एक जंगल होते. जंगलात अनेक प्राणी राहत होते. वाघ, कोल्हा, लांडगा, अस्वल अशा हिंस्त्र प्राण्यांचे वास्तव्य तिथे होते. एके दिवशी कोल्हा जंगलात फिरत असताना खूप जोरात पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू झाला. कोल्हा घाबरला. पळत सुटला. पळता पळता त्याला दिसली गुहा. ही तर वाघाची गुहा. घेऊ या का आश्रय गुहेत? आणि वाघाने आपल्याला खाल्ले तर! पुढेही मरण अन् मागेही मरण ! गुहेजवळ कोल्हा घुटमळत होता. गुहेत वाघाची चाहुल लागेना ! तेव्हा हिम्मत करून गुहेत शिरला. पण वाघ केव्हाही येण्याची शक्यता होती. त्याने स्वतःच्या बचावाची पूर्ण तयारी केली होती. अतिशय सुरक्षित जागी तो लपून बसला. इतक्यात एक अस्वल पावसापासून, वाऱ्यापासून स्वतःला वाचवित त्याच गुहेत शिरताना कोल्ह्याने पाहिले. आता अस्वल आपल्याला खाणार. काहीतरी युक्ती केली पाहिजे. अस्वल कोल्ह्यापासून थोड्याच अंतरावर होते. एवढ्यात कोल्ह्याने एकदम विचित्र आवाज काढायला सुरूवात केली. अस्वलाने विचार केला हा आवाज वाघाचा नाही. मग आत कोण आहे? उसने अवसान आणून अस्वलाने जोरात विचारले, “कोण आहेस रे तू ! माझ्या समोर ये.” विचित्र आवाजात कोल्हा बोलला, “ए, मी कोण म्हणून विचारतोस ? मी… मी अस्वलाचे केस उपटणारा, वाघाचे तोंड बांधणारा, एक शिंग्याचे शिंग बांधणारा असा अजब प्राणी आहे.” अस्वल घाबरले. पळत सुटले. वाटेत त्याला वाघ भेटला.
वाघाने पळणाऱ्या अस्वलाला थांबवत विचारले, “अस्वलदादा, अस्वलदादा एवढे पळत कुठे निघालात ?” अस्वलदादा म्हणाला, “काय सांगू बाबा वाऱ्या पावसापासून वाचण्यासाठी थोडा वेळ आश्रयाला तुझ्या गुहेत शिरलो तर अजबच दृश्य दिसले, वाघोबा तुझ्या गुहेत एक खूप विचित्र प्राणी शिरला आहे. म्हणतो कसा, “मी अस्वलाचे केस उपटणारा, वाघाचे तोंड बांधाणारा, एक शिंग्याचे शिंग बांधणारा प्राणी आहे.” असा अजब कोणता प्राणी आहे समजत नाही, तूच जाऊन बघ म्हणजे समजेल.” एवढे बोलून अस्वल पळत सुटले. वाघ संतापात आपल्या गुहेजवळ आले. आणि गुहेत शिरताच वाघ डरकाळी फोडत म्हणाला, “कोण आहेस रे तू ? बाहेर निघ मी तुला फाडून खातो.” वाघाची डरकाळी ऐकून कोल्हा थरथर कापू लागला. आता आपल्याला वाघ फाडून खाणार. पण तरीही धीर न सोडता कोल्हा आवाज बदलून बोलू लागला, “ये वाघा, ये ! मी तुझीच वाट बघत होतो. तू मला ठार मारतोस काय? अरे, मी अस्वलाचे केस उपटणारा, वाघाचे तोंड बांधणारा आणि एकशिंग्याचे शिंग बांधणारा विचित्र प्राणी आहे. थांब तुझेच मुस्काट प्रथम बांधतो.” वाघ विचार करू लागला, “माझ्यापेक्षा बलवान, अस्वलापेक्षा ताकदीचा आणि एकशिंग्यापेक्षा शक्तीशाली प्राणी कोण असेल ? पण प्रथम जीव वाचविणे महत्त्वाचे होते. वाघाने तेथून पळ काढला. थोड्याच वेळात बाहेरचे वातावरण शांत झाले. वारा आणि पाऊस थांबला होता. जवळपास कोणी नाही असे पाहून लपलेल्या कोल्ह्याने वाघाच्या गुहेतून पळ काढला. अशा प्रकारे मोठ्या चातुर्याने कोल्ह्याने आपला जीव वाचविला.