जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
एस.एम.जोशी यांनी आयुष्यभर सामान्यांसाठी जीव ओतून काम केले. त्यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९०४ रोजी येथे झाला.त्यांच्या स्फटिकासारख्या स्वच्छ, पारदर्शक, प्रामाणिक आणि सात्त्विक व्यक्तिमत्त्वाने त्या काळात अनेकांना प्रेरणा दिली. एस.एम. यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची सुरुवात स्वातंत्र्य चळवळीतूनच झाली. काही विशिष्ट ध्येये, जीवनमूल्ये आणि निष्ठा घेऊनच एस.एम. जोशी यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. युसूफ मेहेर अली यांच्या नेतृत्वाखाली युथ काँग्रेसमध्ये एस.एम.जोशी सहभागी झाले. पुढे १९४२ चे भारत छोडो आंदोलन व भूमिगत राहून केलेले काम, एकूण सात वष्रे भोगलेला कारावास, त्यातली अर्धीअधिक सक्तमजुरीची शिक्षा- हे सर्व करत असताना इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वतंत्र भारताची जडणघडण ही आíथक व सामाजिक न्याय आणि समता यावर आधारित समाजनिर्मितीची असली पाहिजे, या ध्येयाने प्रेरित होऊन १९३६ मध्ये काँग्रेस सोशालिस्ट पार्टीच्या स्थापनेत ते सहभागी झाले.
माणसाला दुसऱ्या माणसाबद्दल वाटणारी सहानुभूती आणि प्रेम हेच जीवनमूल्य प्रधान समजले पाहिजे आणि तेच शाश्वत सत्य आहे, या समाजवादी मूल्यावरच समाजाची उभारणी केली पाहिजे, हा मूलभूत सिद्धान्त त्यांनी आपलासा केला. स्वातंत्र्यलढय़ाबरोबरच मा.एस.एम यांनी कामगार चळवळीत भाग घेतला तो एका मोठय़ा ध्येयासाठी. त्यांनी कामगार चळवळीकडे फक्त कामगारांच्या वाजवी मागण्या मान्य करून घेण्याचे एक साधन म्हणून कधीच पाहिले नाही. या लढय़ाचा उपयोग समताधिष्ठित नवसमाजाची उभारणी करण्यासाठी होईल, असे त्यांना वाटत होते आणि म्हणूनच कामगारांच्या न्याय्य लढय़ाला विधायक वळण देण्याचा आणि कामगारांना सामाजिक बांधीलकीची शिकवण देण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. कामगार चळवळ अहिसक व सहिष्णू मार्गाने लढत असताना तिला समाजपरिवर्तनाची दिशा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. प्रथम त्यांनी पुण्यातील लहान-लहान कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या भांडी कामगारांची संघटना बांधली. नंतर हळूहळू रेवडी कामगार, तपकीर कामगार, विडी कामगार यांच्या युनियन बांधल्या. पण त्यांचे मुख्य काम पुण्यातील खडकी- देहू रोड येथील संरक्षण कारखान्यातील कामगारांच्यात होते.
सर्वप्रथम ५१२ कमांड वर्कशॉपच्या युनियनचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. नंतर त्यांनी ऑल इंडिया डिफेन्स फेडरेशनची स्थापना करून त्याचे ते पहिले जनरल सेक्रेटरी झाले. कामगारांनी कारखान्याची शिस्त पाळली पाहिजे, प्रामाणिक राहिले पाहिजे, जास्तीत जास्त मेहनत करून चांगले उत्पादन केले पाहिजे; तसेच दारू, जुगार अशा व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे, घरातील स्त्रियांना सन्मानाने व समानतेने वागविले पाहिजे- या सर्व गोष्टींवर ते कामगारांशी संवाद साधत असत.
राष्ट्रीय दृष्टिकोन न सोडता आणि सामाजिक कर्तव्याची जाण ठेवूनच एस.एम कामगार चळवळीत उतरले होते. स्वातंत्र्यलढा आणि कामगार चळवळ याचबरोबर एस.एम यांची दोन फार महत्त्वाची योगदाने म्हणजे राष्ट्र सेवादल आणि संयुक्त महाराष्ट्र. एस.एम यांनी जरी पक्षीय राजकारणात हिरिरीने भाग घेतला तरी त्यांचा मूळ पिंड रचनात्मक आणि विधायक काम करण्याचाच होता. राष्ट्र सेवादलाच्या उभारणीत व राष्ट्र सेवादलाचे पहिले दलप्रमुख म्हणून त्यांनी तरुणांच्या एका संपूर्ण पिढीलाच पुरोगामी विचारांनी भारून टाकले. त्यांचे हे योगदान अत्यंत मोलाचे आहे.
एस.एम यांच्या राजकीय प्रवासातील संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन आक्रमक असूनही अहिंसक होते. लोकांचा उद्रेक, गोळीबार वगरे झाला नाही असे नाही. पोलिसांच्या गोळीबारात १०५ निरपराध माणसे मारली गेली; पण त्या वेळेस मुंबई व महाराष्ट्राची जनता नेतृत्वहीन होती. जनतेच्या प्रक्षोभाला एका संघटित व अहिंसक आंदोलनाची योग्य दिशा देण्याची नितांत गरज होती. कुठलेही आंदोलन सफल होण्यासाठी कणखर, प्रामाणिक आणि कार्यक्षम नेतृत्व लागते. अशा कठीण परिस्थितीत संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली आणि समितीचे सरचिटणीस म्हणून एसेमच्या नावाची घोषणा झाली. समितीचे सरचिटणीस या नात्याने एस.एम यांनी महाराष्ट्राच्या जनतेला नेतृत्व दिले.
आंदोलनाला एक नतिक दिशा दिली आणि सर्व विरोधी पक्षांची एकजूट करून संयुक्त महाराष्ट्र संसदीय व सत्याग्रहाच्या मार्गाने खेचून आणला. संयुक्त महाराष्ट्र समिती हे अनेक पक्षांचे एक कडबोळे होते. प्रजा समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट, शेकाप, हिंदू महासभा, रिपब्लिकन पक्ष अशा भिन्न विचारांच्या पक्षांना एकत्र घेऊन जाण्याची तारेवरची कसरत एसेमच करू शकत होते. याचे कारण त्यांच्यावर सर्व पक्षांतील नेत्यांचा असलेला पूर्ण विश्वास. एसेमबद्दल सर्वाना खात्री होती की, हा अत्यंत प्रामाणिक आणि निस्वार्थी माणूस असून वैयक्तिक स्वार्थ तर सोडाच, पण ध्येयपूर्तीसाठी स्वत:च्या पक्षाचे हित पण ते बाजूला ठेवतील. डॉ. डांगे, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, दाजीबा देसाई, बी. सी. कांबळे, दत्ता देशमुख, डॉ. नरवणे, जयंतराव टिळक असे दिग्गज नेते होते आणि त्या सर्वाना खात्री होती की, एस.एम आपली कधीच फसवणूक करणार नाहीत.
एस.एम यांच्या बाबतीत आत एक आणि बाहेर दुसरेच, असा प्रकार नसायचा. जे काही बोलायचे-करायचे ते सर्व उघडपणे आणि सच्चेपणाने. त्यामुळे खूपदा न पचणारे, न आवडणारे निर्णयदेखील हे नेते एस.एम यांच्या विश्वासामुळे मान्य करीत असत. म्हणूनच आचार्य अत्रे यांनी खास आपल्या शैलीत एस.एम म्हणजे संयुक्त (एस) महाराष्ट्र (एम) असे समीकरण केले. एस.एम १९५७ मध्ये विधानसभेवर निवडून आले. नंतर १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि प्रजा समाजवादी पक्ष समितीतून बाहेर पडला. त्यानंतर १९६२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विरोधी पक्षांची दाणादाण करून काँग्रेसने आपले वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित केले. नानासाहेब गोरे त्या वेळी पुण्याहून लोकसभेसाठी आणि अण्णा परत विधानसभेसाठी उभे होते.
प्र.स.प. आणि समाजवादी पक्षाचे ऐक्य होऊन संयुक्त समाजवादी पक्षाची स्थापना १९६५ मध्ये झाली आणि एस.एम हे या पक्षाचे पहिले अध्यक्ष झाले. पण पक्षनिर्मिती होतानाच प्र.स.प.चे लोक त्यातून वैयक्तिक कारणास्तव बाहेर पडले. काही ध्येयधोरणे आणि कार्यक्रम यांवर मतभिन्नता होऊन पक्षातून बाहेर पडणे लोकशाही तत्त्वांना धरून झाले असते. पण एकदा बिनशर्त एकोपा झाल्यावर केवळ वैयक्तिक विरोध किंवा नाराजीसाठी पक्षात फूट पाडणे चुकीचे आहे, असे अण्णांचे ठाम मत होते. त्यामुळे अण्णा संयुक्त समाजवादी पक्षातच राहिले. पक्ष दुभंगून अण्णा एकीकडे आणि अनेक वर्षांचे सोबती सहकारी दुसरीकडे, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्या काळात अण्णांच्या अगदी जवळच्या सहकाऱ्यांनी अण्णांवर जे आक्षेप घेतले, त्यांच्या हेतूबद्दल शंका व्यक्त करणारी पत्रके काढली; त्यामुळे अण्णांना प्रचंड आत्मक्लेश झाले.
एस.एम पुण्यातून १९६७ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत जिंकून आले. तेव्हा इंदिरा गांधींनी काँग्रसचे राष्ट्रपतिपदासाठीचे अधिकृत उमेदवार संजीव रेड्डी यांच्या विरोधात व्ही. व्ही. गिरी यांना उभे केले होते. एक एक मत महत्त्वाचे होते. बाबू जगजीवनराम इंदिराजींच्या वतीने अण्णांना भेटायला घरी आले होते. बाबूजी अण्णांना म्हणत होते, ‘‘एसेम आप जैसे चारित्र्यवान नेताओं की कांग्रेस को जरूरत है.’’ पुढे जाऊन ते म्हणाले, ‘‘इंदिराजीने कहा है की, आप कांग्रेस में आकर कांग्रेस को सुधार सकते हो और कॅबिनेट मंत्री बनकर अपना योगदान दे सकते हो.’’ मा.एस.एम.जोशी यांनी हसत-हसत बाबूजींना उत्तर दिले- ‘‘बाबूजी मं अभी तक खुद की पार्टी को नहीं सुधार सका हूँ, तो कांग्रेस जैसी बडी पार्टी को कैसे सुधार सकता हूँ? आप इंदिराजी को बताईये की मेरा वोट जरूर व्ही. व्ही. गिरीजी को मिलेगा लेकिन उसके लिए कांग्रेस में आनेकी जरूरत नहीं है।’’
प्र.स.प. व सं.सो.पा.चे १९७१ मध्ये परत एकदा एकत्रीकरण होऊन समाजवादी पार्टीची निर्मिती झाली. आणीबाणीच्या काळात जयप्रकाशजींच्या संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनात व पुढे जनता दल पार्टीच्या निर्मितीत एसेमनी भरीव योगदान दिले. समाजवादी पक्ष १९७७ मध्ये जनता दलात विलीन झाला. नंतरच्या काळात समाजवादी चळवळ राजकीयदृष्टय़ा कमकुवतच होत गेली आणि जुना समाजवादी पक्ष असा उरलाच नाही. मा.एस.एम यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात महत्त्वाचा पलू म्हणजे त्यांना शोषित आणि वंचितांबद्दल वाटणारी कणव. नुसतीच कणव नाही तर त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांचे दु:ख कमी करण्यासाठी ते कायम धावून जायला तयार असत. अण्णांच्या व्यक्तिमत्त्वातच एक प्रकारची जादू होती. त्यांचे ते निळेशार डोळे जितके तेजस्वी होते, तितकेच करुणेने भरलेले होते. लाल-गोरी कांती, भव्य कपाळ आणि मागे ओढलेले भरदार केस. प्रत्येकाला असे वाटे की, या माणसाकडे गेलो तर आपली व्यथा, आपले दु:ख निश्चितच कमी होईल. सानेगुरुजी जर आधुनिक महाराष्ट्राचे क्रांतिकारी संत होते, तर एसेम हे आधुनिक महाराष्ट्राचे राजकारणी संत होते. एस.एम.जोशी यांचे १ एप्रिल १९८९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / अभय जोशी निवृत्त विंग कमांडर(मा.एस.एम.जोशी यांचे चिरंजीव)
भारत सरकारने नीरजा भानोत यांना (मरणोत्तर) अशोक चक्र या भारताच्या सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नीरजा भानोत या भारतातील सर्वात लहान वयाची अशोक चक्र हा वीरता पदक मिळविणारी भारतीय ठरल्या.
कविता महाजन यांनी ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात खुप काम केले होते. आदिवासी समाजजीवनाचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. आदिवासी समाज व महिला यांचे प्रश्न त्यांनी सातत्याने मांडले.
छत्रपती शिवाजीमहाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीने बोलू शकणारे निनाद बेडेकर यांची शिवचरित्राचे अभ्यासक अशी ख्याती होती. त्यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४९ रोजी पुणे येथे झाला.
दिलीप प्रभावळकर हे नाव माहित नसलेला रसिक मराठी माणुस विरळाच. ज्याला खरी अभिनयाची जाण व गोडी आहे , त्याला प्रभावळकरांमधला सच्चा व प्रतीभाशील कलावंत हा भावतोच.
गणेश वासुदेव मावळणकर हे १९५२ साली स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे, तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या अहमदाबादमधून लोकसभेवर निवडून गेलेले संसद सदस्य होते.
भारतीय हिंदी चित्रपटाचा वरील काळ सुवर्ण युग म्हणून ओळखला जातो. त्या काळातील नर्गीस, मधुबाला, मीनाकुमारी, बहिदा रेहमान, नुतन, वैजयंतीमाला, साधना या अभिनेत्रींनी सर्वाथाने गाजवला. या तारका रसिक मनाच्या कोंदणात अजूनही विराजमान असून त्यांच्या सौदर्याचा अभिनयाचा नृत्यांमधील पदन्यास, पदलालित्याचा मोहमयी प्रवास अभिनयातील वैविध्यता जाणून घेणे रंजक आहे
आज ७ नोव्हेंबर..आज तमिळ, हिंदी अभिनेता, पटकथालेखक व दिग्दर्शक कमल हासन यांचा वाढदिवस.
जन्म:- ७ नोव्हेंबर १९५४
कमल हासन यांनी हिंदी, तामिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड या भाषांतील अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. १९६० मध्ये त्यांना कलथुर कन्नामा या चित्रपटातील भूमिकेसाठी पहिला राष्ट्रीय बालकलाकार पुरस्कार मिळाला. या चित्रपटातील भूमिकेसाठी वयाच्या चौथ्या वर्षी त्यांचा राष्ट्रपतींकडून सन्मान करण्यात आला होता. कमल हसन यांनी आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप उमटवली. आत्ता पर्यंत कमल हासन यांनी १९० चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. एक दुजे के लिये, सदमा, एक नई पहेली, चाची ४२० ही त्यांच्या चित्रपटांची काही नावे. कमल हसन यांनी आतापर्यंत चित्रपटसृष्टीतील अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळवले आहेत. ते दिग्दर्शन, निर्माते, पार्श्वगायक अशीही त्यांची ओळख आहे. त्यांनी अनेक चित्रपटांचे लेखन केले आहे. तामिळ, हिंदी, तेलुगु, मल्याळम आणि इंग्रजी भाषेतही त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या स्वच्छता अभियानात कमल हसन यांची निवड करण्यात आली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आंनदयात्री कवी बा भ.बोरकर यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९१० रोजी गोव्यातील कुडचडे येथे झाला.
देखणी ती जीवने, जी तृप्तीची तीर्थोदके,
चांदणे ज्यातून वाहे, शुभ पाऱ्यासारखे.
असे देखणे जीवन जगणारे, आणि रसिकांना भरभरून आनंद देणारे आंनदयात्री कवी! बाळकृष्ण भगंवत बोरकर उर्फ बा भ. बोरकर.
१९३० मध्ये वयाच्या विसाव्या वर्षीच बा भ. बोरकर यांचा प्रतिमा हा काव्यसंगह प्रकाशित झाला. त्यांच्या या काव्यसंगहावर केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज यांचा प्रभाव होता. मा.बोरकरांच्या मनावर घरातील धार्मिक वातावरण, प्रेमळ आप्त परिवार, शालेय जीवनातील संस्कार आणि गोव्याचा व कोकणचा रमणीय निसर्ग यांचा खोल परिणाम झालेला त्यांच्या कवितेतूनही दिसून येतो.
निसर्गाच्या भव्योत्कट सौंदर्याचा त्यांना जणू ध्यास जडला होता. निसर्ग हीच त्यांची भाषा बनली; त्यांच्या अविष्काराचे माध्यम बनले. गोव्याच्या निसर्गरम्य भूमीचे वर्णन ते पुढील शब्दांत करतात, - या गोव्याच्या भूमीत मधाचे नारळ असतात. कड्याकपारीतून दुधाचे घट फूटतात; आंब्या फणसांची रास असते. इथे चांदणे माहेरी येते आणि पावसात दारापुढे सोन्या-चांदीच्या धारा खेळतात... किती नितांत सुंदर आणि अत्यंत कल्पनारम्य, पण जिव्हाळ्याने केलेले हे वर्णन आहे! त्यांच्या सर्वच प्रकारच्या लेखनात, विशेषत: कवितेत नियमितपणे निसर्ग डोकावतो. निसर्ग भाषा हेच त्यांचे वेगळेपण.
१९३२ साली बोरकरांच्या कवितेने भारावून जाऊन श्रेष्ठ कवी मा.भा. रा. तांबे यांच्या तोंडून Here is a new star on horisen असे कौतुकाचे उद्गार निघाले. १९३४ मध्ये बडोदा येथील साहित्य संमेलनात तेथे कर माझे जुळती या कवितेसाठी त्यांना सुवर्णपदक प्राप्त झाले.
कवीवर्य भा. रा. तांबे यांच्या विचारसरणीचा, काव्यशैलीचा त्यांच्यावर खूप परिणाम झालेला दिसतो. एकलव्यासारखे तांबे यांचे गुरुपद त्यांनी मनोमन स्वीकारले व मानाने मिरवलेही. त्यामुळे तांब्यांच्या घराण्याची गायकी पुढे नेणारे कवी अशी त्यांची प्रतिमा झाली. मा.बोरकरांचे वि. स. खांडेकर, काकासाहेब कालेलकर, कुमार गंधर्व, पु.ल.देशपांडे, चित्रकार दलाल, यांच्यासह म. गांधी, डॉ. लोहिया, पं. नेहरू, योगी अरविंद बाबू यांसारया विविध प्रांतांतील थोर लोकांबरोबर स्नेहपूर्ण नाते होते. त्यामुळे त्यांचे अनुभवविश्र्व व जीवन अधिक समृद्ध झाले. कोकणीला स्वतंत्र भाषेचा दर्जा मिळावा, असा त्यांचा आग्रह होता .भारत सरकारने ‘पद्मकश्री ’ हा किताब देउन त्यांचा गौरव केला होता. गोव्याच्या स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतल्याबद्दल त्यांना ताम्रपट मिळाला होता. मा.बा भ. बोरकर यांचे ८ जुलै १९८४ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
बा भ. बोरकर यांची मा.पु.ल.देशपांडे यांनी घेतलेली मुलाखत
https://www.youtube.com/watch?v=JbqvWiVvJoI
https://www.youtube.com/watch?v=gFFLRyizEKQ
तव नयनांचे दल हलले ग
https://www.youtube.com/watch?v=34DeXdkusBY
आयुष्याची आता
https://www.youtube.com/watch?v=q_6Pp56xHSU
बा भ. बोरकर यांची कविता मा.पु.ल.देशपांडे यांच्या आवाजात
इतुक्या लवकर येई न मरणा
https://www.youtube.com/watch?v=UGmkOw7M1eU
बा भ. बोरकर यांची कविता मा.पु.ल.देशपांडे यांच्या आवाजात
बा. भ. बोरकर यांच्या 'जपानी रमलाची रात्र' या कवितेचे पु. ल. देशपांडे यांनी केलेले वाचन
https://www.youtube.com/watch?v=uQrxXJ70lcM
ऑल इंडिया रेडिओमध्ये प्रोड्यूसर म्हणून काम करताना गजेंदगडकर यांना गंगूबाई हनगल, कुमार गंधर्व, मल्लिकार्जुन मन्सूर यांच्यासारख्या अनेक श्रेष्ठ गायकांचा सहवास लाभला.
Copyright © 2025 | Marathisrushti