जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
चंदगीराम गेले. भारतीय कुस्तीमधील एक महान पर्व संपले. सहा फूट उंचीचा, १९० पौण्ड वजनाचा आपल्या विनम्र स्वभावाने सर्वांना जिंकणारा पैलवान अनंतात विलीन झाला. त्याने भारतीय कुस्ती क्षेत्रावर आपला अमीट ठसा उमटविला होता. १९७०च्या बँकॉक एशियाडमध्ये भारताला १०० किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या या महान कुस्तीगीराने भारतातील 'हिंद केसरी', 'महाभारत केसरी', 'भारत भीम', 'रुस्तम ए हिंद', 'भारत केसरी' हे सारे प्रतिष्ठेचे किताब जिंकले होते. चंदगीराम यांनी फडातल्या अनेक प्रतिष्ठेच्या कुस्त्याही जिंकल्या होत्या. पेशाने शिक्षक असलेल्या आणि पदवी परीक्षेपर्यंत पोहोचलेल्या या कुस्तीगीराने आपल्या कुस्तीच्या आखाड्यातून अनेक पैलवान घडविले. त्यापैकी सात जणांनी 'अर्जुन पुरस्कार' पटकाविले होते.
बीजिंग ऑलिम्पिकमधला ब्राँझ पदक विजेता सुशीलकुमार हादेखील चंदगीराम यांचाच चेला. चंदगीराम यांनी अनेक मल्ल घडविले हे खरे; पण त्यापेक्षाही त्यांचे या क्षेत्रासाठीचे मोठे योगदान म्हणजे त्यांनी महिला कुस्तीसाठी अतोनात मेहनत घेतली. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या तिन्ही मुलींना प्रथम आखाड्यात उतरविले. १९९० च्या सुमारास तुमच्या मुलींना आखाड्यात उतरविणार का, या प्रश्नाला त्यांनी अशा प्रकारे कृतीतूनच उत्तर दिले होते. त्यामुळे अन्य मुलींच्या पालकांनीही त्यांच्यावर विश्वास टाकला. आखाड्यात मुलींना मुक्तपणे आणि दडपणाशिवाय सराव करायला मिळावा यासाठी त्यांनी आपल्या 'चंदगीराम का आखाडा'मध्ये पुरुषांना प्रवेश देणेच बंद केले. त्यांच्या एका मुलीने-सोनिकाने २००० मध्ये एशियन त्यांच्या चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले होते. शिकविण्याच्या पद्धत अत्यंत कडक होती. त्या पद्धतीबाबत मुली सांगतात, की ते कठोर होते. एकदा का एखादी गोष्ट शिकवली, की ती चेल्याकडून घोटून तयार करून घ्यायचे. कठोर परिश्रमाला त्यांच्याकडे पर्याय नव्हता.
चुकीबद्दल शिक्षा द्यायचे; पण यशानंतर तेवढ्याच उत्साहाने कौतुकही करायचे. मोठ्या उदार मनाचा हा व्यक्तिमत्त्वाचा पैलवान होता. समोरच्या पैलवानाची दोन्ही हातांची दोन-दोन बोटे पकडून त्याला फिरविण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी होती. आपला गुडघा प्रतिस्पर्ध्याच्या छातीवर टेकवून त्याचे दोन्ही हात पकडून डोक्याला डोके लावून ते फिरवायचे. दिल्लीचे गुरू हनुमानदेखील चंदगीराम यांना मानायचे. ते म्हणायचे, हा वेगळ्या ढंगाचा पैलवान आहे. तो समोरच्या पैलवानाचा आदर करतो. त्याच्याकडून विनय शिकण्यासारखा आहे. कुस्ती जिंकल्यानंतर पैलवानालाच नव्हे तर प्रेक्षकांनाही ते अभिवादन करायचे. त्यांनी अनेक मल्लांना पोसले. अनेक महिला कुस्तीगीर घडविले.
गेल्या महिन्यातच त्यांची शिष्या अलका तोमर हिने एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत ब्राँझ पदक पटकाविले. ती म्हणाली, मास्टर चंदगीराम यांचे सध्या एकच ध्येय होते. त्यांना आम्हाला नवी दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत खेळताना पाहायचे होते. ते त्यांचे स्वप्न होते. स्वतः चंदगीराम यांची कारकीर्ददेखील स्वप्नवत होती. त्यांच्या हाताचे पंजे मोठे होते. मनगटाची ताकद प्रचंड होती. त्यांच्या त्या ताकदीचा सर्वांना हेवा वाटायचा. त्यांची खेळावर श्रद्धाही मोठी होती. कुस्तीसाठी आयुष्य वेचणाऱ्या या अवलियाच्या निधनाने कुस्ती उत्तर भारतातच नव्हे तर संपूर्ण देशात पोरकी झाली आहे.
‘ती आली, तिला पाहीलं आणि तिने सर्वांचं मन जिंकलं. आपल्या अद्वितीय अभिनय शैलीत आणि कलेवर प्रचंड हुकुमत असणार्या तसेच मॉडेलिंग विश्वावर आपली अनोखी छाप पाडणार्या राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधव यांच्यासोबत खास गप्पा..फक्त मराठीसृष्टी.कॉमच्या महाराष्ट्राच्या दिपशिखा या सदरासाठी..
पेण तालुक्यात सर्वत्र अण्णा मोकाशी या नावाने ओळखले जाणारे हे गृहस्थ म्हणजे पेणचे सार्वजनिक काकाच म्हणावयास हरकत नाही.
डिसिल्व्हा अंकल… छायाचित्रणाची आवड… आयकर विभागातील सुरक्षित नोकरीत स्वेच्छानिवृत्ती घेऊन पूर्णवेळ छायाचित्रकार होण्याच्या निर्णयातून खऱया अर्थाने त्यांची छायाचित्रकारिता फुलली…
जागतिक कीर्तीचे चित्रपट-कलादिग्दर्शक, चित्रपटदिग्दर्शक व निर्माता नितिन चंद्रकांत देसाई यांचा जन्म ६ ऑगस्ट १९६५ रोजी झाला.
नितिन चंद्रकांत देसाई यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटांसाठी कलादिग्दर्शन केले आहे. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कला विद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले.१९८७ सालापासून त्यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली.
प्रतिभा, प्रयत्न आणि प्रज्ञा या त्रयीच्या जोरावर आपले अढळ स्थान निर्माण करणारे नाव म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई!
एका चाळकरी मध्यमवर्गीय मुलानं रुपेरी पडद्यावर हालचाल करणारी चित्रं पाहिली, त्यामागचे भव्य सेटस् पाहिले आणि ते सारं मोहमयी वातावरण पाहताना आपणही असंच माणसाला मोहवून टाकणारं भव्य काही तरी निर्माण केलं पाहिजे असं मनाशी ठरवूनही टाकलं. अडीच खणांच्या खोलीत राहणाऱ्या माणसानं अडीच दशकांनंतर मुंबई-पुणे महामार्गावर चौक-कर्जत रस्त्यावर अडीचशे एकरात ते भव्य स्वप्न साकारलं- एन् डी स्टुडिओ! आज देशातील अग्रगण्य स्टुडिओमध्ये या स्टुडिओची गणना होते.
नितीन देसाई हे भारतीय चित्रपटसृष्टीमधील एक महत्वाचे नाव. गेल्या शतकातील ऐंशीच्या दशकापासून हे नाव छोट्या पडद्याला व मोठ्या पडद्याला आपलं रुपडं देत आलं आहे. भारतातील प्रत्येक मोठा चित्रपट किंवा दूरदर्शनवरील प्रकल्प हा नितीन देसाई यांच्या कलादिग्दर्शनाने सजत असतो. भारत की खोज सारखी ऐतिहासिक महत्वाची मालिका असो किंवा लगान सारखा अफाट चित्रपट असो. त्या प्रकल्पावर नितीन देसाई हे असणारच! त्यांनी पंधरा वर्षांपूर्वी खालापूर तालुक्यातील चौकजवळ हा स्टुडीओ उभारायला घेतला. एक भव्य स्वप्न सृष्टी येथे आकाराला येऊ लागली. हा स्टुडिओ मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरांपासून समान अंतरावर आणि हमरस्त्याला लागून आहे.
शेजारीच मोरबे धरणाचा सुंदर परिसर, सह्याद्रीच्या डोंगररांगा, वळणदार रस्ते, सहकार्याला कायम उत्सुक असणारे गावकरी आणि नयनरम्य पार्श्वभूमी ही या स्टुडिओची खासियत आहे. आज खालापूर कर्जतचे नाव एक कलापूर या नात्याने सर्वदूर पसरण्यात एन् डी स्टुडिओचा फार मोठा सहभाग आहे. स्टुडिओमुळे खरंतर या संपूर्ण परिसरातील अर्थकारण आणि समाजकारण बर् यापैकी बदललं आहे. या परिसरात भारतातील छोटे मोठे सर्व कलाकार येतात, हजारो जणांना रोजगार मिळतो, याबरोबरच एका व्यवसायाला जोडून अनेक नवनवे जोडधंदे सुरू होत जातात.
एकूणच सारा भाग हा जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे अनेक कंपन्या बंद पडत असताना, एन् डी स्टुडिओमुळे काही प्रमाणात सावरला गेला आहे. आमीर खानचा द रायझिंग हा येथे चित्रित केला गेलेला पहिला भव्य चित्रपट. त्यानंतर या स्टुडिओने मागे पाहिले नाही. मधुर भांडारकर यांचा गाजलेला ट्रॅफिक सिग्नल हा त्यानंतरचा महत्वाचा चित्रपट. १८५७ चा भारला गेलेला कालखंड असेल किंवा मुंबईची अफाट गर्दी वाहून नेणारा गजबजलेला हमरस्ता असेल, तो तेथे साकारला गेला. जोधा अकबर सारखा पिरियड ड्रामा असणारा चित्रपटही येथेच चित्रित झाला. आग्र्याचा भव्य किल्ला येथे दिमाखाने त्यातील सर्व बारकाव्यांसह स्टुडिओमध्ये उभा केला गेला.
ग्रेट कॉमेडी सर्कस, बिग बॉससारख्या अनेक लोकप्रिय आणि भव्य मालिकांचे निर्माण येथे झाले आहे. राजा शिवछत्रपति सारखी भारतीय दूरचित्रवाणीमधील आजवरची सर्वात भव्य मालिका जवळपास संपूर्णपणे येथेच चित्रित झाली. छत्रपतींची राजधानी, त्यांचा दरबार, राजगड, पन्हाळा, रायगड, शिवनेरीसारखे किल्ले उभे केले गेले, आणि ते आजही मालिका संपून गेल्यानंतर त्याच दिमाखात जतन केले गेले आहेत. यासंदर्भात बोलताना श्री नितीन देसाई म्हणाले की, हे सर्व सेट आम्ही निर्माण केले पण ते आम्ही मोडणार नाही, ते तसेच जतन करून ठेवणार, या प्रत्येक सेटला एक ऐतिहासिक महत्व आहे याची जाणीव आम्हाला आहे.
भारतीय कलाइतिहासाची ही सोनेरी पाने आहेत. हा स्टुडिओ म्हणजे लवकरच एक पर्यटन स्थळ म्हणून आम्ही विकसित करणार आहोत. आज अनेकदा ही मयसृष्टी आणि सर्वसामान्य माणसं यांच्यात अंतर पडलेले आपणांस जाणवते. हे अंतर या निमित्ताने कमी होईल आणी कलावंताबद्दलच्या आकर्षणाबरोबरच या कलावंताला आपली कला जोपासायला, पडद्यावरील आपली व्यक्तिरेखा साकारताना किती प्रकारचे कष्ट उपसावे लागतात याची नम्र जाणीव आम्ही करून देऊ शकू. एका दृष्टीने ते लोकशिक्षणच असेल.
आमच्या स्टुडिओमध्ये एकाच वेळी शेकडो कलावंतांची, सहयोगी तंत्रज्ञांच्या राहण्याची, जेवण्याची, अखंड विद्युत पुरवठ्याची आम्ही सोय करू शकतो. आज आमच्या कंपनीचं प्रचंड मोठं असं कार्यालय पवई येथे आहे. एका सामान्य कुटुंबात मी जन्माला आलेलो असल्यामुळे मला माझ्यासारखी परिस्थिती असणाऱ्या लोकांसमोर विनम्र असं उदाहरण ठेवता येतं आहे यासाठी मी परमेश्वराचा आभारी आहे. एन् डी स्टुडिओने आता स्वत:ची कंपनी स्थापन करून नव्या दूरचित्रवाणी मालिका, नवे चित्रपटही घडवायला सुरुवात केली आहे.
राजा शिवछत्रपति या मालिकेच्या निर्मितीबरोबरच तुफान गाजलेल्या महाराणी पद्मिनी, झाशीची राणी या मालिकांची निर्मिती एन् डी स्टुडिओने केली आहे. जगातील सात आश्चर्ये येथे उभी करून ज्यांना ज्यांना ही आश्चर्ये पहाणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी त्या सात आश्चर्यांच्या प्रतिकृती येथे उभारल्या जातील, येथे एक जागतिक दर्जाचं म्युझियम बनविण्याचा श्री देसाई यांचा मानस आहे.
एन् डी स्टुडिओ हे एका सामान्य परिस्थितीमध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीनं आपल्या जिद्द, चिकाट आणि कला यांच्या सहाय्याने साकारलेलं सत्य-स्वप्न आहे! नितिन देसाई यांच्यावर ‘आधुनिक युगाचा विश्वकर्मा: नितीन चंद्रकांत देसाई’
लेखक मंदार जोशी. हे पुस्तक सकाळ प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.
नितीन देसाई हे व्यक्तिमत्व एकूणात ‘नाही रे’ वर्गाला भुरळ घालणारं व्यक्तिमत्व आहे. खिशात काहीही नसताना, वरळीच्या चाळीत राहणार्याव एका सर्वसामान्य परिस्थितीतील बँक कर्मचाऱ्याचा हा मुलगा पुढे अवघ्या अडीच दशकात जागतिक कीर्तीचा कर्तबगार कलादिग्दर्शक, प्रॉडक्शन डिझायनर बनतो, १०० एकरांच्या एन्. डी. स्टुडिओचा मालक कसा बनतो याचा शोध हा मराठी मनाच्या कुतुहलाचा विषय आहे आणि हे कतुतहल शमविणारं हे पुस्तक आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ नीतिन आरेकर
बार्शीच्या गोपाळराव भातंब्रेकर गुरुजींकडून दशरथ पुजारी यांनी संगीताचे व गायनाचे धडे घेतले. त्यांचा जन्म ३० ऑगस्ट १९३० रोजी झाला. वयाच्या अवघ्या १८ वर्षांपासूनच त्यांनी संगीत दिग्दर्शनातील कारकीर्दीस सुरुवात केली. दशरथ पुजारी हे स्वतः उत्कृष्ट हार्मोनियम वादकही होते. त्यांनी पं.लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले यांच्याकडून जयपूर घराण्याची तालीम घेतली होती. मा. दशरथ पुजारी हे एक उत्तम संगीतकार आणि तितकेच उत्तम गायक होते.
खरे तर दशरथ यांना पुजारी शास्त्रीय संगीतात पुढे वाटचाल करायची होती पण विधिलिखित काही वेगळेच होते. पुढे काही गोष्टी अशा घडल्या की ते भावगीतांकडे वळले आणि मग मराठी भावगीतांना एक अवीट गोडीचा गायक आणि उत्तम संगीतकार लाभला. गायक म्हणून त्यांना जास्त संधी मिळाली नाही तरी त्यांनी गायलेली सगळीच गाणी विलक्षण गाजली. त्यामानाने संगीतकार म्हणून तर त्यांची कारकीर्द खूपच भव्य झालेय. मा. दशरथ पुजारी ह्यांनी स्वत: गायलेली गाणी तशी खूपच कमी आहेत. वर सांगितलेले 'अशीच अमुची आई असती ' तसेच ' अजून त्या झुडपांच्या मागे सदाफुली दोघांना हसते ' किंवा 'हरी भजनाविण काळ घालवू नको रे ' हे भक्तिगीत काय, ही सगळी गाणी गाजलेली आहेत. त्यांनी संगीतबद्ध केलेली अवीट गोडीची आणि गाजलेली कैक गाणी सुमन कल्याणपूर आणि माणिक वर्मा ह्यांनी गायलेली आहेत.
दशरथ पुजारी यानी आपल्या प्रदीर्घ संगीत कारकीर्दीत मंगेश पाडगावकर, रमेश आणावकर, शांताराम नांदगावकर, सुधांशु, योगेश्वीर अभ्यंकर, मधुकर जोशी यांसारख्या गीतकारांच्या गाण्यांना चाली बांधल्या. 'झिमझिम झरती श्रावणधारा', 'अशीच अमुची आई असती', 'चल ऊठ रे मुकुंदा', 'केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा', 'मृदुल करांनी छेडित तारा' इत्यादी गाणी त्यांच्या अतिशय गाजलेल्या गाण्यांपैकी आहेत. संगीत-संयोजक अनिल मोहिले हे उमेदवारीच्या काळात मा. दशरथ पुजारी यांचे सहाय्यक होते. दशरथ पुजारी यांनी 'अजून त्या झुडपांच्या मागे' हे आत्मचरित्रपर पुस्तकही लिहिले होते. कवी पी. सावळाराम हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना तसेच 'चतुरंग संगीत सन्मान ' पुरस्कार मिळाला होता. दशरथ पुजारी यांचे १३ एप्रिल २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
दशरथ पुजारी यांची काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=1e1Pnb_v0co&list=PLfCW_Yd-eqbARk1Aa5-yi6OPFjYDLvA62&index=1
https://www.youtube.com/watch?v=oE7ol4Zvlyo
https://www.youtube.com/watch?v=-zV-It-mW9A
https://www.youtube.com/watch?v=ZUu6bM9ldWc
महान धावपटू फ्लाइंगसीख मिल्खासिंग यांचा जन्म २० नोव्हेंबर १९२९ रोजी झाला.
मिल्खा सिंग यांचा जन्म गोविंदपुरा स्थित शीख कुटुंबात झाला होता. मिल्खा सिंग यांनी आपल्या जीवनात ८० शर्यतीत भाग घेतला. त्यात ते ७७ वेळेस विजयी झाले. तीन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. १९५८ मधील कार्डिफ राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये मिल्खा सिंग यांनी 400 मीटरच्या शर्यतीत गोल्ड मेडल मिळवलं होतं. पण त्यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली १९६० च्या रोम ओलिम्पिक स्पर्धेमुळे. त्या स्पर्धेत ४०० मीटरच्या शर्यतीत अगदीच सूक्ष्म फरकानं त्यांचं कांस्यपदक चुकलं होतं.
रोम ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंग यांनी ४०० मीटर शर्यत ४५.७३ सेकंदांमध्ये पूर्ण केली होती. जर्मनीचा धावपटू कार्ल कूफमॅनपेक्षा ते सेकंदाच्या १०० व्या भाग एवढ्या कमी फरकानं मागं राहिले होते. पण त्यांनी शर्यत पूर्ण केलेली ही वेळ त्यानंतर पुढचे ४० वर्षं राष्ट्रीय विक्रम म्हणून कायम होती.मिल्खा कॉमनवेल्थ खेळात वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू होते.१९५८ च्या टोकियो इथं झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये मिल्खा सिंग यांनी २०० मीटर आणि ४०० मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकलं होतं. तर १९६२ च्या जकार्ता आशियाई स्पर्धांमध्ये ४०० मीटर आणि ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीतही सुवर्ण पदक जिंकलं होतं.
लष्करात जाण्याची मिल्खा सिंग यांची खूप इच्छा होती. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला; मात्र तीन वेळा त्यांना अपयश आले. त्यामुळे त्यांनी लष्करात जाण्याचा विचार सोडला. मिल्खा सिंग यांना 'फ्लाइंग सीख' हे नाव पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आयुब खान यांनी १९६० मध्ये दिले होते. त्या वेळी मिल्खा यांनी पाकिस्तानचा सुवर्णपदक विजेता अब्दुल खालिकला पाकिस्तानातच हरवले होते. मिल्खा सिंगच्या आई-वडिलांचा मृत्यू फाळणीदरम्यानच्या दंगलीमध्ये झाला. मिल्खा यांचे लग्न भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार निर्मल कौरसोबत झाले. मिल्खा सिंग यांची पत्नी देखील एक खेळाडू होती. हे अनेक जणांना माहीत ही नसेल कदाचित. दोन महान खेळाडूंच्या मृत्यूमुळे क्रीडा जगतात शोककळा पसरली आहे. मिल्खा सिंह आणि त्यांची पत्नी निर्मला कौर यांची लव्हस्टोरी वेगळी आहे. मिल्खा सिंह हे पहिल्या नजरेतच निर्मला यांच्या प्रेमात पडले होते.
मिल्खा सिंग आणि निर्मला कौर यांची पहिली नजर ही खेळाच्या मैदानावरच भिडली. तिथूनच त्यांच्या प्रेमाची गोष्ट सुरू झाली. मिल्खा सिंग यांचं अनेक मुलींसोबतच्या अफेअरच्या चर्चाही गाजल्या होत्या. एक दोन नव्हे तर तीन मुलींसोबत मिल्खा सिंह यांचं नाव जोडलं गेलं होतं. या मुलींसोबत प्रेमाचे किस्सेही चांगलेच रंगले होते. मात्र मिल्खा यांचा जीव जडला तो मैदानावरच्या हॉलीबॉल खेळणाऱ्या राणीवर.
1955 मध्ये श्रीलंकेमध्ये मिल्खा सिंग आणि निर्मला कौर पहिली भेट झाली होती. याच ठिकाणी दोघांची एकमेकांशी ओळखही झाली. मिल्खा सिंग यांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, ते पहिल्याच भेटीत निर्मला कौर यांच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी कागद नसल्यानं निर्मला कौर यांच्या हातावर रुम नंबर लिहिला असल्याचा किस्साही फार गाजला आहे.
पहिल्या भेटीनंतर 1958 मध्ये दोघांची भेट पुन्हा एकदा झाली. 1960 मध्ये दोघांची भेट पुन्हा एकदा दिल्लीतील नॅशनल स्टेडियममध्ये झाली. तेव्हा मिल्खा सिंग खेळातील मोठं नाव बनलं होतं. या काळात कॉफीसाठी एकत्र येताना त्यांचं प्रेम वाढत गेलं.
दरम्यान या दोघांच्याही लग्नासाठी निर्मला कौर यांच्या घरातून मात्र विरोध होता. मिल्खा सिंग शिख असल्याने निर्मला कौर यांचे वडील दोघांच्या लग्नासाठी तयार नव्हते. त्यामुळे लग्नाच्या मार्गात अडथळा येत होता. अशावेळी पंजाबच्या तत्कालीन मुख्यमंत्री प्रताप सिंह कैरो यांना मध्यस्थी करावी लागली होती.
१९६२ मध्ये मिल्खा आणि निर्मला या दोघांचं लग्न झालं. मिल्खा सिंग यांनी अनेकदा आपल्या पत्नीचे जाहीरपणे कौतुक केलं केलं होतं. ते आपल्या बायकोला स्वतःची सर्वात मोठी ताकद मानत असत.
त्यांचा मुलगा जीव सिंग गोल्फचा प्रसिद्ध खेळाडू आहे. भारत सरकारने त्यांना अर्जून पुरस्कार आणि ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
भाग 'मिल्खा भाग मिल्खा' हा चित्रपट मिल्खा सिंग यांच्या १९४६ ते १९६० पर्यंतच्या जीवनावर आधारित बायोपिक आहे. यात फरहान अख्तर यांनी मिल्खा सिंग यांचा अभिनय केला आहे. या वयात ही मिल्खा सिंग हे देशातल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करत असत. यासाठी सरकारनंही त्यांना मदतीचा हात दिला होता. मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांचं १३ जून २०२१ कोरोनामुळं निधन झाले होते.
मिल्खा सिंग यांचे १८ जून २०२१ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
विलायत हुसेनखांच्या बंदिशींचे सौंदर्य’ या विषयावर कशाळकरांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाकडून संगीताचार्य ही डॉक्टरेट समकक्ष पदवी मिळवली आहे.
पराडकर कुटुंब हे मूळचे कोकण येथील सौंदळ गावचे. मोरोपंताचे पणजे रामजीपंत हे नौकरीच्या निमित्ताने कोकणातून पन्हाळगडावर येऊन राहिले. रामजीपंताचे नातू रामचंद्रपंत हे मोरोपंताचे वडील. ते कोल्हापूरच्या छत्रपतींच्या पदरी नोकरीस होते. मोरोपंताचे बालपण तिथेच गेले.
१९५३ पर्यंत मॅगसेसे यांनी राबवलेली ‘अँटी गोरीला’ मोहीम ही आधुनिक इतिहासातल्या सर्वांत यशस्वी मोहिमांपैकी एक मानली जाते. सर्वसामान्यांचा पाठिंबा नसेल तर हुक चळवळ टिकणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर लष्कराने सामान्यांना सन्मानाने वागवावं असं सांगतं तसंच गरीब शेतकऱ्यांना जमीन आणि अवजारं देऊ करत, त्यांना सरकारच्या बाजूला वळवून घेतलं.
Copyright © 2025 | Marathisrushti