जे जे देवासाठी ते ते देहासाठी या शृंखलेतील हा शंभरावा नमस्कार ! गेल्या वर्षी सुरू केलेल्या या पूर्ण मालिकेला खूप छान प्रतिसाद मिळतोय. किमान 450 भाग सलग लिहून झाले आहेत.
प्रमेहामधे नुसता जिभेवर संयम ठेवून चालत नाही. झोपेवर पण संयम ठेवावा लागतो. आपल्या मूळ श्लोकातील आस्यासुख शब्दानंतरचा दुसरा शब्द स्वप्नसुख.
स्वप्न या शब्दाचा अर्थ निद्रा, झोप. नेहेमीची शांत झोप लागणे वेगळे आणि लोळतलोळत पडणे वेगळे!
नेहेमीची शांत झोप आवश्यकच आहे. आरोग्याच्या प्रमुख घटकामधे ती आहार आणि ब्रह्मचर्याबरोबर स्विकृत झालेली आहे.
झोप अशी हवी की, तिला अन्य गोळी, अभ्यास, अंथरूण पांघरूण, उशी, अंगाई, कोणाचीही गरज नसावी. पडल्या पडल्या ती आली पाहिजे. दिवसभर एवढे श्रम व्हावेत, की कधी एकदा आडवे टेकतोय असे व्हावे, आणि पाठ टेकताक्षणी ती प्रसन्न व्हावी. जसं झोपून उठून मलविसर्जनाला गेल्यावर पाच मिनीटात परत बाहेर यावेसे वाटले पाहिजे. आणि झोप पूर्ण झाल्यावर आणखी थोडावेळ झोपूया, असे न वाटणे म्हणजे झोप पूर्ण होणे. मुख्य म्हणजे या झोपेचे समाधान मिळाले पाहिजे.
झोपेचा आणखी हव्यास वाटू लागणे म्हणजे प्रमेहाकडे वाटचाल सुरू होणे.
अर्थात हे लहान मस्तीखोर मुले जी दिवसभर फक्त धावपळच करतात आणि झोपतात, त्यांच्यासाठी नाही सांगितलेले !
ज्यांची झोप पूर्ण झालेली आहे आणि ज्यांना नुसते अंथरुणात लोळत पडायला आवडते, त्यांना थोडे लवकर अंथरूणातून उठून बाहेर पडायला हवे. ही जास्तीची झोप शरीरातील कफ दोष वाढवते.
दोषांची प्राकृत कर्मे ही शरीरात होतच असतात पण या प्राकृत कामापेक्षा, गरज नसताना, आणखी जास्त कार्य घडून येणे म्हणजे प्रकोप होणे आणि गरजेपेक्षा काम कमी होणे हा दोषांचा क्षय मानावा. अतिरिक्त झोपेमुळे सुस्ती, येते. शरीर आळसावते. पचन मंदावते. अग्नि कमी होतो.
आपण कसं रात्री झोपताना खोलीतील मोठा बल्ब कमी करून झिरोचा बल्ब सुरू ठेवतो, तसेच झोपल्यावर शरीरातील अग्निदेखील कमी केला जातो. म्हणूनतर झोपेपूर्वी पचन पूर्ण होऊन मगच झोपणे अपेक्षित आहे. म्हणून कामा निमित्त (वा असेच वाॅटसपसाठी) जागरण करणाऱ्या मंडळींना पचनाच्या विकृतींना सामोरे जावे लागते. पचनाचा आणि झोपेचा, झोपेचा आणि अग्नीचा खूप जवळचा संबंध आहे.
अग्नि कमी झाला की स्थित्यंतर, बदल होणे कमी होते. स्थिरता येते. मेद वाढतो. जाडी वाढते. म्हणजेच प्रमेहाकडे वाटचाल सुरू होते.
हे निरीक्षण फक्त आयुर्वेदात वर्णन केले आहे. ऋषींची ही दृष्टी आपल्याला आत्मसात होणे अपेक्षित आहे.
मी या स्वप्नसुखमचा आणखी एक शब्दशः अर्थ लावतो, तो म्हणजे झोपेत स्वप्नातदेखील सुख बघणे. झोपेतदेखील सुखाचाच विचार करणारी स्वप्ने बघणे म्हणजे स्वप्नसुख.
काही जणांना वाईट स्वप्न पडतात ते किंचाळत ओरडत उठतात, दुसऱ्यांची झोपमोड करतात. काही जणांना ही स्वप्ने आठवतात, तर काहींना अजिबात आठवत नाहीत. ही वाताची स्वप्ने.
काहींना आपल्याला स्वप्न पडले होते एवढे आठवते, भानावर येतात आणि खुदकन हसतात आणि लगेचच परत झोपतात.ही स्वप्ने त्यांच्या लक्षात राहातात, ही पित्ताची स्वप्नप्रकृती.
तर काहीजण या स्वप्ननगरीतून बाहेरच पडत नाहीत. जागे झाले तरी याच स्वप्नधुंदीत राहातात. झोपेतच हसतात, बोलतात, चालतात सुद्धा. पण भान नसते की आपण अजून झोपेतच स्वप्न बघत आहोत. पूर्ण भानावर येतात, तेव्हा जाग येऊन पुनः झोपतात. ही कफाच्या स्वप्नाची दुनिया असते.
आणखीन एक झोप ही फक्त रात्रीच घ्यायची असते. दिवसाचे झोपणे हे शंभर टक्के वर्ज्य.
वामकुक्षी वेगळी. आणि भरपेट जेवून, पंखा किंवा एसी लावून अंथरूण घालून, डोक्यावरून पांघरूण घेऊन, 'चला आता मस्त झोपतो', असे म्हणत जे झोपणार, त्यांचा सोबतीला प्रमेह नक्की येणार.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
05.02.2017
आरोग्याचा विचार करता, भारताचा विचार करता, चिकित्सेची मुख्य पद्धत आयुर्वेद असायला हवी होती. पण आज भारताच्या या “अल्टीमेट” चिकित्सा पद्धतीला “अल्टरनेटीव्ह” ठरवली गेली. दुय्यम दर्जा दिला गेला.
दिवसा सूर्य असतो. रात्री सूर्य नसतो.
सूर्य म्हणजे साक्षात अग्नि. पचनाला मदत करणारा. म्हणून तर आयुर्वेदात एक वचन आहे, आरोग्यम् भास्कराद् इच्छेत. म्हणजे आरोग्य ठीकठाक ठेवण्यासाठी सूर्याची भूमिका महत्वाची आहे.
सर्वात शुद्ध काय असते ? अग्नि सर्वात शुद्ध. सूर्य म्हणजे अग्नि. सूर्य म्हणजे शुद्धता. सूर्य उगवला की बाकी सर्व जीवजंतु नष्ट व्हायला सुरवात होते. या सूर्याची उष्णता त्यांना सहन होत नाही, आणि त्यातील काही जीवजंतुंचा जन्म संपतो.
आपण सूर्याला केंद्रस्थानी मानतो. आपली भूमाता सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. केवळ भूमाता नाही तर तिचे सर्व मंगळ, बुध, गुरू, शनि, शुक्र हे सर्व भाऊबंद, आपल्या मुलाबाळांसह याच सूर्याला केंद्र मानतात. आणि त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालत आपली कामे करीत असतात.
आपण आपली दिनचर्या पाळतो. सकाळी उठतो, रात्री झोपतो. पशुपक्षीदेखील, सकाळी उठतात, रात्री झोपतात. म्हणजेच सर्व निसर्ग या सूर्याच्या अधिकारात काम करत असतो.
आजच्या वैज्ञानिक नियमानुसार "फोटो सिंथेसिस" ही प्रक्रिया देखील सूर्यावरच अवलंबून असते. पानातील हिरवा रंग देखील याच सूर्यामुळे मिळतो. रक्तातील लाल पेशी वाढायला, कॅल्शियम वाढायला, आणि मुख्य म्हणजे व्हिटामिन डी वाढायला फक्त सूर्य मदत करतो. कोणत्याही प्रकारे व्हिटामिन डी कृत्रिमरीत्या तयार करता येत नाही. जरी जाहिरातीतून तसे दावे केले जात असले तरी, जाहिरातीमधे दाखवतात, ते सर्व खरे कुठे असते ? असो.
तर आपण सूर्यवंशी आहोत. सूर्य उगवतो, त्याच्या स्वागताला आपण आधी उठतो, तो मावळला की आपले सर्व व्यवहार बंद करीत झोपी जातो. हा निसर्ग नियम आहे.
या सूर्याला साक्षी ठेवूनच आपण आपली सर्व महत्त्वाची कामे करीत असतो. जसे नेहमीचे पोटभरतीसाठीचे व्यवसाय, लग्न, मुंज, वास्तुशांत, गृहप्रवेश, होमहवन, वाढदिवस, देवदर्शन, बारसे, इ शुभकार्ये दिवसाचीच केली जातात. कधी विचार केलाय, असं का, असा ?
तेव्हा उत्तर मिळालं, सूर्य असतो म्हणून.
तसेच जेवणे हे जर यज्ञकर्म असेल तर ( तर म्हणजे ते यज्ञकर्मच आहे. वदनी कवल घेता...... जाणिजे यज्ञकर्म । ) ते सुद्धा सूर्य असे पर्यंत पार पडले पाहिजे ना !
म्हणूनच सूर्य असे पर्यंत जेवावे, कारण आपणही याच निसर्गाचा एक हिस्सा आहोत ना !!
तेच नियम आपणही पाळले पाहिजेत, जे "त्याने" ठरवून दिलेले आहेत.
निसर्गापुढे आपली बुद्धी म्हणजे किस झाड की पत्ती !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
27.02.2017
आपण घेतलेल्या अन्नाला शरीराला आवश्यक असणाऱ्या स्वरूपात बदलवणे आणि पुढे ढकलणे हे तोंडाचे काम. त्यासाठी जीभ, पडजीभ, दात, दाढा, गाल, टाळू हे अवयव मदत करीत असतात.
बत्तीस दातांना त्यांचे काम करण्यासाठी पुरेसा वेळ देणं आवश्यक ठरते. सावकाश जेवा, याचा आणखी एक अर्थ अभिप्रेत आहे, "नीट चावून चावून गिळा." यासाठी दात कणखर, बळकट असणे आवश्यक आहेत.
हल्ली लहान मुलांचे दात लवकर किडतात, दोन वेळा ब्रश करूनदेखील दात किडतात, यासाठी प्लॅस्टिकच्या ब्रशऐवजी बोटांचा वापर करणे, किंवा कडूनिंबाच्या काड्यांचे टोक चावून ब्रश तयार करून वापरणे आणि टूथपेस्ट ऐवजी दंतमंजन वापरणे योग्य ठरेल. दात दोन वेळा घासले पाहिजेत. तसेच चुळादेखील नीट भरल्या पाहिजेत, म्हणजे दात लवकर किडत नाहीत. दंतमंजन गोड नको, फेस येणारे नको आणि नुसती पांढरी पावडर नको. किंचीत कडू, किंचीत तिखट किंचित तुरट असावे.
प्रत्येकाच्या दातांची ठेवण वेगळी असते. पण काम एकच असते. अन्नाचे बारीक चूर्ण करणे. वरची किंवा खालची एक दाढ जरी पडली तरी त्या दाढेखाली येणारे अन्न भरडले जात नाही आणि तो तुकडा तसाच रहातो गिळला जातो आणि अपचन सुरू होते. त्यामुळे पचनाशी दातांचा संबंध देखील असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे.
किडलेल्या दात आणि दाढांवर वेळीच उपचार करून घ्यावेत. शक्यतो दात काढू नये. रूट कॅनाॅल सारखी पद्धत वापरून जेवढं वाचवता येईल तेवढं वाचवावं. गडग्यातला एक दगड काढला तर बाजूचे दगड हलू लागतात आणि सर्व गडगा ढेपाळतो. (गडगा म्हणजे दगडाची भिंत जी, कुंपण म्हणून केली जाते.) किडलेला, हलणारा दात अथवा दाढ ही अपचनाची सुरवात असते. ती जास्तीत जास्त वाचवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.
त्याने जी बत्तीशी दिलीय, ते काही तरी कारण असेल म्हणूनच दिलीय ना ! त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी विशिष्ट हेतू असतो, ते ज्ञान मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करणे म्हणजे खरे शिक्षण.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
21.03.2017
पोट म्हणजे जणु काही मिक्सरच !
भांडे अर्धे अन्नाने, पाव भाग पाण्याने, असे एकुण पाऊण भरावे. पाव भाग हवेच्या संचरणासाठी मोकळा ठेवावा. आणि झाकण लावावे आणि दीड दोन मिनीटात मिक्सरमध्ये सर्व अन्नाचे पीठ तयार होते, हे आपण बघतोच.
जसं मिक्सरमध्ये तस्संच अगदी पोटामधे सुरू असतं ! फक्त पोटामधे हा मिक्सर दीड दोन मिनिटाऐवजी दीड दोन घंटे सुरू असतो.
जेवायला सुरवात करावी. पोटाला सूचना मिळत जाते. तसे तसे पोटात पाचक स्राव वाढत जातात. ज्या पदार्थाला पचवायला जे घटक आवश्यक आहेत, ते आधी पासूनच तिथे स्वागताला तयार असतात. सहा चवींचे सहा सोहळे आतमधे सुरू होतात. प्रत्येक चव बाहेर वेगळी असली आणि नंतर आतमधे जरी, अवघा रंग एक झाला अशी अवस्था असली तरी, त्यामधे प्रत्येक पदार्थाला जे पचवायला हवंय, ते मिळत जाते. आणि प्रत्येक पदार्थ आपलं रूपांतर करून घेण्यासाठी तयार असतो.
नाटक सुरू करण्यापूर्वी कसं सगळे कलाकार ड्रेसिंग रूममधे नियमित कपड्यांमधे आत जातात. आतमधे रंगभूषाकार एकच असतो, त्याला प्रत्येक जण आपली भूमिका काय आहे ते सांगतो, त्याअनुसार तो सगळ्यांना असं काही रंगाने रंगवतो, त्यात त्याचं मूळ रूप बदलवूनच टाकतो, जेव्हा हे कलाकार रंगमंचावर येतात, तेव्हा स्वत्व विसरून देहभान हरवून त्या भूमिकेत तादात्म्य पावतात. आणि आपल्या वाटेला आलेला कलेचा भाग सादर करत असतात. प्रत्येक जण फक्त आपली भूमिका, आपली एन्ट्रीची वेळ, एक्झिटची वेळ, आपले संवाद लक्षात ठेवतो, कोणत्या वाक्यानंतर, त्या नाटकातली माझी एन्ट्री, माझा सहभाग दाखवायचा आहे हा क्रम लक्षात ठेवलेला असतो. आणि नाटकाचा पूर्ण एकत्रित परिणाम एकदम उठावदार होतो.
अगदी तस्संच या अन्नद्रव्यांच होत असावं.
तेल तूप इ. स्निग्ध पदार्थ पचवणारी यंत्रणा वेगळी, पिष्टमय पदार्थ, आंबटगोड तिखट पचवणारी यंत्रणा वेगळी. जरी वेगवेगळी असली तरी ही सर्व यंत्रणा त्या मोठ्ठ्या रंगभूषाकाराच्या आज्ञेत आपलं काम करत असतात. अगदी यंत्राप्रमाणे.
रंगवाल्यांकडे कसं आता आपल्याला हवी असलेली शेड तयार करण्यासाठी कंप्युटरवर एक निश्चित प्रोग्राम असतो, त्यात आपल्याला हव्या असलेल्या रंगाच्या शेडचा क्रमांक लिहिला की, आतमधे जे बेसिक रंग असतात, त्यातील कोणता रंग किती मिली सोडायचा हे आधी कंप्युटर द्वारे ठरवलेलं असतं, तो तेवढ्याच प्रमाणात सिक्रीट केला जातो.
पण आपल्यासाठी हे सिक्रेट असतं.
आपल्याला काय महत्वाचं?
आपल्याला जो रंग हवा आहे, त्याच शेडनुसार तो मिळणं. बरोबर ना ! त्या सिस्टीममधे बदल करण्याची सूत्र आपल्या हातात घेऊ नये.
आतमधे मिक्सर फिरत असतो, योग्य प्रमाणात वेगवेगळे रंग योग्य प्रमाणात एकत्र होत असतात. फक्त आपल्याला त्याची जाण नसते.
ऐनवेळी प्रोग्राम बदलवणं तर फारच कठीण असतं. म्हणून असे पदार्थ खाऊ नयेत, ज्याची पूर्वकल्पना आतदिली गेली नसेल. म्हणजेच कोटेड फूड. बाहेरून एक चव आत मधे दुसरीच चव. जसं कॅपसुलमधे भरलेलं कडू औषधी. यासाठीच आयुर्वेदीय पद्धतीने जी औषधे दिली जातात, ती विशिष्ट चवींची असतात, त्याची चव तशीच्या तश्शी आतमधे समजणं तेवढंच महत्वाचं असतं. म्हणूनच आयुर्वेदातील चूर्ण, चाटण, उगाळून घ्यायची असतात. कोणत्याही औषधांच्या चवी समजणे खूप महत्वाचे असते. फसवून औषध तर नकोच, पण आहार पण ज्या त्या चवीचा समजून उमजून आत पाठवावा.
जीभेला फसवून केलेलं खाद्यकर्म नंतर त्रासदायक होऊ शकतं. हे लक्षात असावे.
आतमधे फसवाफसवी नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
26.03.2017
सोनोग्राफीमध्ये झालेल्या प्रगतीमुळे पोटाचे एक्स-रे काढण्याचे प्रमाण घटले आहे.
गणपती आणि कार्तिकेयाची गोष्ट सर्वानाच माहिती आहे. फक्त आठवण करून देतो. सर्वात मोठी प्रदक्षिणा कार्तिकेयाने आपल्या शक्तीने प्रत्यक्ष घातली होती. संपूर्ण पृथ्वीला बाहेरून प्रदक्षिणा ! आणि बुद्धीमान गणेशाने प्रदक्षिणा घातली होती, आपल्या मातापित्यांनाच. आणि मोदकावर आपला हक्क सांगितला होता.
अवयवांना आपले काम करायला एक विशिष्ट स्पेस हवी असते. जी स्पेस या गॅसच्या दबावामुळे मिळत नाही, आणि चांगले निरोगी असलेले अवयव देखील काऽही काम करू शकत नाही.
सुरुवातीला काही वर्षे सी.टी. स्कॅन मशिन्स ही फक्त डोक्याचेच स्कॅन करीत असत; परंतु विज्ञानातील व मुख्यत: संगणक शास्त्रातील प्रगतीमुळे पूर्ण शरीराचे स्कॅनिंग होऊ लागले.
Copyright © 2025 | Marathisrushti