(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • किचन क्लिनीक – पालेभाज्या – चाकवत

    किचन क्लिनीक – पालेभाज्या – चाकवत

    हि भाजी सर्व महाराष्ट्रभर आवडीने खातात व हि भाजी पथ्याची म्हणून देखील प्रसिद्ध आहे.ह्याचे रोप हातभर उंच असते.

    हि चवीला गोड खारट व थंड असते.त्यामुळे ही शरीरातील वात व पित्त कमी करते.

    आता आपण ह्याचे घरगुती उपचारांमध्ये उपयोग पाहूयात.

    १)ताप उतरल्यावर ह्या भाजीचे सूप त्या व्यक्तीला दिल्यास त्याची भूक वाढते.

    २)मुळव्याध असणार्या व्यक्तिंने हि भाजी गव्हाचे फुल्के व कारल्याच्या चटणी सह खावी त्यामुळे संडास साफ व मऊ होतो.

    ३)लघ्वीची जळजळ होत असल्यास धणे,जीरे घालून चाकवत भाजीचे सुप करून प्यावे.

    ४)कावीळ झालेल्या व्यक्तीला ही भाजी खायला देतात त्यामुळे संडास वाटे खराब व वाढलेले पित्त पडून जाते व कावीळ उतरायला मदत होते.

    ५)विद्यार्थी किंवा बुद्धिजीवी लोक ज्यांच्या बुद्धीवर प्रचंड ताण असतो त्यांनी लक्षात नीट रहाण्यासाठी रात्री झोपण्या आधी १/४ कप चाकवताचा ताजी रस+ १ चमचा मध हे मिश्रण १५ दिवस सलग घ्यावे फायदा होतो.
    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग नऊ

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे पंधरा

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा•

    नित्यं हिताहारविहारसेवी
    समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
    दाता समः सत्यपरः क्षमावान
    आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

    आप्त म्हणजे जाणकार.
    ही जाणकार मंडळी सांगतात, तान्ह्या बाळांना अंगाला तेल लावावे, कानानाकात तेल घालावे, ताळु भरावी, हाता पायाला तेल चोळावे.
    प्रतिकार क्षमता वाढण्यासाठी लहान मुलांना दिवसातून दोन वेळा तेल लावणे, तेल लावल्यावर बाहेरचा वारा लागू न देण्यासाठी त्यांना मऊ कपड्यात गुंडाळून ठेवणे, डोक्यावरची ताळु भरण्यासाठी ब्रह्ररंध्राच्या दिशेत चारही बाजूने तेल लावणे, वर कापसाचे वा विड्याचे पान ठेवून त्यावर टोपरे बांधणे इ. सर्व गोष्टी पूर्वी केल्या जायच्या. पण आज या सर्व गोष्टी कालबाह्य, अंधश्रद्धा म्हणून उपेक्षित झाल्या आहेत.

    त्यातल्या त्यात एक बरे आहे," हे असले नको ते उद्योग अजिबात करू नका" म्हणून सांगणाऱ्या भारतातील पाश्चात्य शिक्षणाने प्रभावीत झालेल्या तज्ञ डाॅक्टर मंडळींना त्यांच्या लहानपणी हे सर्व ( नको उद्योग ) केले होते, त्या आप्त आया आणि बाया अजूनही पुरावा म्हणून हयात आहेत.

    लहान मुलांच्या अंगाला तेल लावणे ही एक कला आहे. हे शिक्षण जगातले सोडूनच द्या, भारतात देखील अजूनही कोणत्याही आयुर्वेद महाविद्यालयात दिले जात नाही. हे ज्ञान देण्यासाठी आपल्याकडे या ज्ञानाने समृद्ध असलेल्या आप्तांची संख्या सुदैवाने चांगली आहे.

    जसे, आता उत्तम गुणांच्या, मूळ भारतीय बियांणाचे वाण संपत आलेले आहे, तसे या भारतीय परंपराचे ज्ञान जपून शिल्लक ठेवण्यासाठी या आप्त मंडळींची आवश्यकता आहे. ही मंडळी कदाचित निरक्षर अंगठेबहाद्दर असतील, कदाचित सही सुद्धा करता येत नसेल, त्यांना कदाचित आपण करत असलेल्या कृतीमागील शास्त्र काय आहे, हे शास्त्रीय वैज्ञानिक भाषेत सांगता येणार नाही. पण त्यांच्या राकट हातातील ही हळुवार कला जपणे आणि जोपासणे, त्याला संरक्षित करणे, संवर्धीत करणे हे भावी सुदृढ बलवान भारताला आवश्यक आहे.

    आरोग्याशी संबंधित असलेल्या या अशा प्रत्येक गोष्टीमागे दडलेले शास्त्र, वैज्ञानिक दृष्टीने समाजासमोर आणणे आणि पुनर्स्थापित करणे ही काळाची गरज आहे.

    ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.....
    ......संपूर्ण भारत निरोगी होण्यासाठी, आप्त बनत चाललेल्या वैद्य म्हणवून घेणाऱ्या, अंगी सुप्त गुण असलेल्या गुणवान वैद्यांची देखील !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    ०४.०८.२०१७

  • आहारसार भाग ७

    केवळ फवारणी करणार्‍या शेतकऱ्याला जर कॅन्सर होतोय तर हे धान्य खाणार्‍यांना तो होईल की नाही, हे नीट विचार करून पहावे. ही समस्या फक्त भारतातीलच आहे असे समजू नये. पूर्ण जगात या रासायनिक शेतीचे कॅन्सर रूपी राक्षसी परिणाम दिसताहेत.या रासायनिक खत आणि विषारी औषधे निर्माण करणार्‍या भांडवलदार कारखानदारांची लाॅबी एवढी मजबूत आहे, की कोणत्याही देशातील सरकार उलथवून टाकण्याची यांची ताकद आहे.

  • प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग सहा

    लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल
    कालचा भाग 1 आजचा भाग 2

    ज्या लॅबोरेटरीच्या रिपोर्टस् वर आपण अवलंबून रहातो, त्या लॅब रिपोर्ट च्या मागील छापील बाजू कधी वाचून बघीतली आहे ? किंवा काही वेळा रिपोर्ट च्या खालीच अगदी बारीक अक्षरात लिहिलेलं असतं.( सिगरेटच्या पाकिटावर कसं दिसेल न दिसेल अशा अक्षरात लिहिलेलं असतं.... "सिगरेट स्मोकिंग इज इन्युरस टु हेल्थ")

    मुद्दाम वाचा.
    मला त्यांचं कायम कौतुक वाटतं. सगळी कार्डस अगदी ओपन असतात. लपाछपीचा व्यवहार नाही. जे सत्य आहे ते अगदी लेखी लिहूनच देतात. नंतर मागाहून कोणी गडबड नको करायला, आम्हाला सांगितलेच नाही, माहितीच नव्हतं वगैरे.....

    आपले जे रक्त लघवी वगैरेचे रिपोर्टस दिले जातात, त्या रिपोर्टवर जे काही लिहिलेलं असते, ते फक्त ती चिठी लिहून देणाऱ्या डाॅक्टरसाठीच असते. त्याचा रूग्णाशी खरंतर काहीच संबंध असत नाही. रूग्ण हा त्या कागदाचा केवळ वाहक असतो. तो रिपोर्ट काय आहे, कसा आहे, बरोबर आहे की नाही, हे त्या पॅथाॅलाॅजीच्या असिस्टंटनी कधीही रूग्णाला सांगायचे नसते. सल्लेही द्यायचे नसतात. त्यामुळे त्या कागदावर खाली काही वाक्ये असतात...
    जसे,
    The analysis results are only answer to corrosponding sample.
    The reported results is for information and for interpretation of referring doctor only.

    याचा अर्थ असा होतो की, हा केवळ वैद्यकीय व्यावसायिकासाठी समजेल अशा वैद्यकिय भाषेत लिहिलेला कागद आहे. त्यात रूग्णांनी आपले डोके खर्च करू नये. त्याचा अभ्यास ज्यांना आहे, अशा वैद्यकिय जाणकारांनी त्या रिपोर्ट चे अर्थ नीट समजतील अशा भाषेत लावावेत, आणि आपल्या रुग्णांना सांगावेत. त्यासाठी योग्य तो मोबदला रूग्णांनी, त्यांना दिलेला असतो. (काही वाक्यांचे विस्तृत अर्थ खरंतर कंसातील आहेत, पण कंस न टाकता लिहिले आहेत.)

    Referring doctor.......who understand the meaning of reporting units, reference ranges, and limitations of technologies should interpret the results.

    "त्यांनीच याचे अर्थ लावावेत, ज्यांना या रिपोर्टमधील युनीट, रेफरन्स रेंज यांची पूर्ण माहिती, पूर्ण अभ्यास, ज्ञान आहे. तसेच रिपोर्ट करण्यासाठी जी मशीनरी वापरली गेली, त्या विशिष्ट कंपनीच्या मशीनरीचे, त्या मशीन मधील रिपोर्टींग करण्यासाठी वापरलेल्या पद्धतीमधील त्रुटींचे, अंतिम निष्कर्षावर जे परिणाम होतात, ते समजून घेऊन तसे रुग्णाला सांगितले जावे."

    हे सर्व ज्यांना माहिती नाही, त्यांनी जर, गलत तरीकेसे, अपने अंदाज से, इस रिपोर्ट को पढा और अपने तरीके से यदी समझ लेने की कोशीष की, और अगर गलतीसे कुछ उल्टा पुल्टा हो गया, तो इसके जिम्मेदार हम नही रहेंगे ।

    बरोबरच आहे ना. मोबाईल जरी आपल्या मालकीचा असला तरी, त्याचा बिघाड बघण्यासाठी, अतिहुशारी करून, नेट वरून वाचून, मोबाईल खोलून, दुरूस्ती करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का ?

    आणि इथे तर प्रत्यक्ष स्वतःच्या जीवाशी खेळ असतो. म्हणून पॅथाॅलाॅजीचे तज्ञ डाॅक्टरदेखील या रिपोर्टचा योग्य तो अर्थ लावू शकत नाहीत, कारण त्यांनी रुग्णाला काही वेळा बघितलेला पण नसतो.

    अशा अर्धवट ज्ञानावर आरोग्याचे निष्कर्ष काढणे तर फार धोक्याचे असते.
    ना रे बाबा ना !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    16.02.2017

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग सत्याहत्तर

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 34

    नैवेद्यम् समर्पयामी-भाग आठ

    नैवेद्य दाखवताना देवाला घास भरवायचे. त्याचा मंत्र आहे, "नैवेद्यम् समर्पयामी." असे म्हणून घास भरवायचे. थोडं थांबून देवाला पाणी प्यायला द्यायचे. त्याचा एक मंत्र असा आहे. "नैवेद्यम् मध्येपानीयं समर्पयामी ! " असे म्हणून देवाला थोडे भरवून झाल्यावर मधेच, ताम्हनामधे एक पळी पाणी सोडावे. आणि पुनः देवाला सहा घास भरवायचे.
    हे झाले कर्मकांड.

    यात देहासाठी काय आहे ?
    हे सर्व जेवायचे कसे पाणी कसे प्यावे याचे शुद्ध आयुर्वेदीय नियम आहेत. जे जे देवासाठी ते ते देहासाठी.

    आयुर्वेद मतानुसार पाणी जेवताना मधेमधेच प्यावे म्हणजे प्रकृती सम रहाते. जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने बारीक व्हायला होते,
    आणि जेवणानंतर पाणी प्यायल्याने जाड व्हायला होते. अर्थात आपण कसे पाणी प्यावे, हे आपल्या प्रकृतीवर अवलंबून आहे. म्हणजेच वैद्य सल्ला महत्त्वाचा ! उगाच आपले आपल्यावर प्रयोग करू नयेत.

    पण सर्वसाधारणपणे पाणी जेवताना मधे मधेच प्यावे, हा नियम आहे हे लक्षात ठेवावे. यासाठी हा नियम देवपूजेमध्ये देखील समाविष्ट केला गेलाय. "मध्ये पानीयं समर्पयामी....."

    पाणी कोणी किती कसे आणि का प्यावे, याविषयी सविस्तर टीपा मागील वर्षीच येऊन गेल्या आहेत. पुनरूक्ती दोष टाळतो. फक्त एक उदाहरण सांगतो, नारळाचे दूध किंवा नारळाचा रस काढायचा असेल तर, नारळ वाटतानाच त्यामध्ये पाणी घालावे लागते. अन्यथा रस चांगला निघत नाही.
    स्लॅब घालताना वाळू, सिमेंट, खडी, मिक्सरमध्ये एकत्र फिरवतानाच त्यात पुरेसे पाणी मिसळले जाते. अन्यथा लोखंडाच्या फ्रेममध्ये हे मिश्रण योग्य रितीने पसरलेच जाणार नाही. तसेच पाणी जेवता जेवता मधे मधे, स्वतःला आवश्यक असेल तेवढे, जरूर प्यावे. म्हणजे पुढे अन्नरस चांगला तयार होतो. कोणत्या तरी पुस्तकात वाचले म्हणून, कोणीतरी सांगितले म्हणून, डायेटीशियन बोलली म्हणून, टीव्ही वर दाखवले म्हणून, अथवा कोणीतरी पाश्चात्य बुद्धीचा डाॅक्टर सांगतो म्हणून आपण आपल्या भारतीय भोजन परंपरा अजिबात बदलू नयेत. पारंपारिक आहार तसाच घ्यावा. आहाराचे जे अगदी साधे सोपे नियम आहेत, ते उगाच क्लीष्ट करून, शरीरामधे ताण वाढवणारे, चुकीचे नियम, चुकीच्या समर्थनासह करून, सोपे साधे जीवन कठीण करून, रोग वाढवून घेणे आहे.
    त्यामुळे पाणी फक्त जेवतानाच प्यावे. तहान नसताना, अन्य वेळी अजिबात नको. अन्य वेळी जे पाणी प्यायचे ते फक्त तळहाताच्या मधे राहील एवढे पळीभरच प्यायचे असते, हा नियम देखील देवपूजेतील आचमनातून आपण शिकलो आहोत.

    "मग बाकी सर्वजण पाणी जास्ती प्या" असं का सांगतात? ते त्यांनाच माहिती !!! आपल्याला तहान लागली की, स्वतःला तहान असेल तेवढे पाणी, आपणच ठरवून प्यायचे असते. एवढे लक्षात ठेवावे. बाकी विषय संपला.

    तर देवपूजा करणे हे सर्व जीवनावश्यक नियम समजावून सांगणे आहे. हे दररोज सांगावे लागतात. नाहीतर आपली चंचल बुद्धी भ्रष्ट व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून हे सर्व उपचार दररोजच्या पूजेमधेच समाविष्ट करून टाकले.
    सततम् क्रिया अभ्यासः । एखादी क्रिया सतत केली गेली की ती अंगवळणी पडते.

    आजीआजोबा, आईबाबा यांनी जे नियम ठरवले ते तसेच पाळायचे असतात. स्वतःच्या पाश्चात्य बुद्धीने त्यात बदल केला की, पुढील पिढीला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. जसे भरपूर पाणी प्या, म्हणून एका वडील पिढीने सांगितल्यामुळे आताच्या पुढील पिढीमधे पाण्यामुळे होणारे प्रमेह, रक्तदाब, संधीवात, इ.इ. रोग वाढलेले दिसतात. हे "जनुकीय" बदल नाहीत तर जीवनशैलीतील बदल आहेत, जे आपण बदलवू शकतो. ज्या चुका पूर्वजांनी केल्या त्याच चुका जर सहवास आणि साहचर्याने जर पुढील पिढी करीत राहिली तर जनुकीय बदल न होता, चुकीची जीवनशैलीजन्य रोगांची संख्या मात्र वाढतेय, हे आपण आपल्या डोळ्यासमोर पहातोय.

    आपणाला हे सर्व बदलायचे आहे. रोग कमी करायचे आहेत. डायबेटीस रक्तदाब पीसीओडी थायराॅईड यावरील गोळ्या एकदा सुरू झाल्या की, त्या कायम स्वरूपात घ्याव्याच लागतात, हे धादांत खोटे गृहीतक, रोगाबद्दलच्या काही चुकीच्या कल्पना डोक्यातून काढून टाकायच्या आहेत, जीवनशैलीतील दोष काढून टाकून, निरोगी, निरामय, निर्रौषध, जीवनशैली परत स्थापन करायची आहे. यासाठीच ही माझी देवपूजा !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    27.06.2017

  • सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग बारा

    जगण्याची साधी सोपी सूत्रे - एकशे चौपन्न
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - भाग तेरा
    सांगेन गोष्टी हिताच्याच चार - भाग बारा

    जगण्याचे साधे सोपे नियम सांगताना ग्रंथकार पुढे म्हणतात,
    बुडण्याचा भय असेल, अशा छिद्र असलेल्या किंवा फुटक्या नावेत बसू नये, किंवा जे झाड पडणारे असते, त्यावर चढू नये.
    यात आपलेच नुकसान होणार हे नक्की असते.

    आजच्या काळानुसार जी बॅक बुडणारी आहे, त्यात पैसे ठेवू नयेत, किंवा कमी काळात दाम दुप्पट वगैरे फसव्या योजनेत पैसे गुंतवू नयेत. मल्टीलिंक मार्केटिंग हा परदेशी फंडा आहे. आपली गुंतवणुक सोडवून घेण्यासाठी दुसऱ्याला आत गुंतवायचे असा सरळ सरळ अर्थ म्हणजे एम एल एम.

    कमी पाणी असलेल्या एका विहिरीत पडलेल्या बोकडाला वर येण्यासाठी, एक बोकड धडपडत असतो. पण वर येता येत नाही. "व्वा, पाणी किती गोड आहे, पिऊन तर बघा !" असे आमिष इतरांना दाखवल्यावर, काठावरून जाणाऱ्या दुसऱ्या बोकडाला, पाणी चाखून बघावेसे वाटते. म्हणून दुसरा बोकड इतर कोणताही विचार न करता, आत उडी मारतो. त्याच्या डोक्यावर पाय ठेवून पहिला बोकड केव्हा विहिरीबाहेर पडतो, ते दुसऱ्याला कधी कळतच नाही, मग तीच युक्ती दुसरा बोकड, तिसऱ्या बोकडासाठी वापरतो याला म्हणतात, मल्टी लिंक !
    यात प्राॅडक्ट म्हणून काहीही साधन वापरले जाऊ शकते. मग ती बदकाच्या पिसाची गादी असेल, नाहीतर भादरलेल्या बोकडाची दाढी असेल, नाहीतर एखादे लाॅकेट असेल वा लोहचुंबक असेल, खेळण्यातली गोल्डन डाॅल असेल वा एखादे दंतमंजन असेल. झटपट पैसे मिळवण्यासाठी काहीही फंडे वापरले जातात, पश्चात ताप होऊ नये, यासाठी सावध तो सुखी, हे सूत्र लक्षात ठेवावे.

    मातीचे ढेकूळ, दगड वा फळ मारून, (आपल्या किंवा इतरांच्या ) झाडावरचे फळ तोडू नये.
    हा मारलेला दगड परत आपल्याच डोक्यावर पडण्याचा संभव असतो, वा कुणाचे तरी नुकसान करणारा असतो. कुणा व्यक्तीचे नाही झाले तरी झाडाचे नक्कीच होते. गरज नसताना दुसरे कच्चे फळ पडणे, झाडावरील घरट्यातील पक्ष्यांच्या पिल्लांना धोका पोचणे, किंवा पलीकडील घराची कौले फुटणे यापैकी काहीही होऊ शकते. अगदीच काही नाही झाले तर असा शेजारी किंवा झाड मालक जेव्हा पाठ धरून बोंबलत येतो तेव्हा सैराट होऊन धावताना आपल्याला इजा होऊ शकते.

    परवानगी घेऊन अथवा न घेता कोणाच्याही घरात, दाराचा वापर न करता अन्य मार्गाने घुसू नये.

    दुसऱ्याच्या घरात आपण एकट्यानेच कोणाला सांगितल्या शिवाय, किंवा कोणी सांगितल्याशिवाय खुर्चीवर वा उच्च आसनावर बसू नये.

    नंतर खुर्ची सोडावी लागली तर ते दुसरे दुःख कोणते नसते. विशेषतः व्यासपीठावर बसणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे.

    झोपी गेलेल्यास उठवू नये, हे पण ग्रंथकार लिहितात. पण ही सूचना शाळा काॅलेजमधे वर्गात झोपा काढणाऱ्यांसाठी सांगितलेली नसून, अति श्रमाने जो दमलेला आहे, किंवा ज्याला खरोखरच विश्रांतीची गरज आहे, अशा मंडळींकरीता आहे हे सूज्ञांनी लक्षात घ्यावे.

    रात्रभर वाॅटसप चालवून दमल्याभागल्यांसाठी हा नियम लागू होत नाही. अशा मंडळीना उठवताना नाकी नऊ येतात. यांना उठवण्यासाठी हळुच यांच्या कानात म्हणावे, "मोबाईलला लाॅक टाकायला विसरला आहेस, की स्वारी टुणकन उठून बसेल बघा !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    १२.०९.२०१७

  • आहाररहस्य ५

    छान पंगत बसलेली आहे. जिलब्यांचा मस्त वास दरवळतो आहे. आवडीची मंडळी वाढायला अवतीभवती बागडताहेत,
    अशा वेळी जिलबी खाण्यावरून पैज लागते.

  • किचन क्लिनीक – पालेभाज्या – कोथिंबीर

    किचन क्लिनीक – पालेभाज्या – कोथिंबीर

    आपल्या स्वयंपाकघरात अत्यंत मानाचे स्थान प्राप्त अशी हि वनस्पती.तशी सगळ्याचीच लाडकी.कारण कोणताही शाकाहारी अथवा मांसहारी पदार्थ असो जसे वरण,डाळ,पोहे,उपिट,भाज्या,माशांची आमटी,चिकन,मटण ह्यावर सजावटी करीता हिची पेरणी करतात.तसेचकाथिंबीर चटणी,कोथिंबीर वड्या ह्या सगळ्यांच्याच आवडीच्या.ब-याचं व्यंजनांमध्ये हिचा वापर त्या पदार्थांची चव वाढविणा करिता केला जातो.कारण हिच्या मंद सुगंधाने व हिरव्यागार रंगाने पदार्थ दिसायला तर संदर दिसतोच पण त्याची लज्जत हि वाढते.

    कोथिंबीरीचे १ मीटर उंचीचे नाजुक क्षुप असते.ह्याची पाने दंतुर कडा असलेली व सुगंधी असतात.हि चवीला तुरट,कडवट व गोड असते व गुणाने थंड असते.म्हणुनच हि शरीरातील तिन्ही दोष शांत करते.

    जसा आपण हिचा उपयोग स्वयंपाकामध्ये करतो तसेच हिचा वापर घरगुती उपचारांमध्ये देखील होतो.

    १)तोंड आले असता कोथिंबीरीच्या रसाने गुळण्या कराव्यात.

    २)डोकेदुखी मध्ये कोथिंबीरीचा पाला वाटून त्याचा लेप कपाळावर करावा.

    ३)कामाच्या दरम्यान जर चेहर्याचा संपर्क उष्णतेशी आल्यास त्वचा कोरडी होते व त्वचेची आग होते तेव्हा कोथिंबीरीच्या रसांच्या घड्या चेहर्यावर ठेवाव्या थंडावा मिळतो.

    ४)वारंवार उल्ट्या होत असल्यास कोथिंबीरीचा रस+मध हे मिश्रण वारंवार चाटायला द्यावे.

    ५)ओल्या इसबावर कोथिंबीर वाटून त्यात वेखंड घालून ह्या मिश्रणाचा जाडसर लेप त्यांवर करावा.

    ६)हाता पायाची आग होत असल्यास कोथिंबीरीच्या पाल्याचा रस काढुन हातापायांच्या तळव्यांना चोळावा.

    कोथिंबीर खाण्याचा अतिरेक केल्यास शरीरातील धातूंना क्षीणता येते.
    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • आहारातील बदल भाग ६५ – चवदार आहार -भाग २७

    तुरटी कशी ? या प्रश्नाचे उत्तर अनुभुति घेतल्याशिवाय येत नाही. ती तुरट आहे. हे उत्तर तर सर्वांनाच माहिती आहे. कशाप्रमाणे गोड वगैरे वर्णन करता येईल. पण तुरट म्हणजे काय ? या प्रश्नाचे उत्तर काय देणार ना ?

    त्यासाठी तुरटी चाखून पाहिल्यावर जे लागते त्याला तुरट म्हणतात. असेच सांगावे लागेल.
    यालाच अनुभुति म्हणतांत. प्रत्येक गोष्ट सिद्धत्वाच्या कसोटीवर तपासता येत नाही हेच खरे.

    तेच प्रत्येक चवींच्या बाबतीत आहे. वापरून बघितली की, अभ्यास केला की, यांची अनुभूती घेता येते.

    या सर्व चवींचे ज्ञान जीभ या ज्ञानेंद्रियानी होत असते. हे एकमेव इंद्रीय उभयात्मक आहे. म्हणजे कर्मेंद्रिय पण आहे आणि ज्ञानेंद्रिय सुद्धा आहे.
    रसना म्हणजे आत चवीची अनुभुति देणे म्हणून रसनेंद्रिय आणि निर्माण झालेला शब्द बाहेर फेकणे म्हणून वागेंद्रीय.

    आत बाहेर दोन्ही कामे करते. म्हणून या जीभेवर संयम आणता आला की, सर्व साध्य झाले. ज्याने जिंकीली रसना, त्याने जिंकिली वासना.

    सर्व इच्छांवर संयम आणण्यासाठीदेखील ही तुरट चव मदत करेल.

    संयमात ठेवणे हा गुण झाला, पण काहीवेळा तो दोषही होतो. जिथून विष बाहेर काढायचे आहे तिथून ही तुरट चव बाहेर पडायलाच देत नाही. स्रोतसांचे आकुंचित झाल्यामुळे बाहेर पडणारे स्राव कमी होतात. न पचलेले अन्न देखील आत मधे पडून राहाते. आम जागचा हलत नाही, तो तुरट चवीच्या याच स्तंभ गुणामुळे ! त्याचा परिणाम म्हणून पोटदुखी, मलावष्टंभ.

    रक्तवाहिनीचा गरजेपेक्षा जास्त संकोच झाला तर रस रक्त विक्षेपणात अडथळे येणे, ह्रदयात वेदना होणे, ह्रदयाची ताकद कमी होणे, ही लक्षणे दिसतात.त्याचा परिणाम अन्य अवयवांवर होऊन यकृत, किडनी इ. मधे पण अवरोध जमा होऊ लागतो. म्हणून थकवा येणे, ग्लानी येणे, उत्साह जाणे, रक्तदाब वाढणे, तोंड सुकणे, आवाज बसणे यासारखी लक्षणे निर्माण होतात. चेहेरा वाकडा होणे, एक बाजू लुळी पडणे, हे वाताचे आजार देखील याच तुरट चवीच्या अतिसेवनाने होतात. हे विसरता नये.

    पोषण करणाऱ्या नलिकांचा संकोच झाल्यामुळे कमालीचा अशक्तपणा येतो. वजन खूप कमी होते, प्रतिकार करण्याची शारीरिक आणि मानसिक ताकदच संपून जाते. याला देखील हीच तुरट चव जबाबदार आहे.

    आपणाला कायम एकच बाजू दिसत असते. दुसऱ्याची चुक आणि आपली बरोबर.
    दोन्ही बाजूने विचार करण्याची सवय ठेवली तर भूमिकेला योग्य न्याय देता येतो. आपले काय चूक नि काय बरोबर. आणि ते का. हे शोधले की सापडते.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    27.11.2016

  • इंद्रिये अवयव आणि आहार – भाग एक

    आपल्या पचनाचा प्रत्येक इंद्रियांशी संबंध असतो. पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये आणि मन यांचा पचनाशी कसा संबंध असेल ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

    या सगळ्यांमधे महत्त्वाचे आहे, मन ! मनामार्फत अनुभूती येत असते. जर हे मनच जागेवर नसेल, तर आपण काय खातोय, त्याची चव कशी असणार, हे अनुभवले नाही, तर त्याचा होणारा परिणाम वेगवेगळा होणार.

    जेवताना, खाताना टीव्ही बंद असावा, असे जेव्हा वारंवार आई ओरडते, तेव्हा नेमके काय बदल होतात, जे पचन बिघडवतात ? हे समजून घेतले तर जेवताना लक्ष जेवणातच राहील. जसे शिकवताना लक्ष शिक्षकांकडे असेल तरच शिकवलेले डोक्यात जाते, नाहीतर इकडून तिकडे शब्द धावत सुटतात. त्याचा अर्थ मनामार्फत इंद्रियापर्यंत पोचतच नाही.

    रसग्रहण नावाचा शब्द साहित्य क्षेत्रात वापरला जातो. तो मुळात आहारशास्त्रातील आहे. गोड, आंबट, खारट, तिखट,कडू आणि तुरट या सहा रसांचे ग्रहण कधी होईल, जर माझे मन जाग्यावर म्हणजे जेवताना, जेवणाच्या ताटावर असेल तर. वेळ मिळेल तसे मी जेवून घेतो, मी डबा खातो, कामात गुंतलो तर लागलेली भूक लक्षात सुद्धा येत नाही, काही वेळा कधी पोट भरलंय, हे पण कळत नाही. अशी अवस्था असणाऱ्यांनी जरा सावध रहायला हवे, कारण यांचे पचन हमखास बिघडते. आणि हीच छोटी छोटी कारणे पुढे काट्याचा नायटा करतात.

    जेवणाचा डबा न्यावा लागणं ही गरज आहे, कोणी हौस म्हणून डबा नेत नाही. शाळेची सहल हा या हौसेला अपवाद असायचा. सहलीला न्यायच्या डब्याची गंमत काही औरच असायची....
    आता यातून आनंद मिळवत जेवलो तर खाल्लेल्याचं पचन होणार. नाहीतर अगदी प्रेमळ बायकोच्या हातचा, प्रेमानं बनवून दिलेला, डबा जर मनापासून खाल्ला नाही तर पचन पूर्ण होणार नाही.

    डबा कसा खाल्ला तर आनंद जास्त मिळेल? विचार करून पहा. काही कारणाने कामावरून, जेवणाच्या वेळीच घरी आलोय, सकाळी भरून दिलेला डबा सोबत आहे, तर तो डबा आपण कसा खाऊ ? तर नेहेमी जेवतो ते ताट समोर घेऊ, डब्यातले जे काही एक दोन जिन्नस असतील, ते ताटात वाढून घेऊन जेवायला सुरवात करू. आणि छान शांतपणे जेवू. डबा तोच आहे. आपणच वाढून घ्यायचा आहे, पण ताटात वाढून घेऊन जेवलो तर मिळणारा आनंद वेगळा असतो.

    म्हणजे डब्यातल्या डब्यात जेवणे, आणि ताटात वाढून जेवणे यात फरक आहे. ताटात वाढून जेवण्यात जे समाधान मिळते, ते डब्यातल्या डब्यात बुचकून खाण्यात मिळत नाही.

    अर्थात काही भगिनीना, डबा खाणं हे तेवढंच आनंददायी वाटतं.
    रोजच्या रांधा वाढा... या चक्रातून सुटका तर मिळते तिला ! उरलं सुरलं काढून ठेवणे नाही, ओटा टेबल पुसायला नको, पुढची आवराआवर करावी लागत नाही....

    रोज डबा खाण्याची जागा जरी घर नसली, तरी डब्यातील सर्व पदार्थ ताटात वाढून जेवण्यातला आनंद तर आपण घेऊ शकतो ?

    एका ताटाचा तर प्रश्न आहे, तेवढे एक ताट काम करतो तिथे ठेवून द्यायचे की झाले. तेवढेच समाधान !!

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    16.03.2017