(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • कुशल संवादपटू विलासराव

    माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मी असंख्य लोकांच्या मुलाखती घेत त्यांच्याशी संवाद साधला आहे. यापैकी काही माणसे चांगलीच स्मरणात राहिली आहेत. त्यापैकी विलासराव देशमुख हे एक व्यक्तिमत्त्व. त्यांच्या निधनाची बातमी कळल्यावर त्यांच्याशी संवाद साधतानाचे ते सारे क्षण मनाच्या किनार्‍याशी ताजे होत डवरले. 

    – सुधीर गाडगीळ

  • ज्येष्ठांच्या निर्वाहासाठी नियम २०१०

    भारतीय संस्कृतीत कुटुंबसंस्थेस महत्त्वपूर्ण स्थान आहे. परंतु या सध्याच्या परिस्थितीत विभक्त कुटुंब पध्दत उदयाला येताना दिसते. सर्वात मोठा प्रश्न आहे तो वृध्दांचा (ज्येष्ठ नागरिकांचा). मुलांचा सांभाळ करुन त्यांच्यावर चांगले संस्कार केल्यानंतर करिअरच्या मागे धावणार्‍या मुलांनी पालकांकडे पाठ फिरविली. अशा अनेक ज्येष्ठ नागरिकांसमोर प्रश्न आहे तो आधाराचा. मुलं वृध्दापकाळातील आधाराची काठी असतात, असे सर्वसामान्यपणे म्हटले जाते, परंतु याचा विसर पडू लागला आहे. आता यावर उपाय म्हणून शासनानेच लक्ष घालून ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थासाठी व कल्याणासाठी नियम २०१० तयार केला आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात अडचणी येणार नाहीत, त्यांना जगण्यासाठी त्रास होणार नाही यांची काळजी घेतली आहे.

  • साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे!

    दैनिक लोकसत्ताच्या रविवार २९ ऑगस्ट २०१० च्या अंकात श्री अरुण जाखडे यांनी गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे असे मत मांडले आहे.

  • समृद्ध विचारांची दिवाळी

    गावाकडची दिवाळी खूप छान असायची.वर्षभरातील मोठा सण म्हणून दिवाळी कधी येईल याची ओढ लागायची.दिवाळीची धमाल,सर्व जणांनी मिळून आनंद घेणं हे जरी चार पाच दिवसाचं असलं तरी तोच आमचा वर्षभराचा ठेवा होता.सतत आठवत राहते ती दिवाळी.पहाटे उठून कुडकुडत्या थंडीत..आई अंघोळ घालायची…

  • कर चले हम फिदा….: मदन मोहन

    युद्ध म्हटले की बंदुका, तोफा, मशिनगन्स, युद्धनौका,विमाने, बॉम्बस्,गडगडाट, परीसर दणाणून सोडणारे आवाज वगैरे वगैरे डोळ्या समोर येतात. या सर्व गदारोळात संगीत कसे असणार? फार फार तर मिलटरी बॅन्ड एवढाच काय तो संगीताशी संबंध असणारा भाग. बाकी सर्व मन आणि शरीराला भयकंपीत करणारेच असते. भारतीय सैन्यात असाच एक तरूण सामिल झाला होता. इराक मधल्या बगदाद शहरात रायबहादूर चुन्नीलाल नावाच्या श्रीमंत व्यक्तीच्या घरात जन्मलेल्या या तरूणाने बालपणाचा पाच वर्षांचा काळ बगदादमध्येच घालवला होता. १९३२ मध्ये रायबहादूर चुन्नीलाल मुंबईत आले व नंतर सिनेमा व्यवसायतील एक मोठे प्रस्थ बनले. बॉम्बे टॉकीज व फिल्मीस्तान या त्याकाळच्या नावाजलेल्या सिनेनिर्मितीच्या संस्थेत भागीदार झाले. तो तरूण सैन्यात दाखल झाला खरा पण त्या वातावरणात त्याचे मन रमेना. बंदुकीच्या गोळ्या वा मशिनगन्सचे आवाज त्यांच्या कानावर जेव्हा पडत तेव्हा त्याच्या मनात खोल कुठेतरी सतारीच्या तारा झंकारत….अलवार स्वरांचे सूर खुणावत…शेवटी १९४६ मध्ये त्या तरूणाने सैन्यातील नोकरीला बाय बाय केले आणि आपल्या आवडत्या क्षेत्रात काही तरी करावे म्हणून मुंबईला आला.

    सुदैवाने येथे त्यानां ऑल इंडिया रेडिओत नोकरी मिळाली आणि येथूनच मदनमोहन कोहली या तरूणाचा संगीतकार मदनमोहन असा प्रवास सुरू झाला. ऑल इंडिया रेडिओमध्ये त्यांची गाठ पडली संगीतातील दोन महान दिग्गजांशी. पहिले शहनाई नवाज उस्ताद बिस्मिला खान व दुसरे उस्ताद फैय्याज खान यांच्याशी. त्याचवेळी संगीतकार रोशन देखील या रेडिओ स्टेशनवर कामाला होते. स्वत: मदन मोहन यांनी रूढर्थाने संगीताचे असे शिक्षण घेतले नव्हते मात्र या नोकरीच्या वास्तव्यात त्यांना या दोन दिग्गजाकडून संगीतातले मर्म आत्मसात केले. मदनमोहन यानां चित्रपटात संधी मिळाली ती मास्टर गुलाम हैदर या संगीतकारामुळे. मात्र संगीत दिग्दर्शनाची नाही तर गाणे गायनाची. ‘शाहीन’ नावाच्या चित्रपटात त्यांनी चक्क लताजी बरोबर ही दोन गाणी गायली. पूढे १९५० मध्ये मात्र संगीत दिग्दर्शनची पहिली संधी आंखे या चित्रपटाद्वारे मिळाली. मात्र पाच सहा वर्षे संघर्षातच गेली.

    १९५६ मध्ये आला एव्हीएम या दक्षिणेतल्या प्रसिद्ध बॅनरचा किशोर व अशोक कुमार अभिनीत ‘भाई भाई’ हा चित्रपट. यातील जवळपास सर्वच ११ गाणी खूप गाजली आणि मदनमोहन यांना यशाची पहिली चव चाखता आली. “कदर जाने ना…” “ए दिल मुझे बता दे”….”थंडी थंडी हवा”…ही गाणी आजही रसिकांच्या ओठावर सहज येतात. बेगम अख्तर हा मदनमोहन यांचा विक पॉईंट. त्यांच्या गझला आणि भारतीय वाद्ये त्यांच्या नसानसात भिनलेले होते. मुशायरात म्हटली जाणारी गझल व नज्म त्यांनी चित्रपटात आणली, तेथून ती प्रेक्षकाच्या घरात व हृदयात पोहचली. याचे श्रेय संगीतातील सर्वच दिग्गज संगीतकार खुल्या मनाने मदनमोहन यानां देतात ते योग्यच आहे.

    त्यानां क्रिकेटचेही अफाट वेड होते. आताचे ब्रेबॉन स्टेडियमच्या जागी पूर्वी एक मोकळे मैदान होते जिथे तासन तास मदनमोहन क्रिकेट खेळत असत. बेगम अख्तरचे सूर, सैन्यातील कठोर शिस्त आणि क्रिकेटचं वेड हे तिन्ही गुण त्याना संगीत देतानां खूप उपयोगी पडले. एस.डी.बर्मन व सी.रामचंद्र यांच्याकडे त्यांनी सुरूवातले सहाय्यक म्हणून काम केले पण त्यांच्या संगीतावर मात्र त्यांचा प्रभाव पडला नाही. अतिशय मोजक्या वाद्यमेळासह ते आपले गाणे तयार करत. सतार, तबला ढोलकी, सॅक्सोफोन यांचा अप्रतिम वापर त्याच्या संगीतात बघायला मिळतो. त्यामूळे गायकांच्या गाण्याचे आवाजाचे सर्व तपशील त्यांच्या गाण्यात आढळून येते. ‘अनपढ’ चित्रपटाचे ‘आप के नजरोमे समझा प्यार के काबील मुझे’ या एका गाण्याच्या मोबदल्यात संगीतकार नौशाद आपला गाण्याचा सर्व खजिना लुटायला तयार होते. ‘हकीकत’या युद्धाची पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटातील रफीचे ‘कर चले हम फिदा जानोतन साथीयों…..’ हे गाणे म्हणजे त्यांनी भारतीय सैन्याला दिलेली मानवंदनाच आहे. तर याच चित्रपटातील ‘हो के मजबूर मुझे उसने भुलाया होगा’…….हे गाणे म्हणजे भारतीय जवानांच्या हृदयाच्या छेडलेल्या ताराच आहेत. ‘नैनिहाल’ मधील ‘मेरी आवाज सुनो’ हे रफीचे गाणे पंडीत नेहरूनां अर्पण केलेले गाणे होते….उस्ताद रईस खान यांच्या सतारीचा वापर अनेक गाण्यात त्यांनी इतका अप्रतिम केला आहे की स्वत: लता दीदी ‘आज सोचा तो आंसू भर आये’ या गाण्यातील सतारीचे सूर ऐकून हळव्या झाल्या होत्या. ‘वो चूप रहे तो’(जहाँ आरा)….’रस्मे उल्फतमे’(दिल की राहे)…..’नैनो मे बदरा छाये’(मेरा साया)….या गाण्यातील सतारीचे सूर आजही अंग मोहरून टाकतात.

    राजा मेंहदी अली खान, राजेन्द्र कृष्ण आणि कैफी आजमी या तिन गीतकारां सोबत त्यांचे खूप सुंदर असे टयुनिंग होते. यांच्या सोबत केलेली सर्वच गाणी खूप गाजली. त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटातील काही चित्रपट वगळता सर्वच खूप ब्लॉक बस्टर असे नव्हते. मात्र त्या चित्रपटातील गाणी खूप गाजली. लोक चित्रपट विसरले पण गाणी नाही विसरले. जवळपास १०० चित्रपटानां संगीत दिलेल्या मदनमोहन यानां पुरसकार मात्र कमीच मिळाले. १९७० मधील आलेल्या “दस्तक” चित्रपटातील “बयाँ ना धरो या गाण्याने” मात्र त्यानां राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. ‘आप की नजरो ने समझा’…(अनपढ) आणि ‘लग जा गले की’…(वह कौन थी?) या दोन गाण्यानां फिल्म फेअर नॉमिनेशन मिळाले पण पुरस्कार नाही मिळाला. अनेकदा अनेकानां नाही मिळत पुरस्कार पण त्यामुळे त्यांच्या स्थानाला काहीच धक्का पोहचत नाही. ….आजच्या काळातही जेव्हा एक १०-११ वर्षांची मुलगी अत्यंत तन्मयतेने “लग जा गले की आज ये”….. गाऊ लागते तेव्हा तिला हेही माहित नसते की ज्या संगीत दिग्दर्शकाचे ती गाणे गात आहे त्याकाळात तिच्या वडीलांचाही जन्म झाला नसेल. काही संगीतकार, साहित्यीक वा विचारवंत हे कालातीत असतात. खरं तर ५१ वर्षे हे काही असं एक्झीट घेण्याचं वय नाही. मदनमोहन खूप लवकर हे जग सोडून गेले.. त्यांच्या मृत्यू नंतर अनेक गझला, नज्म, कविता, शायरी यानां अनाथ् झाल्या सारखं वाटलं असेल.

    -दासू भगत (२५ जून २०१७)

  • प्रस्तावना – एका पुस्तकाची

    सत्य मिथ्या ऐसें कोणें। निवडावें।

    सत्य म्हणों तरी नासे। मिथ्या म्हणों तरी दिसे ।।

    बाळाच्या जन्मवेळी आणि पुढे प्रत्येक वर्षी साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसाच्या समयी...

    तसं पाहिल तर या संपूर्ण विश्वात आपली ग्रहमाला मग पृथ्वी, नंतर सजीवप्राणी, तद्नंतर चौऱ्यांशी लक्षयोनी या सर्वातून सजीव मानव मग बुद्धीयुक्त व्यक्ती बरोबरीने सधनता, सक्षमता या मुख्य पात्रता फेऱ्या पार केल्यास आपसूकच नातेवाईक, स्नेही, जवळचे सहकारी, काही अनोळखी, मित्र-मैत्रिणी, संस्था समाज यांना जोडणारे, यांचा समुह आपले वाढदिवशी स्मरण, अभिष्ट चिंततो. त्यामुळं अवघ्या सृष्टीसापेक्ष अणुरेणूसमान आपल्या जन्माने, चैतन्यरुपी आत्म्याच्या साहाय्याने आणि मिथ्या जडत्वप्राप्त देहाला चेतना प्राप्त होते. अशाश्वत देहाच्या आणि प्रत्येक पेशीस्थित निर्मळ मनाच्या, आगमनाचे इष्ट चिंतनाने सकारात्मक स्पंदनं निर्माण होऊन, त्या व्यक्तीचे पर्यायाने समुचित विश्वाचे सत्य, आर्त मनी प्रकटावे, ही मनीषा असावी. भय, भूक, मैथुन आणि निद्रा या लक्षणाने युक्त देहाला सजीव प्राणी म्हणतात. ‘पुनरपि जननं पुनरपि मरणं’ या येरझाऱ्या आहेतच.

    चैतन्यरूपी आत्म्याच्या साहाय्याने मिथ्या जडत्वप्राप्त देहाला चेतना प्राप्त होते. अशाश्वत मृत्यूसमयी नेमका उलट प्रवाह वाहतो. मिथ्या जडत्वप्राप्त देहाच्या कुडीतून प्राण म्हणजे सत्य आत्मा निर्वाण करून समुचित विश्वात सामावून जातो. मनुष्य या देहाच्या आसक्तीने आक्रोश करतो, परंतु संत मृत्यूचा आनंदोत्सव साजरा करतात. जीव-शिवाच्या संकल्पना स्पष्ट होत नाही तोवर हे दु:ख, विलाप होणारच. जन्म-मृत्यूच्या वेळी देहाच्या (जीव) आणि सत्य आत्म्याचा (शिव) संयोग होणे क्रमप्राप्त असते. जन्मवेळी देहाच्या (जीव) आणि सत्य आत्म्याचा (शिव) संयोग होतो आणि मृत्यूवेळी सत्य आत्म्याचा (शिव) आणि देहाची पंचमहाभूते (पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश) विश्वात पुन्हा विलीन होतात. जन्म-मृत्यूच्या मधल्या आयुष्यात जीव-शिव फक्त देहधारी प्राणी म्हणून वावर करतो. मृत्यू हा विषय खरेतर आपण आनंदावर विरजण पडेल म्हणून टाळण्याचा प्रयत्न करतो. सकारात्मक दृष्टीने मृत्यूची कला शिकणे आवश्यक आहे.

    मृत्यू-संकल्पना- इथं दोन गोष्टी असतात.

    १) मृत्यूचा क्षण-कालरूपी घोडा

    सरतां संचिताचें शेष । नाहीं क्षणाचा अवकाश।

    भरतां न भरतां निमिष्य । जाणें लागे ।।

    २) मृत्यूची जागा

    नित्य काळाची संगती । नकळे होणाराची गती ।

    कर्मासारिखे प्राणी पडती । नाना देसीं विदेसीं ।।

    एकदा इंद्रसभेत सर्व आमंत्रित देव येतात. विष्णु आपल्या गरुडाला महालाबाहेर सोडून सभेत जातात, तर इतरांबरोबर यमदेवसुद्धा आपल्या रेड्याला महालाबाहेर बांधतात. यमदेवाची नजर बाहेर झाडावर बसलेल्या कावळ्यावर पडते. ते चिंताक्रांत होतात आणि सभेस जातात. चाणाक्ष कावळ्याच्या नजरेतून ही गोष्ट सुटत नाही. यमदेवाच्या चिंताक्रांत नजरेने कावळा चांगलाच घाबरतो. त्याला मृत्यूभयाने घाम फुटतो. ते विष्णू वाहन गरुड पाहतो आणि तो कावळ्याला भीतीचे कारण विचारतो. कावळा इतिवृत्त कथन करतो. गरुड म्हणतो त्यात काय एवढं, आमचे विष्णुदेव जगाचे प्रतिपालक आहेत आणि मी त्यांचा आवडता गरुडवाहन आहे मी तुला मदत करतो. गरुड कावळ्याला पाठीवर बसवून काही क्षणातच गरुडभरारीने खूप दूरवर मेरुपवर्तावच्या गुहेत नेवून लपवतो आणि निश्चिंत रहा इथे यमदूतच काय प्रत्यक्ष यमदेवसुद्धा तुला नेऊ शकणार नाहीत. तुझा मृत्यू टळला असे आश्वस्त करून पुन्हा सभास्थानी येतो. सभा संपल्यावर यमदेव पुन्हा बाहेर येऊन झाडावर कावळा आहे का ते पाहतात. तो नाही म्हणून गरुडाकडे चौकशी करतात. गरुड छद्मीपणे हसून त्यांना कसे फसविले या आविर्भावात तो तर लांब मेरुपवर्तावर गेला असे सांगतो आणि यमदेव निश्वास सोडतात. आनंदलेल्या यमदेवांना पाहून गरुड आश्चर्याने विचारतो की काय झाले? तर यमदेव उत्तरात त्या कावळ्याची घटका भरली होती पण माझ्या अंदाजाने त्याचे मृत्यूस्थळ मेरुपवर्तावर होते आणि हा अजून इथे कसा? माझा अंदाज चुकतो की काय म्हणून चिंतेत होतो. मृत्यूचा क्षण किंवा स्थान आपल्याकडे येते किंवा आपण त्यास्थळी जातो.

    रामचरित मानस मध्ये संत तुलसीदास म्हणतात.

    तुलसी जसी भवतव्यता। तैसी मिलई सहाय।

    आपनो आवई ताही पही। ताई तहा लै जाय।

    कालरूपी घोडा देहाला मृत्यूकडे घेऊन जातो, मृत्यूचा क्षण उधारीने मिळू शकत नाही. एक चतुर मनुष्य मृत्यूसमयी दारी आलेल्या यमदूताला वाक्चातुर्याने गुंगवतो, यमदूताला बोलण्यात गुंतवून चहात गुंगीचे औषध घालतो, आणि त्याला गुंगी येते. हा चतुर मनुष्य यमदूताच्या यादीतील प्रथम असलेले आपले नाव फाडून सर्वात शेवटी खाली चिकटवतो. यमदूताला फसवण्याचा प्रयत्न करतो. थोड्या वेळाने यमदूत शुद्धीवर आल्यावर कामाची घाई करतो आणि त्याला सोबत येण्याचे फर्मावतो. चहाच्या मैत्रीची आठवण देत तो मनुष्य त्याला यादीनुसार बाकीच्यांना अगोदर घेऊन जा, मग माझा नंबर आल्यावर मला ने असे सुचवतो. मैत्रीला जागून यमदूत त्याच्या विनंतीनुसार ठीक आहे, यमदूत ग्लानी उतरल्यावर त्याच्याशी मैत्रीखातर यादी उलटी वाचतो आणि तिथे त्याचा खालून प्रथम क्रमांक लागतो. मी शेवटाकडून सुरुवात करून मग तुला नेतो असे सांगतो तर या चतुर मनुष्याने केलेली चतुराई त्याच्याच अंगलट येते कारण फेरफार केलेल्या यादीत खालून पहिला नंबर याचाच असतो. अशा रीतीने काहीही केले तरी मृत्यूक्षण चुकत नाही, आयुष्यात उसनं, उधारी मिळत नाही.

    मृत्यूची घटिका सांगू शकत नाही. ‘मापी लागले शरीर’ जन्माचा दिवस काळ वेळ आधुनिक शास्त्राने सांगता येते पण आज कुठलेही असे शास्त्र नाही की, जे मृत्यूची वेळ आणि दिवस सांगू शकते. आपण मृत्यूच्या क्षणाची असावधता बाळगतो. मृत्यूचा क्षणाचं दैन्य जीवाला एकट्याला सहन कराव लागत.

    कर्म, धर्म आणि काम याद्वारे मनुष्याने कितीही उत्तुंग यश प्राप्त केले, तरीही मृत्यू अटळ आहे. सत्कर्म करून अशी उंची प्राप्त करून घ्यावी की मृत्युरूपी घटनेचा आनंदसोहळा गोड मानून घेण्याचा सल्ला संत देतात. आपल्या देहातील आत्मा गेल्यावर देहातील चैतन्य नष्ट होते पण आत्मा चैतन्यरुपी असेल तर जन्म-मरणाच्या फेऱ्या चुकवू शकतो.

    असो ऐसे सकळही गेले। परंतु येकचि राहिले।

    जे स्वरुपाकार जाले। आत्मज्ञानी।।

    अखिल विश्वात सदेह चिरंजीवित्व प्राप्त झालेले फक्त अश्वत्थामा आहेत, परंतु आपण चैतन्याने चिरंजीव होण्याचे कष्ट घेतल्यास मृत्यू अटळ आणि आनंददायी मानायला शिकू.

    सदर पुस्तक परमार्थस्वरूप अध्यात्माचे दाखले देत मृत्यूपूर्व तसेच मृत्यूपश्चात सुनियोजित व्यवहारिक कर्मकांडे त्यांचा मूळ शब्दसंग्रह आणि कृतीसहित प्रस्तुत करताना लेखकाने कोणताही अभिनिवेश न बाळगता मृत्यू या दुर्लक्षित विषयावर अनुषंगिक विवेचन प्रसिद्ध करताना पुस्तक परिपूर्ण करण्यावर विशेष भर दिला आहे, त्याचे सुजाण वाचकांनी स्वागतच करावयास हवे.

    इदं न मम

    लेखक - श्री घनश्याम परकाळे

    श्री घनश्याम परकाळे यांच्या कॉमन मॅन या ललित लेखन संग्रह इ-पुस्तकातील हा लेख.
    हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

    https://marathibooks.com/books/common-man-by-ghanashyam-parkale/

    किंमत : रु.१५०/
    सवलत किंमत : रु.७५/-

  • अण्णा, केजरीवालांची कास धरा!

    संसदेत कोणताही कायदा संमत होण्यासाठी खासदारांचे बहुमत आवश्यक…भ्रष्टाचार निर्मुलन, गुन्हेगारीला आवर, स्वच्छ प्रशासन देण्यासाठी…तेव्हा सामाजिक चळवळीतून नागरिकांचे विशिष्ट प्रश्न सरकारच्या निदर्शनास आणता येतात.परंतु त्याची बहुमताने अंमलबजावणी करणे हे सरकार तसेच सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते.“you can not change the system unless and until you become part of it” या म्हणी प्रमाणे सत्ताकारणाच्या बाहेर राहून नाही तर सत्ताकारणात सहभाग घेवून गलिच्छ सत्ताकारणात परिवर्तन करता येते.

  • लग्नं मुलांची … चिंता पालकांची

    ‘घर’ आणि ‘लग्न’ या दोन शब्दांशी ‘चिता’ नावाची गोष्ट जोडूनच येते. आणि माणसाच्या जीवनात या दोन्ही गोष्टींना सहसा

    पर्याय नसतो. या दोन गोष्टींबद्दल चिता वाटणं हीसुद्धा एक ‘समाजमान्य’ गोष्ट आहे. त्यामुळेच विवाहसंस्था चालवत असताना

    काही प्रमाणात का होईना, पालकांच्या चिता कमी करण्यात आम्हाला मदत करता येते, हा आनंदाचा भाग वाटतो.

  • मिसिंग पर्सन ऑनबोर्ड

    जहाज रशियाच्या तॉप्से पोर्ट मधून फ्रान्स कडे निघाले होते. ब्लॅक सी मधून इस्तम्बूल मार्गे मेडिटेरेनियन सी मध्ये जाणार होते.

  • विरही बागेश्री

    रात्रीच्या शांत समयी, एकांतात भेटलेल्या विरहिणीची तरल मनोवस्था म्हणजे बागेश्री. आपल्या शेजारी बसलेला प्रियकर, साथीला आहे पण तरीही मनात कुठेतरी धडधड होत आहे आणि त्या स्पंदनातून उमटणारी वेदना आणि हुरहूर म्हणजे बागेश्री. बागेश्री रागाच्या या आणि अशा अनेक छटा आपल्याला एकाचवेळी आकर्षित करतात आणि त्याचबरोबर चकित देखील करतात.
    रागाची मांडणी बघायला गेल्यास, आरोहात पाच स्वर तर अवरोहात संपूर्ण सप्तक आहे - म्हणजेच औडव/संपूर्ण असा राग आहे. आरोहात "पंचम" आणि "रिषभ" वर्जित तरीही "कोमल निषाद","दोन्ही मध्यम" तसेच "कोमल गंधार" असल्याने रागाची प्रकृती नाजूक अशीच आहे. शास्त्रकारांनी या रागाचा समय मध्यरात्र असा दिलेला आहे. इथे बहुतेक कोमल स्वरांचा प्रभाव असल्याने, ठाय लयीत आणि मंद्र स्वरी सप्तकात. इतक्या प्रकारचे विभ्रम ऐकायला मिळतात की, प्रत्येक कलाकाराला या रागाची मांडणी वेगवेगळ्या प्रकाराने करायला अवसर देते. रात्रीच्या गूढ अंधारात हातातील हिऱ्यातून फाकणाऱ्या अननुभूत प्रकाश किरणाने आसमंत उजळून निघावा त्याप्रमाणे या रागाचे स्वर, कलाकाराच्या मगदुराप्रमाणे या रागाचे सौंदर्य दाखवतात. अर्थात "विरह" आणि "करुणा" हे या रागाचे खरे भाव आहेत, असे म्हणता येईल. या रागाची आणखी खासियत अशी सांगता येईल, या रागात तुम्ही आलापी कितीही वेळ रंगवून आळवायला भरपूर संधी आहे. बहुदा त्यामुळेच या रागात "विरही" भाव अधिक सुंदर खुलतो.
    याच विवेचनाच्या आधारावर, कौशिकी चक्रवर्ती या असामान्य गायिकेने मांडलेली बागेश्री रागातील रचना खास आहे. "पतियाला" घराण्याचा संस्कार घेऊन देखील इतर घराणी आपल्या गायनात सामावून घेऊन, आपली गायकी अधिकाधिक विस्तृत आणि विलोभनीय केली आहे.
    मुळात या गायिकेचा गळा इतका लवचिक, सुरेल आणि संपूर्ण सप्तकाला आवाक्यात सहज घेणारा असल्याने, गळ्यातून येणाऱ्या तानेला कुठेही "अटकाव" म्हणून नसतो. त्याचा परिणाम असा होतो,गळ्यातून येणारी ताण, हरकत ही अतिशय स्वच्छ, सलग असते. बंदिशीच्या सुरवातीलाच, "कोमल गंधार" आणि "कोमल निषाद" जोडीने आल्याने, आलापी अतिशय सुंदर खुलते. गंमतीचा भाग ऐकण्यासारखा असा आहे, वादी स्वर मध्यम आणि हे दोन्ही कोमल स्वर इतके बेमालूम मिसळलेले आहेत की बागेश्री पहिल्याच आलापित आपल्या समोर येतो.
    यात आणखी गंमत म्हणजे सरगमचा वैशिष्ट्यपूर्ण वापर. गाण्यात बरेचवेळा सरगम घेतली जाते, ती त्याच्या आधीच्या तानेच्या संदर्भात किंवा पुढे येणारी जी तान आहे, त्याचे आरेखन मांडणारी असते. त्यामुळे सरगम म्हणजे "स्पेलिंग" असा काहीवेळा प्रकार होतो. तान घेत असताना, ती सरगम बरोबर जोडून घेणे किंवा सरगम संपत असतना, तिला हरकतीच्या वेलबुट्टीची आरास चढविणे, ही खास ऐकण्यासारखे आहे. सरगम मधून परत मुख्य प्रवाहात येणे, ही देखील अप्रतिम कला आहे आणि ती इथे स्पष्टपणे ऐकायला मिळते. तसेच, बंदिश मध्यलयीत असताना, त्याच लयीत "तराणा" गायलेला आहे. फारच सुरेख गायन. आपल्याकडे "तराणा" हा शक्यतो द्रुत लयीत मांडला जातो आणि तालाशी त्याचे नाते जुळवले जाते. "अवधपूर की ये सैंय्या" ही बंदिश म्हणजे खास "पतियाला" घराण्याची मुद्रा आहे.
    इथे बंदिशीच्या ओघात "तराणा" सुरु केला आहे आणि त्याचबरोबर सरगम जोडीने घेतली आहे. याचा फायदा असा होतो, सरगम ऐकताना, "कोमल" स्वर कुठले आणि "तीव्र" स्वर कुठले, याचे भान रसिकाला नेमकेपणाने समजून घेता येते. साधारणपणे तान ऐकताना, अशा स्वरांचा "अदमास" घेणे कधीकधी अवघड होऊन जाते.
    संगीतकार सी. रामचंद्र आणि लताबाई. या जोडीने कितीतरी अजरामर गाणे दिली आहेत आणि रसिकांचे कान तृप्त केले आहेत. या संगीतकाराचे खास वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास, यांनी बांधलेली गाणी अतिशय गोड, श्रवणीय तर असतात(च) पण, त्याचबरोबर आपणही गाऊ शकतो, असे आवाहन करणारी असतात. अर्थात, लताबाईंच्या हरकती घेणे मुश्किल असते तरीदेखील, गाण्याच्या चालीचा स्वत:चा असा अप्रतिम गोडवा असतो आणि तो गोडवा, रसिकांना गायला प्रवृत्त करीत असतो. प्रस्तुत गाणे अतिशय साधे, सरळ आहे पण तरीही अप्रतिम गोडवा त्या गाण्यात भरलेला आहे.
    "ना बोले, ना बोले, ना बोले रे
    घुंघट के पट ना खोले रे
    राधा ना बोले, ना बोले, ना बोले रे"
    कवी राजेंद्र कृष्ण यांनी हे गीत लिहिले आहे. गीताची शब्दकळा बघितली तर असेच समजून घेता येते, गाण्यात जे "खटके","हरकती घेतल्या आहेत त्या घेताना कुठेही शब्दांची (फारशी) ओढाताण होत नाही. रचना गेयताप्रधान असणे म्हणजे नाकी काय, याचे हे गाणे एक सुरेख उदाहरण म्हणून मानावे लागेल. सोप्या शब्दात देखील, प्रसंग गहिरा करण्याची, या कवीची ताकद विलक्षण अशीच होती.
    गाण्यात नेहमी वापरला जाणारा "दादरा" ताल आहे पण, तालाची योजना किती सुंदर आहे. सुगम संगीतात, कुठल्या शब्दावर समेची मात्रा ठेऊन, त्या गाण्याचे सौंदर्य कसे वाढवायचे, यावर संगीतकाराची, शब्दाची जाणकारी दिसून येते. गाण्याची चाल अतिशय सरळ आहे पण ठिसूळ नाही!! गाण्यात सुरवातीच्या सुरांपासून बागेश्री दिसत आहे पण तरीही हे गाणे आहे, याची जाणीव असल्याने. त्या रागाच्या सावलीतच गाण्याची चाल बांधली आहे. खरे तर बागेश्री राग, बहुदा या संगीतकाराचा खास आवडीचा राग असावा, असे वाटते, त्यांच्या कारकिर्दीत, त्यांनी इतर वेळी देखील, बागेश्री रागाचा अप्रतिम उपयोग करून घेतल्याचे आढळून येते. मी वरती, या रागाच्या भावदर्शनाबद्दल "विरही',"करुन" असे शब्द वापरले होते परंतु या भावनांचा परिपोष असून देखील, याच रागातून, अशी आनंदी, उत्फुल्ल तर्ज शोधून काढण्याचे कसब मात्र याच संगीतकाराचे. शास्त्रीय संगीताचा गाढा अभ्यास असेल तर तुम्ही रागाच्या पलीकडे जाउन देखील रागाशी साम्य दाखणारी तर्ज निर्माण करू शकता, हे आणखी खास वैशिष्ट्य इथे सांगता येईल.
    हृदयनाथ मंगेशकरांनी या रागावर आधारित काही गाणी बांधली आहेत. मंगेशकरांच्या गाण्याचे एक वैशिष्ट्य सांगता येईल, त्यांच्या गाण्यात कवितेचा दर्जा नेहमीच अतुलनीय असतो. किंबहुना, ज्या कवितेला चाल लावायची आहे, ती कविता आशयघन असणे, त्यांना जरुरीचे वाटते. मराठीतील अनेक कवी - खास करून असे कवी जे कधीही भावगीतकार म्हणून प्रसिद्ध नव्हते, अशा कवींच्या कविता हुडकून काढून, त्यांना चाल लावणे, मंगेशकरांना नेहमीच आव्हानात्मक वाटत आले आहे. त्यामुळे, गाणे म्हणून आस्वाद घेताना, कविता म्हणून देखील त्या गाण्याचा आस्वाद घेणे तितकेच आनंददायी असते. कवितेचा, कविता म्हणून एक आशय ध्वनित होत असताना, सुरांच्या मदतीने त्याच कवितेचा वेगळाच आशय काहीवेळा अनुभवायला मिळतो आणि तीच कविता झळाळून उठते. आता सुगम संगीतात "कविता" असावी का नसावी, हा एक सनातन विषय आहे आणि अर्थातच त्याचा इथे उहापोह करण्यात काहीच हशील नाही. परंतु कविता दर्जेदार असेल तर संगीतकाराला, चाल बांधायला हुरूप मिळतो, असे कित्येक रचनाकारांनी मान्य केलेले आहे.
    खरतर संत ज्ञानेश्वर यांची शब्दकळा आहे. ज्ञानेश्वर हे आधी कवी आहेत, नंतर मग, तत्वज्ञ, साधक इत्यादी.
    ज्ञानेश्वरांच्या रचनेत "गीतमयता" आहे, याची जाण संगीतकार म्हणून हृदयनाथ मंगेशकरांना झाली आणि त्यातून मराठीतील काही अजरामर गाणी निर्माण झाली.
    "घनु वाजे घुणघुणा, वारा वाजे रुणझुणा" ही ज्ञानेश्वरीमधील अशीच अप्रतिम काव्यरचना.
    "घनु वाजे घुणघुणा, वारा वाहे रुणझुणा;
    भवतारकु आहे कान्हा, वेगी भेटवा का".
    या रचनेतील पहिलाच आलाप बागेश्री रागाची खूण पटवतो. हा आलापच किती कठीण आहे आणि त्यावरून पुढील रचना कशी वळण घेईल, याचा थोडाफार अंदाज बांधता येतो. वास्तविक, या गाण्यात, "निर्मळ" बागेश्री सापडत नाही तरी एकंदरीत गाण्यावर याच रागाची सावली आहे. मी मघाशी म्हटल्याप्रमाणे, या गाण्याचा कविता म्हणून आस्वाद घेत येतो आणि तो तसा घेत यावा, म्हणून गाण्यात फार कमी वाद्ये वापरली आहेत, ज्यायोगे सुरांचे शब्दांवर आक्रमण होऊ नये. अर्थात, नेहमीप्रमाणे, "अनघड" चाल, हे या गाण्याचे लक्षण दिसून येते आणि त्यामुळे ऐकायला गोड वाटणारे गाणे, त्यातील हरकतीसहित गायचे म्हणजे परीक्षाच असते.
    गुलाम अली, हे असेच गझल गायकीमधील सुप्रतिष्ठित नाव. मेहदी हसन साहेबांनी रागावर आधारित गझलांच्या चाली बांधल्या तर गुलाम अलींनी, ठुमरीला हाताशी धरून, गझल गायनाला नवा रंग दिला.
    "मस्ताना पिये जा युं ही मस्ताना पिये जा;
    पैमाना तो क्या चीज है, मैखाना पिये जा".
    अर्थात, उर्दू भाषेत, "मैखाना", "साकी" या विषयावर अनंत रचना वाचायला मिळतात आणि त्याच "मैखाना"ला समोर ठेऊन ही गझल लिहिली आहे. तेंव्हा या शब्दातील भाव ओळखून, गुलाम अलींनी चाल बांधली आहे आणि त्याच स्वरूपाचे गायन केले आहे.
    बागेश्री रागातील नखरेल रंग शोधून, उस्तादांनी अप्रतिम रंग दिला आहे. या सादरीकरणात, आपल्या नेहमीच्या शैलीला थोडी मुरड घालून, किंचित भावगीताच्या अंगाने गायन केले आहे. खानसाहेबांच्या गायकीवर काहीवेळा एक आक्षेप घेतला जातो - गझल गाताना, त्यात इतक्या वेळा तानांचा वर्षाव केला जातो की त्यात शायरी कुठल्याकुठे विसरली जाते आणि गायकीची कलाकुसर फक्त ध्यानात रहाते. पण, इथे मात्र अत्यंत लडिवाळपणे, स्वरांना गोंजारत अति आत्मीयतेने गायन केले आहे आणि त्यामुळे आपण शायरीची देखील मजा घेऊ शकतो.
    मराठीत कवी सुरेश भटांनी अशाच प्रकारच्या म्हणजे गेयतापूर्ण कवितेचा आग्रह धरून, मराठी कवितेत अनमोल भर टाकली आहे. विशेषत: "गझल" हे वृत्त मराठीत रुजवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे, ही बाब कुणी नाकारू शकणार नाही.
    "तरुण आहे रात्र अजुनी, राजस निजलास का रे;
    एवढ्यातच त्या कुशीवर, तू असा वळलास का रे".
    काहीशी रंगेल वाटणारी ही कविता, मराठीत तशी विरळाच वाचायला मिळते. तसे बघितले तर या कवितेला "गझल" म्हणता येईल का? उर्दूतील "नझ्म" या वृत्ताशी जवळचे नाते सांगणारी ही कविता आहे. कविता वाचतानाच, त्या शब्दात दडलेली लय आपल्याला सापडते पण तरीही संगीतकाराने त्यांच्या प्रतिभेला अनुसरून, संपूर्ण वेगळ्या वळणाची चाल बांधली आहे. चाल अतिशय राजस, रंगेल आणि गायकी थाटाची आहे. गमतीचा भाग बघण्यासारखा आहे. वरतीच आपण, याच संगीतकाराने, याच बागेश्री रागात ज्ञानेश्वरांची विराणी सादर केलेली बघितली आणि आता इथे संपूर्ण वेगळ्या घाटाची कविता आणि त्या घाटानुसार संगीतरचना तयार केलेली बघायला मिळते. संगीतकार किती बहुपेडी प्रतिभेचा असू शकतो, हे या दोन उदाहरणांवरून समजून घेता येते.
    तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे