मिटून-मिटुन पाकळी, फुला रे, आता तरी पड खाली
तो बघ तिकडे सूर्य मावळे
तुझेही तसेच केसर पिंकले
कर जागा मोकळी, फुला रे, मिटुन पड खाली ॥
सकाळची रुसली उषा
गाढवा बघ आली निशा
चढली रात्रीलाही काजळी, फुला रे, मीट आता पाकळी ॥
सुगंध तुझा पसरलेला
जाण, हा पुरा ओसरला
का तरीही जागा व्यापली फुला रे आता मिटुन पड खाली ॥
तुझ्यातले अन् काव्य सरकले
ते बघ तुझे म्हातारपण आले
ओळख तू ही स्थिती मुळी, फुला रे, खाली मिटुन पड पाकळी ॥
(शालेय अभ्यासक्रमातील कवी देशपांडेंची कविता प्रस्तुत कवितेची स्फूर्ती आहे.)
-यतीन सामंत
तव स्मरणांचे गीत होते
तूच गीता शब्दभावली
तूच, प्रेरणा संवेदनांची
भावशब्दात प्रसवलेली
तुझ्या निरागस लोचनी
भावप्रीती ओथंबलेली
सोहळे रम्य ऋतुऋतुंचे
लाजती मोदे तव गाली
नभांगणी कृष्ण सावळा
तू पावरी अंतरी घुमलेली
तूच सुगंधा दरवळणारी
ममहॄदयी या गंधाळलेली
हवे काय, अजुनी जीवनी
तुझ्या स्मरणी मती गुंतली
क्षणक्षण ही अधीर स्पंदने
तव भेटीसाठी आसुसलेली
–वि. ग. सातपुते. ( भावकवी )
9766544908
रचना क्र. १८४
३१/७/२०२२
घरट्यातील पिल्लं तोंड वासून वाट बघतात.
त्या हाका दूर वर असलेल्या पक्ष्यांना ऐकू येतात...
पखांत बळ आणून वेगाने येतात उडत उडत.
इवल्याशा चोंचीत एकेक दाणा राहतात घालत घालत..
मोठी होतात धडपडतात. पडतात उठतात.
आणि पंखात बळ आले की दूर दूर उडत जातात..
घरटं होत ओकबोक. पण हे दोघे असतात आनंदात.
पक्षाला वाटतो अभिमान. कालवाकालव होते मात्र तिच्या काळजात...
कधी साथीने जगतात कधी एकटेच उरतात..
त्यांच्याही पंखातील बळ संपत आहे तरीही ते जगत असतात.....
घरातील मुलंही अशीच आईच्या कुशीत असतात..
बाबाच्या मेहनती वर लहानाचे मोठे होतात..
बळ येते त्यांच्या प्रगतीच्या पंखात.
आत्मविश्वासाने ध्येयाप्रती झेपावतात.
सगळे असूनही म्हणतात आम्ही झालो निराधार..
रानातल्या या पक्षांना कुणाचाही नसतो आधार...
.
माणसं राहतात मोठ्या सुरक्षित आणि सुखसोयीत.
म्हणून हाच फरक आहे फक्त घरात आणि घरट्यात...
सौ कुमुद ढवळेकर
खोलीमध्ये कोंडूनी मांजर, हाती घेई काठी ।
मारून टाकण्यासाठी तीला, लागला तो पाठी ।।
अतिशय भीत्री असूनी ती, जीवासाठी पळे ।
हतबल होता पळून जाण्या, मार्ग तो ना मिळे ।।
उपाय नसता हाती कांहीं, चमत्कार घडे ।
सर्व शक्तीनी त्याच्यावरती, तुटून ती पडे ।।
उडी मारूनी नरडे धरले, दोन्ही पंजानी ।
मृत्यूचाच तिने गळा घोटला, शक्ती युक्तींनी ।।
प्रत्येकामध्ये सुप्त असते, शक्ती लपलेली ।
अवचित वेळ पडता दिसे, बाहेर आलेली ।।
मदत देतो निसर्ग तुम्हां, संधी बचावासाठी ।
जीवनासाठी झगडत रहा, शिकवण ही त्याची ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता
शक्तीस द्यावी दिशा चांगली, जीवन यशाकरिता ।।धृ।।
बागेतील फुले सुंदर
फुलपाखरांचे रंग बहारदार
मोहक इंद्र धनुष्याकार
निसर्गातील रम्यतेमध्यें शोधा, ईश्वरी गुणवत्ता ।।१।।
खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता
भजन पुजन प्रभूचे
भक्ति-भाव मनाचे
उपवास करी देहशुद्धीचे
तपसत्वाच्या शक्तीनें करा, आत्म्याची मुक्तता ।।२।।
खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता
गरिबासी मदतीचा भाव
दुःखितांसाठीं प्रेमळ स्वभाव
घ्या इतरांच्या मनाचे ठाव
मिळवा कल्याण करुनी, त्यांच्यात समाधानता ।।३।।
खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता
धनसंपत्ती गंगाजळ
मोहमोयांचे जाळ
षड्-रिपू विकार सकळ
विवेक बुद्धीने नष्ट करा, ही मनाची मलिनता ।।४।।
खर्च करावी ऊर्जा आपली योग्य कामांकरिता
सर्वत्र आहे प्रभू संचार
अणूरेणूत झाला साकार
ब्रह्मांडही त्याचा आकार
विलीन व्हा ईश्वरी तत्वांत, त्यास सर्व अर्पिता ।।५।।
खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
राधेचं श्रीकृष्णावरील निखळ प्रेम
आजच्या तरुण प्रेमिकांत दिसत नाही !
असा प्रश्न सामान्य जनांच्या मनात
आला तर काही चुकले नाही !
प्रेमी युगल एकमेकांवर अंधळ प्रेम करतात,
तर काही जण प्रेमात पडून अंधळे होतात !
कोणाचं प्रेम खरं कोणाचं खोटं,
ते आपापल्यापरीने पुढे रेटतात !
एकतर्फी प्रेमात अपयश आल्यावर
अॅसिड हल्ले, बलात्कार होतात,
बाह्य आकर्षणाला भुलून केलेलं प्रेम
काश्याची साक्ष देतात !
आंधळ्या प्रेमात केलेल्या चुका
गडद काळोखात वाकुल्या दाखवतात,
मुलांपेक्षा मुलींच्या कलंकांच्या
शृंखला भविष्यात सुरु होतात !
अब्रूची लक्तरे वेशीवर टांगल्यावर कळते
निर्णय चुकीचा होता,
प्रेम नव्हतेच
वासनांचा चक्क बाजार होता !
जगदीश पटवर्धन, दादर
एका हिंदी कवितेचा अनुवाद,थोडे काही शब्द घालून माझे,--!!!
सोडून आले आहे मी सगळे,
आपल्यात घडलेले सारे,
माझे तुझे सारे किस्से,
खरंच मी सोडून आले,
रडले डोळे माझे,
अगदी हमसाहमशी,
तुझ्याच फक्त घरापाशी,
सोडून आले सगळे,
रुसणं, रागावणं, मनवणं
मुद्दाम जिद्दीने भेटणं,
अशा कित्येक स्मृती,
सोडून आले तुझ्या दाराशी,-!!!
एकत्र घालवलेले रम्य क्षण, डोळ्यात साठवलेले,
अशा सगळ्या रात्री,
सोडल्या तुझ्या दाराशी, --!!!!
अगदी अगदी बेवारशी,
जिथे सुखाचे आभाळ,
येऊन सामावत होते,
तिथे त्याला पेलणारे ,
हातच मी सोडून आले,
तुझ्या दाराशी बेवांरशी,---!!!!
त्यात काही विजाही,
येऊन भेटायच्या मला,
त्यावेळी होणारी सुखाची बरसात, सोडून आले मी तुझ्या दाराशी,--!!
मिलनाच्या वाटेवरच,
विरहाचे होते चटके,
एका अनामिक भितीने,
आसुसलेपण त्या प्रेमातले,
सोडून आले तुझ्या दाराशी,--!!!
तुझ्या दाराशी,---!!!!!
हिमगौरी कर्वे.©
चिव् चिव् करित बोलतां
तुम्ही सारी भाषा
दोन स्वरातून विचारांना
देत असता दिशा
शब्द आमचे सप्तसुरांतून
येती बाहेरी
व्यक्त करिती भाव सारे
असती जे अंतरी
दोन अक्षरी किमया सारी
तुमच्या भाषेची
त्याच चिव चिवे समजुन घेता
धडधड ह्रद्धयाची
भाव मनीचे टिपून घेण्या
शब्द लागती थोडे
चेहऱ्यावरल्या हलचालीनी
प्रश्न उकलूनी पडे.
समज तुमची आपसांतली
कौतूक करणारी
शब्द मोजके असून देखील
भाव दाखविणारी
चिमण्यानो तुम्ही शिकवा सारे
मानव जातीला
व्यर्थ बडबड करुन सारी
वाहूनी तो गेला
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
विष्ठा बघूनी थुंकलो,
घाण वाटली मजला,
अमंगल संबोधूनी,
लाखोली देई तिजला ।।१।।
संतापूनी मजवर ,
कान उघडणी केली,
तुझ्याचमुळें मूर्खा मी,
अमंगळ ती ठरली।।२।।
आकर्षक रूप माझे,
लाडू करंज्यानें युक्त
कपाटातूनी काढूनी,
केले सारे तूंच फस्त ।।३।।
परि मिळतां तुझा तो,
अमंगळ सहवास,
रूप माझे पालटूनी,
मिळे हा नरकवास ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
एखाद्या मध्यरात्रीपासून रदद् व्हावी बेईमानी वागण्यातली
आणि चलनात यावी सच्चाई...
एखाद्या मध्यरात्रीपासून बंद व्हावा अविश्वास मनामनातला
आणि नवीन ताजातावाना विश्वास भरावा ह्र्दयात...
एखाद्या मध्यरात्रीपासून रद्दबातल व्हावा स्वार्थीपना संकुचित मनातला
आणि मनात उठावेत तरंग निःस्वार्थ भावनेचे....
एखाद्या मध्यरात्रीपासून संपून जावा द्वेष घाणेरडा
आणि हृदय ओथंबून वहावे निर्मळ प्रेमाने...
एखाद्या मध्यरात्रीपासून वाईट भावना ठराव्यात अवैध
आणि सद्भावना रुजावी प्रत्येक मनामनात...
एखाद्या मध्यरात्रीपासून बेकायदेशिर व्हावी धोखेबाजी
आणि आपलेपणा अंकुरावा माणसाच्या अंत:करणात...
एखाद्या मध्यरात्रीपासून नष्ट व्हाव्यात सर्व चिंता
आणि ऊगवावी एक सकाळ सकारात्मक विचारांची...
एखाद्या मध्यरात्रीपासून माणूस बनावा
अगदीच माणसासारखा...
जुन्या वाटा बदलायला त्याने घ्यावा काही दिवसांचा वेळ अधिकृतपणे
पण त्याने बदलावी आपली नियत एखाद्या मध्यरात्रीपासून ....
आणि एकदा त्याच्या नियतीने वाटा बदलल्या की मग
पुन्हा पुन्हा नाही पडणार गरज नोटा बदलण्याची...
हे मात्र घडावेच अगदी एखाद्या मध्यरात्रीपासून....
Forwarded Post
Copyright © 2025 | Marathisrushti