जगण्याची साधी सोपी सूत्रे - एकशे छापन्न
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - भाग तेरा
सांगेन गोष्टी हिताच्याच चार - भाग चौदा
पंधरा दिवसातून तीन वेळा म्हणजे दर पाच दिवसांनी डोक्याचे केस, दाढी, नखे, आदि कापावेत. त्यानंतर स्नान अवश्य करावे. मात्र स्वतःच्या हातानी विशेषतः केस कापू नयेत. ते नाभिकाकडून कापून घ्यावेत. दातानी नखे खाऊ नयेत.
स्वतःचे स्वतः केस कापले तर नाभिकाचा रोजगार बुडेल हा व्यवहार सोडला तरी, स्वतःचे केस नीट कापता येत नाहीत. लहानपणी हळुच केस कापून पहाण्याचा अनुभव प्रत्येकालाच असेल.
डोके, दाढी या ठिकाणी जे केस वाढतात, त्यांच्यावर बसलेली धुळ, जीवजंतु साफ होण्यासाठी ते दर पाच दिवसांनी कापावेत, असे ग्रंथकार म्हणतात. आजच्या युगानुसार, दाढी दर दिवशी किंवा एक दिवसाआड केली तरी चालेल, आणि केस दर महिन्याला तरी कापावेत.
कोणत्याही प्रकारची धार्मिक कार्ये करायची असल्यास किंवा एखाद्याच्या मृत्युपश्चात धर्मशास्त्रानुसार मुंडन करायला सांगितले आहे. यामधेही शुद्धी क्रिया अपेक्षित आहे.
पण डोळ्यांच्या पापण्या, भुवया, मिशी आणि छाती या ठिकाणी असलेल्या केसांना अजिबात कापू नये. त्याने नुकसान होते.
छातीवरील केसांमुळे ह्रदय आणि फुफ्फुसे यांना संरक्षण मिळत असते. केसांमधून काही प्रमाणात मलद्रव्ये देखील बाहेर पडत असतात आणि घाम निर्माण व्हायला पण मदत होते. ज्यामुळे रक्ताची शुद्धी होते.
डोळ्यावरील भुवयांचे केस हे डोक्यावरून येणारा घाम डोळ्यात जाऊ नये यासाठी संरक्षक म्हणून काम करत असतात. त्या उगाचच कोरत राहू नये.
जशा भुवया तशा मिशा. नाकातील स्राव वा उच्छवास तोंडात जाऊ नये, यासाठी मिशांचे केस संरक्षण देतात. पिळदार मिशा व्यक्तीमत्व आणखी खुलवतात, हा भाग वेगळा !
डोळ्यांच्या पापण्यांचे केस तर अतिशय नाजुक असतात. डोळ्यांच्या आतील सर्व स्तरांचे संरक्षण होण्यासाठी या पापण्या तत्पर असतात. आपल्या इच्छेविरुद्ध शरीराच्या फायद्यासाठी काही अवयव काम करत असतात. त्यात जसे ह्रदय, यकृत, किडनी, मेंदू हे आतील अवयव आहेत, तसे डोळ्यांच्या पापणीवर आपला ताबा बहुतेक वेळा नसतो. आपल्या नकळत काही धुळ, धूर, सूक्ष्म किटक जर डोळ्यांत जात असतील तर त्यांना अडवण्यासाठी एक सक्षम यंत्रणा असते, त्यात या पापण्यांचा समावेश असतो.
जननेंद्रिये आणि कक्षा प्रदेशी असलेले रोम नियमितपणे काढावेतच. इथे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.
सर्व अंगावर असलेले केस हे जणुकाही शरीरावर असलेली पिसे आहेत. त्वचेचे संरक्षण करणे, घाम येणारी छिद्रे बाहेरील धुळीने बुजुन जाऊ नयेत यासाठी या बारीक लवीचा उपयोग होत असतो. सूक्ष्म स्पर्श संवेदना होण्यासाठी, समजण्यासाठी या छोट्या केसांचा उपयोग होत असतो. त्वचेची कांती चमकदार रहावी, यासाठी देखील हे रोम काम करीत असतात.
डोक्यावरचे केस खूप कमी ठेवावेत आणि शेंडी राखल्यास उत्तम. शेंडी ठेवणे म्हणजे ब्रह्मरंध्राचे संरक्षण करणे. आणि विश्वातील सकारात्मक उर्जा थेट शरीरात. अर्थात ज्यांचा विश्वास असेल त्यांना पटेल. हा अनुभव घेऊन पाहण्याचा विषय आहे. शेंडी ही "डिश अँटीना" प्रमाणे काम करते, असा माझा अनुभव आहे. आणि फक्त ब्राह्मण जातीत जन्माला आलेल्यानीच ठेवावी असं काही नाही. अन्य जातीमधे देखील शिखा ठेवतात. असो. ज्याची त्याची शेंडी, ज्याची त्याची मर्जी !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
१४.०९.२०१७
सकाळी उठल्यावर सर्वात पहिले आपले तळहात पहावेत. जे हात कष्ट करून पैसे मिळवणार आहेत, या हातानीच लेखन करून सरस्वतीला प्रसन्न करणार आहोत, तर शत्रूशी लढून स्वतःचे, स्वतःच्या कुटुंबातील सर्वांचे संरक्षण करून शांती प्रस्थापित करणारी पार्वती, ह्याच हातामधे विराजमान असते, याची सकाळी सकाळी आठवण करून, नेहेमीच कर्म करायला प्रवृत्त करणारा, हा भक्ती मार्गातील एक ज्ञान पूर्ण श्लोक.
ह्यालाच पांढरा दुधी असे देखील म्हणतात.ह्याचे किती प्रकारची व्यंजने बनत असतील हे सांगणे जरा कठिणच आहे,पण सगळ्यांचा आवडता दुधी हलवा म्हणा,खीर म्हणा,चटणी म्हणा,भाजी म्हणा,सुप इ पदार्थ करतात हे मला माहिती आहे.
जसा ह्याचा उपयोग भाजीमध्ये होतो तसाच ह्याचा औषधी उपयोग देखील आहेत बरं का!
ह्याचे वेल असते जे दुरवर पसरते ह्या वेलीला हि फिकट हिरव्या रंगांचा लांबट अशी फळे लागतात.ज्याचा उपयोग खाण्याकरिता केला जातो.
हा चवीला गोड,थंड असते व पित्तनाशक व कफकारक असतो.आता ह्याचे औषधी उपयोग पाहुया:
१)हातापायांची आग होत असल्यास तळव्यांना रात्री झोपताना दुधीभोपळ्याचा किस बांधुन झोपावे.
२)हातापायांना भेगा पडल्यास दुधीभोपळ्याचा रस व एरंडेल तेल मिसळून लावावे.
३)शौचास कधीपातळ कधी घट्ट किंवा चिकट होत असेल तर जुन झालेला दुधीभोपळा घ्यावा व त्याचे सालकाढुन तो किसुन त्याचा किस तुपावर परतावा व त्यात जीरे,मिरी,खडीसाखर व सैन्धव घालून खावा.
४)ज्यांना कायम संडासला साफ न होण्याची तक्रार असते त्यांनी जेवणात रोज दुधाची भाजी घ्यावी.
५)नियमीत ४चमचे दुधी रस+१/४ चमचे जिरे+१ चमचा मध हे मिश्रण पहाटे सुर्योदयापुर्वी रिकाम्या पोटी घ्यावे व तासभर काही खाऊ नये.हा प्रयोग ४२ दिवस करावा ह्याने शरिरातील उष्णता कमी होते व जेवणास रुची येते तसेच ह्रूदयाला देखील बळ मिळते.
कोवळा दुधी अतिप्रमाणात खाल्ल्यास जुलाब होऊ शकतात व जुन दुधी खाण्याचा अतिरेक केल्यास संडासला घट्ट होऊ शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
आपण जेवढे नैसर्गिक अन्नापासून लांब जाऊ, तेवढे आरोग्यापासून देखील लांब जात चाललो आहोत. माणसाचे आयुष्य विज्ञानाच्या, उपकरणांच्या सहाय्याने वाढले असेलही, पण केवळ संख्यात्मक दर्जा वाढवणे महत्वाचे नसून, जगण्याच्या गुणात्मक दर्ज्यात वाढ किती झाली आहे हे पहाणेदेखील तेवढेच महत्वाचे आहे.
तिखट पदार्थात सर्वात जास्त वापरला जाणारा पदार्थ म्हणजे मिरची. कोशिंबीरी लोणच्या पासून ते सर्व भाज्या आणि फक्त मिरचीच्या ठेच्यापर्यत आपला ठसका दाखवणारी ही मिरची, तिखट पदार्थात आपले स्थान अबाधित राखून आहे.
अति सर्वत्र वर्ज्ययेत, या न्यायाने प्रदेश विचार करून, मिरचीचा वापर युक्तीने करावा. काही जण मिरच्या चराचरा चावून खातात, त्यांना भविष्यात काही गंभीर आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते.
सुकी लाल मिरची आणि हिरवी ओली मिरची यामधे तुलना करायची झाल्यास सुकी लाल मिरची त्यातल्या त्यात बरी म्हणावी. कढी, पिठले, डाळ तडका इ. पदार्थांना लाल मिरचीशिवाय शोभा नाही.
आणि कोशिंबीर, कांदेपोहे, सोलकढी, आमटी या मधे हिरव्या मिरचीचा वास, काही खास असतो.
पण या हिरव्या मिरचीची साल किंवा बी आतड्यांना जर चिकटून राहिली तर तिथे व्रण म्हणजे जखम होण्याची शक्यता असते. म्हणजेच ही साल किंवा बी पोटात जाताना अगदी बारीक होऊन गेली तर धोका तेवढा नाही.
यासाठी युक्ती काय करावी ?
एकतर या हिरव्या मिरचीचे तुकडे करून वापरण्याऐवजी, ती फोडणीमधे अख्खीच वापरावी. म्हणजे त्याचा खास वासपण येईल आणि खाताना ती बाजूला काढून पण ठेवता येईल. किंवा याची सरळ पेस्ट म्हणजे चटणी करून ती वापरावी. कमी पुरते. बी आणि साल पण चिकटून रहाण्याची शक्यता कमी ! ( फोडणीमधे अख्खी वापरताना पुढचे टोक जरा मोडावे, नाहीतर गरम तेलात ती फुटते, आणि गरम तेल उडते. सावधान ! )
ज्यांना तिखट तर हवेच आहे, पण हिरव्या मिरचीने त्रास होतो, त्यांनी जिथे शक्य आहे तिथे लाल मिरची वापरावी. ही मिरची पूर्णपणे पिकल्यानंतर वाळवून ठेवलेली असते. त्यामुळे पचायला हलकी किंवा त्रास द्यायला हिरवीपेक्षा सहनशील असते.
लाल मिरचीची पावडर तर सहजपणे सर्व ठिकाणी वापरली जाते. रंग येण्यापासून, चव वाढवणे आणि सजावटीपर्यंत ही लाल मिरची उपयोगी ठरते.
मिरचीच्या सालीचे गुण बघितले तर एक महत्वाचा गुण लक्षात येतो, तो म्हणजे ती कफाच्या विरोधी गुणाची आहे. चिकटपणा कमी करणारी आहे, रक्तातील चिकटपणा पण कमी करणारी आहे. रक्तातील चिकटपणा म्हणजे आजच्या भाषेत, कोलेस्टेरॉल !
आणि मिरचीची बी, याच्या बरोबर विरूद्ध गुणाची म्हणजे मधुर रसाची ! साठवणीची मिरचीपूड करताना, त्यातील बीया काढून टाकल्या तर ती मिरचीपूड टिकते. नाहीतर मधुर रसाची असल्याने, बीयांना किड लागण्याची शक्यता जास्ती असते.
म्हणून तर प्रमेहात आणि स्थौल्यात मिरचीची बी वर्ज्य सांगितली आहे.... इति कै. विद्याताई जळूकर मॅडम.
पोपट मिरच्या खातो, पण साल नाही खात. फक्त गोड बीयाच खातो.
तिखट खाण्यात पण एक मजा असते. भाजी, उसळ आणि आमटी या तिखट पदार्था व्यतिरिक्त आणखी काही विशिष्ट तिखट पदार्थ आपल्या खाण्यात असतात. जे तिखट असतातच, पण त्यांची काही खास तिखट चव हेच त्यांचे वैशिष्ट्य असते. जसे पावभाजी, पाणीपुरी, भेळ, भजी, बटाटेवडे, आणि त्याच्याबरोबरची ओली सुकी तिखट चटणी.
हे पदार्थ म्हणजे अगदी जानी दुश्मन नाहीत, पण ते डाव्या बाजुलाच वाढलेले आहेत, हे विसरूनही चालणार नाही.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
17.11.2016
नमस्कार करताना आणखी एक उपचार केला जातो, तो म्हणजे प्रदक्षिणा. नामस्मरण करीत देवाला, गाभाऱ्याला, किंवा संपूर्ण देवळाला प्रदक्षिणा घातल्या जातात. या प्रदक्षिणा केंद्रानुवर्ती असतात. म्हणजे देवाला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या भोवती फिरायचे. काय असेल याचा उद्देश? केवळ पुण्यप्राप्ती ? चालणं आणि प्रदक्षिणा मारणं यात फरक आहे !
आयुर्वेदीय चिकित्सा म्हणजे अॅलोपॅथीला पर्याय. असा जर कोणाचा समज असेल तर तो गैरसमज आहे. पॅरासीटामोलच्या ऐवजी आयुर्वेदात काय आहे असे विचारणे म्हणजे मोहोरीच्या ऐवजी बेसन आहे का असे विचारल्यासारखे आहे.
यांची तुलना कधीही करू नये. प्रत्येक पॅथीची स्वतःची अशी खास वैशिष्ट्य असतात. प्रत्येक शास्त्राचे स्वतःचे सिद्धांत असतात. त्यांचा योग्य तो आदर राखलाच पाहिजे. बीकाॅम झालेल्या विद्यार्थ्यांनी म्हणावे, बीएस्सी करून काय होणारे, बीएस्सी करत असलेल्यांनी म्हणावे आर्टस् शिकण्याची काही आवश्यकताच नाही. हे योग्य नव्हे.
मधुमेहा सारख्या आजारात रुग्णाला नेमकेपणाने काय होते आहे, त्याला काय हवेय हे प्रत्येकाचे निकष वेगळे असतात. भविष्यात अमुक होईल म्हणून आत्ता असे वागले पाहिजे ही भीती अवाजवी आहे.
नखाला भविष्यात चुकुन होणारे नखुर्डे हे कॅन्सरमधे रूपांतरीत होऊ शकते, हो किंवा नाही. या दोन पर्यायांपैकी एकच पर्याय निवडायला सांगितला तर दुर्दैवाने याचे उत्तर हो असेच द्यावे लागते, असे आजचे वैद्यक शास्त्र सांगते. नियमावर बोट ठेवले तर भविष्यात होणारा नखाचा कॅन्सर टाळण्यासाठी आपण नखच काढून टाकूया, असा विचार करणे योग्य होईल का ? जे अस्तित्वातच नाही, त्याची भीती निर्माण करून आपली पोळी भाजून घ्यायची ? प्रत्येकाची आळीमिळी गुपचिळी. प्रत्येकाचा बिझनेस. प्रत्येकाला स्वतःची काळजी.
रक्तातली साखर वाढली तर किडनी, डोळे इ. अवयवांवर विपरीत परिणाम होतात, असे एक वैद्यक शाखा म्हणते. अवयवांवर विपरीत परिणाम होतो तो, रक्तातली साखर वाढली म्हणून की, त्यासाठी कायमस्वरूपी घ्याव्या लागणाऱ्या औषधांचे ते दुष्परिणाम आहेत, यावर अजूनही संशोधन सुरूच आहे. शिवाय मनात निर्माण झालेली भीती देखील हाॅर्मोन्स मधे बदल घडवित असतेच.
मधुमेहामधे रक्तातली साखर तपासणी, किंवा तत्सम रासायनिक तपासण्या करणे, हाच एकमेव योग्य निकष आहे, असे म्हणण्याची काहीच आवश्यकता नाही. त्या वैद्यकामधे अजूनही संशोधन सुरूच आहे. त्याचे निकष अजूनही बदलत आहेत.
आणि रक्तातल्या साखरेचा निकष खरं सांगायचं तर आयुर्वेदात सांगितलेलाच नाही. त्यामुळे मधुमेहामधे रक्तातली साखर नाॅर्मल करणे हा आयुर्वेदीय चिकित्सेचा उद्देश असूच शकत नाही. हे वैद्यांच्याच अजून ध्यानात येत नाही तर सामान्य लोकांनी तशी अपेक्षा करणे चुक नव्हे.
हा विचार समजून घेणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीने निदान केले जाते, त्याच पद्धतीने चिकित्सा, पथ्य अपथ्य, योग, प्राणायाम यांचा विचार केला तर चिकित्सा पूर्णत्वाला जाईल. जे सिद्धांत आयुर्वेदात वर्णन केलेले आहेत, ते अन्य पॅथीमधे कसे बसवता येतील ? असे करणे म्हणजे गोल भोकात चौकोनी पाचर ठोकण्यासारखे आहे. कृपया असा विचार सुद्धा करू नये. नाहीतर जे पाहिजे ते (आरोग्य ) आपल्याला कधीही पूर्णत्वाने मिळणार नाही. आणि औषधे मात्र कायमस्वरूपी पूर्णपणे घ्यावी लागतील.
जर आपल्याला घोडा बनवायचा असेल तर त्याचे डोके, पोट, आयाळ तोंड आणि अगदी शेपूट देखील घोड्याचीच बनवली पाहिजे. तरच त्या कलाकृतीला घोडा असे म्हणता येईल. नाहीतर तोंड करायचे घोड्याचे, आयाळ करायची सिंहाची, पोट करायचे वाघाचे, आणि शेपूट लावायचे शेळीचे. कसा दिसेल हा प्राणी ? त्याला पूर्णत्व येणार नाही.
प्रत्येक शास्त्राची स्वतःची एक परिभाषा असते. त्याच परिभाषेत ते सिद्धांत समजून घ्यावे लागतात. तसे केले नाही तर आपल्याला जे पाहिजे ते पूर्ण स्वास्थ्य कदापि मिळणार नाही.
निदान करायचे अॅलोपॅथीनुसार, तपासण्या करून घ्यायच्या रसायनशास्त्राप्रमाणे, चिकित्सा ठरवायची आयुर्वेदानुसार, पथ्य करायचे निसर्गोपचारानुसार, आणि औषध घ्यायचे होमियो पद्धतीनुसारच्या !
याशिवाय पुष्पादिदिचे सल्ले, स्वामीजीनी सांगितलेले उपाय, वाॅटसप महाराजांचे नुस्खे आहेतच.
अशा भीतीच्या पायावर उभारलेल्या विचारसरणीने रोग कसा बरा होईल ? हे रुग्णांनी लक्षात ठेवले पाहिजे.
.....आणि वैद्यांनी सुद्धा !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
14.02.2017
चिंचेचा उपयोग आपल्या स्वयंपाकात बऱ्याच प्रमाणामध्ये केलजातो.आमटी,भाजी,चटणी,
पाक,सरबते,तसेच आता तर इमली जेली देखील मिळू लागली आहे.चाट चे पदार्थ तर चिंच खजुर चटणी शिवाय कल्पनाच केली जाऊ शकत नाही.
अगदी बाई गरोदर असेल तर तिला देखील चिंचा खाव्याशा वाटतात का विचारले जाते.
चिंचेचा मोठा वृक्ष असतो साधारण पणे आवळ्याच्या पानां प्रमाणे बारीक पाने असतात.तसेच त्याला लागलेली कच्ची चिंच हिरवी मातकट रंगांची टणक असते व पिकल्यावर ती पुर्ण मातकट रंगांची होते व आतील बी टणक व त्यावर कठीण आवरण असणारी होते.
कच्ची चिंच आंबट,उष्ण,पित्त,रक्त,कफ दुषित करणारी असून वातनाशक आहे.
पिकलेली चिंच आंबट,गोड,उष्ण,वात,कफनाशक व पित्तकर आहे.
आता हिचे घरगुती उपचारात उपयोग पाहूया:
१)तोंडास घाण वास येणे,जीभेवर साका जमणे,तोंडास चव नसणे ह्यात जेवणा सह कच्ची चिंच व सैंधव घालून केलेला ठेचा खावा.
२)अजीर्ण होऊन मळमळ होणे,उल्टी होणे ह्यात पिकलेली चिंच सैंधव लावून तोंडात धरून चघळावी.
३)लघ्वीची जळजळ,पोटात वात धरणे ह्यात २ चमचे चिंचेचा कोळ+१ चमचा मध+१चमचा साखर हे मिश्रण घ्यावे.
४)किटक चावलेल्या ठिकाणी चिंचोका भाजून अग्र नुसता उगाळून दंश भागी लावावा.
५)१ कि चिंच २ लिटर पाण्यात रात्रभर भिजत घालावी व सकाळी कोळून गाळून त्यात २ किलो साखर घालावी व पाक करावा.हे तयार सरबत ४ चमचे १ ग्लास पाण्यात मिसळून रात्री घेतल्यास बद्धकोष्ठाचा त्रास कमी होते.
चिंच अतिमात्रेत खाल्ल्यास अम्लपित्त होते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
झटपट गुण देणाऱ्या या पॅथीला समाजामधे लवकर मान्यता मिळाली. घी देखा लेकीन बडगा नही देखा. झटपट गुण दाखवणारी औषधे तेवढ्या झटपट अवगुण दाखवत नाहीत. पण उशीरा का होईना, अवगुण हे दिसणारच.
पाण्याची प्रशंसता भाग एक
पाणी म्हणजे जीवन जर योग्य वेळी, योग्य काळी, योग्य स्थळी, योग्य मात्रेमधे प्यायले तर !
हे विश्व पाण्यातूनच निर्माण झाले आहे. प्रत्येक प्राणीमात्राला जगण्यासाठी पाणी हे अत्यंत आवश्यक आहे. असे पाणी न मिळाल्यास तोंडाला कोरड पडते, शरीर चैतन्यहीन होते. अवयव शिथील होतात, आणि शेवटी मृत्यु येतो. पाण्याशिवाय कोणत्याही प्राण्यांचे कार्य चालूच शकत नाही, मग तो रोगी असो वा निरोगी, पाणी हेच जीवन आहे.
निरोगी राहाण्यासाठी वाग्भटजी म्हणतात,
जेवणाच्या आरंभी पाणी प्यायल्याने मनुष्य बारीक होतो.
जेवणाच्या नंतर पाणी प्यायले असता, माणूस स्थूल होतो.
तर जेवताना पाणी प्यायले असता मनुष्य सडसडीत राहातो.
तो मूळ संदर्भ असा आहे.
समस्थूलकृशा भक्तमध्यान्तप्रथमाम्बुपा : ।
भक्तस्यादौ जलं पीतमग्निसादं कृशांगताम् ।
अंते करोति स्थूलत्वं ऊर्ध्व चामाशयात्कफम
मध्ये मध्यांगतां साम्यं धातूनां जरणं सुखम् ।।
जेवताना देवाचे स्मरण करून पहिली आपोषणी घेतात. घसा ओला होण्यापुरतेच हे पाणी सांगितले आहे. नंतरचा घास अडकू नये, म्हणून घसा थोडा ओला करून घेणे. एक पळी पाणी उजव्या हाताची तर्जनी आंगठ्याच्या मुळाशी लावून तळहातावर छोटा खळगा करून त्यात एकच पळी पाणी घेतात......
देवपूजे मधेदेखील कोणत्याही कार्याच्या सुरवातीला आपोषणी घेतात.
केशवाय... नारायणाय....माधवाय नमः।
इथेपण तीनच पळ्या पाणी सांगितले आहे....
पाणी भरपूर प्यायचा नियम जर आपल्या संस्कृती मधे असला असता तर तिथे एक पळीभर ऐवजी, एकेक पेलाभर किंवा एकेक तांब्याभर पाणी प्यायला का सांगितले जात नाही?
"कारणाशिवाय पाणी पिऊ नये. जेवणापूर्वी पाणी पिऊ नये, पाणी प्यायचे असल्यास एक पळीभरच पाणी प्यावे" हा संदेश यातून मिळतो.
जेवणापूर्वी जास्त पाणी प्यायल्याने पोटातील पाचक स्राव कमी होतात.भूक मारली जाते. जेवण कमी जाते, त्यामुळे बारीक व्हायला होते. शरीर कृश होते, म्हणून असे करू नये.
हो. हे आधी ठरवले पाहिजे की, आपण सडसडीत असले पाहिजे. जाड पण नको. आणि बारीक पण नको. केवळ बारीक दिसण्यासाठी, डाएटींगच्या नावाखाली, पाणी पित रहाणे हा रानटी क्रूरपणा आहे. कृपया असे करू नये. आम्ही आमच्या विचारधाराच बदलून टाकल्या आहेत. आम्ही आमचे आदर्शच बदलून टाकले आहेत.
आमचे आदर्श जर दीपिका नि कॅटरीना असतील तर जीवनात वादळं आल्याशिवाय राहाणार नाही. काय दीपक लावायचे आहेत, ते कर्तृत्वात दाखवा. नुसते 'फिगर फिगर' करण्यात काही अर्थ नाही. शरीर अगदी नाजूक आखीव रेखीव, पण जरा काम सांगितले की कंबर जाते मोडून !
तरूणांचा आदर्श सुद्धा संजय दत्त नको, तर बटुकेश्वर दत्त हवा. पाश्चात्य विचारांचे पाणी जोखणारा आणि त्यांच्या तोंडचे पाणी पळवणारा !!
कृश होणे, बारीक होणे हे, 'अशक्त होणे' या अर्थी आहे, हे लक्षात घ्यावे. म्हणून शहाण्या माणसानी जेवणापूर्वी पाणी पिऊ नये.
तोंडातील लाळ औषधी असते, पण सकाळी सकाळी तोंड धुवायच्या अगोदरची नाही. रात्रभर तोंडात तयार झालेली, किडलेल्या दाढांमधे भरून राहिलेली, लाळ औषधी कशी असेल ? राजा भोज यानी लिहिलेल्या एका ग्रंथातील संदर्भ असं सांगतो, पण वाग्भटजी असं कुठेही सांगत नाहीत.
आपले राजे केवळ युद्धच करत नव्हते तर ग्रंथ देखील लिहित होते. आमच्या छत्रपती शंभुराजांच्या संस्कृतमधे लिहिलेल्या बुधभूषण या ग्रंथाचे नाव तरी आठवत असेल. हे सर्व प्राचीन ग्रंथ खरंतर शालेय अभ्यासक्रमात असायला हवेत. असो.
गोऱ्या कातडीचे लोक काय सांगतात, यापेक्षा आपल्या परंपरा आणि आमचे आप्त काय सांगतात, ते जास्त महत्वाचे. त्यांनी नक्कीच चार पावसाळे जास्त बघितलेले आहेत.
थोडा विश्वास दाखवूया, आमच्या आप्तांवर !
त्यांनी आखून दिलेल्या चालीरीती वर !!
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
12.01.2017
Copyright © 2025 | Marathisrushti