(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • वारी..

    संत आणि वारी यांचा वेध घेण्याचा केलेला छोटासा प्रयत्न…

  • मराठी चित्रपट दिशा आणि मार्ग

    2020 च्या मार्च महिन्याआधी आपण ज्या गोष्टी आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग म्हणून गृहीत धरुन चाललो होतो, त्यात भरलेल्या चित्रपटगृहात पॉपकॉर्न खात मजेत सिनेमा पहाणं, ही एक गोष्ट होती. त्या पार्श्वभूमीवर पहिल्या लॉकडाउनमधे थिएटर्स बंद होणं आणि टेलिव्हिजन हे आपलं करमणुकीचं प्रमुख साधन बनणं हा एक प्रकारचा सांस्कृतिक धक्काच होता…..

  • नितळ चंद्रकौंस

    आपल्या रागदारी संगीताचा जेंव्हा साकल्याने विचार करायला लागतो, तेंव्हा प्रत्येकवेळी मला कुसुमाग्रजांची कविता आठवते आणि आपला विचार किती "थिटा" आहे, याची नव्याने जाणीव होते. "मुक्तायन" काव्यसंग्रहात, "मी" या कवितेतील काही ओळी या वाक्यावर थोडा प्रकाश पाडू शकतील, असे वाटते. त्या ओळीत मी थोडा बदल केला आहे!!
    "माणूस आपल्यापर्यंत पोहोचतो तो संबंधामधून, पण त्या संबंधाच्या तुकड्याहून तो केव्हढातरी अफाट प्रचंड असतो;
    खिडकीच्या काचेतून चंद्र किरणांचा कवडसा आपल्या खोलीत पडतो,
    पण कवडसाच, चंद्र नव्हे;
    हजारो कवडसे पडले तरी, आकाशातील ती शीतल घटना;
    अनोळखीच राहते आपल्या जाणिवांना."
    रागसंगीताबाबत संपूर्ण विचार जरी थोडा बाजूला ठेवला तरी, काही रागांबाबत देखील आपण, एकच एक भावना व्यक्त करणे निरातिशय जिकीरीचे आणि चुकीचे देखील ठरू शकते. इतक्या अनंत भावनांच्या छटा, त्या रागांतून, आपल्याला वेगवेगळ्या कारणाने जाणवत राहतात. काहीवेळा, काही प्रतिभावंत कलाकार त्यात, प्रत्येकवेळी स्वत:चा असा वेगळा विचार मांडून, त्या रागाची वेगळीच ओळख आपल्याला करून देतात आणि आपण मात्र, त्या रागाच्या दर्शनाने, अचंबित होतो.
    चंद्रकौंस रागाबाबत माझी अशीच थोडी भावना आहे. खरे सांगायचे तर केवळ हाच राग कशाला, प्रत्येक रागाबाबत मला असेच वाटत आले आहे. आपण रागाला एका कुठल्यातरी भावनेचा रंग देतो आणि त्या चित्रात त्याला "बंदिस्त" करतो पण प्रत्यक्षात तो राग, आपल्याला प्रत्येक क्षणी वेगवेगळ्या रंगाने मोहवून टाकत असतो. इथे या रागाला "नितळ" म्हणताना, माझी अवस्था अशी किंचित द्विधा झाली आहे.
    "अनंत शिखरे निळी शिशिरमुग्ध संध्येतली,
    मधून जडली तिला जलतरंग मेघावली;
    तुझे बहरगीत की मयुरपंखसे आरसे,
    अरण्यभर सांडला मधुर अस्त माझा दिसे".
    कवी ग्रेस, यांच्या ओळी बहुदा माझा विचार स्पष्ट करतील.
    आता थोडे तांत्रिक भागाकडे वळायचे झाल्यास, या रागाची ओळख - "औडव-औडव" अशी करता येते. "रिषभ" आणि "पंचम" स्वरांना या रागात स्थान नाही. "गंधार" आणि "धैवत" हे कोमल स्वर तर बाकीचे तीनही स्वर शुद्ध. रागच समय, रात्रीचे पहिला प्रहर असा दिला आहे आणि त्यातूनच माझ्या मनात "नितळ" ही कल्पना आली. उत्तरांग प्रधान राग आहे आणि प्रमुख स्वर संहती बघायला गेल्यास, "सा ग म ग सा नि नि सा"; " ग म ध नि सा" अशी ऐकायला मिळते.
    किंचित अनुनासिक स्वर, अतिशय धारदार आवाज, लांब पल्ल्याचा गळा, पंजाबी धाटणीची गायकी आणि स्वरांवर "काबू" ठेवण्याची वृत्ती तसेच गाताना, अचानक "अकल्पित" स्वरस्थानांवर स्थिरावून, रसिकांना "धक्का" देण्याची आवड!! पंडित वसंतराव देशपांडे, यांच्या गायकीबद्दल असे काहीसे ढोबळ वर्णन करता येईल. वसंतराव "आलापी" गायनात फारसे रंगत नाहीत, असा एक "आरोप" त्यांच्याबाबतीत केला जातो परंतु जर का त्यांची "गायकी" जरा बारकाईने ऐकली तर त्यात फारसे तथ्य नाही, हेच आपल्याला कळून घेता येईल. खरी गोम अशी आहे, बहुतेकांना गायनात "चमत्कृती" आकर्षित करीत असते आणि तेच गायकीचे वैभव, असला चुकीचा समज करून घेतला जातो. याचाच परिणाम असा होतो, रसिकांना गायनातील "सरगम" या अलंकाराचे अतोनात असलेले आकर्षण!! वास्तविक, "सरगम" म्हणजे येऊ घातलेल्या तानेचा किंवा आधीच घेतलेल्या तानेचा किंवा आलापीचा "आराखडा" असतो परंतु या बाबीकडे दुर्लक्ष होते. वसंतरावांच्या बाबतीत, बरेचवेळा असेच घडत आले आहे.
    "येरी माई गुनिजन" या रचनेतील सुरवातीला आलेली आलापी आणि ठाय लयीतील बंदिश ऐकताना, काही बाबी अवश्यमेव ध्यानात येतात. एखादी हरकत घेऊन किंवा तान घेऊन, परत समेवर येताना, स्वरांवर "किंचित" आघात देऊन ठेहराव घेणे किंवा मध्येच एखादी खंडित तान घेताना, स्वरांना जोरकस "धक्का" द्यायचा!! कदाचित, यामुळेच बहुदा, हा गायक, आलापीमध्ये रमत नाही, असा प्रवाद पसरला असावा. स्वच्छ, मोकळा आवाज, तिन्ही सप्तकात विनासायास "विहार" करण्याची अचाट क्षमता आणि प्रयोगशील गायकी, ताना घेताना, अफाट बुद्धीगम्यतेचा परिचय करून देणारी गायकी आहे. ठाय लयीतील हरकतींचा आस्वाद घेताना, याचा आपल्याला प्रत्यय घेता येतो. गायन ऐकताना, काही ठिकाणी, "किराणा" घराण्याची छाप जाणवते. या रचनेत, बराच वेळ सरगम घेतली आहे आणि ती ऐकताना, "धैवत" स्वरावर जो "ठेहराव" घेतला आहे, तो खास ऐकण्यासारखा आहे. मी मुद्दामून ही रचना निवडली कारण ही रचना बहुतांशी "ठाय" आणि "मध्य"लयीतच सादर केली आहे.
    वास्तववादी चित्रपट निर्मितीत ज्याचा उद्भव होतो, त्या संगीतावरच भर असलेले संगीतकार म्हणून वसंत देसाई, यांचे नाव घ्यावे लागेल. हिंदी, मराठी चित्रपट तसेच मराठी नाटक, या सगळ्या माध्यमात, सहज वावर करणारे अभ्यासू व्यक्तिमत्व, असे देसायांबद्दल ठाम विधान करता येईल. याचा थोडा परिणाम असा झाला, त्याच्या रचनांत, कुठेतरी नाट्यसंगीताचा गंध राहिला, असे जाणवते. या शिवाय असेही जाणवते, पारंपारिक सांगीत चलने आणि चाली यांच्या अंगभूत सांगीत आकर्षणशक्तीवर विश्वास असल्याकारणाने त्या जागा, जशाच्या तशा व परिणामकारकतेने वापरण्यात त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. हिंदुस्थानी कलासंगीताचा आपण यथातथ्य वापर करतो असा मराठी नाट्यसंगीत परंपरेचा दावा बऱ्याच अंशी सार्थ असतो, ध्यानात घेणे जरुरीचे आहे. या परंपरेचा आणि वसंत देसाई यांचा देखील, कलासंगीतास पातळ करून वापरण्यावर भर नव्हता. आणखी एक विशेष मांडता येईल. ज्या व्ही. शांताराम यांच्याशी आणि त्यांच्या चित्रपट निर्मितीशी आयुष्यभर जवळचे संबंध असून देखील, जेंव्हा त्यांनी बाहेरचे चित्रपट निवडले, तिथे मात्र त्यांच्या शैलीचे वेगळे आणि अधिक विलोभनीय दर्शन घडते.
    "सन सनन सनन सनन, जा रे ओ पवन" हे गाणे "संपूर्ण रामायण" चित्रपटातील गाणे "चंद्रकौंस" रागाची आठवण करून देते. चंद्रकौंस रागाच्या सावलीत बांधलेले गाणे असून, चित्रपट गीतांत प्रसिद्ध असलेल्या "दादरा" तालात बांधलेले आहे.
    "सन सनन सनन सनन, जा रे ओ पवन;
    दूर देस लेजा संदेस जहां मेरा सजन;
    जा रे ओ पवन."
    "संपूर्ण रामायण" सारख्या धार्मिक चित्रपट असल्याने, चालीची रचना आणि वाद्यमेळ, यात पारंपरिकता येणे क्रमप्राप्तच ठरते तरी देखील, चालीचा जरा बारकाईने विचार केला तर लगेच आपल्याला कळेल, चालीचा ढंग "गायकी" अंगाकडे झुकलेला आहे आणि रचनेत विस्ताराच्या भरपूर शक्यता आहेत. अर्थात, गायला लताबाई असल्याने, मुळातला सांगीतिक मजकूर, तितक्याच सक्षमतेने सादर केला जातो. गाण्यातील "पॉजेस" तसेच अचानक वरच्या सप्तकात चाल जाणे, ही तर या गाण्याची वैशिष्ट्ये आहेत परंतु त्याचबरोबर, गाताना, बरेचवेळा शब्द तोडून गाण्यावर भर दिला जातो आणि याचे कारण, लयीच्या बंधनात, न बसणारी शब्दरचना. वसंत देसायांच्या रचनेत, शब्दांचे "औचित्य" या बाबतीत नेमकेपणाने सांभाळलेले दिसते.
    संगीतकार म्हणून जरी पु.ल.देशपांडे यांची कारकीर्द दीर्घकालीन नसली तरी त्यांनी आपल्या काळात, अनेक असामान्य रचना तयार करून, त्यांनी आपल्यातील "कलाकारा"चे अंग अप्रतिमरीत्या दाखवून दिले आहे. बऱ्याचशा रचना तशा सहज, कुणालाही भुरळ पडतील अशा आणि गुणगुणता येतील अशा पातळीवर वावरतात. चित्रपटातील गाणी, खासगी भावगीते या प्रांतात या संगीतकाराचा प्रामुख्याने वावर राहिला. रचनाकार म्हणून जरी फार प्रयोगशील नसले तरी देखील,रचना "प्रासादिक" तसेच "रसाळ" म्हणता येतील. त्यांच्या रचनांवर काही प्रमाणात "बालगंधर्व" गायकीचा असर होता, हे स्पष्टपणे जाणवते. "हसले मनी चांदणे" हे मराठीतील प्रसिद्ध भावगीत, चंद्रकौंस रागावर आधारित आहे.
    "हसले मनी चांदणे,
    जपुनी टाक पाउलं साजणी नादतील पैंजणे".
    काहीशी पंजाबी धाटणीची पण तरीही मराठी नाट्यसंगीताचा "असर" दर्शविणारी रचना आहे. माणिक वर्मा यांचा किंचित अनुनासिक स्वर, लडिवाळ गायकी आणि कवितेचा आशय ध्यानात घेता, रचनेची चाल फारच सुंदर आहे. किराणा घराण्याची पूर्वपिठीका असल्याने, गाण्यात एकूणच "उदारता" हा विशेष जाणवतो. पंजाब अंगाची फिरत पण मादकपणाशिवाय, नखरा पण अगदी लखनवी घराण्याचा नाही तसेच बनारसी ठुमरीच्या जवळ जाणाऱ्या प्रसरणशील चालींची भावगीते, हा खास आविष्कार. मुखडा जरी खालच्या अंगाने येणारा असला तरी पहिली लकेर सफाईने खालून वर जाणार आणि अनेकदा पंजाबी वक्र वळणे घेत खाली येणार. भावपट मोठा नाही परंतु संदिग्ध गोडवा, हा स्थायीभाव. यामुळे, माणिक वर्मांची भावगीते महाराष्ट्रात प्रचंड गाजली. ताला शिवाय केलेली आलापी किंवा तालासाहित केलेली आलापी किंवा घेतलेल्या हरकती ऐकताना, इतर भावगीत गायिका आणि माणिक वर्मा यांची गायकी, यात फरक कळून येतो. याचा वेगळा अर्थ असा लावता येईल, मराठी भावगीतांत माणिक वर्मा, यांनी उत्तरेचा रंग फार सफाईने आणला आणि महाराष्ट्रात रुजवला.
    मराठी चित्रपट "पाठलाग" मध्ये असेच अनोख्या चालीचे - या डोळ्यांची दोन पांखरे हे गाणे "चंद्रकौंस" रागाची सावली दर्शवतात.
    "या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती,
    पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगती".
    माडगूळकरांची चित्रदर्शी शैली आणि संगीतकार दत्ता डावजेकरांची अतिशय अवघड चाल, याचे अनोखे मिश्रण या गाण्यात झाले आहे. अशी चाल गायला फक्त आशा भोसले यांचाच गळा आवश्यक आहे, याची सत्यता गाणे ऐकताना सारखे जाणवत राहते. अत्यंत मोजका वाद्यमेळ आणि गायकी ढंगाची चाल, यामुळे हे गाणे, रागाचे नाते सोडून कधी स्वत:चे अस्तित्व निर्माण करते, याचा पत्ताच लागत नाही आणि हीच तर खरी सुगम संगीताची खासियत आहे.
    प्रसिद्ध संगीतकार यशवंत देवांनी या रागावर आधारित असेच एक चिरस्मरणीय गीत दिले आहे. सुधीर फडक्यांनी आपल्या भावगर्भ शैलीत हे गाणे कायमचे चिरंजीव करून ठेवले आहे.
    "त्या तरुतळी विसरले गीत,
    हृदय रिकामे घेउन फिरतो,
    इथे तिथे टेकीत."
    कविवर्य वा.रा. कातांची कविता असून, तसे बघितले तर हे गीत म्हणजे अप्रतिम भावकविता आहे पण तरीही यशवंत देवांनी त्यातील "चाल" हुडकून, इतकी सुंदर चाल लावली. या गाण्यात देखील नाममात्र वाद्यमेळ असून कवितेतील आशय, स्वररचनेतून मुखरित केला आहे. या गाण्यात, जरा बारकाईने ऐकले तर सुरवातीच्या ओळींत "चंद्रकौंस" राग सापडतो पण नंतर कवितेच्या अनुषंगाने चाल फिरते आणि आपल्या हाती असामान्य चालीची रचना ऐकायला मिळते.
    -- अनिल गोविलकर

  • लायब्ररी

    एक वास्तू माझ्या-तुमच्या, सगळ्यांच्या कॉलेजमध्ये आहे. आपण येता-जाता ती नेहमीच बघतो. कोणती ही वास्तू?आठवतं का? ही आहे आपल्याच कॉलेजमधली लायब्ररी. बरेच दिवस इथे तुमची पावलं फिरकली नसतील तर चला एक फेरफटका मारू.

    कॉलेजातली लायब्ररी.. एका कोप-यातली.. शांत शांत. जिथे पाऊल टाकताना तिथल्या शांततेचा दबदबा वाटतो. जरा कुठे खुट्ट आवाज झाला की सर्व कोप-यांमध्ये अचूक नजर ठेवून असणा-या लायब्ररीयनची नजर आपल्याकडेच असेल म्हणून आपल्याला तिथे भीती वाटते. अर्थात त्यांची भीती वाटते म्हणून नाही पण एकूणच लायब्ररीत जाण्याची फारशी हौस नसल्यामुळे आपण तिथे फिरकत नाही. कधी कधी लेक्चरला बंक मारून टाईमपास म्हणून लायब्ररीत जाऊन पुस्तकं चाळण्याची हुक्की येते पण तिथे ग्रुपने जाऊन गप्पा मारता येत नाहीत, मग अशा खेपा कमीच होतात. लायब्ररीची आठवण सर्वानाच हमखास परीक्षेच्या वेळी येते.

    निवांत अभ्यास करण्यासाठी कॉलेजातले सर्व कट्टे भरून जातात तेव्हा लायब्ररीत जागेची शोधाशोध सुरू होते. इथल्या शांततेत आणि मित्रमैत्रिणींच्या बरोबर अभ्यासाला एक वेगळीच लय येते. खरं तर इथली पुस्तकं आयुष्य समृद्ध करणारी असतात. आता मात्र एका क्लिकवर मिळणा-या माहितीकडे कल वाढला असून कॉलेजातली लायब्ररी विस्मृतीत जातेय की काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. आजकाल विद्यार्थ्यांना ई-लायब्ररी मोबाईलवर उपलब्ध असते. पण काहीही असो.. ख-या लायब्ररीची सर कोणालाच येणार नाही. याचं कारण तिथलं वातावरण. मन लावून अभ्यास करण्याची स्फूर्ती देणारी जागा म्हणजे कॉलेजातली लायब्ररी. ‘अभ्यासू’ प्रकारात मोडणा-या मुलांचं जणू दुसरं घर. आपल्या महाविद्यालयीन अभ्यासक्रमातील नोट्सपासून ते साहित्यविश्वातील प्रसिद्ध पुस्तकं, वृत्तपत्रे, साप्ताहिके, पाक्षिक, मासिके, नियतकालिके, अनियतकालिके, दिवाळी अंक आदी सर्व आपल्या कॉलेज लायब्ररीमध्ये उपलब्ध असतात. परंतु हल्लीचे विद्यार्थी इंटरनेटवर जास्त विसंबून राहात असल्यामुळे लायब्ररी आता सुनीसुनी वाटते.

    चुकला फकीर मशिदीत सापडतो त्याप्रमाणे परीक्षेच्या काळात चुकला विद्यार्थी सापडण्याची हमखास जागा म्हणजे लायब्ररी! कधी कोणाचा डोळा चुकवायचा असेल तर विद्यार्थी मुद्दामहून लायब्ररीत जाऊन बसतात. अभ्यास करताना संदर्भासाठी लागणारी पुस्तकेही इथे असतात, परंतु इंटरनेटनं आपल्याला एवढं आळशी बनवलं आहे की सर्च इंजिनमध्ये आपल्याला हवा असलेला शब्द टाकला तर त्याच्याशी संबंधित लाखो वेबसाईटस् मिळतात. मग का बरं संदर्भाची एवढी जड पुस्तके वाचायची? असा विचार करणारे विद्यार्थी लायब्ररीकडे फिरकत नाहीत.

    आपण, थ्री इडियटस्, टू स्टेट्स, कुछ कुछ होता है, मोहब्बते अशा चित्रपटांमध्ये कॉलेज लायब्ररी पाहिली असेल. पुस्तकांनी भरगच्च लायब्ररी, त्यात प्रेमीयुगुल डोळ्यांनी बोलताहेत किंवा एखादं कॉलेज जीवनातलं रोमँटिक गाणं असं काहीसं चित्र तुमच्या मनात लायब्ररीविषयी असेल. या फिल्मी लायब्र-या पडद्यावर पाहायला मजा वाटते. पण तुमच्या स्वत:च्या कॉलेजच्या लायब्ररीतही जरा डोकावून पाहा की! आजची तरुणाईही खूप वाचते, लिहिते असं म्हणतात. पण हे वाचणं केवळ ऑनलाईन रीडिंग आहे किंवा ऑनलाईन विकत घेतलेलं पुस्तक असतं. त्यामुळे भरगच्च वाटणारी कॉलेज लायब्ररी आता काहीशी ओस पडलेली दिसते. काही महाविद्यालयात तर आपली नजरही पुरणार नाही एवढय़ा लांबचलांब लायब्ररी आहेत, जिथे गेल्यावर हे पुस्तक घेऊ की ते घेऊ असा विचार पडतो.

    पूर्वी परीक्षेच्या काळात तर लायब्ररीमध्ये बसण्यासाठी रांगा लागत असत. बसायला जागा मिळणार नाही या विचारानेच विद्यार्थ्यांना सकाळी लवकर जाग यायची, त्यातही आपल्याला हवं असलेलं पुस्तक जर कोणी घेतलं तर परीक्षा संपेपर्यंत आपल्या हातात येणार नाही या कल्पनेनं बिचारे विद्यार्थी सकाळीच कॉलेजची पायरी चढत असत. शिवाय गेल्या वर्षीच्या नोट्स, गेल्या वर्षीचे पेपर्स हे सारं लायब्ररीत उपलब्ध असल्याने त्यासाठीही विद्यार्थ्यांची रांग लागायची. आणि हो.. आजही हे सर्व अभ्यास साहित्य तुमच्या कॉलेजच्या लायब्ररीत देखील उपलब्ध आहे बरं!

    लायब्ररी हे दुसरं घर वाटतं त्यामुळे तिथले ग्रंथपाल म्हणजे लायब्ररीयन सुद्धा अगदी घरचेच वाटतात. प्रत्येक वर्षात शिकणा-या विद्यार्थ्यांवर यांची बारीक नजर असते. आताशा मुलांना आपला ग्रंथपाल कोण आहे याची देखील जाणीव नसते. कोणत्या चित्रपटाचं शूटिंग असेल किंवा प्रश्नपत्रिका लायब्ररीत मिळत आहेत अशी अफवा उठली तरच आपण लायब्ररीचा रस्ता धरतो, नाही तर ती वाट मात्र विद्यार्थ्यांची वाट पाहतच उभी राहते. इंटरनेटवर सर्व पुस्तके उपलब्ध असली तरी कधीतरी त्या लायब्ररीत जाऊन बघा, माहीत नसलेली पण वाचावीशी वाटतील अशा पुस्तकांशीही तुमची भेट होईल. केवळ परीक्षा आलीय म्हणून जाऊ नका, तर आपल्याच कॉलेजचा हा एक भाग तुमच्या किती मदतीचा ठरू शकतो हे अनुभवण्यासाठी लायब्ररीची रोज एक खेप माराच. इथेच वाचन, संग्रह, लिखाणासारख्या चांगल्या सवयी लागतील. आणि तुमच्या येण्या-जाण्यामुळे थोडीशी अडगळीत पडलेली कॉलेजची लायब्ररी पुन्हा एकदा हॅपनिंग होईल!

    -- स्नेहा कोलते

  • जे वेड मजला लागले

    १९६० साली प्रदर्शित झालेल्या अवघाची संसार या चित्रपटातील हे गाणे. या गाण्याचे शब्द होते शांता शेळके यांचे. संगीत होते वसंतराव पवार यांचे. तर आशा भोसले, सुधीर फडके यांच्या सुमधुर आवाजात हे गाणे चित्रित करण्यात आले. चला तर मग ऐकुया हे गाणे..

  • हे बंध रेशमाचे… (लग्नाच्या दुसर्‍या वाढदिवसाच्या निमित्त)

    पण कुसुमाग्रजांची प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं ही कविता चांगलीच पाठ होती.. लग्नाची मागणी घालताना या कवितेचा आधार वाटला. “तुला पाहिलं की वाटतं देव खुप श्रिमंत असेल..

  • प्लॅस्टिक चलनाने समस्या सुटतील का?

    प्लॅस्टिकच्या चलनी नोटा आता काही शहरात थोडयाच दिवसात व्यवहारात येणार आहेत असे वृत्तपत्रातून वाचनात आले. पॉलिप्रॉपलीन नावाच्या पॉलिमरपासून या नोटा तयार करण्यात येणार असल्याने खराब झाल्यानंतरही त्यांचा पुनर्वापर शक्य होणार आहे.

  • विंटर स्पेशल अलिबाग

    लहान असताना मांडव्याला मामाच्या घरी लाकडी माळ्यावर सकाळी सकाळी लवकर जाग यायची ती समुद्राच्या लाटांच्या आवाजाने. जानेवारीत माघी गणेशोत्सवाला थंडी पडलेली असताना मांडव्यात आम्ही सगळे एकत्र जमायचो.

  • स्वामी विवेकानंद बालपणीचे

    कोलकत्याच्या उत्तरेकडील शिमुलिया नावाच्या विभागात गौरमोहन मुखर्जी मार्गावरील दत्त कुटुंबियांच्या भव्य अशा घरात स्वामी विवेकानंद यांचा दि. ०२ जानेवारी १८६३ रोजी जन्म झाला. सकाळी ६ वाजून ३३ सेकंदानी शुवनेश्वरी यांनी या स्वामी विवेकानंदांना जन्म दिला.

  • ज्योतिषविषयक टिप्स – भाग २

    ज्योतिषविषयक माहिती व उपाय सांगणार्‍या या सदरात पत्रिकेतील विविध ग्रहांच्या वेगवेगळ्या स्थानांविषयी माहिती दिली जाईल. या भागात पत्रिकेत मंगळ असलेल्या व्यक्तींसाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. हे साधे सोपे उपाय अवलंबून पहा....


    सप्तम स्थानातील मंगळ - ज्यांच्या पत्रीकेत सप्तम स्थानात मंगळ आहे त्यांनी करावयाचे उपाय.

    १ - पोवळे धारण करणे.
    २ - खोटे बोलु नका.
    ३ - नोकरांना खुश ठेवा.
    ४ - गणपतीची उपासना करा.

    अष्टम स्थानातील मंगळ - ज्यांच्या पत्रीकेत अष्टम स्थानात मंगळ आहे त्यांनी करावयाचे उपाय.

    १ - गणपतीची उपासना करणे.
    २ - मसुरडाळ मंदिरात दान करणे.
    ३ - विधवा स्त्री ला मदत करणे.व तिचा आशिर्वाद घेणे.
    ४ - चांदीची अंगठी बोटात घालणे.

    नवम स्थानातील मंगळ - ज्यांच्या पत्रिकेत नवंम स्थानात मंगळ आहे त्यांनी करायचे उपाय.

    १ - लाल रंगाचा रुमाल जवळ ठेवणे.
    २ - मंगळवारी मारुतीला शेंदुर लावणे.
    ३ - काळभैरवाची उपासना करणे.
    ४ - विधवा स्त्रिला मदत करणे.

    दशम स्थानातील मंगळ - ज्यांच्या पत्रिकेत दशम स्थानात मंगळ आहे त्यांनी करायचे उपाय.

    १ - सोने विकु नये
    २ - अपंग व्यक्तीला मदत करावी.
    ३ - घरात दुध उतु जाऊन देवु नये.
    ४ - निपुत्रीकाची सेवा करा

    अकराव्या स्थानातील मंगळ - ज्यांच्या पत्रिकेत अकराव्या स्थानात मंगळ आहे त्यांनी करायचे उपाय

    १ - पांढरा कुत्रा घरात पाळा.
    २ - गणपतिची उपासना करा.
    ३ - वडिलोपार्जीत इस्टेट विकु नये.
    ४ - रुग्णांना मदत करा.

    बाराव्या स्थानातील मंगळ. - ज्यांच्या पत्रिकेत बाराव्या स्थानात मंगळ आहे त्यांनी करायचे उपाय.

    १ - सकाळी उठल्यावर मध खाणे.
    २ - पक्षांना धान्य घालणे
    ३ - १५ दिवस सलग सव्वाई गुळ पाण्यात प्रवाहित करणे.

    सौ. निलीमा प्रधान