(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कवि मा.मंगेश पाडगावकर

    कवि मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झाला. शाळेत असल्यापासूनच मराठीवर त्यांचं प्रेम जडलं आणि वयाच्या १४ व्या वर्षापासूनच ते कविता करू लागले. कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज आणि बा. भ. बोरकर यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. परंतु, पाडगावकर एका साच्यात कधीच अडकले नाहीत. त्यांनी स्वतःची शैली निर्माण करून मराठी साहित्यात आणि रसिकांच्या मनात वेगळं स्थान मिळवलं. स्वतः प्रेमळ व्यक्ती, प्रेमळ प्राध्यापक असल्यानं प्रेमकवितेवर त्यांचं विशेष प्रेम होतं. पण, भावगीतं, बालकविता, निसर्गकविता, चिंतनशील कविताही त्यांनी तितक्याच प्रभावीपणे केल्या होत्या. त्या सादर करण्याची त्यांची पद्धत तर अफलातून होती. पाडगावकर, विंदा करंदीकर आणि वसंत बापट या त्रयीनं ठिकठिकाणी काव्यवाचनाचे कार्यक्रम करून राज्याच्या कानाकोपऱ्यातील वाचकांना कवितेची गोडी लावली. सहजसोप्या शब्दांतून व्यक्त होणारे बोल आणि ओठांवर सहज रुळणाऱ्या कविता पाडगावकरांनी दिल्या. मंगेश पाडगांवकरांची कविता-गीतं म्हणजे मोगऱ्याची टपोरी फुलं. नियतीने पाडगांवकरांच्या प्रतिभेला कधीही धोका दिला नाही. त्यांचा हात सतत लिहिता ठेवला. आपल्या कवितेतली, गीतांतली आशयघनता सातत्याने टिकवलेला हा श्रेष्ठ कवी! त्यातल्या अनेक कवितांची गाणी झाल्यानं साहित्यासोबतच संगीत क्षेत्रातील मा.पाडगावकरांचं योगदानही मोठं आहे.

    पाडगावकरांनी या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे' असं म्हणत मराठी रसिकांना प्रेम करायला शिकवले, जगण्याचं बळ देणारे... 'अशी पाखरे येती, आणिक स्मृति ठेवुनी जाती', अशा सहजसोप्या शब्दांत जीवनाचं सार सांगीतले.

    ते आपल्या कवीतांनी तरुणाईला प्रेमात पाडत असत. 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं', असं म्हणणारे 'पाडगावकर आजोबा' कॉलेजमधल्या मुला-मुलींचे मित्रच होऊन जायचे. भावकविता, भावगीते, बालगीते, संगीतीका, नाटय़काव्य, गझल, वात्रटिका, सामाजिक उपरोधपर कविता, बोलगाणी आणि विडंबन अशा विविध साहित्य प्रकारातून मा.पाडगावकरांनी वाचकांना समृध्द केले.

    पाडगांवकर यांनी ‘कधी बहर, कधी शिशिर, परंतु दोन्ही एक बहाणे. या त्यांच्या गीताच्या ध्वनिमुद्रणाची सांगीतलेली आठवण. ‘सुधीर फडक्यांनी केलेले शब्दांचे उच्चार ही एक थरारून टाकणारी गोष्ट होती. शब्द माझेच होते. त्यामुळे मला तरी त्या शब्दांचं नावीन्य नव्हतं. पण सुधीर फडक्यांच्या आवाजात ते ऐकताना माझेच शब्द आता मला नव्याने भेटत होते. ‘बहर धुंद वेलीवत यावा’ या ओळीतील ‘बहर’ आणि ‘धुंद’ या शब्दांतून व्यक्त होणारी तारुण्यातल्या फुलण्याची धुंदी.. ‘हळूच लाजरा पक्षी गावा’ या ओळीतील पक्ष्याच्या गाण्यातून व्यक्त होणारं कोणाचंतरी ते कोवळं लाजरेपण.. ‘आणि अचानक गळून पडावी विखरून सगळी पानं’ या ओळीतील निराशा आणि आधीच्या दोन ओळींतील विरोधाचं नातं- हे सारं सुधीर फडके इतक्या विलक्षण उत्कटतेनं प्रकट करत होते, की त्यांच्या गायनातून माझी कविता नव्याने जन्म घेत आहे असं मला वाटलं.

    मंगेश पाडगावकरांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. 'सलाम' या काव्यसंग्रहासाठी त्यांना १९८० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. महाराष्ट्रातील दर्दी रसिकांच्या मनात स्थान मिळवलेल्या पाडगावकरांना २००८ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर, २०१३ मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं त्यांचा गौरव करण्यात आला होता. २०१० मध्ये दुबईत झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र टाइम्सनंही पाडगावकरांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं गौरवलं होतं. मंगेश पाडगावकर यांचे ३० डिसेंबर २०१५ रोजी निधन झालं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • संवेदनशील कवी सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ ’कैफी आझमी’

    उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील मिजवां येथे एका जमीनदाराच्या घरी कैफी आझमी यांचा १४ जानेवारी १९१९ रोजी जन्म झाला. नातेवाईकांच्या हट्टामुळे धार्मिक शिक्षणासाठी लखनौच्या सुलतान-अल-मदरिस मध्ये दाखल व्हावे लागलेल्या कैफी यांना त्याच्या बंडखोर स्वभावामुळे तिथून हाकलून देण्यात आले. ते अत्यंत संवेदनशील होते. लहानपणापासूनच जो माणूस अलम दुनियेतील दु:खे संपवणा-यांच्या गटात सामील झाला, सर्वांच्या दु:खाला आपल्या गीतांमधून ज्याने शक्ती दिली आणि न्यायाच्या लढाईत ज्याची गाणी पुढच्या रांगेत असत, तो स्वत:चे दु:ख कधीही व्यक्त करीत नसे. मा.कैफी आझमी फार मोठे कवी होते. आपल्या भावाची गझल पूर्ण करण्यासाठी त्यांनी १२ व्या वर्षी जी गझल लिहिली ती अमर झाली. नंतर तीच गझल बेगम अख्तर यांनी गायिली. ‘इतना तो जिंदगी में किसी की खलल पडे, हंसने से हो सुकून न रोने से कल पडे’.

    कैफी आझमी यांचे नशीब म्हणजे त्यांना मित्र फारच चांगले मिळाले. मुंबईत इप्टाच्या दिवसांतील त्यांचे मित्र नंतर नावाजलेले कलावंत म्हणून ओळखले जाऊ लागले. इप्टामध्येच होमी भाभा, किशन चंदर, मजरूह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, बलराज साहनी, मोहन सहगल, मुल्कराज आनंद, रोमेश थापर, शैलेंद्र, प्रेम धवन, इस्मत चुगताई, ए. के. हंगल, हेमंतकुमार, अदी मर्झबान, सलिल चौधरींसारख्या कम्युनिस्टांसोबत त्यांनी काम केले. ते एकदा असेच हैदराबादला गेले असताना ‘यूँही कोई मिल गया था चलते चलते’ असे काहीसे त्यांच्या बाबतीत घडले. ज्या मुलीच्या प्रेमात ते पडले होते ती मुलगी म्हणजेच उदारमतवादी याह्या खान यांची कन्या शौकत.

    शौकत यांनी कैफींना पसंत करण्याचे कारण म्हणजे कैफी विख्यात शायर होते. प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनचे संस्थापक सज्जाद जहीर यांच्या ड्रॉइंग रूममध्ये त्यांचे लग्न लागले होते. १९४६ मध्ये क्रांतिकारी विचारसरणीच्या शौकत यांनी आईच्या मर्जीविरुद्ध आपल्या पुरोगामी वडिलांसोबत औरंगाबादहून मुंबईला येऊन कैफी यांच्याशी लग्न केले होते. त्यांच्या निकाहच्या वेळी काझीने शौकतजींना विचारले, ‘‘तुला हे लग्न कबूल आहे?’’ तिने ‘हो’ म्हटले. पण पंचाईत पुढे आली. मुलगा शिया अन् मुलगी सुन्नी पंथाचा. असे लग्न असेल, तर तिथे दोन्ही काझी आवश्यक असतात. त्याकाळी ते परिस्थितीने गरीब होते. त्यांनी कसाबसा एक काझी आणला होता. दुसर्या् काझीला द्यायला पैसे नव्हते. तेव्हा काझीने मुलाचा धर्म विचारताच मित्राने सांगितले, ‘‘मुलगा हनफियुल (म्हणजे इमाम अबू हनाफी यांचे जे अनुयायी आहेत, त्यांच्या पंथाचा) आहे.’’ या युक्तीवादाच्या जोरावर लग्न पार पडले. लग्नानंतर कैफींनी ब-याच खस्ता खाल्ल्या. ते गावी गेले. तिथे त्यांच्या मुलाचा जन्म झाला. त्यांचा पहिला मुलगा ‘खय्याम’ एक वर्षाचा होऊन वारला. नंतर ते मुंबईला गेले.

    सुरुवातीलाही ते लखनऊला राहिले होते. धार्मिक शिक्षण घेण्यासाठी ते गेले होते; पण न्यायासाठी लढा सुरू केल्याने त्यांना हाकलून देण्यात आले. त्यांची मुलगी शबाना पोटात होती तेव्हा कम्युनिस्ट पक्षाने आदेश दिला की, गर्भपात करा. कैफी भूमिगत होते आणि पक्षाला मुलाबाळांच्या खर्चाची चिंता होती. शौकत कैफी आपल्या आईकडे हैदराबादला गेल्या. तेथेच मुलगी शबाना आझमी यांचा जन्म झाला. नंतर त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव अहमद ऊर्फ बाबा.

    शबाना आझमी यांच्या यशात कैफींचा फार मोठा वाटा आहे.
    शबाना आझमीने आपले वडील कैफी आझमी यांच्या कवितांना समर्पित एका वेबसाइटची निर्मिती केली आहे.
    http://www.azmikaifi.com
    या वेबसाइटवर कैफी आझमी यांनी लिहिलेली गाणी आणि कविता ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरुपात उपलब्ध आहेत. त्याशिवाय येथे व्हिडिओ, त्यांनी लिहिलेल्या कविता आणि गाण्यांबरोबरच त्यांच्या विषयीची माहितीदेखील पुरविण्यात आली आहे. विसाव्या शतकातील अनेक उत्कृष्ट चित्रपट कैफींच्या नावाने ओळखले जातात. ‘हीर रांझा’मध्ये चेतन आनंदने सर्व संवाद कवितेच्या रूपात सादर करण्याची इच्छा व्यक्त केली आणि कैफी यांनी ते संवाद लिहिले. प्रियाऐवजी कुणी दुसरी नायिका असती तर राजकुमारला हा चित्रपट कुठवर घेऊन गेला असता सांगता येत नाही. सर्वोत्कृष्ट युद्धपट ‘हकीकत’ हाही कैफींचा चित्रपट. ‘गर्म हवा’, ‘कागज के फूल’, ‘मंथन’, ‘कोहरा’, ‘सात हिंदुस्तानी’, ‘बावर्ची’, ‘पाकीजा’, ‘हंसते जख्म’, ‘अर्थ’, ‘रजिया सुलतान’, असे चित्रपट कैफींमुळे अजरामर झाले.

    कैफी यांनी जास्ती गाणी लिहीली नाहीत पण जी लिहीली ती काळजाचा ठाव घेणारी ठरली. त्यातला अर्थपूर्ण आशय रसिकांच्या मनाला अलगद स्पर्श करणारा होता. 'चलते-चलते यूँ ही कोई मिल गया था' (पाकिजा), 'वक्त ने किया क्या हसीं सितम' (कागज के फूल), 'तुम बिन जीवन कैसा जीवन'(बावर्ची), 'तुम जो मिल गए हो तो ये लगता है...' (हंसते जख्म), 'कुछ दिल ने कहा, कुछ भी नहीं' (अनुपमा), 'इक जुर्म करके हमने चाहा था मुस्कुराना' (शमा), 'जीत ही लेंगे बाजी हम तुम' (शोला और शबनम), 'ये नयन डरे डरे' (कोहरा), 'सारा मोरा कजरा चुराया तूने'(दो दिल), 'बहारों...मेरा जीवन भी सँवारो'(आखिरी खत), 'धीरे-धीरे मचल ए दिल-ए-बेकरार' (अनुपमा), 'या दिल की सुनो दुनिया वालों' (अनुपमा), 'मिलो न तुम तो हम घबराए' (हीर-रांझा), 'ये दुनिया ये महफिल' (हीर-रांझा), 'जरा सी आहट होती है तो दिल पूछता है' (हकीकत) ही त्यांची काही लोकप्रिय चित्रपट गीते होत... १९८० च्या दशकात कैफी आझमींनी 'अर्थ' चित्रपटासाठी अतिशय आशयसंपन्न गीते लिहिली 'झुकी झुकी सी नजर करार है की नही, दबा दबा सा सही, दिल में प्यार है की नही' 'कोई ये कैसे बतायें की वो तनहा क्यों है' आणि तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो'.

    भारत सरकार ने १९७४ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सम्मानित केले होते. मा.कैफी आझमी यांचे निधन १० मे २००२ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • चित्रपट अभ्यासक आणि सिने पत्रकार धनंजय कुलकर्णी

    धनंजय कुलकर्णी हे सकाळ, लोकसत्ता, पुढारी, लोकमत सोबतच प्रीमियर, तारांगण या अंकातून चित्रपट विषयी स्तंभ लेखन करीत असतात. त्यांनी पुण्यातील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्र संचालन व निवेदन केले आहे. तसेच खाजगी रेडिओ एफ. एम. वर अनेक चित्रपट विषयक कार्य क्रमाचे सादरीकरण केले आहे.चित्रपट विषयक अनेक वेब पोर्टल वर ते लिखाण करीत असतात.

  • इतिहास संशोधक डॉ.पांडुरंग पिसुर्लेकर

    पिसुर्लेकरांनी या अभिलेखागाराखालील दप्तरखाना सुधारला; त्यातील कागदपत्रे खंडवार लावली आणि त्यासंबंधी सूची व दोन मार्गदर्शिका प्रसिध्द केल्या. गोवा स्वतंत्र झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने पणजी येथे इतिहास संशोधनकेंद्र स्थापन केले. त्याचे संचालकपद पिसुर्लेकरांकडे होते. गोमांतकातील पहिले हिंदू इतिहास संशोधक असणारे डॉ. पिसुर्लेकर पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेली सर्व ऐतिहासिक कागदपत्रे भारतीय पुराभिलेखागारात आणण्यासाठी आयुष्यभर झटले. पोर्तुगीज दफ्तरातील साडेचारशे वर्षातील सर्व कागदपत्रे अभ्यासून त्यांनी ‘पोर्तुगीज मराठे संबंध’ हा अप्रतिम साधनग्रंथ लिहिला.

  • राजन विचारे

    राजन विचारे हे ठाण्यामधील सुपरिचित राजकीय व्यक्तिमत्व. ठाणे शहर मतदारसंघातून ते २०१४ साली लोकसभेवर निवडून गेले. त्यापूर्वी ते ठाणे शहराचे आमदारही होते.

    ठाणे शहराचे महापौरपद भुषवित असताना त्यांनी सॅटिससारखा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारून ठाणे स्टेशन परिसरामधील वाह्तुकीची कोंडी दुर केली होती. तसेच शहरासाठी ११० एम. एल. डी. पाणी पुरवठा योजना राबवून पाणी कपातीचा प्रश्न सोडविण्याचा अनोखा प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे त्यांनी कापूरबावडी येथील कलादालन तसेच मानपाडा येथील नाटयगृहाची बांधणी करून त्यांनी पर्यटनाच्यादृष्टीनेदेखील ठाणे नगरीला नवा आयाम देण्याचा दमदार प्रयास केला होता.

    आमदार झाल्यानंतर अधिवेशनांमध्ये ठाण्याच्या विकासाचे विवीध प्रश्न विधीमंडळामध्ये उपस्थित करून जनतेच्या समस्यांना वाचा फोडली. गावदेवी मंडईचा गेली १४ वर्षे रखडलेला प्रश्न त्यांच्या पुढाकारामुळे अधिवेशनामध्ये मांडला गेला होता.

    शहरातील स्थानिक लोकांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता ठाण्यामध्येच मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यासाठी सरकारमागे तगादा लावणे, शहर्‍यातील प्रचंड कचर्‍याची विल्हेवाट लाविण्याकरिता भरावभूमी चा आग्रह धरणे, शहरातील नागरिकांना बेस्टची सुविधा मिळावी यासाठी पवारनगर ते शिवाजीनगर, वाघबीळ ते सिप्झ, दादलानी पार्क ते अंधेरी अशा गर्दींच्या ठिकाणांवर बस सेवा सुरू करून देणे, अशी कित्येक कल्याणकारी कामे त्यांनी आजवर केली आहेत.

    सांस्कृतिक कार्यक्रमांचे ठाण्यामधील विविध ठिकाणी आयोजन करून, त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रणे देवून, व उपयुक्त संवादसत्रे घेवून मराठी संस्कृतीची काहीशी भुसभुशीत झालेली मुळे, पुन्हा रूजविण्याचे कार्य ते आजही अतिव उत्साहाने करित असतात. महादहीहंडी महोत्सव, तसेच चैत्र महिन्यामध्ये सामुहिक चैत्रोत्सव व नवरात्रोत्सव साजरा करण्याचा पायंडा, ते महापौर असतानाच पाडला गेला.

    ठाणे परिसरातील पर्यटन विकासाकरिता ठाणे शहरालगत पसरलेल्या खाडीमध्ये, कल्याण ठाणे व बेलापुर या प्रदीर्घ पट्टयादरम्यान जलमार्ग विकसीत करून जलवाहतुकीसाठी या खाडीचा वापर करण्याचा प्रस्ताव त्यांनी सरकारसमोर मांडला आहे. तसेच मेट्रो रेल्वेचा बहिउद्देशीय प्रकल्प ठाण्यापर्यंत वाढवण्याची मागणी सुध्दा ते रेल्वे प्राधिकरणाकडे करीत आहेत.

  • संगीतकार अशोक पत्की जिंगल्सचा राजा

    पूर्वी एक जिंगल तयार व्हायला चार ते पाच तास लागत. माझ्या बाबतीत सांगायचं तर दोन तासांत दोन जिंगल्स तयार करून मी पुन्हा तिसऱ्या कामासाठी दुसऱ्या स्टुडिओत जायचो. एक काळ असा होता की, सकाळी रेडिओवाणीला (वरळी) ८ ते १० मध्ये दोन जिंगल्स, मग १० ते ६ वेस्टर्न आऊटडोअर (फाऊंटन), पुन्हा संध्याकाळी ६ ते १० दोन जिंगल्स (रेडिओवाणी किंवा रेडिओ जेम्स- वरळी) आणि रात्री १० ते २ बॉम्बे लॅब किंवा फिल्म सेंटरला फिल्मची जिंगल्स मी करत असे आणि पहाटे तीन वाजता घरी जात असे. आणि पुन्हा सकाळी साडेसहाला उठून आठ वाजता रेडिओवाणीला हजर!

    अशोक पत्की यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    http://www.marathisrushti.com/articles/ashok-patki-jingles-king/

    # Patki, Ashok

  • नंदकिशोर कलगुटकर

    नंदकिशोर कलगुटकर हे अनेक मराठी चित्रपटांचे प्रसिद्धीप्रमुख होते. कलगुटकर यांनी विशेषतः दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, रामराम गंगाराम, मुका घ्या मुका, सासरचं धोतर आदी मराठी आणि तेरे मेरे बीच में, आगे की सोच अशा हिंदी चित्रपटांचे प्रसिद्धीप्रमुख म्हणून काम पाहिले.

  • पहिल्या महिला कुलगुरू हंसा मेहता

    पहिल्या महिला कुलगुरू हंसा मेहता यांचा जन्म ३ जुलै १८९७ रोजी गुजरात येथे झाला.

    हंसा मेहता या भारतातील एक समाजसुधारक, स्वतंत्र सेनानी, स्त्री-हक्काच्या पुरस्कर्त्या आणि शिक्षणतज्ञ होत्या. हंसा मेहता यांचे वडील मनुभाई मेहता हे बडोदा संस्थानचे दिवाण होते. त्यांचे आजोबा नंदशंकर मेहता हे गुजराती भाषेतील पहिले कादंबरी लेखक होते. हंसा मेहता यांनी इंग्लंडला जाऊन समाजशास्त्र आणि पत्रकारितेतील उच्चशिक्षण घेतले. १९४१ ते १९५८ पर्यंत त्या बडोदा विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरही कार्यरत होत्या. इंग्लंडहून उच्च शिक्षण घेऊन परतल्यानंतर सरोजिनी नायडू यांनी त्यांची महत्मा गांधींशी भेट घालून दिली. महात्मा गांधी त्यावेळी गुजरातच्या साबरमती जेलमध्ये होते. या भेटीनंतर हंसा मेहता यांच्या जीवनात अभूतपूर्व बदल घडून आला. याच भेटीनंतर त्या स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय झाल्या. विदेशी वस्तूंवर बहिष्कार आणि दारूबंदीसारख्या चळवळीत त्या अग्रभागी राहून नेतृत्व करत होत्या. १९२४ साली त्यांनी जीवराज नारायण मेहता यांच्याशी विवाह केला. त्या नागर ब्राह्मण कुटुंबातील होत्या आणि जीवराज मेहता हे वैश्य मेहता होते. त्याकाळी त्यांच्या या आंतरजातीय विवाहाला कुटुंबीयांनी विरोध केला. पण, स्वतः बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनी यात हस्तक्षेप करत त्यांच्या घरच्यांची नाराजी दूर केली. जीवराज मेहता पुढे स्वतंत्र भारतातील गुजरात राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले. त्यांच्या वैवाहिक जीवनामुळे त्यांच्या समाजिक आणि राजकीय कामात कोणतेही अडथळे निर्माण झाले नाहीत. विवाहानंतर दोघेही मुंबईमध्ये वास्तव्य करू लागले. यामुळे स्वातंत्र्य लढ्यात आणि राजकीय चळवळीतील त्यांच्या सहभाग आणखीन वाढला. १९३२ साली हंसा मेहता आणि त्यांचे पती जीवराज मेहता दोघांनाही ब्रिटिशांनी अटक केली. डॉ. जीवराज मेहता हे राजकारणात फारसे सक्रीय नव्हते तरीही केवळ हंसा मेहता यांना पाठींबा दिल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली. तुरुंगातून सुटून आल्यानंतर त्या राजकारणात अधिक सक्रियतेने सहभागी झाल्या. प्रांतीय स्वायत्ततेच्या कायद्यामुळे त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. मुंबई विधानसभा मंडळातून त्या पहिल्या प्रांतीय निवडणुकीत उतरल्या आणि निवडून देखील आल्या. भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या संविधान सभेतही त्यांची निवड करण्यात आली होती. भारतीय संविधान मंडळावर निवड होण्यापूर्वी त्यांनी अखिल भारतीय महिला संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्यांनी स्त्रियांचे अधिकार आणि त्यांच्या हक्काबाबतचा एक चार्टर देखील मांडला होता. १९४५ ते १९६० पर्यंत त्यांनी भारतातील विविध संस्थावरती महत्वपूर्ण पदे भूषवली. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या देखील त्या कुलगुरू होत्या. अखिल भारतीय माध्यमिक शिक्षा मंडळाच्या सदस्य होत्या. इंटर युनिव्हर्सिटी बोर्ड ऑफ इंडियाचेही अध्यक्षपद त्यांनी भूषवले.
    हंसा मेहता गुजराती भाषेतील एक अग्रणी साहित्यिक देखील होत्या. गुजराती भाषेतून त्यांनी लहान मुलांसाठी अनेक पुस्तके लिहिली. गुलीव्हर्स ट्रॅव्हल सारख्या इंग्रजी कादंबरीच्या अनुवादही त्यांनी केला. शेक्सपिअरची काही नाटके देखील त्यांनी गुजरातीत आणली.

    भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार आयोगावर हंसा मेहता यांची नेमणूक केली होती. या मानवाधिकार घोषणेच्या पहिल्या कलमात हंसा मेहता यांनी एक दुरुस्ती केली. मानवाधिकाराच्या जाहीरनाम्यातील पहिल्या कलमात “सर्व पुरुष समान दर्जाचे आणि स्वतंत्र आहेत” असा उल्लेख करण्यात आला होता. पण, हंसा यांनी पुरुष या शब्दाऐवजी मनुष्य या शब्दाची दुरुस्ती सुचवली. त्यांच्या सूचनेनुसार पहिल्या कलमात, “सर्व स्त्री-पुरुष समान दर्जाचे आणि स्वतंत्र आहेत.” अशी दुरुस्ती करण्यात आली.

    त्यांच्या या एका छोट्याशा दुरुस्तीमुळे जगभरातील लोकशाही आणि सार्वभौम राष्ट्रांसाठी आदर्शवत ठरलेल्या या जाहीरनाम्याने लैंगिक समानतेचा पायंडा घालून दिला. म्हणूनच त्यांनी सुचवलेली ही दुरुस्ती छोटीशी असली तरी, तितकीच महत्वपूर्ण होती, हे नाकारता येत नाही.

    हंसा मेहता यांनी ही दुरुस्ती सुचवली नसती तर, मानवाधिकार हे फक्त पुरुषांपुरतेच मर्यादित राहिले असते आणि जगभरातील असंख्य स्त्रिया मानवाधिकाराच्या हक्कांपासून वंचित राहिल्या असत्या. म्हणूनच त्यांनी सुचवलेली ही दुरुस्ती अतिशय महत्वपूर्ण आहे.

    १९४६ ते १९४९ या काळात भारतीय संविधान मंडळाच्या बैठकीत लैंगिक समानतेच्या अनुषंगाने ज्या काही चर्चा आणि सल्लामसलती व्हायच्या त्यातही हंसा मेहता यांनी आपले योगदान दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलाला देखील त्यांच्या पाठींबा होता. हिंदू कोड बिलाचा मसुदा तयार करताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत देखील काम केले होते. महिलांना वडिलोपार्जित संपत्तीत वारसा हक्क मिळावा यासाठी त्यांनी समर्थन दर्शवले.

    १९ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभेत दिलेल्या आपल्या भाषणात त्या म्हणाल्या होत्या, “मी ज्या महिला संघटनांशी संबधित आहे, त्यांनी कधीच राखीव जागा, कोटा किवा स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली नाही. आम्ही फक्त सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्यायाची अपेक्षा करत आहोत.” १९५९ मध्ये पद्मभूषण या भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले गेले.

    हंसा मेहता यांचे ४ एप्रिल १९९५ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • भारतीय बुद्धिबळ ग्रॅंडमास्टर अभिजीत कुंटे

    बुद्धिबळ खेळाचा विचार करता अभिजित यांनी गेली अनेक वर्षे महाराष्ट्राचा झेंडा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर सतत उच्चस्थानावर फडकवत ठेवला आहे. गेली अनेक वर्षे अभिजित जागतिक स्तरावर पहिल्या १५० बुद्धिबळपटूंत स्थान टिकवून आहेत.

  • एक प्रतिभावान दिग्दर्शक बिमल रॉय

    दो बिगा जमीन, देवदास, मधुमती, सुजाता आणि बंदिनी आदी चित्रपटांतून रसिकांच्या मनावर मोहिनी घालणारे हिंदी चित्रपट दिग्दर्शक म्हणजे बिमल रॉय. त्यांचा जन्म १२ जुलै १९०९ रोजी झाला. हिंदी चित्रपटसृष्टीत त्या काळात कधी शेतकऱयांची व्यथा, रहस्यमय, विरह, समाजव्यवस्था आदी विषय त्यांनी आपल्या चित्रपटातून हाताळले आणि आपली वेगळी छाप त्यांनी निर्माण केली. ते खास करून चित्रपटामध्ये सौदर्याचा वापर करून घेणार दिग्दर्शक म्हणून ओळखले जात. त्यांच्या चित्रपटातील प्रत्येक फ्रेम ही कलात्मक असायची. मा.बिमल रॉय यांच्या चित्रपटात संवेदनशील नातेसंबंध आणि समाजातील उपेक्षित वर्गांचे चित्रण असायचे. मा.बिमल रॉय यांनी एक तरुण फिल्ममेकर म्हणून त्याकाळी अनेकांना प्रेरणा दिली. गुलजार यांना मा.बिमल रॉय यांनी त्यांच्या "बंदिनी' या चित्रपटासाठी त्यांना संधी दिली आणि त्यांनी लिहिलेले "मोरा गोरा अंग लै ले..' हे नूतन यांच्यावर चित्रित झालेले गाणे सुपरहिट ठरले. बिमल रॉय स्वत:च एक चित्रपटाची शाळा होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
    बलराज सहानी यांची दो बिघा जमींन बद्दल एक आठवण सांगितली जाते.

    बलराज सहानी हे त्या काळातले एक उच्चविद्याभूषित होते. कलकत्त्यात ते तेव्हा प्राध्यापकी करत. इंग्लंडवरून शिकून आल्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व हे साहेबी होतं. बिमल रॉय हे चित्रपट बनवत असल्याचं त्यांना कळल्यानंतर ते त्यांना भेटायला गेले व आपल्याला या चित्रपटात भूमिका करायची आहे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. बिमल रॉय यांचं पात्र हे एका गरीब शेतक-याचं, एका रिक्षावाल्याचं होतं. बलराज सहानी यांना सुटाबुटात पाहून बिमल रॉय यांनी त्यांना ही भूमिका देण्याचं नाकारलं. बलराज सहानी यांनाही आपली चूक कळून आली. त्यानंतर या भूमिकेसाठीच्या पोषाखात त्यांनी वावरून त्या भूमिकेचा अभ्यास केला. इतकंच नव्हे तर आपल्या बायका-मुलांना घेऊन त्यांनी कलकत्त्यात काही काळ रिक्षा ओढण्याचाही सराव केला. या सा-या गोष्टीचा अभ्यास करून मग ते पुन्हा बिमल रॉय यांना भेटायला गेले. त्यांना त्या लुकमध्ये पाहिल्यावर मग बिमल रॉय यांनी त्यांना ही भूमिका देऊ केली. कलाकाराच्या प्रभावापुढे न झुकणारे असे ते दिग्दर्शक व आपल्या दिग्दर्शकाच्या समाधानासाठी प्रचंड कष्ट घेणारे ते कलाकार आता सापडणं मुश्कीलच.

    बिमल रॉय हे त्या काळातले एकमेव असे दिग्दर्शक होते ज्यांच्या घरी दिलीप कुमार स्वत: कथा ऐकायला येत असे. एरवी सर्वच दिग्दर्शकांना दिलीप कुमार आपल्या घरी बोलावत अस्त. बिमल रॉय यांनी मात्र कधीही फोन केला तर ते लागलीच त्यांच्या घरी येत असत. दिलीप कुमार यांच्या अभिनय कारकिर्दीतली सर्वात प्रभावी व्यक्तिरेखा म्हणजे देवदास हा चित्रपट होय असे दिलीप कुमार स्वत:च म्हणत आहे. भारतीय चित्रपट इतिहासात जे देदीप्यमान तारे चमकून गेले त्यामध्ये निर्माते-दिग्दर्शक बिमल रॉय यांचे स्थान अढळ आहे. रॉय यांच्या चित्रपटांना आजमितीस अनेक वर्षे लोटली तरी त्यातील आशय, कलात्मकता आणि सर्जनशीलता सामान्य रसिकांच्या हृदयाचा ठाव अजूनही घेत असतात. १९११ ते १९६६ या काळातील ‘उदयरे पथे’, ‘दो बीघा जमीन’, ‘परिणीता’, ‘बिराज बहू’, ‘देवदास’, ‘मधुमती’, ‘सुजाता’, ‘बंदिनी’, ‘परख’ आणि ‘बापबेटी’ अशी अनेक चित्ररत्ने रॉय यांच्या श्रेष्ठत्वाची जाणीव करून देतात. मा.बिमल रॉय यांचे ८ जानेवारी १९६६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    बिमल रॉय यांच्या काही कलाकृतीची माहिती
    दो बिघा जमींन
    साल:- १९५३
    या चित्रपटाची प्रेरणा त्यांना बायसिकल थिव्ह्स या चित्रपटावरून आली होती. एक अल्पभूधारक असा शेतकरी, त्याच्याकडे केवळ दोन बिघा जमीन असते. या गावात त्याला अनेक संकटांचा सामन करावा लागतो. याच गावातला एक सावकार एका मिल मालकाबरोबर मिळून या गावात एक मिल बनवण्यासाठी जमीन मिळवून देण्याचं कारस्थान करतो. त्याचाही त्रास या शेतक-याला होतो. या शेतक-याला आपल्या उदरनिर्वाहासाठी शहरात यावं लागतं. त्यानंतर त्याच्या आयुष्यात काय होतं. त्याच्या जमिनीचं काय होतं? याची कथा या चित्रपटातून पाहायला मिळते. बलराज सहानी व निरुपा रॉय यांच्या अभिनयासाठीही हा चित्रपट आठवणीत आहे. अगदी साधेपणाने कथा सांगण्याचं बिमलदांचं कौशल्यही या चित्रपटातून पाहायला मिळतं. त्या काळात या चित्रपटाने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले होते.

    देवदास
    साल:-१९५५
    शरदचंद्र चटोपाध्याय यांच्या देवदास या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची निर्मिती बिमल रॉय यांनी केली. आपल्या लहानपणीच्या प्रेमासाठी नंतर दारूच्या आहारी गेलेल्या व स्वत:च्या जीवनाचा नाश केलेला नायक या चित्रपटातून दाखवण्यात आला आहे. दिलीप कुमार, वैजंयती माला व सुचित्रा सेन यांच्या विलक्षण अभिनयासाठीही हा चित्रपट ओळखला जातो. एक ठाकूर आपल्या जीवनाचं कशा प्रकारे पतन करून घेतो हे या चित्रपटातून दाखवण्यात आलं असलं तरी समाज व व्यक्तिस्वातंत्र्य या महत्त्वाच्या गोष्टीकडेही हा चित्रपट लक्ष वेधतो. आपल्या विलक्षण शैलीच्या जोरावर बिलदांच्या या चित्रपटालाही अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. याच चित्रपटाचा रिमेक नंतर शाहरुख खान याला घेऊन संजय लीला भन्साली यांनी केला होता.

    मधुमती
    साल:-१९५८
    या चित्रपटात एका पुनर्जन्मावरच्या प्रेमावरची कथा सांगण्यात आली होती. एका निर्जन जागी गेलेल्या एका इंजिनीअरला आपल्या पुनर्जन्माच्या प्रेमाची कथा आठवते व त्यानंतर त्यांच्या जीवनात काय काय उलथापालथी होतात हे या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. फ्लॅशबॅक व वर्तमानाचा सुरेख वापर करून मांडण्यात आलेली ही कथा लोकांना चांगलीच भावली होती. या चित्रपटाबरोबरच या चित्रपटातली गाणीही गाजली. तब्बल बारा गाण्यांचा या चित्रपटात समावेश होता. ही गाणी आजही तितकीच अवीट गोडीची आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांनी, समीक्षकांनी व पुरस्कारांनीही गौरवण्यात आले होते. शाहरुख खानने नंतर याच चित्रपटावर आधारित ओम शांती ओम या चित्रपटाची निर्मिती केली होती. तोही प्रचंड यशस्वी ठरला होता.

    सुजाता
    साल:-१९५९
    जातीप्रथेच्या संदर्भात अनेक माध्यमातून चर्चा होत असते. असे असले तरी भारतात ती एक मोठी समस्या आहे. याच विषयावर आधारित चित्रपटाची निर्मिती बिमलदांनी केली होती. एका ब्राह्मण मुलाचे दुस-या जातीतल्या मुलीशी प्रेम होते. त्यानंतर समाज त्यांच्या या प्रेमाकडे कसा पाहतो. त्यांच्यापुढे कोण कोणती आव्हानं येतात हे या चित्रपटातून दाखवण्यात आले होते. या चित्रपटातल्या नूतन यांच्या जबरदस्त अशा अभिनयामुळेही हा चित्रपट गाजला होता.

    बंदिनी
    सर्वसामान्य भारतीय स्त्रीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात दिल्या गेलेल्या योगदानाची कथा या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून नूतन यांचा दमदार अभिनय लोकांपुढे आला. अशोक कुमार व त्या वेळी नवोदित असलेल्या धर्मेद्र यानेही यात चांगली भूमिका केली होती. संपूर्णपणे स्त्रीप्रधान असलेला हा चित्रपट त्या काळातला एक क्रांतिकारी चित्रपट म्हणून गणला गेला. या चित्रपटानेही प्रचंड यश मिळवले. बिमलदा यांचे चित्रपट पाहून त्याकाळी भारतीय चित्रपटांची उंची किती होती हे दाखवणारे आहेत. आज जागतिक सिनेमाचं कौतुक करणाऱ्यांनाही हे चित्रपट आपलेसे वाटतील यात शंका नाही.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट