जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये 'संगीतकार दत्ताराम' हे नाव एके काळी खूपच गाजले होते. दत्ताराम हे डिचोली तालुक्यातील. त्यांचे मुळ नाव दत्ताराम शिरोडकर, मुळगावी त्यांच्या वडिलांचे किराणा दुकान होते. पुढे आई ९ वर्षाच्या दत्तारामला घेऊन सांवतवाडीला गेली, तिथे शाळेत घालताना शेजारच्या मुलाने त्यांचे नाव 'दत्ताराम वाडकर' सांगितले आणि तेच नाव कायमचे लागले. शिक्षणात त्यांचे फार लक्ष नव्हते. त्यामुळे आई त्यांना घेऊन मुंबईत गेली. तिथे तबला शिकले, ढोलक शिकले, त्यातूनच पुढे पृथ्वी थिएटर हुस्नलाल - भगतराम, संगीतकार शंकर आदीशी त्यांचा संबंध आला. राजकपूर तेव्हा 'आग' चित्रपटाद्वारे निर्माते झाले, पण 'आग' आपटला. पुढे 'बरसात' जोरदार चालला. दत्ताराम त्यावेळच्या दर्दभ-या गाण्यात ढोलकचा ठेका धरायचे. 'चोरी चोरी' चित्रपटात 'ये रात भिगी भिगी' या गाण्यात ढोलकचा अप्रतिम ठेका दत्ताराम यांनी दिला आणि तोच हिंदी चित्रपटसृष्टीत 'दत्ताराम ठेका' म्हणून गाजू लागला. त्यातूनच पुढे राजकपूरने दत्ताराम यांना 'अब दिल्ली दूर नही' या चित्रपटासाठी स्वतंत्रपणे संगीत दिग्दर्शनाची संधी दिली. या चित्रपटातील ''चुन चुन करती आयी चिडिया, मोरभी आया चूहाभी आया, बंदरभी आया'' हे गाणे हिट झाले.
दत्ताराम यांचा सुवर्णकाळ म्हणजे 'परवरिश' चित्रपटातील एकापेक्षा एक हिट गाणी होय. यमन रागातील चाल दत्ताराम यांनी बांधली आणि हसरत जयपुरीने त्याचे शब्द लिहिले. "ऑसू भरी है ये जीवन की राहें, कोई उनसे कहदे, हमे भूल जायें " या गाण्याने लोकप्रितेचा कळस गाठला. राज कपूर भलताच खुश झाला. राजकपूर हा ग्रेट शोमन होता. तसाच संगीताचा जाणकार होता. १९५९ साली 'कैदी ने ९११' मधील लताच्या आवाजातील ''मिठी मिठी बातोंसे बचना जरा'' हे गाणेही खूप लोकप्रिय झाले. ''आसू भरी है ये जीवन की राहे'' हे मुकेश यांचे गीत आजही रसिकांच्या लक्षात आहे. ही गीते संगीतबध्द करणारा माणूस होता मा.'दत्ताराम'. १९५० नंतरची ही गाणी आहेत, पण त्यामध्ये आधी चाल बांधण्यात आली आणि हसरत जयपुरींनी त्या चालीवर शब्द गुंफले. दत्ताराम त्यावेळी संगीतकार जय-किशन आणि राजकपूर यांच्याएवढेच लोकप्रिय होते. ढोलक या लोकवाद्याचा वापर प्रतिष्ठित हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी खुबीने केला. असे हे दत्ताराम काळ बदलल्यानंतर अज्ञातवासात गेले. १५ - १६ चित्रपटांना दत्ताराम यांनी संगीत दिले. तो जमाना वेगळा होता. आजच्या लाखाच्या, कोटीच्या आकडयांत मानधन कधी मिळाले नाही, 'परवरिश' साठी जेमतेम पाच हजाराचे मानधन मिळाले होते असे दत्ताराम सांगत. पुढे जमाना बदलला, शंकर-जयकिशन यांना साथ देत दत्ताराम यांनी मुबंईत बरीच वर्षे काढली. मा.दत्ताराम यांचे ८ जून २००७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / शरद कारखानीस
कपिल देव यांचा जन्म ६ जानेवारी १९५९ रोजी झाला.
रामलाल निखंज आणि पूर्वाश्रमीच्या राजकुमारी लाजवंती यांच्या सात अपत्यांमधील कपिल हे सहावे अपत्य.
रावळपिंडीनजीकच्या एका खेड्यातून फाळणीच्या वेळी रामलालजी चंडीगढला येऊन राहिले होते आणि बांधकाम साहित्य व लाकडे पुरविण्याचा व्यवसाय ते करीत होते. वयाच्या बाराव्या वर्षी कपिल देशप्रेम आझादांचा चेला बनला. नोव्हेंबर १९७५ मध्ये कपिल सर्वप्रथम हरयाणासाठी खेळला आणि सहा बळी मिळवले. त्या हंगामात ३ सामन्यांमधून १२ बळी त्याने मिळवले. १९७६-७७ च्या हंगामात जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात त्याने एकूण ३६ धावा देत ८ बळी घेतले. हा सामना हरयाणाने जिंकला.
नंतरच्या साखळी सामन्यांमधून कपिलची कामगिरी यथातथाच राहिली असली तरी उप-उप-उपांत्य फेरीच्या सामन्यात बंगालविरुद्ध त्याने दुसऱ्याह डावात केवळ नऊ षटके गोलंदाजी करताना २० धावा देत तब्बल ७ गडी बाद केले. उप-उपांत्य सामन्यात हरयाणाची गाठ मुंबईशी पडली आणि हरयाणाने लढत गमावली असली तरी कपिलदेवने साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले. १९७८-७९ च्या हंगामात इराणी चषकाच्या सामन्यात आठव्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन कपिलने ६२ धावा काढल्या.
दुलीप चषकाच्या अंतिम सामन्यातील सात बळीनी त्याला उत्तर विभागाच्या संघात प्रवेश मिळवून दिला आणि याच हंगामात कपिल पहिली कसोटी खेळला – पाकिस्तानविरुद्ध. १९७९-८० च्या हंगामात दिल्लीविरुद्ध १९३ धावांची खेळी हे त्याचे पहिले प्रथमश्रेणी शतक. या हंगामात तो हरयाणाचा कर्णधार होता आणि त्याच्या संघाने अतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.
१९९०-९१ च्या रणजी करंडकाचा अंतिम सामना कपिलने गाजवला. संजय मांजरेकर, विनोद कांबळी, सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर, चंद्रकांत पंडित, सलील अंकोला, ॲकबी कुरुविला अशा दिग्गजांचा समावेश असलेल्या मुंबई संघाला हरयाणाने पराभूत केले. हरयाणाच्या संघातील काही खेळाडू होते : दीपक शर्मा, अजय जडेजा, चेतन शर्मा, विजय यादव. मिळालेल्या शिकारींकडे पाहिल्यास कपिल त्याच्या पहिल्यावहिल्या कसोटी मालिकेत फारसा यशस्वी ठरला असा निष्कर्ष काढता येणार नाही पण त्याच्या बाऊन्सर्सची दहशत पाक फलंदाजांनी घेतली होती आणि त्याचा फायदा इतर गोलंदाजांना नक्कीच मिळाला होता. सादिक मोहम्मदला त्याने एका बहिर्डुल्यावर टिपले होते. मालिकेतील तिसऱ्यां सामन्यात कराचीच्या नॅशनल स्टेडिअमवर त्याने अवघ्या ३३ चेंडूंमध्ये अर्धशतक केले होते. भारतीयाचे कसोट्यांमधील हे पहिले अर्धशतक. मग कपिलने एक पंचांकडे फलंदाज बाद असल्याचा आग्रह धरण्यासाठीचा अपवाद वगळता, कारकिर्दीत केव्हाही मागे वळून पाहिले नाही.
दिल्लीच्या फिरोजशहा कोटलावर त्याचे पहिले कसोटी शतक आले, अवघ्या १३० चेंडूंमध्ये. १९८२-८३ च्या हंगामात गावसकरला विश्रांती देण्यात आल्याने कपिलवर कर्णधारपदाची जबाबदारी टाकण्यात आली. वेस्ट इंडीज दौऱ्यापासून तो नियमित कर्णधार बनला आणि त्या दौऱ्याावर त्याच्या संघाची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे वेस्ट इंडीजला एका एकदिवसीय सामन्यात हरविणे! गावसकरने या सामन्यात ९० तर कपिलने ७२ धावा केल्या होत्या आणि ४७ षटकांमध्ये २८२ धावा करून भारतीयांनी त्या राखल्या होत्या.
१९८३ कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने इंग्लंड मध्ये १९८३ साली आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. यावर नुकताच 83 नावाने चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
रिकी पॉन्टिंग हा क्रिकेट जगताचा एक अद्भुत आणि महान ‘एंटरटेनर’ मानला जातो. रिकी पॉन्टिंगला क्रिकेट जगतात पंटर या टोपणनावाने ओळखले जात असे.
ज्या काळात पार्वतीकुमार, गोपीकृष्ण, रोशनकुमारी यांच्यासारखी नर्तक मंडळी सिनेमाकडे वळली त्या काळात दमयंती जोशी यांनी कथक नृत्यसाधनेची विशुद्ध कास धरली आणि त्यामध्ये नवनवीन प्रयोग सिद्ध केले. नृत्यांगना दमयंती जोशी यांचा जन्म ५ डिसेंबर १९२८ रोजी झाला. दमयंती जोशी यांनी कथक नृत्यप्रकारास पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली, तर भरतनाट्यम हा नृत्यप्रकार दक्षिणेतून मुंबईत येऊन रुजण्यास त्या कारणीभूत झाल्या. बालपणापासून नृत्याचीच ओढ असलेल्या दमयंती जोशी यांचा जन्म मुंबईतल्या एका ब्राह्मण कुटुंबात झाला. सुरवातीचे नृत्य शिक्षण सीताराम प्रसाद यांच्याकडे घेतले.
दमयंती जोशी यांना वयाच्या चौथ्या वर्षी मादाम मेनका या नृत्यांगनेने आपली वारसदार म्हणून पंखाखाली घेतले. हे सगळे १९३० च्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबईत घडत होते ह्या पार्श्वभूमीवर अजूनच जास्त महत्वाचे आहे. मादाम मेनका या पारंपारिकरित्या नृत्याच्या घराण्यातून आलेल्या नव्हत्या पण कथ्थक शिकलेल्या होत्या आणि मणिपुरी, कुचिपुडी अश्याही अनेक शैलींचाही त्यांनी अभ्यास केला होता. अनेक शैलींना आपल्या बॅलेमधे एकत्र करण्याचे प्रयोग मेनका जोशी यांनी केले. त्याचे संस्कार घेऊन दमयंती जोशींनीही पुढे बरेच महत्वाचे यशस्वी प्रयोग केले. या सगळ्यात त्यांना पूर्णपणे साथ देणारी त्यांची आई वत्सलाबाई जोशी यांचेही योगदान महत्वाचे होते.
भारतीय नृत्य विदेशात पोहचवण्याचे श्रेय दमयंती जोशी यांना जाते. त्यांना राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला होता. भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता. मा.दमयंती जोशी यांचे निधन १९ सप्टेंबर २००४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
वामन पंडित हा रामदासाचा समकालीन असून पंडीत संप्रदायाचा प्रातिनिधिक कवी होय. त्याचा कालखंड इ.स. १६३६ ते १६९५ असा मानला जातो. तो संस्कृत पंडित होता. प्रारंभी त्याने संस्कृत भाषेत रचना केली होती, परंतु पुढे रामदासस्वामींच्या सांगण्यावरुन त्याने मराठीत ग्रंथरचना केली. त्याच्या ग्रंथांमध्ये निगमसार, गीतेवरील समश्लोकी टीका, यथार्थदीपिका, कर्मतत्व इत्यादींचा समावेश होतो.
तथापि, वामन पंडित प्रसिध्द आहे तो त्यांच्या आख्यान कवितांमुळे राम व कृष्ण यांच्या जीवनावरील महत्वाच्या प्रसंगांवर ही आख्याने आहेत. वामन पंडिताची आख्याने विविध श्लोकवृत्तात्मक असून प्रत्येक आख्यानाच्या प्रारंभी मंगलाचरण आहे आणि त्या मंगलाचरणातच त्या आख्यानाचे सारही सांगितले आहे. विविधता, विदग्धता आणि विपुलता यांनी त्याचे काव्य नटलेले आहे. यमक आणि प्रसाचा हव्यास हे त्याच्या शैलीचे वैशिष्टय सांगता येईल. त्याच्या रचनेतील यमकाच्या अतिरेकामुळे त्यास खमक्या वामन असे म्हटले जाते.
१०० हून अधिक चित्रपटांत दारा सिंग यांनी अभिनय केला होता. १९७८ साली दारासिंग यांना रुस्तम-ए-हिंद या किताबाने गौरवण्यात आले होते. २००३ साली ते राज्यसभेचे खासदारही झाले.
बापू पटवर्धन यांनी गेले ९-१० वर्षे ब्लड कॅन्सरने आजारी होते. त्यांनी १५-२० केमो घेतल्या होत्या. त्यांनी कॅन्सरलाही मात दिली होती, असे त्यांचे शिष्यगण सांगतात. ३० किमो झाल्यानंतर त्यांनी कोलकात्याला जाऊन कार्यक्रम सादर केला.
विद्यार्थीप्रिय ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर ल. गावडे सरांनी २० जून २०१६ रोजी त्र्याणव्या वर्षात पदार्पण केलंय.
वंदनीय गावडे सरांनी वीस जून दोन हजार सोळा रोजी, त्र्याणव्या वर्षात पदार्पण केलंय ! २० जून १९२४ ही सरांची जन्मतारीख आहे. आजच्या मंगलदिनी गावडे सरांच्या घरी, दिवसभर त्यांच्या विद्यार्थ्यांचा, शिक्षकगणांचा, पत्रकारांचा, साहित्यिक, शासकीय, कला, अश्या विविध क्षेत्रातील जाणत्यांचा वावर असतो. मी तो सर्व अनुभव गेली अनेक वर्षे जवळून बघत आलोय. होय, बरोब्बर पन्नास वर्षे माननीय गावडे सरांचा मला अगदी जवळून सहवास लाभत आलाय ! जणू आज सरांच्या जन्मदिनी आम्ही विद्यार्थी गुरुपौर्णिमा साजरी करतोय, व्यासपूजन करतोय !
"गावडे सर" हा एक अभ्यासाचा स्वतंत्र विषय आहे, एवढे त्यांचे कार्य महान आहे !
मला आजही लख्ख आठवतंय, पुण्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या, डेक्कन जिमखान्यावरील भावेस्कूलमध्ये, एकोणीसशे त्रेसष्ठ साली गावडे सर आले. सर त्यापूर्वी नूतन मराठी विद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करीत होते. एक व्यासंगी शिक्षक म्हणून सरांची कारकीर्द महान आहे, भरीव आहे !
सरांना त्यांच्या शालेय जीवनांत मराठी विषयाबरोबरच चित्रकलेचीही गोडी होती, हे ऐकतांना खरं वाटतं कां ? होय, त्यांना चित्रकलेची खूप आवड होती, त्यांना त्यावेळी चित्रकलेची पारितोषिकेही मिळाली होती. गावडे सरांनी काढलेल्या, जलरंगातील निसर्गचित्राला बाँबे आर्ट सोसायटीतर्फे मुंबई येथे भरलेल्या प्रदर्शनात प्रशस्तिपत्रक मिळाले होते. तसेच "जीव जिवाचे जीवन" आणि पर्वती व पार्वती ही दोन छायाचित्रे, बाँबे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनामध्ये प्रदर्शित झाली होती. प्रदर्शनातील त्यांची चित्रे पाहून, जाणते कलारसिक आबासाहेब मुजुमदार ह्यांनी गावडे सरांना, चित्रकार होण्याचा सल्ला दिला होता !
गावडे सर, आजही त्यांच्या सर्व गुरुजनांविषयी मनापासून बोलतात, त्यांच्या अनेक आठवणी सांगतात ! सर, आपल्या यशाचे सर्व श्रेय विनम्र भावनेने त्यांच्या गुरुजनांना प्रांजळपणे देतात, हे पदोपदी जाणवते !
१९६७ साली, आम्हांला अकरावीला गावडे सर मराठी शिकवायचे, सरांचे ते तास आजही जसेच्या तसे मनावर ठसले आहेत. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींचे पसायदान असो की, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांची "सागरा प्राण तळमळला" असो, सर विषयाशी पूर्णपणे एकरूप झालेले असायचे आणि आम्ही विद्यार्थी, सरांचे बोलणे ऐकण्यात तल्लीन व्हायचो ! विद्यार्थी घडविण्याचा वसा, हेच सरांच्या उभ्या आयुष्याचे मर्म होय !
आमच्या विद्यार्थीदशेतील सरांचा आदर्श सांगणारी एक आठवण सांगू कां ? स्नेहसंमेलनाची शाळेत तयारी चालली होती. साहजिकच घरी निघायला सर्वांना उशीर व्हायचा. शाळेपासून सायकलवर सरांचे घर तसे जवळ होते. दिवेलागणी नंतर शाळेतून सगळे घरी निघाले, तेव्हां सर सायकल हातात धरून पायी चालू लागले, एका शिक्षकांनी त्यांना विचारले, "गावडे सर, पायी कां चाललात ? सायकल पंक्चर झाली कां ?" त्यावर गावडे सरांचे उत्तर ऐकून सगळेच स्तिमित झाले . ते म्हणाले, "आज सायकलचा दिवा नाही, आणि अंधार झालाय, मग दिव्याशिवाय सायकल चालवून नियम कसा मोडू ?" त्याकाळी सायकलला रॉकेलचा दिवा असायचा. गावडे सरांची ती शिस्त, नियमांची अंमलबजावणी आम्ही जवळून पाहिली, कळत नकळत ते सुसंस्कार आमच्या पिढीवर घडले, एवढे मात्र निश्चित !
मागे एकदा सर अमेरिकेला गेले होते, तेव्हां गावडे सरांच्या एका हुशार विद्यार्थ्याने एक शक्कल लढविली. त्याने अमेरिका स्थित असलेल्या, सरांच्या अनेक विद्यार्थ्यांना एकत्र जमवून, एक स्नेहमेळावा आयोजित केला, तेव्हां सर्वांनी गावडे सरांना आग्रह केला की आज पुन्हा तुमच्याकडून ज्ञानेश्वरी शिकायची आहे. झाले, सरांनी तिथेच "पसायदान" विषयी दीर्घ शिकवणी घेतली.
गावडे सरांच्या स्वभावामध्ये वाकयुदध कधीच नसते, हं, सरांचा वाग्यज्ञ ऐकणे, म्हणजे मोठी पर्वणी असते ! सरांची मृदू, मवाळ भाषा, समोरच्याला जिंकून घेते. सरांनी ज्ञानेश्वरी फक्त अभ्यासली नाही तर आत्मसात केली, हे सरांच्या सहवासात येणा-या प्रत्येकाला जाणवते !
गावडे सरांना शालेय जीवनापासूनच वाचनाची प्रचंड आवड होती. ह. ना. आपटे, वि. स. खांडेकर, अश्या अनेक नामवंतांचे विपुल साहित्य सरांच्या वाचनात आले. "स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर" हे तर सरांचे श्रद्धास्थान ! एकदा तर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या समक्ष, एका कार्यक्रमात गावडे सरांना गाणं म्हणण्याची सुसंधी लाभली होती. सावरकरांच्या समग्र साहित्याचा आणि जीवनपटाचा अभ्यास सरांनी केला. महत्वाचे म्हणजे, पुणे विद्यापीठामध्ये ह्या विषयावरील पीएचडी करण्याचे पहिले भाग्य डॉ. प्र. ल. गावडे सरांना लाभले, ही खरोखरीच अभिमानाची गोष्ट आहे !
आपल्या गावडे सरांनी, श्रीक्षेत्र आळंदीच्या, श्रीज्ञानेश्वरमहाराज संस्थांचे विश्वस्त तसेच प्रमुख विश्वस्त म्हणून १९८६ ते १९९५ या कालावधीमध्ये मनोभावे सेवाकार्य केले होते. त्या काळातील, माझ्या आठवणीतील एक सुखद प्रसंग! तो दिवस होता, १७ नोव्हेंबर १९८९ चा ! पंडित हृदयनाथ मंगेशकर ह्यांचा "अमृताचा घनु" चा पहिला कार्यक्रम श्रीक्षेत्र आळंदी येथे देऊळवाड्यात झाला होता ! कार्याक्रमापुर्वीच गावडे सरांनी होणा-या गर्दीचा अचूक अंदाज बांधून, अजानवृक्षा जवळील अंगणात कार्यक्रमाची व्यवस्था केली होती. बघता बघता गर्दी वाढू लागली. वाड्याच्या भिंतीवर, कट्ट्यावर, जागा मिळेल तिथे लोक बसले, अगदी देऊळवाड्याबाहेरही जनसागर जमला होता. साडे आठ वाजता सुरु झालेला कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक प्राचार्य राम शेवाळकर सरांनी "अमृताचा घनु"चे निरुपण केले होते तर पंडितजींची अमृतमयी अभंगवाणी, असा अद्वैत शब्दस्वरांचा संगम श्रोत्यांनी अनुभवला. मध्यरात्री अडीच-तीनचे सुमारास कार्यक्रमाची सांगता झाली. त्यापुढे गावडे सरांनी आम्हां सर्वांना श्रीप्रसाद दिला! गावडे सरांचा जन्म श्रीक्षेत्र नेवासा येथील आहे, मला वाटतं हा खरोखरी दैवी योगायोग आहे !
गावडे सरांनी अध्यापनाबरोबरच शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी अनेक उपयोगी उपक्रम अवलंबिले होते. १९७४ ते १९८० ह्या कालावधीमध्ये सरांच्या अध्यक्षतेखाली "गरवारे शालेय भजन दिंडी" हा नामांकित उपक्रम नावाजला गेला.
गावडे सरांच्या प्रदीर्घ अनुभवाची छाप अनेक संस्थांवर राहिली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीचे सदस्य, कोषाध्यक्ष, संपादन मंडळ सदस्य, ग्रंथ समीक्षक सदस्य, अशी विविध पदे सरांनी भूषविली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अधिवेशनात सरांचा चर्चासत्रात सहभाग होता. महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेचे अध्यक्षपद सरांनी भूषविले आहे. मराठी अध्यापक संघाचे (कनिष्ठ महाविद्यालय) अध्यक्षपद असो वा किर्लोस्कर स्वच्छ सुंदर शाळा योजना, सल्लागार समितीचे सदस्य असो, किंवा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक परीक्षण समितीचे सदस्य असो, सर त्या त्या उपक्रमामध्ये स्वतःला झोकून देऊन काम करीत आले. विशेश म्हणजे सरांनी कामायनी मतीमंद मुलांच्या संस्थेचेही आस्थेवाईकपणे काम केले. मुख्याध्यापक प्रशिक्षण वर्गांचे संचालन सरांनी केले आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गावडे सरांनी दैनिक केसरीमध्ये सातत्याने तीस वर्षे लेखन केले आहे. महाराष्ट्र टाईम्स मुंबई आवृत्तीमध्ये एक वर्षभर शैक्षणिक विषयावरील सदराचे लेखन केले आहे.
गावडे सरांनी विपुल ग्रंथ लेखन केले आहे. (१) सावरकर : एक चिकित्सक अभ्यास, (२) कवी यशवंत - काव्यरसग्रहण,(३) सावरकरांचे साहित्य विचार, (४) माध्यमिक शिक्षण - विचार आचार व्यवहार, (५) दहावी अभ्यास - तंत्र आणि मंत्र, (६) विचार प्राथमिक शिक्षणाचा, (७) मुक्तांगण ते मुक्तविद्यापीठ - शैक्षणिक ग्रंथ, (८) राष्ट्रगुरू संत तुकडोजी, (९) भटकंती - प्रवासवर्णन , ही काही वानगीदाखल दिलेली नावे आहेत !
गावडे सरांनी आजवर अनेक शैक्षणिक ग्रंथांचे संपादन केलेले आहे ! त्यामध्ये शैक्षणिक पुस्तकांचाही समावेश आहे ! साहित्य विचार, कथाकौस्तुभ शालेय मराठी व्याकरण, मराठी भाषेची काही पाठ्य पुस्तकांचाही त्यात समावेश आहे. लोकमान्य टिळक विशेषांक, स्वातंत्र्यसमर विशेषांक, तसेच विद्यामंदिरातील चैतन्यदीप -प्राचार्य न. शं. जमदग्नी, आदी उच्च ग्रंथांचे संपादन सरांनी केलंय !
आपल्या गावडे सरांची ओघवती अमृतमय वाणी ऐकण्याची सुसंधी संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवली आहे ! उल्लेख करायचा झालाच तर, अनेक दाखले देता येतील. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, साहित्य संघ, वसंत व्याख्यानमाला, सावरकर साहित्य व्याख्यानमाला, लोकहितवादी व्याख्यानमाला, सांगली येथील गुरुवर्य शिराळकर व्याख्यानमाला, बृहन महाराष्ट्र साहित्य परिषद आयोजित व्याख्यानमाला, संतसाहित्य विषयक व्याख्यानमाला, गीतारहस्य जयंती व्याख्यानमाला. अजून एक विशेष म्हणजे, दोन हजार दहा साली, नागपूर येथे आयोजित सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद गावडे सरांनी भूषविले होते !
श्रीज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी, ह्यांनी प्रकाशित केलेल्या, श्रीतुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, श्रीज्ञानेश्वर वाड्मय सूची, श्रीनामदेवकृत समाधी अभंग, संजीवन, आदी महान ग्रंथांचे, गावडे सरांनी संपादन केले आहे !
आदरणीय गावडे सरांनी शिक्षण क्षेत्रामध्ये केलेल्या मौल्यवान कार्याची नोंद अनेक मान्यवर संस्थांनी घेतली आणि सरांचा यथोचित गुणगौरव केला !
गावडे सरांनी कला क्षेत्रामध्ये भरारी घेतली आहे ! कलोपासक संस्थेने सादर केलेल्या, मो. ग. रांगणेकर लिखित, "माझं घर" ह्या संगीत नाटकात नायकाची भूमिका साकारली होती. शिशुपालवध आणि भार्गवगर्वहरण या संगीतिकांचे लेखन सरांनी केले होते. भार्गवगर्वहरण ही संगीतिका पुणे आकाशावाणी केंद्रावरून प्रक्षेपित झाली होती. आकाशवाणीच्या विविध मुलाखती, श्रुतिका व्याख्याने, चर्चा, ह्यामध्ये सरांचा अजूनही सहभाग असतोच.
वंदनीय गावडे सरांचा मला अगदी घरगुती सहवास लाभत आलाय. गावडे सर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या डे. जि. भावेस्कूलचे मुख्य होते, तर माझे वडील पंडित विष्णू चिंचोरे गुरुजी, पुण्यातील त्याच संस्थेच्या बाल शिक्षण मंदिर शाळेचे आणि नंतर भावे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक होते. मा. गावडे सर आणि माझे वडील ह्यांच्यामध्ये स्नेहाचे अकृत्रिम नाते होते. आज माझ्या वडिलांच्या माघारीही तोच स्नेहाचा ओलावा, गावडे सरांकडून मी अनुभवीत आहे. माझ्या मनात गावडे सरांच्या विषयी अनेक आठवणी आहेत, किती आणि कोणत्या सांगू ?
दोन डिसेंबर २०१० रोजी "घ्यावी भरारी आकाशी" ह्या माझ्या पाचव्या अल्बमचे प्रकाशन पुण्यात झाले होते ! गावडे सरांनी त्याचे अध्यक्ष स्थान स्वीकारावे अशी माझी मनःपूर्वक इच्छा होती. सरांनी माझी विनंती लगोलग मान्यही केली. कार्यक्रमाचे दिवशी सकाळी गावडे सरांचा वाईहून मला फोन आला, ते म्हणाले, "अरे माझ्या मोठ्या बहिणीची तब्येत ठीक नाही म्हणून मी वाईला आलोय, पण तू काळजी करू नकोस, मी कार्यक्रमाचे ठिकाणी, संध्याकाळी वेळेवर पोहोचतो"! मी क्षणभर गांगरलो आणि संध्याकाळी अगदी वेळेवर, सर वाईहून, कार्यक्रमाचे ठिकाणी, पुण्यातील मयुर कॉलनीमधील बाल शिक्षण मंदिरच्या सभागृहात दाखल झाले ! गावडे सरांचे भाषण छे, छे, अमृताचे बोल ऐकून समस्त श्रोतृवृंद भारावला, अन मी तर … विचारूच नका. कार्यक्रम झाला अन् गावडे सर पुन्हा वाईला गेले. वयाच्या सत्त्याऐंशीव्या वर्षीसुद्धा सरांनी, आपल्या लाडक्या विद्यार्थ्याच्या प्रेमापोटी केलेली धावपळ थक्क करणारी होती !
अगदी अलीकडचा म्हणजे सोमवार, दिनांक २० मे २०१३ चा एक प्रसंग सांगू कां ? गावडे सर मला म्हणाले, "अरे उपेंद्र, आपल्या एअर मार्शल भूषण गोखले ह्यांना "अग्नी पुरस्कार" जाहीर झालाय, त्यांचे कौतुक करायची इच्छा आहे". झालं ! मा. एअर मार्शल भूषण गोखले सरांना मी फोन केला अन् भेटीची वेळ ठरवली. त्याच दिवशी दुपारी साडेचार वाजता, मा. गावडे सर, श्री. ना. वा. अत्रे सर, उत्कर्ष प्रकाशनचे श्री. जोशी आणि मी स्वतः मा. गोखले साहेबांचे निवासस्थानी गेलो. सुरुवातीच्या गप्पागोष्टी झाल्यावर, मा. गोखले सरांनी स्वतः केलेला एक अनमोल संग्रह दाखविला. आम्ही सगळे बघत होतो आणि गावडे सर, कुतुहलाने प्रत्येक गोष्ट विचारून, जाणून घेत होते.
पुणे येथील निवारामध्ये, शतायुषी संस्थेने, सोमवार, दिनांक एक जुलै २०१३ रोजी आयोजित केलेल्या, "छंदातून भेटलेली माणसं" ह्या माझ्या गप्पांच्या कार्यक्रमास गावडे सर आवर्जून उपस्थित तर राहिलेच, शिवाय कार्यक्रम संपताच, तोंडभरून माझे कौतुकही केले अन् प्रेमाने माझ्या पाठीवरून हात फिरवला !
अगदी अलीकडची म्हणजे बुधवार, दिनांक दहा जुलै २०१३ ची एक आठवण ! श्री. कृष्णा देशपांडे लिखित, "असावे घरटे आपुले छान" पुस्तकाचे प्रकाशन पुण्यातील कर्वे रोडवरील, महाराष्ट्र पत्रकार सभेच्या सिद्धार्थ हॉल येथे संध्याकाळी सात वाजता झाले. आॅस्ट्रेलियातील माझे मित्र चेतन देशपांडे ह्यांनी मला फोन करून सांगितले कि, "माझ्या वडिलांच्या पुस्तक प्रकाशनाला, गावडे सरांना प्रमुख पाहुणे म्हणून तुम्ही बोलवा ". नंतर पुण्यात आल्यावर चेतन देशपांडे, कृष्णा देशपांडे ह्यांचे समवेत मी गावडे सरांचे घरी समक्ष आमंत्रण करण्यासाठी गेलो, तो काय, सरांनी तत्काळ होकार भरून आमंत्रण स्वीकारले !
कार्याक्रामचे दिवशी, गावडे सरांना कार्यक्रमस्थळी घेऊन जाण्यासाठी, मी सरांच्या घरी, संध्याकाळी सव्वासहा वाजता गेलो, पाहतो तर काय, टेबललँपच्या प्रकाशात, गावडे सर, खुर्चीवर बसून प्रकाशित होणा-या पुस्तकाचे वाचन करीत होते, मी म्हणालो, "सर निघायचं ना?" "हो, हो, मी तयार आहे", सर उत्तरले. वास्तविक सरांनी पुस्तक वाचले होते, तथापि पुन्हा एकदा नजरेखालून घालण्याची सरांची जिज्ञासू वृत्ती निश्चितच उल्लेखनीय आहे. प्रत्यक्षात, पुस्तक प्रकाशनाचे वेळी, सरांनी सारा श्रोतृवृंद निमिषात, आपल्या अभ्यासपूर्ण वाणीने जिकला, हे कां मी वेगळे सांगू ?
मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०१४ रोजी, दुपारी साडेचार वाजता, मएसो भावे प्राथमिक शाळेच्या वार्षिक संमेलनाचे वेळी आमची भेट झाली. संध्याकाळी कार्यक्रम संपताच, मी गावडे सरांना म्हणालो, "सर चला, मी तुम्हांला घरी सोडतो". सर म्हणाले, "उपेंद्र, आधी साहित्य परिषदेमध्ये जायचं आहे". मी रिक्षा थांबवली. सर म्हणाले, "अरे, रिक्षा नको, संध्याकाळचे पायी चालायचं आहे. तू नुसतं बरोबर चल, हात नको धरू". आम्ही साहित्य परिषदेत गेलो.
अश्या महान व्यासंगी गुरूंचे आपण विद्यार्थी आहोत, हे म्हणवून घेताना, उर अभिमानाने फुलून येतो. मला असं वाटतं, कि फक्त गुरुपौर्णिमेलाच पूजन होत नाही तर, जिथे जिथे, जेव्हां जेव्हां आपल्या गुरूंचे नित्यनेमाने स्मरण करतो, तेच गुरुपूजन, तीच व्यास पूजा होय !
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर प्र. ल. गावडे सरांना उदंड दीर्घायुरारोग्य लाभो, अशी श्री ज्ञानेश्वर माउलींचे चरणी मनोभावे प्रार्थना,
लेखक : उपेंद्र चिंचोरे
20 June 2016
सामाजिक कार्यामुळे लाखोंचा पोशिंदा झालेले भवरलाल जैन यांनी आपली ‘भाऊ’म्हणून ओळख निर्माण केली होती. भंवरलाल जैन यांचे दहावीपर्यंत शिक्षण आर. आर. हायस्कूलमध्ये तर बी. कॉम, एलएल.बी. मुंबई विद्यापीठातून केले. महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती जेव्हा मुंबई-पुण्यापलिकडे जात नव्हती, तेव्हा भवरलाल जैन यांनी स्वत:च्या औद्योगिक साम्राज्याचा पाया जळगावात रचला.
प्रसाद सावकार यांचा जन्म १४ डिसेंबर १९२८ बडोदे येथे झाला.
प्रसाद सावकार यांचे पूर्ण नाव सांबप्रसाद रघुवीर सावकार. गोमंतकीय संगीत रंगभूमीवरील नामवंत सावकार घराण्यात त्यांचे वडील रघुवीर सावकार हे स्त्रीभूमिकांसाठी प्रसिद्घ असलेले गायक-नट होते व ते ‘रंगदेवता’ या पदवीने ओळखले जात.
वडिलांच्या ‘रंगबोधेच्छु नाट्यसमाज’ या नाट्यसंस्थेत प्रसाद सावकारांचा बालपणापासूनच वावर असल्याने त्यांच्यावर लहानवयातच नाटक प्रसाद सावकार व संगीत यांचे संस्कार होत गेले. गायन-अभिनयाचे प्राथमिक धडे त्यांना वडिलांकडूनच मिळाले. संशयकल्लोळ नाटकात त्यांनी वडिलांबरोबर कृत्तिकेची भूमिका केली. एवढेच नव्हे, तर ह्याच नाटकात कृत्तिका, साधू, जलशातील गायक व वैशाख शेठ अशा चार भूमिका एकाच वेळी करून त्यांनी एक विक्रमच केला. गोपीनाथ सावकारांच्या ‘कलामंदिर’ संस्थेच्या सौभद्र, मृच्छकटिक, विद्याहरण, मानापमान अशा नाटकांतून त्यांनी सुरुवातीला काही भूमिका केल्या, तसेच हौशी रंगभूमीवर करीन ती पूर्व इ. नाटकांतूनही कामे केली. मो. ग. रांगणेकरांच्या ‘नाट्यनिकेतन’ संस्थेच्या रंभा कुलवधू, कोणे एके काळी, एक होता म्हातारा या नाटकांतून त्यांनी विविध भूमिका साकारल्या. लग्नाची बेडी या नाटकातील त्यांची ‘गोकर्णा’ची भूमिका उल्लेखनीय होती. पेडगावचे शहाणे, गोरा कुंभार अशा मोजक्या चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका केल्या.
१९६० ते १९७२ या काळात मराठी रंगभूमीवर संगीत नाटक परंपरेचे पुनरुज्जीवन घडून आले. या काळात नाट्यसंगीताला नवसंजीवन देणाऱ्या प्रमुख गायक-नटांमध्ये प्रसाद सावकार हे अग्रणी होते. १९६० मध्ये विद्याधर गोखले यांची दोन संगीत नाटके–पंडितराज जगन्नाथ व सुवर्णतुला लागोपाठ रंगभूमीवर आली. या दोन नाटकांनी मराठी संगीत रंगभूमीचे नवे पर्व सुरू झाले आणि प्रसाद सावकारांनी गायिलेली त्या नाटकांतील पदे संस्मरणीय ठरली. विशेषतः पंडितराज जगन्नाथ या नाटकातील वसंत देसाईंच्या संगीत-दिग्दर्शनाखाली प्रसाद सावकारांनी (भूमिका पं. जमनलाल) गायिलेली ‘जय गंगे भागिरथी’ व ‘सावन घन गरजे’ ही नाट्यपदे खूपच लोकप्रिय झाली. ‘जय गंगे’ने तर लोकप्रियतेचा कळस गाठला व प्रसाद सावकारांना श्रेष्ठ गायक-नट असा लौकिक मिळवून दिला. त्यांनी सुवर्णतुला नाटकात कृष्णाची भूमिका केली आणि ‘रतिहून सुंदर’ व ‘रागिणी मुख’ ही पदे गायिली. यानंतर विद्याधर गोखले यांच्या मंदारमाला नाटकात त्यांनी ‘मदनगोपाळ’ ही व्यक्तिरेखा साकारली व राम मराठे यांच्याबरोबर ‘बसंत की बहार’ ही जुगलबंदी गायिली. तसेच विद्याधर गोखले यांच्या जय जय गौरीशंकर या नाटकात ‘ श्रृंगी’ची भूमिका केली. त्यातील त्यांनी गायिलेली ‘ भरे मनात सुंदरा’ व ‘नारायणा रमारमणा’ ही नाट्यपदेही लोकप्रिय झाली. यानंतर त्यांनी पुरुषोत्तम दारव्हेकरांच्या कट्यार काळजात घुसली या नाटकात ‘सदाशिव’ची भूमिका साकारून पं. जितेंद्र अभिषेकींसमवेत ‘घेई छंद’ हे पद गायिले. पुरुषोत्तम दारव्हेकरांच्या घनश्याम नयनी आला या नाटकात त्यांनी गायिलेल्या दोन गीतांची ध्वनिमुद्रिका निघाली. मधुसूदन कालेलकरांच्या तो राजहंस एक या नाटकात त्यांनी कृष्णाची भूमिका साकारली. अमृत मोहिनी, अवघा रंग एकची रंग ही त्यांच्या भूमिका असलेली अखेरची नाटके होत. त्यांचा आवाज भरदार व श्रवणमधुर, वाणी स्वच्छ व शुद्ध आणि गायकीत आवश्यक त्या करामती, ताना व हरकती असल्याने त्यांच्या गाण्यांची श्रोत्यांवर सहज छाप पडते. छोटा गंधर्व यांना त्यांनी श्रवणगुरू मानले.
त्यांना अनेक मानसन्मान लाभले: पद्मश्री, अ. भा. मराठी नाट्यपरिषदेचे बालगंधर्व सुवर्णपदक, संगीतभूषण राम मराठे स्मृतिपुरस्कार, गोवा शासनाचा कलावंत पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, गोमंतक मराठी अकादेमीच्या दीनानाथ स्मृतिप्रतिष्ठानतर्फे लता मंगेशकर पुरस्कार इत्यादीचा त्यात समावेश होतो.
आपल्या समुहा तर्फे. प्रसाद सावकार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Copyright © 2025 | Marathisrushti