नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

साहित्यिक , विचारवंतांच्या सहवासातूनच योगायोगाने आमच्या महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे या संस्थेची शाखा मुंबई प्रदेश व ठाणे जिल्हा (महाराष्ट्र्) येथे माझे मित्र कविवर्य प्रा. जयंतराव भावे यांच्या अथक प्रयत्नातून सुरू झाली. साहित्य हे वैश्विक आहे. साऱ्या जगभरात मराठी भाषिक आहेत. सध्याच्या या फेसबुक / वाट्सअपच्या जमान्यात या वरील मित्रांचा सहज संपर्क संवाद होत आहे. अनेक मराठी लेखक/कवी आपल्याशी जोडले गेले आहेत.

शालेय शिक्षण संपून महाविद्यालयीन जीवन सुरु होताना आपल्या मनात आपल्या भावी आयुष्याविषयी खूप वेगवेगळ्या कल्पना असतात. पैकी काही स्वप्नाळू असतील तर काही वास्तववादी! स्वप्नाळू वाटत असलेल्या कल्पना जर प्रत्यक्षात उतरवायच्या असतील तर त्यासाठी स्वत:च्या विचारांची आपल्या स्वत:ला खात्री असणं आणि आपल्या निर्णयाबद्दल आत्मविश्वास असणं फार महत्वाचं ठरतं. असाच एक स्वप्नाळू वाटणारा, सरधोपट वास्तवाशी फारकत घेणारा निर्णय एक युवती घेते… आणि त्यानंतर काय काय घडतं तिच्या आयुष्यात याचा पट मांडला आहे “गोष्ट एका खर्या इडीयट ची’ या पुस्तकात!
तो भय्या इमानदार होता. वखारीचे उत्पन्न वर्षानुवर्षे तो त्यांना आणून द्यायचा. घर त्याच्यावर सोपवून बाळ दिल्लीला गेला. बाळला आतां त्या घरांत परत यावं असं वाटत असेल ? त्या घराचं भाडे भरायचा प्रश्नच नाही कारण विनाभाडे फक्त देवांची पूजा करण्याच्या अटीवर ते त्याच्या आजोबांकडे आले आहे. त्यामुळे ते विकताही येत नाही कारण त्यांच्याकडे मालकी हक्कच नाही. कोणी म्हणत त्या देवांमुळेच त्या कुटुंबाची वाताहत झाली. सुरूवातीला देवांची पूजा व्यवस्थित होई. कुटुंबावरची संकटे वाढली तशी त्यांना शंका यायला लागली. मग घरांतली देवांची खोली दिवसातून दोनदाच उघडू लागले. एकदा सकाळी पूजेसाठी आणि एकदा संध्याकाळी उदबत्त्या लावण्यासाठी. इतरवेळी दार बंद करून ठेवत. पण फार कांही फरक पडला नाही.

पुणे जंक्शनहून पुणे-कोल्हापूर पॅसेंजर गाडी नुकतीच सुटली होती.
सेकंड क्लासमधे पाच प्रवासी अजून डुलक्या देत होते.
नुकतेच त्यांचे भोजन झाले होते, त्यामुळे ते आता झोंप काढण्याच्या प्रयत्नात होते.
सर्व कसं शांत होतं.
अचानक दरवाजा उघडला गेला आणि एक ताडासारखा सरळ, उंच आणि नीटनेटका पोशाख केलेला, अंगात जाकीट घातल्यामुळे पत्रकार वाटणारा माणूस आंत शिरला.
धाप लागल्यामुळे डब्यात मधेच तो थोडा वेळ नुसता उभाच होता.
त्याचे डोळे बसायला जागा शोधत होते.
मग तो उद्गारला, “परत चुकीचाच डबा मिळालेला दिसतोय. कमाल आहे !
एखादा वैतागेल अशाने.”
त्याला पाहून प्रवाश्यांमधला एकजण आनंदाने ओरडला, “श्याम आठवले, तू इकडे कसा ? श्यामच ना तू ?”
नव्या प्रवाशाने प्रथम भकास नजरेने त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं मग तोही आनंदाने ओरडला, “राम हेगडे, अरे किती वर्षांनी भेटतो आहेस !
कुठे होतास ? मला माहित नव्हतं तूही ह्या गाडीतच आहेस.”
रामने विचारलं. “कसं चाललंय तुझं, श्याम ?”
“अरे यार, मी ठीक आहे रे !
फक्त माझा डबा चुकलाय आणि कांही केल्या तो मला सांपडत नाही.
काय मूर्ख आहे मी ! मला कोणीतरी बडवला पाहिजे !”
गाडीबरोबर एक हेलकावा घेऊन श्याम पुढे म्हणाला, “विचित्र गोष्टी होत असतात.
मी गाडीतून उतरून जरा पुढे जाऊन एक छोटा पेग घेत होतो आणि दुसरी घंटा वाजली.
एकाने कसं बरं वाटणार ?
मग आणखी एक पेग मी घाईघाईत घेत असतांनाच तिसरी बेल झाली.”
“मी कसाबसा तो संपवून गाडीकडे धांव घेतली आणि वेड्यासारखा समोर येईल त्या डब्यात उडी मारून चढलो.
मूर्खपणाच झाला तो !”
राम म्हणाला, “पण तू तर मजेत दिसतोयस ? इथे भरपूर जागा आहे. ये बस इथे !”
“नाही रे बाबा ! मला माझा डबा शोधला पाहिजे. अच्छा !” श्यामने स्पष्टीकरण केले.
राम म्हणाला, “ऐक माझं ! असा डबा शोधतांना जरा चूक झाली तर दोन डब्यांच्या मधे पडशील !
आता इथे बस. स्टेशन आलं की शोध तुझा डब्बा.”
श्यामने एक मोठ्ठा सुस्कारा सोडला आणि कांटेरी पाटावर बसल्यासारखा चुळबुळ करत तो रामच्या समोरच्या मोकळ्या जागेवर बसला.
राम हेगडेने विचारले, “तू कुठे निघाला आहेस ?”
श्याम आठवले म्हणाला, “मी अवकाशाच्या प्रवासाला निघालोय. माझ्या डोक्यात गोंधळ आहे की मी कुठे चाललोय तें मीच सांगू शकत नाही.
जिथे नशीब नेईल तिथे जायचं.
तू कधी सुखी मूर्ख पाहिला आहेस ? नाही ?
मग सर्वात सुखी माणूस पहा.
माझा चेहरा पाहून काय वाटतं तुला ?
राम हेगडे त्याच्याकडे पहात म्हणाला, “विशेष कांही नाही दिसत वेगळं ! आहेस नेहमीसारखाच.”
श्याम आठवले म्हणाला, “मी खरंच सांगतो तुला.
मी आरशात पाहिलेलं नाही पण आतां मी अगदी येडपट दिसत असेन ना !
मी वेडाच होतोय बहुदा.
तुला माहित आहे, राम, अरे मी लग्न केलंय. काय समजलास !”
राम हेगडे आश्चर्याने ओरडला, “म्हणजे तू शेवटी लग्न केलसं !”
श्याम म्हणाला, “केलं म्हणजे काय ? आजच केलं.
लग्न केलं, देवळातून बाहेर आलो आणि थेट गाडी पकडली.”
रामने श्यामचे अभिनंदन वगैरे केले.
मग तो म्हणाला, “तू तर छुपा रूस्तुम निघालास !
म्हणून तू असा सजलायस आणि ताजातवाना वाटतोयस !”
श्याम म्हणाला, “ हो रे मित्रा ! स्वप्न पुरं करायला, मी अगदी अत्तराचा फवारा सुध्दा अंगावर आणि कपड्यांवर मारलाय.
ह्या क्षणी मी माझ्यावरच खूष आहे.
स्वर्गसुख, स्वर्गसुख म्हणतात, ते हेच असावं !
माझ्या आयुष्यात मी कधी एवढा आनंदी नव्हतो.”
श्यामने डोळे मिटून मान हलवली.
“मी अत्यानंदात आहे. विचार कर, दोन मिनिटांत मी माझ्या डब्ब्यात पोहोचेन.
तिथे खिडकीशी मला आपलं सर्वस्व देऊ केलेली, सुंदर गोल चेहरा अन् सुंदर नाक डोळे असलेली माझी देवता, माझी प्रिया, माझी बायको बसलेली असेल.
एखादी परीच आहे असं वाटणारी सुंदरी, माझी लाडकी.. !
पण हे सर्व तुला सांगून काय उपयोग. तू व्यवहारी, अरसिक, अविवाहीत.
प्रेम वगैरे झूठ वाटणारा तू ! तुला नाही समजणार.
तू जर कधी विवाह केलास तर माझी आठवण येईल तुला.
मी आता एक दोन मिनिटांत तिच्या बाजूला बसलो असेन आणि तिची हनुवटी हातात धरून तिचं सौंदर्यपान करेन.”
पुन्हा श्याम आठवलेने डोळे मिटले अन् मान हलवली.
तो परत बोलू लागला, “मी माझी मान तिच्या खांद्यावर ठेवून झोपेन.
ह्या अशा आनंदाच्या क्षणी सगळं जग कवेंत घ्यावसं वाटतं.
राम, मित्रा, ये, तुला कडकडून भेटू दे.”
राम म्हणाला, “ये, तुझा आनंद साजरा करू.”
दोघे कडकडून मिठी मारतात.
आजूबाजूला बसलेले प्रवासी मोठ्या आवाजांत चाललेला हा संवाद ऐकत असतात.
दोघे कडकडून भेटतांच सर्व एकत्र हंसतात.
श्याम पुढे बोलू लागतो, “मग चित्र पूर्ण करण्यासाठी पॅंट्रीमधे जाऊन कांही खानपान करणार. मजा करणार.”
आता श्यामचे बोलणं ऐकायला पांच श्रोते होते.
त्याच्या बोलण्याला, त्याच्या हावभावांना ते सर्वच दाद देत होते.
त्यांची झोप आता उडाली होती.
तो बडबडतच होता.
तो हंसला की सर्व हंसत होते.
तो म्हणाला, “सद्गृहस्थहो, कधी दारू प्यावीशी वाटली तर प्या.
ती पिणं चांगली की वाईट ह्याचं तत्त्वज्ञान बनवण्याची गरज नाही.
ते तत्त्वज्ञान आणि ते मानसशास्त्र अगदी गुंडाळून ठेवा."
तेवढ्यात एक तिकीट चेकर तिथून जात होता, त्याला उद्देशून तो म्हणाला, “साहेब, तुम्ही जेव्हां डब्बा नंबर २०९ मधे जाल तेव्हां तिथे एक हिरव्या रंगाची पांचवारी साडी नेसलेली स्त्री दिसेल, तिला सांगा की मी इथे आहे."
चेकर म्हणाला, "जरूर सांगेन पण डब्बा नंबर २०९ ह्या गाडीला जोडलेल्या डब्ब्यांत नाही. २१९ नंबरचा डब्बा मात्र आहे."
श्याम म्हणाला, “ ठीक आहे. मग २१९ असेल. तिला सांगा की तिचा नवरा इथे आहे आणि ठीक आहे.”
मग तो डोक्याला हात लावत म्हणाला, “काय मजा आहे. नवरा, बायको, एक छोटा विधी झाला आणि कांही मिनिटांत आम्ही पती-पत्नी झालो. माझं ठीक आहे हो !
पण तिचा विचार करा. काल ती मुलगी होती, लहान होती आणि आज लागलीच पत्नी झाली. कमाल आहे !”
एक प्रवासी मधेच म्हणाला, “आज काल कोणी सुखी असणं फार कठीण झालं आहे.
पांढरा हत्ती पहायला मिळणं जसं कठीण आहे, तसंच ते कठीण आहे.”
“बरोबर आहे पण ह्यात दोष कुणाचा आहे ?” श्यामने बसल्या जागीच पाय लांब करत विचारलं.
तो पुढे म्हणाला, “तुम्ही जर सुखी नसाल तर तो तुमचा दोष आहे.
तुम्हाला नाही वाटत असं ?
माणूस स्वतःच सुख स्वतःच निर्माण करतो.
तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर तुम्ही सुखी होऊ शकता.
नाही तर तुम्हीच सुखाकडे पाठ फिरवतां.”
“पण पुढे काय होणार, ते तुम्हाला कसं कळतं ?” कोणीतरी विचारलं.
श्याम म्हणाला, “ अगदी सोप्पं आहे.
निसर्गाने माणसाच्या आयुष्यात वेगवेगळे भाग ठेवलेत.
त्या त्या वेळी माणसाने आपल्या त्या स्थितीवर प्रेम करावे.
मात्र तसं न करतां तुम्ही जर दुसऱ्याच अपेक्षा ठेवल्यात तर तुम्हाला दुःखच मिळणार.
तरूण झालात की विवाह करावा, ही निसर्गाचीच आज्ञा आहे.
त्या वयांत विवाहाविना आनंद नाही.
योग्य वेळ येताच विवाह करावा.
चालढकल करू नये पण तुम्ही लग्न करत नाही.
दुसऱ्याच कशाची तरी वाट पहाता.
तसं केल्याने दुःखी होता.
विवाह करावा, मद्य प्यावसं वाटलं तर मद्य प्यावं.
आनंद साजरा करावा.
‘महाजनो येन गता: स पन्थ:’ हे मला अगदी योग्य वाटतं.
सर्व जण जातात, तोच म्हणजे मध्यम मार्ग म्हणजेच राजमार्ग.
म्हणूनच मी सुखी आहे.”
“तुम्ही म्हणतां की माणूस स्वतःचा आनंद निर्माण करतो पण मला सांगा की दांत दुखत असला किंवा एखादीला वाईट सासू छळत असली तर त्या व्यक्तींना आनंद कसा होणार ? सांगा !
सर्व कांही दैवावर अवलंबून असतं.
योगायोग असतो.
समजा, आता आपल्या गाडीला अपघात झाला तर तुम्ही ताबडतोब सूर बदलाल.” एक प्रवासी म्हणाला.
“एकदम चुकीचे उदाहरण.
गाडीला अपघात वर्षा-दोन वर्षात एखादा होतो. मला अपघात होईल अशी भिती मुळीच वाटत नाही.
मला अपघात या विषयावर मुळीच बोलायचं नाही.
आपली गाडीची गती मंद झाली.
बहुदा एखादं स्टेशन जवळ आलं असावं !“
रामने विचारलं, “तू आता पुढे कुठे जाणार आहेस ? कोल्हापूरला की बेळगावला ?”
श्याम म्हणाला, “कोल्हापूरलाही नाही आणि बेळगांवलाही नाही.
मी सांगलीहून आलो आणि धुळ्याला चाललोय.
कोल्हापूर, बेळगांव उलट्या दिशेला आहेत. मी उत्तरेला चाललोय.”
राम म्हणाला, “अरे पण ही गाडी मिरजेहून कोल्हापूर किंवा बेळगांवकडे जाणारी आहे.”
“अरे मी चाललोय नाशिकमार्गे धुळ्याला.
परत उलट कशाला जाऊ ?” श्यामने ठामपणे सांगितले.
“मी तर बेळगांवला चाललोय. आता सातारा येत असेल.” राम म्हणाला.
“म्हणजे ही दिल्लीकडे जाणारी गाडी नाही ?”
“श्याम, तू पुण्याला बहुदा चुकीच्या गाडीत चढलास.
तू परत सांगलीकडे जाऊ शकशील पण धुळ्याला नाही.” राम म्हणाला.
बाकीच्या प्रवाशांनीही त्याला दुजोरा दिला.
“अरे बापरे ! मी ही किती मूर्ख आहे.
मग तो चक्क रडू लागला.
अरे माझी नवखी पत्नी त्या पॅसेंजर गाडींतून गेली आहे.
बिचारी एकटीच काळजी करत बसली असेल.
आता काय करू ?”
तो तोंडावर हात घेऊन रडत म्हणाला, “मी एक दुःखी, दुर्दैवी माणूस आहे. आता काय करू ?”
“अरेरे ! कठीण आहे खरं !
पण तुम्ही साताऱ्याहून तिला तार पाठवा आणि थोड्या वेळाने मागून येणाऱ्या कलकत्ता एक्सप्रेसने धुळ्याला जा.
तुम्ही कदाचित थोडे आधीच पोहोचाल आणि तिला धुळे स्टेशनवरच गांठू शकाल.”
“कलकत्ता एक्सप्रेस ! आणि मी त्या कलकत्ता एक्स्प्रेसचे तिकीट कसे काढू ? माझ्याकडे पैसेच नाहीत.
माझे पैसे पत्नीकडेच आहेत.”
सर्व प्रवासी हंसतात.
आपापसात कांही बोलतात आणि हंसत हंसतच थोड्या वेळापूर्वी स्वतःला सुखी म्हणवणाऱ्या त्या दुःखी माणसाच्या तिकीटासाठी पैसे जमवू लागतात.
- अरविंद खानोलकर.
मूळ कथा - हॅपी मॅन
मूळ लेखक - ॲंटन चेकॉव्ह
तळटीप - ही गोष्ट वाचून सुप्रसिध्द मराठी लेखक चिं. वि. जोशी ह्यांच्या वायफळाचा मळा मधल्या एका गोष्टीची आठवण झाली.
चिं. वि.जोशींची गोष्ट सरस आहे.
तिचा उल्लेख मी माझ्या आठवणींची मिसळमधे केला आहे.
तोच भाग पुन्हा सादर करतो.
“चिं. वि. जोशींच्या "वायफळाचा मळा" या पुस्तकांत एक लेख आहे.
"स्मरणशक्तीचे प्रोफेसर".
लेखकाला गाडीत एक प्रोफेसर भेटतात. प्रोफेसर साहेब लेखकाला स्मरणशक्ती कशी वाढवावी, लहान सहान गोष्टी कशा लक्षात ठेवाव्यात ह्याबद्दल उदाहरणासहीत लेक्चर देतात.
त्यांचे एक उदाहरण पहा.
ते म्हणतात, "मला अहमदनगर जायचे आहे.
अहमदनगर हे नांव लक्षांत ठेवण्यासाठी मी एक कारिका रचली आहे.
ती अशी "दिवस गर्व विष नसे ज्या पुरी" (अह + मद + न गर).
पद्यमय कारिका पटकन् लक्षात रहाते आणि गांवाचे नांव लक्षात ठेवणे सोपे जाते."
लेखक त्यांना विचारतो, "आपण अहमदनगरला कोणत्या कामासाठी निघाला आहेत ?"
तर प्रोफेसर म्हणाले, "अहो, अहमदनगरला माझ्या बहिणीला स्थळासाठी दाखवण्याचा कार्यक्रम आहे."
लेखकांने विचारले,"पण बहिण कुठे दिसली नाही तुमच्या बरोबर."
प्रोफेसर त्या प्रश्नाने गडबडले आणि म्हणाले, "अरेच्चा, म्हणजे ती मनमाड स्टेशनवर गाडी बदलताना तिथेच राहिली वाटते !"
-- अरविंद खानोलकर.
मूळ लेखक- ॲंटोन चेकॉव्ह.
आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीत, क्लिंट इस्टवुड सारखाच दिसणारा व त्याची हुबेहूब ‘कॉपी’ करणारा, फिरोज खान हा एकमेव कलाकार आहे!
परदेशातला, बहुदा त्यागराजचा हा शेवटचा प्रोजेक्ट होता. तो सध्या वयाच्या पन्नाशीच्या टप्यात होता. हिंदी महासागरात श्रीलंकेच्या आजून दक्षिणेला, श्रीलंकेच्या आधिपत्यातल्या, एका नगण्य बेटावर, तो प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून आला होता. या खडकाळ आणि डोंगराळ बेटावर काही ब्रिजेस बांधायची होती. भारतातल्या कॉन्स्ट्रक्शन कंपनीने त्याला पाठवले होते. याला दोन कारणे होती. एक तर तो सडाफटिंग होता. कुटुंब बायका पोर! काही पाश नव्हते. कारण त्याचा ‘कुटुंब’ व्यवस्थेवर अजिबात विश्वास नव्हता. आजाद पंछी! सुख पैशात खरेदी करता येतात, हे याच जगाने, त्याला शिकवले होते. आणि दुसरे कारण त्याची भटकंतीची हौस!
लांबलचक लाकडी फळ्यांनी बनविलेली ही हातगाडी बारा ते पंधरा फूट लांबीची असे. त्याला दोन लोखंडी चाकं असत. जर त्यांच्यावर वजनाचा भार कमी असेल तर तो गाडीवान हातगाडी हाताने ढकलत नेत असे. कधी हातगाडी मालाने भरलेली असेल तर तो गाडीला लावलेला पट्टा खांद्याला अडकवून गाडी ओढत जाई.
“अरे तुमच्या औषधांनी मिस्त्रीशेट चांगला बरा झाला. करसनची मात्र झाली ” पंचाईत. त्याचे सर्व रंगढंग बंद पडले. बापाची अफाट संपत्ती आणि हे दिवटे एकुलते एक चिरंजीव. अत्यंत उधळ्या. त्यात पोरी फिरवणे, पाटा, जुगार आणि कसले कसले नाद. बाप लेकाची रोज भांडणे व्हायची. खूप आरडाओरडा व्हायचा. अख्ख्या ससेक्स रोडचा तो एक चर्चेचा विषयच झाला होता. शेवटी कंटाळून कंटाळून शेटनी करसनला इस्टेटीचा अर्धा वाटा काढून दिला आणि करसन वेगळा राहू लागला. पण त्याच्या सारख्या कर्मदरिद्री माणसाला कितीही पैसा कसा पुरावा? काही वर्षातच कफल्लक होऊन तो परत आला. शेटनी त्याला घराबाहेर काढला. पण त्याची आई मधे पडली म्हणून शेटनी त्याला परत घरात घेतला. थोडे दिवस बरे गेले आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या.
पोलीस खात्यात असताना त्याने कधी स्वतः तर कधी सहकाऱ्यांबरोबर जुलूम, जबरदस्ती, अन्याय केल्याच्या घटना त्याने गप्पांच्या ओघात आम्हाला सांगितल्या होत्या.
पन्नास वर्षांपूर्वी सदाशिव पेठेत असताना घरात ‘इस्त्री’ हा प्रकार नव्हता. फक्त वडिलांचेच कपडे अधूनमधून जवळच्या लाॅन्ड्रीतून इस्त्री करुन आणावे लागत. मी सर्वात लहान असल्याने ते काम माझ्याकडेच असायचे. ती ‘लक्ष्मी लाॅन्ड्री’ होती राऊत नावाच्या माणसाची. त्याचा मुलगा माझ्या वडिलांचा विद्यार्थी.
Copyright © 2025 | Marathisrushti