(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • प्रतिभावंत गायक कुमार गंधर्व

    कुमार गंधर्व यांचा बेळगावजवळच्या सुळेभावी खेड्यात कानडी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म ८ एप्रिल १९२४ रोजी झाला. त्यांचे मूळ नाव शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली. लहान वयातच त्यांनी आपल्या गायकीची चमक दाखवली. आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीने त्यांनी रसिकांवर अक्षरशः गारुड केले. घराणेशाहीच्या चौकटीत बंदिस्त व्हायला त्यांनी साफ नकार दिला. त्याऐवजी आपली स्वतःची गानशैली जनमानसात रुढ केली.

    १९३० आणि १९४० च्या दशकात पंडित बी. आर. देवधर यांचे शिष्यत्व त्यांनी स्वीकारले. त्यावेळीच मा.कुमार जींच्या नावाचा दबदबा भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात निर्माण झाला. एप्रिल १९४७ मध्ये भानुमती कंस यांच्याशी कुमार जींचा विवाह झाला आणि ते मध्य प्रदेशातील देवासमध्ये स्थायिक झाले. त्याचवेळी काळाने त्यांच्यावर आकस्मिक आघात केला. त्यांना टीबीची बाधा झाली. या दुखण्याने त्यांची फुफ्फुसे खालसा केली. असं म्हणतात की, या दुखण्यात त्यांचं एक फुफ्फुस कायमस्वरुपी निकामी झालं. पत्नी मा.भानुमती यांनी याकाळात त्यांची सेवाशुश्रुषा केली. त्या आधी देवधरबुवांकडे आणि नंतर मा.कुमारजींकडेच गाण्याचे शिक्षण घेत होत्या. त्यांच्याच मदतीने पंडितजी आजारातून बरे झाले आणि १९५३ मध्ये आजारानंतरची त्यांची पहिली मैफल रंगली. परंतु या दुखण्याने त्यांच्या स्वरराज्याला चांगलाच हादरा दिला होता. १९६१ मध्ये बाळंतपणात पत्नी भानुमतीचे निधन झाले. त्यानंतर कुमार जींनी वसुंधरा श्रीखंडे यांच्याशी विवाह केला. त्याही देवधरबुवांच्या शिष्या होत्या.

    कुमार जी आणि वसुंधराबाईंची कन्या कलापिनी ही अनेकदा गाण्याच्यावेळी तानपु-यावर त्यांना साथ द्यायची. माळव्याची लोकगीतं, निर्गुणी भजन, नवरागनिर्मिती यांवर कुमारजींचा मोठा व्यासंग होता. मा.कुमारजींची लोकप्रियता अफाट होती. संगीतातील जाणकार मंडळी त्यांच्या गायकीवर जीव ओवाळून टाकायची. त्यामध्ये महाराष्ट्रीय मंडळींची संख्या मोठी होती. पुणे आणि मुंबईच्या उपनगरातील रसिकांच्या हृदयावर कुमार जींनी अधिराज्य गाजवले. याचठिकाणी त्यांच्या गाण्याच्या मैफली रंगायच्या.

    चेंबूरसारख्या परिसरात शाळांमध्ये त्यांच्या मैफली व्हायच्या. अगदी फुकट. खरेखुरे संगीताचे दर्दी या मैफलींना हजेरी लावायचे आणि कुमार जींच्या गाण्याची हरएक तान कानात जपून ठेवायचे. कुमार गंधर्वांची गायकी चित्रित करण्यासाठी एकदा मा.जब्बार पटेल कॅमेरा घेऊन आले. मा.मधु लिमये आणि ज्येष्ठ साहित्यिक मा.विंदा करंदीकर त्यावेळी उपस्थित होते. मैफलीत कॅमेरा पाहून मा.कुमारजींना आश्चर्य वाटले.

    पंडितजींनी जब्बारना विचारले, कॅमेरात किती मोठा रोल आहे ? थोडक्यात किती वेळाचे गाणे चित्रित करायचे आहे ? जब्बार यांनी सांगितले, पावणे चार मिनिटे. एका चीजेसाठी पावणे चार मिनिट म्हणजे फारच अवघड काम. पण पंडितजींनी घड्याळ लावले आणि सांगितले सुरू करा चित्रीकरण. त्यांनी तराणा सुरू केला. समा बांधली आणि बरोबर २२५ सेकंदात समेवर येऊन गाणे संपविले. १९९० साली कुमार गंधर्व यांचा पद्म विभूषण पुरस्कार देऊन भारत सरकारने गौरव केला. कुमार गंधर्व यांचे १२ जानेवारी १९९२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    कुमार गंधर्व यांचे ऋणानु बंधाच्या
    https://www.youtube.com/watch?v=K0CXNZyGVeU

    कुमार गंधर्व यांचे रागदारी
    https://www.youtube.com/watch?v=PCpMcvWkNy4

    कुमार गंधर्व यांची निरगुणी भजन
    https://www.youtube.com/watch?v=6CAFRYsNXXM

  • शार्दुल संभाजी कदम

    शार्दुल संभाजी कदम

    ठाण्यातील चित्रकला क्षेत्रातील एक तरुण व्यक्तिमत्व म्हणजे शार्दुल संभाजी कदम हे होत. व्यावसायिक चित्रकार म्हणून पुढे येत असलेले शार्दुल कदम हे सर जे.जे. स्कुल ऑफ आर्ट मध्ये अधिव्याख्याता आहेत.

  • बॉलिवुड गायिका सुनिधी चौहान

    दिल्लीत जन्मलेली सुनिधी प्रतिभावंत असल्याचे तिच्या वडिलांनी तिच्या बालपणीच ओळखले होते. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९८३ रोजी झाला. वयाच्या केवळ सुनिधी चौहानचे बालपणीचे नाव निधी चौहान असे होते. चौथ्या वर्षापासून तिने मंदिरात गायन सुरु केले होते.

    शालेय जीवनात सुनिधी दिल्लीत अनेक ठिकाणी स्टेज परफॉर्मन्स देत होती. याच काळात टीव्ही अँकर तबस्सुम यांची नजर सुनिधीवर पडली. त्यांनी आपल्या एका शोमध्ये सुनिधीला गाण्याची संधी दिली आणि तिच्या कुटुंबाला मुंबईत स्थायिक होण्याचा सल्ला दिला. तबस्सुम यांनीच सुनिधीची भेट प्रसिद्ध संगीतकार जोडी कल्याणजी-आनंदजी सोबत घालून दिली. त्यांनी सुनिधीला त्यांच्या ग्रुपमध्ये गाण्याची संधी दिली होती.

    वयाच्या १३व्या वर्षी 'मेरी आवाज सुनो' या शोचे विजेतेपद पटकावल्यानंतर राम गोपाल वर्मा यांनी सुनिधीला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक दिला. मस्त या सिनेमातील रुकी रुकीसी जिंदगी... हे तिने गायलेले पहिले बॉलिवूड गाणे आहे. हे गाणे जबरदस्त हिट ठरले. या गाण्यासाठी सुनिधीला तब्बल 14 वेगवेगळ्या अवॉर्ड्ससाठी नॉमिनेशन मिळाले होते. यापैकी दोन अवॉर्ड्स सुनिधीने आपल्या नावी केले. त्यानंतर सुनिधीने कधीही मागे वळून पाहिले नाही.

    सुनिधीने केवळ हिंदीतच नव्हे तर उर्दू, उडिया, पंजाबी, मराठी, तामिळ, तेलगू, भोजपुरी, बंगाली, आसामी, गुजराती आणि नेपाळी भाषेत गाणी गायली आहेत. सुनिधी चौहानने लग्न २००२ मध्ये वयाच्या १८ वर्षी दिग्दर्शक बॉबी खानबरोबर केले होते. पण फार काळ त्यांचे लग्न टिकू शकले नाही आणि या दोघांचा घटस्फोट झाला. एप्रिल २०१२ मध्ये सुनिधीने दुसरे लग्न केले. बालपणीचा मित्र आणि म्युझिक डायरेक्टर हितेश सौनिकबरोबर सुनिधीने संसार थाटला आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • लेखिका पुपुल जयकर

    पुल जयकर भारतातील कृष्णमूर्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा विश्वस्त होत्या. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जपान येथे झालेल्या भारतीय महोत्सवाच्या त्या मुख्य सूत्रधार होत्या. त्या इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अंड कल्चरल हेरिटेज (इन्टॅक) या संस्थेच्याही अध्यक्ष होत्या. त्या भारतीय कला आणि संस्कृतीच्या पुरस्कर्त्या होत्या.

  • नाना पाटेकर

    नाना पाटेकर लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत

  • कथा, पटकथा, संवाद लेखक व कलाकार प्रदीप कबरे

    प्रदीप कबरे हे मुळातच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. अभिनेता म्हणून त्यांनी नाव कमावलं आहेच, पण लेखक म्हणूनही कामगिरी केली आहे. त्यांनी आत्तापर्यंत दोन नाटकं लिहिली आहेत. त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९५६ रोजी झाला. तसंच अंदाजे अडीच हजार रेडिओ कार्यक्रम लिहिले आहेत. पाच हजारांहून अधिक रेडिओ कार्यक्रमांचं सादरीकरण केलं आहे. सहा-सात माहितीपटांचं लेखन केलं आहे. शंभरेक जिंगल्स लिहिल्यात. दोन चित्रपटांची कथा-पटकथा-संवाद लिहिले आहेत. एका चित्रपटासाठी गीतलेखनही केलं आहे.

    कलाक्षेत्राची प्रदीप कबरे यांना सुरुवातीपासून आवड होती. कॉलेजमध्ये आल्यानंतर त्यांनी अभिनयाला सुरवात केली. कॉलेजमध्ये असताना त्यांनी ‘वेटिंग फॉर घासलेट’ ही पहिली एकांकिका केली होती. ती ‘आयएनटी’मध्ये सादर झाली होती. व या एकांकिकेसाठी ‘आयएनटी’चं सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पहिलं पारितोषिकही मिळालं होतं. त्याच सुमारास त्यांनी ‘कोंडी’ या पहिल्या व्यावसायिक नाटकातही काम केलं. ‘आयएनटी’ची निर्मिती असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शक होते शंभू मित्रा. या नाटकात सतीश दुभाषी, गणेश सोळंकी वगैरे तगडी स्टारकास्ट होती. रमेश पवार यांनी पिसाट खुनी रामन राघवच्या जीवनावर ’वरचा कानून’ हे नाटक लिहिलं होतं. त्यामध्ये रामन राघवनची भूमिका अशोक सराफ करत होते. तर रमेश पवार इन्स्पेक्टरच्या भूमिकेत होते. प्रदीप कबरे यांनी या नाटकात हवालदाराची विनोदी भूमिका केली होती. व तेव्हाच प्रदीप कबरे यांच्या मनात आलेकी स्वत:ची नाटय़संस्था स्थापन करावी.

    स्वत:ची नाटय़संस्था स्थापण्याचा विचार सुचला तरी तो लगेच अमलात आला नाही. कारण दरम्यानच्या काळात प्रदीप कबरे यांची अभिनय कारकीर्द जोरात धावू लागली होती. कमलाकर सारंग यांच्या ‘खोल खोल पाणी’, ‘सखारम बाईंडर’ आणि ‘जोडीदार’ या नाटकांत त्यांना भूमिका मिळाल्या. ‘माऊली प्रॉडक्शन’ची ‘कार्टी प्रेमात पडली’,‘ देखणी बायको दुस-याची’ आणि ‘दांडेकरांचा सल्ला’ ही नाटकंही त्यांच्या वाट्याला आली. बाळ कोल्हटकर लिखित ‘लहानपण देगा देवा’चं दिग्दर्शन त्यांनी केलं आणि याबद्दल कोल्हटकरांकडून दादही मिळवली. याच काळात सुधीर कवडी यांनी लिहिलेलं ‘बोल बाबी बोल’ हे नाटक प्रदीप कबरे यांच्या वाचनात आलं. यातली बॉबीची मध्यवर्ती भूमिका खूप सशक्त होती. प्रदीप कबरेंना ती आवडली, पण इतर कुठल्याही निर्मात्याने हे नाटक केलं असतं तर त्याने ती त्यांना दिली नसती. या बद्दल कबरे त्याचं कारण सांगताना म्हणतात, ‘‘त्यावेळी मी काही नावाजलेला नव्हतो. मला कुणाचं पाठबळ नव्हतं.

    माझ्याकडे एखादा ग्रुप नव्हता. त्यामुळे ते मीच करायचं ठरवलं. तत्पूर्वी हे नाटक मी माझा मित्र कमलाकर सारंगला वाचायला दिलं. कमलाकर माझ्यामागे उभा राहील, अशी मला आशा होती. त्याने हे नाटक दिग्दर्शित करायचं कबूल केलं. आणि १९८७ मध्ये प्रदीप कबरे यांनी ‘गुरू प्रॉडक्शन’ची स्थापना केली. हे नाटक प्रेक्षकांना आवडलं. सुधीर कवडीला या नाटकाबद्दल त्यावर्षीचं राज्य सरकारचं सर्वोत्कृष्ट नाटय़लेखनाचं पारितोषिक मिळालं.’’

    या नाटकाने कबरे यांना आर्थिक फायदा करून दिला नसला तरी लोकप्रियता भरपूर मिळवून दिली. त्यांच्या मध्यवर्ती भूमिकेचं कौतुक झालं. त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी ‘धांदलीत धांदल’ या दुस-या नाटकाची निर्मिती केली. राजा मयेकर, शेखर विश्वासराव, सुषमा तेंडुलकर, प्रदीप पटवर्धन, विजय पाटकर यांच्या भूमिका या नाटकात होत्या. बाबा पार्सेकर, कमलाकर केळुसकर, गिरिधर मोरे, प्रदीप रांजणकर, उल्हास सुर्वे, शरद विचारे यांच्या साथीने ‘गुरू प्रॉडक्शन’ची वाटचाल सुरू राहिली. ‘मनात माझ्या’ हे ‘गुरू’चं तिसरं नाटक. ते कबरे यांनीच लिहिलेलं. ‘सेंड मी नो फ्लॉवर्स’ या इंग्रजी नाटकाचं ते रूपांतर होतं. या नाटकावरून ‘हाय मेरा दिल’ हे हिंदी नाटक आलं होतं. त्याच्या लेखकाकडून रीतसर परवानगी घेऊन कबरे यांनी त्याचं मराठी रूपांतर केलं होतं. स्मिता जयकरने या नाटकातून मराठी रंगभूमीवर पदार्पण केलं. ‘‘या नाटकाचे ५० प्रयोग झाले. आर्थिक गणित यावेळीही चुकलं तरी या नाटकाने मला बरंच काही शिकवलं. महत्त्वाचं म्हणजे या नाटकाने प्रदीप कबरे यांना अभिनेता, लेखक, दिग्दर्शक अशी तिहेरी ओळख दिली.’’

    ‘गुरू’च्या वाटचालीत ‘हँडस अप’ आणि ‘चाफा बोले हा’ ही दोन नाटकं महत्त्वाचा टप्पा ठरली. ‘हँडस अप’ नाटकाचे आजवर २५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी या नाटकात भूमिका केल्या होत्या.
    प्रदीप कबरे यांच्या ‘गुरू प्रॉडक्शन’ने आत्तापर्यंत नऊ नाटकांची निर्मिती केलीय.

    ‘गुरू प्रॉडक्शन’ ने अनेक नवोदित कलाकारांना रंगभूमीवर ब्रेक दिलाय. ‘एप्रिल फूल’ या नाटकातल्या सगळ्या कलाकारांचं ते पहिलंच नाटक होतं.

    अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेल्या "मराठी नाट्य कलाकार संघा‘च्या अध्यक्षपदी प्रदीप कबरे यांनी काही काळ काम केले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • मराठीतील दर्जेदार नाटकांचे लेखक वसंत कानेटकर

    महाराष्ट्राला अभिमान वाटावा असं नाट्यक्षेत्रातील एक नाव म्हणजे वसंत कानेटकर. वसंत कानेटकर यांचे शिक्षण पुणे व सांगली येथे झाले. त्यांचा जन्म २० मार्च १९२२ रोजी झाला.इंग्रजी विषय घेऊन एम. ए. पदवी मिळविल्यानंतर नाशिक येथे हंसराज प्रागजी ठाकरसी महाविद्यालयात सुमारे २५ वर्षे त्यांनी अध्यापन केले. नाटककार म्हणून ओळख असलेल्या कानेटकरांनी सुरुवातीला कथा, कादंबरीपासूनच आपल्या लेखनाला सुरुवात केली. मा.वि. स. खांडेकर यांचा सहवास मिळाल्याने साहित्याचा दर्जेदारपणा कळत नकळत रूजला गेला. नाशिकला आल्यावर कुसुमाग्रजांच्या सहवासातूनही त्यांच्यातील साहित्यिक आणखी फुलत गेला. ३० वर्षांच्या काळात त्यांनी सुमारे चाळीस नाटकं आणि काही एकांकिका रंगभूमीच्या ओटीत घातल्या. प्रेक्षकांची आवडनिवड जाणणारा एक प्रयोगशील नाटककार म्हणून ते लोकप्रिय होते.
    वेड्याचं घर उन्हात हे त्यांचे पहिले नाटक म्हणजे मनोविश्लेषणाचा एक नवीन प्रयोग होता. त्यानंतर देवांचं मनोराज्य, प्रेमा तुझा रंग कसा, रायगडाला जेव्हा जाग येते, लेकुरे उदंड जाहली, मत्स्यगंधा, हिमालयाची सावली, विषवृक्षाची छाया, कस्तुरीमृग, वादळ माणसाळतयं, अश्रूंची झाली फुले, मला काही सांगायचयं इ. अनेक नाटके त्यांनी लिहिली. १९८८ मध्ये ठाणे येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मानही त्यांना मिळाला होता. वसंत कानेटकर यांचे ३१ जानेवारी २००४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

  • लेखिका मंगला बर्वे

    अन्नपूर्णा या पुस्तकावर कित्येक महिला आणि परदेशात जाणारी, एकटी राहणारी तरुणाई स्वयंपाक करायला शिकली. त्यांच्या या पुस्तकाने विक्रीचे अनेक रेकॉर्ड मोडले. सध्या या पुस्तकाची ७७ वी आवृत्ती बाजारात आहे.

  • शामची आई

    संस्कार म्हणजे नक्की काय?

    बहुतेकांच्या मते घरी संध्याकाळी शुभंकरोती म्हणणे, मोठयांचा आदर करणे, खरे बोलणे, स्वच्छतेचे पालन करणे… पण हे संस्कार मुलांमध्ये रूजणार कसे? संस्कार हे एका पिढीतून दुस-या पिढीत रूजवायचे असतात. संस्कारांचा अनमोल ठेवा साने गुरूजी यांनी ‘श्यामची आई’च्या रूपाने लिहून ठेवला आहे. ‘श्यामची आई’ पुस्तकावर कितीतरी पिढया संस्कारक्षम झाल्या; साने गुरुजीनी लिहिलेले ‘श्यामची आई’ हे पुस्तक कोणत्याही काळात उपयुक्त ठरणारे पुस्तक आहे. कित्येक पिढ्यांवर सुसंस्कार करण्याचं काम या एका पुस्तकाने केलं.

    प्रेम आणि मातृत्वाचा साक्षात्कार घडवून आणण्याची ताकद ज्यांच्या लेखणीत व वाणीत होती, अशा मा.साने गुरुजी यांच्या `श्यामची आई' या अवीट गोडीच्या पुस्तकाच्या लिखाणाची सुरुवात ९ फेब्रुवारी १९३३ साली झाली. स्थळ होते, नाशिकचा तुरुंग व समोर श्रोते होते, तुरुंगात विविध गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगणारे कैदी. स्वातंत्र्य चळवळीत सत्याग्रह केल्याच्या `गुन्ह्या'साठी साने गुरुजीही सजा भोगत होते., कैद्यांना रात्री आईच्या गोष्टी सांगतानाच साने गुरुजी त्या आठवणी लिहून काढत राहिले. पाच दिवसांत म्हणजे १३ फेब्रुवारीपर्यंत त्यांनी पुस्तक लिहीले.

    `श्यामची आई' ही साने गुरुजींच्या लहानपणीच्या जीवनाची गोष्ट. पांडुरंग सदाशिव साने नावाचा कोकणातला मुलगा त्याच्या आई-वडिलांसह परिस्थितीशी झुंज देत देत मोठा होतो. वडिलांच्या पडत्या काळात घर सांभाळतानाच मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, म्हणून आईची चाललेली धडपड रोजची अनुभवतो. या साऱ्याचे त्याच्या बालमनावर खोलवर परिणाम होत राहतात. तीच स्पंदने `श्यामची आई' मध्ये टिपलेली आहेत. यातला `श्याम' म्हणजे स्वत: साने गुरुजी. स्वत:ला स्वत:पासून दूर करून आत्मकथन करण्याचा विलक्षण वेगळा व कठीण प्रयोग साने गुरुजींनी `श्यामची आई'ची रचना करताना साकारला. तो कमालाचीचा यशस्वीही झाला.

    `श्यामची आई'च्या प्रत्येक प्रकरणाचे शीर्षक `रात्र' असे आहे. अशा ४२ रात्रींत श्यामच्या आईचे कथानक पूर्ण होते. `श्यामची आई' वाचताना ज्याच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या नाहीत, असा माणूस क्वचितच सापडेल. हे कथानक म्हणजे खरे तर गद्य रुपात साने गुरुजींनी रचलेले काव्यच आहे.

    त्यावर आधारित `श्यामची आई' हा मराठी चित्रपट आचार्य अत्रे यांनी १९५३ साली निर्माण केला. तो प्रचंड गाजलाच, शिवाय त्याच वर्षीपासून सुरू झालेला राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार याच चित्रपटाला मिळाला.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    शामची आई पुस्तक गुगल प्ले स्टोअर वर
    https://play.google.com/store/apps/details?id=sahityachintan.shyamchiAai

  • संगीतकार सरदार मलिक

    संगीत विश्वात सरदार मलिक यांना ‘सुरांचा सरदार’ म्हणून ओळखलं जात असे. हिंदी सिनेसृष्टी मध्ये भरीव काम करुन सुध्दा पहिल्या पाच मध्ये नाव न मिळवु शकलेला एक संगीतकार म्हणजे सरदार मलिक.

    सरदार मलिक उत्तर प्रदेशमधील अल्मोडा गावचे. आयुष्यभर सर्वधर्मसमभावाचा त्यांनी पुरस्कार केला. त्यासाठी ‘सरदार’ नाव धारण केलं. ते स्वत: सरदार, पत्नी बिल्किस तर मुलं अन्नू, अबू आणि डेबू. हिंदुस्थानी संगीताचे प्राथमिक धडे त्यांनी अल्लाउद्दीन खाँ साहेबांकडे गिरवले. उस्ताद अली अकबर खाँ, पंडित रविशंकर हे त्यांचे गुरुबंधू होते. गायनाचं शास्त्रोक्त शिक्षण त्यांनी पंडित विष्णुपंत शिराळी यांच्याकडून घेतलं. उदय शंकर यांच्याकडे नृत्यकला शिकले. पुढे सरदार मलिक संगीत दिग्दर्शनाकडे वळले. १९४७ मधील जयंत देसाईंचा ‘रेणुका’ हा त्यांनी संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट. ‘नायक मुबारक’साठी त्यांनी पार्श्वगायनही केलं; पण चित्रपट अपयशी ठरला. पुढे काही काळ ते एच.एम.व्ही.त काम करत होते. सरदार मलिक यांची संगीतकार म्हणून ओळख झाली ती ‘ठोकर’(१९५३)पासून.

    ‘ठोकर’मधलं तलतच्या आवाजातील शम्मी कपूरवर चित्रित झालेलं ‘ऐ गमे दिल क्या करू’ हे गीत माधुर्य, अर्थपूर्ण शब्द सौंदर्यामुळे मन वेडावून टाकत होतं. इंटरव्हलनंतर हाच मुखडा घेऊन पुढचा भाग आशाच्या आवाजात आहे. एक गाणं, तोच विचार दोन वेळा चित्रपटात द्यायची कल्पना सरदार मलिक यांचीच! हा चित्रपट पाहायला निर्माते-दिग्दर्शक पी. एन. अरोरा आले होते. ही दोन्ही गाणी ऐकून ते इतके प्रभावित झाले, की त्यांनी ‘चोर बाजार’ या पुढच्या चित्रपटासाठी मलिकना करारबद्ध केलं. ‘हुई थी हम से नादानी, तेरी महफिल में आ बैठे, जमीं की खाक होकर, आसमां से दिल लगा बैठे.’ केवळ आपल्या आवाजाच्या जादूने भावनांमधील विविध छटांचा आविष्कार करण्याच्या बाबतीत त्या काळात लता मंगेशकरांना तोड नव्हती. ज्याला नाव देता येणार नाही, अशी एक अप्रतिम छटा त्यांनी सरदार मलिक यांच्या या गाण्यातून व्यक्त केली आहे. ‘झुक झुक जाए नजर शरमाए, किसी को कहां न जाए’ हसरत जयपुरीची ही हळुवार भावना गीता दत्तच्या आवाजात त्यांनी तितक्याच समर्थपणे पेश केली आहे.

    विष्णुपंत शिराळींच्या गायकीचा जबरदस्त प्रभाव सरदार मलिक यांच्यावर होता. झोपाळयासारखा स्वरांचा चढ-उतार करत ते गाण्याची लज्जत वाढवत असत. त्यांच्या गायकीची झलक सरदार मलिक यांनी ‘आब-ए-हयात’मधील हेमंतकुमारच्या गाण्यातून दाखवली आहे. ‘मैं गरीबों का दिल हूं वतन की जुबां.’ वेळात वेळ काढून हेमंतकुमार यांनी सरदार मलिक यांच्यासाठी पार्श्वगायन केलं. हेमंतकुमार यांचं हे एक विशेष उल्लेखनीय गीत आहे. चोखंदळ रसिकांनी सरदार मलिक, आशा भोसले यांच्याकडून गाऊन घेतलेली काही गाणी ऐकल्यास त्यांना हा ‘सुरों का सरदार’ काय होता, याची थोडीफार कल्पना येईल. धीरूभाई देसाईंचा ‘सारंगा’ म्हणजे त्यांच्या प्रतिभाशक्तीचा उत्कृष्ट नमुना. रसिक श्रोत्यांसाठी जणू मेजवानीच. ‘पिया कैसे मिलू तुमसे, मेरे पाव पडी जंजीर’ (लता-रफी) या गाण्यातील अगतिक विरहिणी, ‘लागी तुमसे लगन साथी छुटे ना’ (मुकेश-लता) यातील लाडीक नखरा, लताच्या ‘कोई घर आएगा प्यार जगाएगा’मधील ढोलकीची रसपूर्ण साथ, सुमन कल्याणपूरच्या गाण्यातील मधुर दर्द आणि शेवटी लक्षात राहतो, तो मुकेश. ‘हाँ दिवाना हूँ मैं, गम का मारा हुआ इक बेगाना हूँ मैं..’ सरदार मलिक यांनी मुकेशच्या आवाजाचा अतिशय कुशलतापूर्वक उपयोग केला आहे. त्याच्या आवाजातील वजन कमी करून दिलेलं ‘सारंगा तेरी याद में, नैन हुए बेचैन’ हे गाणं म्हणजे, मुकेशच्या कारकिर्दीतला मानबिंदू आहे.

    सरदार मलिक यांनी मात्र मनाचा मोठेपणा दाखवून गाण्याच्या यशाचं श्रेय तारशहनाईवादक डी. एम. टागोर यांना दिलं आहे. टागोर यांना सर्व वादक कलाकार दुखींदा म्हणून ओळखत असतं. ते तारशहनाई वाजवताना इतकी व्याकूळता निर्माण करत, की ऐकणा-याच्या डोळय़ांतून अश्रू पाझरत असत. ‘सारंगा’ चित्रपटाने जितका बिझनेस केला, त्यापेक्षा अधिक बिझनेस त्याच्या ध्वनिमुद्रिकांनी केला. मा.सरदार मलीक यांनी सहाशेच्यावर गाण्यांना संगीत दिले आहे. संगीतकार अन्नु मलिक हे मा.सरदार मलीक यांचे चिरंजीव. सरदार मलीक यांचे निधन २७ जानेवारी २००६ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट / अरुण पुराणिक