गुरूवंदना गायन गृप (आठवणींची मिसळ १४)
Category:
साहित्य - ललितमाझ्या साडूंनी (कै.रमेश वैद्य) निवृत्तीनंतर एक छान उपक्रम सुरू केला होता. ते स्वतः उत्तम गायक होते. ते गीतकारही होते. त्यांच्या अनेक रचना रेडीओच्या सुगम संगीतात अनेकदा चांगल्या चांगल्या गायक-गायिकांनी गायल्या. गायनावर त्यांचे खूप प्रेम होते. निवृत्तीनंतर ते इच्छूकांना गायन शिकवत असत. पण मी म्हणतो तो उपक्रम आगळावेगळा होता. दर गुरूवारी त्यांच्या घरी गाण्याची एक खास बैठक होई. त्यांत भाग घेणारे बहुतेक सर्वच जण निवृत्त झालेले होते. कांहीनी नोकरी पूर्ण केली होती तर कांही जणांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. पण सर्वांच गायनावर प्रेम होतं. ह्या दोन-अडीच तासांच्या बैठकीत सर्वजण वीस वीस मिनिटे गात असत. जे थोडे कच्चे होते, तेही हळूहळू चांगले गाऊ लागत. कारण इतर सदस्य त्यांना उत्तेजन देत. ह्या बैठकींना त्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनांतखूप महत्त्वाचं स्थान मिळालं त्यांच्या या गृपला अकरा वर्षे पूर्ण झाली तेव्हां सर्वांनी मिळून एक गाण्याचा कार्यक्रमच सादर केला. दोनशेहून अधिक श्रोते त्या कार्यक्रमाला हजर होते. मला त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून बोलावले होते. काल कांही कागद चाळतांना मी त्या कार्यक्रमाच्या वेळी जे भाषण केले होते ते हाती आले. मी कांही मोठा वक्ता नाही की माझी भाषणे नोंदली जावीत. परंतु निदान तुम्हांला ते सादर करावं असं मनात आलं म्हणून इथे देत आहे.