गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवताना बघीतलंय ? नीट बघा.
कर्मकांडामधे आयुर्वेद कसा भिनलाय पहा.
नैवेद्याच्या ताटात पंचपक्वान्न सजलेली असतात.पाच प्रकारच्या भाज्या असतात. कोशींबीर, चटणी, वरण भात तूप असतेच.
नैवेद्य दाखवताना मंत्र आहेत.
प्राणाय स्वाहा
अपानाय स्वाहा
व्यानाय स्वाहा
उदानाय स्वाहा
समानाय स्वाहा
ब्रह्मणे स्वाहा
सहा वेळा हे मंत्र म्हणत ताटाभोवती पाणी फिरवायचे असते. हे घास आपण देवाला भरवतोय आणि देव जेवतोय, असा नामदेवाचा भाव मनात हवा.
लक्षात आले का , हे वायुचे पाच प्रकार आहेत. यातील प्रत्येक घास प्रत्येक वायुला अर्पण केला आहे. "आता याची जबाबदारी तुझी. पुढे न्यायचे, आणि पोटातील पाचकाग्नीच्या ताब्यात द्यायचे.माझी जबाबदारी संपली." आजच्या भाषेत रिले रेस !
त्यांच्या नावाचा पुकारा करून स्मरण केले की, तो तो वायु सूक्ष्म रूपात तिथे हजर राहून आपली जबाबदारी पूर्ण करतो.
एखाद्या संघटनेमध्ये कसे कामाचे वाटप केले जाते. पाहुण्यांची जबाबदारी एकाने, निमंत्रणे दुसर्याने, रंगमंच व्यवस्था तिसर्यावर, चौथा भोजन. ज्याला जे काम नेमून दिले आहे ते तेवढेच सांगितलेले काम त्याने पार पाडायचे. दुसर्याच्या कामात जरापण ढवळाढवळ करायची नाही, तरच सगळी कामे उत्तमरीत्या पार पडतात. तसेच प्रत्येक वायुला, प्रत्येक पित्ताला काम नेमून दिलेले आहे. याची आठवण फक्त त्यांना नावे घेऊन करून दिली जाणे, म्हणजेच नैवेद्य दाखवणे.
सहा वेळा पाणी फिरवून झाले की पुनः एक मंत्र म्हणतात,
"मध्ये पानीयम् समर्पयामी "
आणि ताम्हनात पाणी सोडायला सांगतात. म्हणजे देवाला अन्नाचे सहा घास भरवल्यानंतर भोजनाच्या मधे पाणी प्यायला दिले जाते. आणि पुनः सहा घास भरवले जातात.
"जेवताना मधे मधे पाणी प्यावे," हा साधासोपा नियम या नैवेदयामी मधे दिसला.
जे जे देवाला ते ते देहाला या नियमानुसार, तोच नियम आपणालाही लागू पडतो.
ज्ञानमार्ग्याला या नैवेद्याच्या ताटात तूप वरण भात आणि गुळखोबर्यातल्या कॅलरीज दिसतील, त्या बर्न करण्यासाठी किती पॅडलमारावे लागतील, याचे गणित त्याच्या डोक्यात सुरू होईल.
कर्ममार्ग्याला त्या मंत्रामागील अनुभव दिसेल, आणि ग्रंथोक्त रेफरन्स न शोधता, तो त्यामागील कार्यकारण भाव शोधेल.
भक्तीमार्गी व्यक्तीला त्यातील भोळा अर्पणभाव दिसेल. देवाचा प्रसाद म्हणून, अन्य कोणताही विचार न करता, ताटाभोवती निःशंक मनाने तो पाणी फिरवेल.
नैवेद्याचे भरलेले ताट तेच आहे, पण एखाद्या चिकित्सक मनात केवळ शंका आणि शंकाच येत रहातील. तो नजरेसमोर जिम ठेवील, त्याचे ग्रंथोक्त रेफरन्स शोधत बसेल आणि ताटाभोवती पाणी फिरवत उगाच नुसता चिखल करेल.
बाकी तिघेजण, तो समोरचा नैवेद्य सहज फस्त करून टाकतील, पण चौथा वैद्य मात्र केवळ त्याची चिकित्साच करत बसेल.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
07.09.2016
रसाचा आणखी एक उपप्रकार म्हणजे अनुरस होय. मुख्य चवी बरोबर आणखी एक चव मागाहून जाणवते तो अनुरस. जसे मध खाताना गोड लागतो, पण मध पोटात गेल्यावर जीभेवर एक प्रकारची तुरट चव रेंगाळत रहाते. त्याला मधाचा अनुरस म्हणतात.
कोणतेही पदार्थ एकल रस प्रधान असत नाहीत. म्हणजे मध फक्त गोडच असतो असे नाही. अग्निच्या कमी अधिक असण्यामुळे, पंचमहाभूतांच्या तरतम भावामुळे, पदार्थातील चवी मधे थोडा थोडा बदल होत जातो. आणि अनुरसांची निर्मिती होते.
जसे हिरवा रंग बघितला तरी त्यात अनेक सूक्ष्म छटा असतात. साडीला योग्य मॅचिंग ब्लाऊजपीस शोधताना, हे पाच पन्नास रंग आपल्याला सहज दिसतात. तसे, चवींमधे देखील एका चवीत आणखी दुसरी चव मिसळत गेली कि वेगळी वेगळी चव बनत जाते. घरात साखर, चहा पावडर, दूध, पाणी तेच असले तरी चार माणसांनी बनवलेल्या चार चहाच्या चवीमधे फरक पडतोच ना ! यातील साखर पावडरचे प्रमाण थोडे जरी कमी जास्त झाले किंवा गॅस लहान मोठा ठेवला गेला तरी बनणारा चहा हा वेगवेगळ्या चवींचा बनतो, हे आपण व्यवहारात पाहातो, तसेच आहे.
हिरड्यांचा तुरटपणा, सुपारीचा तुरटपणा यात फरक आहे. साखरेचा गोड पणा आणि गुळाचा गोडपणा यातही फरक आहे. तसेच कारले आणि मेथीच्या कडूपणातही फरक दिसतो. त्यामुळे प्रत्येक चवीचे वेगवेगळे अनुभव येणे आणि त्याचे शरीरावर वेगवेगळे परिणाम दिसणे, चुकीचे नाही.
एखादे नवीन व्यंजन बनवताना त्यात कोणत्या चवी किती प्रमाणात मिसळल्या जात आहेत, त्यावर त्या पदार्थांचे औषधी गुण अवलंबून असतात.
डाळीपासून गोड गुळ घालून खीर करता येते, आणि तिखट मसाला एकत्र केला की, आमटी बनते. आंबट घातले की, चटणी होईल.
आता हेच बघा ना, खीर गोड आहेच, आणि पुरणपोळी पण गोडच आहे. हे दोन्ही गोड पदार्थ एकाच चणाडाळीपासून बनतात, म्हणजे यांचे गुण एकच असतील का ? कारण एक खीर शिजवली जातेय आणि दुसरी पुरणपोळी भाजली जातेय. जो पदार्थ पाणी घालून शिजवला जातो, तो पचायला जड बनतो, तर भाजून ज्याच्यातील पाणी कमी केले जाते, ती पुरणपोळी पचायला खीरीच्या तुलनेत हलकी होईल का ? असा विचार करायला हरकत नाही, पण पुरणपोळी बनवण्यासाठी आणखी एक मधुर रस वापरला जातो, तो म्हणजे गहू. म्हणजे पुनः ती पचायला जड झाली. यासाठी
पुरणपोळी खाताना ती तुपाबरोबर किंवा कोकणात नारळाच्या दुधाबरोबर इतरत्र गाईच्या दुधाबरोबर खाल्ली जाते. सोबत डाळीची मसालेदार तिखट आमटी (ज्याला कट असेही म्हणतात.) पुरणपोळी पचवायला मदत करायला हजर असतेच.
यासाठी आहार बनवताना किंवा खाताना, चवींच्या मिलाफाचा संगम करण्यासाठी, युक्ती वापरणे महत्वाचे असते. जी ओरीजिनली भारतीयांकडे आहे.
एखादा पदार्थ सहजपणे पचावा, यासाठी त्या पदार्थामधे अन्य काही पदार्थ युक्तीने मिसळले जात होते. आता सर्वच बदलले. दोन भिन्न चवीचे पदार्थ बिनधास्त एकत्र केले जात आहेत. जसे मधुर रसाच्या दुधात आंबट फळे घालणे, किंवा दूध घातलेल्या चहामध्ये खारट चवीची खारी मारी बुचकळून खाणे हे रस विरूद्ध आहे.
हे विरूद्ध एखादा दिवस खाल्ले म्हणजे लगेच रोगाची लक्षणे दिसतील असे नाही. पण वारंवार असे रस विरूद्ध पदार्थ खाल्ले गेले तर मात्र असात्म्यता अहणजे अॅलर्जी निर्माण होते, हे नक्की !
वेगवेगळ्या फूड चॅनेल्सवर रंगसंगती, फॅशन, ट्रेंड, व्हरायटी, न्यू इन्व्हेंशन इ. च्या नावाखाली आरोग्यदायी आहाराचा पार बट्ट्याबोळ चाललेला आहे. त्यात डाएटीशियन या पदवीधारकांकडून आयुर्वेदातील मूलतत्वे बरोबर विरूद्ध करून सांगितली जात आहेत. वैद्य मंडळीदेखील पाश्चात्य बुद्धीची बनत चालली आहेत, अनेक डाॅक्टरांचे देखील आहाराबाबत एकमत होत नाही, आणि नेमकं आपण कसं वागायचं, हे समाजाला समजतच नाहीये.
किती किती ठिकाणी दुरूस्ती करणार ? आभाळच फाटले आहे, ठिगळे तरी किती लावणार ? बघू, अच्छे दिन आनेवाले है, असं ऐकायला येतंय !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
29.11.2016
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 26-दीपं दर्शयामी-भाग तीन
जसे इंधन तशी काजळी.
जर दिवा तेलाचा असेल तर काजळीचे प्रमाण वेगळे. मेणाचा असेल तर वेगळे. राॅकेलचा असेल तर काजळी जास्ती आणि पेट्रोल जाळले तर काजळी एकदम कमी. स्पिरीटला काजळी धरणारच नाही, तर विमानातील इंधनाची ज्योतच दिसणार नाही. म्हणजे जसे इंधन तशी काजळी. भगवत गीतेमधे या अर्थाचा एक श्लोक आला आहे...
भक्ष्ययते यद् ध्वान्तम कज्जलम च प्रसूयते।
यद् दीपोज्वलेत कज्जली भवेत् ।
जायते तादृशी प्रजा।
झिरोचा बल्ब, एल ई डी बल्ब, ट्यूबलाईट, फ्लुरोसंट बल्ब, हॅलोजन, हाय मास्क बल्ब या प्रत्येकापासुन मिळणारा प्रकाश वेगवेगळा.
आपल्याला ज्या कारणासाठी प्रकाश हवा आहे, त्याप्रमाणे योजना हवी. फक्त मलाच वाचायचे आहे, किंवा लेखन करायचे असेल तर टेबल लॅम्प पुरतो ना ! तिथे हॅलोजन नको ! आता तर पेनच्या रिफिलच्या टोकापुरताच उजेड पाडणारी पेन पण निघाली आहेत.
या प्रत्येक यंत्रणेला लागणारी विद्युत उर्जा देखील वेगवेगळी असते. काही ठिकाणी एसी करंट, काही ठिकाणी डीसी करंट काही ठिकाणी स्टॅबीलायझर, काही ठिकाणी अॅडेप्टर, तर काही ठिकाणी फक्त मायक्रोचीप पुरते. तसेच आहे. दिव्यातील इंधन जसे असेल तसे परिणाम आपणास मिळतात.
जो दिवा देवासाठी तसाच तो देहासाठी समजून घ्यावा. जशी काजळी दिव्यामधे तशी देहामध्ये देखील काजळी बनते. आपल्या अन्नाचा दर्जा जसा असेल, तशी काजळी बनण्याचे प्रमाण कमी जास्त होईल.
खाल्लेल्या अन्नातून चांगले आणि वाईट असे दोन भाग तयार होतात. चांगल्या उत्तम प्रतीचा आहार जर आपण सेवन केला तर तयार होणारे प्राॅडक्ट उत्तम प्रतीचेच असणार. मध्यम प्रतीचा आहार घेतला तर मध्यम प्रतीचे प्राॅडक्ट तयार होणार. आणि हलक्या प्रतीचे अन्न घेतले तर हलक्या दर्जाचे प्राॅडक्ट तयार होणार.
आड्यात जे असेल तेच पोहोऱ्यात येणार ना !
बिर्याणी करायची असेल तर तांदुळ बासमतीचाच हवा. साधा भात करायचा असेल तर तांदुळ मसूरी किंवा कोलम हवा. आणि पेज करायची असेल तर उकडा तांदुळ उत्तम असतो. आपल्याला कोणते प्राॅडक्ट बनवायचे आहे ते ठरवले तर तांदुळ कोणता वापरायचा ते निर्णय बदलतात.
तसेच शरीर पुष्ट करायचे असेल तर आहाराची योजना वेगवेगळी हवी. केवळ मांसधातु वाढवायचा असेल तर आहार वेगळा, रक्त वाढवायचे असेल तर आहार वेगळा आणि सगळेच धातु वाढवायचे असतील तर आहार वेगळा असतो.
या अन्नाच्या दर्ज्याला आयुर्वेदीय ग्रंथकार आणि गीताकार, सत्व रज तम असे नामाभिधान करतात.
आहार सात्विक असेल तर सर्व इंद्रिये, अवयव, धातु, अगदी मन सुद्धा सात्विक बनते. आहार राजसिक असेल, तर शरीरावर होणारा परिणाम राजसिक असतो, आणि आहार तामसिक असेल तर विचार आणि कृती तामसिक होते. हेच सांगण्यासाठी, पटवून देण्यासाठी, (पटवून घेणाऱ्याला) दिव्याचे उदाहरण ग्रंथकर्ते देतात.
"शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी" असे तुकाराम महाराजांनी देखील म्हटलेले आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
19.06.2017
लवण रसाचा युक्तीने वापर केला तर तो प्रिझरवेटीव्ह म्हणून वापरता येतो. म्हणून तर लोणच्यामधे मीठ जास्त घालतात.
मीठाला कधीही कीड लागत नाही. हा त्याचा एक चांगला गुण. मीठाप्रमाणेच खायचा चुना देखील कीटनाशक आहे.
मीठातील हा गुण ओळखून मासे टिकवण्यासाठी, सुकवण्यासाठी मीठाचा वापर होतो. कैरी, लिंबू मिरच्या टिकवण्यासाठी सुद्धा मीठच वापरले जाते.
कोकणात कच्च्या फणसाचे गरे मीठ लावून वाळवतात. काही ठिकाणी हे असे मीठ लावलेले कच्चे गरे नीट गुंडाळून, मातीच्या मडक्यात जमिनीत पुरूनही ठेवतात. ते कुसत नाहीत किंवा किडत नाहीत. आणि आवश्यक वाटतील तेव्हा बाहेर काढून, धुवुन भाजी करतात.
दररोज दात घासण्यासाठी लवणरस हा निषिध्द सांगितला आहे. त्याने दात जास्त क्षरण पावतात, म्हणजे झिजतात, पण युक्ती वापरली तर किडलेल्या दातांपासून मुक्ती मिळते. किडलेल्या दाढांमधे मीठाचा दाणा धरून ठेवल्यास किड मरते.
कशी ?
घरात कोबी अथवा फ्लाॅवर किंवा तत्सम भाजी आणली, तर त्यात लपलेली किड दिसत नाही. ती बाहेर यावी यासाठी सुगृहिणीला, हा फ्लाॅवर मीठाच्या पाण्यात बुडवून ठेवायचा असतो, हे सांगावे लागत नाही, किंवा शिकण्यासाठी शाळेत जावे लागले नाही. फ्लाॅवर मीठाच्या पाण्यात बुडवला की लपलेली कीड आपोआप बाहेर येते, तशी दाढेत लपलेली कीडदेखील आठवड्यातून एकदा मीठाच्या पाण्याचा कवल धरला की झाले काम ! मीठाची गुळणी धरून बसणे म्हणजे कवल. ( कवल टीप यापूर्वी झाली आहे. )
म्हणजे आजच्या भाषेत मीठ जंतुनाशक झाले ना !
कोबी, पालक, पडवळ, दोडका अश्या काही भाज्यामधे मीठ नैसर्गिकरित्या जास्तच आहे. त्या शिजवताना मीठ जरा कमीच घालावे लागते. या भाज्या शिजल्यानंतर आळतात, हे सुगृहिणीला कळते.
मीठ जास्त झाले तर पोटात ढवळत रहाते. म्हणून उलटी नीट होण्यासाठी मीठाचे पाणी प्याले तर उलटी छान होते.
छान होते ? किळसवाण्या उलटीमधे छान होण्यासारखे काय आहे ? ते उलटी करणाऱ्यांना विचारावे, म्हणजे समजेल.
पोटात आतड्यांना चिकटलेला चिक्कट आम सोडवण्यासाठी हे लवणजल वापरले जाते.
ताप कमी होण्यासाठी मीठाच्या पाण्याच्या घड्या डोक्यावर ठेवतात, हा प्रथमोपचार तर सर्वांनाच माहिती आहे.
आणि कुठेतरी लचकून मुरगळून सूज आली, तर गरम पाण्यात मीठ टाकून शेक घेणे हा उपाय पण घरातील ज्येष्ठ नागरीकांना माहिती आहे. शरीरातील पाणी बाहेरून स्वतःकडे शोषून घेणे, या मीठातील गुणामुळे सूज आणि वेदना कमी करण्यासाठी मीठ बाहेरूनच वापरले जाते.
उलट्या जुलाब होत असतील तर मीठ साखर पाण्याचा जगजाहीर उपाय आहेच. पण तो आयुर्वेद मतानुसार सरसकट वापरू नये, अग्नि मंद होतो. यासाठी वैद्य मत जरूर घ्यावे.
केस गळणाऱ्या केसमधे मीठ जरा जपूनच वापरावे, नाहीतर गाॅनकेस व्हायला वेळ लागणार नाही.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
06.11.2016
ह्या भाजी बाबतीत आपल्याला मिश्र प्रतिक्रिया एकायला व अनुभवायला मिळतात.काहीजणांची अत्यंत आवडती तर काही जणांची अगदीच नावडती अशी हि भाजी(माझी सर्वांत आवडती आहे बुवा). आपण ह्याचे विविध प्रकार बनवून हिला खात असतो जसे मेथीचे पराठे,मेथी मलाई मटर,मेथीचे थेपले,मेथी आलू इ.पण प्रत्येक स्वरूपात हिच्यापासून बनविलेल्या व्यंजनांची लज्जतच काही निराळी आहे.
अशा ह्या मेथींच्या भाजीचे लहान क्षूप असते.तसेच हि चवीला कडू तुरट आणि थंड असते,त्यामुळे शरीरातील पित्त व कफ कमी करते.
हिचे देखील घरगुती उपचारांमध्ये बरेच उपयोग आहेत बरं का!चला तर मग आता ते पहायचे ना?
१)ज्या मंडळींना शौचास साफ होत नाही त्यांनी मेथीची भाजी जेवणात घ्यावी.
२)गळवांवर हिच्या पानांचा लेप लावावा म्हणजे वेदना व सूज कमी होते.
३)संडासला आव पडत असल्यास ५ चमचे पानांचा रस खडीसाखर घालून घ्यावा.
४)वारंवार लघ्वीला होत असल्यास १/४ कप मेथी पाल्यांचा रस+१/२ चमचा कात+३ चमचे खडीसाखर हे मिश्रण दिवसातून एकदा घ्यावे.
५)डोक्यात कोंडा झाल्यास आंघोळी पुर्वी पाच मिनिटे केसांच्या मुळांना मेथीच्या पानांचा रस लावावा व नंतर साबण न वापरता केस धुवावेत.केस मऊ व चमकदार होतात.
६)चेहरा तेलकट होत असल्यास मेथीच्या पाल्याचा लेप चेह-यांवर लावून १/२ तास ठेवावे व कोमट पाण्याने धुवावे.
मेथीची भाजी जास्त प्रमाणात खाल्ल्यास संडासला पातळ व वारंवार होऊ शकते.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
जेवण सकाळी आणि सायंकाळी करावे ?
काहीतरीच सांगताय राव ! ही काय जेवायची वेळ आहे ? भूक तर लागली पाहिजे ना ! आमचं सकाळचा नाश्ता खाल्लेलाच पचत नाही, तर जेवायचं कुठुन ?
यासाठी काही मुलभुत गोष्टी समजून घ्याव्या लागतील. आज जे काही सांगितले जातेय, ते कितपत योग्य आहे ते आधी ठरवावं लागेल.
दर दोन तास किंवा चार तासांनी सतत खात रहा, असे आज डाॅक्टरांकडून सांगितले जाते, नाहीतर म्हणे अॅसिडीटी वाढेल म्हणून खावे, असेही सांगितले जाते, असे रुग्ण सांगतात, डाएटीशियन तेच सांगतात, जिम इन्स्ट्रक्टर तेच सांगतात. मुळात प्राॅब्लेम इथेच सुरू होतोय. ज्यांना आरोग्य माहिती आहे त्यांना आहारशास्त्राची माहिती नाही. ज्या डाएटीशियनना आहारशास्त्र माहिती आहे, त्यांना आरोग्याची काहीही कल्पना नाही. आणि जिम इन्स्ट्रक्टरना फक्त प्रोटीन डाएट खपवणे एवढेच माहिती. बाकी त्यांना ओकी ठो माहिती नाही. पण आयुर्वेद तज्ञांना त्यांच्या सिलॅबसमध्ये दोन्ही शास्त्र शिकवली जातात. हेच आयुर्वेदाची प्लस बाजू.
आयुर्वेदात आहाराविषयीचे एक अत्यंत मह्त्त्वाचे सूत्र सांगितले जाते, ते म्हणजे "भूक असेल तेव्हा जेवावे, नसेल तर खाऊ नये." या सूत्राचा आधार घेऊन असे निश्चित सांगता येईल कि दर दोन चार तासांनी भूक नसली तर अजिबात खाऊ नये.
गॅस पेटलेला असेल तरच वर अन्न शिजेल ना. गॅस पेटलेलाच नसेल तर ? चमचाभर पाणी सुद्धा गरम होणार नाही. बरोबर आहे ना ? भूक नसताना जेवले तर अजीर्ण होईल. मग जेवायचेच कशाला ? सकाळ असो वा संध्याकाळ दुपार असो वा रात्र भूक नसताना अजिबात जेवू नये.
आयुर्वेद म्हणतो, वेगान् न धारयेत्
वेगान प्रवृत्तयेत् ।
शरीराकडून निर्माण केलेला वेग अडवू पण नये, किंवा त्याच्या मुद्दाम विरोधात जाऊ नये.
मग आज असे उलटे आणि चुकीचे का सांगितले जाते ?
ते मी कसं सांगू? मी सांगितले तर ते चुकीचे होईल ना.
तो नास्ति मम अधिकारः ।
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
26.02.2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे- क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 25-दीपं दर्शयामी-भाग दोन
शुभं करोति कल्याणम
आरोग्यम सुख संपदा ।
शत्रुबुद्धी विनाशाय
दीपज्योती नमोस्तुते ।।
ही दिव्याची प्रार्थना तर आपली सर्वांचीच पाठ आहे. पाठ आहे, म्हणजे अर्थ माहिती असेलच असे नाही. कधी विचारही केला नसेल एवढा ! या पाठात एक बदल होत चाललाय, तो लक्षात आणून देतो, धनसंपदा नाही, सुखसंपदा ! आरोग्य तर मिळतेच पण सुख देखील मिळते. आपण भारतीय कधी धनाच्या मागे नव्हतो, पण सुखाच्या मागे कायम होतो. सुख मिळविण्यासाठी धन हवेच असे नाही, पण सुख हेच धन असे मानणारी आपली भारतीय संस्कृती !
मी दिव्याला नमस्कार करतो कारण, हा शुभ आहे, पवित्र आहे, शुद्ध करणारा आहे, कल्याणकारक आहे. आरोग्यकारक आहे, सुखकारक आहे. आपल्याच मनातील, शत्रुप्रमाणे असणारे वाईट विचार नष्ट करणारा आहे.
दिव्या दिव्या दीपत्कार
कानी कुंडले मोतीहार
दिव्याला पाहून नमस्कार
दिवा लावला देवापाशी
उजेड पडला तुळशीपाशी
माझा नमस्कार सर्व देवांपाशी
देहलीदीपक न्याय नावाचा एक न्याय सांगितलेला आहे. उंबरठ्यावर लावलेला एक दिवा आतील देवापर्यंत आणि बाहेरील तुळशीपर्यंत प्रकाश देत राहतो. आतून बाहेरून प्रकाश देणारा हा अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे. असं संत सोहिरोबानाथ देखील म्हणतात.
घरातली पीडा बाहेर जावो,
बाहेरची लक्ष्मी घरात येवो,
घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभो.
ही सर्वांचे शुभ करणारी कल्याणकारी प्रार्थना दिव्याला उद्देशून म्हटली जाते.
दीपज्योती परब्रह्म
दीपज्योति जनार्दनः
दीपो हरतु मे पापं
संध्यादीपं नमोस्तुते ।
मनात निर्माण होणाऱ्या वाईट विचारांचे पाप नष्ट होण्यासाठी रोज सायंकाळी घरात दिवा लावावा. सायंकाल हा संधीकाल आहे. दिवस आणि रात्री मधला. पाप आणि पुण्ण्या मधला ! चांगलं आणि वाईट यामधला ! हा संधीकाल असतो सत्व आणि तमामधला ! सकारात्मकता आणि नकारात्मकता यामधला ! वनस्पतींचे श्वसन बदलण्याचा ! हे "चेंज ओव्हर" होत असताना सर्वच स्तरावर संतुलन राखणं महत्त्वाचे असते. आणि हेच काम दिवा करत असतो.
भो दीप ब्रह्मरूपस्त्वं
ज्योतिषांप्रभुरव्ययः
आरोग्यम देही पुत्रांश्च
सर्वान् कामांश्च देही मे
प्रत्यक्षात सगुण रूपातील देव म्हणजे अग्नी. निसर्गात सूर्य नारायणाच्या रूपात तर शरीरात जाठराग्नीच्या रूपात असतो. जसं निसर्गाचं रक्षण करतो, तसंच हा अग्नी आरोग्याचे रक्षण करणारा आहे. केवळ रक्षण करणाराच नव्हे तर वंश वाढवणारा आहे. सर्व मनोकामना पूर्ण करणारा आहे. फक्त विश्वास ठेवून, श्रद्धेने करणाऱ्याला फळ मिळते.
केवढा अर्थ भरलाय या प्रार्थनेमध्ये !
कोणत्याही कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन करून केली जाते. का ? कशासाठी ? काय एवढं मोठ्ठं होणार तेलाचा दिवा लावून ?
स्वतः जळत असताना, स्वतःच्या जळण्याचे दुःख न करता, मेणबत्तीसारखे जळताना, सारखं अश्रु गाळत न रडता, आपल्या जळण्यामुळे सारं जग प्रकाशमान होतंय या आनंदात, फक्त प्रकाश मागे ठेवायचा असतो.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
18.06.2017
माणूस हे रसायनच काही अद्भूत आहे. सगळं कळतंय, पण वळवत नाही. आध्यात्मिक भाषेत यालाच " माया " असे म्हणतात वाटतं.
एकदा या मायेच्या जालात अडकलं की, माया सोडतही नाही, सोडवतही नाही, सोडलं तरी दुःख, सोडलं नाही तरी दुःख.
असो.
मांसाहारी आणि शाकाहारी प्राण्यांच्या आवाजापेक्षा माणसाचा आवाज, त्यातील चढउतार, गोडवा, हीच त्याची देणगी. सात स्वरांचे ज्ञान आहे, म्हणून गाता बोलता येते, भांडताही येते. असं इतर कार्निवोरस, हर्बीवोरस ना नाही करता येत.
नजर रोखून, डूक धरून खाणे हे माणसाला जमत नाही. एखादा पदार्थ आवडला नाही तर नाक मुरडेल, पण मारक्या बैलासारखा, किंवा कुत्र्यामांजरा सारखा दुसऱ्या वर गुरगुरत तर खाणार नाही. बायकोने केलेलं कसं निमूटपणे गिळतो !!! ( म्हणजे तसं करायचं तरी असतं. )
सकाळी दुपारी संध्याकाळी आणि रात्री असं रोज चार वेळा तरी पोटभर जेवतो. तरीदेखील काही जणांना रात्री परत भूक लागतेच. माणूस मांसाहारी प्राण्यांसारखा एकदा पोटभर खाल्ले की पुढे चार दिवस उपास नाही करत.
माणसाची आतडी, मांसाहारी प्राण्यांच्या आतड्यांपेक्षा लांब असतात, तर शाकाहारी प्राण्यांच्या आतड्यांपेक्षा लहान असतात.
मांसाहारी प्राण्यांप्रमाणे तोंड उघडे ठेवून, जीभ बाहेर काढून, श्वासोच्छ्वास करीत तापमान संतुलीत राखत नाही, की अंग चाटत बसत नाही. उन्हाळा आला की घाम खूप येतो, थंडी आली की शू शू खूप करतो आणि शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढतो.
माणसांच्या अंगाला दुर्गंधी नाही. कारण दररोज आंघोळ करतात. अपवादाने काही महाभाग असतीलही. पण ते घरात रहात नाहीत, हाॅस्टेलला रहात असतील कदाचित !
दया, प्रेम, वात्सल्य, लळा माणसांमधे असते.
नरो वा वानरो वा !
मांसाहारी नरांइतके क्रूर नसतात. हे नक्की.
माणसाचे डोळे जन्मतःच उघडलेले असतात. पण मिटून घेऊन झोप आणल्याचं सोंग मात्र उत्तम वठवतो. मला माहित नव्हतं, विसरलो, जमलंच नाही, सहन झालं नाही, झेपत नाही, ही अशी कारणं हर्बीवोरस किंवा कार्निवोरस देत नाहीत. त्याने नियम केलाय तो पाळण्यासाठी. टाळण्यासाठी नाही. बुद्धीचा अतिवापर झाल्यानं, त्यालाच टाळायला, पिटाळायला, रिटायर करायला निघालेल्यांना काय सांगणार आणि कसं समजवणार ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
2.10.2016
आजच्या भाषेत बाजारी टिकावू खाद्यान्न, बेकरी फूड, हाॅटेलचे खाद्य, डबाबंद खाद्यपदार्थ, अर्धतयार अन्न, म्हणजे अगदी स्पष्टच सांगायचं तर किंडर, जेम्स सारखी चाॅकलेटस्, लेज, कुरकुरे, दो मिनट नूडल्स, पेप्सीकोक, मॅक आणि पिझ्झा हट्टचे अन्न इ.इ. हे सर्व तयार करताना कसली तेलं, पीठं पाणी वापरतात, कसं समजणार ? हे सर्व परान्न.
प्रत्येक कृतीमधे आपण भारतीयत्वापासून कसे लांब जातोय, आणि भारतीयत्वापासून लांब जाणे म्हणजे आरोग्यापासून लांब जाणे, कारण भारतीयत्व म्हणजे संपूर्ण आरोग्य हे लक्षात आणून देणारी ही लेखमाला आहे, याची एकदा आठवण करून देतो. आपण भारतीय असल्याचा आनंद नक्कीच व्हायला हवा. गेले ते दिन गेले, असे म्हणून सोडून देऊन कसे चालेल ? त्यातील जे चांगले असेल ते स्विकारण्याची तयारी हवीच.
Copyright © 2025 | Marathisrushti