
नमामो वयं मातृभूः पुण्यभूस्त्वाम्
त्वया वर्धिताः संस्कृतास्त्वत्सुताः
अये वत्सले मग्डले हिन्दुभूमे
स्वयं जीवितान्यर्पयामस्त्वयि ||
हे मातृभूमी, हे पुण्यभूमी, आम्ही तुझ्या मुली ज्यांचे तू पालन-पोषण केले, संवर्धन केले तुला नमस्कार करतो. हे वत्सले, मंगले, हिंदुभूमे तुझ्यासाठी आम्ही आपले जीवन समर्पण करतो.
प्रार्थने मध्ये शक्ती असते हे आपण जाणतोच, त्याचे फळ अजूनच उच्च होते जेव्हा प्रार्थना सामूहिक केली जाते. राष्ट्र सेविका समितीची ही प्रार्थना आजही देशातील काना-कोपऱ्यातून सामूहिक पद्धतीने गायली जाते आणि प्रत्येक सेविकेच्या मनात अनन्य समर्पण भाव जागृत करते.
कर्तृत्व, मातृत्व आणि नेतृत्व ह्याचा त्रिवेणी संगम ज्यांच्या ठायी अनुभवायला मिळाला त्या भारतमातेच्या वीरांगना वंदनीय लक्ष्मीबाई केळकर अर्थात साऱ्या देशाच्या मावशी केळकर.
०६ जुलै १९०५ साली त्यांचा जन्म नागपूर येथे दाते कुटुंबात झाला. त्यांचे वडील भास्करराव दाते पुढारलेल्या विचारांचे होते, तसेच आई यशोदाबाई सुद्धा. दोघेही टिळकांचे भक्त होते. त्यांच्या घरात केसरी चे सामूहिक वाचन चाले. त्यांच्या आई दुपारच्या वेळी आजूबाजूच्या महिलांना एकत्रित करून केसरी चे वाचन,त्यावरील लेखांवर विचार मंथन करीत. कमलताईंवर संघटनात्मक रचनेचे संस्कार अगदी लहानपणीच झाले. इंग्रजी शाळेत रुजवला जाणारा विचार आणि घरात घडणाऱ्या गोष्टी हा विरोधाभास कमलताईंना सतत खटकत होता, त्यांनी शाळेला राम राम ठोकला.
१४ व्या वर्षी त्यांचा विवाह श्री पुरुषोत्तम केळकर ह्यांच्याशी झाला आणि त्या लक्ष्मीबाई पुरुषोत्तम केळकर झाल्या. केळकरांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून मुलं होती, त्यांची एक बहीण बाल विधवा होती, लक्ष्मीबाईंच्या प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावामुळे एवढ्या लहान वयात त्यांनी सगळं घर आपलंसं केलं. सांसारिक बंधनात अडकल्या तरी मनातून सामाजिक विचार कधीच दूर झाले नाही. अवकाळी वैधव्य आलं आणि सगळ्यांची जवाबदारी लक्ष्मीबाईंवर आली. लक्ष्मीबाईंनी मुलांची, नणंदेची आणि शेतीची जवाबदारी घेतली आणि अतिशय उत्तमरीत्या पार पाडली. एकदा डॉ केशव हेडगेवार ह्यांचा प्रवास वर्ध्याला असतांना लक्ष्मीबाई त्यांना जाऊन भेटल्या आणि संघाबरोबर काम करण्याची आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली. डॉक्टरांनी त्यांना सांगितले की हे शक्य नाही,पण महिला संघटन होऊ शकते, ते तुम्ही करावं.
"स्त्री आणि पुरुष हे धर्मरूपी गरुडाचे दोन पंख आहेत. त्यामुळे स्त्रीची उन्नती व्हायलाच हवी.पंख असमान असतील तर गरुड झेप कशी घेणार?" हे स्वामी विवेकानंदांचे विचार लक्ष्मीबाईंचे प्रेरणा स्थान बनले. डॉ च्या प्रत्यक्ष सल्ल्याने आणि विवेकानंदाच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी २५ ऑक्टोबर १९३६ साली राष्ट्र सेविका समितीची स्थापना केली. महिलांनी केलेले, महिलांचे संघटन, महिलांसाठी, ज्यातून समाज बांधणी, घरा-घरातून देशप्रेम, स्वातंत्र्य चळवळीची माहिती, असे सगळे साधणार होते. राष्ट्र निर्माण हे एक दिवसात शक्य नाही, त्यासाठी प्रत्येक घरात हा विचार पोहचणे आवश्यक आहे, आणि कुठलीही गोष्ट रुजविण्याचे काम एक स्त्री अतिशय उत्तम पद्धतीने करू शकते म्हणून महिलांचे संघटन.
"जवाबदारी आणि कर्तव्य ह्यांची गल्लत करू नये. स्त्री म्हणून कुटुंब, समाज, आणि राष्ट्र याबद्दल प्रत्येक स्त्रीने आपले कर्तव्य आनंदाने निभवावे."
"व्यक्ती-व्यक्तीवर राजकीय व सामाजिक संस्कार करून तिला एक अनुशासित सूत्रबद्ध शक्तीचे अंग म्हणून सिद्ध करायचे आहे व अशा सर्व व्यक्तींमध्ये कर्तव्यभावना, परस्पर जिव्हाळा, व सहकार्य निर्माण करणे, तसेच स्त्री हीच राष्ट्राची आधारशक्ती आहे त्यामुळे तिच्या उन्नती आणि संघटनेतून हिंदुराष्ट्र उभे राहणार, म्हणून समिती." लक्ष्मीबाईंची समिती मागची ही भूमिका फक्त भाषणात बोलण्यापुरती नव्हती तर स्वतःच्या वागण्या-बोलण्यातून आणि कार्यातून प्रत्यक्ष आयुष्यात आणि सामाजिक आयुष्यात त्यांनी सतत उत्तमरीत्या निभावली म्हणूनच त्या कदाचित सगळ्यांच्या 'मावशी' झाल्या.
१९४७ ऑगस्ट च्या दुसऱ्या आठवड्यात त्या स्वतः कराचीत गेल्या, जेव्हा हिंदूंची भर दिवसा कत्तल सुरू होती. कराची विमानतळावर 'खून से लिया है पाकिस्तान, लढ के लेंगे हिंदुस्थान' अशा घोषणा सुरू होत्या, तेव्हा केवळ आपल्या सेविकांना आधार देण्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. सगळ्या सेविकांना स्वतः जातीने भेटल्या, त्यांच्याशी बोलल्या, त्यांना धीर दिला कारण तिथल्या एका सेविकेने त्यांना पत्र पाठवून बोलवलं होते. काराचीतील हिंदू परिवारांना भारतात परत आणण्यासाठी त्यांनी भरपूर काम केले.
भारत पाकिस्तान, भारत-चायना युद्ध काळातसुद्धा मावशींच्या सेविका सगळ्यांच्या मदतीला धावून येत होत्या.
स्त्री सुलभ गुणांचा वापर राष्ट्र निर्माणासाठी करणाऱ्या, स्त्रियांच्या संघटनेतून देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला घरा-घरात पोहचवणाऱ्या, स्त्री म्हणजे केवळ एक कुटुंब नाही तर राष्ट्र निर्माण करायची ताकद तिच्या ठायी आहे हे स्वतःच्या कार्यतून आदर्श ठेवणाऱ्या या भारतमातेच्या वीरांगनेला आमचे शत शत नमन.
|| वंदे मातरम् ||
-- सोनाली तेलंग.
०७/०७/२०२२.
संदर्भ :
१. कर्मयोगिनी वंदनीय मौसीजी
२. दिपज्योति नमोस्तुते : सुशीला महाजन
३. स्त्रीशक्ती आणि स्वातंत्र्यलढा : डॉ अर्चना कुळकर्णी, स्मिता कुळकर्णी
४. http://xn--h4b.indusscrolls.com/
July 25, 2022
राशी :- मीन
स्वामी :- गुरु
देवता :- चक्रपाणि
जप मंत्र :- ॐ ह्रीं क्रीं चक्रायनमः
उपास्यदेव :- हनुमान
रत्न :- पुष्कराज / लसणी
जन्माक्षर :- दी ची दि दु दू थ थाथ्र झ झं झा झि झी त्र दे द्रे द्रो दो च चा चं ही द्विस्वभावी राशी आहे.कन्या रास मीन राशीचा विरोधी रास मानली जाते. माशाला पाठीचा कणा नसतो. त्यामुळे मीन मानसिक व शारीरिक बाबतीत खूप लवचिक असतात. मीन राशीचे लोक सदैव मदतीस तत्पर, संवेदनशील, कल्पक, कधीही नाही न म्हणणारे असे असतात. मीन राशीला व्यवहार जमत नाही. तसेच जास्त वेळी लक्ष देणाऱ्या व्यायाम प्रकारांना ते कंटाळतात. मीन राशीचा खाण्यावर ताबा अजिबात नसतो. पोहता न येणारी मीन राशीची व्यक्ती क्वचित आढळते.
विजय कुलकर्णी स्वामी समर्थ सेवा केंद्र काठापुर बु जिल्हा पुणे(आपल्या सर्वांच्या माहितीसाठी)
December 4, 2016
बऱ्याचवेळा सदस्यांना त्यांच्या अडचणीबाबत कोणाकडे तक्रार करावी याची माहिती नसल्याने ते चुकीच्या दप्तरी पत्रव्यवहार करत राहून मौल्यवान वेळ वाया घालवत असतात. मागील लेखात तुम्हाला अधिमुल्य आणि हस्तांतरण बाबत माहिती मिळाली. परंतु सदस्याला कोणती अडचण असल्यास कोणत्या दप्तरी अर्ज करावा? सदर लेखात याबाबत बऱ्याचदा विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे आपल्यासाठी.
July 4, 2021
युद्ध म्हटले की बंदुका, तोफा, मशिनगन्स, युद्धनौका,विमाने, बॉम्बस्,गडगडाट, परीसर दणाणून सोडणारे आवाज वगैरे वगैरे डोळ्या समोर येतात. या सर्व गदारोळात संगीत कसे असणार? फार फार तर मिलटरी बॅन्ड एवढाच काय तो संगीताशी संबंध असणारा भाग. बाकी सर्व मन आणि शरीराला भयकंपीत करणारेच असते. भारतीय सैन्यात असाच एक तरूण सामिल झाला होता. इराक मधल्या बगदाद शहरात रायबहादूर चुन्नीलाल नावाच्या श्रीमंत व्यक्तीच्या घरात जन्मलेल्या या तरूणाने बालपणाचा पाच वर्षांचा काळ बगदादमध्येच घालवला होता. १९३२ मध्ये रायबहादूर चुन्नीलाल मुंबईत आले व नंतर सिनेमा व्यवसायतील एक मोठे प्रस्थ बनले. बॉम्बे टॉकीज व फिल्मीस्तान या त्याकाळच्या नावाजलेल्या सिनेनिर्मितीच्या संस्थेत भागीदार झाले. तो तरूण सैन्यात दाखल झाला खरा पण त्या वातावरणात त्याचे मन रमेना. बंदुकीच्या गोळ्या वा मशिनगन्सचे आवाज त्यांच्या कानावर जेव्हा पडत तेव्हा त्याच्या मनात खोल कुठेतरी सतारीच्या तारा झंकारत….अलवार स्वरांचे सूर खुणावत…शेवटी १९४६ मध्ये त्या तरूणाने सैन्यातील नोकरीला बाय बाय केले आणि आपल्या आवडत्या क्षेत्रात काही तरी करावे म्हणून मुंबईला आला.
सुदैवाने येथे त्यानां ऑल इंडिया रेडिओत नोकरी मिळाली आणि येथूनच मदनमोहन कोहली या तरूणाचा संगीतकार मदनमोहन असा प्रवास सुरू झाला. ऑल इंडिया रेडिओमध्ये त्यांची गाठ पडली संगीतातील दोन महान दिग्गजांशी. पहिले शहनाई नवाज उस्ताद बिस्मिला खान व दुसरे उस्ताद फैय्याज खान यांच्याशी. त्याचवेळी संगीतकार रोशन देखील या रेडिओ स्टेशनवर कामाला होते. स्वत: मदन मोहन यांनी रूढर्थाने संगीताचे असे शिक्षण घेतले नव्हते मात्र या नोकरीच्या वास्तव्यात त्यांना या दोन दिग्गजाकडून संगीतातले मर्म आत्मसात केले. मदनमोहन यानां चित्रपटात संधी मिळाली ती मास्टर गुलाम हैदर या संगीतकारामुळे. मात्र संगीत दिग्दर्शनाची नाही तर गाणे गायनाची. ‘शाहीन’ नावाच्या चित्रपटात त्यांनी चक्क लताजी बरोबर ही दोन गाणी गायली. पूढे १९५० मध्ये मात्र संगीत दिग्दर्शनची पहिली संधी आंखे या चित्रपटाद्वारे मिळाली. मात्र पाच सहा वर्षे संघर्षातच गेली.
१९५६ मध्ये आला एव्हीएम या दक्षिणेतल्या प्रसिद्ध बॅनरचा किशोर व अशोक कुमार अभिनीत ‘भाई भाई’ हा चित्रपट. यातील जवळपास सर्वच ११ गाणी खूप गाजली आणि मदनमोहन यांना यशाची पहिली चव चाखता आली. “कदर जाने ना…” “ए दिल मुझे बता दे”….”थंडी थंडी हवा”…ही गाणी आजही रसिकांच्या ओठावर सहज येतात. बेगम अख्तर हा मदनमोहन यांचा विक पॉईंट. त्यांच्या गझला आणि भारतीय वाद्ये त्यांच्या नसानसात भिनलेले होते. मुशायरात म्हटली जाणारी गझल व नज्म त्यांनी चित्रपटात आणली, तेथून ती प्रेक्षकाच्या घरात व हृदयात पोहचली. याचे श्रेय संगीतातील सर्वच दिग्गज संगीतकार खुल्या मनाने मदनमोहन यानां देतात ते योग्यच आहे.
त्यानां क्रिकेटचेही अफाट वेड होते. आताचे ब्रेबॉन स्टेडियमच्या जागी पूर्वी एक मोकळे मैदान होते जिथे तासन तास मदनमोहन क्रिकेट खेळत असत. बेगम अख्तरचे सूर, सैन्यातील कठोर शिस्त आणि क्रिकेटचं वेड हे तिन्ही गुण त्याना संगीत देतानां खूप उपयोगी पडले. एस.डी.बर्मन व सी.रामचंद्र यांच्याकडे त्यांनी सुरूवातले सहाय्यक म्हणून काम केले पण त्यांच्या संगीतावर मात्र त्यांचा प्रभाव पडला नाही. अतिशय मोजक्या वाद्यमेळासह ते आपले गाणे तयार करत. सतार, तबला ढोलकी, सॅक्सोफोन यांचा अप्रतिम वापर त्याच्या संगीतात बघायला मिळतो. त्यामूळे गायकांच्या गाण्याचे आवाजाचे सर्व तपशील त्यांच्या गाण्यात आढळून येते. ‘अनपढ’ चित्रपटाचे ‘आप के नजरोमे समझा प्यार के काबील मुझे’ या एका गाण्याच्या मोबदल्यात संगीतकार नौशाद आपला गाण्याचा सर्व खजिना लुटायला तयार होते. ‘हकीकत’या युद्धाची पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटातील रफीचे ‘कर चले हम फिदा जानोतन साथीयों…..’ हे गाणे म्हणजे त्यांनी भारतीय सैन्याला दिलेली मानवंदनाच आहे. तर याच चित्रपटातील ‘हो के मजबूर मुझे उसने भुलाया होगा’…….हे गाणे म्हणजे भारतीय जवानांच्या हृदयाच्या छेडलेल्या ताराच आहेत. ‘नैनिहाल’ मधील ‘मेरी आवाज सुनो’ हे रफीचे गाणे पंडीत नेहरूनां अर्पण केलेले गाणे होते….उस्ताद रईस खान यांच्या सतारीचा वापर अनेक गाण्यात त्यांनी इतका अप्रतिम केला आहे की स्वत: लता दीदी ‘आज सोचा तो आंसू भर आये’ या गाण्यातील सतारीचे सूर ऐकून हळव्या झाल्या होत्या. ‘वो चूप रहे तो’(जहाँ आरा)….’रस्मे उल्फतमे’(दिल की राहे)…..’नैनो मे बदरा छाये’(मेरा साया)….या गाण्यातील सतारीचे सूर आजही अंग मोहरून टाकतात.
राजा मेंहदी अली खान, राजेन्द्र कृष्ण आणि कैफी आजमी या तिन गीतकारां सोबत त्यांचे खूप सुंदर असे टयुनिंग होते. यांच्या सोबत केलेली सर्वच गाणी खूप गाजली. त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटातील काही चित्रपट वगळता सर्वच खूप ब्लॉक बस्टर असे नव्हते. मात्र त्या चित्रपटातील गाणी खूप गाजली. लोक चित्रपट विसरले पण गाणी नाही विसरले. जवळपास १०० चित्रपटानां संगीत दिलेल्या मदनमोहन यानां पुरसकार मात्र कमीच मिळाले. १९७० मधील आलेल्या “दस्तक” चित्रपटातील “बयाँ ना धरो या गाण्याने” मात्र त्यानां राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. ‘आप की नजरो ने समझा’…(अनपढ) आणि ‘लग जा गले की’…(वह कौन थी?) या दोन गाण्यानां फिल्म फेअर नॉमिनेशन मिळाले पण पुरस्कार नाही मिळाला. अनेकदा अनेकानां नाही मिळत पुरस्कार पण त्यामुळे त्यांच्या स्थानाला काहीच धक्का पोहचत नाही. ….आजच्या काळातही जेव्हा एक १०-११ वर्षांची मुलगी अत्यंत तन्मयतेने “लग जा गले की आज ये”….. गाऊ लागते तेव्हा तिला हेही माहित नसते की ज्या संगीत दिग्दर्शकाचे ती गाणे गात आहे त्याकाळात तिच्या वडीलांचाही जन्म झाला नसेल. काही संगीतकार, साहित्यीक वा विचारवंत हे कालातीत असतात. खरं तर ५१ वर्षे हे काही असं एक्झीट घेण्याचं वय नाही. मदनमोहन खूप लवकर हे जग सोडून गेले.. त्यांच्या मृत्यू नंतर अनेक गझला, नज्म, कविता, शायरी यानां अनाथ् झाल्या सारखं वाटलं असेल.
-दासू भगत (२५ जून २०१७)
June 25, 2017
गड, कोट, किल्ले असे शब्द घेतले की, डोळय़ांसमोर इतिहास नाचू लागतो. राजवटी, लढाया, पराक्रम, कटकारस्थाने आणि अशा कितीतरी स्थलकालाच्या घटना त्या त्या वास्तूभोवती फेर धरायला लागतात. पण प्रत्येक गडकोटांना असा ज्वलंत इतिहास मिळतोच असे नाही. पण अशांपैकी काहींचे भाग्य मात्र मग भूगोलात उजळते आणि निसर्ग त्यांना आपली सारी अपूर्वाई बहाल करतो. या कुळातीलच एक लोणावळय़ाजवळचा कोरीगड! इतिहासाच्या उत्खननापेक्षा निसर्गाची भटकंती घडवणारा; म्हणूनच पावसाळा स्थिरावला की, एखाद्या वारी वेळ काढून कोरीगडची वाट धरावी. लोणावळय़ाच्या दक्षिणेस कोरबारसे मावळात एक वाट गेली आहे. या वाटेवरील आंबवणे गावच्या डोक्यावर हा कोरीगड. ‘सह्य़ाद्री’कार स. आ. जोगळेकर म्हणतात, कोरी हे कोळय़ांच्या एका पोटजातीचे नाव. तेव्हा या कोरी लोकांचा गड तो कोरीगड आणि त्याचा मावळ तो कोरबारसे. लोणावळय़ापासून या कोरीगडापर्यंत अंतर आहे साधारण वीस किलोमीटर. याशिवाय मुळशी रस्त्यावरील माले गावातूनही एक रस्ता घुसळखांबमार्गे कोरीगडकडे जातो. पण या दोन्ही वाटांवरून एका दिवसात ही भ्रमंती करायची असेल तर स्वतचे वाहन असणे सोयीचे. अन्यथा लोणावळय़ातून सुटणारी दुपारी १२ किंवा सायंकाळी पाचची भांबुर्डे एस.टी. पकडायची आणि आंबवणे गावातील महादेवाच्या मंदिरात मुक्काम ठोकत गडदर्शन आटोपायचे.
असो, तर या आंबवणेत आलो की, या गावातूनच एक वाट तीन हजार फूट उंचीच्या या गडावर जाते. पण यापेक्षा एक सोपी वाट आंबवणे अलीकडच्या शहापूरमधून गडाकडे निघते. हे शहापूर म्हणजे गडाची एकेकाळची पेठ. यामुळे गावचा उल्लेख पेठ शहापूर असाही होतो आणि यामुळेच कोरीगडला कुवारीगड, कोराईगडच्या बरोबरीने शहागड असेही म्हणतात. तर हे शहापूर ओलांडले की, एका मोठय़ा घळीतून जाणारा हा मार्ग थेट गणेश दरवाजात येऊन थडकतो. या दरवाजाअलीकडेच काही प्राचीन खोदीव लेण्या दिसतात. यातीलच एका लेणीत गणेशाची स्थापना केली आहे. त्यामुळे या दरवाजालाही त्याची ओळख मिळाली - गणेश दरवाजा! हा गणेश दरवाजा ओलांडून आत गेलो की, उत्तम तटबंदी आणि भरपूर सपाटी असलेला गड समोर येतो. यातील बलदंड तटावरूनच गडप्रदक्षिणा सुरू करावी. उत्तम तट, शत्रूच्या उरात धडकी भरवणाऱ्या तोफा, गडदेवता कोराईदेवी आणि पाण्याने काठोकाठ भरलेली दोन तळी ही एवढीच ती काय कोरीगडची दुर्गसंपत्ती! पण आपण पावसाळय़ात आलो तर या वेळेची हिरवाई या मोजक्याच निर्जीव अवशेषांनाही जिवंत करते. यातही सर्वात जास्त लक्ष जाते ते गडावरील दोन मोठय़ा तळय़ांकडे. पश्चिम तटाला खेटून असलेली ही तळी पावसाळय़ात काठोकाठ भरतात. अगदी कधीकधी वाऱ्याच्या हेलकाव्यावर हे पाणी बाहेर पडू पाहते. अशा वेळी या कठडय़ावर यावे आणि आपल्याच हलणाऱ्या प्रतिमा पाहत तासन् तास बसून राहावे. या तळय़ाच्याच पाश्र्वभूमीवर कोराई देवीचे मंदिर आहे. भव्य आणि तेजस्वी मूर्ती. असे म्हणतात की, शेवटच्या मराठे-इंग्रज लढतीत जेव्हा हा गड पडला तेव्हा इंग्रजांनी या देवीचे दागिने उतरवले आणि ते मुंबईच्या मुंबादेवीला घातले. पुढे काळाच्या ओघात देवीचे छतही कोसळले. यामुळे एरवी कधी आलो की, उघडय़ावरील ही मूर्ती आणि तिची ही कथा आठवली की हळहळ व्यक्त होते. पण तेच पावसाळय़ात आलो की, भोवतालच्या हिरवाईतून असंख्य रानफुले उमलतात आणि जणू हे सारे दु:ख बाजूला सारत कोराईदेवी नवरात्रासाठी पुन्हा सालंकृत होते.
गडाच्या पोटातील काही खोदीव लेण्यांकडे पाहून हा गड प्राचीन असावा असे वाटते. पुढे तो कोळय़ांच्या ताब्यात असताना १४८६ मध्ये निजामशाहीने जिंकल्याची नोंद आहे. यानंतर १६४६ मध्ये अन्य गडांबरोबर कोरीगडही स्वराज्यात दाखल झाला. १७०० मध्ये पुन्हा मुघल राजवटीकडून पंत सचिवांनी हा गड स्वराज्यात आणला आणि अखेर १८१८ च्या शेवटच्या मराठे-इंग्रज युद्धात तीन दिवसांच्या प्रखर लढय़ानंतर गडावर युनियन जॅक चढला. इतिहास सांगणाऱ्या या काही सन-सनावळय़ा आणि घटना कोरीगडाबाबत मिळतात. इतिहासाचे हे दाखले देणाऱ्या सहा तोफा आजही गडावर दिसतात. पैकी ११८ इंच लांबीची ‘लक्ष्मी’ ही सर्वात थोरली. तिच्या हिशेबाने उभे राहावे आणि उगाच समोरच्या मावळाकडे उरी अभिमान घेत पाहावे. गडावरील हे विशेष पाहत असतानाच आपल्या नजरा आजूबाजूलाही वळतात. यामागे दऱ्याखोऱ्यांचा मावळ हे कारण तर असतेच, पण त्यातही पावसाळा हे खास निमित्त असते. एरवी लक्षातही न येणारे डोंगर पाऊस पिऊन हिरवे-ओले झाले की, उगीचच ओळखीचे वाटतात. मग त्यातही थोडेसे धुके हटले की, दूरदूरचे कर्नाळा, माणिकगड, प्रबळगड, मोरगड, ढाक, राजमाची ही दुर्गमंडळी ओळखी देऊ लागतात. तळातील भातखाचरांची सर्वच गावे एकसारखी वाटतात. मुळशी जलाशय या साऱ्या देखाव्याला एक निळी किनार देतो आणि मग हे सारे पाहता पाहता कोरीगडची मुशाफिरी आकार घेऊ लागते.
पावसाळ्या मध्ये हा गड फिरताना एक वेगळाच अनुभव येतो. या गडाची भटकंती करीत असताना समोरील गावामधून वारकरी सप्ताहातील कीर्तने ऐकायला येत होती. या मधुर गाण्याच्या तालावर गड कधी फिरून झाला हे कळेच नाही. पावसाची अधूनमधून येणाऱ्या सरी आणि गार वाहणारा वारा अंगावरती शहारे उभे करीत होता. खरे तर या साऱ्याचा मोह ‘त्यांनाही’ झाला, त्यातूनच श्रीमंतांचा सहारा आता या कोरबारसे मावळात उभा राहिला. पण त्याच्या या विळख्यात आमचा कोरीगड मात्र उगाचच अवघडून उभा राहिल्यासारखा वाटतो. चालायचेच, काळाचा महिमा! पण या ‘काळा’ला एकच विनंती; गावे, शेती, जमिनी गेल्या; आता आमचा गड तरी आहे असाच सोळाव्या शतकातील राहू द्यावा! राजांच्या या कोरीगडालाही त्याचा मोकळा श्वास घेऊ द्यावा!
सौजन्य : संतोष घारे यांनी लिहिलेला हा लेख मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी शेअर करत आहे.
October 23, 2016
दक्षिण अमेरिकेची कुठलीही चित्रे पाहिलीत तरी माचूपिचूचे चित्र बघायला मिळणारच. किंबहुना माचूपिचूशिवाय दक्षिण अमेरिका ट्रीप पूर्ण होऊच शकत नाही म्हणा !त्यामुळे आमचा पुढचा टप्पा ’पेरू’.या देशातच इन्का संस्कृतीचे अवशेष असणारे माचूपिचू हे अत्यंत महत्त्वाचे स्थान.हे कुझ्कोपासून ८० किमी अंतरावर आहे त्यामुळे लीमा या राजधानीपेक्षा‘ इंन्कांची राजधानी कुझ्कोकडॆ’ आम्ही मोर्चा वळवला.
July 17, 2019
संतश्रेष्ठ गजानन महाराज जेवले ती गोस्ट सांगणार आहे ज्यांची श्रद्धा नाही त्यांना पुरावा देऊ शकेल, साल २०००-२००१ नाशिक येथील भिसे पती (Retd.मॅनेजर बँक ऑफ बडोदा)पत्नी (Advocate) गजानन महाराज यांचे भक्त.नाशिक येथील कॉलेज रोड चा फ्लॅट सोडून मुंबई नाका येथे नवा फ्लॅट घेतला उद्देश हाच कि इंदिरानगर येथील श्री गजानन महाराज मंदिर जवळ पडेल..झाले नव्या फ्लॅट ची वास्तूशांत ठरली..पत्रिका तयार झाल्या पहिली पत्रिका श्री गजानन महाराज यांना द्यावी म्हणून दोघेही इंदिरानगर येथील मंदिरात गेले महाराजांना विनंती केली आज पत्रिका घेवून आलो आहे पहिला मान तुमचा तुम्ही आवर्जून यावे तुमच्या अशीर्वादा शिवाय कार्य पूर्ण होणार नाही,मनोभावे नमस्कार केला आर्जव केले आणि इतरांना पत्रिका वाटायला निघाले त्यानंतर वास्तू शांतीसाठी अनेक लोक आले प्रत्येकाची आस्थेवाईकपणे विचारपूस केली जेवणे झाली आणि लोक निघून गेली त्या नंतर केटरर्स ने त्याचे ताट,वाटी,पेले नेले..स्वयंपाक घरात स्टुलावर एक ताट राहिले होते जे (जेवल्या नंतर जसे असते तसे) भिसे साहेबांना त्यांच्या सौ.नी (Advocate) ताट आणून दाखवले स्वच्छ केल्यावर त्यांना वाटले कि हे ताट केटरर्स चे राहिले असेल त्यानुसार त्याला फोन केला तो म्हणाला चेक करतो त्या नंतर त्याचा फोन आला कि त्याचे सगळे ताट ज्यांना नं असतो ते व्यवस्थीत पूर्ण आहेत तुम्ही चेक करा कोणा नातेवाईक यांचे असेल ...भिसे दाम्पत्यांनी थोडी माहिती घेतली पण असे कसे नातेवाइकांना विचारणार..?आडून पाडून माहिती घेतली पण काहीच पत्ता लागेना एव्हाना सौ.भिसे यांनी ताट बघितले आणि श्री.भिसे यांना दिले आणि सांगितले कि ताटामागे कोणाचे नाव टाकले आहे काय..? श्री.भिसे यांनी पहिले तर त्यावर सं.ग.सं. शेगाव ताट क्र.३०१ असे होते (पूर्वी पासून भांड्यांवर जसे नाव टाकतात तसे..) त्यांनी सौ.भिसे यांना बोलावले आणि सांगितले कि प्रत्यक्ष श्री.गजानन महाराज आपल्याकडे जेवावयास आले होते आणि तुम्हा वकील मंडळींना पुरावा लागतो म्हणून हे ताट स्वतः महाराज येथे सोडून गेले आहेत..
आजही ते ताट त्यांच्या घरी आहे..
खरी गम्मत पुढे आहे...
कर्णोपकर्णी हि वार्ता मुंबईतील त्यांच्या ओळखीच्या गृहस्थांना कळली त्या मुळे ते थेट भिसे यांच्या घरी गेले त्या ताटा ची पूर्ण माहिती घेतली त्याचा आकार इ. आणि थेट शेगाव गाठले ..
तेथे श्री.शंकर पाटलांना त्या प्रकारच्या ताटा संबंधी माहिती विचारली तेव्हा श्री.शंकर पाटील यांनी त्यांच्या सहाय्यकास तशी किती ताटे आहेत हि माहिती विचारली ?
साहाय्यक म्हणाला अगदी त्याच धाटणीची १५०० ताटे आहेत.
श्री.भिसे यांच्या ओळखीच्या गृहस्थांनी सहाय्यकास श्री.शंकर पाटील यांच्या मार्फत परत पाठवले आणि ताट क्र.३०१ आणावयास सांगितले..
तो साहय्यक परत आला आणि म्हणाला एकूण १४९९ ताटे आहेत पण ताट क्र.३०१ missing आहे.
ओळखीच्या गृहस्थानी सांगितले कि सदर ताट तुम्हाला मिळनार नाही कारण ते नाशिक येथे श्री.भिसे यांच्या कडे आहे.त्यांनी सदर माहिती श्री भिसे यांना कळविली.
शेगाव चे श्री.शंकर पाटील जे शेगाव संस्थानांत मोठे अधिकारी सद्गृहस्थ त्यांना माहित आहेत शेगाविचा राणा भक्त प्रतिपालक भक्तांच्या इच्छा आजही पुरवितो..
हि तो श्रींची इच्छा!!
आजही ते ताट श्री व सौ.भिसे यांच्याकडे आहे
हे लिहिण्याची प्रेरणा श्री.गजानन महाराजांचीच आहे कारण भिसे यांची श्रद्धा आणि त्यांचे निमंत्रण अगदी सहज आणि भक्तीने ओतप्रोत आहे आजही ते इंदिरानगर च्या श्री.गजानन महाराज मंदिराचे खजिनदार आहेत महाराजांची प्रचिती त्यांना मिळाली kvd मध्ये धार्मिक आणि डोळस श्रद्धावान आहेत...!!
|| जय गजानन ||
|| गण गण गणात बोते ||
October 22, 2016
एक विलक्षण जग आणि त्यांच्यातला तो मी पण….
November 10, 2010
चीलीत गेले 69 दिवस दोन हजार फूट खोल (म्हणजे अर्धा मैल) खाणीत 33 खाण कामगार अडकून पडले होते. त्यांना अक्षरश: पाताळातून बाहेर काढावे लागले. त्यासाठी सारा देश एक झाला. जगातली सर्वात आधुनिक साधने आणि यंत्रे वापरून आणि सर्वात आधुनिक तंत्र वापरून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. या लढ्याची ही रंजक कथा.
October 20, 2010
जनार्दन गव्हाळे
August 17, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti