(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

  • हिला कुठेतरी पाहिले आहे…

    मी लांबूनच तिला बघत होतो…बघत बघत जवळ येऊ लागलो… ती म्हणाली ..पहेचाना .. मी असेच उत्तर दिले….. कैसी हो..आप….

  • ऍबॉर्शन! ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – ४

    डॉ. कर्णिक, साठीच्या आसपास वय असलेले, नावाजलेले गायनीक होते. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेहमीच गर्भवती महिलांची गर्दी असायची. आजचा दिवसहि त्याला अपवाद नव्हता. रात्रीचे साडेनऊ वाजत आले होते. शेवटचा पेशंट तपासला कि, मॅटर्निटी वॉर्डातून राऊंड आणि मग ते या कामाच्या रगाड्यातून मोकळे होणार होते.

  • बांडगुळ…

    माझ्या बापाने नेहमीच छोटी स्वप्ने पाहिली आणि मोठी स्वप्ने पाहणाऱ्या माझी पंख छाटली, माझी आई तिने नेहमीच मोठी स्वप्ने पाहिली पण बांडगुळ बनून… माझी भावंडे ती तर बांडगुळाला खाऊन जगणाऱ्याच्या भूमिकेत होते.

  • कठोर शिक्षा – भाग १

    सुविख्यात वकील श्री. नारायण – (ऊर्फ नानू) प्रभु याला अशी सलगी मुळीच आवडली नाहीं. तो कामात गर्क होता. इतर वकीलांबरोबर कोर्टाच्या प्रतीक्षालयात (Common Room मध्ये) बसून आजच्या कामाचा आढावा घेत होता. त्याची पाठ दाराकडे होती म्हणून कोण हांक मारत होतं ते आधी समजलं नाहीं. त्याने पाठ वळवली आणि त्याला ओळख पटली. इतर वकीलही माना वळवून पाहूं लागले. ।।

  • वाटणी (कथा)

    प्रत्येक गावात दादा, काका, मामा, नाना अशा नावाने ओळखली जाणारी माणसे असतात. अशाच एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला सर्व गाव ‘आबा’ म्हणायचा. साऱ्या गावाचे ते ‘आबा’ होते..

  • चमेली! (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३६)

    चमेली! (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३६)

    गांवठी व डॅशहाउंड ह्यांच मिश्रण असलेली, कोल्हाच वाटणारी कुत्री फुटपाथवर अस्वस्थपणे फिरत होती.
    मधेच भूंकून आणि पंजे चाटून आठवत होती की ती घरी जायचा रस्ता कसा विसरली ?
    आजचा दिवस कसा गेला तें आठवत होते पण शेवटी ती ह्या अनोळखी फूटपाथवर कशी आली ?
    सकाळी कोंड्या सुताराने, लाकडाची वस्तु कागदात गुंडाळून कांखेत मारली आणि तो तिला म्हणाला, “चल, चमेली.”
    ताबडतोब ती खुर्चीखालून बाहेर येऊन आळस झटकून मालकामागे धांवली होती.
    कोंड्याचा ग्राहक दूर रहात होता.
    वाटेत कोंड्याने संवयीप्रमाणे दोन गुत्त्यांमधे ताकदीसाठी दोन प्याले रिचवले.
    चमेलीला आठवले रस्त्यात ती अगदी चक्रमपणे वागली.
    बाहेर फिरायला आणल्याच्या आनंदात उड्या मारल्या, गाड्यांच्या मागे भुंकत धांवली आणि तिने रस्त्यावरच्या कुत्र्यांना पळवून लावले.
    ती कोंड्याच्या नजरेआड झाली की तो ओरडे, “कुठे गेली बदमाष ! चल सरळ !”
    कोंड्याचं काम झाल्यावर तो बहिणीच्या घरी गेला.
    तिथेही प्याला, कांही खाल्ले आणि एका पुस्तकं बांधणाऱ्याकडे गेला.
    तिथून खानावळीत व नंतर एका मित्राकडे गेला.
    संध्याकाळपर्यंत कोंड्याने बरीच दारू ढोंसली होती व तो धड चालू शकत नव्हता.
    तो तत्त्वज्ञान बरळत होता, “माणसाची सगळी मस्ती जीता असेपर्यंतच, मेला की फक्त राख.”
    मधेच चमेलीला म्हणे, “चमेली, तू एक क्षुद्र प्राणी आहेस. माणसासमोर तू म्हणजे एखाद्या मोठं कपाट बनवणाऱ्या कारागीरापुढे एक छोटी घडवंची घडवणारा सुतार.”
    एवढ्यांत बँडचा आवाज येऊ लागला.
    सैनिकांची संचलनाला निघालेली तुकडी त्यांच्याकडेच येत होती.
    तो आवाज चमेलीला असह्य वाटला.
    चमेलीचं धैर्य गळालं, ती गोल गोल फिरत भुंकू लागली.
    तिला कळेना की तिचा मालक सैनिकांकडे आनंदाने कां पहात होता आणि त्याने सलाम कां ठोकला ?
    ती जोरांत भुंकत पलिकडल्या फूटपाथवर पळाली.
    ती भानावर आली, तेव्हां बँड गेला होता पण मालकही गायब होता.
    ती डावीकडे, उजवीकडे, समोरच्या फूटपाथवर सगळीकडे मालकाला शोधून आली पण त्याला जणू जमिनीने गिळले असावे.
    ती जमिनीचा वास घेऊ लागली पण तिथून बरेच लोक जाड बूट घालून गेल्यामुळे मालकाच्या पायांचा वास नाहीसा झाला होता.
    तिथे रबराचाच वास येत होता.
    तोपर्यंत रात्र झाली.
    रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिवे लागले.
    घोडागाड्या, हातगाड्या, भराभर जात येत होत्या.
    फूटपाथवर माणसांची वर्दळ वाढली होती.
    अनोळखी माणसे उगाचच ये जा करून तिला अडथळा करत होती.
    तिने माणसांची वर्गवारी मालक आणि ग्राहक अशी केली होती.
    कोंड्याला तिला बोलायचा, मारायचाही अधिकार होता. ग्राहकांना नाही.
    जाणारे, येणारे तिला पायांनीच ढकलू पहात होते आणि ती त्यांच्या पायाला चावू पहात होती.
    माणसांची गर्दी कमी झाली.
    चमेली फिरून आणि भुंकून थकली.
    थंडी वाढली होती.
    ती जवळच्याच घराच्या दाराशी गेली आणि मुटकुळे करून झोपली.
    दिवसभरांत एकाकडे एक बिस्कीट तर खानावळीजवळ एक मांसाचा छोटा तुकडा एवढचं खाल्ल्यामुळे ती भुकेली होती.
    ती माणूस असती तर म्हणाली असती, “एवढ्यावर कशी जगू, त्यापेक्षा जीव देते.”
    थकव्यामुळे तिला डुलकी लागली तोंच दरवाजा उघडला.
    दरवाजा तिला जरासा लागला आणि एक माणूस बाहेर आला.
    ती कूं कूं करत त्याच्या पायांत घोटाळली आणि त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.
    त्याने खाली वांकून तिला विचारले, “अरे, भू भू, तूं कुठून आलीस ? लागलं कां तुला ? माफ कर. अशी रागावू नकोस, ये.”
    चमेलीने त्याच्याकडे पाहिलं.
    तो गुबगुबीत इसम बाहेर चालला होता.
    त्याने टोपी घातली होती.
    चमेलीला त्याची भाषा कळली नाही पण आवाज आश्वस्त करणारा वाटला.
    ती त्याचा हात चाटू लागली व करूणपणे कूं, कूं करू लागली.
    तो म्हणाला, “मजेशीर आहेस तू ! कोल्हा वाटतेस अगदी ! कधी तरी उपयोगी येशील.”
    त्याने तिला खूण केली. “चल माझ्या बरोबर !”
    तें चमेलीने ओळखलं.
    चमेली त्याच्यामागून गेली.
    पंधरा वीस मिनिटांनी ती एका मोठ्या खोलीत होती.
    तो डायनिंग टेबलाशी बसला होता आणि ती मान एका बाजूला कलती करून त्याच्याकडे कुतूहलाने पहात होती.
    तो जेवताना अधून मधून तिच्याकडे चपाती, चीज,मांसाचे तुकडे, कोंबडीची हाडकं असं कांही टाकत होता.
    जे पडेल ते ती पटापट खात होती.
    जशी खायची तशी तिची भूक वाढायची.
    तिचं तें भराभरा खाणं पाहून तो म्हणाला, “तुझा मालक बहुदा तुला खायला पुरेसं देत नसावा !
    किती हडकुळी झालीयस तू ?”
    चमेली खाण्यात मग्न होती.
    खाऊन ती समाधानाने बसली व शेपूट हलवू लागली.
    मालक आरामखुर्चीत बसला असतांना चमेली विचार करत होती की सुताराकडे ती बरी होती की इथे बरी आहे ?
    ह्याच्या खोलीत फारच थोडे सामान होते.
    कोंड्या सुताराकडची खोली वस्तूंनी भरलेली होती.
    शिवाय व्हार्निशचा सुंदर वास यायचा.
    तिथे बसायला किती जागा होत्या.
    पण ह्या माणसाकडे खायला खूप असावं.
    तो बाजूलाच सिगार ओढत बसला असताना एकदाही तिच्यावर डाफरला नाही.
    कोंड्या सुताराने एवढ्या वेळात दहादा शिव्या देऊएकदा तिचा उध्दार केला असता आणि एखादी लाथही पेकाटात घातली असती.
    मग तो परका इसम बाहेर जाऊन एक दरी घेऊन परतला.
    ती त्याने कपाटाच्या बाजूच्या कोंपऱ्यांत अंथरली आणि म्हणाला, “ये, इकडे. ह्याच्यावर झोंप.”
    चमेली जाऊन मऊ दरीवर झोंपली.
    तो दिवा घालवून खोलीतून गेला.
    चमेलीला झोपेत मधेच कुत्र्यांचे भुंकणे ऐकू आले.
    ती प्रतिसाद देणार होती पण एकदम आपल्यावर आलेला प्रसंग आठवून दुःखी झाली.
    तिला चुकल्या-चुकल्यासारखे वाटू लागले.
    कोंड्याचा नाठाळ मुलगा बबन्या तिला आठवला.
    ती अशी बसली की बबन्या तिच्याशी खेळायला येई.
    त्याचे खेळ तिचे डोळे पांढरे करत.
    मालक बाजूला आराम करत असे.
    बबन्या तिचे मागचे पाय धरून तिला बांकाखालून ओढून बाहेर काढी.
    मग तिला धरून फक्त मागच्या दोन पायावर चालायला लावी.
    तिला उचलून घंटा हलवावी तशी हलवे.
    तिला सिगारच्या तंबाखूचा वास घ्यायला लावी.
    चमेली ह्या विचारांतून लौकर बाहेर आली आणि पेंगू लागली.
    स्वप्नात तिने कितीतरी कुत्रीं पाहिली. माणसे पाहिली.
    ती आणि बबन त्या माणसांच्या मागे धावत होती.
    मग अचानक बबनही कुत्रा झाला व त्या माणसांवर भुंकू लागला.
    दोघानी एकमेकांच्या नाकाचा वास घेतला मग दोघं मजेत धांवत सुटले.
    सकाळी चमेली जागी झाली तेव्हां खोलीत एकटीच होती.
    तिने खोलीच्या सर्व कोपऱ्यांचा वास घेतला.
    लक्ष घालण्यासारखं काहीच तिला मिळालं नाही.
    तेव्हा खोलीच्या दुसऱ्या दरवाज्यावर तिने खुडबुड केली आणि जरा छातीने ढकलला तर तो उघडला.
    आंत तोच इसम झोपेत घोरत होता.
    एक दोनदा भुंकून तिने त्याला जागं करायचा प्रयत्न केला मग तो नाद सोडून दिला.
    खुडबुड करून तिने त्याही खोलीचा दुसरा दरवाजा उघडला.
    आत जाताच तिला वेगळाच वास जाणवला आणि सावध होऊन ती थबकली.
    खोलीच्या भिंतीना ठिपके ठिपकेवाला कागद डकवला होता.
    चमेली आत शिरताच एक राखी रंगाचा हंस पंख पसरून आवाज करत तिच्या अंगावर आला.
    त्याच्या जवळच एक केसाळ मांजर होते.
    चमेलीला पहातांच त्याने अंगावरचे केस फुलवले, डोळे वटारले आणि पाठ फुगवून तें ही “फीस्स्” आवाज करू लागले.
    चमेली जरा घाबरलीच पण ते बाहेर न दाखवतां भुंकत ती मांजराच्या दिशेने पुढे जाऊ लागली.
    मांजराने आपली पाठ आणखीच धनुष्यासारखी वांकवली व फिस्कारत आपला पंजा चमेलीच्या डोक्यावर हलकेच मारला.
    चमेलीने मागे उडी घेतली व मध्येच बसून ती कर्कश भुंकू लागली.
    तोपर्यंत मागून येऊन हंसाने आपल्या चोचीचा प्रसाद चमेलीला पाठीवर दिला.
    चमेलीने हंसावर उडी मारायचा प्रयत्न केला.
    तो इसम आत येऊन ओरडला,“काय चाललंय ? ह्या गडबडीचा अर्थ काय ? चला, आपापल्या जागेवर जा.”
    मांजराकडे जाऊन थोपटत तो म्हणाला, “काय मन्या ! तुला लढाई करायचीय ? चल गप्प बस बघू.”
    मग हंसाकडे वळत म्हणाला, “हंसराज, तुझ्या घरात जागेवर जा बघू.”
    मांजर आपल्या दरीवर आडवे झाले व त्याने डोळे मिटून घेतले.
    त्याच्या चेहऱ्यावरून त्याला उगीच चिडल्याचा पश्चात्ताप होत होता.
    चमेली गुरगुरत होती तर हंसराज भराभर आवाज करून मालकाला बरंच कांही आपल्या भाषेत सांगत होता.
    मालक म्हणाला, “ठीक आहे, ठीक आहे पण तुम्ही मित्र बनून शांततेने राहिलं पाहिजे.”
    मग चमेलीला जवळ घेत तो म्हणाला, “आणि तू घाबरू नको. ते चांगले दोस्त आहेत. ते तुला त्रास नाही देणार.
    अरे, तुला कांही तरी नाव द्यायला हवं. हं ! तुला आपण आंटी म्हणूया. ठीक आहे, आंटी !”
    मग पुन्हा पुन्हा आंटी म्हणत तो बाहेर गेला.
    चमेली बसली आणि पाहू लागली.
    मन्या दरीवर डोळे मिटून झोपल्याच सोंग करत होता.
    हंसराज पाय आपटत मान उंच करून भराभर कांहीतरी बोलतच होता.
    तो हुशार असावा.
    एक लांबलचक भाषण करून एक पाऊल मागे जाऊन आपल्याच भाषणावर खूष झाल्याचं दाखवायचा.
    त्याच्या बोलण्याला गुर्रर्र ची साथ देत चमेली बसली होती.
    मग ती उठली आणि तिने सर्व कोपरे हुंगले.
    एका कोपऱ्यात एका वाडग्यांत पावाचे तुकडे आणि वाटाणे पडलेले होते.
    चमेलीने दोन तुकडे खाल्ले.
    आपलं खाणं चमेली खाते आहे म्हणून हंसराजला बिलकुल राग नाही आला.
    तो अधिक उत्साहाने बोलू लागला व त्यानेही येऊन कांही वाटाणे खाल्ले.
    कांही वेळानंतर तो इसम परत आला.
    त्याने बरोबर कांहीतरी विचित्र वस्तु आणली होती.
    ती दोनच्या आकड्यासारखी होती.
    मधोमध दोरी बांधलेली घंटा होती.
    तिथे एक पिस्तुलही होते.
    त्याने ती वस्तु खोलीच्या मधोमध ठेवली.
    मग त्याने हंसराजला बोलावले.
    हंसराज पुढील आज्ञेची वाट पाहू लागला.
    तो इसम म्हणाला, “हंसराज, प्रथम सर्वांना वांकून नमस्कार कर. व्यवस्थित.”
    हंसराजने मान प्रथम उंच करून चारी बाजूना फिरवली मग पाय दुमडत मान झुकवली.”
    तो इसम म्हणाला, “खूप छान ! आता मरून जा.”
    लागलीच हंस पाठीवर उताणा झोपला व पाय वर करून पडला.
    अशाच आणखी कांही गोष्टी करून दाखवल्यावर तो इसम ओरडला, “आग, आग, बचाव.”
    हंसराज त्या वस्तूकडे गेला व दोरी धरून जोरजोरात घंटा हलवू लागला.
    तो इसम खूष झाला.
    त्याने हंसराजच्या मानेवरून मायेने हात फिरवला.
    “शाब्बास, हंसराज. आता तू हिरे, सोन्याचे दागिने विकणारा व्यापारी आहेस.
    तुझ्या दुकानात चोर घुसतात.
    मग तू काय करशील ?”
    हंसराजने जाऊन पिस्तुलाशी जोडलेला दोर ओढला.
    मोठ्ठा आवाज झाला.
    चमेलीला ह्या दोन्ही गोष्टी पाहून एवढा आनंद झाला की त्या चौकटीभोवती भुंकत ती गोल गोल फिरली.
    तो इसम म्हणाला, “आंटी, बस. गडबड नको करूस.”
    हंसराजचं काम अजून बाकी होतं.
    आणखी एक तास त्या इसमाने त्याला गोल फिरायला लावलं.
    वाटेत असलेल्या रींगमधून उड्या मारायच्या, मधेच बसायचे, वगैरे त्याला करायला लावत होता.
    चमेलीला ते फार आवडलं.
    एक-दोनदा तीही त्याच्या मागे फेरी मारून आली.
    त्याने मोलकरणीला हाक मारून म्हटले ‘मारीयाला आण’.
    थोड्याच वेळात एक वेगळाच आवाज खोलीत आला.
    चमेली घाबरली नव्हती पण सुरक्षेसाठी त्या इसमाजवळ जाऊन बसली.
    मोलकरणीने एक काळी डुक्करीण खोलीत आणली.
    चमेलीच्या ओरडण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत आत येताच डुक्करीणीने बसून आपले दोन्ही पुढचे पाय उचलले व आनंद दाखवत हवेत हलवले.
    ती मालकाला, हंसराजला व मन्याला पाहून खूष झाली होती.
    ती हंसाच्या व मांजराच्या जवळ जाऊन आनंद दाखवून आली.
    तिच्या हालचाली आणि आनंद पाहून चमेलीला वाटले हिच्यावर भुंकणं व्यर्थ आहे.
    मालकाने ती चौकट बाजूला ठेवली व मन्याला हांक मारली, “मन्या, चला, आता पिरॅमिड करूया.
    मन्या आळस झटकत अगदी नाईलाजाने पुढे आला आणि डुक्करीणीजवळ गेला.
    मग मालकाने बराच वेळ तिघांना कांही समजावले व तो म्हणाला, “एक, दोन.. तीन.”
    त्या बरोबर हंसराज उडी मारून डुक्कराच्या पाठीवर उभा राहिला.
    मग अगदी कांही विशेष न केल्यासारखं दाखवत मन्या आधी उडी मारून डुक्करीणीच्या पाठीवर आणि मग हंसराजच्या पाठीवर जाऊन मागच्या दोन पायांवर उभा राहिला.
    चमेली खूषीने भुंकू लागली.
    मग अशाच कांही गोष्टी तो मालक त्या तिघांना शिकवत राहिला.
    त्या दिवशीचा अभ्यास संपला.
    चमेलीला वेळ कसा गेला तेंच कळलं नाही.
    मोलकरीण येऊन डुक्करीणीला घेऊन गेली.
    मन्या कांही झालंच नाही असं भासवत आपल्या दरीवर जाऊन झोपला.
    रात्रीसाठी चमेलीची दरी पण त्याच खोलीत आणली गेली.
    भरपूर खाऊन चमेली तिथेंच हंस आणि मन्या यांच्याबरोबर झोंपली.
    असा एक महिना गेला.
    चमेलीला भरपूर खायची संवय झाली होती.
    तिने नवे आंटी हे नावही स्वीकारले होते.
    तिला त्या मालकाची आणि नव्या सोबत्यांचीही संवय झाली होती.
    दिवस आरामात चालले होते.
    रोज सर्वात आधी हंसराज उठे व त्याचं अखंड बोलणं सुरू होई.
    मग चमेली जागी होई.
    चमेली त्याची वटवट ऐके.
    लौकरच तिच्या लक्षांत आलं की तो उगीचच बडबडतो.
    तशी ती त्याच्या बडबडीकडे दुर्लक्ष करू लागली.
    मन्या सर्वांत शेवटी जागा होई व तरीही डोळे मिटून पडून राही.
    त्याचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन “हे जग तुच्छ आहे” असा होता.
    चमेली उठल्यावर सर्वत्र फिरून वास घेई.
    तिला आणि मन्याला घरभर फिरायची परवानगी होती.
    हंसराजला मात्र त्याच खोलीत रहावं लागे.
    डुक्करीणीच घरं कुठे तरी बाहेर बागेत होतं.
    मोलकरीण तिला फक्त सरावाच्या वेळी घेऊन येई. मालक उशीरा उठे.
    उठल्यावर चहा घेऊन तो त्यांना नव्या गोष्टी शिकवत असे व सराव करून घेत असे.
    रोज तीच तालीम.
    तीन चार तासांनी मन्या थकून दारूड्यासारखा चाले तर हंसराज चोंच उघडून श्वास घेऊ लागे.
    मालक सारखा कपाळावरचा घाम पुसे.
    ती तालीम आणि जेवण चमेलीला आवडत होतं पण तिची संध्याकाळ खराब जाई.
    रोज मालक संध्याकाळी हंसराज आणि मन्या दोघांना घेऊन बाहेर जाई.
    चमेली तेव्हा कंटाळून नुसती पडून राही.
    तिला व्हार्निशचा वास आठवे.
    कांही माणसं आठवत.
    तिची शेपटी हलू लागे.
    मग परत ती निपचीत पडून राही.
    तिची वाढ आता पूर्ण झाली होती आणि प्रकृतीही चांगली झाली होती.
    एक दिवस मालक म्हणाला, “आंटी, आता तू पण कांही तरी काम करायला पाहिजे. तुला कलाकार व्हायचंय ना !”
    त्याने तिला वेगवेगळ्या कसरती शिकवल्या.
    मागच्या दोन पायांवर उभं रहाण्याचा पहिला धडा ती पटकन शिकली.
    दुसऱ्या धड्यात मागच्या दोन पायांवर उभं राहून उंच उडी मारून मालकाच्या हातातले बिस्कीट खाऊ लागली.
    मग ती नाच करायला शिकली, दोरीबरोबर गोल फिरू लागली, घंटा वाजवू लागली, पिस्तूलाचा बार काढू लागली आणि पिरॅमीडमधे मन्याची जागा घेऊ लागली.
    ती भराभर शिकायची.
    प्रत्येक गोष्ट केल्यानंतर भुंकून आनंद व्यक्त करायची.
    तिचा मालक खूश होता.
    तो म्हणे हिच्यात उपजत कला आहे.
    खरी कलाकार आहे.
    तिला 'कला' शब्द इतका आवडे की कला म्हटल्याबरोबर ती उडी मारत असे, जणू कांही ते तिचं नांव होतं.
    एकदा चमेली अथवा आंटीला कुत्र्यांना पडावं असं स्वप्न पडलं.
    ती धांवत होती व एक हमाल झाडू घेऊन तिचा पाठलाग करत होता.
    ती दचकून उठली.
    आजूबाजूला अंधार होता.
    खोली कोंदट होती.
    तिला काळोखाची भीती वाटत नसे पण आता ती भ्यायली व तिला भुंकावेसे वाटू लागले.
    तिच्या मालकाने दुस-या खोलींत उसासा सोडलेला तिने ऐकला.
    आदल्या दिवशी मन्याच्या वाटणीचा कबाब तिने मधेच पळवला होता व कपाटाआड दडवला होता.
    त्याची तिला आठवण झाली पण रात्री अंधारात फिरायची मनाई होती.
    मग झोपण्यासाठी तिने पुन्हा डोळे मिटले आणि अचानक हंसराजने किंचाळल्यासारखा विचित्र आवाज केला.
    काय झालं तें न कळल्यामुळे तिने नुसतीच गुरगुर केली.
    तिने परत जरा डुलकी घेतली.
    स्वप्नांत दोन मोठे कुत्रे कांही तरी खात होते व तिच्यावर गुरगुरत होते.
    एका शेतकऱ्याने त्यांना हांकलले मग ती तें खाऊ लागली.
    एवढ्यात हंसराज पुन्हा जोरात किंचाळला.
    आंटीला हंसराज ओरडतोय, हे लक्षांत आले नाही.
    खोलींत कुणीतरी आलंय अशी तिची खात्री झाली.
    ती भुंकू लागली.
    बाहेर डुक्करीणही आवाज करत होती.
    तिचा मालक हातात दिवटी घेऊन आला.
    आंटीला खोलीत कुणी परका दिसला नाही.
    हंसराज झोपला नव्हता.
    त्याचे पंख पसरले होते व चोंच
    उघडी होती.
    तो खूप थकलेला दिसत होता.
    मन्याही जागाच होता.
    मालकाने विचारले, "हंसराज काय होतंय तुला? तुला बरं नाही वाटत म्हणून ओरडतोयस?"
    हंसराज गप्पच होता.
    मालकाने थोडा वेळ त्याच्या मानेवरून हात फिरवला मग तो परत गेला.
    पुन्हा काळोख झाला.
    आंटी पुन्हा घाबरली.
    कुणीतरी बाहेरचे खोलीत आहे असे तिला सारखे वाटत होते.
    बाहेर डुक्करीणीची खुडबुड चालूच होती.
    मन्याही अस्वस्थ होता.
    सर्व गोष्टी चिंताजनक होत्या. पण कां?
    मग कधी नव्हे तो मन्या जवळ येऊन तिचे पाय चाटू लागला.
    तिनेही त्याला चाटले.
    हंसराज पुन्हा किंचाळला.
    मालक आत येत म्हणाला, “हंसराज,” हंसराज पंख पसरून गप्प पडून होता.
    मालक त्याच्या बाजूला बसून हात फिरवत म्हणाला, “हंसराज, तूं मरत आहेस कां ? अरे देवा ! मी विसरलोच.
    आज घोड्याने तुझ्यावर पाय दिला होता !”
    आंटीला त्याचं बोलणं कळलं नाही पण मालकालाही कांही भयानक घडणार आहे, असे वाटतेंय, हे तिला समजले.
    ती मालकाकडे पाहून भूंकू लागली.
    मालक म्हणाला, “आंटी, हंसराज मृत्यूला सामोरा जातोय.
    मृत्यू ह्या खोलींत आलाय ! आपण काय करणार ?”
    मालक उदास होऊन बाहेर गेला.
    घाबरलेली आंटी त्याच्याबरोबर बाहेर आली.
    थोड्याच वेळांत मन्याही तिथे आला.
    मालक सारखा, “काय करणार ?” म्हणत होता.
    मग त्याने एका थाळ्यात पाणी भरलं आणि हंसराजपुढे ठेवलं, “पी, हंसराज !”
    पण हंसराज पाणीही पिऊ शकत नव्हता.
    मालकाने त्याची मान वाकवून चोच थाळ्याला टेकवली.
    ती चोच तशीच तिथे राहिली.
    हंसाने पंख जास्तच पसरले.
    मालक म्हणाला, “कांहीच उपयोग नाही. हंसराज आपल्याला सोडून गेला.
    माझ्या प्रिय मित्रा, किती बेत केले होते मी !
    ह्या वसंत ऋतुंत तुला गांवी नेणार होतो गवतावर चालतांना तुझा रूबाब मला पहायचा होता. कां गेलास लवकर ?
    आता तुझ्याशिवाय मी काय करू ?”
    सकाळी येऊन माळी हंसराजला उचलून घेऊन गेला.
    आंटी खोलीतून बाहेर आली.
    कपाटाआड दडवलेला कबाबचा तुकडा तिथेच होता पण आंटीला तो खावासा वाटला नाही.
    ती सोफ्याखाली जाऊन बसली.
    एका संध्याकाळी मालक कांही ठरवून आत आला.
    तो म्हणाला, “आंटी आज तू आमच्या बरोबर चल. आता पिरॅमिडमधे हंसराजची जागा तुला घ्यायचीय.”
    मग तो स्वत:शीच बडबडू लागला.
    “आज आपलं हसं होणार. आपण कांही तयारी केली नाही.
    आपण तालमी पण नाही घेतल्या. छे !”
    तो बाहेर जाण्याचा वेश करून आला होता.
    त्याने मन्याला उचलून घेतले व तो म्हणाला, “आंटी चल.”
    आंटी उठली आणि त्यांच्यामागून जाऊ लागली.
    ते गाडीतून एका नव्याच जागी येऊन पोहोचले.
    गाडीतून उतरल्यावर समोर मोठी खोलगट बशी उलटी करून ठेवली तर दिसेल अशा आकाराचं कापडाचं घर दिसत होतं.
    त्यावर सर्व ठिकाणी दिवे होते.
    प्रवेशद्वारावर खूपच रंगीत दिवे होते आणि माणसांची गर्दीही होती.
    बरेच घोडेही दिसत होते.
    पण आंटीला कुत्रे दिसत नव्हते.
    आंटीला आणि मन्याला उचलून घेऊन मालक एका काळोख्या रस्त्याने आंत एका खोलीत गेला.
    आंटीला जातांना एक खूपच मोठी खोली दिसली.
    त्यांत माणसांची भीतीदायक गर्दी दिसत होती.
    आंटी थोडी घाबरली.
    मन्या जणू कांही बेफिकीर असल्यासारखा चेहरा करून होता.
    त्या खोलीच्या पडद्यातूनही माणसांची गर्दी थोडी थोडी जाणवत होती.
    खोलीत आल्यावर मालकाने दोघांना खाली उतरायला सांगितले.
    त्याच्या हातांतून त्यांनी खाली उडी मारली.
    त्या खोलीत एक टेबल होतं आणि एक स्टूल होतं.
    मन्या जाऊन स्टूलाखाली बसला.
    मालकाने आपला वेश बदलायला सुरूवात केली.
    प्रथम डोक्यावर एक रंगीबेरंगी उंच टोपी घातली.
    तोंडाला पांढरं कांही तरी फासलं.
    मग जाड मिशा लावल्या.
    भुवयांवर जाड भुंवया लावल्या.
    मग फुलं फुलं असलेल्या कापडाची विचित्र पँट घातली.
    ती बूटांवरून खाली येत होती.
    आंटीने अशी पँट कधीच पाहिली नव्हती.
    मग विचित्र रंगाचे साॅक्स घातले.
    वर जाकीट घातलं.
    त्यावर पाठी एक तारा होता.
    तर पुढचा भाग रंगीत होता.
    आंटीला विचित्र वाटत होते पण स्थितप्रज्ञ मन्याकडे पाहून तिला धीर वाटत होता.
    आंत येऊन एक मुलगी मालकाला म्हणाली, “आतांचा एक खेळ झाला की तुमची वेळ. तयार रहा.”
    त्यांचा मालक अस्वस्थ होता.
    आज गोंधळ होणार अशी त्याला भीती वाटत होती.
    ती मुलगी परत येऊन म्हणाली, “चला, तुमची वेळ झाली.”
    मालक उठला, “आंटी, चल.”
    असं म्हणतं त्याने मन्याला एका पेटीत घातले व ती पेटी हातांत घेतली.
    आंटीला काय चाललंय ते कळत नव्हतं.
    मालकाने तिलाही उचलली आणि पेटीत टाकली.
    मन्या तिच्या पायांखालून सुटायसाठी प्रयत्न करू लागला.
    ती पेटीच्या बाजूवर नखांनी कुरतडू लागली.
    अंधारात तिला आवाज येऊ लागले.
    मग मालकाचा मोठा आवाज आला, “नमस्कार, आम्ही आज परत आलो आहोत.”
    लोकांचा आरडाओरड ऐकू आला.
    मालक गर्दीच्यावर मोठा आवाज काढत म्हणाला, “ऐका.”
    लोक शांत झाले.
    “माझी काकी स्वर्गात गेली. जातांना ही पेटी मला देऊन गेली. पाहूया आपण पेटीत काय आहे ? बहुतेक खूप नोटा असतील. मलाही माहित नाही. उघडू ?”
    त्याने पेटीच कुलुप काढून झाकण काढताच आंटीने व मन्याने खाली उडी मारली.
    लोकांनी मोठा ओरडा केला.
    आंटी घाबरली. ती भूंकत मालकाभोवती फिरू लागली.
    मालक म्हणाला, “अरे हा तर मन्याकाका आणि ही आंटी. माझे नातलग.”
    असं म्हणत मालक जमीनीवर उपडा पडला व मन्याला आणि तिला त्याने जवळ घेतले.
    थोड्याच वेळांत आंटी त्याच्या हातून निसटून उभी राहिली.
    त्याने जवळ घेतले म्हणून झालेला आनंद गिरक्या घेऊन दाखवू लागली.
    तिला सभोंवताली चेहरे, चेहरे आणि चेहरेच दिसत होते.
    बाक असे वर वर गेले होते आणि वरपर्यंत माणसे भरली होती.
    “आंटी, आपण बसाल कां ?” आंटीला कळलं काय करायचं ते.
    ती टूणकन उडी मारून एका खुर्चीवर बसली.
    लोकांनी टाळ्या वाजवल्या, गिल्ला केला.
    मालकाच्या डोळ्यात नेहमीप्रमाणेच माया होती पण तो हंसत होता, हातवारे करत होता.
    आंटीला कळले की मालक खूष आहे.
    तीही प्रेमाने मोठ्याने भुंकली.
    मग मालक म्हणाला, “आंटी मी आणि मन्याकाका नाच करतो, तोपर्यंत तू बसून रहा.”
    मग त्या दोघांचा बँडच्या तालावर नाच सुरू झाला.
    मन्या त्यात मजा वाटत नसल्यासारखा पण शिकवल्याबरहुकुम नाचत होता.
    त्यांच्या नाचाला लोकांनी खूप दाद दिली.
    मग मालक आंटीला म्हणाला, “आंटी, आतां तू !”
    त्याने एक बाजा खिशातून काढला व तोंडाला लावून तो वाजवू लागला.
    आंटीला वाद्यवादन आवडत नसे.
    ती चुळबुळ करू लागली. भुंकू लागली.
    चारी बाजूनी त्याला लोकांनी दाद दिली.
    त्याने एक वरचा सूर लावला आणि अचानक प्रेक्षकांमधून एक मुलगा मोठ्याने ओरडला, “आंटी ? ही आंटी नाही. ही तर चमेली ! चमेली !”
    लगोलग बेवड्या कोंड्या सुताराचा आवाज आला, “ही आपली चमेलीच आहे. बबन्या ! ही चमेलीच ! चमेली !”
    एकाने शिट्टी वाजवली. व दोघांनी परत हांक मारली, “चमेली, इकडे.. इकडे ये !”
    आंटीने आवाजांच्या दिशेने पाहिलं.
    उभे राहिलेल्या दोघांचे चेहरे तिला उजेडात दिसले.
    एक कुरळ्या केसांच्या झिपऱ्यावाला बेवडा चेहरा तर दुसरा गुबगुबीत गालांचा गोल चेहरा.
    तिला ओळख पटली.
    ती धडपडत उठली, खूर्चीवरून खाली पडली, वाळूत कसंबसं तिने सांवरलं आणि पडत धडपडत त्या दोघांच्या दिशेने धांवू लागली.
    लोकांनी मोठा आवाज केला.
    पुन्हा बबन्याची हांक आली, “चमेली, चमेली.”
    चमेलीने सर्कशीतल्या गोल कठडा ओलांडला लोकांच्या गर्दीत उडी घेतली.
    सर्वांचे हात तिला पुढे पुढे जायला मदत करत होते.
    ती ते हात चाटत होती.
    चेहरे चाटत होती आणि वरच्या बाकांच्या, त्या आवाजांच्या, दिशेने जात होती.
    शेवटी गॅलरीत बबन्याच्या हातांत ती विसावली.
    अर्ध्या तासानंतर चमेली व्हार्निश आणि शिरस ह्यांचा वास येणाऱ्या माणसाच्या मागून चालत होती.
    गटारापासून लांब कसं रहायचं, हे तिला ठाऊक होतं.
    कोंड्या म्हणत होता. “किती पापी मी ! आणि चमेली तुलाही जरा अक्कल कमीच आहे.
    माणसासमोर तू म्हणजे एखाद्या मोठं कपाट बनवणाऱ्या कारागीरापुढे एक छोटी घडवंची घडवणारा सुतार.”
    बाजूने बापाची टोपी घालून बबन्या चालत होता.
    चमेलीला मागून चालतांना घामट कपड्यांतल्या त्यांच्या पाठी दिसत होत्या.
    ती त्यांच्यामागून अशी अनंत काळ चालत आली होती व तिला वाटत होतं तिच्या आयुष्यांत त्यांत एका मिनिटाचाही कधी खंड पडला नव्हता.
    तिला ती कळकट खोली, तो हंसराज, मन्या, ते चविष्ट जेवण, ती तालीम, ती सर्कस, हे सर्व आठवलं.
    पण तिला अनेकदा पडणाऱ्या स्वप्नातलं तें एक घाणेरडं भयानक स्वप्न ह्या सदरांत तिने टाकून दिलं.

    -- अरविंद खानोलकर.

    मूळ कथा - काष्टंका

    मूळ लेखक - अँटन चेकॉव्ह

  • शेअर बाजारात उडी (गोमुच्या गोष्टी – भाग २)

    पाच सहा दिवसांनी सुरेश मेहता मला शोधत आला. गोमु माझ्याबरोबरच होता. सुरेशला कसा चुकवतां येईल ह्याचा मी विचार करत होतो. त्याला न सांगता त्याच्या पाहुण्याशी व्यवहार केला होता, त्यामुळे किंचित अपराधीपण वाटत होतं. पण सुरेश सरळ आमच्याकडेच आला.

  • अल्पोपहार (संक्षिप्त रूपांतरीत कथा २४)

    मी नाट्यगृहात बसलो होतो.
    तिने मला पाहिले व बोलावून घेतले.
    मी तिला ह्यापूर्वी पाहिल्याला अनेक वर्षे झाली होती.
    तिचे नाव सुध्दा माझ्या लक्षांत नव्हते.
    तिच्या बोलावण्यावरून मध्यंतरात मी माझी जागा सोडून तिच्या बाजूला जाऊन बसलो.
    तिने उत्साहाने बोलायला सुरूवात केली, “काळ किती भराभर जातो नाही ?
    आपण प्रथम भेटलो त्याला अनेक वर्षे झाली, नाही कां ?
    तुला आठवतंय आपण प्रथम भेटलो, तेव्हां तू मला भोजनाचं निमंत्रणच दिलं होतं !”
    मला चांगलंच आठवलं.
    वीस वर्षांपूर्वीची ती गोष्ट होती.
    मी मुंबईत रहात होतो.
    मुगभाटातील एका मित्राबरोबर खोली भागीदारीने भाड्याने घेतली होती.
    जेमतेम दोन वेळचं जेवण आणि जागेचं भाडं भरण्याएवढीच माझी कमाई होती.
    तिने माझं एक पुस्तक वाचलं होतं आणि पुण्याहून मला त्यासंबंधी पत्र लिहिलं होतं.
    ती बंगाली होती पण पुण्यांत राहून तिला मराठी उत्तम येत असे.
    तिचं नांव लिली होतं.
    मी तिला धन्यवाद देणारं छानसं उत्तर पाठवलं होतं.
    मग तिच्याकडून दुसरं पत्र आलं होतं.
    ती मुंबईत येणार होती.
    ती खरं तर पालघरला जाणार होती.
    पण मला मान्य असल्यास मला भेटण्यासाठी मुंबईत थांबणार होती.
    ‘ताजमधे तिला अल्पोपहार देणं मला जमेल कां ?’ असंही तिने पुढे विचारलं होतं.
    ताज म्हटल्यावर तुम्हाला कल्पना आलीच असेल.
    परदेशी पाहुणे, मोठे सरदार, उद्योगपती, इ. लोकांचा राबता असलेल्या त्या हॉटेलात कधी पाय ठेवायचाही मी विचार केला नव्हता.
    चैन म्हणजे छत्रेंच्या हॉटेलमधे मिसळ खाणे, एवढीच माझी धांव.
    पण लिलीच्या स्तुतीने मी भाळलो होतो.
    शिवाय एखाद्या स्त्रीला नकार कसा द्यायचा ते अजून शिकलो नव्हतो.
    मी विचार केला की माझ्याकडे थोडी शिल्लक होती व नुकताच एका प्रकाशकाकडून अागाऊ रक्कम मिळाली होती.
    साधारण तीन हजार रूपये माझ्याकडे होते.
    त्यापैकी दोन हजारात ताजमधला अल्पोपहार (त्या काळच्या किंमतींनुसार) सहज होईल. राहिलेल्या हजारांत महिना कसाबसा भागवू.
    चहा पिणे महिनाभर बंद करायला लागेल, इतकंच.
    मी उत्तरादाखल तिला लिहिलं की ताजमधे तिला अल्पोपहार देणं सहज शक्य आहे.
    “आपण येत्या गुरूवारी साडेबारा वाजतां ताजमधेच भेटू.”
    आणि आम्ही भेटलो.
    ताजमधेही वेगवेगळ्या वैशिष्ट्याची वेगवेगळी रेस्टॉरंटस आहेत.
    पण सुदैवाने मी पसंत केलेलं इंडीयन रेस्टॉरंट तिने चालवून घेतलं.
    मला वाटलं होतं तितकी ती तरूण नव्हती.
    तिचं वय पस्तीशीच्या आसपास असावं.
    सारखं हंसून ती आपले दात जरा जास्तच वेळा मला दाखवत होती.
    असं निदान मला आपलं वाटलं.
    ती खूप बोलत होती पण ती माझ्याबद्दल बोलू इच्छित होती.
    त्यामुळे मी तिचा श्रोता व्हायला तयारच होतो.
    एका सुटातल्या मॅनेजरने मेनु आणून ठेवला.
    ताजमधे ऑर्डर घेणारे आणि पदार्थ आणून देणारे वेगळे होते.
    हे मी प्रथमच पाहिले.
    मी मेनुवरून नजर फिरवतांना उजवीकडच्या किंमतींवरून नजर फिरवू लागलो आणि मला धक्काच बसला.
    माझ्या कल्पनेपेक्षा त्या बऱ्याच जास्त होत्या.
    तेवढ्यात लिली म्हणाली, “मी ह्यावेळी फारसं काहीच खातं नाही.”
    मी उसन्या औदार्याने म्हणालो, “अस्सं कसं ! कांहीतरी घे.”
    “एखादाच पदार्थ घेईन मी. मी एकापेक्षा जास्त काही एकाच वेळी खात नाही.
    मला वाटतं की लोक हल्ली फारच खातात.
    असं कर, एक बोनलेस फीशची डीश सांग.”
    मी आशा करत होतो की असा पदार्थ इथे नसेलच.
    पण वेटर म्हणाला, “आहेत ना, अगदी ताजे मासे आणलेत थोड्या वेळापूर्वी.
    एका डीशमधे दोन मोठ्या तुकड्या येतील.
    फक्त तयार व्हायला थोडा वेळ लागेल.
    बाईसाहेब, तोपर्यंत वेळ घालवायला काहीं आणू कां ?
    एखादं ॲपेटायजर?”
    ती म्हणाली, “नाही, एकावेळी मी एकच पदार्थ खाते पण जर जास्तच वेळ लागणार असेल तर कोणतंही ॲपेटायजर आणा आणि तुमच्याकडे माशाची गाभोळी खायला तयार असेल तर ती आणा. ती पचायला हलकी असते.”
    माझ्या छातीत थोडी धडधड झाली.
    हे सर्व अत्यंत महागडे पदार्थ होते.
    मग मी माझ्यासाठी सगळ्यात स्वस्त पदार्थ म्हणजे बटाटे वडा पाहिला आणि सांगून टाकला.
    ती म्हणाली, “तू चूक करतोयसं. उगीचच तेलकट आणि जड पदार्थ मागवू नको.
    असलं खाणं खाल्ल्यावर काम कसं करणार ?
    मला स्वत:चं पोट असं फुगेपर्यंत खायला नाही आवडत.
    शिवाय ताजमधे बटाटेवडा काय खातोस ? दादरला काणेंकडे बटाटेवडा चांगला मिळतो.”
    तिची खाण्याबद्दलची माहिती अद्ययावत होती.
    मग कांही पिण्याचा प्रश्न आला.
    ती म्हणाली, “दुपारच्या वेळी मी नाही ‘ड्रींक’ घेत.”
    मी घाईघाईने म्हणालो, “मी ही नाही कांही घेत.”
    माझ्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत ती म्हणाली, “अपवाद म्हणून सफेद वाईन घेते कधी कधी.
    फ्रेंच वाईन असेल इथे बहुदा.
    त्या इतक्या हलक्या असतात की त्रास तर होत नाहीच पण पचनाला मदत करतात.”
    इथे तिने आपली दंतपंक्ती पुन्हा मला दाखवली.
    आता मला विचारणे भाग होते, “काय मागवू तुझ्यासाठी ?”
    आदरातिथ्याचा भाग म्हणून मी विचारले.
    आता भावना आधीच गोठल्या होत्या.
    “माझ्या डॉक्टरांनी मला शॅम्पेनशिवाय इतर मद्य घ्यायला मनाई केली आहे.” ती म्हणाली.
    माझा चेहरा थोडा पांढरा पडला पण मी अर्धी शॅम्पेन मागवली व म्हणालो, “माझ्या डाॅक्टरांनी मला शॅम्पेन प्यायला पूर्ण मनाई केली आहे.”
    तिने विचारले, “मग तू काय पिणार आहेस ?”
    मी म्हणालो, “पाणी.”
    मग तिने ॲपेटायजर संपवलं, माशांची गाभोळी खाल्ली, बोनलेस फिश खाल्लं.
    ती मजेंत साहित्य, संगीत, कला, इ. बद्दल बोलत होती.
    मी बिल किती येईल ह्याचा विचार करत होतो.
    जेव्हा माझे बटाटेवडे आले, तेव्हा तिने मला पुन्हां चांगलेच खडसावले.
    “अच्छा, म्हणजे तू जेवणाच्या वेळी अशा पचायला जड वस्तू खाऊन प्रकृती खराब करून घेतोस तर !
    ही घोडचूक आहे तुझी.
    तू माझ्यासारखं कां करत नाहीस ?
    एका वेळी एकच पदार्थ खायचा.
    तुला त्याने खूप छान वाटेल.”
    वेटर परत मेनु घेऊन आला, तेव्हां मी म्हणालो, “मी फक्त एकच पदार्थ खातो.”
    तिने वेटरला बाजूला बोलावले व मेनु घेत म्हणाली, “छे ! छे ! मी दुपारच्या जेवणावर काहीच दुसरं घेत नाही.
    फक्त एक चावा, तो सुध्दा केवळ बरोबरच्या व्यक्तीशी संवाद चालू रहावा म्हणून.
    आता मी आणखी कांही खाऊ शकत नाही फक्त जर ती शतावरी भाजीची स्पेशल डीश असेल तर चालेल कारण ती मुंबई शिवाय इतरत्र मिळत नाही.
    मुंबईत येऊन ती न खाता जाणं म्हणजे मुंबईचा अपमान होईल.”
    आता माझं काही खरं नव्हतं.
    मुंबईच्या बाजारांत दहा रूपयाला एक जुडी मिळणारी भाजी मोठ्या हॉटेलात गेली की खूपच महाग होते असं मी ऐकून होतो.
    मी वेटरला म्हणालो, “बाईसाहेबांना तुमच्याकडे शतावरीची भाजी आहे की नाही ते जाणून घ्यायचय.”
    हे वाक्य मी ‘नाही’ वर जोर देत बोललो, जेणेकरून वेटरने “नाही” म्हणावे.
    पण एखादा चमत्कार पाहून येईल तसे त्याच्या चेहऱ्यावर हास्य पसरले.
    तो म्हणाला, “बाईसाहेब, आजच ताजी ताजी लांब, कोवळी आणि छानशी पाने आली आहेत.
    तुम्ही नशीबवान आहांत.”
    ती म्हणाली, “मला बिलकुल भूक नाही पण आता तुम्ही म्हणताच तर मी खाईन थोडीशी ! तूही घेणार ना !”
    मी म्हणालो, “नाही. मी असली पालेभाजी कधीच खात नाही.”
    ह्यावर ती म्हणाली, “मला माहित आहे की कांही जणांना पालेभाज्या आवडत नाहीत पण असे लोक कितीतरी पाचक आणि सत्त्वयुक्त अन्नाला मुकतात.”
    आम्ही पालेभाजी शिजण्याची वाट पहात होतो.
    मी भीतीने सर्द झालो होतो.
    माझं आजचं बजेट तर केव्हाच कोलमडलं होतं पण आता महिनाभर फांके मारायला लागणार, हे नक्की झालं होतं.
    निदान माझ्या खिशातले तीन हजार रूपये आताच बिल द्यायला तरी पुरे पडणार की नाही ही शंकाच होती.
    जर बिल भरताना पाच पन्नास कमी पडले तर हा विचार भयानक होता.
    माझ्या पाहुणीकडेच मला पैसे मागावे लागले असते.
    मला ते आवडले नसते.
    मी ठरवले की बिल जर खिशातल्या पैशांपेक्षा जास्त आले तर खिशात हात घालायचा आणि मोठ्याने नाटकी ओरडायचे, “माझे पाकीट मारले कोणीतरी!” मग तिलाच बिल भरायला सांगायचे.
    तिच्याकडेही पैसे नसले तर मग माझे घड्याळ आणि चेन तिथे गहाण ठेवायची आणि मग पैसे आणून देऊन वस्तू परत घ्यायच्या.
    तिच्यासाठी शतावरीची अमूल बटरमधे केलेली गरम गरम भाजी आली.
    लांब कोवळी पाने छान सजवलेली होती.
    ती निर्लज्ज बाई अगदी आरामात ते खाऊ लागली.
    वाफाळलेल्या भाजीतील तो अमूल बटरचा वास माझ्या नाकांत शिरत होता.
    शेवटी तिची भाजी संपली.
    “कॉफी ?” मी विचारले.
    ती शांतपणे म्हणाली, “हो, आईस्क्रीम आणि कॉफी.”
    आता मी बिलाची काळजी करणे सोडले होते.
    मी माझ्यासाठी कॉफी आणि तिच्यासाठी कॉफी आणि आईस्क्रीम मागवले.
    आईस्क्रीम खाता खाता ती म्हणाली, “तुला ठाऊक आहे, मी नेहमी ह्या वाक्यावर विश्वास ठेवते की जेवणावरून उठतांना तुमची थोडी भूक शिल्लक पाहिजे. आणखी थोडं खाता आलं असतं हा विचार मनांत ठेऊन पानावरुन उठावं, असं म्हणतात.”
    मी तिला घाबरत विचारले, “अजून भूक आहे तुला ?”
    ती म्हणाली, “नाही, नाही. मी तर बाई लंचच्या वेळी फारसं खातच नाही.
    मी सकाळी कॉफी घेते आणि नंतर डीनरनंतर घेते पण लंचच्या वेळी एकच पदार्थ खाते.
    मी तुझ्यासाठी ते सांगत होते.”
    मी म्हणालो, “अच्छा ! माझ्यासाठी होय.”
    कॉफी आणि आईस्क्रीमचा समाचार घेऊन झाला न झाला, एवढ्यांत एक माझ्या दृष्टीने भयानक गोष्ट घडली.
    एक ताजची टोपी घातलेला मुलगा एक फळांची टोपली घेऊन आमच्याच टेबलाजवळ आला. त्यांत रसाळ पीच फळे होती.
    ती फार महाग असतात.
    युरोपहून इथे येतात.
    पण हा तर त्या फळांचा सीझनही नव्हता. ,म्हणजे ती खूपच महाग असणार.
    ती मला म्हणाली, “हे बघ, तू वडे खाऊन पोट भरून टाकलयस.
    तेव्हा तुला कांही आता खाता येणार नाही पण मी फक्त एकच पदार्थ खाल्ल्यामुळे मी ह्या एका फळाची चव घेणार आहे.”
    तिने एक फळ उचललं व खायला सुरूवात केली.
    बिल आलं आणि मी पैसे भरले तेव्हा माझ्या लक्षांत आलं की पुरेशी टीप द्यायलाही माझ्याकडे पैसे नाहीत.
    मी उरलेले केवळ तीस रूपये टीप म्हणून ठेवले व आम्ही उठलो.
    तिच्याकडे मी पाहिलं तर तिची हांवरी नजर त्या डीशमधल्या तीस रूपयांवर खिळलेली मला दिसली.
    मी मनांत विचार करत होतो की खिशात दमडी नसतांना संपूर्ण महिना कसा काढायचा ?
    बाहेर पडून निरोप घेताना ती म्हणाली, “माझं उदाहरण डोळ्यांसमोर ठेव. फक्त एकच पदार्थ दुपारी लंचच्या वेळी खा.”
    मी म्हणालो, “मी त्याहीपेक्षा अधिक काही करीन. आज रात्री जेवणारच नाही.”
    ती टॅक्सीत बसतां बसतां म्हणाली, “विनोदी आहेस तू ! खरंच ! भीषण विनोदी. बाय.”
    त्यावेळी मला राग आला पण मी कांहीच करू शकत नव्हतो.
    तिने माझा सहज बकरा बनवला होता. ताज हे कांही तिचे नेहमीचे स्वतःच्या पैशांनी जायचे ठिकाण नव्हते.
    स्त्री दाक्षिण्य, मैत्री, लेखक म्हणून मला दिलेला भाव ह्या सर्वांमुळे मी माझी अक्कल गहाण टाकून माझी दोन तीन महिन्यांची कमाई तेव्हा खर्च करून बसलो होतो.
    त्यानंतर मी तो महिना उधारी करून, उपास करून कसाबसा काढला होता.
    पण आज लिलीकडे पहातांना मला थोडंसं समाधान वाटतंय कारण अल्पोपहाराला एकच पदार्थ खाणाऱ्या, तेव्हांची जेमतेम एकूणपन्नास- पन्नास किलो वजन असलेल्या लिलीचा, तिच्या खादाड आणि फुकटखाऊ वृत्तीमुळे, आता चांगला १३२ किलोंचा मोठा गोल गरगरीत भोपळा झालेला मला समोर दिसत होता.
    -- अरविंद खानोलकर.
    मूळ कथा - द लंचॉन
    मूळ लेखक - डब्ल्यू सॉमरसेट मॉम(१८७४ - १९६५)
    तळटीपः मॉमचीच आणखी एक छोटी आणि हलकी फुलकी गोष्ट सादर केली आहे. परंतु त्यावरून मॉम ह्या लेखकाविषयी गैरसमज करून घेऊ नये. त्याच्या कादंबऱ्या व कथांवर एकूण ४६ चित्रपट आले व त्याला ग्रँड मॅन ऑफ ओल्ड लेटर्स असं म्हटलं जातं.
  • लेखणी (कथा)

    आता तो मुलगा – अर्थात मी – विजय जाधव एक नवोदित लेखक म्हणून उदयाला आलोय. समाजात एक घमेंडी, अकडू, आणि पाषाण  हृदयी तरूण म्हणून वावरतोय. आज लोक माझ्याकडे काम घेऊन यायला धजावतात कारण ती करायला माझ्याकडे वेळ नाही आणि ती करणं माझ्या प्रतिष्ठेला  शोभतही नाही.

  • शाळेचा पहिला दिवस

    शाळेचा पहिला दिवस व्हता.मी चौथीतून पाचवीत गेलो .बापानं कशीतरी पदरमोडं करून वह्या पुस्तकं आणले व्हते. या सालापासून मव्हा भाऊबी शाळंत येणारं होता. मनून मंग बाच्या सांगण्यावरूनं मी त्यालं घेऊन शाळतं निघालो.