(इटालियन लोककथा)
‘जोजा ही एका राजाची मुलगी, पाय घसरून पडलेल्या एका म्हातारीला
कुचेष्टेने हसली. तशी म्हातारीने चिडून शाप दिला : ‘तादेव’ नावाचा मृत राजपुत्र
तुला पती मिळू दे अन् तुझे खूप हाल होऊ देत !’ बिचारी राजकन्या, तिने
म्हातारीची विनवणी केली. तो मृत राजपुत्र कशाने उठेल म्हणून विचारले. तशी
म्हातारीने सांगितले की, त्याच्या उशाशी थडग्यात एक मोठे चांदीचे पिंप
ठेवलेले आहे, ते जी तरुणी तीन दिवसांत अश्रूंनी भरून टाकील तीच त्याला
जीवदान देऊ शकेल व मग त्यांचे लग्न होईल. तू फिदीफिदी हसलीस ना? आता
सारखी रड अन् कर त्याला सजीव ‘राजकन्येने कष्टाने राजपुत्राचा शोध लावला व खरोखरच तो देखणा पण मृत राजपुत्र पाहून तिला इतके अनिवार दुःख झाले की, तिच्या डोळ्यांतून सारख्या धाराच लागल्या पाण्याच्या. इतक्या की, ते भांडे भरत आले, दोनचार थेंब कमी होते, तेवढ्यात जरा थकल्यामुळे तिचा डोळा लागला आणि काय दुर्दैव बघा,
एक हलकट मोलकरीण हे पाहत होती, तिने पिंप ओढून दुसऱ्या कोपऱ्यात नेले
व आपल्याच डोळ्यांतली चार आसवे त्यात टाकली ! त्या चार थेंबांनी ते पिंप
भरले. लगेच तो राजपुत्र सजीव होऊन थडग्यातून बाहेर आला, ती काळूबाईच
आपला जीव वाचवणारी तरुणी असे समजून तिला बरोबर घेऊन गेला व त्याच
रात्री त्यांचे लग्नही लागले. बिचारी राजकन्या तेथेच हळहळत बसली व काळीचे
आयतेच साधले ! मग त्या कळकट राणीला डोहाळे लागले ते गोष्टी ऐकायचे.
तेव्हा राजपुत्राने दवंडी देऊन ठिकठिकाणच्या गोष्टीवेल्हाळ बाया आणवल्या.
ती राजकन्याही या बायांतच मिसळून आलेली होती. तिने आपली खरीखुरी
कथा सर्वात शेवटी सांगितली. तशी काळ्या राणीचा चेहरा खर्रकन उतरला.
राजपुत्राला तिचे कपट कारस्थान कळले. तशी तिने सारे कबूल केले. मग त्याने
तिला देहान्त शिक्षा दिली व राजकन्येशी त्याचे लग्न झाले.