जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
अभिनेते, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचा जन्म २१ मे १९५६ रोजी चेंदणी कोळीवाडा येथे झाला.
डॉ.जयप्रकाश घुमटकर हे ठाण्याच्या शैक्षणिक साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेली चाळीस वर्षे सातत्याने कार्यरत आहेत. चाळीस वर्ष साहित्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात व देशभरामध्ये ते करीत असतात. साहित्यातील विविध विषय आपल्या लेखणीद्वारे परखडपणे हाताळणारे जयप्रकाश यांनी हे अनेक नामवंत साहित्यिकांमधून आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.
जयप्रकाश यांना शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती, त्यांनी १९७४ मध्ये ठाण्यात कलासरगम या नाट्यसंस्थेत प्रवेश घेतला, अभिनयाचे धडे गिरविण्यास सुरुवात केली आताचे सुप्रसिद्ध नाट्य सिने दिग्दर्शक कुमार सोहोनी, विजय जोशी यांच्या सोबत अनेक नाटकात काम केली.
त्यामध्ये काका किशाचा,जाळ्यात गावलाय मासा आदी गाजलेल्या नाटकात काम केली, त्यानंतर १९७५ ते १९८० च्या काळात त्यांनी ‘माधुरी थिएटर्स’ नावाची स्वता:ची नाटक कंपनी स्थापन केली आणि लेखक दिग्दर्शक श्याम फडके, काका रणदिवे यांच्या सोबत बिन पैशांचा तमाशा, बाई बिगर भानगड नाही, पै पै आणि पै, बायको उडाली भुर ही नाटके रंगमंचावर आणली आणि ती त्याकाळी ती गाजली सुद्धा. १९८१ मध्ये जयप्रकाश यांनी चित्र प्रकाश ही फिल्म कंपनी स्थापन करून डोमकावला या चित्रपटाची निर्मिती करण्यास सुरुवात केली होती
पण हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही आणि त्यांचे २२ लाख रुपये अक्षरशः डब्यात गेले आणि ते आर्थिक खड्यात गेले, पण त्यांनी आत्महत्या केली नाही, नैराश्यावर मात करून पुन्हा नव्या उमेदीने उभे राहिले. त्यानंतर त्यांनी ‘भानामती’ या चित्रपटाची निर्मिती केली, याचे दिग्दर्शन व मुख्य सरपंचाची भूमिका सुद्धा यात त्यांनी केली होती. यावेळेस मात्र हा चित्रपट पूर्ण होऊन व खूप गाजला, यात पैसे मिळून १९८१ झालेले आर्थिक नुकसान भरून निघाले.
आपल्याला चित्रपट निर्मिती का जमली नाही, आर्थिक फटका का बसला यावरती कुढत न बसता त्यांनी १९८१ ते २००० पर्यंत चित्रपट क्षेत्राचा अभ्यास करून, नवीन चित्रपट निर्मात्यांना आर्थिक फटका बसू नये,, ते खड्डयात जाऊ नये यावर मार्गदर्शन करण्यासाठी ’चित्रपट कसा काढावा’ या नावाने एक पुस्तक लिहिले, या पुस्तकाला त्यांचे मित्र सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांची प्रस्तावना लाभली आहे. या पुस्तकाला त्यांना राज्यपातळीवरचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे या पुस्तकाच्या अनेक आवृत्या निघून त्याचा लाभ नवीन चित्रपट निर्मात्यांना झाला आहे.
चित्रपट कसा काढावा?, या सोबतच तऱ्हेवाईक नातेवाईक, विचित्र विश्व, विद्रोही जोतिबा, गोलघुमट-कोळीवाडा ते नौपाडा-एक प्रवास, साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणूक-लेखाजोखा असे अनेक विविध विषय त्यांनी आपल्या लेखणीद्वारे परखडपणे हाताळले आहे. यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या युगपुरुष-डॉ. बाबासाहेब आंबेडकर-शोध आणि बोध या प्रबंधाला तर राष्ट्रीय पातळीवरचा दिल्लीचा सर्वोच्च दलित साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा लाभला होता. त्यानंतर प्रकाशित झालेल्या बुध्दधम्माच्या वाटेवर या पुस्तकाने तर साहित्य वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली होती. या पुस्तकालाही त्यांना दिल्लीचा सर्वोच्च दलित साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. सर्वोच्च दलित साहित्य अकादमी पुरस्कार दोन वेळा लाभलेले ते साहित्य क्षेत्रातील एकमेव लेखक आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आत्मकथनपर त्यांनी लिहिलेल्या गोलघुमट-कोळीवाडा ते नौपाडा-एक प्रवास या पुस्तकाने तो काळ विशेष गाजवला होता. त्यामुळेच त्यांना सर्वत्र गोलघुमट या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यामुळे की काय त्यांनी काव्य क्षेत्रात गोलघुमट हे नाव धारण केले आहे. त्यापैकी त्यांचे गाजलेले कवितासंग्रह पानगळीची सळसळ, टवाळकी, खिल्ली, पोपटपंची आणि प्रेमासाठी वाट्टेल ते हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. या काव्यसंग्रहामधील त्यांच्या संविधान, गुलाम,वळवळणारे किडे,चोरावर मोर, चौकीदार, पुन्हा येईन, सोंगाड्या या कवितांनी तर महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला होता. डोंबिवली येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक सुद्धा त्यांनी लढवली होती. पण त्यांना अपयश आले होते. पण अपयशाने खचून न जाता त्यांचा साहित्य प्रवास आजही सुरू आहे. निवडणूकीच्या राजकारणात त्यांच्यावर पुणे येथे काही लोकांनी शाईफेक हल्ला सुद्धा केला होता. साहित्य संमेलनाध्यक्षाच्या निवडणूकीच्या राजकारणावर प्रकाशझोत टाकण्यासाठी त्यांनी साहित्य महामंडळाच्या राजकारणावरती बऱ्या वाईट घटनांवर एक पुस्तक लिहिले होते त्या पुस्तकाचे नाव होते साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणूक-लेखाजोखा. त्यामुळे की काय अध्यक्षपदाची निवडणूक पध्दती बंद होऊन नियुक्ती पद्धती सुरू झाली असे साहित्य वर्तुळात बोलले जाते. त्या वर्षापासूनच साहित्य महामंडळाने निवडणूक पध्दती बंद करून घटक संस्थांकडून नावे मागवून अध्यक्षपदाच्या नियुक्तीची प्रथा (वशिलेबाजीने) पुन्हा सुरू करण्यात आली. सध्या गद्य आणि पद्य असे दोन्ही विषय ते समर्थपणे हाताळत आहेत.
बुवाबाजी, लांडी लबाडी करणारे,भोंदू साधू, पुजारी तसेच अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या लोकांवर परखड भाष्य करणारे"बा"मन हे खळबळजनक पुस्तक लवकरच प्रकाशनाच्या वाटेवर आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या मराठी साहित्य मंडळ या सरकारमान्य प्रख्यात संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ते बिनविरोध निवडून आले आहेत. जयप्रकाश यांनी अभिनेते म्हणून होणार सून मी त्या घरची, वैरी मंगळसूत्राचा,महिमा काळभैरवाचा, आमदार माझ्या खिशात, भक्ती नागनाथाची, धाव रे विठ्ठला,एक डाव सत्तेचा आणि भानामती या चित्रपटात अभीनय केला आहे. आणि आता त्यांचा "चमेलीबाईचा खून कोणी केला?"हा नवीन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
डॉ. जयप्रकाश घुमटकर यांनी घुमटकर क्लासेस, घुमटकर इंजिनिअरिंग कॉलेज आदी शिक्षण संस्थांमार्फत ५०,००० हजारांच्यावर विद्यार्थ्यांना शिकविले आहे. तसेच त्यांना आपल्या पायावर उभे राहणे शिकवून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास विविध अंगांनी सुद्धा केला आहे. तसेच त्यांचे कित्येक विद्यार्थी देशात आणि परदेशात उच्च स्थानावर कार्यरत आहेत.
जयप्रकाश यांना आत्तापर्यंत महाराष्ट्र जनमुद्रा पुरस्कार, ठाणे जिल्हा साहित्यरत्न पुरस्कार, साहित्यभूषण पुरस्कार, साहित्य साधना पुरस्कार, ठाणे महानगरपालिकेचा ठाणे गौरव पुरस्कार तसेच महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांना आत्तापर्यंत लाभलेले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन या प्रख्यात संस्थेच्या महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांतर्फे त्यांना नुकताच महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आला.
एक अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेल्या डॉ.जयप्रकाश घुमटकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
संगीत संयोजक इनॉक डॅनियल्स हे भारतीय चित्रपट संगीतातील एका गुणी कलाकाराचं नाव. इनॉक डॅनियल्स यांचा जन्म १६ एप्रिल १९३३ रोजी पुणे येथे झाला. वयाच्या नव्वदाव्या वर्षा नंतर देखील ते त्याच तडफेने अकॉर्डियन वाजवतात.
शंकर-जयकिशन, राम कदम, सी. रामचंद्र यांच्यासारख्या अनेक संगीतकारांसोबत इनॉक यांनी काम केलं आहे. त्यांनी आपल्या संगीत संयोजनानाने आणि वादनाने सर्व संगीतकारांना मोहून टाकलं. अप्रतिम गाणी करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. पाश्चात्य शास्त्रीय संगीतावर त्यांची कमालीची पकड आहे .
पंचहौद मिशनच्या चर्चसमोर असलेल्या ख्रिस्ती जमातीसाठी बांधलेल्या चाळीत त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील बेंजो, मोठा भाऊ व्हायोलिन तर दुसरा भाऊ क्लॅरियोनेट वाजवत होते. या सुरिल्या परिवारामध्ये इनॉक यांचा ‘बालपणीचा काळ सुरांचा’ गेला. इनॉक यांच्या वादनाची सुरुवात ड्रमसेटवर झाली. नियतीच्या मर्जीनुसार इनॉक यांच्या नशिबी अॅ्कॉर्डियन होते, पण उपलब्ध असलेल्या वाद्यांत ते नव्हते. त्यांचे वडील ख्रिश्चन बॉईज हॉस्टेलचे अधीक्षक होते. चर्च संबंधित असलेल्या युरोपियन फादर यांना वाटले की, हॉस्टेलमधील मुलांना एखादे तरी वाद्य यावे, संगीताची ओळख व्हावी, सुरांची माहिती व्हावी. या उद्देशाने त्यांनी विविध प्रकारची वाद्ये युरोपातून मागवली आणि ती इनॉकला सुवर्णसंधी वाटली; कारण फक्त पाहण्यासाठीही दुर्मिळ असणारी ट्रंपेट- ट्रॉम्बोनसारखी वाद्ये त्याला उपलब्ध झाली. सदर फादर मुलांना आवडेल ते वाद्य शिकवत असत. छोटा इनॉक त्याकडे आसुसून पाहात असे.
युरोपातून एक रेव्हरंड फादर स्लेड पुण्याच्या पंचहौद मिशनमध्ये आले होते. त्यांची मराठी शिकण्याची इच्छा होती. त्यांची आणि इनॉकची चांगली गट्टी जमली. इनॉक यांचे शिक्षण मराठीतूनच झाल्याने त्याच्याकडे मराठीचे ज्ञान होते- आजही ते अस्खलित मराठीतच बोलते- पण इंग्रजी मात्र त्या वेळी चांगले नव्हते. मोडक्यातेडक्या इंग्रजी-मराठीत त्यांचा संवाद चाले. त्यांचा आग्रह होता ‘तुम्ही इंग्रजी बोलू नका. मी मराठीत बोलताना ज्या चुका होतील त्या दाखवा व दुरुस्त करा.’ यामुळे त्यांची चांगली दोस्ती झाली. त्यांना वाटले की, या मुलाला थोडेफार वाजवायला शिकवले पाहिजे. ते उत्कृष्ट पियानोवादक होते. चर्चमध्ये रविवार प्रार्थनेसाठी ऑर्गन असतेच. ऑर्गन व पियानोच्या स्वरपट्टय़ा एकच असतात. रेव्हरंड स्लेडच्या मार्गदर्शनाखाली इनॉकची शिकवणी सुरू झाली. एका वर्षांतच ते ऑर्गन मोठय़ा सफाईने वाजवू लागले. घरीच ऑर्गन असल्याने शिकलेल्या पाठाची उजळणी वेळ मिळेल तेव्हा ते करीत असे. चर्चमधील क्वायर्स, हीम्स आदी प्रार्थना वाजवू लागले.
संगीतातील गायन, हार्मनी, मेलडी हे प्रकार चर्चमध्ये वारंवार वाजवले जातात. प्रख्यात पाश्चात्त्य संगीतकार बिथोवेन, बाख, मोझार्ट यांच्या रचनांचा त्यामध्ये समावेश होते. त्यांचे थोरले बंधू रेल्वेमध्ये नोकरी करीत होते. कानपूर येथे बदली झाली तेव्हा एक अँग्लो-इंडियन परिवार भारत सोडून ऑस्ट्रेलियाला चालले होते. त्यांच्याकडून त्यांचा पियानो स्वस्तात मिळाल्याने आपल्या धाकटय़ा भावासाठी ते रेल्वेने पुण्यास पाठवला. घरचेच वाद्य मिळाल्याने इनॉक चोवीस तास रियाज करून कुशल वादक बनला.
इनॉकने पियानो अॅवकॉर्डियनवर वाजवलेले पहिले गाणे ‘आह’ चित्रपटातील ‘सुनते थे नाम हम..’ होते. खूप धमाल आली. इनॉकला पियानो अॅ कॉर्डियन खूपच आवडले. (ओरिजनल ‘पतिता’, ‘आह’, ‘दाग’ या चित्रपटांतील अॅइकॉर्डियनचे सूर मात्र व्ही. बलसारा याने हार्मोनियमवर काढले होते ही माहिती अनेक संगीतप्रेमींना मनोरंजक वाटेल) दिल्लीमध्ये झालेल्या कॉलेज यूथ फेस्टिवलमध्ये इनॉकच्या वादनाने खूपच प्रसिद्धी मिळवली व वाडिया कॉलेजला पहिले बक्षीस मिळाले. त्यांची ओळख व्हॅन शिप्ले या प्रख्यात हवाईयन गिटारवादकाशी झाली व एक चांगला सुरेल ग्रुप तयार झाला. त्यांचे संयुक्त वादन श्रवणीय होत असे. शिप्ले मेलडी वाजवत असे तर इनॉक हार्मनीने गाणे सुशोभित करीत असे. साथीला स्पॅनिश गिटार व दोन रिदमिस्टही होते. कॉलेजमधून संगीताकडे वाटचाल चालू झाली व अर्थार्जनही सुरू झाले. त्यांच्या कार्यक्रमात लोकप्रिय हिंदी गाणी व ‘कम सप्टेंबर’, ‘लाराज थीम फॉर अ फ्यू मोअर डॉलर’ यांसारखी इंग्रजी गाणीही असत.
आता इनॉकचे चित्रपटसृष्टीतील पदार्पण अपरिहार्य होते. पुण्याच्या नवयुग स्टुडियोमध्ये चित्रपट चित्रीकरणाबरोबरच गाण्यांचेही ध्वनिमुद्रण होत असे. सुधीर फडके, वसंत पवार, पु. ल. देशपांडे यांच्याबरोबर इनॉकचा परिचय झाला. पु. ल. देशपांडे हे आपल्या ‘गुळाचा गणपती’चे चित्रीकरण व ध्वनिमुद्रण करीत होते. त्यांना अॅ्कॉडयन खूप आवडत होते, कारण पेटीवादनात ते प्रवीण होते. त्यांनी अॅीकॉर्डियन ऐवजी पियानो वाजविण्याची सूचना केली. खरे तर पियानोमध्येच इनॉक प्रवीण होता. त्यांचे पहिले चित्रपटवादन पियानोनेच झाले. राम कदम वसंत पवारचे साहाय्यक होते, पुणे आकाशवाणीवर क्लॅरियोनेट वादक म्हणून कामाला होते. त्यांना इनॉकचे वादन आवडत असे. त्यांनी स्वतंत्र काम मिळाल्यावर इनॉकला संगीत संयोजक नेमण्याचा शब्द दिला. राम कदम यांच्या सर्व चित्रपटांना इनॉकनेच संयोजन केले. वादन हेच अंतिम ध्येय ठेवणाऱ्या इनॉकचे मुंबईला प्रयाण आता अपरिहार्य होते.
१९६०-६१ ला इनॉक यांनी मराठी चित्रपटात वादन व संगीत संयोजनाला प्रारंभ केला. मुंबईत आल्यावर त्याला पहिला हिंदी संगीतात ब्रेक बिपिन-बाबुल यांच्या संगीत संयोजनाने मिळाला आणि ते लोकप्रिय झाला. त्याने संगीतकारांचे लक्ष वेधले. संगीताची प्रचंड आवड असलेल्या श्रोत्यांना अरेंजमेंट तथा संगीत संयोजनाबद्दल कुतूहल नसल्याने संगीत संयोजक यांची योग्य दखल घेतली गेली नाही. संगीतकारांच्या असामान्य प्रतिभेला सुचलेल्या चालींचे सोने संयोजकांनी केले, अगदी तेडीस तेड काम करून गाण्याला भरजरी रूप दिले व त्यांचे सौंदर्य नटवले, खुलवले.
संगीतकार खय्याम यांनी स्वरबद्ध केलेल्या कैफी आजमी यांच्या ‘शगुफ्ता’ अल्बमला इनॉक संयोजक होते. एका गाण्याचे संयोजन इनॉक यांनी इतके अप्रतिम केले की, कलाकार, वादक व ध्वनिमुद्रक सर्वाना ते आवडले. त्यांनी मनापासून दाद दिली.. ध्वनिमुद्रणाच्या वेळी खय्याम नव्हते. त्यांना जेव्हा ती रचना ऐकविली तेव्हा त्यांनी लागलीच इनॉकला रात्रीच फोन केला. ते म्हणाले, ‘डॉन! गाना बहुत अच्छा हुवा है, लेकिन उसमें पोएट्री छूट गयी है। हमें उसकी अरेंजमेंट बदलनी चाहिए, और कल फिर से रेकॉर्ड करेंगे। वैसी ते तुम्हारी अरेंजमेंट गाने से भी बढिम्या हो गई है।..’ त्यानुसार इनॉकने अॅकरेजमेंट बदलून गाणे ध्वनिमुद्रित केले. राम कदम स्वत: वादक असल्याने त्यांच्याबरोबर काम करणे इनॉक यांना सोपे जाई. त्यांची चतुरस्र प्रतिभा रामभाऊ जाणत असल्याने त्याच्या कामात ढवळाढवळ करीत नसत. त्याला पूर्ण स्वातंत्र्य मिळे. रामभाऊंचा झपाटाही विलक्षण होता. एकेका दिवशी पाच-सहा रचना ते ध्वनिमुद्रित करत. मुंबईच्या स्टुडिओत ध्वनिमुद्रण होत असल्याने पंडित विधाते या तालवादकाला व इतरही कोरस कलावंतांना पुण्यावरून मुंबईला आणीत. मैलाचा दगड असलेल्या ‘पिंजरा’ या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत.. त्यामागची कहाणी सांगण्यासारखी आहे. गीतकार, संगीतकार व इनॉक यांच्या अलौकिक मेहनतीची कल्पना येते. शांतारामबापूंचा चिकित्सक स्वभाव, रामभाऊंची अथक कार्यशैली. सी. रामचंद्र यांच्या कडे इनॉक यांनी खूप काम केले. शंकर-जयकिशनकडे अॅीकॉर्डियनसाठी गुडी सिरवाई, धीरजकुमार, सुमित मिश्रा यांसारखे वादक असल्याने इनॉक यांनी त्यांच्याकडे मोजकेच काम केले. रेडिओ सिलोनवर ‘साज और आवाज’ या सात ते सव्वासातच्या सुमारास सकाळी कित्येक वर्षे इनॉक यांच्या अॅजकॉर्डियनवर वाजविलेल्या रचना वाजवल्या जातात. त्यांची सुरुवात कशी झाली याचा योगायोगही विलक्षण आहे. १९५५ ते ५७ मध्ये इनॉकने व्हॅन शिप्लेबरोबर आफ्रिकेचे अनेक दौरे केले.. तेथील संगीतप्रेमींना त्या दोघांचे वादन खूपच पसंत होते.. त्या वेळी तलत मेहमूद व सी. एच. आत्मा यांचेही कार्यक्रम होत. जानेवारी १९५७ ला भारतात परतताना इनॉक व शिप्ले भेटले. त्यांची लोकप्रियता आत्मानेही अनुभवली होती. भारतात आल्यावर सी. एच. आत्माने एचएमव्हीचे जनरल मॅनेजर चढ्ढांना इनॉकच्या वादनाच्या तबकडय़ा काढण्याची सूचना केली.. एचएमव्हीने त्यानंतर इनॉकच्या खूप गाण्यांच्या तबकडय़ा काढल्या. त्यांचा अभूतपूर्व खप रसिकांमध्ये झाला. इनॉक संयोजक म्हणून अपरिचित असलेल्या गानरसिकांना अॅणकॉर्डियन वादक इनॉकला मात्र आजही खूप जण ओळखतात. त्याच्या रेकॉर्ड्सही संग्रही आहेत. त्यांची रेकॉर्ड झालेली पहिली धून ‘सोलवा साल’मधील ‘है अपना दिल ते आवारा’ आहे. कानसेनांच्या दुनियेत रेडिओ सिलोनचे नाव अग्रगण्य आहे. त्यावर गोपाल शर्मा, विजयकिशोर दुबे नंतर आले. त्यांनी लोकप्रिय झालेल्या कितीतरी कार्यक्रमांची संकल्पना आखली. त्यामध्येच ‘साज और आवाज’ हा कार्यक्रम आहे.. होता वैशिष्टय़ संगीतकार गायक/वादकांचे वाढदिवस लक्षात ठेवून त्यांनी गायलेली/ वाजवलेली/ संगीत दिलेली गाणी पूर्ण वेळ ऐकवली जातात. १६ एप्रिलला सिलोनने पूर्णवेळ इनॉक यांच्या पंच्याहत्तराव्या वर्षांच्या वाढदिवशी रेडिओ सिलोनने इनॉकचे वाद्यसंगीत ऐकवले व त्याचा फोन नंबर दिला. तलत महमूद, व्हॅन शिप्ले व इनॉकचे संयुक्त दौरे आफ्रिकेला झाले. अॅंकॉर्डियनमध्ये ‘गोरे गोरे, ओ बाके छोरे’ वाजवणाऱ्या रेगोला व शंकर-जयकिशनकडे वाजवणाऱ्या गुड्डी सिरवाईला ते गुरुस्थानी मानते.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ विलासदत्त राऊत
इनॉक डॅनियल्स यांची वेबसाईट
http://www.enochdaniels.com/about/
इनॉक डॅनियल्स यांचे वादन
https://www.youtube.com/watch?v=b57Ke-2Is0E
https://www.youtube.com/watch?v=mnZM8ANG2Kc
सुमती मुटाटकर या हिंदुस्तानी संगीतातील आग्रा घराण्याच्या गायिका व संगीतज्ञ, तसेच दिल्ली विद्यापीठाच्या संगीत विभागात प्राध्यापिका होत्या.
अनंत गणेश गाडगीळ ऊर्फ दाजीकाका गाडगीळ यांचा जन्म ११ सप्टेंबर १९१५ ला सांगलीत झाला. वडिलोपार्जीत पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सची जबाबदारी दाजीकाकांनी गेल्या ७५ वर्षांपेक्षा अधिक वर्षे समर्थरित्या पेलली. पु. ना. गाडगीळ आणि कंपनी (पीएनजी) या सराफी पेढीचे आधारस्तंभ, तरुणाईला लाजवेल असा उत्साह अंगी असणार्या दाजीकाका गाडगीळ यांचे १० जानेवारी २०१४ या दिवशी वृद्धापकाळाने वयाच्या ९९ व्या वर्षी पुण्यातील प्रयाग रुग्णालयात निधन झाले.
रामचंद्र हे ठाकूर हिंदी आणि गुजराती चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक होते. रामचंद्र ठाकूर यांची खासियत ही होती की ते अकरा भाषा बोलणारे बहुभाषी होते. ते पाली भाषेचे अभ्यासक होते.
रिची बेनॉ हे स्पिनर आणि गुगली टाकत होते परंतु ते चेंडूला फ्लाइट द्यायचे आणि त्याचबरोबर योग्य दिशा देत असत त्यामुळे समोरचा फलंदाज सतत दडपणाखाली असायचा. ते आजच्या शेर्न वॉर्न अँशले गिल्स प्रमाणे अराउंड द विकेट टाकायचे . त्याचपप्रमाणे ते त्या काळामध्ये अत्यंत प्रभावी क्लोज फिल्डर होते.
बॉलिवूडचे मोठे घराणे म्हणून ओळखल्या जाणा-या कपूर घराण्यातील राज कपूर यांचे पुत्र ऋषी कपूर. त्यांचा जन्म ४ सप्टेंबर १९५२ रोजी झाला. आपल्या पहिल्याच चित्रपटात एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत, आपल्या वडिलांच्या लहानपणची भूमिका करताना तो निळ्या डोळ्यांचा, गोंडस मुलगा ,गोल चेहरा आणि चेहऱ्यावरचे स्मितहास्य .... दिलेली भूमिका त्याने फक्त व्यवस्थितपणे पार पडलीच नाही तर त्यात आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली. त्या भूमिकेबद्दल त्याला उत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आणि लगेच ३ वर्षानंतर आपल्या अभिनेता म्हणून आलेल्या पहिल्याच चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेताचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. चित्रपटातील प्रतिष्ठीत कुटुंबात जन्म घेतल्यामुळे अभिनयाचे संस्कार बालपणापासूनच होते पण त्या चित्रपटसृष्टीत जर यशस्वी होण्यासाठी स्वताच्या अभिनयाची क्षमता लागते हे ऋषीकपूर यांनी सुरवातीलाच ओळखले होते. आपल्या पहिल्या चित्रपटात ‘बॉबी’ मध्ये डिम्पल कपाडिया सोबत पदार्पण केल्याबरोबरच कितीतरी महिलांच्या गळ्यातला ताईत झालेला हा अभिनेता कायम ‘लवर बॉय’ म्हणून प्रस्थापीत झाला.
आपल्या सुरवातीच्या काळात रोमांटिक हीरो म्हणून लोकांच्या हृदयात जागा बनविणाऱ्या या अभिनेत्याने त्याचा नंतरच्या काळात विविध प्रकारच्या भूमिका करून स्वताला अष्टपैलू अभिनेता म्हणून प्रस्थापित केले. ते , रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांच्यापेक्षा यशस्वी झाले. ‘बॉबी’ बद्दल बोलताना ऋषीकपूर सांगतात कि बऱ्याच लोकांना आजपर्यंत असेच वाटायचे कि ऋषीकपूरला पदार्पण करण्यासाठी हा चित्रपट बनविण्यात आला आहे. पण प्रत्यक्षात ‘मेरा नाम जोकर’ च्या अपयशामुळे खचून गेलेल्या राजकपूर यांना एका नवीन प्रेमकहाणी वर चित्रपट बनविण्याचा होता पण त्यावेळेचा रोमांटीक हिरो राजेश खन्ना यांना चित्रपटासाठी निवड करण्यासाठी त्यांच्या जवळ पुरेसा निधी नव्हता. मग पैसे वाचविण्यासाठी त्यांनी घरचाच कलाकार निवडला आणि नंतर आपण सर्व जाणतोच कि मेरा नाम जोकर चा गेलेला पैसा वसूल करणारा हा सिनेमा ठरला. या चित्रपटासाठी पहिल्यांदा राजकपूर यांनी आपले सुरवातीपासुनाचे संगीतकार शंकर जयकिशन यांना डावलून लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना अनुबंधित केले होते. तो विषय वेगळा कधी त्या विषयावर पण पोस्ट करेल.
१९७३ च्या बॉबी पासून २००० पर्यंत ऋषीकपूर हे नायकाची रोमांटिक भूमीका करीत होते. या दरम्यान त्यांनी ९२ चित्रपटात काम केले, त्यापैकी ५१ चित्रपटात ते एकटेच नायक होते तर ४१ बहुनायक चित्रपट होते. या दरम्यान त्यांनी जवळपास सर्वच अभिनेत्रीसोबत नायक म्हणून काम केले होते. १२ चित्रपटात एकत्र काम करणाऱ्या अभिनेत्री नीतू सिंग यांच्यासोबत त्यांनी विवाह केला. २००० पर्यंत रोमांटिक भूमिका केल्यानंतर त्यांनी सहायक अभिनेता म्हणून भूमिका साकारायला सुरुवात केली तर त्याच्या अभिनयाचे वैविध्य दिसून आले. मग ती ‘नमस्ते लंडन’ चि वडिलांची भूमिका, ‘औरंगझेब’ मधील लाचखाऊ पोलीस अधिकारी, ‘हाउसफुल्ल 2’ मधील विनोदी, स्टूडेंट ऑफ द ईयर मधील डीन, अग्निपथ मधील ‘रौफ लाला’ किंवा ‘D-Day’ मधील डॉन. या वरूनच दिसून येते कि आपल्या अभिनयासाठी समर्पित ऋषीकपूर यांनी आपल्या सुरवातीच्या काळा प्रमाणेच आपल्या दुसर्या डावात सुद्धा तेवढीच मेहनत घेतली. इतक्या सर्व यशस्वी चित्रपटातून भूमिका करीत असताना पण त्यांनी आपल्या कुटुंबीयांकडे तेवढेच लक्ष दिले. ते कधीही सायंकाळी ६ नंतर शूटिंग करीत नाही. ऋषी कपूर यांची बहुतांश गाणी सुपरहिट झाली होती.
प्रत्येकाच्या तोंडात त्यांची गाणी असायची. त्यांच्या साठी आघाडीच्या सर्व गायकांनी पार्श्वगायन केले होते पण शैलेंद्र सिंग यांचा आवाज त्यांना सर्वात जवळचा वाटायचा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
ऋषीकपूर यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=buak7IIvWxY
https://www.youtube.com/watch?v=1ldwcYP4PjQ
https://www.youtube.com/watch?v=VLmVJmi3CtA
चित्रगुप्त यांचे संपूर्ण नाव चित्रगुप्त श्रीवास्तव. त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला. त्यांनी एम. ए. (इकॉनॉमिक्स) ही पदवी घेऊन काही काळ प्राध्यापक म्हणून देखील काम केले. त्यांना संगीत व काव्य या क्षेत्रात रुची असल्यामुळे ते नशीब आजमाविण्यासाठी मुंबईत आले व अतिशय कष्ट करून एस. एन. त्रिपाठी यांच्याकडे असिस्टंट म्हणून काम केले. खऱ्या अर्थाने त्यांची कारकीर्द भाभी ह्य़ा चित्रपटापासून सुरू झाली. चित्रगुप्त यांनी एकूण ८२८ गाणी केली. मा.चित्रगुप्त यांनी प्रेमधवन, मजरुह सुलतानपुरी, साहिर, राजेंद्र कृष्ण व आनंद बक्षी इ. गीतकारांकडून गाणी लिहून घेतली. महमंद रफी व लता मंगेशकर यांच्या आवाजाचा टोन चित्रगुप्तांनी बरोबर वापरला व या कलाकारांची गाणी त्यामुळे अतिशय सुरेल वाटली.
एव्हीएम या दक्षिणेकडच्या बॅनरखाली त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले. लता मंगेशकर, महमंद रफी, आशा भोसले, तलत मेहमूद, मुकेश तसंच मन्नाडे इत्यादी गायकांच्या माध्यमातून त्यांनी सुरेल गाणी दिली. परंतु त्यांच्या वाटय़ाला सगळेच ‘बी’ ग्रेड सिनेमे आले. एकाही मोठय़ा हीरोचा चित्रपट (दिलीप, देव, राज कपूर) त्यांना मिळाला नाही. संगीत चांगले असूनसुद्धा त्यांना पाहिजे तेवढा सन्मान मिळाला नाही. परंतु एकटय़ा चित्रगुप्तांनी आपल्या संगीताच्या जोरावर ‘बी’ ग्रेड सिनेमांना तारून नेले. ‘बी’ ग्रेड सिनेमाचे निर्माते चित्रगुप्त यांच्या संगीतावर अतिशय खूश असत. कारण अशा चित्रपटांमध्ये चांगली गाणी असल्यामुळे ते चित्रपट यशस्वी होत असत.
भारत भूषण, चंद्रशेखर, अजित, सुनील दत्त, राजेंद्रकुमार हे त्यांच्या चित्रपटाचे नायक होते. तर कुमकुम, फरियाल, शकिला, श्यामा, माला सिन्हा, नंदा, मीनाकुमारी या नायिका होत्या. खऱ्या अर्थाने १९५७-१९६७ हे दशक चित्रपट संगीताच्या दृष्टीने भरभराटीचे होते. चित्रपट जरी चालले नसले तरी चित्रपटातील गाणी ही सतत रेडिओवर वाजत असत व लोकप्रिय होत असत. चित्रगुप्त यांचे निधन १४ जानेवारी १९९१ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
चित्रगुप्त यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=CB52wfw846U
आज बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्री कोंकणा सेनचा वाढदिवस.
कोंकणा सेनचा जन्म ३ डिसेंबर १९७९ रोजी झाला.
कोंकणा सेन शर्मा ही दिग्दर्शिका अपर्णा सेन शर्मा यांची मुलगी आहे. 'इंदिरा' या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारत १९८३ साली कोंकणाने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर ती २००० साली 'एक जे अच्छे कन्या' या बंगाली चित्रपटात झळकली. चित्रपट जगतात कोंकणाला सर्वात पहिल्यांदा प्रसिध्दी 'मिस्टर एंड मिसेस अय्यर' या चित्रपटामुळे मिळाली. याचे दिग्दर्शन तिची आई अपर्ण सेन शर्मानेच केले होते. ती सायन्स रायटर आणि जर्नलिस्ट मुकुल शर्मा यांची मुलगी आहे. तिची आई अपर्णा सेन एक प्रसिध्द सिने अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहे. 'मिस्टर एंड मिसेस अय्यर'साठी कोंकणाला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. यानंतर कोंकणा २००५ साली 'पेज थ्री' चित्रपटात चमकली. या चित्रपटामुळे तिची हिंदी चित्रपट वर्तुळात ओळख निर्माण झाली. यापूर्वी तिने अनेक भूमिका केल्या असल्या तरी ते चित्रपट कमर्शियली सक्सेस नव्हते. या दरम्यान तिने 'वेक अप सिड' चित्रपटात रणबीर कपूरसोबत रोमान्स केला. फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोंकणाने मिळवला आहे. २००६ साली 'ओंकारा 'आणि २००७ साली 'लाइफ इन ए मेट्रो' या चित्रपटांसाठी कोंकणाला सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला होता. सहाय्यक अभिनेत्रीचा कोंकणाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. कोंकणा सेन ही अतिशय सिलेक्टेड चित्रपटातून आपल्याला दिसली आहे. प्रसिध्दीसाठी किंवा पैशासाठी सरसकट चित्रपटातून काम करण्याचा मोह तिने टाळला. आशयघन चित्रपटातूनच ती दिसली आणि छोट्या भूमिकातूनही ती उठून दिसली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
कुंदनलाल सैगल ही आठ अक्षरे म्हणजे सप्तकातील पहिला ‘सा’ आणि वरचा ‘सा’ मिळून आठ स्वर, संगीतप्रेमींसाठी ही मंत्राक्षरे आहेत. महान गायक नट या उपाधीपेक्षाही वरती स्थान असलेला हा स्वर. त्यांचा जन्म ११ एप्रिल १९०४ रोजी झाला. अवघ्या पंधरा-सोळा वर्षांच्या कालखंडात कुंदनलाल सैगल यांनी संपूर्ण संगीतसृष्टीवर अमीट ठसा उमटविला. त्यांच्या गायकीचा प्रभाव अनेक गाजलेल्या गायकांवर निश्चितपणे जाणवतो.
‘जब दिल ही टूट गया’ हे ‘शाहजहाँ’ चित्रपटातील गीत ऐकताना ‘हम जी के क्या करेंगे’मधील ‘क्या’ हा स्वर गाताना उदास, हतबल आणि सकारण असा उच्चार हे सारेच भिडल्यावाचून राहत नाही. दोन्ही अंतऱ्यांमध्ये ‘इक भेदी लूट गया’ किंवा ‘हर साथी छूट गया’ ही विफलता समजण्यासाठी मूळ गाणे ऐकावेच लागते. ‘तदबीर’ चित्रपटातील संगीतकार लाल मोहम्मद यांनी स्वरबद्ध केलेले ‘मैं पंछी आजाद मेरा कहीं दूर ठिकाना रे, इस दुनिया के बाग में मेरा आना-जाना रे’ हे गीत अधिक वेगळे काही सांगत नाही. या गीताचा अंतराही पुरेसा संदेश देतो. ‘जीवन की परभात में आऊँ, सांज भये तो मैं उड जाऊँ, बंधन में जो मुझको बांधे वो दिवाना रे..’ हेच सैगल यांच्या बाबतीत खरे आहे. ‘शाहजहाँ’ याच चित्रपटातील ‘गम दिए मुस्तकिल..’ या गीतातील दोन वेगवेगळ्या पद्धतीत गायलेले.. ‘हाय हाय ये जालिम जमाना..’ ही या गीतातील खास बात आहे. ‘दिया जलाओ जगमग.. जगमग..’ हे खेमचंद प्रकाश यांनी स्वरबद्ध केलेले ‘तानसेन’ चित्रपटातील गीत जेव्हा सैगल स्वरात आपल्यासमोर येते, तेव्हा स्वरांचे झुंबर क्षणार्धात लख्ख प्रकाशमान झाल्याचे जाणवते. आणि हा प्रकाश उमलतो तो सुरुवातीच्या ‘दिन सूना सूरज बिना..’ पासूनच. ‘सो जा राजकुमारी..’ या अंगाई गीताने के. एल. सैगल यांचा गाण्यातील भाव ऐकताना आपण मोहरून जातो. ‘माय सिस्टर’ चित्रपटातील ‘दो नैना मतवारे’ हे लोकप्रिय गीत, ‘दिया जिसने दिल’ या गीतातील ‘दिल’ या शब्दावरील स्वरमेळ, ‘रुमझुम रुमझुम चाल तिहारी’ या गीतातील ‘हंसध्वनी’ राग, ‘देवदास’ चित्रपटातील ‘बालम आये बसो मोरे मन में’ ही तिमिर बरन यांची आकर्षक स्वररचना हे सारे सैगल माहौल निर्माण करणारे आहे. लोककवी मनमोहन एका कवितेत सैगलांबद्दल म्हणतात-
तुझ्याच कंठामध्ये अवचित
मधमाशी घे ‘मोहोळ’ बांधुनी
बुलबुल बसले बनात रुसुनी।
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी या सूरसम्राटाला मानवंदना देताना म्हटले होते-
अशीच संगीते आळवी तुझी कलावंता,
घडीभर जागव रे अमुची अशीच मानवता..
सैगल हे त्या काळचे सर्वात लोकप्रिय गायक. त्यांच्या आवाजाला इंग्लिश श्रोते ‘गोल्डन व्हॉइस’ म्हणायचे. सैगल यांची सर्वच गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्यांच्या गैरफिल्मी गजलासुद्धा फार श्रवणीय आहेत. ‘बाबुल मोरा’ हे स्ट्रीट सिंगर चित्रपटातील गाणे अजूनही लोकांना फार आवडते. के.एल. सैगल यांचे १८ जानेवारी १९४७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti