आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक चार
जगण्यासाठी औषधं काम करत नाही. - भाग नऊ
विश्वासराव पानीपतच्या लढाईत मारला गेला. आता कोणावर विश्वास म्हणून ठेवायला नको, असे वाक्प्रचार आपण व्यवहारात वापरतो.
औषध देणाऱ्यावर पूर्ण विश्वास ठेवून औषध घेणं महत्वाचे असते, तसंच मी बरा होत आहे, बरा होणार आहे, हा स्वतःवरचा विश्वास देखील महत्वाचा असतो.
औषध सेवन करत असताना हा विश्वास मिळवण्यासाठी भाव निर्माण करणं महत्त्वाचा असतो.
औषधं जाह्नवीतोयं, वैद्यो नारायणो हरिः ।
...... श्रद्धय हरिकिर्तनम।
मी हे जे काही औषध घेत आहे, ते जणुकाही गंगोदक आहे, त्याने माझे सर्व रोग नष्ट होत आहेत, आणि "औषध देणाऱ्या वैद्याला, मी नारायण स्वरूपात पहातोय, मग त्याने दिलेले तीर्थ घेतल्यावर मला गुण का येणार नाही," अशी श्रद्धा हवी, म्हणजे साधे एचटुओ सुद्धा तीर्थ बनते.
अकाल मृत्यु हरणम्
सर्व व्याधी विनाशनम्,
विष्णुपादोदकं तीर्थे
जठरे धारयाम्यहम् ।
असा मंत्र आपण देवाचे तीर्थ घेताना म्हणतो, (असा म्हणावा, म्हणजे तसा भाव, कल्पनेने तयार करावा, म्हणजे आपण जे एचटुओ, दूध, पंचामृत, नदीचे, नळाचे पाणी पितो, ते जणुकाही प्रत्यक्ष भगवंताने दिलेले औषध आहे, असा भाव ठेवावा. ब्रॅण्डेड औषध आणि जेनेरीक औषध घेताना सुद्धा असाच भाव ठेवावा का, असा प्रश्न कृपया विचारू नये.
हे तीर्थस्वरूप औषध घेतल्यावर, माझा अकालमृत्यु टळणार आहे, सगळे व्याधी मुळातून नष्ट होत आहेत, म्हणून हे औषध स्वरूपात असलेले तीर्थ, मी माझ्या जठरात म्हणजे पोटात घेत आहेत. (आता मला काळजीचे काहीच कारण नाही. आता माझी काळजी घेणारा, सर्व शक्तीमान परमेश्वर माझ्याबरोबर असताना काळजी कशाला ? काळोख कितीही पडलेला असेना का, जर माझ्याकडे उजेड करण्याचे खात्रीचे साधन जर असेल तर काळोखाची भीती वाटायचे काहीच कारण नाही.)
आता, परमेश्वरच नाही, ही विकल्प भावना आपणच जर तयार करून घेतली असेल तर, तीर्थ काय, पाणी काय. ब्रॅण्डेड काय, जेनेरीक काय, कशानेच गुण येणार नाही. एक भक्कम आधार भक्तीचा हवा तर भीती नाहीशी होते.
"मेरे लिए दुवा करो,"
"प्लीज, प्रे फाॅर मी" असं सांगणारी मुसलमान ख्रिश्चन माणसे आपण अवतीभवती बघतो, पिक्चरमधे असे डायलाॅगदेखील आपण ऐकतो, पण "माझे आजारपण कमी होण्यासाठी तुम्ही, माझ्यासाठी देवाला सांगा", असं विश्वासाने सांगणारी माणसे कमी होत चालली आहेत.
केवळ औषध काम करत नाही.
हरबार दवा काम नही करती, कभी कभी दुवा भी काम करती है !
यालाच दैवं पंचमम् उत्तमम् असे म्हटलेलं आहे.
-- वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
02362-223423.
27.04.2017
“जा तेल लावीत” असे वाक्य आपण काही वेळा रागाने म्हणतो. हे खरं तर सकारात्मक वाक्य आहे.
आपण सेवन करत असलेल्या त्रिफळा चुर्णामध्ये देखील हरडा व बेहड्या सोबत आवळा असतो.
आवळ्याचे २०-२५ फूट उंच वृक्ष असतो.ह्याची पाने चिंचेच्या पानांप्रमाणे असतात व ह्याला पिवळी फुले गुच्छ स्वरूपात येतात.फळे गोलाकार,मांसल पिवळसर हिरवी व आत टणक बी असणारी असतात.
ह्याच्यात खारट सोडुन बाकी पाच ही चवी असतात व त्यात आंबट चव प्रमुख असते.हा थंड गुणाचा असून तो तिन्ही दोषांचे शमन करतो.
आता आवळ्याचे घरगुती उपयोग पाहूया:
१)ज्या बायकांना अंगावर पांढरे जाते त्यांनी आवळ्याच्या बिया पाण्यात वाटून त्यात साखर व मध घालून सलग तीन दिवस घ्याव्या.
२)खरूज झाल्यास आवळ्याचे चुर्ण जाळून त्याची राख करावी व ती तीळ अथवा निंब तेलामध्ये कालवून लावावी.
३)घसा बसला असल्यास गाईच्या दुंधात आवळ्याचे चुर्ण मिसळून द्यावे.
४)अम्लपित्तामध्ये आवळ्याचे चुर्ण केळीच्या कांद्याच्या रसामध्ये मिसळून द्यावे.
५)नाकाचा घोळणा फुटून रक्तस्राव होत असल्यास व डोके वारंवार दुखत असल्यास आवळ्याचे चुर्ण तुप व साखर घालून खावे.
६)पित्याच्या विकारामध्ये आवळ्याचे ५ ग्राम चुर्ण कल्हई केलेल्या भांड्यात रात्रभर भिजत ठेवावे व सकाळी हे त्यात ५० मिली गाईचे दुध मिसळून ते प्यावे.
७)१ चमचा आवळा रस+ २ चमचे ओल्या हळदीचा रस सकाळी उपाशी पोटी घेतल्यास मधुमेहामध्ये फायदा होतो.
८)१ चमचा आवळा रस+ ४मोठे चमचे नारळाचे दुध रोज दुपारी जेवणापुर्वी घेतल्यास कृमिंचा त्रास कमी होतो.
९)१ चमचा आवळा रस+२ चमचे केळफूलाचा रस रोज २ महीने घेतल्यास बायकांचे अंगावर पांढरे जाणे,मासिक पाळीच्या वेळी अतिरक्तस्त्राव होणे ह्या तक्रारी कमी होतात.
१०)१ चमचा आवळा चुर्ण १ कप ताज्या ताकामध्ये मिसळून रोज जेवणानंतर घेतल्यास हाता पायाची आग होणे,संडासच्या जागी होणारी आग ह्या तक्रारी कमी होतात.
आवळा किती ही चांगला असला तरी तो अति खाल्ल्यास जुलाब होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
हे जंगली फळ असल्याने ह्याला जंगलची काळी मैना म्हणतात.घनदाट काळ्या झुडपात हि पिकतात साधारणपणे डोंगराळ भागात.करवंदांची फळांच्या पुड्या घेऊन लोक हायवेच्या कडेला किंवा बाजारात बसतात.
करवंदे कच्ची असताना टणक,हिरवी,आंबट तुरट चवीची व उष्ण आणी पित्तकर व वातनाशक असतात.तर पिकलेली करवंदे जांभळी चवीला आंबट गोड व थंड आणी कफपित्त नाशक असतात.कच्ची करवंदे लोणचे करायला वापरतात.
आता आपण ह्याचे घरगुती उपचार पाहूयात:
१)कच्च्या करवंदांचे लोणचे भुक वाढविते,खाल्लेल्या अन्नात पाचक स्त्राव मिसळून त्याचे चांगले पचन करविते.
२)पोटात पित्त वाढून आग होत असल्यास पिकलेली गोड करवंदे खावीत आराम पडतो.
३)गांधीलमाशी किंवा विषारी किडा चावल्यास करवंदे कुचकरून त्याची चटणी दंश झालेल्या भागी चोळावी.
४)पोपटामध्ये वात धरून पोट फुगले व दुंखु लागल्यास मुगाचे कढण करावे व त्यात ५ कच्ची करवंदे व १ मोठा चमचा दही घालून प्यावे फायदा होतो.
५)तोंडास रूची नसणे,तोंड बेचव होणे ह्यात ८-१० करवंदे चावून तोंडात येणारी लाळ थुंकून टाकावा तोंडाची चव सुधारते.
कच्ची करवंदे जास्त खाल्ल्यास पोटात आग होते तर पिकलेली करवंदे जास्त खाल्ल्यास पोट बिघडते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
अमुक रोग 'कमी करण्यासाठी' आयुर्वेदात काय औषध सांगितले आहे, असा प्रश्न विचारायला लागू नये, यासाठी, रोग होऊच नये यासाठी आयुर्वेद नीट समजून घेणे आवश्यक आहे.
आयुर्वेदात सांगितलेले उपाय हे प्राधान्याने रोग होऊ नयेत, यासाठी सांगितलेले आहेत, हे आधी लक्षात घ्यावे. केवळ रोगाची लक्षणे कमी केले की झाले असे नव्हे तर, जो रोग समूळ नष्ट व्हायला हवा, तो योग्य औषधोपचार आणि विशिष्ट पथ्य सांभाळले की झाले. त्यासाठी औषधे कायमची कशाला घ्यायची ?
आयुर्वेद ही एक जीवनशैली आहे. त्यामुळे जीवन कसे जगावे, जीवन म्हणजे काय, त्याचा उद्देश काय आहे, हे अगदी सुरवातीलाच स्पष्टपणे ग्रंथकार सांगतात.
प्रमेहासारखे रोग होऊ नयेत, यासाठी ही जीवनपद्धती समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आयुर्वेद म्हणजे कोणतीही 'पॅथी' नाही. किंवा हे सांगण्यात सुद्धा कोणताही अहंकार नाही. सुदैवाने आपल्या या संपूर्ण स्वदेशी शास्त्राचा अभ्यास करता आला, हे माझे सद्भाग्य. घेतलेल्या शिक्षणपद्धतीचा परिणाम म्हणून काही जणाना आयुर्वेद नाही शिकता आला, म्हणून वाईट वाटून घेण्याचे काहीच कारण नाही. फक्त तो नीट समजून घ्यावा. वाग्भटजीनी आपल्या ग्रंथाची सुरवातच एका छान श्लोकाने केली आहे. त्यात ते म्हणतात, हे शास्त्रीय ज्ञान मिळवण्यासाठी राग, अहंकार, अभिनिवेश, गर्व, आदि बाजूला ठेवावे. तरच ग्रंथ नीट समजून शिकता येईल. त्यासाठी पूर्वग्रह दूषित दृष्टी बदलायला हवी. अजूनही काही डाॅक्टर आयुर्वेद म्हणजे बोगसगिरी असे ( अज्ञानाने ) म्हणतात.
"देवा, त्यांना क्षमा कर, ते काय बोलत आहेत, ते त्यांचे त्यांनाच कळत नाहीये."
आणि आयुर्वेदाचे काही (ज्ञानी ) पदवीधर सुद्धा आयुर्वेदाचीच थट्टा करतात, त्यांची तर किव करावीशी वाटते.
असो.
काल परवा काही जणांनी वैयक्तिकरीत्या विचारलेल्या शंकाना सार्वजनिकरीत्या उत्तर द्यावेसे वाटले. म्हणून लिहिले.
प्रमेहामधे दही नको. या कायद्याला पळवाटीची युक्ती कशी शोधावी हे आपण पाहिले.
काही वेळा असे सांगितले जाते, की एवढी वर्षे आम्ही दही खातोय, आम्हाला काय सुद्धा धाड भरली नाही.? हे कसे ?"
प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. एखाद्या व्यक्तीची काहीवेळा मानसिक ताकद जास्त असते. काहीवेळा आध्यात्मिक शक्ती त्याला मदत करत असतात, त्यामुळे रोग लगेच होत नाहीत. पण जेव्हा यापैकी एखादी ताकद कमी होते, तेव्हा लगेच किंवा कालांतराने त्रास संभवू शकतात. जे शारिरीक त्रास आज मला होत नाहीत, किंवा लक्षणे दिसत नाहीत, ते आजार किंवा रोग भविष्यात होणारच नाहीत, यासारख्या भ्रमात कोणी राहू नये. तसेच प्रमेहासारख्या रोगात कायमस्वरुपी औषध घ्यायलाच लागते, या गैरसमजात देखील कुणी राहू नये.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
30.01.2017
पाणी शुद्धीकरण भाग पाच
पाणी शुद्ध करण्यासाठी आणखी एक पद्धत शाळेत शिकवली गेलीय, जी एकदम साधी सोपी आहे.
त्यातील मुळ कल्पना लक्षात घेतली की, आपल्याला हवे बदल त्यात करता येतील.
एका छोटे छिद्र असलेले मडके घेऊन त्या छिद्रावर एक तलम मलमलचे कापड आतल्या बाजूला ठेवावे. त्या मडक्यात चार इंच वाळू भरावी. त्यावर कोळसे टाकावेत. त्यावर माठे गुळगुळीत दगड भरावेत. वरून हळुवार पाणी ओतावे. मोठी अशुद्धी कोळशात अडकते. छोटी अशुद्धी वाळूच्या कणामधे अडकते. त्याहून छोटी अशुद्धी कापडात अडकते. आणि नंतर छिद्रांतून पाणी ठिपकू लागते. जे शुद्ध स्वरूपात मिळते. दररोज कापड स्वच्छ धुवुन घ्यावे.
याच यंत्रामधे थोडा बदल असाही करता येतो. दोन मडकी एकावर एक ठेवून वरील मडक्याच्या तळाला छोटे छिद्र करावे आणि सर्व सामग्री घालावी. खालील मडक्यात पाणी जमा होते.
हेच तत्व वाॅटर फिल्टर्स मधे वापरले जाते. वेगवेगळी मटेरीयल वापरून काही अडथळे (कांड्या ) निर्माण केले जातात, जेणेकरून पाण्यातील अशुद्धी त्यात अडकत जाईल. काही दिवसानी हया कांड्या बदलाव्या लागतात.
काही फिल्टर्स मधे इलेक्ट्रॉनिक रचना वापरली जाते. पण सर्वात उत्तम उपाय म्हणजे पाणी उकळून घेणे.
पाणी किती उकळले म्हणजे त्यातील अशुद्धी दूर होईल ?
आजचे विज्ञान सांगते किमान चाळीस मिनीटे पाणी उकळत राहिले तरच त्यातील अशुद्धी जाते. काही जंतु असे असतात, की ते पाण्याचे तापमान जसे वाढत जाते तसे स्वतःभोवती एक कवच तयार करतात आणि उकळत्या पाण्यात चक्क खेळतात. हे छुपे रूस्तम चाळीस मिनीटापर्यंत जिवंत राहू शकतात नंतर मात्र ते मरतात.
पाण्याचा एक सोळांश काढा करणे, हा नक्कीच चांगला उपाय आहे. कोणत्याही वाॅटर फिल्टर मधले पाणी सोळा लीटर घेऊन ते एक लीटर उरेपर्यंत आटवावे.
केवळ उकळले तरी पुरत नाही. पुनः ते गाळावेही लागतेच. कारण उकळल्यामुळे त्यातील अविद्राव्य घटक तळाला बसतात आणि ते प्रत्यक्षात दिसतात. ते गाळल्याशिवाय दूर होतच नाहीत.
एक सोळांश उकळणे राहिले दूरच, किमान अष्टावशेष तरी राहूदेत, किंवा चतुर्थांश तरी आटवा, किंवा दोनाचे एक तरी करा, किमान उकळा तरी. यापैकी काहीही एक करा, पण करा.
नाहीतर तुमची पचन क्षमता एवढी वाढवा की, रोगाचे जंतु तुम्ही प्रत्यक्ष गिळलेत, तरी ते तुमच्या अग्निने सर्व भस्म करून टाकू शकाल.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
01.01.2017
या अन्नपचनातून आणखी एक स्फोटक पदार्थ तयार होतो. जो दिसत नाही, पण आपले अस्तित्व सतत दाखवत असतो,
ज्याच्यामुळे दवाखान्यात येणारे नव्वद टक्के रूग्ण हैराण झालेले असतात,
जो आजपर्यंत कोणत्याही पॅथाॅलाॅजी लॅबला दिसलेला नाही, कंप्युटरला समजलेला नाही, एम आर आय ला उमजलेला नाही. स्कॅनमशीन शोधू शकली नाही.
जो आपले कर्तृत्व तर दाखवतो, पण स्वतः मात्र नामानिराळा रहातो.
ज्याच्या दबावाखाली भले भले अवयव गुपचूप बसून रहातात. आपले कामही करू शकत नाही, असा दरारा असणारा,
ग्रंथात, ज्याच्या नावावर, ऐशी रोगांची भलीमोठी लिस्ट लागलेली आहे असा,
वाॅन्टेड असे फर्मान येऊनही त्याला कोणीही पकडू न शकलेला,
जो स्वतः विकृत होऊन, कफाला पित्ताला हलवून टाकण्याची क्षमता असलेला,
स्वतःची वेगळी स्रोतस यंत्रणा नसतानाही, इतर प्रस्थापित यंत्रणेचा वापर करत, सर्व स्रोतसांमधे भरून रहाणारा,
विकृत झालेल्या पित्तामुळे बिघडलेला अग्नि हा ज्याचा पितामह म्हणजे आजोबा, आणि त्यामुळेच विकृत झालेल्या कफाचा परिणाम म्हणून जन्माला आलेले 'आमजन्य अपचन' हा ज्याचा पिता आहे, ज्याच्यामुळे अनेक अन्य रोगांना जन्म मिळालेला असतो, किंवा जो त्यांचा जन्मदाता असतो,
शोषून घेऊन सुकवून टाकणे हा दुर्गुण असलेला, अत्यंत चंचल स्वभावाची जोड मिळाली की, समोरच्यातला स्नेह आटवून टाकणारा,
पाण्यामुळे वाढणारा, पाण्यात काम करण्याऱ्या मंडळींना लवकर पकडणारा, थंड गुणाचा जवळचा मित्र असणारा,
ज्याच्या अस्तित्वामुळे पोटाला चारी बाजूला सारखीच तडस लागते, हा भौतिकशास्त्रातील नियम सिद्ध करणारा,
ज्याच्याकडे स्त्री पुरूष वृद्ध बालक असा भेद नाही, कोणताही वांशिक, जातीय, धार्मिक भेदभाव न मानणारा,
हाडे ठिसूळ करण्यात एक नंबर, चरबी एका जागी साठवून ठेवण्यात एक नंबर, मळाला सुकवून टाकून विबंध निर्माण करण्यात एक नंबर, मनात आलं तर अग्निला भडकवून टाकून, एका ठिकाणी लागलेली आग दुसऱ्या ठिकाणी नेऊन, लावालावी करण्यात एक नंबर असलेला,
श्रम केले नाही, पोट हलवले नाही, पोट दाबले गेले नाही, पोट पिळले गेले नाही, तर जिथे आहे तिथे, तस्साच पडून रहाणारा,
बहुतेक वेळा आभासी ह्रदयरोगाची लक्षणे दाखवणारा, आणि प्रचंड भीती उत्पन्न करणारा,
क्षणात इथे तर क्षणात तिथे असा लपाछपीचा खेळ खेळत स्नायुंना कमजोर करून टाकणारा,
काय खाल्लेतर बरे होईल, काय नाय खाल्लेतर बरे होईल, या द्वंद्वात कायम ठेवणारा, काहीही खाल्लेतरी आणि काही नाही खाल्लेतरी जे करायचंय ते करणारा,
एवढं असूनही स्वतंत्रपणे शास्त्रीय नावाचं बारसं न झालेला, त्यामुळे स्वतंत्र व्याधी म्हणावा की नाही, इथपर्यंत वैद्यांची चर्चासत्रे घडवणारा
वन अॅण्ड ओन्ली वन
गॅस
गॅस
आणि
गॅस
-- वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
31.03.2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 15-पुष्प तिसरे
फुल हा नाजूक आणि नाशीवंत अवयव ! त्याचे आयुष्यही एखाद्या दिवसाचेच!!! त्यामुळे फूल टिकणेही कठीण. टिकवणेही कठीण. पण त्यापासून मिळणारा मध मात्र टिकतो.
फुले देवाला वाहाताना देठ काढून वाहतात. जे द्यायचे ते उत्तम गुणाचे. जसे देहाला तसेच देवाला. आपणही अन्नाचा दर्जा, प्रत, पाहूनच माल खरेदी करतो. धान्य निवडतो, त्यावर संस्कार करतो, निवडणे, आसडणे, पाखडणे, घोळणे, चाळणे, धुणे, सुकवणे, वाळवणे, चिरणे, खोवणे, तळणे, भाजणे, उकडणे, वाफवणे, शिजवणे, परतणे, इ.इ. यापैकी कोणता तरी संस्कार करतो आणि नंतरच वापरतो. हा फरक आहे पशु पक्षी आणि मानवामधील. जी बुद्धी आहे, ती वापरली तरच पचन सुलभ होते.
देवाला देताना सुद्धा जे जांगले असेल तेच द्यावे. देवाला दिलेले परत आपल्याकडेच येत असते. न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार देवाला नैवेद्य उत्तम पदार्थांचा दाखवला तर तो परत आपल्याचकडे येणार आहे. कारण तो नैवेद्य प्रसाद म्हणून आपणच सेवन करणार असतो.
फुले सुद्धा निवडूनच अर्पण करावीत. किडकी, शिळी, मनात राग ठेवून ओरबाडलेली फुले देवाला सुद्धा चालत नाहीत.
फुले, पाने, ओरबाडायची तर नसतातच, पण तोडायची पण नसतात, तर खुडायची असतात. खुडणे हा संस्कार फक्त फुलांसाठी. खुडताना नखांचा वापर केला जातो. तोडण्यासाठी बोटे वापरली जातात. ( आणि माणसे तोडण्यासाठी शब्द !) डोलणारे फूल एकदा फांदीवरून तोडले की फांदीपासून कायमचेच वेगळे होत असते. ते परत जोडता येत नाही. ( माणसांचे मात्र तसे नाही. "क्षमस्व" मनापासून म्हटले तर तोडलेली नाजूक माणसे देखील जोडली जातात. पण मनापासून साॅरी म्हणायला आलं पाहिजे. काही माणसांना मनापासून "साॅरी" सुद्धा म्हणता येत नाही. तोंडदेखलेपणाने "साॅरी" म्हणतात, हे मोठ्या मनाने ऐकून घेणाऱ्याच्या सहज लक्षात येते. समर्थांनी नमस्कार करण्याचे फायदे दासबोधातील एका समासामधे छान वर्णन केलेले आहेत. असो ! )
फुल खुडताना अगदी हलकेच खुडायचे असते. नखांनी हळुवारपणे खुडायचे असते. फांदी, पान यांना अजिबात धक्का न लावता. खुडल्यामुळे फुलांच्या देठातील रस आपल्या नखात शिरत असतो. मेंदी लावल्यावर कसं नख रंगतं, म्हणजे मेंदीचा रस जर नखातून आरपार जिरतो तर फुलांचा रस देखील नखातून शरीरात जातो. (दोन्ही हातांची नखे एकमेकांवर घासली असता केसांचं आरोग्य चांगलं राहाते, असे प.पू. स्वामी रामदेवबाबा म्हणतात.) म्हणजेच नखे हा देखील शरीरात औषध देण्याचा एक मार्ग आहे. व्यवहारात हे लक्षात येत नाही.
वेगवेगळ्या फुलामधे वेगवेगळे अर्क असणार, वेगवेगळी फुले खुडली की, ते सर्व प्रकारचे अर्क आपल्या नखातून शरीरात शोषले जाणार. शरीराच्या दृष्टीने काही उपयोगी असतील काही निरूपयोगी. ते शरीर ठरवेल. आपलं काम शरीरात अन्न पोचवणे ! त्यातून काय निर्माण करायचं, कसं निर्माण करायचं, किती टाकायचं किती वापरायचं, हे तो ठरवेल ! आपण आपलं नेहेमीचं काम, धर्म म्हणून करावं. फळाची अपेक्षा न ठेवता ! फळ तर मिळणारच असते. हाच तर त्याचा नियम आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
08.06.2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक सात
निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच-भाग दोन !
यापूर्वी लिहिलेल्या उपवास मालिकेमधे खरंतर हे सर्व नियम सांगितले आहेतच, पण.....
आपलं जसं एक मन असतं, तसं निसर्गाचं एक मन असतं. विश्व मन. आपण जसा विचार करत असतो, तसा निसर्ग पण विचार करत असतो. आपलं मन जेव्हा विश्वमनाशी जोडलं जातं, तेव्हा खूप प्रसन्न वाटतं. विश्वाची सर्व एनर्जी, उर्जा आपण जेव्हा आपल्या मनापासून स्विकारतो, तेव्हा ही आनंदाची अनुभूती आपल्याला येत असते.
आपण जसा विचार करतो, तसं आरोग्य आपणाला मिळत असतं. कोणत्याही रोगाची बीजे ही आपल्याच मनामधे असतात. ती विश्वमनाशी जोडली गेली की, तीच स्पंदने पुनः आपल्यापाशी येतात.
आपल्या उपनिषदांमधे हेच सांगितले आहे. ब्रह्मांडामधे प्रचंड शक्ती आहे. ब्रह्मांडातील सर्व चांगल्या गोष्टी माझ्यासाठी दास बनून येऊ शकतात. हे विश्व मला सतत मदत करत आहे. मला माझ्या प्रत्येक कार्यात ही शक्ती सूक्ष्म रूपात मदत करत आहे. माझ्या सर्व गरजा विश्वमनाकडून पुरवल्या जात आहेत. हे विश्व खूप सामर्थ्यशाली आहे, त्यामुळे माझ्या सर्व योग्य गरजा विश्वमनाकडून सहज पूर्ण होणाऱ्या आहेत. त्याच्यासाठी या गरजा म्हणजे किस झाड की पत्ती !
फक्त योग्य शब्दात, योग्य वेळी त्या मागितल्या पाहिजेत. त्या सर्व इच्छा पूर्ण होणारच आहेत, असा विश्वास पाहिजे, या आनंदात सतत राहिलो तर त्या मिळतातच !
वास्तुशास्त्रामधे पण हेच सांगितलेले आहे. वास्तु कायम "तथास्तु" म्हणत असतो. घरात कायम सकारात्मक स्पंदने असतील तर कोणतीही प्रबळ अनिष्ट शक्ती कोणताही त्रास देऊ शकत नाही. निसर्गाचे हे नियम, ही स्पंदने, ही उर्जा घेण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. असा सकारात्मक विचार करायला शिकलं पाहिजे.
माझ्या आजोबांना डायबेटीस होता, वडीलांना पण होता, आता मलाही तो होणार आहे, असा विचार जर मनात प्रबळ होत गेला तर, कितीही पथ्य पाळले तरी डायबेटीस तुम्हाला शोधत तुमच्याकडे येणारच. हाच निसर्गाचा नियम आहे.
मग विचारांची स्पंदने जर सकारात्मक ठेवली तर विश्वमना पर्यंत पोचणारा परिणाम सकारात्मकच असणार ! म्हणजेच काहीही झाले तरी मला डायबेटीस होणार नाही, वाढलेल्या साखरेचा मला काहीही त्रास होणार नाही, अशी स्पंदने जर निसर्गामधे प्रक्षेपित केली तर तीच स्पंदने जास्त ताकद घेऊन पुनः आपल्याचकडे परत येतात आणि रोगापासून हवे असलेले संरक्षक कवच आपणाला मिळत असते. यालाच आजच्या भाषेत प्रतिकारशक्ती म्हणतात.
राॅन्डा बर्न यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे, द सिक्रेट नावाचं. या पुस्तकात हेच रहस्य सांगितलेलं आहे. आपण जो विचार करतो, तो एवढा सकारात्मक करा की विश्वमनाशी तो जोडला जाईल.
रोन्डा बर्न यांचे नाव एवढ्यासाठीच घेतले की आपली मानसिकताच अशी बनली आहे, की पाश्चात्य तज्ञ जे सांगतात, तेच अंतिम सत्य. जणुकाही आकाशातूनच पडले आहे, आपल्या पराभूत भारतीय मानसिकतेचा तो परिणाम आहे, इतकंच. बाकी विशेष नाही.
सो बी पाॅझिटीव्ह, नेचर हियर्स यु !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
07.05.2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 29
नैवेद्यम् समर्पयामी-भाग तीन
नैवेद्य करताना सोवळ्यातच करावा, असा दंडक आहे.
नेमके सोवळे म्हणजे काय हो ? पीतांबर ? रेशमी वस्त्र? की धूतवस्त्र ? की आणखीनच काही ? आणि काय आवश्यकता आहे या सोवळ्याची ? त्याच्यावर काय फक्त ब्राह्मणांचीच मक्तेदारी आहे काय ?
कधीच नव्हती, कधीच नाही, कधीच नसावी.
सोवळे म्हणजे शुद्धता. स्वच्छता.
आपण जे स्वच्छतेचे नियम पाळतो ते जरा कडक केले तर शुद्धता मिळते. नेहेमीच्या वापरातील कपडे आणि सोवळ्यातील कपडे, वेगवेगळे ठेवण्याचे हेच एकमेव कारण. आपण बाहेर हवे तसे फिरतो. बाह्य वातावरणातील जीवजंतु आपल्या अंगाखांद्यावर, हातापायावर बसतात, आपल्याबरोबर ते आपल्या घरात येतात. स्वयंपाकघरात येतात. अन्नापर्यंत पोचतात. आणि अन्नातून आपल्या पोटातही जातात. जीवजंतुंचा, अन्न आणि आहार ते आपले शरीर अवयव, हा प्रवास जेवढा टाळता येईल, तेवढा टाळला जावा, यासाठी हे सोवळे ! काय चूक आहे असे सोवळे पाळण्यात ?
बाहेरून घरात आल्यावर हात पाय धुवुन कपडे बदलून घरात यावे असा कडक नियम एकेकाळी ब्राह्मण घरात होता. मी जाणीवपूर्वक जातीचा उल्लेख करतोय. काही कर्मठ ब्राह्मण घरात तर बाहेरून आल्यावर कपडेच काय, जे बरोबर आणलेले सामान, वस्तु,भेटी, पिशव्या, भाजी, जेवढे धुता येईल तेवढे सर्व धुवुन घेतले जायचे. का ? कशासाठी? एवढा कर्मठपणा आवश्यक होता का ? उलट गत कालापेक्षा आताच्या कालात असा कर्मठपणा घरात आणला तरी पन्नास टक्के आजार कमी होतील. आमच्या सौभाग्यवती नोटादेखील धुवुन घेतात, कारण विचारले तर सांगतात, "लोक नोटा मोजताना थुंकी लावून मोजतात, या नोटा खाटीकखान्यातून आल्या असतील तर मांस लागलेले असेल, मासळी बाजारातून आल्या असतील तर रक्त लागलेलं असेल, रस्त्यावर ही नोट पडलेली असेल तर तिथली घाण लागलेली असेल, म्हणून मी त्या नोटा धुते." काय चुकले तिचे ? ( मनात म्हटलं दोन हजाराची नोट फक्त धुवु नकोस, रंग जातो म्हणे !जोक अपार्ट,) पण हे सोवळे नव्हे काय ?
बाजारभर फिरायचे आणि घरात, अगदी स्वयंपाकघरात देखील तसेच त्याच बूटांनी फिरायचे ? बूट काढले तर साॅक्सची घाण म्हणे घरात येते. एवढे सोवळे कळते तर स्वच्छता कोणी ठेवायची ? बूट साॅक्स, बाहेरचे कपडे यावर जी घाण आहे ती घराबाहेर ठेवावी. हातपाय धुवून आत यावे, एवढे सुद्धा समजत नाही ?
आणि स्वयंपाकघरात तर आंघोळ केल्याशिवाय जायचेच नाही, समजा चुकुन गेलात तर कशालाही स्पर्श करायचा नाही. हे पण सोवळेच. देवघरातील गोष्टच वेगळी!
देवघरात पूर्वीच्या काळी वर्षाच्या बेगमीची लोणची, सांडगे कुरडया, पापड, मुरांबे, गुलकंद आदि "आयसोलेट " करून ठेवलेले असायचे ! हे पण सोवळेच ! तिथे तर आणखीनच कडक सोवळे. नेहेमीच्या धुतलेल्या वस्त्राने पण तिथे जायचे नाही. आंघोळ झाली की तडक देवघरात जाऊन तिथेच ठेवलेले सोवळे नावाचे वस्त्र नेसायचे. त्यानंतर कश्याकश्यालाही स्पर्श करायचा नाही. आणि देवपूजा नैवेद्य सर्व कर्मकांड पार पडायचे. हे सर्व कर्मकांड ब्राह्मण घरात इमाने इतबारे व्हायचे ! काय ही स्वच्छता, हे सोवळे चुकीचे होते ?
या देवासाठी नैवेद्याचा स्वयंपाक देखील सोवळ्यातच व्हायला हवा, असा दंडक चुकीचा होता का ? जे जे देवासाठी ते ते देहासाठी या नियमानुसार, जर देवाला शुद्ध आणि सात्विक लागते तेच आपणाला सुद्धा.
आणि काय हो,
आज डाॅक्टर मंडळी सांगतात, कुत्रा मांजर या प्राण्यांपासून लांब रहा, त्याना "टच" करू नका, त्यांच्या अंगावरील केसापासून तुम्हाला अॅलर्जी होईल, दमा चाळवेल, तेव्हा तुम्ही मान्यच करता ना कि या प्राण्यांच्या अंगावरील जे काही अदृश्य जीवजंतु, "अॅलर्जिक सबस्टन्स " आपणाला पुढे जाऊन त्रास निर्माण करू शकेल, त्यापासून सावध राहिलेले बरे. ही "प्रिकाॅशन" घेणे म्हणजेच सोवळे.
ऑपरेशन थिएटरमधे एखाद्याचे शस्त्रकर्म करायचे असेल तर तिथे कोणाला प्रवेश असतो ? नन अदर दॅन डाॅक्टर अॅण्ड सिस्टर्स. फक्त नर्स आणि डाॅक्टरच तिथे जाऊ शकतात. का ? आम्ही का नाही जाऊ शकत ? तर आपण त्या ऑपरेशन थिएटरमधील नर्स आणि डाॅक्टरांसारखा "स्टरलाईझ्ड ऑटोक्लेव्हड" पोशाख घातलेला असत नाही, हे एक कारण असते.
अरे, म्हणजे आज "ऑपरेशन थिएटर" मधे देखील सर्व डाॅक्टर सोवळ्यातच असतात म्हणा की !
हो.
हे सर्व डाॅक्टर्स ऑपरेशन थिएटरमधे सोवळे नेसलेले अगदी कर्मठ ब्राह्मणच असतात, मग त्यांची जात काही का असेना !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
22.06.2017
Copyright © 2025 | Marathisrushti