जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
सुचित्रा सेन यांचे विवाहाआधीचे नाव रमा दासगुप्ता असे होते. त्यांचा जन्म ६ एप्रिल १९३१ रोजी झाला. किमान तीन दशके तरी आपल्या सौंदर्याबरोबरच, सशक्त अभिनयाने सुचित्रा सेन या बंगाली चित्रपटाच्या सुवर्णयुगातील एक महत्त्वाच्या साक्षीदार ठरल्या. अग्निपरीक्षा, देवदास, सात पाके बंधा हे त्यांचे बंगाली चित्रपट विशेष लक्षात राहिले. हरणासारखे नेत्रसौंदर्य (मृगनयनी) लाभलेल्या सुचित्रा सेन यांनी सत्तरच्या दशकात चित्रपटसृष्टी सोडली. नेहमी सार्वजनिक जीवनात मिसळणे टाळणाऱ्या सुचित्रा सेन या बंगालच्या ‘ग्रेटा गाब्रो’ म्हणून प्रसिद्ध होत्या. कन्नन देवी यांच्यानंतर बंगालमधील एकाही अभिनेत्रीला सुचित्रा सेन यांच्याइतके चाहते मिळाले नाहीत. त्यांची लोकप्रियता इतकी होती, की दुर्गापूजेच्या वेळी दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती यांच्या प्रतिमा सुचित्रा सेन यांच्या चेहऱ्यावर बेतल्या जात असत. ‘शेष कोठाई’ या चित्रपटापासून त्यांनी १९५२ मध्ये सुरुवात केली व नंतर बिमल रॉय यांच्या १९५५ मधील ‘देवदास’ या चित्रपटात त्यांना दिलीपकुमारच्या देवदासबरोबर साकारलेल्या पारोच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. बंगाली अभिनेते उत्तम कुमार यांच्याबरोबर त्यांची चांगली जोडी पडद्यावर जुळली. त्यांचे हारनो सूर (१९५७), अग्निपरीक्षा (१९५४), सप्तपदी (१९६१), ग्रिहदाह (१९६७), इंद्राणी (१९५८), सागरिका (१९५६), बिपाशा (१९६२), कमल लता (१९६९), अलो आमार अलो (१९७२), हर मन हर (१९७२) व प्रियो बंधाबी (१९७५) हे चित्रपट संस्मरणीय ठरले. त्यांनी ५२ बंगाली तर ७ हिंदी चित्रपट केले. भारतभूषणबरोबरचा चंपाकली, देव आनंदबरोबर सरहद, बंबई का बाबू यासह ममता हा एक चित्रपटही त्यांनी केला होता. १९७४मध्ये त्यांनी ‘देवदास’नंतर गुलजार यांच्या ‘आँधी’ चित्रपटाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. संजीव कुमार यांच्यासमवेत त्यांनी जी भूमिका केली होती, त्यात त्यांची भूमिका ही इंदिरा गांधी यांच्या जीवनाशी मिळतीजुळती होती त्यामुळे तेव्हा वाद निर्माण झाला होता. १९७८ मध्ये त्यांनी सौमित्र चटर्जी यांच्याबरोबर ‘प्रणोय पाश’ हा चित्रपट केला. तो पडला. त्यानंतर सुचित्रा सेन कधीच कुणाला दिसल्या नाहीत व २००५ मध्ये त्यांनी दादासाहेब फाळके पुरस्कार नाकारला होता. यशस्वी कारकिर्दीनंतर अचानक त्या एकाकी आयुष्य जगू लागल्या होत्या. आपल्या घरातच त्यांनी स्वतःला बंदिस्त करून घेतले होते. २००५ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यांना भारत सरकार कडून पद्मश्री आणि बंगाल सरकार कडून बंगबिभूषण हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. मा.सुचित्रा सेन यांचे निधन १७ जानेवारी २०१४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सुंदरता', 'नृत्य' आणि 'अभिनय' यांचा सुरेख त्रिवेणी मिलाफ म्हणजे माधुरी दीक्षित. तिचा जन्म १५ मे १९६७ रोजी झाला. पूर्वाश्रमीची माधुरी शंकर दीक्षित आणि आजच्या माधुरी श्रीराम नेने.
माधुरी ही ख-या अर्थाने सौंदर्य, अभिनय आणि नृत्य यांचा अभूतपूर्व एकत्रित संगम आहे. तिच्या आधीच्या सर्व सुपरस्टार या कुठे ना कुठे कमी होत्या. अपवाद फक्त रेखाचा. मधुबालाला नृत्यात मास्टरी नव्हती तर हेमा मालिनी सौंदर्यवती असली तरी अभिनयात डावी होती. श्रीदेवी नृत्यात काही प्रमाणात कमजोर होती आणि तिचे सौंदर्य हे काही परिपूर्ण नव्हते. माधुरी मात्र पहिली परिपूर्ण सुपरस्टार होती.
माधुरी दीक्षित यांनी १७ वर्षांची असताना पहिला चित्रपट राजश्री प्राँडक्शनचा 'अबोध' केला. 'अबोध' कुणी फारसा पाहिला नाही. पुढे माधुरी दीक्षित यांनी 'मोहरे', 'मानवहत्या' असे 'बी' ग्रेडचे चित्रपट केले. मीनाक्षी शेषाद्री प्रमुख भुमिकेमध्ये असतांना 'स्वाती' आणि 'आवाराबाप' या चित्रपटांमध्ये माधुरी यांनी सहाय्यक भूमिका केल्या. 'उत्तर दक्षिण' हा माधुरी दीक्षित यांचा पहिला व्यावसायिक चित्रपट. ज्या माधुरी यांनी मीनाक्षी सोबत सुरवातीला चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या त्याच 'घई कॅम्प' मध्ये माधुरीने दिमाखदार प्रवेश करून मीनाक्षीचीही 'छुट्टी' केली. त्यावेळी मराठी मुली फारश्या हिंदी चित्रपटात यशस्वी होत नव्हत्या, अपवाद फक्त नूतन, स्मिता पाटील आणि पद्मिनी कोल्हापुरे यांचा. पण 'तेजाब'च्या आधी ओळीने ८ अपयशी चित्रपट देऊन 'एक दो तीन ..' असे म्हणत माधुरीने घवघवीत यश मिळवले.
नंबर १ च्या पदावर विराजमान होणारी माधुरी ही पहिली मराठी अभिनेत्री ठरली. जे निर्माते तिला 'फिजीक' नाही असे म्हणायचे त्यांनाच तिच्यात कमालीचे 'सेक्स अपील' दिसू लागले. तिच्या दिलखेचक अदांनी तर संपूर्ण सिनेसृष्टीला दिवाणे केले. तिची 'हम आपके है कौन' मधील काम कमालीचे हिट ठरले. माधुरीच्या नावाचे 'गाणे' (माधुरी दीक्षित मिली रस्ते में..) आणि 'चित्रपट' (मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ) देखील आले. तिने २ चित्रपटात (धारावी, बड़े मियां छोटे मियां) 'माधुरी दीक्षित'चीच भूमिका केली. माधुरी दीक्षितची जोडी अभिनेता अनिल कपूरसोबत खूपच फेमस झाली होती.
अनिल-माधुरीच्या जोडीने त्याकाळी `तेजाब`, परिंदा`, `राम-लखन`, `किशन कन्हैया`, `जीवन एक संघर्ष`, `जमाई राजा`, `खेल` `बेटा`, `जिंदगी एक जुआ`, `राजकुमार`, `पुकार` हे हिट सिनेमे केले. त्यांनी केलेल्या जवळपास ५७ चित्रपटांपैकी १६ चित्रपटांतील भूमिकांसाठी त्यांना निरनिराळ्या पुरस्कारांसाठी 'नामांकन' मिळाले, तर ५ वेळा त्यांनी प्रतिष्ठेचा 'फिल्म फेअर' पुरस्कार दिल, बेटा, हम आपके हैं कौन, दिल तो पागल है, देवदास या चित्रपटांसाठी पटकावला. 'हम आपके हैं कौन' या चित्रपटानंतर तर माधुरी दीक्षित या लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या. मात्र त्यानंतर आलेले राजकुमार, प्रेमग्रंथ, कोयला, मृत्युदंड, महानता असे चित्रपट न चालल्याने 'माधुरीची जादू संपली..' अशा शब्दात समीक्षकांनी त्यांच्यावर टीका करणे सुरु केले. 'दिल तो पागल है' प्रदर्शित झाल्यावर सुरवातीला समीक्षकांनी करिष्मा कपूरचेच अधिक कौतुक केले होते. मात्र सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार 'दिल तो पागल है' साठी मिळाल्यानंतर याच समीक्षकांचे माधुरीने आभार मानले. कारण त्यांच्याचमुळे अधिक मेहनत करायची प्रेरणा मिळाली असल्याचे माधुरी दीक्षित यांनी नमूद करून आपल्या समीक्षकांच्या टीकेला चोख उत्तर दिले.
प्रसिध्द चित्रकार एम.एफ.हुसेन माधुरीवर अत्यंत फिदा असल्याने त्यांना एम.एफ.हुसेन ऐवजी एम.एफ. म्हणजे 'माधुरी' 'फिदा' हुसेन असे गमतीने संबोधले जायचे. माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित सर्वच नृत्यगीतं आज देखील लोकप्रिय आहेत. माधुरी दीक्षित यांची क्रेझ अजून देखील कायम आहे. माधुरी दीक्षित यांनी आपल्या सिने करियरमध्ये ७० सिनेमातून काम केले आहे. छोट्या पडद्यावर देखील त्यांनी 'झलक दिखला जा' द्वारे परीक्षक म्हणून रंगत आणली होती. माधुरी आणि संजय हे एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात होते, ते लग्नही करणार असल्याची चर्चा होती.
माधुरी दीक्षितने फिल्म इंडस्ट्रीत आल्यानंतर काहीच वर्षांत आपले बस्तान बसवले. संजय दत्तही त्याकाळात एक प्रसिद्ध अभिनेता होता. दोघांच्या प्रसिद्धीचा विचार करून त्यांना साजन या चित्रपटासाठी साईन केले गेले. हा चित्रपट आणि त्यातील गाणी प्रचंड गाजली होती. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान माधुरी आणि संजय एकमेकांच्या प्रेमात पडले, असे म्हटले जाते. साजन हा चित्रपट हिट झाल्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये संजय आणि माधुरी यांची जोडी झळकली. खलनायक या चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंत माधुरी आणि संजयच्या अफेअरची चर्चा सगळीकडेच सुरू झाली होती. माधुरीच्या कुटुंबीयांनी संजय आणि तिच्या नात्याला विरोध केला होता असेही म्हटले जाते.
संजयच्या आयुष्यात माधुरी येण्याआधी त्याचे लग्न झालेले होते. आज माधुरी दीक्षित या अमेरिकेमध्ये अनेकवर्षे स्थायिक होऊन देखील आपल्या दोन मुलांना पाश्चिमात्य संस्कृती ऐवजी भारतीय संस्कृतीत वाढवत आहे. लग्नानंतर माधुरी दीक्षित यांनी `गुलाब गॅंग` आणि `डेढ़ इश्किया` या सिनेमातून कमबॅक केले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
माधुरी दीक्षित यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=AEGYBrGVufY
https://www.youtube.com/watch?v=ErT1kN0MPTk
दामिनी, अवंतिका, अक्कासाहेब, राधिका असो की राजश्री प्रॉडक्श्नच्या गाजलेल्या हिंदी मालिका. रोहिणी निनावेंच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली प्रत्येक व्यक्तिरेखा आणि मालिका लोकप्रिय होतेच.
गोगा कपूर यांचे खरे नाव रविंद्र कपूर पण ते बॉलीवूड मध्ये गोगा कपूर या नावाने काम करत असत. अनेक चित्रपटात सपोर्टींग व्हिलनची भूमिका करणाऱ्या गोगा कपूर यांनी अभिनय क्षेत्रात रंगभूमीच्या माध्यमातून पदार्पण केले.
आनंद इंगळे हा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. आतापर्यंत त्याने बऱ्याच मराठी चित्रपटात आणि नाटकांत काम केले आहे. तो मराठी सिनेसृष्टीपुरता मर्यादित न रहाता हिंदी सिनेमासृष्टीत मुशाफिरी करू लागला आहे. त्याचा “Daddy” हा हिंदी सिनेमा बहुचर्चित ठरला.
आनंद अभ्यंकर यांचे शालेय शिक्षण नागपूरच्या सरस्वती हायस्कूलमध्ये झाले. शाळा, महाविद्यालयात किंवा गणेशोत्सवात नाटक बसवून त्या माध्यमातून अभ्यंकर यांनी छोट्या-छोट्या नाटकांमधून मराठी रंगभूमीवर प्रवेश केला. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्यात आले. त्यांचा जन्म २ जून १९६३ रोजी झाला. त्यांची रंगभूमीच्या क्षेत्रातील खरी कारकीर्द पुण्याला सुरू झाली. गरवारे महाविद्यालयात त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी व्यवस्थापन शास्त्राचेही शिक्षण घेतले. बजाज ऑटोमध्ये काही काळ त्यांनी नोकरी केली. मुंबईत आल्यावर उमेदवारीच्या काळात मोहन जोशी यांच्या साथीने त्यांनी कामासाठी संघर्ष केला.
शिक्षण आणि नोकरीच्या काळात त्यांनी काही नाट्य संस्थांसाठी काम करण्यास सुरुवात केली. ‘कुर्यात सदा टिंगलम्’द्वारे त्यांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर भक्ती बर्वे यांच्याबरोबर ‘आई रिटायर होतेय’, आनंद म्हसवेकर लिखित-दिग्दर्शित ‘चॉइस इज युवर्स’ अशा नाटकांमध्ये त्यांनी उल्लेखनीय भूमिका साकारल्या. ‘वादळवाट’, ‘असंभव’, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘फू बाई फू’, ‘मला सासू हवी’, ‘शुभंकरोती’, ‘या गोजिरवाण्या घरात’ आणि सह्याद्री वाहिनीवरील गोंदवलेकर महाराजांच्या मालिकेच्या माध्यमातून अभ्यंकर घराघरात पोहोचले. तर ‘वास्तव’, ‘जिस देश में गंगा रहता हैं’, ‘अकलेचे कांदे’, तेरा मेरा साथ रहें, ‘मातीच्या चुली’, ‘चेकमेट’, ‘कुंकू लावते माहेरचं’, ‘ही पोरगी कोणाची’, ‘पप्पू कांट डान्स साला’, ‘आनंदाचे झाड’, ‘आयडियाची कल्पना’, ‘जन्म’, ‘बालगंधर्व’ ,‘स्पंदन’ अशा चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या. आनंद अभ्यंकर यांचे २३ डिसेंबर २०१२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आज ५ नोव्हेंबर.. आज मराठी रंगभुमी दिवस
१८४३ साली विष्णुदास भावे यांनी 'संगीत सीतास्वयंवर ' नाटकाचा प्रयोग सदर करून मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली. १५० हून अधिक वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या मराठी रंगभूमीवर अनेक प्रयोग केले गेले ,आणि आजही अनेक नवे प्रयोग सातत्याने होत आहेत मा.विष्णूदास भावे यांनी ’सीता स्वयंवर’ हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणुन मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली. सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील 'दरबार हॉल’ मधे हा प्रयोग झाला. विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस ’मराठी रंगभूमी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. विष्णुदास भावे हे अतिशय बुद्धिमान हस्तकला कारागीर होते. अगदी बारीकसारीक हालचाली करू शकतील अशा लाकडाच्या असंख्य बाहुल्या त्यांनी बनवल्या होत्या. या बाहु्ल्या वापरून रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग करावयाचा त्यांचा इरादा होता परंतु काही कारणाने ते शक्य झाले नाही. विष्णुदास भाव्यांनी बनवलेल्या त्या बाहुल्या पुढे रामदास पाध्ये यांच्या हातात पडल्या. त्यांनी व त्यांच्या पत्नी अपर्णा पाध्ये यांनी खूप दिवस खटपट करून भाव्यांच्या बाहुल्यांच्या रहस्याचा छडा लावला, आणि एके दिवशी, विष्णुदास भाव्याना रंगमंचावर करता न आलेला सीता स्वयंवराचा प्रयोग त्याच बाहुल्या वापरून केला. मराठी रंगभूमी स्थापनादिन प्रतिवर्षी ठिकठिकाणी साजरा केला जातो. विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची ’अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती’ ही १९६० सालापासून ’विष्णुदास भावे गौरवपदक’ देत आली आहे. सांगली येथील ही समिती व राज्य मराठी नाटय परिषद यांच्यातर्फे दरवर्षी या दिवशी हे मानाचे पदक दिले जाते. मराठी रंगभूमीचे आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या नावाचे गौरव पदक, ११ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असते. मराठी रंगभूमीवर प्रदीर्घ सेवा करणार्यार ज्येष्ठ कलाकारास हे गौरव पदक देण्यात येऊन सन्मानित करण्यात येते. आत्तापर्यंत हा पुरस्कार वसंत कानेटकर, पु.श्री.काळे, मास्टर कृष्णराव, दुर्गा खोटे, छोटा गंधर्व, केशवराव दाते, प्रभाकर पणशीकर, मामा पेंडसे, भालचंद्र पेंढारकर, नानासाहेब फाटक, हिराबाई बडोदेकर, बालगंधर्व, विश्राम बेडेकर, ज्योस्ना भोळे, ग.दि.माडगूळकर, बापूराव माने, माधव मनोहर, शरद तळवलकर, दिलीप प्रभावळकर,रामदास कामत, शं.ना. नवरे , फय्याज इमाम शेख, रत्नाकर मतकरी, अमोल पालेकर, महेश एलकुंचवार, डॉ.जब्बार पटेल आदींना मिळाला आहे. या वर्षीचा पुरस्कार मा. अनेक नाटके, शंभरहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केलेले ज्येष्ठ अभिनेते मा. जयंत सावरकर यांना मिळाला आहे. छोट्या मोठ्या कोणत्याही भूमिकेत असले तरी आपली अभिनयाची स्मृती रसिकांच्या मनात उमटवणाऱ्या जयंत सावरकर यांना हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद सर्वांनाच झाला, यातच या व्रतस्थाला मिळालेली सन्मानाची पावती आहे. मराठी रंगभूमीचे संस्थापक विष्णुदास भावे यांच्या नावाने येत्या मराठी रंगभूमी दिनी, आज पाच नोव्हेंबरला सांगलीत वितरण होत आहे.या पुरस्काराने अभिनयाची साठी गाठलेले आणि सहस्रचंद्रदर्शनांकित अभिनेते असलेल्या सावरकर यांना त्यांच्या आयुष्यभराच्या भूमिकांना मिळालेली दाद आहे. त्यांचा हा नित्यनूतन उत्साह असाच राहो, हीच या पुरस्काराच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा!
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
डेसमंड टूटू यांना दक्षिण आफ्रिकेत रंगभेद विरोधाचं प्रतिक म्हणून ओळखलं जातं. त्यांना देशाची नैतिक कम्पास (Country’s Moral Compass) म्हणूनही ओळखलं जातं. त्यांनी नेहमी विवेकवादाची बाजू घेतली.
दो बिगा जमीन, देवदास, मधुमती, सुजाता आणि बंदिनी आदी चित्रपटांतून रसिकांच्या मनावर मोहिनी घालणारे हिंदी चित्रपट दिग्दर्शक म्हणजे बिमल रॉय. त्यांचा जन्म १२ जुलै १९०९ रोजी झाला. हिंदी चित्रपटसृष्टीत त्या काळात कधी शेतकऱयांची व्यथा, रहस्यमय, विरह, समाजव्यवस्था आदी विषय त्यांनी आपल्या चित्रपटातून हाताळले आणि आपली वेगळी छाप त्यांनी निर्माण केली. ते खास करून चित्रपटामध्ये सौदर्याचा वापर करून घेणार दिग्दर्शक म्हणून ओळखले जात. त्यांच्या चित्रपटातील प्रत्येक फ्रेम ही कलात्मक असायची. मा.बिमल रॉय यांच्या चित्रपटात संवेदनशील नातेसंबंध आणि समाजातील उपेक्षित वर्गांचे चित्रण असायचे. मा.बिमल रॉय यांनी एक तरुण फिल्ममेकर म्हणून त्याकाळी अनेकांना प्रेरणा दिली. गुलजार यांना मा.बिमल रॉय यांनी त्यांच्या "बंदिनी' या चित्रपटासाठी त्यांना संधी दिली आणि त्यांनी लिहिलेले "मोरा गोरा अंग लै ले..' हे नूतन यांच्यावर चित्रित झालेले गाणे सुपरहिट ठरले. बिमल रॉय स्वत:च एक चित्रपटाची शाळा होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.बलराज सहानी यांची दो बिघा जमींन बद्दल एक आठवण सांगितली जाते.
बलराज सहानी हे त्या काळातले एक उच्चविद्याभूषित होते. कलकत्त्यात ते तेव्हा प्राध्यापकी करत. इंग्लंडवरून शिकून आल्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व हे साहेबी होतं. बिमल रॉय हे चित्रपट बनवत असल्याचं त्यांना कळल्यानंतर ते त्यांना भेटायला गेले व आपल्याला या चित्रपटात भूमिका करायची आहे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. बिमल रॉय यांचं पात्र हे एका गरीब शेतक-याचं, एका रिक्षावाल्याचं होतं. बलराज सहानी यांना सुटाबुटात पाहून बिमल रॉय यांनी त्यांना ही भूमिका देण्याचं नाकारलं. बलराज सहानी यांनाही आपली चूक कळून आली. त्यानंतर या भूमिकेसाठीच्या पोषाखात त्यांनी वावरून त्या भूमिकेचा अभ्यास केला. इतकंच नव्हे तर आपल्या बायका-मुलांना घेऊन त्यांनी कलकत्त्यात काही काळ रिक्षा ओढण्याचाही सराव केला. या सा-या गोष्टीचा अभ्यास करून मग ते पुन्हा बिमल रॉय यांना भेटायला गेले. त्यांना त्या लुकमध्ये पाहिल्यावर मग बिमल रॉय यांनी त्यांना ही भूमिका देऊ केली. कलाकाराच्या प्रभावापुढे न झुकणारे असे ते दिग्दर्शक व आपल्या दिग्दर्शकाच्या समाधानासाठी प्रचंड कष्ट घेणारे ते कलाकार आता सापडणं मुश्कीलच.
बिमल रॉय हे त्या काळातले एकमेव असे दिग्दर्शक होते ज्यांच्या घरी दिलीप कुमार स्वत: कथा ऐकायला येत असे. एरवी सर्वच दिग्दर्शकांना दिलीप कुमार आपल्या घरी बोलावत अस्त. बिमल रॉय यांनी मात्र कधीही फोन केला तर ते लागलीच त्यांच्या घरी येत असत. दिलीप कुमार यांच्या अभिनय कारकिर्दीतली सर्वात प्रभावी व्यक्तिरेखा म्हणजे देवदास हा चित्रपट होय असे दिलीप कुमार स्वत:च म्हणत आहे. भारतीय चित्रपट इतिहासात जे देदीप्यमान तारे चमकून गेले त्यामध्ये निर्माते-दिग्दर्शक बिमल रॉय यांचे स्थान अढळ आहे. रॉय यांच्या चित्रपटांना आजमितीस अनेक वर्षे लोटली तरी त्यातील आशय, कलात्मकता आणि सर्जनशीलता सामान्य रसिकांच्या हृदयाचा ठाव अजूनही घेत असतात. १९११ ते १९६६ या काळातील ‘उदयरे पथे’, ‘दो बीघा जमीन’, ‘परिणीता’, ‘बिराज बहू’, ‘देवदास’, ‘मधुमती’, ‘सुजाता’, ‘बंदिनी’, ‘परख’ आणि ‘बापबेटी’ अशी अनेक चित्ररत्ने रॉय यांच्या श्रेष्ठत्वाची जाणीव करून देतात. बिमल रॉय यांचे ८ जानेवारी १९६६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
बिमल रॉय यांच्या काही कलाकृतीची माहिती :
दो बिघा जमींन
साल:- १९५३ या चित्रपटाची प्रेरणा त्यांना बायसिकल थिव्ह्स या चित्रपटावरून आली होती. एक अल्पभूधारक असा शेतकरी, त्याच्याकडे केवळ दोन बिघा जमीन असते. या गावात त्याला अनेक संकटांचा सामन करावा लागतो. याच गावातला एक सावकार एका मिल मालकाबरोबर मिळून या गावात एक मिल बनवण्यासाठी जमीन मिळवून देण्याचं कारस्थान करतो. त्याचाही त्रास या शेतक-याला होतो. या शेतक-याला आपल्या उदरनिर्वाहासाठी शहरात यावं लागतं.
त्यानंतर त्याच्या आयुष्यात काय होतं. त्याच्या जमिनीचं काय होतं? याची कथा या चित्रपटातून पाहायला मिळते. बलराज सहानी व निरुपा रॉय यांच्या अभिनयासाठीही हा चित्रपट आठवणीत आहे. अगदी साधेपणाने कथा सांगण्याचं बिमलदांचं कौशल्यही या चित्रपटातून पाहायला मिळतं. त्या काळात या चित्रपटाने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले होते.
देवदास
साल:-१९५५
शरदचंद्र चटोपाध्याय यांच्या देवदास या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची निर्मिती बिमल रॉय यांनी केली. आपल्या लहानपणीच्या प्रेमासाठी नंतर दारूच्या आहारी गेलेल्या व स्वत:च्या जीवनाचा नाश केलेला नायक या चित्रपटातून दाखवण्यात आला आहे.
दिलीप कुमार, वैजंयती माला व सुचित्रा सेन यांच्या विलक्षण अभिनयासाठीही हा चित्रपट ओळखला जातो. एक ठाकूर आपल्या जीवनाचं कशा प्रकारे पतन करून घेतो हे या चित्रपटातून दाखवण्यात आलं असलं तरी समाज व व्यक्तिस्वातंत्र्य या महत्त्वाच्या गोष्टीकडेही हा चित्रपट लक्ष वेधतो. आपल्या विलक्षण शैलीच्या जोरावर बिलदांच्या या चित्रपटालाही अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. याच चित्रपटाचा रिमेक नंतर शाहरुख खान याला घेऊन संजय लीला भन्साली यांनी केला होता.
मधुमती
साल:-१९५८
या चित्रपटात एका पुनर्जन्मावरच्या प्रेमावरची कथा सांगण्यात आली होती. एका निर्जन जागी गेलेल्या एका इंजिनीअरला आपल्या पुनर्जन्माच्या प्रेमाची कथा आठवते व त्यानंतर त्यांच्या जीवनात काय काय उलथापालथी होतात हे या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे.
फ्लॅशबॅक व वर्तमानाचा सुरेख वापर करून मांडण्यात आलेली ही कथा लोकांना चांगलीच भावली होती. या चित्रपटाबरोबरच या चित्रपटातली गाणीही गाजली. तब्बल बारा गाण्यांचा या चित्रपटात समावेश होता. ही गाणी आजही तितकीच अवीट गोडीची आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांनी, समीक्षकांनी व पुरस्कारांनीही गौरवण्यात आले होते. शाहरुख खानने नंतर याच चित्रपटावर आधारित ओम शांती ओम या चित्रपटाची निर्मिती केली होती. तोही प्रचंड यशस्वी ठरला होता.
सुजाता
साल:-१९५९
जातीप्रथेच्या संदर्भात अनेक माध्यमातून चर्चा होत असते. असे असले तरी भारतात ती एक मोठी समस्या आहे. याच विषयावर आधारित चित्रपटाची निर्मिती बिमलदांनी केली होती. एका ब्राह्मण मुलाचे दुस-या जातीतल्या मुलीशी प्रेम होते. त्यानंतर समाज त्यांच्या या प्रेमाकडे कसा पाहतो. त्यांच्यापुढे कोण कोणती आव्हानं येतात हे या चित्रपटातून दाखवण्यात आले होते. या चित्रपटातल्या नूतन यांच्या जबरदस्त अशा अभिनयामुळेही हा चित्रपट गाजला होता.
बंदिनी
सर्वसामान्य भारतीय स्त्रीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात दिल्या गेलेल्या योगदानाची कथा या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून नूतन यांचा दमदार अभिनय लोकांपुढे आला. अशोक कुमार व त्या वेळी नवोदित असलेल्या धर्मेद्र यानेही यात चांगली भूमिका केली होती. संपूर्णपणे स्त्रीप्रधान असलेला हा चित्रपट त्या काळातला एक क्रांतिकारी चित्रपट म्हणून गणला गेला. या चित्रपटानेही प्रचंड यश मिळवले. बिमलदा यांचे चित्रपट पाहून त्याकाळी भारतीय चित्रपटांची उंची किती होती हे दाखवणारे आहेत. आज जागतिक सिनेमाचं कौतुक करणाऱ्यांनाही हे चित्रपट आपलेसे वाटतील यात शंका नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
टूनटून यांचे खरे नाव उमा देवी खत्री होते. त्यांचा जन्म १ जानेवारी १९२३ रोजी झाला. १९४०-४५ चा काळ होता, रम्य अशा दिवसातली ती सकाळची वेळ होती, संगीकार नौशादजी आपल्या आशियाना या घरात हार्मोनियमवर गाण्याचे स्वर काळ्या पांढरीच्या शृंगारात बसवत होते. इतक्यात त्यांच्या दारावर थाप पडली. पाठोपाठ आणखी थापा पडल्या. डोअर बेल न वाजवता दारावर कोण सलग थापा मारतंय हे बघण्यासाठी त्यांनी दरवाजा उघडला आणि समोर कोणीच नव्हते, ते दार बंद करणार इतक्यात बाजूला लपलेली एक १२- १३ वर्षांची धिटूकली समोर आली. तिने त्यांच्या पायाला मिठीच मारली ! ते तिच्याशी बोलण्याआधी तिने भोकाड पसरले, ते तिला घरात घेऊन आले. तिची विचारपूस केली तेंव्हा ती बोलती झाली. ती म्हणाली, "मला तुम्ही गायनाची संधी दिली नाही तर मी इथल्याच समुद्रात जीव देईन !" गावात असताना रेडीओवर गाणी ऐकून ऐकून तिने एकलव्यी बाण्याने रियाझ केलेला, इतकीच काय ती तिची गायनाची तयारी पण तिचा आवाज मधुर असल्याने तिचा स्वतःवर विश्वास होता अन तिच्या डोक्यात सतत नौशादजींचे वेड असे.
या शिदोरीवर तिने घर सोडून वयाच्या १३ व्या वर्षी थेट मुंबई गाठली होती. नौशाददेखील युपीच्या लखनौचेच असल्यामुळे त्यांना तिची काळजीही वाटत होती. नौशादजीनी तिच्या अशा या पार्श्वभूमीमुळे काही दिवस काम दिले नाही अन एके दिवशी तिची ऑडीशन घेतली आणि ते अचंबित झाले ! या मुलीचे नाव उमा देवी होय ....गाण्याचे वेड डोक्यात घेऊन आलेल्या उमादेवीच्या आयुष्यात पुढे अनेक चढउतार येऊन ती एक हसण्याजोगी बाब होणार आहे याचा तिला तिळमात्र अंदाज नव्हता. त्या दिवशी नौशादजींनी तिला ऐकले अन तिला पार्श्वगायनासाठी तत्काळ निवडले. तिची वर्णी इतरत्र लागू नये म्हणून नौशादजींनी ए. आर. कारदार यांना गळ घातली, नौशाद म्हणजे त्या काळाचे सर्वात मोठे संगीतकार असल्याने त्यांचा शब्व्द डावलणे अशक्य होते. तत्काळ उमादेवीची निवड शैलीदार सोनेरी आवाजाची गायिका म्हणून ए. आर.कारदार प्रॉडक्शन हाऊससाठी झाली, तिच्याशी करार केला गेला, तिचे मासिक वेतन ५०० रुपये ठरवले गेले. पण एक अट होती तिने ३ वर्षे दुसरया प्रॉडक्शन हाऊससाठी गायचे नाही.
त्यांना गाण्यासाठी लगेच सिनेमे मिळाले दर्द, दिल्लगी, चांदनी रात, नाटक पैकी 'दर्द' मधील शकील बदायुनी यांनी लिहिलेलं' अफसाना लिख रही हुं' ने तिला रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आणले सुरैयाबरोबरचे 'बेताब है दिले दर्द' ने तिला आणखी प्रसिद्धी मिळाली. दर्द नंतर मेहबूब खानच्या 'अनोखी अदा' मधलं 'काहे जिया डोले' आणि 'दिल को लगाके हमने कुछ भी न हमने पाया. 'हे गाणंही हिट झालं. पण उमादेवी मात्र करारात बांधल्या गेल्या असल्यामुळे इतर संधींना मुकत गेल्या अन त्यांना हळूहळू गायकीसाठी इतर प्रॉडक्शन हाऊसची दारे जवळजवळ बंद झाली अन तिचे करारबद्ध प्रॉडक्शन हाऊसच शेवटी बंद पडले. अन उमा देवी गायिकेच्या भूमिकेतून स्ट्रगलरच्या फेऱ्यात अडकली. त्या कामासाठी फिरू लागल्या. त्या गव्हाळ वर्णाच्या, थोडीशी जाड अंगाची, किंचित बसक्या चणीची होत्या, दिसायला लाखात एक वगैरे अशी काही नव्हत्या पण ती अगदी जेमतेम सौंदर्यवती होती अशी बाब होती. गायकीत नाव झाले तरी हरकत नाही पण अपयशाचा शिक्का घेऊन गावाकडे तिला परत जायचे नव्हते. त्यामुळे गाण्यातील संधींनी तोंड फिरवल्यामुळे तिने अभिनयासाठी प्रयत्न सुरु केले, एखादा रोल मिळतो का यासाठी ती वेगवेगळ्या प्रॉडक्शन हाऊसचे उंबरठे झिझावू लागल्या. त्याचा गायकीचा प्रवास थांबला, नायिका होण्याचे स्वप्न भंगले अन ती बॉलीवूडची पहिली महिला कॉमेडीयन म्हणून नावारूपाला आली.
१९५० मध्ये नौशाद यांचीच निर्मिती असलेला बाबुल हा सिनेमा सेट वर आला. या सिनेमातील नर्गिसच्या मैत्रिणीच्या - मुन्शीजीच्या मुलीच्या विनोदी भूमिकेसाठी तिला विचारणा झाली प्रेक्षकांनी या सिनेमातील उमादेवीच्या पात्रावरही प्रचंड कौतुकाचा वर्षाव केला, या पात्राचं नाव होतं टूनटून! हे नाव पुढे उमादेवीला आयुष्यभर चिकटले. त्यांची गायिका ही मूळ ओळख या सिनेमाने पुसून काढली अन टूनटून हे नाव जन्मास आले. जॉनी वॉकर, मेहमूद, धुमाळ, आगा, मुक्री, केष्टो मुखर्जी, भगवानदादा अशा अनेक कॉमेडीयन्स सोबत त्यांनी सिनेमे केले पण कधी कुणाशी नाव जोडू दिले नाही. टूनटून यांचा समाजावर इतका प्रभाव पडला की टूनटून या शब्दाचा अर्थच जाडी मुलगी असा होऊन गेला. टूनटूनने केलेल्या गुरुदत्तच्या आर-पार, मिस्टर और मिसेस फिफ्टी फाईव मधील आणि आबरू, एक राज, प्यासा, शराफत, दिल और मोहब्बत मधील भूमिका विशेष गाजल्या. १९५० ते १९६०च्या दशकातील ५० सिनेमात त्यांनी काम केलं. मा. उमादेवी उर्फ टूनटून यांचे २४ नोव्हेंबर २००३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. समीर गायकवाड / इंटरनेट
उमादेवी उर्फ टूनटून यांनी गायलेली काही गाणी
मेरी प्यारी पतंग
अफसाना लिख रही हुं
दिलवाले
Copyright © 2025 | Marathisrushti