"आम्हाला हे असं लवकर जेवणं अजिबात शक्य नाही, हो!" असं सांगणाऱ्या करीता खास टीप....
सक्काळी सकाळी उठायचं, भराभरा आवरायचं डब्बा बनवायचा, पोरांना शाळेत हाकलायचं, नवरा कामाला पाठवलं की कसाबसा चहात पाव बुचकळून खायचा, म्हणजे झाला नाश्ता. वर पाणी ढोसायचं, आपला डबा करायचा, धावधाव करीत ऑफीस गाठायचं, बाॅसची बोलणी खायची, परत घरी येताना मार्केट मार्गे खरेदी करून, येऊन कंबर कसून परत कामाला लागायचं, टीव्ही समोर बसलेल्यांना तिथे नेऊन चहा बिस्कीट खायला द्यायची, कपबशासुद्धा आपणच घरात न्यायच्या. रात्रीच्या जेवणाचं बघायचं, हे करत असताना, तू आज कशी चुकलीस, हे समोर खुर्चीवर ढेंग टाकून निवांत बसलेल्याकडून निमूटपणे ऐकून घ्यायचं. तोंडातून एकही अवाक्षर न काढता, जेवणाचा कार्यक्रम पार पाडायचा, आपणच डाॅक्टरकडे जाऊन आणलेल्या गोळ्या आपणच घ्यायच्या आणि कधी एकदा पडता येतंय याची वाट बघायची ......
हे सर्व कशासाठी करताय ?
दोन घास सुखानं खाता यावेत म्हणून ना.....
खाल्लेलं अंगाला लागण्यासाठीच ना.....
पण जरं या व्यस्त दिनचर्येतून जर शेवटच्या दोन ओळी साध्य होणार नसतील तर ? सगळा खटाटोप कशासाठी करताय ?
कशासाठी ? पोटासाठी !
एकच बदल करून पहा,
फक्त जेवणाची वेळ बदला...
आता असं करता येतं का बघा.
सकाळचा नाश्ता कॅन्सल.
नाश्त्याऐवजी थेट पोटभर जेवण.
दुपारचं जेवण / डबा कॅन्सल.
सायंकाळी घरी आल्यावर पोटभर जेवण.
( जे सातला घरी पोचू शकत नाहीत, त्यांनी सायंकाळचा डबा सोबत न्यावा.)
दोन वेळा जेवण बनवायचंच नाही. फक्त सकाळी एकदाच जेवण बनवण्यात वेळ खर्च करायचा. एक पदार्थ फक्त सायंकाळी नवीन करायचा. बाकीचे तीन प्रकार सकाळचेच.
सूर्य असल्यामुळे सकाळचे तयार अन्न सायंकाळ पर्यंत नासत नाही. सायंकाळी बनवलेले मात्र सकाळी फुकट जाते.
दुपारचा डबा अगदी भुकेपुरताच. सायंकाळच्या भूकेची जाणीव ठेवणारा.
दुसरे मुख्य जेवण सायंकाळी सात वाजता.
बाकी जेवणात कोणतेही पथ्य करायचे नाही.
सूर्योदय ते सूर्यास्त सगळं खायचं, पोटभर खायचं, मनसोक्त खायचं.... कावळ्यासारखं !
पथ्य एकच ....
खाताना भीती न बाळगता खायचं. आणि खाल्ल्यानंतर खाल्लेलं सगळं विसरून जायचं. खाल्लेलं आठवायचं नाही, मनात साठवायचं नाही.
बायकांचा स्वयंपाकघरात जाणारा आणि "रांधा वाढा उष्टी काढा" मधे खर्च होणारा वेळ वाचेल.
सायंकाळी साडेसातनंतर स्वयंपाकघर बंद.
सहकुटुंब सहपरिवार कुठेतरी शाॅपिंग, देऊळ, बाग.... थोडं मोकळे वाटेल.
स्वयंपाकघरातला वेळ वाचेल,
फॅमिली लाईफ एन्जाॅय करता येईल, हौस, मौज करता येईल.... आणि बरंच काही...
मुख्य म्हणजे निरर्थक औषधांशिवाय, निरामय जीवन जगत सगळं जेवण घेता येईल.
नाहीतर......
डोंबिवली फास्ट पकडत, दिवसभर धांगड धिंगा करत, ज्या पोटात आहार टाकल्यानंतर त्याचे रूपांतर उर्जेमधे होते, त्याऐवजी, त्याच पोटात रोज न चुकता, जन्मभर पुरणारी औषधं टाकायची आहेतच...
आणि डाॅक्टरच लिहून देतात हल्ली...
वरील सर्व औषधे पांडुरंगाच्या चरणी विलीन होईपर्यंत सुरू ठेवावीत......
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
06.03.2017
जर हे सर्व विश्व, एक कुटुंब एक क्षणभर जरी मानले तरी, या कुटुंबातील प्रत्येक देश, हा या घराचा सदस्य झाला.
या प्रत्येकाला जर हे घर “वाटायचे” ठरवले तर प्रत्येक खोलीची जबाबदारी वाटून द्यावी लागेल.
ज्याची मास्टरी ज्याच्यात, त्याला ती जबाबदारी द्यावी.
हि प्रत्येकाची आवडती.हिला बोली भाषेत तवसे देखील म्हणतात.हिची कोशिंबीर,रायते अगदी लाजवाब लागते.गरमी मध्ये शरीर व मन थंड करणारी हि काकडी सगळ्यांचीच लाडकी.
हिचा उपयोग स्वयंपाका मध्ये जसा होतो तसाच हिचा वापर आपण घरगुती औषध उपचारात देखील करू शकतो.
हिचा वर्षायू रोमश वेल असतो.आणि ह्याच वेलीला हि रसरशीत फिक्कट हिरव्या रंगांची फळे लागतात जे चवीला गोड व थंड असते.त्यामुळेच हे शरीरातील पित्तदोष कमी करते व वात व कफ दोष वाढविते.
आता आपण हिचे औषधी उपयोग पाहू:
१)अंगाची जळजळ होत असल्यास काकडीचा लेप लावावा व हिच्या बिया थंडाई मध्ये घालून देतात.
२)लघ्वी कमी होत असेल तर काकडीचे बी, जिरे व साखर पाण्यात घालून केलेला काढा प्यावा फायदा होतो.
३)अंगावर पांढरे जात असल्यास १ ग्राम काकडी बी मधला गर + १ ग्राम पांढ-या कमळाच्या पाकळ्या वाटून त्यात जिरे व खडीसाखर घालून ७ दिवस खावे.
४)उन्हाळयात उष्णता कमी करायला काकडी चिरून त्यात खडीसाखर व लिंबाचा रस घालून खावी.
५)छातीत जळ जळ होत असल्यास ४ चमचे काकडी रस+खडीसाखर हे मिश्रण सकाळी उपाशी पोटी घ्यावे.
६)गव्हाचे पदार्थ खाऊन जर अजीर्ण झाले तर त्यावर उतारा म्हणून काकडी खावी.
अतिमात्रेत काकडी खाल्ल्यास सर्दी होते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 27-नैवेद्यम् समर्पयामी-भाग एक
आपल्यासाठी देवपूजेतील एक महत्वाचा उपचार म्हणजे नैवेद्य. कारण आपणाला निश्चितपणे माहिती असते, की जो नैवेद्योपचार आपण देवासाठी म्हणून करत आहोत, तो देवासाठी नसून, आपल्या देहासाठीच आहे. तो नैवेद्य नंतर आपणालाच खायला मिळणार आहे. मग तो गणपतीचा मोदक असो किंवा म्हसोबासाठीचा बोकड. नाव देवाचे खातो आपणच.
निवृत्तीनाथ इंदोरीकर एका किर्तनात म्हणतात,
"किती स्वार्थी आहोत आपण. 'बोकड देवासाठी' असं म्हणत देवाला काय देतात तर खूर. जो शिजत नाही. तो शिजला असता तर तोही दिला नसता, विठ्ठल विठ्ठल"
देवपूजा दिवसातून किती वेळा केली जाते ? दोन वेळा. सकाळी आणि सायंकाळी. दिवसभर देवपूजा असते का ? नाही. दोनवेळा देवपूजा तसे दोन वेळा नैवेद्य. इथे आरोग्य दडलेले आहे. दिवसभर चरत राहायचे नसते. जे काही खायचे ते दोन वेळा पोटभर हा महत्त्वाचा सिद्धांत इथे सांगितलेला आहे.
भारतीय परंपरांना आरोग्याच्या दृष्टीने किती महत्त्व आहे, ते इथे लक्षात येते. कारण अन्य कोणत्याही धर्मात अशी षोडशोपचार पूजा नाही, असे नैवेद्य नाहीत. अन्य चार पाच सण सोडले तर फार मोठे सण नाहीत. त्यामागे फार मोठे लाॅजिक नाही. जे सण म्हणून साजरे केले जातात, ते फक्त प्रेषितांच्या जयंत्या अथवा मयंत्या. किंवा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग लक्षात ठेवण्यासाठी, त्यांचे कार्यकर्तृत्व स्मरणात रहावे यासाठी केलेली सोय असते. पुष्पगुच्छ किंवा बुके आणून ठेवला, मेणबत्ती पेटवली की, झालं. उपचार म्हणून नाही.
आज आमच्या हिंदू धर्मामधे देखील हे नुसते कर्मकांड उरले आहे. एखाद्या महामानवाच्या नावे जयंती किंवा पुण्यतिथीच्या निमित्ताने जुलुस, जलसा, डीजे, आणि पार्टी ! मग ते महामानव गांधी असोत वा आमचे आंबेडकर किंवा आमचेच सम्राट अशोक असोत, या महामानवांनी सांगितलेली तत्वे सोयीस्कर विसरवली जातात, आणि फक्त जातीचे राजकारण पसरवले जाते.
आणखीन दुर्दैव हेच आहे की प्रत्येकाने आपले झेंडे देखील वेगळे केलेत, रंग देखील वाटून घेतलेत, महापुरूष पण वाटून घेतलेत.
मोहनदास करमचंद गांधीचा आत्मा, ड्रायडेच्या निमित्ताने कुठेतरी म्हणत असेल "हेची फळ काय मम तपाला" ! मी आयुष्यभर काय सांगितले आणि माझे अनुयायी माझ्या नावाने काय करत आहेत ? माझे गुण जाऊदेत, अहिंसा जाऊदेत, सत्य जाऊदेत, माझ्याच नावाची टोपी घालून, मद्यपान करत, मांसाचाच चकणा भरताहेत. हे केवळ गांधीचे दुःख नाही तर सर्वच महामानवांचे दुःख आहे. असो.
षोडशोपचार पूजेचे हे वैशिष्ट्य फक्त हिंदू धर्मामध्येच. धर्मसूत्रे नीट अभ्यासली तर त्यामागे असलेले शास्त्र समजून घेतले तर ती अंधश्रद्धा, बुरसटलेले कालबाह्य विचार नसून, सुसंस्कृत जीवन जगण्याची एक आदर्श पद्धत आहे, असे लक्षात येते.
राजकारणातील काही स्वार्थी माणसांनी किंवा काही जातीयवादी माणसांनी राजकारण म्हणून या चालीरीतींवर टीका करायला सुरवात केली, आणि आमच्या मनात विकल्प यायला सुरवात झाली. एकेकाळी शिक्षण व्यवस्थेमधे असणारे सर्व हिंदू धर्मग्रंथ, मेकाॅलेच्या कुटनीतीला बळी पडून आमच्या शिक्षणातूनच गायब करण्यात आले. मूळ पायाच डळमळीत केला तर इमारत केव्हाही पडू शकते, या सिद्धांतानुसार, हिंदुंचे धर्मग्रंथ देवघरात फूल वाहून, पोथीरूपात बंद झाले. ते गेल्या पन्नास साठ वर्षात कधी उघडून, वाचून, आचरणात आणले गेले नाहीत, परिणामी धर्मग्रंथात काय सांगितले गेले होते, का सांगितले होते, त्याचे भावार्थ काय होते ?त्यात नेमके काय समजून घ्यायचे असते, ही दृष्टी नाहीशी झाल्यामुळे आम्हाला आमचेच धर्मग्रंथ म्हणजे जणुकाही पुराणातली वांगीच वाटू लागली. भीतीपोटी केवळ उपचार शिल्लक राहिले आणि उपचारामागील विज्ञान विसरले गेले. आणि फक्त कर्मकांड म्हणून आमचेच बुद्धिमान पंडीत आपल्याच धर्मग्रंथाची हेटाळणी करू लागले.
नैवेद्याचे रूपांतर पार्टी पर्यंत येऊन पोचले आहे, ही शोकांतिका आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
20.06.2017
रस्साभाजी मधे रस्सा महत्वाचा !
ग्रेव्ही महत्वाची. त्यातले पदार्थ बदलले की परिणाम बदलणार .
जसं कोणत्याही भाजीतले पाणी हे वात वाढवणारे असते. पण पाण्याशिवाय, केवळ परतून किंवा वाफेवर, ज्या भाज्या बनवल्या जातात, त्या वात वाढवत नाहीत.
पण पाणी घालून शिजवलेल्या भाज्या वात वाढवतात.
जसं बटाटा हा वात वाढवतो. म्हणजे बटाटावडा करताना बटाटा जसा शिजवला जातो तसा पाण्यात शिजवला तर वात हमखास वाढणार. बटाट्याच्या काचऱ्या केल्या तर त्याला पाणी लागत नाही. म्हणून वात तेवढा वाढणार नाही. बटाटे चिरून, थोड्याश्या तेलात परतून मग पाणी घालून शिजवले तरी त्याचे गुण बदलतात.
पण हाच बटाटा बार्बिक्यु सारखा थेट अग्निवर भाजला तर पचायला शिजवल्यापेक्षा, काचऱ्यांपेक्षाही हलका होतो.
भरली वांगी वांग्यामधे मसाला भरून केली जातात. पण भाजली जात नाहीत, फक्त शिजवली जातात, म्हणून पचायला जड होतात.
वांगी बटाटा रस्सा हा फोडी परतून नंतर पाणी, मसालाग्रेव्ही घालून केला जातो. भाजल्यामुळे पचन थोडे सुलभ होते.
वांग्याच्या काचऱ्या नुसत्याच परतल्या जातात, पाणी घातलेच जात नाही, म्हणून वांग्याच्या काचऱ्यांची भाजी पचायला हलकी. तर भरताचे वांगे शिजवण्याऐवजी भाजलेच जाते. पचायला आणखी हलके. वांगे एकच. मसाला जवळपास तोच. पण संस्कार बदलले की गुणधर्म बदलतात.
पदार्थ जरी तिखट चवीचा असला तरी, तो पदार्थ बनवताना कसा बनवला जातोय, हे महत्वाचे.
म्हणून रसभाजी, सुकी भाजी, परतून भाजी आणि बार्बिक्यु या सर्व तिखट पदार्थांचे परिणाम वेगवेगळे होतात.
हा आहे संस्काराचा परिणाम.
ग्रेव्ही करताना जे पदार्थ वापरले जातात, ते सुद्धा वेगवेगळे परिणाम दाखवतात. कांदा टोमॅटोची ग्रेव्ही, नारळाची ग्रेव्ही, काजूची ग्रेव्ही, ही क्रमशः पचायला जड होत जाते.
कोकणात रसभाजीला, चणाडाळीच्या पीठाचे अळण लावतात. अळण म्हणजे भाजीला घट्टपणा येण्यासाठी, भाजीतला रस आळण्यासाठी घातला जाणारा पदार्थ.
काही ठिकाणी तांदुळाचे पीठ पण वापरतात.
पाणी आणि भाजी शिजवल्यावर एकजीव होऊन जावीत, एकमेकांशी फटकून वागू नयेत, वाढलेल्या ताटात वेगळे वळण काढू नये, यासाठी हे अळण.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
15.11.2016
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक - चार
जगण्यासाठी औषधं काम करत नाही.- भाग दहा
" जेनेरीक आणि ब्रॅण्डेड असं आयुर्वेदात नाही का हो भाऊ ?
सध्या जेनेरीक आणि ब्रॅण्डेडचे वारे वाहाताहेत वाॅटसप वर ! म्हटलं आपल्या आयुर्वेदात असं काही असतं का ? आयुर्वेदातील काही औषध महाग असतात, म्हणून विचारतोय राग मानू नका."
एका रुग्णाचा फोनवरून भाबडेपणाने विचारलेला एक सहज प्रश्न.
खरंतर हाच विषय यापूर्वी गेल्या वर्षी वेगळ्या टायटलने येऊन गेला आहे. त्यावेळी टायटल होते, "स्वदेशी देशी आणि विदेशी !"
एकदा अकबराने प्रश्न विचारला,
सर्वात मोठे शस्त्र कोणते ?
बिरबलाने नेहेमीप्रमाणे हजरजबाबी उत्तर दिलं, हाती असेल ते
आयुर्वेदाला काय जेनेरीक काय ब्रॅण्डेड ! रुग्णाला गुण येणं महत्वाचे !
न तु अहं कामये राज्यं
न स्वर्गं न अपुनर्भवम्।
कामये दु:खतप्तानां
प्राणिनाम् आर्तिनाशनम्।।
या श्लोकाचा अर्थ लक्षात घेतला कि औषधांच्या अर्थ व्यवस्थेत, काही अर्थ नाही हे लक्षात येईल.
श्लोककर्ते म्हणताहेत,
मला राज्य नको, मला स्वर्गातील इंद्रपदही नको, मला पुनः जन्म नको,
( मला कोणत्याही राजकीय पाठींब्याची गरज नाही, मला मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा मोह पण नाही, मला परत इलेक्शनलाही उभे राहायचे नाही, )
रोगाच्या दुःखाने तप्त झालेल्या माझ्या रुग्णांच्या वेदना तात्काळ कमी करण्यासाठी जे काही करता येईल, ते मी करेन.
( पण समाजसेवा करण्यासाठी मला स्वतंत्र पक्षही काढायचा नाही, जे काही करायचे ते तुमच्याबरोबर राहून करेन, पण मला अढळपद द्यावे. )
मी ज्या वैद्यकीय क्षेत्रात आहे, त्या आयुर्वेद शास्त्रामधील हे वचन विसरून कसे चालेल ? भले चार पैसे कमी मिळतील, कंठलंगोट बांधता येणार नाही, पायाला कापडी पिशवी गुंडाळायला जमणार नाही. (टाय आणि पायमोजे ) आणि भारतात गरज तरी काय ? तसं या ब्रॅण्डेड औषधांच झालंय.
ह. अगदी फरक दाखवायचाच झाला तर ग्रंथोक्त आणि पेटंटेड असा दाखवता येईल. ग्रंथोक्त म्हणजे ग्रंथात जशी वर्णन केली आहेत तशी, जसे च्यवनप्राश. आणि मूळ औषधी फाॅर्म्युल्यामधे बदल करून सरकार दप्तरी नोंद केली ते पेटंट प्राॅडक्ट बनते, जसे आंबा फ्लेवर च्यवनप्राश किंवा सोन्यामारूती च्यवनप्राश इ. कितीही उत्खनन करून बघितले तरी यात सोनं आणि चांदी काही सापडणार नाही, पण किंमत मात्र चौवीस कॅरेटहून भारी.
त्यामुळे ग्रंथोक्त औषधे खूप स्वस्त असतात, गुणवान असतात, आजच्या भाषेत 'टाईम टेस्टेड' आहेत, हजारो वर्षे झाली तरी त्रिभुवनकिर्तीचे नाव त्रिखंडात तसेच गाजतेय, किंवा ग्रंथोक्त सूतशेखरची घटकद्रव्ये तशीच आहेत, मग भारतातल्या कोणत्याही कंपनीने ही ग्रंथोक्त औषधे बनवली तरी फाॅर्म्युला तोच रहावा अशी सरकारची अपेक्षा असते. (आता आयुर्वेदीय औषधांचा क्वालिटी कंट्रोल हा संशोधनाचा भाग आहे, हे गृहीत धरले आहे. )
आयुर्वेद महाविद्यालयातून शिकून बाहेर पडलेल्या प्रत्येक वैद्याला दवाखान्यात आवश्यक असलेली औषधे, स्वतःची स्वतः तयार करता येतात, तेवढे प्रत्यक्ष ज्ञान त्याना महाविद्यालयाने दिलेले असते, (असे गृहीत धरलेले असते ) पण अन्य अभारतीय पॅथीमधली औषधे मात्र डाॅक्टर मंडळींना तयार करता येत नाहीत, त्यांच्या अभ्यासक्रमातील "औषध निर्माण" ही फार मोठी पोकळी आहे. त्यामुळे औषधांसाठी औषध कंपन्यावर अवलंबून रहाणे ही त्यांच्या व्यवसायाची गरज बनली आहे,
पण आयुर्वेदात मात्र अगदी कच्च्या मालापासून तयार औषध बनवेपर्यंतची सर्व औषध निर्माण कृती शिकवली गेल्याने, अगदी घरच्या घरी देखील स्वस्त आणि मस्त औषधे, कोणत्याही आयुर्वेद पदवीधारकांना बनवता येतात. त्यामुळे आयुर्वेदीय औषध कंपन्यांची बनवेगिरी कमी होते, साहाजिकच स्पर्धा कमी होते.
ब्रॅण्डेड वापरले नाही तर अवस्था जेनेरीकमधल्या त्या हिरो सारखी होते, असा एक फोटो व्हायरल होतोय. ब्रॅण्डेड म्हणजे खूप स्टॅण्डर्ड असा प्रचार मल्टीनॅशनल कंपन्याशिवाय आणखी कोण करणार ? यात नुकसान कंपन्यांचे होते आहे. डाॅक्टरांचे नाही. भारतातल्या डाॅक्टरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारवर नेम धरण्याचा कंपन्यांचा हा प्रकार आहे. इतकंच !
शेवटी औषध ते औषध. हाती असेल तर माती सुद्धा औषध ठरते, असं सांगणाऱ्या आयुर्वेदात ब्रॅण्डेड आणि जेनेरीक असा भेद कसा असू शकेल ?
-- वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
02362-223423.
28.04.2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 18-पुष्प सहावे
आपल्याकडे सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम असला की तोरणं बांधायची पद्धत आहे. आंब्याची पाने, नारळाच्या झावळ्या, भेडलेमाडाची कातरी पाने, केळीची झाडे, गोंड्याच्या माळा, नारळाचे तोरण, भाताच्या लोंब्या, इ.इ. नी अंगण, दरवाजे, प्रवेशद्वार सजवले जातात. याचं आयुर्वेदात काही महत्त्व असेल का ?
आंब्याच्या पानाला एवढे महत्व का दिले असेल ? दरवाज्याच्या तोरणासाठी तेच, गुढीसाठी तेच, कलशस्थापना करण्यासाठी आंब्याचा टाळ हवाच. अभिषेक करताना देखील आंब्याची पाने हवीत, हळद चढवायला देखील आंब्याचीच पाने. इतकंच काय तर विवाह होमाच्या वेळी विस्तव आणताना देखील ताज्या आंब्याच्या पानानी हा विस्तव झाकून आणला जातो.
उत्तम जंतुनाशक गुण आंब्याच्या पानात दडलेले आहेत. प्रमेहामधे आंब्याची पाने वापरली जातात. आंब्याच्या पानातून येणारा चीक आणि वास देखील औषधी आहे. म्हणून तर आंब्याच्या लोणच्यामधे देठाचा भाग असलेल्या फोडी आवर्जून घातल्या जातात. त्यातील औषधी चीक आणि वास यावा यासाठी आणि जंतुसंसर्ग न होता लोणचे वर्षभर टिकावे यासाठीच !
हे आम्रपल्लव जसे आध्यात्मिक कर्मकांडामधे आहेत, आंबा, वड, पिंपळ, पायर (म्हणजे प्लक्ष किंवा पिंपुरणी,) औदुंबर याना अध्यात्मामधे विशेष महत्व आहे, तसेच पंचपल्लव आयुर्वेदात सांगितलेले आहेत.
(आम्र जंबु कपित्थानाम् बीजपुरक बिल्वयो: ।।)
जी गोष्ट आंब्याची तीच झेंडू किंवा गोंड्याची. गुढी तोरणामधून सर्वत्र सूक्ष्मातून जंतुनाश व्हावा, साथीचे रोग येऊ नयेत यासाठी केलेल्या या आध्यात्मिक उपाययोजना तर नसतील ?
हे सामाजिक आरोग्य सांभाळण्यासाठी केले जाणारे सार्वजनिक उपचार असू शकतात का ? असा दावा नाही, पण काहीतरी तथ्य असणारच. आपण ते एकतर डोळस बुद्धीने म्हणजे ज्ञानयोग वापरून, किंवा सांगितलेले कर्म, रूढी परंपरा म्हणून करत रहावे, म्हणजे कर्ममार्गी व्हावे किंवा विकल्प मनात न आणता साध्या सोप्या भक्ती मार्गाने जावे. पण काहीच करणार नाही, आणि फक्त विरोधाला विरोध करीत रहायचे असे मात्र नको.
गुढी उभारली जाते. सगळ्यांकडे एकाच वेळी एकाच पद्धतीने उभारली जाते. एकाच पद्धतीने गोंड्याची माळ, आंब्याची कडूलिंबाची पाने, तांब्याचा कलश, दरवर्षी ओला नवीन बांबू, दरवाज्यामधे स्थापना, कढीलिंबाची चटणी खाऊन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरवात करायची. हे सर्व का केले जाते ? केवळ भक्ती ? केवळ धर्म ? केवळ कर्मकांड ? केवळ रूढी परंपरा ? केवळ वार्षिक उत्सव ? केवळ दिखावा ?
नक्कीच नाही. नीट डोळे उघडून पाहिले तर त्यात दडलेले सार्वजनिक आरोग्य दिसेल.
सहस्त्र तुलसीदले, सहस्त्र दुर्वा, सहस्त्र बेल सहस्त्र नामानी कशासाठी वाहिले जातात ? एकीकडे सांगायचे सगळे देव एकच आहेत. कोणत्याही देवाला हाक मारा, ती एकाच ईश्वरापर्यंत पोचते, मग हजारदा त्याचेच नाव का उच्चारायचे ? एकदा हाक मारून पुरणार नाही का ? असे असंख्य प्रश्न आज केवळ अज्ञानामुळे अनुत्तरीत रहातात आणि धर्माकडे पहाण्याचा दृष्टीकोन विकृत होऊ लागतो.
काही ना काही निमित्त करून ही कर्म कांडे पुनरावृत्त करण्यामागे "बूस्टर डोस" देण्यासारखा हेतू तर नसेल ?
या सर्व कर्मकांडामागे लपलेले आरोग्य शोधायचे कुणी ? निदान विचार तरी सुरू करूया.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
11.06.2017
आहाराचा विचार कोणत्या कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो हे आपण पहात होतो. या सूत्रातील पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, सात्म्यता.
म्हणजे बाकी दुनिया गयी भाड मे, मला काय पचणारे आणि माझ्यासाठी अमुक पदार्थ चालण्णार आहे की नाही. हे ठरवणे.
एखाद्याला पंधरा दिवस सलग पुरणपोळ्या खाल्या तरी पचतात, एखाद्याला पन्नास जिलब्या पण पचतात. पण तोच नियम सर्वांना लागू होईल असे नाही.
परत परत त्याच शंका विचारल्या जात आहेत, याचा अर्थ मला नेमकेपणाने काय म्हणायचं आहे ते नीट समजले नसावे. एकतर मला नीट सांगता येत नसावे, किंवा वाचणाऱ्याने समजून घेण्याचा प्रयत्न केला नसावा. असो. पुनः एकदा सांगतो. कोणतेही, कोणाचेही गैरसमज नसावेत
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी - भाग 35
नैवेद्यम् समर्पयामी - भाग नऊ
देवाचे जेवण पूर्ण झाल्यावर ताम्हनात तीन पळ्या पाणी सोडायला सांगितले जाते. जर भटजींनी म्हटलेले मंत्र नीट ऐकलेत, तर यातील अर्थ लक्षात येतील. नाहीतर एकाबाजूने भटजी मंत्र म्हणताहेत, आणि दुसऱ्या बाजूला पूजा करताना यजमान मोबाईल वर बोलाताहेत, आणि यजमानीण आपला मेकअप करतेय, असे असेल तर हे केवळ कर्मकांड होते आहे असे समजावे. मग कावळे काव काव करायला टपलेले आहेतच. "अशी कर्मकांडे करण्यात वेळ कशाला घालवा ? जो नाहीच आहे त्याला नैवेद्य तरी कशाला दाखवा." वगैरे वगैरे.
तर भटजी असं म्हणतात, तीन वेळा ताम्हनात पाणी सोडा.
नैवेद्यान्तरेण आचमनीयम् समर्पयामि ।
हस्तप्रक्षालनम् समर्पयामि ।
मुखप्रक्षालनम् समर्पयामि ।
जेवणानंतर एक वेळा आचमन करावे. देवाचे नाव घेऊन एक पळी पाणी तळहातावर घेऊन पिणे म्हणजे आचमन करावे.
खरंतर प्रत्येक घासच देवाचे नाव घेत तोंडात घालायचा असतो. निदान तसा भाव तरी ठेवायचा. "आतले अन्न पचवायला मी आता देवाला सांगितलेले आहे, आता मला काळजी नाही, त्यातील गुणदोष तो बघेल."
खाताना भीती नसावी आणि खाल्ल्यानंतर आठवण न यावी. या दोन्ही गोष्टी देवाच्या स्मरणाने साध्य होतात. म्हणूनच भगवंत म्हणतात, "तुझा अधिकार फक्त कर्म करण्यापुरता. ( फक्त माझे स्मरण करत अन्न गिळायचे...) म्हणजेच केलेले कर्म तू मला अर्पण करणे. मी तुला त्याचे योग्य ते फळ, वेळ आल्यावर देणार आहे. यावर विश्वास ठेवायचा. म्हणजे पचन सुलभ होते.
आचमन करण्याने, अन्ननलिकेला आतील बाजूला लागलेले अन्न पुढे ढकलून अन्न नलिका धुतली जाते. एवढंच पळीभर पाणी जेवणानंतर घ्यावे, हा पण एक सोयीस्कर अर्थ.
जेवणानंतर देवाचे हाय धुवायला पाणी दिले जाते, तोंड धुवायला, चूळ भरायला, त्याच्या हातावर पाणी घातले जाते. केवढी एकरूपता साधली जाते. आपल्याकडे जेवायला आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना सुद्धा आपण असाच उपचार करावा. ( केवळ व्हीआयपी पाहुण्यांना नको )
त्याही आधी जेवल्यानंतर हात धुवायचे असतात आणि खळखळून चूळ भरायची असते, एवढे तरी सांगितले गेलंय.? कोणासाठी सांगितले असेल हे कर्मकांड ? देव जो स्वतः निर्लेपी, निर्मोही, निर्गुण निराकार आहे त्याच्यासाठी ???
जे जे देवासाठी ते ते देहासाठी.
वीतभर वाटीत बोटं बुचकळली आणि टीचभर पेपरला तोंडं पुसली की झालं हस्तमुख प्रक्षालन ! काय चाललं आहे ? कुठे भारतीय संस्कारातील दोन्ही हात स्वच्छ धुणे, खळखळून चुळा भरणे आणि कुठे पाश्चात्य प्रकारातील वाटीभर पाण्यात फक्त एका हाताची बोटे बुडवणे आणि ओठावरून कागद फिरवणे ?
नियमितपणे जर पाण्याने खळखळून चुळा भरल्या जात असतील तर दात किडत पण नाहीत, चुळ भरण्याने दातात अडकलेले अन्नकण बाहेर निघून जातात. आणि दाताला किड लागण्यापासून वाचवले जातात, म्हणून काही खाल्ल्यानंतर तोंड धुवावे, हात धुवावेत, हे देवपूजेच्या माध्यमातून दररोज सांगितले जाई.
पाश्चात्य देशात हस्त, मुख प्रक्षालन कसे करावे हे माहितीच नव्हते, वेळ मिळेल तेव्हा, पावासारखे सुके पदार्थ फिरत फिरत खायचे, आमटी भाजी, चटणी लोणचे असे ओले पदार्थच त्यांच्या ताटात न आल्याने, हाताला अन्न चिकटत नव्हते. त्यामुळे तोंड, हात धुणे हा संस्कार त्यांच्या संस्कृतीमध्येच नव्हता.
अन्न हातानी मुरडणे, कालवणे, एका हातानी त्याचे घास करणे, एका हातानीच खाणे, खाल्ल्यानंतर हात उष्टे होतात, म्हणून ते धुणे, हे त्यांच्या संस्कृतीमध्येच नव्हते. त्याचा परिणाम म्हणून या सर्व पाश्चात्य लोकांना दात आणि हिरड्यांच्या मोठ्या समस्या निर्माण होतात. आणि या समस्या निवारणासाठी दंततज्ञ !! आपल्या गावात, तीस वर्षापूर्वी किती डेन्टीस्ट होते, आणि आता गावामधे दंततज्ञ किती आहेत ? ओझरता सर्व्हे केलात तरी, यांची वाढलेली संख्या लक्षात येते. या दातांच्या रोगाची मूळ कारणे कुठे आहेत, कशात आहेत, याचा एकदा शोध घेतला पाहिजे.
ज्या पाश्चात्य देशात एकेकाळी दात घासणे, चुळ भरणे, गुळण्या करणे कधी माहितीच नव्हतं, त्यादेशातील लोकांनी, ज्या भारत देशातील वयोवृद्धांचे बत्तीस दात स्मशानामधे सुद्धा मोजून घेतले जात... अश्या आमच्या भारत देशातील लोकांचे, "मौखिक आरोग्य कसे चांगले राहील?" यावर चर्चासत्रे घ्यावीत, यापेक्षा मोठा विनोद नाही.
........पण आज जमाना बदल गया है। यालाच "कलियुग" असे नाव. दुसरं काय म्हणणार ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
28.06.2017
Copyright © 2025 | Marathisrushti