(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग बारा

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे अठरा

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा•

    नित्यं हिताहारविहारसेवी
    समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
    दाता समः सत्यपरः क्षमावान
    आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

    निरोगी रहाण्यासाठीचे हे पथ्यापथ्य मोजक्या दिवसासाठी नसून कायम स्वरूपी आहे, हे लक्षात घ्यावे.

    आपण नेहमी निरोगी राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ते सोडून आमच्या धारणाच आम्ही बदलून टाकल्या आहेत. आयुष्य हे अनमोल आहे, हे विसरून आयुष्य हे चुलीवरच्या कांद्यापोह्या एवढे स्वस्त करून टाकले आहे. गॅसपेक्षा चुलीवरचे जरा खमंग लागतात, एवढेच काय ते !

    निरोगी रहाण्यासाठी अमुक पथ्य पाळा, असे सांगितले की, रुग्णाच्या कपाळावर डाव्या कानापासून उजव्या कानापर्यंत आठ्याच आठ्या दिसू लागतात.

    बंधनात रहायला कुणालाच आवडत नाही. आणि जर ते बंधन दुसऱ्याने घातलेले असेल तर अजिबात नकोसे वाटते.

    मी मला हवे तसे वागेन, मला कोण अडवणार ? अशा बेगुमान मनाला लगाम तर हवाच. हा लगाम आप्तांनी घातला तर त्याला तप म्हणतात. आई वडीलांनी सांगितले तर शिस्त म्हणतात, आणि डाॅक्टरनी सांगितले तर पथ्य म्हणतात. आणि दुसऱ्या कुणीतरी सांगण्यापेक्षा स्वतःचे स्वतःला आवरणे आणि सावरणे आवश्यक आहे.याला संयम म्हणतात.

    हे कुणा दुसऱ्यासाठी नसून स्वतःच्या भल्यासाठी आहे, एवढे तरी लक्षात ठेवावे. शरीर मन आणि आत्मा या तिघांच्या चिरंतर कल्याणासाठी हे करावेच लागेल.

    पहिल्या ओळीतील हितकर असा आहार विहार हा शरीरासाठी. दुसरी तिसरी ओळ मनावरील संयमासाठी आणि चौथी ओळ आत्मरक्षणासाठी आहे. हे भान असावे. असे ग्रंथकार सांगतात.

    या संयमाची सवय पहिल्यापासूनच लावून घेतली तर लागते. संयम आतून यावा लागतो. संयम येण्यासाठी मनाला मुरड कशी घालावी, आवर कसा घालावा, हे समर्ध रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकात लिहून ठेवले आहे.

    मना वासना दुष्ट कामा नये रे,
    मना सर्वथा पापबुद्धी नको रे ।
    मना धर्मता नीती सोडू नको हो,
    मना अंतरी सार विचार राहो ।।

    संत असो वा आप्त. सर्वजण आतून एकच विचार करीत असतात, हेच यावरून सिद्ध होते. आयुष्य असो वा आरोग्य. ते नीट सांभाळायचे असेल तर काही पथ्य तर करावेच लागणार.

    ।। जय जय रघुवीर समर्थ ।।

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    ०७.०८.२०१७

  • आहारातील बदल भाग ४ – मांसाहारी भाग एक

    मांसाहारी प्राण्यांची काही वैशिष्ट्ये आहेत. जी खास आहेत. वैश्विक सत्य आहेत. म्हणजे जगात कुठेही गेलात तरी ही सत्य बदलत नाहीत. वाघ भारतात असो, वा बांगला देशात त्याची वैशिष्ट्ये तीच रहातात.

    सर्व मांसाहारी प्राणी पाणी पिताना जीभेने पितात. जीभ खूप खरखरीत असते. जीभेला आतल्या बाजूला वळलेल्या खाचा असतात. त्यामुळे पाणी चाटले जाते. चाटलेले पाणी या खाचांमधे भरलेले रहाते. सिंह पाणी पिताना पाहिलेत. सिंहच कशाला कुत्रा, मांजर देखील असंच पाणी पितात.

    यांचे दात आणि सुळ्यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते. भक्ष्य पकडण्यासाठी, खाल्लेले मांस तोडण्यासाठी, हाडे फोडण्यासाठी, सुळे आतमधे वळलेले, वर खाली दोन्ही जबड्यात असतात. या सुळ्यांना धार असते. तीक्ष्ण टोके असतात. यामुळे भक्ष्य एकदा पकडले की सहसा सुटत नाही. मगरीच्या तोंडातील दातांची रचना लक्षात घ्या.

    यांना अन्न बारीक करायचे नसते. अन्न रवंथ करायचे नसते. सुळ्यांनी भक्ष्याचे तुकडे केले की अख्खे तुकडे गिळतात. म्हणून यांच्या जबड्यात दाढा कमी असतात. दाढा कमी, चावणे नाही म्हणून यांची पचन करणारी आतली अन्नपचन करणारी काही एन्झाईम्स खूप जास्ती प्रमाणात पाझरत असतात, ज्यामुळे त्या अम्लामधे मांसाचे तुकडे सहज विरघळून जातात. अजगर तर अख्खी नीलगाय गिळतो. त्याच्या पोटात एवढे तीक्ष्ण पाचकरस असतात की त्यात नीलगाईची शिंगे, हाडे, केस, दात, पायाचे खूर सगळं काही सहज विरघळून जाते. यांना शिजवणे सोडाच, जाळले तरी ते भस्म होत नाहीत, असे हे अत्यंत कठीण अवयव पोटातील पाचकरसात सहज विरघळून जातात. ईश्वराने/ निसर्गाने, त्यांना अन्नपचन करण्यासाठी केलेली ही मदतच आहे. त्यामुळे यांनी अन्नाचे तुकडे गिळले तरी सहज पचून जातात. अपचन, अजीर्ण, पोटफुगी, गॅस, ढेकर असे काही लक्षणे किंवा आजार त्यांना नसतात.

    पायांची नखे देखील सुळ्यांप्रमाणे टोकदार धारदार आणि तीक्ष्ण असतात.झडप घालून भक्ष्याला पकडणे, परत सुटू नये म्हणून नखे रोवून ठेवणे, गरूड, घार, घुबडाची नखे पाहिलीत किती अणकुचीदार असतात ती !

    या नखांचे आणखी एक वैशिष्ट्य. ती हलवता येतात. आत बाहेर करता येतात. भक्ष्याला पकडण्यासाठी ही रचना असते. काम झाले की फोल्डींग करून ठेवायची.

    यांना अंगावर पाणी घ्यायचा खूप कंटाळा येतो.त्यामुळे ही मंडळी आंघोळ करीत नाहीत. यांच्या अंगाला खूप उग्र वास येतो. दुर्गंधी पण असते.

    आवाज तर विचारूच नका. एवढा मोठा आणि भेदक असतो, की डरकाळी फोडली तरी उरात धडकी भरावी.

    त्यांची नजर पण एवढी तीक्ष्ण असते, की दूरवरचे भक्ष्य देखील सहज दिसते. घारीला किती वरून जमिनीवर असलेले भक्ष्य दिसते.

    आणि यांनी एकदा पोटभर खाल्ले तर पुढे आणखी काही दिवस एखादा प्राणी खायला नाही मिळाला तरी चालते. एवढे प्रोटीन्स त्यांना मिळतात की ते पुढे पुरवून पुरवून वापरता येतात. हाय प्रोटीन डाएट !

    सर्व मांसाहारी प्राणी नजर रोखून ठेवत, कळपाने, समुहाने ठरवून शिकार करतील, पण शिकार खाताना एकट्या एकट्यानेच खातील, डूक धरून खातील. खाताना इतर कोणी त्याचेच भाऊबंद शिकार खायला आले तर त्यांच्या अंगावर गुरगुरतील, ओरडतील, धावून जातील. मांजराची पिल्ले, उंदीर पकडताना बघीतलंय कधी.

    ईश्वराने यांची आतडी लांबीला कमीच ठेवली आहेत, न जाणो कोणता रोगट प्राणी चुकुन खाल्ला गेला, तर तो लवकरात लवकर पोटातून बाहेर पडून जावा. पुढे जाऊन त्याच्या शरीरातील रोगजंतु, किंवा टाॅक्झीन्स, खाणाऱ्याला त्रास देणार नाहीत.

    ईश्वर /निसर्ग महान आहे.
    .......क्रमशः ऊद्या

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    25.09.2016

  • किचन क्लिनीक – ताकाचे सामान्य व विशेष गुण

    सर्व साधारणपणे ताक हे चवीला गोड,तुरट,आंबट,पचायलाहल्के, कफवातनाशक ,शरीर बल वाढविणारे,संडास घट्ट करणारे,भुक वाढविणारे व हृदयाला हितकर आहे.

    पण प्रत्येक पशूच्या दुधापासून बनविलेल्या ताकाचे गुणधर्म हे वेगळे असतात त्यामुळे काही जनावरांच्या दुधापासून तयार केलेल्या ताकाचे गुणधर्म आता आपण पाहूया:

    १)गाईचे ताक:

    भुक वाढविणारे,बुद्धिवर्धक,मुळव्याधीत गुणकारी,त्रिदोषनाशक आहे.

    २)म्हशीचे ताक:

    दाट,कफकर,सूज उत्पन्न करणारे किंवा असल्यास वाढविते,पचायला जड आहे.

    ३)शेळीचे ताक:

    अतिशयस्निग्ध,पचायलाहल्के,त्रिदोषनाशक,
    मुळव्याध,पांडुरोग,सुज कमी करणे ह्यात उपयुक्त.

    आता ताक कोणत्या दोषामध्ये कोणत्या अनुपाना सोबत घ्यावे ते पाहू:

    १)वातविकारात:

    आंबट ताक सैंधव घालून प्यावे.

    २)पित्तविकारात:

    गोड ताक साखर घालून प्यावे.

    ३)कफविकारात:

    लोणी काढलेले ताक सुंठ मिरी घालून प्यावे.

    (क्रमश:)

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग सहा

    झोप येते आहे, पण झोपायचे नाही, भूक लागली आहे, पण जेवायचे नाही.

  • नमस्कार – भाग ३

    नमस्कार करताना आणखी एक उपचार केला जातो, तो म्हणजे प्रदक्षिणा. नामस्मरण करीत देवाला, गाभाऱ्याला, किंवा संपूर्ण देवळाला प्रदक्षिणा घातल्या जातात. या प्रदक्षिणा केंद्रानुवर्ती असतात. म्हणजे देवाला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या भोवती फिरायचे. काय असेल याचा उद्देश? केवळ पुण्यप्राप्ती ? चालणं आणि प्रदक्षिणा मारणं यात फरक आहे !

  • आंबेहळद / आम्रगंधी हरिद्रा

    हिचे हळदीप्रमाणे दिसणारे वर्षायू क्षुप असते.ह्याची पाने ६० सेंमी -१मीटर लांब असतात व कंद गोल,स्थूल आल्याच्या कंदा प्रमाणे दिसणारा व रूंदिला बारीक व अधिक पांढरा असतो.ह्या कंदाला कैरी सारखा वास येतो.

    ह्याचे उपयुक्तांग कंद असून हि चवीला कडू,गोड व थंड गुणाची असून हल्की व रूक्ष असते.आंबेहळद कफपित्तशामक व वातकर आहे.

    चला आता आपण हिचे काही औषधी उपयोग पाहुयात:

    १)शरीराचा कुठला हि अवयव मुरगळला असता आंबेहळदीचा लेप लावल्यास सुज कमी होते.

    २)त्वचा रोगा मध्ये खाज व पुरळ आला असता आंबेहळदीचा लेप लावतात.

    ३)आंबेहळद रक्त शुद्ध करते म्हणून रक्ताच्या विकारात उपयुक्त आहे.

    ४)चेहऱ्यावर मुरमांचे डाग अथवा मुरूमे आली असता आंबेहळदीचा लेप लावतात.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४
    ©️ Dr Swati Anvekar

    English Name: Mango Ginger

  • आजचा आरोग्य विचार – भाग पंधरा

    उकीडवे ( हिंदी मे उकुडू बैठकर ) बसून मलविसर्जन केल्यामुळे मल सहजपणे बाहेर पडायला मदत होते. दोन्ही मांड्या पोटावर विशेषतः पोटाच्या खालच्या भागावर दाबल्या गेल्याने पक्वाशय, मलाशय अधिक कार्यरत होतात. पोटऱ्या दाबल्या जातात. त्यामुळे मलविसर्जनाची सर्वात आदर्श पद्धत म्हणजे उकीडवे बसण्याची आहे, असे संशोधन आंग्ल भाषेतील पाश्चात्य विद्वानांनी लिहिलेल्या पुस्तकामधे नमूद केलेले आहे.

  • नमस्कार – भाग २ 

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे - भाग ९६
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक ११
    जे जे देवासाठी ते ते देहासाठी - भाग ५२

    बायकांनी नमस्कार करायची पद्धत वेगळी. पुरूषांची वेगळी. पुरूषांचा नमस्कार साष्टांग. जमिनीवर पडून आठ अंगांचा स्पर्श जमिनीला करून पुनः उठायचे. नमस्कार जरी देवाला घालत असलो तरी फायदा आपल्यालाच होतो ना ! शरीराला आणि मनाला देखील.

    नमस्कार म्हणजे लीनता. शरणागत भाव. माझ्यापेक्षा ज्ञानाने, तपाने, बुद्धीने, वयाने, सामर्थ्याने, अभ्यासाने, जे अधिक आहेत, त्यांच्या समोर नतमस्तक होताना मनातील दोष निघून जातात.

    ज्याच्याकडे चाकरी करतोय, त्यांना मालक म्हणून केलेला नमस्कार वेगळा. त्यातील भाव वेगळा. मालकाने दिलेल्या पैशामुळे माझा चरितार्थ चालणार आहे, म्हणून याला नमस्कार करायला हवा. मालकाला खुश ठेवण्यासाठी, मालकाचा अहं सुखावण्यासाठी केलेला हा नमस्कार मनापासून केलेला नसतो.

    राजकारणातल्या नमस्काराची रीतच वेगळी. न बोललेलंच बरं. हे नमस्कार म्हणजे नुसती चमचेगिरी ! पक्ष बदलला की व्यक्तीनिष्ठा बदलली. की नमस्कार बदलला.

    नमस्कार करण्याचा आणखी एक प्रकार म्हणजे सॅल्युट. एनएसएसेस चे कॅडेटस, एनसीसी छात्र, स्काऊट गाईडचे कब, बुलबुल्स, मिलीट्रीमधले सैनिक, पोलीस जो नमस्कार करतात, ते सॅल्युट प्रकारामधे येतात. पण नेपाळी गुरखा जो नमस्कार करतो, त्यातला सॅल्युट भाव वेगळा आणि तिरंग्याला जेव्हा कडक सॅल्युट ठोकतो, तो भाव वेगळा. माझा नमस्कार कोणासाठी आहे तेवढा त्यातील भाव वेगळा. काहीवेळा तोंडदेखलेपणा किंवा ड्यूटी म्हणून तर काही वेळा मजबूरी म्हणून ! साहेबाची गाडी येत असते, तेव्हा त्या गाडीला देखील सॅल्युट ठोकावा लागतो.

    राजाला करत असलेला मुजरा हा देखील नमस्काराचाच एक प्रकार. कमरेत नव्वद अंशात वाकत, हात जमिनीपासून आपल्या कपाळापर्यतदोन तीन वेळा वरखाली करणे हा राजाला दिलेला सन्मानाचा नमस्कार आहे.

    गुरूला करत असलेला नमस्कार फारच वेगळा. गुरूच्या उजव्या पायाला आपल्या उजव्या हाताने आणि डाव्या पायाला आपल्या डाव्या हाताने, आपले हात एकमेकांवर स्वस्तिकासारखे करून केलेला नमस्कार जगात दुसरीकडे कुठेच आढळणार नाही. या नमस्कारातील भाव वेगळा.

    एका हाताने कधीही नमस्कार करू नये, असे हिंदु धर्म सांगत असूनही कपाळाला, छातीला आणि दोन्ही खांद्यांना स्पर्श करून नमस्कार करण्याची पद्धत हिंदुमधे आली. हे केवळ हिंदु धर्माचा अभ्यास नसल्यामुळेच. हिंदु पद्धतीने नमस्कार करण्यामधे देखील शास्त्र आहे. पण आमच्या शालेय अभ्यासक्रमातूनच हे डिलीट केल्यामुळे केवळ हिंदु घरात जन्माला आलोय म्हणून हिंदु. पण इतर धर्मातील लहान लहान मुलांना त्यांनी नमस्कार कसा करावा, का करावा, हे त्या त्या धर्मानुसार, प्रत्येक घरात शिकवले जाते.

    आणि बायकांचा नमस्कार कमरेमध्ये वाकून ! नुसतं वाकायचं नाही तर वाकून डाव्या पायाच्या करंगळीपासून उजव्या पायाच्या करंगळीपर्यंत नमस्कार अवस्थेमधे हात वर खाली हलवत अर्धगोलाकार वळायचे ! पोट दाबले जाते, गर्भाशयातील दोष पिळले जातात, कंबर हलवली जाते, खांदे हलवले जातात, पाठीचा कणा, वाकवला जातो, मनगटे सैल करून घेतली जातात, असा नमस्कार केला तर, किती उत्तम व्यायाम आहे हा !

    "एक काम धड नीटपणे करता येत नाही" असं म्हणत दोन्ही हातानी टाळी वाजवत बायकोनं कोपरापासून केलेल्या नमस्काराला काय नाव द्यावं हो ? ही कदाचित जागतिक लेव्हलची शंका असेल.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    02362-223423.
    16.07.2017

    आजची आरोग्यटीप

  • नैवेद्य भाग ५

    अकाल मृत्युहरणम
    सर्वव्याधिविनाशनम,
    विष्णु पादोदकं तीर्थं
    जठरे धारयाम्यहम् ।।

    तीर्थ ग्रहण करताना हा मंत्र म्हणतात. मंत्र म्हटलेलं पाणी आणि साधं पाणी यांचं केमिकल अॅनालेसिस कदाचित एकच येईल. पण आपण या एचटुओ मधे श्रद्धा निर्माण केली की, पाण्याचंच तीर्थ बनतं.
    त्यासाठी आपला विचार भारतीय हवा. देवावर श्रद्धा हवी आणि मुख्य म्हणजे स्वतःवर विश्वास हवा.

    तसेच
    अच्युतानंद गोविंद
    नामोच्चरण भेषजात ।
    नश्यन्ति सकला रोगाः
    सत्यम् सत्यम् वदाम्यहम् ।।

    हा श्लोकदेखील म्हणतात.
    अन्न असो वा औषध, देवाचं नाव घ्यावं आणि निश्चिंत व्हावं.
    मी परत परत खात्रीनं सांगतोय, असं श्लोककर्ता वारंवार बजावून सांगतोय, पण नाही पटत.

    औषधं सर्व रोगानाम्
    श्रद्धया हरिसेवनम असं वाग्भटाचार्यदेखील म्हणतात.

    काही गोष्टींची कारणमिमांसा केली तरी बुद्धीच्या स्तरावर उत्तरे मिळत नाहीत. अनेक औषधे तयार करत असताना काही विशिष्ट श्लोक, स्तोत्र, मंत्र म्हणावेत, म्हणजे औषधाची कार्यकारी क्षमता वाढते.
    याला अनुभवाशिवाय दुसरा वैज्ञानिक पुरावा काय देता येणार.

    मी घेत असलेले अन्न किंवा औषध हे ईश्वरीय इच्छेने घेत आहे, माझे कर्तृत्व शून्य आहे. अशी मनाला सम किंवा शून्य स्थितीत आणून ठेवणारी अवस्था निर्माण करून जेव्हा अन्न वा औषध सेवन केले गेले तर त्याचे परिणाम सकारात्मक दिसतात, असे आजचे मानसोपचार तज्ज्ञ देखील म्हणतात.

    हे केवळ भारतीय लोकच म्हणतात, असंही नाही, होमीयोपॅथीमधे पण आय ट्रीट, ही क्युयर्स असंच म्हणतात ना !
    अगा म्या नाही केले असे माऊलींचे शब्द आहेत. असो.

    अन्न सेवन करत असतानाची भावना महत्वाची असते. म्हणून अन्नसेवन करण्यापूर्वी देवाला नैवेद्य दाखवावा.
    यात आणखी एक भाव असतो, तुझेच तुजला अर्पण !
    तूच तुझ्या शक्तीने तयार केलेले, तुझे अन्न मी तुला अर्पण करतो.

    ज्यांचा देवावर विश्वास नाही, देवाला आम्हीच बनवले आहे, आम्हीच निवृत्त केले आहे, अश्या विचारसरणीच्या मंडळींनी देखील त्या अज्ञात शक्तीला शरण जावे, आपण घास घेण्यापूर्वी हा विचार जरूर मनात निर्माण करावा.

    आता नैवेद्यातील कर्मकांड.
    वाढलेल्या पानाभोवती पाणी हातात घेऊन, ताटाभोवती डावीकडून ऊजवीकडे गोलाकार फिरवावे. आणि ताटातील चार सहा शीते बाहेर काढून ठेवावीत. पाण्याची ही गोलाकार रेषा ही ताटात येणाऱ्या सूक्ष्म जीवांसाठी जणुकाही लक्ष्मणरेषा तयार झाली. आता बाहेरील जीव ताटात येणार नाहीत, पण त्यांना सुद्धा आपल्यातील अन्नाचा भाग मिळावा, पाण्याच्या काढलेल्या रेषेवरून, अन्न शोधत येणार्‍या जंतुना पटकन अन्न मिळावे. म्हणून चित्राहुती.
    असंही असू शकेल.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    11.09.2016

  • जगण्याचे साधे सोप्पे नियम – भाग एक

    आता जगण्यासाठी सुद्धा नियम करावे लागतील का ?
    हो.
    कसे जगावे, यासाठी जे नियम चुकीच्या पद्धतीने प्रस्थापित होत आहेत, झालेलेच आहेत, त्यातील दोष काढून त्यांना पुनर्स्थापित करावे लागणार आहे. शास्त्र न सोडता, आणि परंपराचा आदर राखून हे नियम बनवता आले तर जगणे सोपे होईल.
    "मला असे वाटते" या सदराखालीच हे नियम बनवावे लागणार आहेत. कारण या नियमांना कोणताही ठोस आधार नाही.
    हे नियम स्पष्टपणे कुठेही वर्णन केलेले नाहीत, पण नियम असल्याशिवाय इथे पानही हलत नाही, कुठे आहे रेफरन्स दाखवा पाहू, असे विचारले तर उत्तर देणे, पुरावा दाखवणे कठीण होईल, हे आधीच नमूद करतो.
    नियम असतात ते अंदाज बांधण्यासाठी असतात. तेच खरं असंही काही नसतं. आरोग्याचे नियम म्हणजे कायदा नव्हे, आणि कायद्याने सर्व मिळतेच असे तरी कुठे आहे ना ?

    एवढ्या उंचीला एवढे वजन असावे, असलेच पाहिजे असे नाही, रक्तदाब एकशेवीस बाय ऐशी असावा. तो तेवढाच असावा असे नाही. नियम केला की, एकशेवीस चे एकशे एकवीस झाले की रक्तदाब वाढला की नाही ? से येस ऑर नो. उत्तर द्यावे लागेल. हो. पण तारतम्याने आपण ठरवतो, एकने वाढ म्हणजे लगेच एक गोळी वाढवावी, असे नसते ना ! शेवटी तारतम्य आणि होणारा त्रास, दिसणारी लक्षणे, आणि नियम यांची योग्य सांगड घालता येणे महत्त्वाचे!

    पण नियम म्हणून काही हवेत की नकोत ? म्हणून काही नियमांची क्रमशः चर्चा करू.

    नियम एक.
    पहिलाच नियम असा करू की, कोणताही नियम पाळू नये.

    प्रत्येकाचे शरीर वेगळे, प्रत्येकाचे हातापायांच्या बोटांचे ठसे वेगळे, केसांची संरचना वेगळी, प्रत्येकाच्या डोळ्याची ठेवण वेगळी, प्रत्येकाचा आत्मा वेगळा, प्रत्येकाचे मन वेगळे, प्रत्येकाच्या इंद्रियांची क्षमता वेगळी, प्रत्येकाची प्रकृती वेगळी, प्रत्येकाची भूक वेगळी, प्रत्येकाची आवडनिवड वेगळी, प्रत्येकाचा कोठा वेगळा, प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळे, प्रत्येकाचे कामाचे स्वरूप वेगळे, प्रत्येकाची धारण करण्याची क्षमता वेगळी, प्रत्येकाची शक्ती वेगळी, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी........

    एवढी विविधता इथे नांदत असताना, प्रत्येकाला होणारा आजाराचे स्वरूप वेगळे, त्याला होणारे त्रास वेगळे, प्रत्यःकाला बरे वाटण्याची कारणे वेगळी, त्याचे पथ्यापथ्य वेगळे, त्याची औषधे वेगळी......... हे फक्त आयुर्वेद सांगतो.

    एवढी विविधता आपल्या अवतीभवती दिसत असताना, प्रत्येकाने पाळायचे नियम एकच कसे असतील ? यासाठी पहिलाच नियम, आपल्या आरोग्याच्या बाबतीत कोणताच नियम नक्की होऊ शकत नाही. अगदी एकाच प्रकृतीची, एकाच वेळी जन्माला आलेली, दोन जुळी माणसे किती भिन्न स्वभावाची असतात ? त्या दोघांमधे बाहेरून आतून थोडेफार साधर्म्य दिसेल पण तेवढ्यापुरतेच असते. कुंडलीशास्त्रानुसार देखील त्यांच्या अंशांश कुंडल्या बदलतात. असंच प्रत्येकाचे असते. त्यामुळे इथे प्रत्येकाचे नियम वेगळे.

    हे नियम, थोडे तारतम्य वापरून, थोडा अनुभव वापरून, थोडा विवेक वापरून, थोडा ग्रंथांचा अभ्यास करून, थोडे व्यवहारज्ञान वापरून, थोडे थोरामोठ्यांनी सांगितलेले ऐकून, बदलायचे असतात.

    जसे, दूध दही हा प्रमेहाचा हेतू म्हणजे मधुमेह होण्याच्या अनेक कारणातील एक कारण सांगितले आहे. याचा अर्थ लगेचच दूध दही कायमचे बंद करण्याची आवश्यकता नाही. आपल्या प्रकृतीला, आजच्या भाषेत काय "सुट" होते ते पहावे. अतिरेक नक्की टाळावा. चहामधे दूध चालेल, पण दुधाचाच चहा नसावा. गरज असेल तरच दूध घ्यावे. औषध म्हणून नको. अनुपान म्हणून दुध प्यावे, पण नियम म्हणून बोर्नव्हीटा खपवण्यासाठी दूध नको. म्हणजे बोर्नव्हीटा खाल्ला नाहीतर ताकद कशी येणार म्हणून दूध पाजवायचे, किंवा दुधामधे पूर्ण शक्ती असते, म्हणून दूध प्यायलाच हवे, पण दुधाचा वास चव आवडत नाही म्हणून त्यात काहीतरी टाॅनिकच्या नावाने विरघळून टाळूत ओतायचे, हा नियम नको.

    इथे तारतम्य हवे, माझ्या मुलाला खरोखरच या सर्वाची गरज आहे का, हे एखाद्या जाणकार वैद्याला विचारून घ्यावे आणि नंतरच निर्णय घ्यावा. उगाचच कोणीतरी हिरो, खेळाडू, आपले खोटेनाटे सिक्रेट ओपन करत असतील तर भुलून जाऊ नये, इतकेच.

    सांगायचा मुद्दा असा की, स्वतः ठरवून काहीही करू नये. सहजपणाने एखादी गोष्ट घडून जावी, नको त्या ठिकाणी असलेली बुद्धी संपवून टाकली तर हवी तिथे ती वापरता येत नाही.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    10.04.2017