जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
नाटय़, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अशा तिन्ही माध्यमांद्वारे रसिकांत लोकप्रिय झालेले फारुख शेख यांनी वकिलीचे शिक्षण घेत असतानाच नाटय़क्षेत्रात प्रवेश केला. त्यांचा जन्म २५ मार्च १९४८ रोजी झाला. ७०-८० च्या दशकात फारूक शेख यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. समांतर चित्रपट आणि तसेच मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये त्यांचा मुक्त संचार सुरू होता. त्यांिनी अनेक दर्जेदार चित्रपट दिले. विनोद आणि संवेदनशील विषयांवर त्यां चा हातखंडा होता. नुरी, शतरंज के खिलाडी, चष्मेतबद्दुर, गरम हवा इत्यािदी चित्रपट गाजले. `क्लब ६०′ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. `यह जवानी है दिवानी’ या चित्रपटामध्ये त्यांनी रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेला सिकंदर मिर्झा प्रेक्षकांना खूपच भावला होता. सहजसुंदर अभिनय ही त्यांची जमेची बाजू होती. मा.फारुक शेख यांनी अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केले होते. `चमत्कार’, `जी मंत्रीजी’, `श्रीकांत’ या मालिकांमधील त्यांच्या अभिनयाने एक वेगळाच प्रभाव निर्माण झाला होता. झी टिव्हीवरील प्रसिद्ध `जीना इसी का नाम’ या शोचे त्यांनी सूत्रसंचालन केले होते. या शोमध्ये त्यांनी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींची मुलाखतही घेतली होती. सत्यजित रे, मुज्जफर अली, हृषिकेश मुखर्जी आणि केतन मेहता यांसारख्या दिग्दर्शकांसोबत फारुक शेख यांनी काम केले होते. शबाना आझमी, दीप्ती नवल अशा अभिनेत्रींसोबत फारूक शेख यांची जोडी अधिक गाजली. त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यांच्या आवाजामध्ये एक वेगळेपणा होता. त्यांची विनोदशैली आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची वृत्ती यासाठी फारुक शेख यांची ओळख होती. फारुख शेख निव्वळ कलाकार नव्हते, तर माणुसकी जपणारे कलाकार होते. एक अभिनेता, सामाजिक कार्यकर्ता, प्रचंड अभ्यासू कलावंत, असे फारुख शेख यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. प्रसन्न व्यक्तिमत्त्व, निरागस चेहरा आणि सहजसुंदर अभिनय या गुणांमुळे समांतर चित्रपटांत काम करतानाही फारुख शेख सर्वसामान्य चित्रपट रसिकांचे ‘नायक’ बनलेले होते. मा. फारुख शेख यांचे २७ डिसेंबर २०१३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सिमी गरेवाल म्हटलं की आपल्याला ‘रांदेवू’ वुईथ सिमी गरेवाल’ हा त्यांचा शो आठवतोच. सिमी गरेवाल यांचे वडील जे. एस. ग्रेवाल आर्मीत ब्रिगेडियर होते. त्यांचे बालपण इंग्लंडमध्ये गेले आणि शिक्षण न्यूलँड हाऊस स्कूलमध्ये झाले होते. इंग्लंडमध्ये बालपण घालवल्यानंतर किशोरावस्थेत सिमी भारतात परतल्या. त्यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९४७ रोजी दिल्ली येथे झाला. वयाच्या पंधराव्या वर्षी तिला 'टार्जन गोज टू इंडिया' या सिनेमाची ऑफर मिळाली होती. हा सिनेमा सिमीने स्वीकारला होता. आपल्या पहिल्या सिनेमात तिला फिरोज खानबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती. त्यांनी मेहबूब खान, राज कपूर, मृणाल सेन, राज खोसला अशा मात्तबर दिगदर्शकांबरोबर काम केले.
सिमी गरेवाल या बोल्ड सीन साठी त्या काळी फेमस होत्या. सिमी गरेवाल या 'दो बंधन', 'साथी', 'मेरा नाम जोकर' आणि 'सिद्धार्थ' या वादग्रस्त सिनेमासाठी ओळखले जातात. १९७२ मध्ये रिलीज झालेल्या 'सिद्धार्थ' या सिनेमात सिमी गरेवालने बॉलिवूडमधला पहिला न्यूड सीन देऊन खळबळ उडवली होती. हा सिनेमा सर्वाधिक वादग्रस्त सिनेमा ठरला होता. कोनरॉट रुक्सच्या 'सिद्धार्थ' या सिनेमात अनेक हॉट आणि वादग्रस्त सीन्स होते. एका सीनमध्ये तर शशी कपूर न्यूड सिमी ग्रेवालच्या समोर उभे दिसतात. हे छायाचित्र दोन इंग्रजी मासिकांनी आपल्या कव्हरपेजवर प्रकाशित केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. प्रकरण थेट न्यायालयात पोहोचले होते. शशी कपूर आणि सिमीच्या न्यूड सीनमुळे 'सिद्धार्थ' हा सिनेमा भारतात प्रदर्शित झाला नव्हता.
सिमी गरेवाल यांनी ६० पेक्षा जास्त चित्रपटात कामे केली आहेत. सिमी गरेवालने "रुखसत " या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. मिथुन चक्रवर्ती व अनुराधा पटेल यांच्या भूमिका होत्या. अभिनय सोबत सिमी गरेवाल एक अँकर म्हणूनपण आपल्या लक्षात आहे. ‘इंडियाज मोस्ट डिझायरेबल’ हा शो पण सिमी गरेवाल यांचा होता. दूरदर्शनवर Woman's World या नावाने त्यांनी डॉक्यूमेट्री केली होती. राजीव गांधी यांच्या जीवनावर राजीव या नावाने डॉक्यूमेट्री केली आहे. सिमी गरेवाल यांची खासियत म्हणजे त्या नेहमी पांढ-या रंगाचे कपडेच परिधान करतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची निवड करण्यात आली आहे.
प्रेमानंद गज्वी हे मराठी नाटककार, लेखक व कवी आहेत. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून समाजातील विदारक सत्य प्रभावीपणे मांडणे यासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे ‘घोटभर पाणी’ अनेक भारतीय भाषांत अनुवादित झालं. ‘श्रेष्ठ भारतीय एकांकी’ या द्विखंडीय ग्रंथात प्रसिद्धही झालं. इंग्रजीत शांता गोखलेंनी ते अनुवादिलं आणि त्याचे प्रयोगही बंगलोरच्या एका नाटय़संस्थेनं केले. त्यापैकी एक प्रयोग एनसीपीएच्या मिनी थिएटरमध्ये अलेक पदमसींनी आयोजित केला होता. पण ‘लघुनाटय़’रूप असल्यामुळे असेल कदाचित, समीक्षकांनी त्याची विशेषशी दखल घेतली नाही.
‘तन-माजोरी’ मराठीत विलक्षण गाजलं. त्याला राम गणेश गडकरी, मामा वरेरकर, अनंत काणेकर आदी लेखन पुरस्कारही मिळाले. नाना पाटेकरांना घेऊन ते व्यावसायिक रंगमंचावर आलं. महाराष्ट्र मंडळाच्या प्रेमामुळं त्याचा प्रयोग आणि ग्रंथप्रकाशन सोहळा लंडनमध्येही झाला. गोवा विद्यापीठात एम.ए.च्या अभ्यासक्रमात ते शिकवलं जाऊ लागलं. कोकणीत त्याचा अनुवाद झाला. पुढे सगीर अहमद चौधरी या मित्रानं ते हिंदीत अनुवादित केलं. त्याचे पृथ्वी थिएटरला प्रयोग झाले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं त्याची दखल घेतली. अजमेरच्या (राजस्थान) ‘कृष्णा ब्रदर्स’नं ग्रंथरूपात ते प्रसिद्धही केलं. एवढंच कशाला, अमिताभ बच्चन आणि नासिरुद्दीन शाहला घेऊन त्यावर फिल्म करण्याची घोषणाही दिग्दर्शक राहुल रवैल यांनी केली होती.
‘किरवंत’ खरं तर त्यांनी लिहिलं होतं १९८१ साली; पण त्याचं समीकरण नीट सुटलं नव्हतं. मग ते समीकरण पुन्हा सोडवून पाहिलं. डॉ. श्रीराम लागूंनी ते व्यावसायिक रंगमंचावर सादर केलं. आणि मग हा-हा म्हणता प्रेमानंद गज्वी हे नाव सर्वतोमुखी झालं. स्मशानकर्मे करणाऱ्या ‘किरवंता’चं उपेक्षित जीणं त्यातून प्रथमच मराठी साहित्याच्या केंद्रस्थानी आलं होतं. पं. वसंत देवांनी ‘किरवंत’चा हिंदी अनुवाद केला. तो ‘समकालीन भारतीय साहित्य’ या साहित्य अकादमीच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाला नि पुढं दिल्लीच्या श्रीराम सेंटरनं ‘महाब्राह्मण’च्या रूपात हिंदी रंगमंचावर तो सादर केला. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या भारत रंगमहोत्सवातही ते सादर झालं व गाजलं. बघता बघता ‘किरवंत’ इंग्रजीत (अनुवाद- म. द. हातकणंगलेकर) आलं. कोलकाताच्या सीगल बुक्सनं ते प्रकाशित केलं.
त्यांची गाजलेली नाटके व एकांकिका: किरवंत, गांधी आणि आंबेडकर, छावणी, जय जय रघुवीर समर्थ, डॅम इट अनू गोरे, तन-माजोरी, देवनवरी, नूर महंमद साठे, शुद्ध बीजापोटी.
घोटभर पाणी, पांढरा बुधवार, बेरीज-वजाबाकी, (प्रेमानंद गज्वी) समग्र एकांकिका. प्रेमानंद गज्वी यांना वि. वा. शिरवाडकर पुरस्कार, मसापचा जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
प्रेमानंद गज्वी यांचे पहिले नाव आनंद गजभिये.. या बद्दल ते म्हणतात. मुळातच मला कव्वालीचा भारी नाद होता. गावी आमच्या बौद्ध समाजाचं ‘भीमबुद्ध भजनी मंडळ’ होतं. ते गावोगावी भजन गात. अशाच एका गावी कव्वालीचा सामना मी केला होता. सिनेमातील गाण्यांच्या चालीवर शेदीडशे गाणी मी लिहिली आहेत. तर मुद्दा मी प्रेमानंद गज्वी कसा झालो? आपली अंगीभूत आवड आपल्याला योग्य ठिकाणी घेऊन जाते. गोविंद म्हशीलकर हा मुंबईमधील प्रसिद्ध कव्वाल. मालाडमध्ये त्यांचा कार्यक्रम ठरलेला होता. ते यायला उशीर होत चालला होता.
लोक चुळबूळ करायला लागले. कुणीतरी मला म्हणालं, ‘म्हशीलकर येईपर्यंत ‘गा’ की लेका.’ तोवर कुणीतरी तबला-पेटी आणली. मी गावू लागलो. दरम्यान म्हशीलकर आले. ‘आले; आले! ए तू थांब आता!’ मी थांबलो. गोविंद म्हशीलकरांची कव्वाली सुरू झाली. मी स्टेजवरच मागे बसलेला, ‘कोरस’ करीत. म्हणजे म्हशीलकर पुढं म्हणतील त्याच ओळी मागच्यांनी पुन्हा आळवणं. सकाळी कव्वाली संपली. जाता-जाता म्हशीलकरांनी विचारपूस केली. म्हणाले, ‘मला घरी येऊन भेट.’ मी परेलच्या बी.आय.टी. चाळीत त्यांच्या घरी भेटलो.
मैत्रीचे धागे जुळले. मी गाणी लिहित होतो सिनेमातील गाण्यांच्या चालीवर नि गातही होतो कोरसमध्ये. एक दिवस ते म्हणाले, कितना लम्बा है तुम्हारा नाम.. ‘ग-ज-भि-ये’? छोटा कर दूँ? ‘गज्बी’! मी तसा शागिर्दच त्यांचा. कशाला नाही म्हणतो? दरम्यान माझ्या कानावर एक नाव आलं ‘गज्वी’ हे मुस्लीम आडनाव. गज्बीपेक्षा ‘गज्वी’ मला अधिक बरं वाटलं. मी गज्वी हे नाव स्वीकारलं. मी गाणी लिहित होतोच. आपल्या गाण्याची एखादी पुस्तिका प्रसिद्ध व्हावी ही इच्छा. तशी तयारी केली. पण पुस्तिकेला नाव काय देणार? म्हशीलकरांचा प्रश्न. मी म्हटलं ‘आनंद गीते’. तर ते म्हणाले, ‘या नावाची किताब तर आहे, मार्केटमध्ये.’ मी लगेच म्हणालो, ‘आनंद को प्रेमानंद कर देते है!’ आणि अशाप्रकारे मी आनंद गजभियेचा ‘प्रेमानंद गज्वी’ झालो. बाजारात माझी पुस्तिका आली. ‘प्रेमानंद गीते’ हे पुस्तक छापलं गेलं ‘बुद्धभूषण प्रिंटींग प्रेस’मध्ये. भैयासाहेब आंबेडकरांनी ते छापून दिलं. भैयासाहेब; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चिरंजीव.
मराठी रंगभूमीदिनाचे औचित्य साधून रंगभूमी/थिएटर, कला, प्रतिभा याविषयावर ड्रामा स्कूल मुबईच्या वतीने निलम सकपाळ यांनी प्रेमानंद गज्वी यांच्याशी साधलेला संवाद.
https://www.youtube.com/watch?time_continue=36&v=B65YsRASIng
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
एखाद्या व्यक्तिचं कर्तुत्व आणि त्यांची आपल्या ध्येयाप्रती असलेली निष्ठा ही त्याला एका अशा पदावर नेऊन ठेवते जिथे तो माणूस यशाच्या मागे लागत नाही तर यश त्याच्या मागे लागतं. पण त्यावेळी देखील यशापशाची पर्वा न करता आपल्या कामात, त्या कामाच्या धुंदीतच जगायला त्याला आवडतं.
निवृत्त प्रमुख, रेडिओ केमिस्ट्री विभाग, भाभा अणुसंशोधन केंद्र
आज ५ डिसेंबर
आज ख्यातनाम गझल गायक गुलाम अली यांचा वाढदिवस
जन्म:- ५ डिसेंबर १९४०
गुलाम अली यांचे नाव त्यांच्या वडलांनी बडे गुलाम अली खाँ यांच्यापासून प्रेरित होऊन ठेवले. गुलाम अली थोडे मोठे झाल्यावर बडे गुलाम अली खाँ यांच्याकडे त्यांना शिष्य बनवण्यासाठी वडलांनी चकरा मारायला सुरुवात केली. बडे गुलाम हे त्या काळचे सर्वात मोठे आणि अत्यंत व्यग्र असे व्यक्तिमत्त्व होते. गुलाम अली यांनी आपल्या एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं, की त्यांचे वडील त्यांना पहाटे पाच वाजता उठवायचे. नाही उठले तर काठीने मारून उठवायचे. का, तर बडे गुलाम अली खाँचे नाव खराब होऊ नये. तेव्हा ते पाच वर्षांचे होते. बरेच दिवस गेल्यावर एके दिवशी बडे गुलाम अली खाँ त्यांच्या घरी आले आणि त्यांच्या वडलांच्या असंख्य बिनत्यांची आबरू ठेवण्यासाठी गुलाम अली यांना ‘काहीतरी गा’ असे म्हणाले. त्यांनी धीर करून ‘सैयाँ बोलो तनिक मोसे रहियो न जाए’ ही ठुमरी गायली. गाणं संपताच बडे गुलाम यांनी पंधरा वर्षांच्या छोट्या गुलामला मिठी मारली आणि त्यांना आपला गंडा बांधला. तथापि, बडे गुलाम खरोखरीच अतिशय व्यग्र असल्याने त्यांचे तीन बंधू बरकत अली खाँ, मुबारक अली खाँ आणि अमानत अली खाँ यांनी त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले.
१९६० साली मा.गुलाम अली यांनी लाहोर आकाशवाणीवर गायक म्हणून कारकिर्दीची सुरवात केली. त्यानंतर त्यांना गझल गायक म्हणून भारत, पाकिस्तान व जगात अमाप लोकप्रियता मिळाली.
गुलाम अलीजी एक मेहबूब गजल गायक आहेत. पाकिस्तानातील गजलचे बादशहा मेहदी हसन यांच्या नंतरच्या पुढच्या पिढीचे आणि समर्थ गजल गायक आहेत. त्यांच्या ‘चुपके चुपके’ने तीन दशकांपूर्वी लावलेले वेड अद्याप ओसरायला तयार नाही. हिंदुस्थानी ठुमरी गायकीची शैली गजलच्या फॉर्मसाठी यशस्वीपणे वापरणाऱ्या गुलाम अली यांनी शेकडो गजला गायल्या आहेत. त्यातील एक निवडणे हे इतर गजलांवर अन्याय केल्याशिवाय शक्य नाही. मा.गुलाम अली व मा.आशा भोसले यांचा मिराज ए गझल हा अल्बम फारच सुंदर आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
गुलाम अली यांच्या काही गजला
चुपके चुपके रात दिन
चमकते चाँद को टूटा हुआ
हंगामा है क्यूँ बरपा
ये दिल ये पागल दिल मेरा
हम तेरे शहर में आए हैं
कल चौदहवीं की रात थी
अपनी धुन में रहता हूँ
मुळगांवकर यांनी आपल्या कारकिर्दीत ६३ प्रकारची वेगवेगळी विमाने चालविली. त्यांपैकी २२ विमाने जेट होती. हा एक जागतिक विक्रमच म्हणावा लागेल. वेगवेगळ्या प्रकारची विमाने चालविण्यासाठी प्रत्येक वेळी काही आठवड्यांचे कन्व्हर्जन ट्रेनिंग घ्यावे लागते, हे लक्षात घेतले तर त्यांचे अष्टपैलुत्व सहजपणे लक्षात येईल. मुळगांवकरांच्या नावे आणखी एक विक्रम जमा होतो. ‘मिग-२१’ हे स्वनातीत (ध्वनीच्या वेगापेक्षा जलद गतीचे) विमान चालविणारे ते पहिले भारतीय वैमानिक ठरले. वायुसेनाप्रमुख झाल्यानंतरही ते ‘मिग-२१’ चालवीत असत. वायुसेनेला स्वनातीत युगात नेणारे युगपुरुष असे त्यांचे सार्थ वर्णन केले जाते.
ज्येष्ठ अभिनेत्री व कळसुत्रीकार मीना नाईक यांचा जन्म १९ जून १९५१ रोजी झाला.
मीना या समाजभान असणारी रंगकर्मी व कळसुत्रीकार म्हणून ओळखल्या जातात. मीना नाईक या माहेरच्या मीना सुखटणकर होत.मीना नाईक यांचे शिक्षण मुंबईत झाले असून, त्यांनी १९७२ मध्ये मुंबईतील जे जे इंस्टिट्यूशन ऑफ एप्लाइड आर्ट येथून जे डी आर्टस् पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण केले तसेच मुंबई विद्यापीठामधून बी. ए. १९८० व म.ए. १९८३ साली पूर्ण केले.
१९७६ ते १९७८ या काळात त्यांनी पेपेट्री मध्ये अभ्यास केला. त्या वेळी त्यांना पेपेट्रीमध्ये मध्ये जपान फौंडेशन आणि भारत सरकार कडून दोन शिष्यवृत्ती मिळाल्या होत्या.
मीना नाईक यांनी समाजातील अनेक संवेदनशील विषयावर लघुपट व ऍनिमेशन चित्रपट तयार केले आहेत. त्यांनी 'वाटे वरती काचा ग' या नाटकाद्वारे बाललैंगिक अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला. काही काळापूर्वी मीना नाईक यांनी बालकांवर होणाऱ्या लैंगिक शोषणावरील ‘पोक्सो’ कायद्याबाबत जनजागृती निर्माण करणाऱ्या ‘कळसूत्री’-निर्मित ‘अभया’ या एकल – महिला हा नाट्यप्रयोग राजभवन येथे राज्यपालांच्या उपस्थितीत झाला होता.
२०१० मध्ये त्यांना दूरदर्शनच्या सहयाद्री वाहिनी कडून हिरकणी ह्या मानाच्या पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.
याच बरोबर त्यांनी दूरदर्शन वरचे किलबिल, अमृत मंथन अशा अनेक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे.
मीना नाईक यांनी यशवंतराव चव्हाण या चित्रपटात अभिनय केला आहे. नुकताच काम केलेला चित्रपट म्हणजे हृदयांतर.अभिनेत्री व निर्मात्या मनवा नाईक या त्यांच्या कन्या होत. ‘ढिनच्यॅक एंटरप्राइज’ या चित्रपटात मीना नाईक आणि मनवा नाईक या दोघी मायलेकी प्रथमच एकत्र काम करताना दिसल्या होत्या.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
स्मिता तळवलकर या माहेरच्या स्मिता गोविलकर. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १९५५ रोजी झाला. स्मिता तळवलकर यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या हुजुरपागा शाळेत झाले. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र हे विषय घेऊन बी. ए. झाल्यावर स्मिता तळवलकर यांनी मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमही केले होते. त्यांनी १९७२ साली मुंबई दूरदर्शनवरून वृत्तनिवेदिका म्हणून कारकीर्द सुरू केली होती.
तब्बल सतरा वर्षे त्यांनी वृत्तनिवेदिका म्हणून काम केले होते. १९८३ साली त्यांनी मराठी रंगभूमीवर पाऊल ठेवले. तेव्हापासून त्यांनी आपल्या सुरेख अभिनयाने मराठी रसिकांवर मोहिनी घातली होती. अनेक मराठी चित्रपटांतील दर्जेदार अभिनयासाठी त्या रसिकांना परिचित होत्या. त्यांनी मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवला होता. निव्वळ अभिनयातच नव्हे तर चित्रपट आणि टीव्हीच्या अनेक मराठी मालिकांच्या निर्मात्या व दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
१९८६ मध्ये त्यांनी "गडबड घोटाळा' व "तू सौभाग्यवती हो' या चित्रपटांद्वारे मराठी सिनेसृष्टीत पाय रोवले. त्यांनी "अस्मिता चित्र' या निर्मिती संस्थेची स्थापना करून अनेक चित्रपट व मालिकांची निर्मिती-दिग्दर्शन केले. "कळत नकळत' व "तू तिथे मी' या चित्रपटांमधील अभिनयाने त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले. "अस्मिता चित्र'चा "चौकट राजा' या चित्रपटामुळे १९९१ चे वर्ष स्मिता तळवलकर यांच्यासाठी खास ठरले. हा चित्रपट गतिमंद मुलाच्या आयुष्यावर बेतलेला होता.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर हे प्रमुख भूमिकेत होते. त्यामध्ये स्मिता तळवलकर यांनी "मीनल' म्हणजे या मुलाच्या बालपणापासूनच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. संजय सूरकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाच्या यशानंतर सूरकर-तळवलकर जोडीने "तू तिथे मी', "सातच्या आत घरात', 'आनंदाचे झाड' असे यशस्वी चित्रपट दिले. "सवत माझी लाडकी' हा स्मिता तळवलकर यांचे दिग्दर्शन असलेला पहिला चित्रपट होता. "अस्मिता चित्र' या बॅनरखाली त्यांनी सहा चित्रपट आणि २५ दूरदर्शन मालिकांची निर्मिती केली. पेशवाई, अवंतिका, सुवासिनी, उंच माझा झोका, अशा त्यांच्या काही गाजलेल्या मालिका आहेत.
स्मिता तळवलकर यांनी चित्रपट शिक्षणासाठी "अस्मिता चित्र अकादमी' स्थापन केली होती. या अकादमीच्या पुणे, मुंबई आणि ठाणे येथे शाखा असून या अकादमीतून अनेक कलावंत घडले आहेत. कर्करोगाशी लढा देत असतानाही त्यांनी कामात खंड पडू दिला नाही. 'स्मिताची गोष्ट 'हे पुस्तक त्यांचे अनेक वर्षांचे मित्र योगेश्वर गंधे यांनी लिहिले आहे. पहिल्या २६ पानात चरित्र /आठवणी आहेत तर पुढील ४५ पानांत त्यांच्या कथा आणि लेख आहेत.
स्मिता तळवलकर यांचे निधन ६ ऑगस्ट २०१४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आशुतोष गोवारीकर यांनी उमेदवारीच्या काळात सी.आय.डी.मालिकेतून शिवाजी साटम यांच्या साहाय्यकाचे काम केले. त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. अमोल पालेकरच्या 'कच्ची धूप' या मालिकेतून आशुतोष अभिनेता म्हणून लोकांना प्रथम दिसले. पुढे तो 'होली', 'गूँज', 'कभी हां कभी ना', 'सलीम लंगडे पे मत रो' सारख्या सिनेमांत काम केले. पण त्यांना अभिनय-कारकिर्दीत घट्ट मुळे रोवता आली नाहीत. मग दिग्दर्शन क्षेत्रातले पदार्पण असलेला त्यांचा 'पहला नशा' हा त्याचा चित्रपट दणकून आपटला. त्याच्या, आमीर खान नायक असलेल्या 'बाजी'च्या दिग्दर्शनानेही बाजी मारली नाही. त्यामुळे 'लगान' हा त्याचा जीवन-मरणाचा प्रश्न बनला होता. आणि 'लगान' ने त्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. ते दिग्दर्शक व अभिनेता म्हणून अनेक आव्हानांना खंबीरपणे सामोरा गेले.
आशुतोष गोवारीकर यांनी २००१ मध्ये 'लगान' तयार केला. त्यानंतर भारतात क्रीडाविषयक चित्रपटांची लाट आली. आशुतोष गोवारीकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी अभिनय, दिग्दर्शन व निर्मिती केली आहे. १९९८ सालच्या सरकारनामा ह्या मराठी चित्रपटामध्ये त्याने भूमिका केली होती. बॉलिवूडमधील दिग्दर्शनासाठी त्याला आजवर फिल्मफेअर सह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २००१ मध्ये लगानला फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपट व २००८ मध्ये जोधा अकबर या चित्रपटाला फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार व फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार मिळाला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti