(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आहारातील बदल भाग ४९ – चवदार आहार -भाग १०

    मिरची तिखट आहे, अन्नाची चव आणि वास दोन्हींना वाढवते. कोलेस्टेरॉललासुद्धा कमी करते. पण अल्सर होण्याची भीती पण वाढते.

    एकाच वेळी एखाद्या पदार्थाचे गुण पण सांगितले जातात, आणि अवगुण पण.
    गुण वाचताना वाटते...
    व्वा. याच्याएवढं चांगलं काहीच नाही, किती चविष्ट आहे ! छान छान !!
    आणि अवगुण वाचताना वाटतं, याच्याएवढं डेंजर आणि तिख्खट दुसरं काही नाही.

    (मी मोदींबद्दल बोलत नाहीये, तिखट चवी विषयीच बोलतोय.)

    कसं ते बघा.
    तिखट चव इंद्रियांना उत्तेजना देणारी पण शुक्राचा नाश करणारी आहे.
    योग्य प्रमाणात मूर्च्छानाशक तर जरा जास्ती प्रमाणात चक्कर यायला मदत करणारी आहे.
    योग्य प्रमाणात भूक आणि पचनशक्ती वाढवणारी आहे, तर जरा प्रमाणात चुकले तर अंगाची पोटाची आग करवणारी आहे.
    कफनाशक, शरीरातील ओलावा कमी करणारी आणि बंधने सैल करणारी आहे तर त्याच वेळी अशक्तपणा वाढवणारी, धातुंचे बल नाहीसे करणारी पण आहे.
    त्वचा रोगांवर उपयोगी पण आहे आणि त्वचेतून रक्तस्राव घडवणारी पण आहे.
    प्रमेहात उपयोगी पण आहे, आणि नपुंसकता वाढवणारी पण आहे.

    एकाच वेळी ही दोन दोन परस्परांना विरोधी वाटणारी कामे कशी होतात, मराठीत सांगायचे झाले तर हे वाचून फक्त कन्फ्युज व्हायला होते. नेमकं काय करायचं कळतंच नाही.

    असं गोंधळून जाऊ नका. पॅनिक होऊ नका.
    दोन्ही बाजू बरोबर आहेत.

    आहार सहा चवींचा हवा, हे तर आपलं आधीच ठरलेलं होतं. प्रश्न आहे, महत्व कुणाला द्यावं ?

    मिरची खावीशी तर वाटते, पण तिखट लागता नये.
    कोलेस्टेरॉल कमी तर झालं पाहीजे, पण अल्सर होता नये. सगळं एकदम कसं जमणार ?

    वर वर बघताना वाटते, हे खूप डेंजर आहे, पण तसे नाही. दूरगामी परिणाम पण लक्षात घ्यावे लागतात.

    कुछ पाने केलिए कुछ खोना तो पडताही है !
    सगळं काही ठीक होईल.
    कर नाही त्याला डर कशाला ...

    तिखट खाणं बंद पण करायचं नाहीये, आणि भरपूर पण खायचं नाहीये.
    खायचं पण किती, त्याला पण मर्यादा असतात ना !
    माझंच शेत आहे, मी हवं तेवढं खाईन, असं म्हणून मिरच्या खात बसलात, तर दूरगामी परिणाम कसे होतील ?

    आपली क्षमता ओळखा.
    पचनशक्ती ओळखा.
    प्रतिकारशक्ती ओळखा.
    भूतकाळाचा विचार करू नका.
    भविष्याची चिंता करू नका.
    वर्तमानात रहा.
    दुसऱ्यावर विश्वास न टाकता, स्वतःला ओळखा, म्हणजे चुकीचे सल्ले ऐकले जाणार नाहीत.

    पचेल एवढंच खा.
    (मग अन्न असूदे, किंवा पैसा )
    नाही पचलं तर, एकतर देह सोडावा लागतो नाहीतर देश तरी.....

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    10.11.2016

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग सत्तावीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सात

    निसर्गाचे नियम - सर्वांसाठी सारखेच - भाग दोन !

    यापूर्वी लिहिलेल्या उपवास मालिकेमधे खरंतर हे सर्व नियम सांगितले आहेतच, पण.....

    आपलं जसं एक मन असतं, तसं निसर्गाचं एक मन असतं. विश्व मन. आपण जसा विचार करत असतो, तसा निसर्ग पण विचार करत असतो. आपलं मन जेव्हा विश्वमनाशी जोडलं जातं, तेव्हा खूप प्रसन्न वाटतं. विश्वाची सर्व एनर्जी, उर्जा आपण जेव्हा आपल्या मनापासून स्विकारतो, तेव्हा ही आनंदाची अनुभूती आपल्याला येत असते.

    आपण जसा विचार करतो, तसं आरोग्य आपणाला मिळत असतं. कोणत्याही रोगाची बीजे ही आपल्याच मनामधे असतात. ती विश्वमनाशी जोडली गेली की, तीच स्पंदने पुनः आपल्यापाशी येतात.

    आपल्या उपनिषदांमधे हेच सांगितले आहे. ब्रह्मांडामधे प्रचंड शक्ती आहे. ब्रह्मांडातील सर्व चांगल्या गोष्टी माझ्यासाठी दास बनून येऊ शकतात. हे विश्व मला सतत मदत करत आहे. मला माझ्या प्रत्येक कार्यात ही शक्ती सूक्ष्म रूपात मदत करत आहे. माझ्या सर्व गरजा विश्वमनाकडून पुरवल्या जात आहेत. हे विश्व खूप सामर्थ्यशाली आहे, त्यामुळे माझ्या सर्व योग्य गरजा विश्वमनाकडून सहज पूर्ण होणाऱ्या आहेत. त्याच्यासाठी या गरजा म्हणजे किस झाड की पत्ती !

    फक्त योग्य शब्दात, योग्य वेळी त्या मागितल्या पाहिजेत. त्या सर्व इच्छा पूर्ण होणारच आहेत, असा विश्वास पाहिजे, या आनंदात सतत राहिलो तर त्या मिळतातच !

    वास्तुशास्त्रामधे पण हेच सांगितलेले आहे. वास्तु कायम "तथास्तु" म्हणत असतो. घरात कायम सकारात्मक स्पंदने असतील तर कोणतीही प्रबळ अनिष्ट शक्ती कोणताही त्रास देऊ शकत नाही. निसर्गाचे हे नियम, ही स्पंदने, ही उर्जा घेण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. असा सकारात्मक विचार करायला शिकलं पाहिजे.

    माझ्या आजोबांना डायबेटीस होता, वडीलांना पण होता, आता मलाही तो होणार आहे, असा विचार जर मनात प्रबळ होत गेला तर, कितीही पथ्य पाळले तरी डायबेटीस तुम्हाला शोधत तुमच्याकडे येणारच. हाच निसर्गाचा नियम आहे.

    मग विचारांची स्पंदने जर सकारात्मक ठेवली तर विश्वमना पर्यंत पोचणारा परिणाम सकारात्मकच असणार ! म्हणजेच काहीही झाले तरी मला डायबेटीस होणार नाही, वाढलेल्या साखरेचा मला काहीही त्रास होणार नाही, अशी स्पंदने जर निसर्गामधे प्रक्षेपित केली तर तीच स्पंदने जास्त ताकद घेऊन पुनः आपल्याचकडे परत येतात आणि रोगापासून हवे असलेले संरक्षक कवच आपणाला मिळत असते. यालाच आजच्या भाषेत प्रतिकारशक्ती म्हणतात.

    राॅन्डा बर्न यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे, द सिक्रेट नावाचं. या पुस्तकात हेच रहस्य सांगितलेलं आहे. आपण जो विचार करतो, तो एवढा सकारात्मक करा की विश्वमनाशी तो जोडला जाईल.

    रोन्डा बर्न यांचे नाव एवढ्यासाठीच घेतले की आपली मानसिकताच अशी बनली आहे, की पाश्चात्य तज्ञ जे सांगतात, तेच अंतिम सत्य. जणुकाही आकाशातूनच पडले आहे, आपल्या पराभूत भारतीय मानसिकतेचा तो परिणाम आहे, इतकंच. बाकी विशेष नाही.
    सो बी पाॅझिटीव्ह, नेचर हियर्स यु !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    07.05.2017

  • आजचा आरोग्य विचार – भाग नऊ

    भारतातील सर्वसामान्य लोक जसे जगताहेत, त्यांची जीवनशैली कशी होती, याचे निरोगी चित्र डोळ्यासमोर आणण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. राजे महाराजे, त्यांचे मंत्री, राजकारणी किंवा आजचे मंत्री यांच्या छानछौकीबद्दल आपण बोलतच नाही.

  • शतावरी

    शतावरी ह्या वनस्पती बाबत आपल्या पैकी बऱ्याच जणांना माहीत असेल.आपण सर्वांना शतावरी कल्प तर माहितच असेल जो बाळंतीणीला हमखास दुधातून दिला जातो.चला तर आज आपण ह्या शतावरीची थोडी जास्त ओळख करून घेऊ.

    शतावरीचे काटेरी झुपकेदार वेल असतो.ह्याच्या फांद्यावर उभ्या रेषा असतात.काण्ड त्रिकोण,स्निग्ध असते.ह्याचे काटे ०.५-१ सेंमी लांब व खालच्या बाजुस वळलेले काहीसे बाकदार असतात.शतावरीचे काण्ड हे पानां सारखे भासते.२-६ ह्या संख्येत गुच्छात उगवते.१.२५-२-५ सेंमी लांब पातळ व विळ्या प्रमाणे भासते.फुले मंजिरी स्वरूपात उगवतात जी २.५-५ सेंमी लांब एकेरी किंवा गुच्छ रूपात असतात हि सुगंधी व पांढरी किंवा गुलाबी रंगाची असतात.फळ वाटाण्याच्या आकाराचे १-२ बीज युक्त असते.मुळ हे मुल स्तंभापासून जाड लांबट गोल व दोन्हीकडे निमुळती व पांढरी अशी मुळे फुटतात.

    शतावरीचे उपयुक्तांग आहे मुळ.ह्याची चव गोड,कडू असून हि थंड गुणाची व जड,स्निग्ध व मृदू असते.हि वातपित्त नाशक व कफ पोषक आहे पण ओली असताना मात्र कफकर असते.

    चला आता आपण हिचे औषधी उपयोग जाणून घेऊ:

    १)वातनाशक व बल्य असल्याने शतावरी सिद्ध तेल अभ्यंगासाठी वापरतात.

    २)सरक्त मल प्रवृत्तीमध्ये शतावरी सिद्ध घृत चांगले कार्य करते.

    ३)बाळंतीणीस चांगले व भरपूर स्तन्य उत्पत्ती साठी शतावरी सिद्ध दुध देतात.

    ४)अधोग रक्तपित्तामध्ये शतावरीचा काढा अथवा स्वरस वापरतात.

    ५)शतावरी शुक्रधातूची वाढ करते तसेच ती गर्भाशय पोषक देखील आहे.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • वदनी कवल भाग २

    नाम घ्या श्री हरीचे......

    गजर करणे, जयजयकार करणे म्हणजे देवाचे नाव घेणे, त्याला हाक मारणे, आणि त्याला आपली सतत आठवण करून देणे.

    या अन्नप्रार्थनेमधे खूप मोठा अर्थ सामावलेला आहे.

    तू दिलेल्या वाचेने, तुझे नाम अगदी सहजपणे मी घेतोय, त्यासाठी कोणतेही मोल मला द्यावे लागत नाही. तुच दिलेले अन्न सेवन करतोय, पोटात ढकलतोय, आता पुढची जबाबदारी हे दयाघना, आता तू स्विकार !
    कारण भगवंता, तूच गीतेमधे सांगितले आहेस,
    अहं वैश्वानरो भूत्वां
    प्राणीनां देहमाश्रितम ....
    "*मीच* जठराग्नि आहे. चारही प्रकारचे अन्न मीचपचवतो. (तुम्ही फक्त माझ्यापर्यंत आणून पोचवा.) तुमच्या कर्मसिद्धांतानुसार मीच त्याचे योग्य ते फळ, योग्य त्या वेळी देणार आहे. आणि या मिळणार्‍या फळाची आसक्ती न ठेवता, तू तुझे कर्म केवळ कर्तव्य म्हणून करीत रहा."

    तुझ्याशिवाय हे अन्न पचवणारा कोण आहे ? हा भाव मनी ठेवावा.
    हे खरेच आहे.

    आपण फक्त अन्न खातो. त्यापासून लाल रंगाचे रक्त तयार करणे, घट्ट असलेले मांस हाडे यांची निर्मिती करणे, मातृस्तनी पांढरे दूध निर्माण करणे, पाण्याच्या रंगाचे मूत्र बाहेर काढणे, इ. सर्व नियंत्रित करणारी एक शक्ती आहे,
    (तिलाच आध्यात्मिक भाषेत ईश्वर आणि आयुर्वेदीय भाषेत अग्नि असे म्हणतात.)
    आणि हे सर्व आपल्याच पोटात चालले आहे, याची साधी जाणीव सुद्धा आपल्याला नसणे हेच, त्याच्या अस्तित्वाचे लक्षण आहे. अदभुत यंत्र आहे हे शरीर ! म्हणूनच तर समर्थ म्हणतात, "या शरीरासारीखे दुसरे यंत्र नाही "

    हे शरीर त्याने एवढे गुंतागुंतीचे बनवले आहे, पण प्रत्येक स्पेअर पार्टचे काम अगदी चोख.

    कशासाठी हे अन्न मी सेवणार? याचा विचार अन्न घेत असताना व्हायला हवा. माझ्या आहाराने मला शक्ती मिळते आहे, आणि ही देहशक्ती मला देशभक्ती वाढवण्यासाठी वापरायची आहे, हेच माझ्यासाठीचे जीवन कर्म असेल,

    उदरभरण नोहे म्हणजे केवळ पोट भरणे नाही, तर ही देवाला दिलेली जणुकाही आहुतीच आहे, माझ्या मीपणाची, अहंकाराची, आहुती मी या यज्ञात हवन करतोय, असा भाव निर्माण करणारी बुद्धी, याच अन्नातून निर्माण होणारी आहे, ती उत्तम गुणी बुद्धी फक्त तू मला दे ! हा देणारा दुसरा तिसरा कोणी नसून तू स्वतःच अन्नरूप ब्रह्म आहेस !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.

    05.09.2016

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग सतरा

    "गॅसवर तुमच्याकडे काही परमनंट औषध आहे काहो ? "

    90% पेशंटचा 100 % विचारला जाणारा एकमेव भाबडा प्रश्न. ज्यावर डाॅक्टरांची विकेटच पडते. आता या प्रश्नाचे उत्तर एका ओळीत, एका शब्दात, आणि एखाद्या औषधांनी, कसं काय देता येणार ?

    अख्खं वर्ष हेच समजावून सांगण्यात गेलंय, की रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा होऊ नये यासाठी सावधानता बाळगणे, केव्हाही चांगलेच ना !

    दर दोन चार तासांनी खा खा खाल्ले तर पचन करायला वेळ कधी देणार ? मग वात बिघडणारच. आपल्याच कर्मानी विकृत झालेला हा वात म्हणजे आजच्या काळातील 'गॅस' होय.

    आपल्यासाठी हा वात वाढवणारे पदार्थ कोणते ते शोधून बंद करणे हे आपणच शोधायचे. कारण आपण काय खातोय यापेक्षा कसे पचवतोय हे जास्ती महत्त्वाचे आहे. खाल्लेल्याचे पचन होणे, त्यावर अग्निची प्रक्रिया होणे महत्त्वाचे ! अग्निच्या जे जे विरोधात ते ते सर्व वात वाढवणारे. जसे पाणी. अतिरिक्त प्रमाणात, चुकीच्या वेळी घेतलेले, पाणी हे वात वाढवते.

    आंबोळी इडलीच्या सुक्या पीठात पाणी घातल्यानंतरच आंबायला सुरवात होते ना ! पाणी घातल्यानंतरच पीठ फुगते, दुप्पट होते, पीठाची चव बदलते, स्वरूप पालटते, पीठ बुडबुडेयुक्त दिसते, हे सर्व बदल पीठामधे कोणी केले ? एका पाण्याने केले. म्हणजे इडली डोसा पाव पिझ्झा यासारख्या आंबवलेल्या पदार्थात गॅस मुळातच जास्ती असतो, म्हणजे आंबवलेल्या पीठाचे सर्व प्रकार गॅस वाढवतात.

    पण क्वचित प्रसंगी हे पदार्थ खावेच लागणार असतील तर याच पीठाचे खमंग, कुरकुरीत डोसे करून खावेत, खाल्ले तरी ते दिवसाचेच खावे आणि ते पचेपर्यंत दुसरे काहीही खाऊ नये, ही युक्ती आहे. हा पर्याय आहे. सोयीस्कर अर्थ काढू नयेत.

    जेवणामधे कच्चे तेल आणि सर्व प्रकारचे कच्चे मसाले वापरले तर गॅस कमी होतो.

    सूर्यास्तापूर्वी घेतलेले जेवण, गरम गरम जेवण, गोड, आंबट, खारट चवींनीयुक्त जेवण, वाताचा म्हणजे गॅसचा नाश करते. जेवणात सहा चवी आवश्यक आहेत. एखादी चव जरी कमी पडली तरी गॅस होणार.

    पाणी, तेल आणि अन्नपचन या विषयावरील मागील सर्व टीपा पुनः वाचाव्यात. नाहीतर पुनरूक्ती दोष उत्पन्न होईल.

    नियमितपणे मलप्रवृत्ती साफ राहील, असे पहावे. जेव्हा मलप्रवर्तन करावेसे वाटेल, तेव्हा "त्याचे" लगेचच ऐकावे. आणि मलमूत्र विसर्जन करून यावे. यासाठी आतून "तो" काय सांगतोय, यावर सतत लक्ष ठेवावे, म्हणजे गॅस होणार नाही.

    जे अन्नपाणी साठवलेले असते, ते गॅस वाढवणारे असते. अन्नपाणी कुजल्यावर त्यामधे गॅस तयार होतो. पालेभाज्या, कच्ची खाल्ली जाणारी आणि मोड आणून पचायला जड बनवलेली कडधान्ये, खूप पिकलेली फळे, फ्रीजमधील अन्नपदार्थ ( ते सर्व शिळेच होतात. ) रात्र उलटून गेलेला तयार आहार, गॅस वाढवतो.

    पोटात अवकाश न ठेवता ठासलेले, बकाबका खाल्लेले, बळेबळे भरवले जाणारे, मनाविरुद्ध खाल्लेले अन्न देखील गॅस वाढवणारे असते.

    जसे गाडीचे अग्निस्थान म्हणजे कार्बोरेटर आणि अतिरिक्त वायुवाहक पुंगळी म्हणजे सायलेन्सर साफ असेल, तरच गाडीचे अॅव्हरेज वाढते, हे खरे आहे ना ?

    -- वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    01.04.2017

  • किचन क्लिनीक – शिंगाडा – (कमलकंद)

    किचन क्लिनीक – शिंगाडा – (कमलकंद)

    उपावासा साठी प्रसिध्द असा हा पदार्थ.काही जण हा कंद नुसता उकडून देखील आवडीने खातात किंवा मग ह्याच्या पिठाचा वापर वेगवेगळे उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो.

    हा काळा जाडसर साल असणारा कंद अातून मात्र पांढरा शुभ्र असतो.जसा ह्याचा उपयोग स्वयंपाकात केला जातो तसाच ह्याचा घरगुती उपचारात देखील वापर केला जातो.

    शिंगाडा चवीला गोड तुरट असतो व थंड असतो त्यामुळे तो शरीरातील वात व कफ दोष वाढवितो तर पित्त दोष कमी करतो.

    चला मग ह्याचे घरगुती उपचार पहायचे ना:

    १)अम्लपित्तामध्ये १ टेबल संपून शिंगाडा पीठ + १ कप दूध+ १ कप पाणी घालून खीर करावी व त्यात खडीसाखर घालून रोज ४ तासांनी एकदा हि खीर थंड करून खावी.

    २)पित्तामुळे अतिभूक लागून काही व्यक्ती खुप खातात त्यांना शिंगाड्याच्या पिठाचा तुपावर परतून केलेला शिरा खायला द्यावा.

    ३)शरीरात रक्त कमी असल्यास १ मोठा चमचा शिंगाडा पीठ व १ काळा खजूर तुपावर परतून गोळा बनवावा व असा गोळा रोज सकाळी उपाशी पोटी खावा व मग त्यावर तासभर काही ही खाऊ नये.

    ४)डोळ्याची आग होणे,डोळे लाल होणे ह्या तक्रारींवर शिंगाडा पीठ तूपावर परतून रात्री चघळून खावे हा प्रयोग २ महीने करावा.

    ५)आतड्यातून अन्न लवकर पुढे सरकल्यास संडासला साफ न होणे,वारंवार दुर्गंध युक्त संडास होणे,पातळ भसर संडासला होणे ह्या तक्रारी सुरू होतात.त्यावेळी शिंगाडा पीठाची भाकरी मसूरच्या कढणासह खावी ह्याने आतड्याची गती नियंत्रणात रहायला मदत होते.

    शिंगाडा पीठ अतिमात्रेत खाल्ल्यास संडासला घट्ट होऊ शकते.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग आठ

    लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 4

    आपण अवलंबून रहात असलेल्या रिपोर्ट मधला फोलपणा आपल्याला काही वेळा दुसरे निदान करायला भाग पाडतो. निदानच बदलले तर चिकित्सा पण बदलत जाते, पथ्यपाणी बदलते.
    आयुर्वेदाचा एखाद्या रोगाच्या चिकित्सेमागील दृष्टीकोन लक्षात यावा यासाठी हे लिहितोय.

    म्हणून वैद्य जेव्हा रूग्णांची तपासणी करतात, तेव्हा रिपोर्ट तपासणे, हा कार्यक्रम सगळ्यात शेवट पार पाडतात. पण रूग्णांना काय कौतुक असते, रिपोर्ट दाखवण्याचे ! एवढ्याऽऽऽऽऽ तपासण्या केल्यात ! ही एवढी फाईल. ज्याचा खरंतर त्यावेळेस काऽऽही उपयोग नसतो.

    हे सर्व रिपोर्ट का करायचे, तर त्यावेळेस रुग्णाची काय परिस्थिती होती, एवढंच समजण्यासाठी. तो रिपोर्ट " असा " का आला याचे उत्तर मात्र कोणाकडेच नसते. तो आत्ताच असा का आला, याचेही उत्तर कोणाकडे नसते. हे कमी आहे, आणि हे वाढले आहे, त्यासाठी आमच्याकडे हे औषध आहे, हे उत्तर मात्र सगळ्यांकडे असतं. फक्त कंपन्यांची नाव फक्त बदलतात. एवढंच !

    आयुर्वेदात अश्या काही प्रयोगशालेय चाचण्या सांगितलेल्या नाहीत का ?
    आयुर्वेदातील सारे निष्कर्ष हे संशोधनाअंतीच लिहिलेले आहेत. "इदं आगमसिद्धत्त्वात्" असे ग्रंथकर्ते स्पष्टपणे सांगतात. ते म्हणतात,
    " हे आम्ही यापूर्वी तपासून बघितलेले आहे, आता यावर पुनः डोके खर्च करू नका. यापुढील संशोधन करा."
    त्वचेची, रक्ताची रंग परीक्षा, लघवीची तेलबिंदू परीक्षा, मलाची परीक्षा करून निदान कसे करावे, हे सुस्पष्ट पणे मांडून ठेवलेले आहे. काळाच्या ओघात यातील काही तपासण्या मागेच राहिल्या, त्यातील मुत्राच्या तैलबिंदू परिक्षणा सारख्या परीक्षांचा वैद्यांनी पुनः अभ्यास करायला हवाय.

    थोडं विषयांतर होतंय, पण मनात आलं ते लिहून टाकतो,

    कावीळ झालेली नाही, काविळीचे एकही लक्षण रूग्ण सांगत नाही. पण रिपोर्टमधे कुठेतरी विकृती दाखवली जाते, कावीळ वाढू नये म्हणून उगाचच आयुष्यभर पथ्य करीत बसायचे असते का ? रोगापेक्षा रोगाची भीती ही आपल्याला मृत्युकडे लवकर नेणारी असते.

    त्यापेक्षा कोणताही रोग होऊ नये यासाठी आपली प्रतिकारक्षमताच एवढी वाढवून ठेवावी, की चुकुन जरी काही वेळा अपथ्य झाले तरी, काहीही होता कामा नये.

    चेक बाऊंस होऊ नये यासाठी कसं पुरेसा बॅलन्स अकाउंटमधे ठेवणे आवश्यक असते, तसं आपल्याकडील इंद्रियांच्या सर्व क्षमता एवढ्या वाढवून ठेवायच्या की, चुकुन एखाद्या वेळी एखाद्या रोगाचा सामना करायची वेळ आलीच तर पुरेसा शक्तीचा साठा आपल्याकडे तयार असेल. ऐनवेळी कुठे जाणार ना ! एनी टाईम मनी कधी मिळतील? पुरेसा बॅलन्स असेल तरच !

    केवळ अॅण्टीऑक्सीडंटस् घेणे म्हणजे प्रतिकार क्षमता वाढवणे नव्हे हं !
    हे सगळं पाश्चात्य डोकं. त्यांना सगळं कसं इन्स्टंट हवं असतं. पाणी विहिरीतून येतं, त्यासाठी ती जमिन खणावी लागते, विहिर बांधावी लागते, तरच विहिरीला असलेले पाणी हवे तेव्हा वापरता येते.

    हे कोणाला कळेल ? ज्यांनी कायम टॅप वाॅटरच वापरले आहे त्यांना ? विहिरच बघीतली नाही त्यांना ? मग त्यांच्यासाठी वेगळी गरज निर्माण होते, त्याला ते इन्स्टंट म्हणतात.

    एक गोळी टाकली तोंडात की आली एनर्जी. असं कुठाय ? ती काय हवा आहे का ? चाकाला ट्यूब जोडली आणि हवा भरली !

    तसं शोधायला गेलं तर आयुर्वेदातील सगळी रसायन औषधे ही अॅण्टी ऑक्सीडंटच आहेत. सगळे मसाल्याचे पदार्थ अॅण्टीऑक्सीडंटच आहेत. असो. पाश्चात्यांची संशोधक वृत्ती मात्र अभ्यासण्यासारखी आहे. छोट्या छोट्या गोष्टींचाही ते अतिशय मनापासून अभ्यास करतात, आणि महत्त्वाचे म्हणजे आपले संशोधन लिहून ठेवतात, इतरांना सांगतात. त्यामुळे पुढील पिढीला त्याचा फायदा होतो. एकदा झालेली चुक टाळता येते.

    भारतीय संशोधनातील एक मोठ्ठा दोष हा रहातो, की आमचं डाॅक्युमेंटेशन नीट होत नाही. ज्यावेळी जे गरजेचं आहे, ते केलंय. काहीवेळा, त्याचं महत्व लक्षात येत नाही, काही वेळा, कशाला लिहून ठेवायचं, राहातंय लक्षात. असं म्हटलं जातं.
    मग कधीतरी गरज असते तेव्हा इसारलंय म्हटलं की झालं....
    भारतीय संशोधक प्रत्येक वेळी चुकतात असं नाही,
    आता इस्रोचीच गोष्टच बघा ना !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    18.02.2017

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग पंचवीस

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे एकतीस
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
    निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग पंचवीस

    नित्यं हिताहारविहारसेवी
    समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
    दाता समः सत्यपरः क्षमावान
    आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

    पाचकळ बाचकळ बोलू नये
    ज्या बोलण्याचा काहीच फायदा होत नसतो, ते बोलण्यात उगाच वेळ घालवू नये. आपल्या बोलण्यातून दोन अर्थ निघतील, असं पाचकट बोलणं झालं तर ऐकणारा तुमची वैचारिक पातळी ओळखतो. आपणच आपली किंमत कमी करून घेत असतो. म्हणून कधी पाचकट बोलू नये.

    बाचकळ म्हणजे बालीश बोलणे करू नये. आपली पत, आपली योग्यता, आपला व्यवसाय, आपल्या समाजातील मानाच्या स्थानाला कधीही धक्का पोचेल असे आपले बोलणे करू नये, विशेषतः बालीशपणाने पण बोलू नये. आपल्या बोलण्याने आपल्याच माणसाची मानहानी होईल असे वागू नये. वेळ काळ पाहून बोलावे.

    फिदी फिदी उगा हसू नये
    चार चौघात असताना उगाच गरजेपेक्षा जास्त मोठ्या आवाजात हसू नये, याने खरंतर आपलेच हसे होत असते.

    भोकाड मोठे पसरू नये
    रडणे हा जरी मनावरचा ताण कमी करणारा वेग असला तरी त्याचे उदीरण किंवा प्रवर्तनाचे नाटक होऊ नये. रडण्यामुळे मनावरचा ताण हलका होतो. पण अति सर्वत्र वर्ज्ययेत या न्यायाने मोठ्या आवाजात रडू नये. आपले रडणे चार भिंतींच्या आत असावे. ते पलिकडील भिंतीला कळले की तिसऱ्या कानाला सुद्धा आपोआपच समजते. आणि भिंतीच्या कानाचे ओठ होतात, आणि ते बोलू लागतात.

    फुकाचे बोल बोलू नये
    वांझोट्या चर्चा करून काहीही साध्य होत नाही. ज्यातून काहीही निष्कर्ष निघण्याची शक्यताच नसते, अशा गोष्टी करून काय साध्य होणार असते ?
    समर्थ म्हणतात, अशा ठिकाणी आपली बुद्धी वेळ आणि पैसा संपवू नये.
    धकाधकीचा मामला
    कैसा घडे अशक्ताला ........
    जो वैचारिक दृष्टीने अशक्त आहे त्याला विज्ञानातील मोठे मोठ्या जड शब्दांचे अर्थ कसे समजणार ?

    प्रयत्न कधी सोडू नये.
    सतत प्रयत्नशील आणि प्रयोगशील रहावे. नवनवीन पद्धतीने कार्य करावे. शंभर घाव घातले की फुटणारा दगड नव्याण्णव घाव घालून फुटत नाही, आता काही होणार नाही, असे म्हणून प्रयत्न थांबवणाऱ्याला काहीच लाभ होत नाही. मागाहून येणारा एकमेव शेवटचा घाव दगडावर घालतो आणि त्याच्या एका घावाने दगड फुटतो. म्हणून प्रयत्न कधी सोडू नयेत.

    प्रयत्न सोडणे म्हणजे जगण्यावरील विश्वास सोडून देणे. हे जे आई मुलांना सांगते त्यात आईचे काय चुकले ?

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग सात

    आपल्या नेहेमीच्या कामात, दुसऱ्याने केलेली ढवळाढवळ आपण मान्य करीत नाही. मग शरीराने तरी का मंजुरी द्यावी ?