(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • प्रख्यात हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक पं.वामनराव सडोलीकर

    पं. वामनराव सडोलीकर यांच्याबद्दल आजच्या पिढीला काही माहित नाही, पण मागच्या दोन पिढ्या मात्र जरूर त्यांची आठवण काढतात. मा.पं. वामनराव सडोलीकर यांना घरात भाऊ म्हणत. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर १९०७ रोजी कोल्हापूरपासून जवळच कोथळी गावी झाला.

    फार लहान वयात घर सोडून मुंबई आणि नाशिकला पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या 'गांधर्व महाविद्यालया'त पं. वामनराव सडोलीकर दाखल झाले. अल्पकाळ घरी कोल्हापूरला राहून पुन्हा, अल्लादिया खाँसाहेब शंकरराव सरनाईक यांना तालीम देताना त्यांचं गाणं ऐकता येईल; या मोहाने १९२५ ला 'यशवंत नाटकमंडळी'त भाऊ नायक झाले. तो काळ त्यांना संगीतातली दृष्टी, ऐकलेली तालीम प्रत्यक्षात आणण्याचं धाडस आणि परिणामी प्रसिद्धी देणारा ठरला. मा.पं. वामनराव सडोलीकर यांनी संगीत सम्राट अल्लादिया खाँसाहेबांच्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायकीचा फार लहान वयात ध्यास घेतला. त्यांना मनोमनी आराध्यदैवत मानलं. काही कारणांमुळे खाँसाहेबांनी ब्राह्मणाला शिकवणार नाही अशी शपथ घेतली होती. त्यामुळे भाऊंनी त्यांचे सुपुत्र उस्ताद भूजीर्खाँ यांचा गंडा बांधला. कालांतरानं भूजीर्खाँ प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबई सोडून कोल्हापूरला गेले. जाताना थोरल्या खाँसाहेबांकडे मा.पं. वामनराव सडोलीकर यांना सुपूर्द करून म्हणाले, 'अब्बाजी, वामनराव आपले आहेत. आता आपण त्यांना तालीम द्या.' अल्लादियाखाँना भाऊंचा परिचय नव्यानं करून द्यायची जरुरी नव्हती. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळात भूजीर्खाँ सेवा करीत, तर भवानी मंडपात छत्रपतींच्या कुलस्वामिनीची अल्लादिया खाँ संगीत सेवा करीत. भाऊंचे वडील (दादा) दत्तोपंत माधव कुलकणीर् (सडोलीकर) स्वत: उत्तम सतार वाजवीत. ते रागदारीचे जाणकार होते. लहानग्या वामनला घेऊन ते संगीतसेवेच्या वेळी दोन्ही देवळात हजर असत. एवढंच नव्हे, तर छत्रपतींच्या कुटुंबातील व्यक्तींच्या छत्र्या (स्मारकं) असत तिथे त्यांच्या जयंती-पुण्यतिथीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात भूजीर्खाँ गात असत. याही ठिकाणी दादा भाऊंना घेऊन ऐकायला हजर असत. काळासावळा तरतरीत लहान मुलगा आणि त्याचे गोरेपान उंच वडील खाँसाहेबांना परिचित झाले होते. नाटककंपनीत असताना शंकरराव सरनाईकांची तालीम ऐकून तिचे पडसाद वामनच्या नाट्यपदातून उमटताना, त्याच्या तानांच्या लडीवर लडी ऐकून बेभान झालेल्या प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर केलेला पाहून खाँसाहेबांना आपली तालीम ऐकून ऐकून हुबेहूब उचलणारा एकलव्य दिसला होता. काही वेळा खाँसाहेब भाऊंना रियाजाच्या आणि तानांच्या बाबतीत सूचना देत. केलेल्या रियाजावर टिप्पणी करत. पण त्या काळात गंडाबंधनाबद्दल विचार करणं भाऊंना शक्यच नव्हतं. कारण गंडाबंधनाची दक्षिणा होती रुपये दहा हजार! कलदार सुरती रुपये! आपल्या वडिलांवर असा भार टाकणं भाऊंच्या कल्पनेबाहेरचं होतं. आधीच गाणं शिकण्यासाठी घरापासून दूर राहिल्यामुळे आणि शिरस्त्याप्रमाणे शाळा न शिकल्याबद्दल आजूबाजूच्या लोकांनी आईवडिलांना टोमणे मारलेले होते. त्यामुळे खाँसाहेबांचं कंपनीतलं वास्तव्य ही भाऊंच्या दृष्टीनं मोठी पर्वणी होती. खाँसाहेब कधीकधी फिरायला जाताना भाऊंना घेऊन जात. फिरता फिरता त्यांचे काही अनुभव, कधी उपदेश, कधी त्या दिवशी भाऊंचा ऐकलेला रियाज यावर टिप्पणी करून खाँसाहेब सूचना करीत. ते दिवस भाऊंनी हृदयात जपून ठेवले होते. खाँसाहेब आणि त्यांचं कुटुंब हे भाऊंनी जन्मभर पुण्य मानलं. पं. पलुस्कर यांच्या सहवासात मिळालेलं 'रामनाम-धन', 'शिस्तीचे पाठ', 'रामायणावर भक्ती' आणि 'स्वरसाधनेचा मूलमंत्र' हे देखील पं. वामनराव सडोलीकर यांच्या आयुष्याला स्थिरता देणारं ठरलं. सुदैवानं दोन्ही गुरू एकाच मार्गाचे प्रवासी होते. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही प्रवाहांचं त्यांच्या आयुष्यात अचल अधिष्ठान होतं. त्यामुळे कुठेही वैचारिक द्वंद्वात सापडून दिशा भ्रष्ट होण्याचा धोका भाऊंच्या आयुष्यात आला नाही. गुरू सच्चरित्र, स्थितप्रज्ञ आणि सर्वार्थानं मोठा असणं हे फार मोठं भाग्य असतं. भाऊंना हे सद््भाग्य लाभलं आणि त्यांच्यामुळे आम्हालाही तो आशीर्वाद लाभला. पं. वामनराव सडोलीकर यांनी नाट्यकलेची सेवा नायक, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक या रूपात केली. अनेक होतकरूंना ही कला शिकवली. आपल्या स्थानावरून न उठता केवळ भूमीसंवाद आणि त्यामागचा विचार समजावून देऊन ते कलाकारांकडून उत्कृष्ट काम करून घेत. मैफलीत गायला बसले आणि आवाज लागला नाही अशी त्यांनी कधीच तक्रार केली नाही. खाँसाहेबांनी भूजीर्खाँ, मंजीखाँ आणि बडेजींना जे आपल्या गायकीचं मर्म समजावून दिलं ते भाऊंनाही दिलं. तालाचा विचार अगदी वेगळ्या दृष्टिकोनातून करून सर्वसामान्य रागही कसे अभिनव रीतीनं सोडवायचे आणि मांडायचे, अवघड राग कसे उलगडायचे याची मर्मभेदक दृष्टी भाऊंना मिळाली आणि श्रोत्यांच्या अनुनयासाठी कोणताही समझौता न करता शुद्ध गायकीच भाऊंनी मैफलीतून सतत मांडली. त्या काळी साधं पांढरं धोतर, स्वच्छ, कडक इस्त्रीचा पांढरा झब्बा किंवा शर्ट-कोट, माथ्यावर टोपी (बुलबुले आणि कं. कोल्हापूर यांच्याकडून खास बनवलेली) हा त्यांचा वेष त्यांची ओळख बनला होता. आज जरासं नाव झालं की कलाकार 'पंडित किंवा उस्ताद' होतात. आता अधिक शिकायची आपल्याला गरज नाही, असं त्यांना वाटतं. पण भाऊंनी आपलं उत्तरायुष्यही शिकण्यात-शिकवण्यात व्यतीत केलं. त्यांच्या वैयक्तिक गरजा इतक्या माफक होत्या की त्या गरजांसाठी आपल्या मूल्यांशी तडजोड करण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. त्यांचा स्वभाव येणाऱ्या प्रसंगातून किंवा अनुभवातून सकारात्मक विचार जोडणारा होता. दु:खानं पिचून जाणं किंवा निराशेनं दैवाला दोष देणं त्यांनी कधी केलं नाही. रागीट होते, पण त्यांचा राग समोरच्याचा मनोभंग करणारा, त्याच्या व्यक्तित्त्वाला जाळून टाकणारा नव्हता. पं. वामनराव सडोलीकर आपले गुरू उस्ताद अल्लादिया खान यांनी स्थापन केलेल्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या शैलीने गायन करत असत. किशोरवयात त्यांनी ग्वाल्हेर घराण्याचे पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांच्याकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. पुढच्या काळात त्यांनी हिंदुस्तानी संगीताचे शिक्षण जयपूर-अत्रौली घराण्याच्या उस्ताद भुर्जी खान व उस्ताद अल्लादिया खान यांचेकडे घेतले. त्यांच्या शिष्यांत बंधू मधुकर सडोलीकर, कन्या श्रुती सडोलीकर-काटकर आणि मंजिरी आलेगांवकर यांचा प्रामुख्याने समावेश होतो. ‘पं. वामनराव सडोलीकर फौंडेशन’ तर्फे वामनराव सडोलीकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वरांजली अर्पित केली जाते. गानसम्राज्ञी श्रृती सडोलीकर आपले वडिल वामनराव सडोलीकर यांच्या स्मरणार्थ दर वर्षी कार्यक्रम करुन त्यांना श्रध्दांजली वाहतात. पं. वामनराव सडोलीकर राहात असलेल्या दादरच्या हिंदु कॉलनीतील चौथ्या रस्त्याला मुंबई महानगर पालिकेने पं. वामनराव सडोलीकर यांचे नाव दिले.
    वामनराव सडोलीकर यांचे २५ मार्च १९९१ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट/ श्रृती सडोलीकर

  • हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेत्री, कवयित्री लीना चंदावरकर

    लीना चंदावरकर यांचे वडील आर्मी ऑफिसर होते. त्यांचा जन्म २९ ऑगस्ट १९५० रोजी धारवाड येथे झाला. सुरुवातीला जाहिरातीत काम केल्यावर मा. सुनील दत्त यांनी लीना चंदावरकर यांना पहिला ब्रेक दिला. तो चित्रपट होता मन की मित, १९६९ ते १९७९ या काळात त्यांनी अनेक चित्रपटात कामे केली. पण मेहबुब की मेहंदी या चित्रपटाने त्यांना नाव कमावून दिले. सिद्धार्थ बांदोडकर यांच्याशी त्यांनी वयाच्या २४ व्या वर्षी लग्न केले. पण लग्नानंतर काही दिवसांतच बांदोडकर यांचे निधन झाले.

    किशोर कुमार यांच्याशी १९७९ मध्ये भेट झाली. तू उत्तम कलावंत आहेस, अभिनय सुरू ठेव, असं सांगितलं. त्या वाक्यानेच त्यांना एकत्र आणलं. त्यांनी किशोर कुमार यांच्याशी लग्न केले. मा. लीना चंदावरकर किशोर कुमार यांच्याबाबत म्हणतात, किशोर कुमार नावाचं व्यक्तिमत्त्व माझ्या आयुष्यात आलं… आणि जीवनच बदलून गेलं… अवघा साडेसात वर्षांचा सहवास मला लाभला… मिळविलेला आनंद खूप काळ टिकत नाही, पण गमाविलेली गोष्ट आयुष्यभर आठवत राहते, असं माझ्या आयुष्यात झालं… प्रचंड हुशार, समोरच्याला आनंदी ठेवण्याची जबरदस्त ताकद आणि माणुसकी ही त्यांची वैशिष्ट्ये… त्यांच्या इच्छाशक्तीमुळेच मी गाणी लिहू शकले.

    लीना चंदावरकर यांचे गाजलेले चित्रपट ‘हमजोली’, ‘मैं सुंदर हूं’, रखवाला’, ‘मनचली’, ‘हनीमून’, ‘बिदाई’, ‘कैद’. आपल्या समूहातर्फे लीना चंदावरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट
    https://www.youtube.com/watch?v=DOTO3pyU3ms
    लीना चंदावरकर यांची गाणी.
    https://www.youtube.com/watch?v=v3oJtE-sb5U
    https://www.youtube.com/watch?v=ria04eZ-q20
    https://www.youtube.com/watch?v=q7NgDq4Pm8w&list=PLXCoHsJ9oLedJWvUtNcPhocMHEvHnMKtu

  • भारतीय वैज्ञानिक सर जगदीशचंद्र बोस

    वनस्पतींनाही संवेदना असतात', याची जगाला जाणीव करून देणारे महान भारतीय वैज्ञानिक सर जगदीशचंद्र बोस यांचा जन्म ३० नोव्हेंबर १८५८ रोजी झाला.

    बोस यांचा जन्म बांगला देशातील मैमनसिंग येथे झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बोस हे फरीदापूर जिल्ह्याचे उपदंडाधिकारी होते. भारतीय संस्कृती व परंपरा पाळणाऱ्या कुटुंबात त्यांचे बालपण गेले. रामायण व महाभारत या श्रेष्ठ महाकाव्यांचे त्यांच्यावर बालपणापासून संस्कार झाले होते. ही महाकाव्ये त्यांच्या जीवनप्रणालीचे प्रेरणास्रोत होती. सातत्याने कठोर परिश्रम केल्यास अपयशाचे परिवर्तन यशामध्ये होऊ शकते, यावर त्यांची वाढ श्रद्धा होती.
    कोलकाता (कलकत्ता) येथील सेंट झेविअर्स शाळेत त्यांचे प्रारंभिक शिक्षण झाले. या शाळेत बहुसंख्य विद्यार्थी ब्रिटिश व इंग्रज प्रशासकीय सेवेतील भारतीय अधिकाऱ्यांची मुले होती. जगदीशचंद्र हे ग्रामीण भागातील असल्यामुळे इतर मुले या मुलाची थट्टा व छळ करीत असत. सुरुवातीस बोस यांनी त्यांची ही मस्ती व त्रास सहन केला. परंतु या वागण्यामुळे बोस यांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला, तेव्हा त्यांनी त्या शहरी मुलांपैकी एका आडदांड मुलाला चांगलेच चोपले व खाली पाडले. त्यांच्या या प्रतिकारामुळे बरेच विद्यार्थी त्यांचे मित्र बनले व त्यांना मान देऊ लागले. या प्रकारानंतर मात्र त्यांना त्रास देण्याची हिंमत कोणी दाखवली नाही.

    बोस यांचे महाविद्यालयीन शिक्षण कलकत्ता येथील महाविद्यालयातच झाले. नंतर वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी ते इंग्लंडला गेले. तेथील वास्तव्यात पदार्थ विज्ञानाचे नामांकित तज्ज्ञ लॉर्ड रॅले यांचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की वैद्यकशास्त्र सोडून पदार्थविज्ञानाचेच अध्ययन त्यांनी सुरू केले. त्यासाठी केंब्रिजच्या ख्राईस्ट चर्च महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. १८८५ साली त्यांनीलंडन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्राप्त केली. याबरोबरच सृष्टिविज्ञान विषयातील ट्रायपॉस ही पदवी मिळवून ते भारतात परतले.

    भारतात परतल्यानंतर ते कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात पदार्थविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून कार्य करू लागले. हे उच्च पद धारण करणारे ते पहिले भारतीय होते. या उच्च पदावर काम सुरू केल्यानंतर त्यांना समजले की, ब्रिटिश प्राध्यापकांपेक्षा आपल्याला कमी वेतन देण्यात येत आहे. या अन्यायाचा प्रतिकार म्हणून, जरी काम केले तरी पगार स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला.

    अशा प्रकारे, अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवणे हा सत्याग्रहाचाच एक प्रकार होता. त्यांच्या या सत्याग्रहाचा परिणाम होऊन शासनाने शेवटी त्यांची मागणी पूर्ण केली. त्यांना थकबाकीसह पूर्ण पगार देण्यात आला. महात्मा गांधींनी भारतात येऊन सत्याग्रहाच्या माध्यमातून अन्यायाचा प्रतिकार करता येतो याची जाणीव करून दिली होती. परंतु बोस यांनी त्यांच्याही अगोदर शांततापूर्ण मार्गाने अन्यायाच्या विरोधाचा हा प्रयोग यशस्वी केला होता.

    प्रकाशाचा किरण स्फटिकातून जाताना मार्ग बदलतो, म्हणजेच त्याचे अपवर्तन (Refraction) होते. काही स्फटिकांतून दोन अपवर्तित किरणे आढळतात. या चमत्कृतीस 'दुहेरी अपवर्तन' म्हणतात. कोलकाता येथे परत आल्यानंतर बोस यांनी या दुहेरी अपवर्तनावर संशोधन सुरू केले. जर्नल ऑफ एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संशोधन नियतकालिकात या संदर्भातील त्यांचा पहिला शोधनिबंध प्रकाशित झाला. यानंतर त्यांनी 'विद्युत-चुंबकीय तरंग' या विषयावरील संशोधनाला सुरुवार केली. १ मिमी ते १ सेमी तरंगलांबी (Wavelength) असलेल्या विद्युत-चुंबकीय तरंगाची निर्मिती, संप्रेषण व ग्रहणक्षमता हे त्यांचे संशोधन क्षेत्र होते. त्या काळात अशा प्रकारच्या तरंगलांबीच्या क्षेत्राचे संशोधन कार्य हे अतिशय जटिल व गुंतागुंतीचे मानले जाई.

    या कामासाठी त्यांना महाविद्यालयाकडून कोणतेही साधन, साहाय्य वा अन्य मदत मिळाली नाही. असे असूनही, स्थानिक मनुष्यबळाची मदत घेऊन, त्यांना मार्गदर्शन करून तीन महिन्यांत आवश्यक ती उपकरणे त्यांनी बनवून घेतली, त्यासाठी लागणारा खर्च त्यांनी स्वतः सोसला व ते संशोधनात गढून गेले. पदार्थांची अंतर्गत संरचना समजावी यासाठी प्रथमच त्यांनी सूक्ष्म तरंगांचा (Micro Waves) वापर केला व यात त्यांना यशही आले. त्यांनी बनवलेले हे उपकरण आज 'तरंग मार्गदर्शक' (wave Guide) या नावाने ओळखले जाते. लघुतरंगांच्या अर्धप्रकाशीय गुणधर्मासंबंधात. अनेक प्रयोग त्यांनी केले व इ.स. १८९५ साली या प्रयोगांच्या आधारे रेडिओ संसूचकांच्या प्रारंभिक रूप असलेल्या सुसंगतीत सुधारणा घडवून आणली. त्यामुळे स्थायू अवस्था पदार्थविज्ञानाच्या (Solid-state Physics) विकासाला चालना मिळाली.

    बिनतारी संदेशवहनाच्या (Wireless Telegraphy) संशोधनाशी नाव निगडित असलेले इटलीतील प्रसिद्ध संशोधक व विद्युत अभियंते मार्कोनी यांनी या क्षेत्रात काम करण्यापूर्वीच बोस यांनी काम केले होते आणि यशही प्राप्त केले होते. इ.स. १८९५ मध्येच प्रा. बोस यांनी रेडिओ तरंग पक्क्या भिंतीतून परावर्तित करता येऊ शकतात हे जाहीरपणे प्रयोग करून दाखवून दिले. त्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. लंडन येथील रॉयल इन्स्टिट्युटमध्ये लॉर्ड केल्विन व अन्य वैज्ञानिक यांच्या उपस्थितीत त्यांनी या प्रयोगाचे प्रात्यक्षिक पुन्हा दाखवले. नंतर या क्षेत्रातील प्रयोग थांबवून आपले खूप वर्षांनी मार्कोनी यांनी बिनतारी संदेशासंबंधित एकस्व अधिकार (पेटण्ट - Patent) प्राप्त केले. अनेक विदेशी ग्रंथांतून आज बिनतारी संदेश यंत्रणेचा संशोधक म्हणून मार्कोनीची प्रशंसा केली जाते; पण खरे श्रेय मात्र बोस यांनाच आहे.

    इंग्रजांच्या काळात संशोधन हे भारतीय वैज्ञानिकांसाठी फारसे उमेदीचे काम नव्हते. उपकरणांची कमतरता होती, सोयी-सुविधा असलेल्या प्रयोगशाळांचा देखील अभाव होता. संदर्भसाहित्य व ग्रंथालायेही उपलब्ध नव्हती. शासनही प्रोत्साहन देत नसे. मान्यतेसाठी लंडनकडे डोळे लावून बसावे लागे. बोस यांच्या बौद्धिक क्षमतांमुळे अनेक इंग्रजी शास्त्रज्ञ प्रभावित झाले होते. लॉर्ड केल्विन व सर ऑलिव्हर लॉज यांना तर बोस यांच्याबद्दल विलक्षण आदर होता. त्यांनी असेही सुचवले होते की, बोस यांनी लंडन येथेच स्थायिक व्हावे व संशोधन करावे. परंतु स्वतःच्या देशावर प्रेम असणाऱ्या बोस यांनी हा प्रस्ताव स्वीकारला नाही.

    शतकाच्या अखेरच्या सुमारास बोस यांनी वनस्पती शारीरक्रियाशास्त्र (Plant Physiology) या विषयाच्या संशोधनावर आपले लक्ष केंद्रित केले. वनस्पती उत्तेजित झाल्यास त्यांच्यात सूक्ष्म हालचाली होतात, या बाबीचा अभ्यास करण्यासाठी बोस यांनी कल्पक पद्धत शोधून काढली. त्यांनी हे सिद्ध केले. वनस्पती उत्तेजित झाल्यास त्यांच्यात सूक्ष्म हालचाली होतात, या बाबीचा अभ्यास करण्यासाठी बोस यांनी कल्पक पद्धत शोधून काढली. त्यांनी हे सिध्द केले की, वनस्पतींना संवेदना असतात. माणसाप्रमाणेच सुख-दु:खाच्या प्रतिक्रिया त्या व्यक्त करू शकतात. मात्र माणून किंवा पशू यांच्याप्रमाणे आवाजाच्या माध्यमातून वनस्पती वेदना व आनंद व्यक्त करू शकत नाहीत; पण फुलून येऊन, कोमेजून वा वाळून त्या आपल्या भावना व्यक्त करतात. तसेच, अन्य सजीवांप्रमाणेच वनस्पतीही श्वासोच्छवास करतात.

    १० मे, १९०१ रोजी लंडन येथील रॉयल सोसायटीचे सभागृह वैज्ञानिकांच्या उपस्थितीने गच्च भरले होते. जगदीशचंद्र बोस तेथे आपल्या एका महत्त्वपूर्ण प्रयोगाचे प्रात्यक्षिक सादर करणार होते. त्यांनी वनस्पतींची संवेदनशीलता तपासणारे 'क्रेस्कोग्राफ' या नावाचे अतिशय नाजूक उपकरण बनवले होते. ते उपकरण म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण असा शोध होता. एका रोपट्याला ते उपकरण जोडले होते. नंतर ते रोपटे ब्रोमाइड या विषारी द्रव्याच्या पसरट भांड्यात बुडवण्यात आले. त्यामुळे वनस्पतीच्या सूक्ष्म स्पंदनांचे प्रक्षेपण वर्धित स्वरूपात पडद्यावर दिसत होते. थोड्या वेळाने त्या रोपट्याचे स्पंदन अनियमित होत होत अचानक थांबले. रोपटे जणू काही विषाला बळी पडले होते. वातावरण आश्चर्याने स्तब्ध झाले होते.

    क्रेस्कोग्राफ : वनस्पतींची वाढ नोंदवणारे व सूक्ष्मातीसूक्ष्म हालचाल कोट्यांशपटींनी वर्धित करून दाखवणारे नाजूक उपकरण. या प्रयोगामुळे वनस्पती शरीरक्रिया जाणणाऱ्या अनेक शास्त्रज्ञांना मुळीच आनंद झाला नाही. बोस हे पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ असून, विज्ञानाच्या अन्य क्षेत्रांवर त्यांनी अतिक्रमण करण्याचे धाडस केले, हे त्या शास्त्रज्ञांच्या रागामागील व आनंदित न होण्यामागील कारण होते. वनस्पती शरीरक्रिया शास्त्रातील वैज्ञानिकांनी प्रतिपादित केलेल्या गोष्टी चूक असल्याचे बोस यांनी सिद्ध केले होते. सभागृहातील वैज्ञानिक यामुळे इतके विचलित व प्रक्षुब्ध झाले की, रॉयल सोसायटीतर्फे बोस यांचे भाषण प्रकाशित करण्यास त्यांनी विरोध केला. परंतु खोटा पडेल इतका आपला प्रयोग तकलादू नाही, याबद्दल बोस यांना आत्मविश्वास होता. दोन वर्षे अथक परिश्रम करून त्यांनी एक प्रबंध (मॉनोग्राफ - Monograph) प्रकाशित केला. प्रबंधाचे शीर्षक होते 'सजीव व निर्जीव यांच्यातील प्रतिसाद प्रक्रिया' (Response in the Living and Non-living). आपला प्रयोग अचूक असून प्रयोगाचे फलित योग्यच आहे, हे सत्य स्वीकारण्यास पर्याय नाही; हे रॉयल सोसायटीला त्यांनी पटवून दिले. जे भाषण सुरुवातीस प्रकाशित झाले नाही, ते आता प्रकाशित देले गेले व जगभर वितरित करण्यात आले. बोस यांची शास्त्रज्ञ म्हणून जगभर ख्याती पसरली. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. इ.स. १९२० साली रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. या पदासाठी निवड झालेले ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ ठरले. त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे मोल लक्षात घेऊन ब्रिटिश शासनाने इ.स. १९१७ मध्ये त्यांना 'सर' या किताबाने सन्मानित केले. तेव्हापासून ते 'सर जगदीशचंद्र बोस' या नावाने ओळखले जाऊ लागले.

    बोस यांना जीवशास्त्रज्ञ म्हणून आता ओळखले जाऊ लागले. त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल प्रत्येक भारतीय सदैव ऋणी राहील. पाश्चिमात्यांनी मान्यता दिल्यानंतरच त्यांच्या देशातील लोकांनी बोस यांच्या संशोधनास मान्यता दिली व त्यांचे श्रेष्ठत्व ताणले. ३० नोव्हेंबर, १९१७ रोजी बोस यांनी 'बोस संशोधन संस्था' देशाला समर्पित केली.

    कविश्रेष्ठ रवींद्रनाथ टागोर हे बोस यांचे मित्र होते. त्या काळात पाश्चिमात्यांना टागोरांविषयी माहिती नव्हती. बोस यांनी टागोरांच्या साहित्याचे भाषांतर करून ते प्रसिध्द केले. त्यामुळे टागोरांची प्रतिभा ज्ञात झाली. त्यांचे समकालीन भारतीय वैज्ञानिक सी.व्ही. रामन यांच्यापेक्षा बोस ३० वर्षांनी मोठे होते. योगायोग असा की, रामन ज्या वित्तीय प्रशासकीय सेवेच्या परीक्षेस बसले होते, त्या परीक्षेतील पदार्थविज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका बोस यांनी तयार केली होती. आपल्या मृत्यूच्या एक दिवस आधी बोस यांनी तयार केली होती. आपल्या मृत्यूच्या एक दिवस आधी बोस यांनी बोस संशोधन संस्थेच्या निदेशकास सांगितले होते की, मृत्यूनंतर माझी उरलीसुरली संपत्ती विकावी व त्यातून मिळणारे धन संशोधन व सामाजिक कार्यासाठी वापरले जावे. जगदीशचंद्र बोस यांचे २३ नोव्हेंबर १९३७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • मराठी कथाकार, कादंबरीकार, कवी, संवाद लेखक मधु मंगेश कर्णिक

    आपल्या आगळ्यावेगळ्या व विपुल साहित्यनिर्मितीचे स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या लेखकांत मधू मंगेश कर्णिक यांचे नाव महत्त्वपूर्ण आहे. मधु मंगेश कर्णिक यांचे प्राथमिक शिक्षण करुळ येथील शाळेत १९३८ ते १९४२ पर्यंत झाले. त्यांचा जन्म २८ एप्रिल १९३१ रोजी करुळ, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे झाला.तर कणकवली येथे १९४२ ते १९५१ पर्यंत माध्यमिक शिक्षण झाले. इच्छा असूनही त्यांना प्रतिकूल परिस्थितीमुळे पुढे शिक्षण घेता आले नाही. ९ फेब्रुवारी १९५२ रोजी एस.टी. कॉपरेरेशनमध्ये ज्युनिअर क्लार्क म्हणून नोकरीस लागलेल्या कर्णिकांनी साहित्य निर्मितीसही सुरुवात केली. मधु मंगेश कर्णिक यांची पहिली कथा - कृष्णाची राधा - ही रत्नाळकर मासिकातून प्रसिद्ध झाली.’कोकणी गं वस्ती’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. कथा, कविता, नाटक, कादंबरी, ललित गद्य, बालवाङ्‌मय, अशा सर्वच साहित्यप्रकारांमध्ये लेखन करून कर्णिकांनी आपल्या प्रतिभेचा प्रत्यय वाचकांना वेळोवेळी दिला. मधु मंगेश कर्णिक यांनी आशयाच्या अंगाने मराठी कादंबरीत वैविध्य आणले.

    देवकी, सूर्यफूल, निरभ्र, माहीमची खाडी, भाकरी आणि फूल, जेईली, सनद, कातळ, वारुळ, संधिकाल या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. ज्या भूमीशी आपली नाळ बांधली गेली आहे, त्या भूमीशी आत्मियतेने बंध राखून आणि आपल्या अनुभव विश्वाशी निगडित राहून त्यांनी प्रदीर्घकाळ कथालेखन केले. कोकणी गं वस्ती, पारघ, तोरण, मंत्र, भुईचाफा, मांडव, गुजा, संकेत, तहान, डोलकाठी, झुंबर, केवढा, गवळण, अनिकेत, उत्तरायण इत्यादी ४१ कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. मधु मंगेश कर्णिक कथाकार, कादंबरीकार म्हणून सुप्रसिद्ध आहेत. इतर चौफेर लेखनही त्यांनी केले असून ते कवीसुद्धा आहेत. त्यांनी १९४५ मध्ये लिहिलेली पहिली कविता ‘बालसन्मित्र’मध्ये प्रसिद्ध झाली. त्यांचा ‘शब्दांनो, मागुते या’ हा पहिला काव्यसंग्रह २८ एप्रिल २००१ रोजी प्रकाशित झाला. त्यात ८५ कविता आहेत. मधु मंगेश कर्णिक यांची ललित गद्यात समाविष्ठ होणारी दहा पुस्तके आहेत. १) सोबत, २) नैऋत्येकडचा वारा, ३) जिवा भावाचा गोवा, ४) माझा गाव माझा मुलुख या पुस्तकांचा समावेश होतो.

    मधु मंगेश कर्णिक यांनी ‘देवकी’ व ‘केला तुका झाला माका’ ही दोन नाटके लिहिली. दूत पर्जन्याचा हे चरित्र, जगन्नाथ आणि कंपनी, शाळेबाहेरील सौंगडी, चिमणचारा, गोड गोड चिमणचारा ही खास लहान मुलांसाठी लिहिलेली पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कर्णिक यांच्या ‘स्वप्नपूर्ती’ या कथेवर ‘घुंगरू’ हा हिंदी चित्रपट प्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केला. भाकरी आणि फूल, जुईली, रानमाणूस या कथा-कादंबऱ्यांवर आधारित दूरदर्शन मालिका विलक्षण गाजल्या व लोकप्रिय झाल्या. त्यांनी विविध विशेष अंकांचे संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते व राज्य मराठी विकास संस्थेचे अतिरिक्त संचालक आहेत. ते कोकण कला अकादमी, नाथ पै वनराई ट्रस्ट यांचे संस्थापकही आहेत. त्यांनी ‘करूळ पंचक्रोशी शिक्षण प्रसार मंडळ’ स्थापन केले आणि त्या मंडळाचे करूळ ज्ञानप्रबोधिनी हायस्कूलही सुरू केले. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेत त्याचा सिंहाचा वाटा होता. कोकणातील मालगुंड येथे केशवसुतांचे सुंदर स्मारक उभारण्यासाठी मधु मंगेश कर्णिक यांनी अपार कष्ट घेतले. भारत सरकारने त्यांचा ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • चरित्रलेखक, इतिहाससंशोधक यशवंत दिनकर फडके

    चरित्रलेखक, इतिहाससंशोधक यशवंत दिनकर फडके यांचा जन्म ३ जानेवारी १९३१ रोजी सोलापूर येथे झाला. कै यशवंत दिनकर फडके यांचे वडील स्वातंत्र्य चळवळीत उतरले होते. स्वातंत्र्य चळवळीमुळे वडिलांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे फडके यांना शिक्षणासाठी बरीच धडपड करावी लागली. सोलापुरातील ’हरीभाऊ देवकरण हायस्कूल’ शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. शालेय शिक्षण चालू असताना त्यांनी द्वा.भ. कर्णिकांच्या ’संग्राम’ वृत्तपत्रातून लेखनही केले. १९४७ साली मॅट्रिक परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणाकरता ते पुण्यास गेले. राज्यशास्त्र हा विषय घेऊन पुणे विद्यापीठातून त्यांनी बी.ए. व एम्‌.ए. चे शिक्षण केले. १९७३ साली त्यांनी मुंबई विद्यापीठाकडून पीएच्‌.डी. पदवी मिळवली. य. दि. फडके हे साहित्यिक, साक्षेपी संशोधक आणि राजकीय इतिहासकार म्हणून प्रसिद्ध होते. २००० साली झालेल्या बेळगाव साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

    महाराष्ट्राच्या इतिहासावर त्यांनी मांडलेले संशोधन तसंच राजकीय विचारांवर त्यांनी केलेले भाष्य खूप महत्त्वाचे आहे. त्यांची सत्तरहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसंच र. धों. कर्वे, गोपाळ गणेश आगरकर, सेनापती बापट अशा दिग्गजांची खरी ओळख त्यांनी चरित्र लिहून करून दिली. डॉ. आंबेडकरांवर अरुण शौरी यांनी लिहिलेल्या टीकेला तसेच खणखणीत उत्तर त्यांनी दिले होते. एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा इतिहास लिहून त्यांनी मराठी माणसाला समृद्ध केले आहे. यशवंत दिनकर फडके यांचे ११ जानेवारी २००८ रोजी निधन झाले.

    त्यांची साहित्यसंपदा
    द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया- य दि फडके आणि आर. श्रीनिवासन, सेनापती बापट यांचे चरित्र
    सोशल रिफॉर्मेशन ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्रातील समाजसुधारक, पॉलिटिक्स अॅन्ड लॅगवेज, वी के चिपळुणकर
    वूमन इन महाराष्ट्र, आगरकर शोध बाळगोपाळांचा, रा. धो. कर्वे, केशवराव जेधे, नथुरामायण, आंबेडकरांचे मारेकरी अरुण शौरी, शाहू छत्रपती आणि लोकमान्य, केतकर लेख संग्रह (संपादन - य. दि. फडके)

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • चंद्रशेखर संत

    माराठी क्रीडा पत्रकारितेत स्वत:चे अग्रगण्य स्थान निर्माण करणारे चंद्रशेखर संत हे तब्बल २५ वर्षे ते “म.टा”त क्रीडा पत्रकार म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर ‘स्पोर्ट्स वीक’ मध्येही त्यांनी काम केले.

  • क्रिकेटपटू सिडने बार्न्स

    सिडने बार्न्स वयाच्या 21 व्या वर्षी 1894 मध्ये जलद गोलंदाज म्हणून नावारूपास येत होते तेव्हा ते स्टॅफोर्डशायर काउंटी क्रिकेट क्लबमध्ये ग्राउंड स्टाफ म्हणून काम करू लागले. सिडने बार्न्स यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना खेळला तो 13 डिसेंबर 1901 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी नाबाद 26 धावा केल्या आणि 65 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या

  • दिलीप प्रभावळकर

    दिलीप प्रभावळकर हे नाव माहित नसलेला रसिक मराठी माणुस विरळाच. ज्याला खरी अभिनयाची जाण व गोडी आहे , त्याला प्रभावळकरांमधला सच्चा व प्रतीभाशील कलावंत हा भावतोच.

  • ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे

    १९५५ मध्ये समाजवादी पक्षाने पुकारलेल्या गोवा मुक्तीसंग्रामात दिनू रणदिवे सक्रिय होते. तसंच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सहभाग होता. या लढ्यात त्यांनी आचार्य अत्रे यांच्यासोबत तुरुंगवासही भोगला. संयुक्त महाराष्ट्र समितीने १९५६ मध्ये संयुक्त महाराष्ट्र पत्रिका या नावाचे अनियतकालिक सुरु केले.

  • आनंद अभ्यंकर

    मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील एक लोकप्रिय अभिनेते होते