(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • मोठ्यांचा खेळ होतो, आमचा जीव जातो

    वाशीम जिल्ह्यातील सवड या गावात मोठी दुर्घटना घडली. १९ सप्टेंबर २०१६ रोजी पहाटे वॉकिंगला जाणाऱ्या तीन मुलांना एका अज्ञात कारने चिरडले. काहीही चूक नसताना बिचाऱ्या तिघांना आपला जीव गमवावा लागला.
    रिसोड जवळील सवड येथील अंकित गौतम जाधव वय १४ वर्षे, वैभव विश्वनाथ वाकळे वय १५ वर्षे, करण लक्ष्मण खांदळे वय १३ वर्षे हे तिघे मित्र आज पहाटे ५:३० वाजताचे दरम्यान मॉर्निंग वॉकसाठी आल्यावर वाशीम-रिसोड रस्त्याच्या कडेला व्यायाम करत असतांना वाशीमवरून सुसाट वेगाने आलेल्या अज्ञात कारने या तिघांनाही चिरडले कार त्याच वेगात पसार झाली. कार ने चिरडल्याने घटनास्थळीच तिघांचाही मृत्यू झाला. जी सुसाट कार आली ती बहुतेक इनोव्हा असण्याची शक्यता मॉर्निंग वॉकला आलेल्यांनी व्यक्त केली. तिन मित्रांच्या आकस्मिक मृत्यूने सवड गांवावर शोककळा पसरली. अंकित जाधव हा रिसोडच्या शिवाजी हायस्कूलच्या इयत्ता आठवीत तर वैभव वाकळे हा इयत्ता नववी मध्ये शिकत होता. करण खांदळे हा सवडच्या सिद्धेश्वर विद्यालयात सातव्या वर्गात शिक्षण घेत होता. मृतक तिघेही एकमेकांचे नातेवाईक असून त्यांची चांगली मैत्रीही होती. या तिघांपैकी वैभव वाकळे पहिल्यांदाच मॉर्निंग वॉकला गेला काळाने त्यावर घाला घातल्याचे त्याचा मोठा भाऊ साश्रुपूर्ण नयनांनी सांगत होता. दुर्घटनेनंतर तिघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणले होते. तिथे शेकडो शोकमग्न नातेवाईक,मित्र गोळा झाले होते. १३- १४ वर्षे वयोगटातील त्या निरागस मुलांचे फोटो पाहिले तर मन सुन्न होते.

    या घटनेवरून पुन्हा एकदा आठवण झाली. सलमानखाननेही मुंबईत असेच लोकांना चिरडले होते. त्यावर शहाणा गायक अभिजित याने तर हद्द ओलांडली. तो म्हणाला की, रस्त्यावर झोपणाऱ्यांचा मृत्यू कुत्र्यासारखाच होतो. काय म्हणाल अशा निर्लज्ज लोकांना. यातून समाजात वाढत चाललेली श्रीमंतांची मग्रुरीच दिसून येते. कारमधून सुसाट जाणारे श्रीमंत हे रस्त्याने पायदळ जाणाऱ्यांना किडे माकोडे समजतात की काय असा प्रश्न पडतो. यांच्याकडे पैसे असतात, गाड्या घेतात, सुसाट आणि बेदरकारपणे चालवून निष्पाप लोकांचे जीव घेतात. वाशीम जिल्ह्यातील या तीन बालकांचे जीव गेले. तो भामटा चालक आपली कार दामटत पळून गेला. आई-वडिल तर आपले लाडके गमवून बसले. अशांना कोणत्याही प्रकारची शिक्षा होत नाही. हे आपले दुर्भाग्य. म्हणून अशा लोकांची मस्ती वाढत चाललेली आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी जर रस्त्याने पायदळ जाणाऱ्यांनीही असेच पाऊल उचलले तर काय होईल. त्यांचेही काही होणार नाही. पण अनेक निष्पाप लोकांचे प्राण तर वाचतील. आता सुसाट आणि बेदरकारपणे दुचाकी, चारचाकी वाहन चालवणाऱ्यांची मस्ती जिरवण्यासाठी पायदळ चालणाऱ्यांनीही कायदा हातात घेऊन त्यांच्यावर दगड भिरकावले. तर त्यात गैर काय असे सामान्य माणसाला का वाटू नये.

    अपघातांचे हे प्रकार असेच जर सुरू राहिले तर चालकांना दगडधोंडे खाण्याचे दिवस दूर नाहीत. एवढे मात्र लक्षात ठेवावे. आपला जीव लाखमोलाचा वाटतो. तसाच दुसऱ्यांचा जीव समजून वाहन चालवले तर बिघडते कुठे. पण घाई वेळेची, मस्ती पैशाची, मौज वेळेची करत अनेकांना प्राण गमवावा लागतो. मोठ्यांचा खेळ होतो, अन गरीबांचा जीव जातो. असेच म्हणावे लागेल.

    जनार्दन गव्हाळे,
    खामगाव, जि. बुलढाणा. विदर्भ

  • विक्लांत अहिर भैरव

    “मेरी सुरत तेरी आंखे” या चित्रपटात, मन्ना डे यांनी गायलेले, “पुछो ना कैसे मैने रैन बितायी” हे गाणे ऐकले आणि बघितले, तेंव्हापासून माझ्या मनावर या गाण्याचा थोडा प्रभाव आहे. या गाण्यात, आपल्याला, सुरवातीपासून “अहिर भैरव” ऐकायला मिळतो आणि अशा असामान्य गायकीतून आपण या रागाचा आनंद घेऊ शकतो. हिंदी गाण्यात प्रसिद्ध असलेल्या, केरवा तालात हे गाणे बांधले आहे.

  • मानसोपचार तज्ज्ञांची भेट ! ( बेवड्याची डायरी -भाग २३ वा )

    आज मानसोपचार तज्ञांच्या भेटीचा वार होता ..या आठवड्यात नवीन दाखल झालेल्या सर्वांना माँनीटरने …सकाळी प्रार्थनेच्या वेळी त्यांना आज मानसोपचार तज्ञांना भेटायचे आहे हे सांगितले होते ..त्यावर एकदोन जणांनी सरळ सरळ नकार दिला होता ..त्यांना माँनिटरने वारंवार दारू अन्य मादक पदार्थांच्या सेवनाने मेंदूवर कसे दुष्परिणाम होऊन ..मानवी विचार ..भावना ..वर्तन यात कसा नकारात्मक बदल होतो हे समजून सांगितल्यावर ते तयार झाले

  • सोबत

    आजकाल कुणाशीही बोलावसं वाटत नाही. खूप खूप कंटाळा येतो. सगळीकडे मुखवटे चढवलेले चेहरे. ज्याची पाठ फिरेल त्याची निंदा करणारे. ह्यांची मानसिकता इतकी चीप असते ना की नको वाटतं …

    इतकं खोटं कसं काय ते वागू शकतात? ह्यात आपले लोक पण असतात हे विशेष!

    ज्यांच्यासाठी तुम्ही कितीतरी वेळेला एडजस्टमेंट केलेली असते ते देखील एका नकाराने बदललेले बघितले आणि वाटलं, ‘आपण एकटे असतो तेच बरं असतं.’

    ह्यांच्यापेक्षा पुस्तकांमध्ये आणि छंदामध्ये रमावं, मन प्रसन्न राहतं आणि नकारात्मक गोष्टींपासून तुम्ही स्वाभाविकपणे दूर जाता…

    कधीतरी अशी वेळ येते की तुम्हाला माणसांचाच कंटाळा येऊ लागतो. त्यांना सांभाळून घेताना तुमची प्रचंड दमछाक होते.

    प्रत्येकाचे मूड्स संभाळण, त्यांच्या मनाप्रमाणे वागणं ह्या सगळ्यात आपण पार दमून जातो. सतत दुसऱ्यांचा विचार करताना आपल्याला “स्वतःला काय हवं आहे” हा प्रश्न कधी मागे राहतो हे काळतच नाहि. आपण इतकं सगळं करूनही आपल्याला प्रेमाचे दोन शब्द, नात्यात हवा असलेला आदर, विश्वास, आपुलकी मिळते असंही नाही.

    मग अशा वेळी प्रश्न पडतो “हे सगळं कशासाठी?”

    खूप विचार केला की ह्या प्रश्नाचे एक उत्तर असं मिळतं ते म्हणजे – “आपण एकटेपणाला घाबरतो.”

    सुरक्षतेसाठी कळपात राहिलं पाहिजे हि एक चुकीची मानसिकता आपल्यात रुजलेली असते. एकटे पडू या भीतीमुळे अनेकदा आपण चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करतो. मनात नसूनही अनेक गोष्टी स्वीकारत जातो. मोठे होतो पण “सोबत”, “मैत्री” ह्या गोष्टींचे आणि नात्यांचे खरे अर्थ विसरतो.

    लोकांनी शरीराने आपल्या सोबत असण्याला “सोबत” असं गोंडस नाव देतो. आपणही तसेच खोटे वागत जातो, पण एक क्षण असा येतो जेव्हा हा माणसांचा गोतावळा नकोस होतो.

    मोजकीच पण चांगली माणसं हवीत असं वाटू लागतं. ह्या मुखवट्या मागचे चेहरे भेसूर वाटू लागतात आणि आपण पुन्हा स्वतःकडे वळतो. जाणीवेचा एकच क्षण असतो आणि तो आपल्या हातून कधीच निसटू द्यायचा नसतो.

    ‘मी उत्तम तेच करीन आणि चांगल्या लोकांच्या सोबतीतच राहीन’ असा मनाशी निश्चय केला की आपली निवड बदलत जाते आणि पर्यायाने आयुष्यही बदलतं. मोजकीच पण प्रेमळ, आपल्याशी प्रामाणिक भावनेने जोडलेली, वेळ प्रसंगी हितासाठी थोडीशी रागावणारी माणसं म्हणजे खरी –

    “सोबत…!”

    माणसांच्या गर्दीत चालताना आपला दीपस्तंभ कुणाला मानायचं हे आपणच ठरवायच

    -- सुमंत आचार्य

  • फवारे हास्याचे – (4)

    साहित्याचा चोर मी
    तरि साहित्यिक थोर मी
    थोर वाङ्मयचौर्याविरुद्ध नेहमी
    पण लढतो घनघोर मी ।।

    -सुभाष स.नाईक

  • अमुल्य वेळेची किंमत

    कसय....
    आपण ज्या वेळेस समोरच्या व्यक्तीनी सांगितलेल्या वेळापेक्षा पाचच मिनिटे ऊशिरा पोहचलोना.....
    लगेचच बरळतील.,,
    "आपल्या भारतीयांना अमुल्य वेळेची खरच किंमत नाही....
    नाहीतर भारत केव्हाच पुढे गेला असता....."
    आणि जर आपण वेळेपुर्वीच पाच मिनिटे पोहचुन सुध्दा जर या महाशयांना ऊशिर झाला ना...
    मग हळुच निर्लज्जपणे म्हणतात......
    "चालतय हो..... दहा-पंधरा मिनिटे ऊशिर होणारच...
    आपण घाई केल्यास देश पुढे जाणार आहे का?"..
    असतात अशीही लोक.....
    घ्या सांभाळुन ......

    विवेक जोशी...

  • हे सुर्वे नारायणा…..(श्रद्धांजली)

    तु वारसदार सूर्यकुलाचा

    ज्यांना थांबणे माहित नाही……………

  • ‘तमासगीर’ पु. लं. – स्वरतीर्थ

    एकदा एका लावणीच्या कार्यक्रमाला पु. ल. देशपांडे यांनी हजेरी लावली होती. कार्यक्रम संपल्या नंतर सभागृहात लावणी कलावंताने पुलंना म्हटलं...

    ‘‘तुम्ही बी तमासगीर हायसा नव्हं!’’

    तेव्हा पुलं उत्तरले, ‘एखाद्या कलाकाराने छानसं गायन केलं किंवा अभिनेत्याने नाटक सादर केलं किंवा नतर्कीने नृत्य साकारले, वादकाने सुमधुर वाद्य झंकारले तर त्याला परफॉर्मन्स आर्टिस्ट म्हटल जात, तर त्याच ताकदीने लावणी सादर करणाऱ्या कलावंताना तमासगीर म्हटल जातं.’

    खरोखरच आपल्या प्रतिभासंपन्न शब्दसंचाराने गदिमांच्या लेखणीतून प्रत्यक्षात शारदेचं वरदान उमटलं, तर बाबुजींच्या स्वरझंकारातून सरस्वतीच्या सुरेल सुरांचे सप्तक झळाळले आणि पुलंच्या लेखणीतून श्रीविष्णूंचं संगीतमय शब्दलालित्य दृगोचर झालं. या गदिमा, बाबुजी आणि पुलंच्या प्रतिभात्रिवेणीतून जन्माला आलेलं मराठी कलासाहित्य अभिजात आहे आणि कलाकार तमासगीरच आहेत. कारण तमाशा म्हणजे काय...

    ‘तमापासून आशेपर्यंत रंगत जाणारा खेळ म्हणजे तमाशा!’’

    तम म्हणजे अंधारापासून आशेच्या प्रकाशापर्यंत जाण्याचा मार्ग तो तमाशा. हा खेळ मग कोणी निखळ आनंद देणाऱ्या गीतलेखणाद्वारे तर कुणी सकस अभिनयाद्वारे तर आणखी कुणी मनोहारी नृत्याद्वारे साकार करताना स्वत:सह जनसागराला असीम आनंदात डुंबवतो, तो कलावंत तमापासून आशा-अपेक्षांपर्यंत रंगत जाणारा खेळ सादर करतो, तो ख़ऱ्या अर्थाने तमासगीरच म्हणावयास हवा आणि त्या सादरीकरणास तमाशा म्हणावयास हवं.

    निवेदिका अनघा मोडक बोलत होत्या. कोमल मृदु वाणीने चोखंदळ रसिक प्रेक्षक तल्लीन होत होते. त्यांनी अभ्यासू प्रतिभेतून निवेदनाची अलितीय पण समयोचित मांडणी करीत, नवनवीन गोष्टींनी अवघ्या सभागृहाच्या मनावर राज्य केल. याच तल्लीनतेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेला तो स्वरभास्कर नचिकेत देसाई यांनी प्रस्तुत केलेला ‘कानडा राजा पंढरीचा’ हा गदिमा, बाबुजींचा अभंग. विठ्ठलनामाच्या गजराने भक्तिरसात चिंब न्हालेल्या श्रोत्यांनी मग ताल धरला तो नचिकेतच्या सुरेल गळ्यातील पल्लेदार तानेवर आणि नजाकतीने गायलेल्या हरकतीवर.

    हा होता क्लायमॅक्स !

    सुरेल गळ्याच्या गायिका सोनाली कर्णिक, दीप्ती रेगे, सानिया पंडित यांनी स्वरसाज चढविला तर संगीत संयोजक प्रशांत लळीत, व्यवस्थापक आणि तबला स्वप्निल पंडित, तसेच प्रसन्न पंडित आॅक्टोपॅडवर मोहिते तर तालवाद्यांवर माळी यांनी उत्तम साथ दिल्यामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. या स्वरांजलीची तरल स्पंदने आसमंत व्यापून गेली.

    खरंतर, हाऊसफुल्ल श्रोतृगण आणि मी सलग सव्वातीन तास एकदा खुर्चीवर जे बसलो तो कार्यक्रम संपेपर्यंत... या अप्रतिम मंत्रमुग्ध करणाऱ्या अदाकारीने

    एवढा प्रभावित झालो की अगदी ब्रह्मानंद मिळाला... ब्रह्मानंद मिळाला... दुसरे शब्दच नाहीत!

    यशवंतराव प्रतिष्ठान नवी मुंबई आणि साहित्य मंदिराच्या संयुक्त विद्यमाने साहित्य मंदिर, वाशी, नवी मुंबई येथे साकारलेला स्वरतीर्थ हा संगीतमय नजराना म्हणजे लाखमोलाची संधी आम्हाला विनामूल्य प्राप्त झाली त्याबद्दल आयोजकांचे मन:पूर्वक धन्यवाद!

    लेखक : घनश्याम परकाळे

    श्री घनश्याम परकाळे यांच्या कॉमन मॅन या ललित लेखन संग्रह इ-पुस्तकातील हा लेख.
    हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
    https://marathibooks.com/books/common-man-by-ghanashyam-parkale/

    किंमत : रु.१५०/
    सवलत किंमत : रु.७५/

  • टर्की.. संताप ! (नशायात्रा – भाग ३०)

    तर आम्ही एकूण चार पाच जणांनी पहाटे बसने जाण्याऐवजी आदल्या दिवशी रात्रीच सटाण्याला जायचे ठरवले होते व त्यानुसार आम्ही तयारी करून गांजा , ब्राऊन शुगर असा पैसे असतील तेव्हढा साठा सोबत घेऊन नाशिक ला सी .बी .एस च्या स्थानकावर जमलो होतो..

  • नितळ चंद्रकौंस

    आपल्या रागदारी संगीताचा जेंव्हा साकल्याने विचार करायला लागतो, तेंव्हा प्रत्येकवेळी मला कुसुमाग्रजांची कविता आठवते आणि आपला विचार किती "थिटा" आहे, याची नव्याने जाणीव होते. "मुक्तायन" काव्यसंग्रहात, "मी" या कवितेतील काही ओळी या वाक्यावर थोडा प्रकाश पाडू शकतील, असे वाटते. त्या ओळीत मी थोडा बदल केला आहे!!
    "माणूस आपल्यापर्यंत पोहोचतो तो संबंधामधून, पण त्या संबंधाच्या तुकड्याहून तो केव्हढातरी अफाट प्रचंड असतो;
    खिडकीच्या काचेतून चंद्र किरणांचा कवडसा आपल्या खोलीत पडतो,
    पण कवडसाच, चंद्र नव्हे;
    हजारो कवडसे पडले तरी, आकाशातील ती शीतल घटना;
    अनोळखीच राहते आपल्या जाणिवांना."
    रागसंगीताबाबत संपूर्ण विचार जरी थोडा बाजूला ठेवला तरी, काही रागांबाबत देखील आपण, एकच एक भावना व्यक्त करणे निरातिशय जिकीरीचे आणि चुकीचे देखील ठरू शकते. इतक्या अनंत भावनांच्या छटा, त्या रागांतून, आपल्याला वेगवेगळ्या कारणाने जाणवत राहतात. काहीवेळा, काही प्रतिभावंत कलाकार त्यात, प्रत्येकवेळी स्वत:चा असा वेगळा विचार मांडून, त्या रागाची वेगळीच ओळख आपल्याला करून देतात आणि आपण मात्र, त्या रागाच्या दर्शनाने, अचंबित होतो.
    चंद्रकौंस रागाबाबत माझी अशीच थोडी भावना आहे. खरे सांगायचे तर केवळ हाच राग कशाला, प्रत्येक रागाबाबत मला असेच वाटत आले आहे. आपण रागाला एका कुठल्यातरी भावनेचा रंग देतो आणि त्या चित्रात त्याला "बंदिस्त" करतो पण प्रत्यक्षात तो राग, आपल्याला प्रत्येक क्षणी वेगवेगळ्या रंगाने मोहवून टाकत असतो. इथे या रागाला "नितळ" म्हणताना, माझी अवस्था अशी किंचित द्विधा झाली आहे.
    "अनंत शिखरे निळी शिशिरमुग्ध संध्येतली,
    मधून जडली तिला जलतरंग मेघावली;
    तुझे बहरगीत की मयुरपंखसे आरसे,
    अरण्यभर सांडला मधुर अस्त माझा दिसे".
    कवी ग्रेस, यांच्या ओळी बहुदा माझा विचार स्पष्ट करतील.
    आता थोडे तांत्रिक भागाकडे वळायचे झाल्यास, या रागाची ओळख - "औडव-औडव" अशी करता येते. "रिषभ" आणि "पंचम" स्वरांना या रागात स्थान नाही. "गंधार" आणि "धैवत" हे कोमल स्वर तर बाकीचे तीनही स्वर शुद्ध. रागच समय, रात्रीचे पहिला प्रहर असा दिला आहे आणि त्यातूनच माझ्या मनात "नितळ" ही कल्पना आली. उत्तरांग प्रधान राग आहे आणि प्रमुख स्वर संहती बघायला गेल्यास, "सा ग म ग सा नि नि सा"; " ग म ध नि सा" अशी ऐकायला मिळते.
    किंचित अनुनासिक स्वर, अतिशय धारदार आवाज, लांब पल्ल्याचा गळा, पंजाबी धाटणीची गायकी आणि स्वरांवर "काबू" ठेवण्याची वृत्ती तसेच गाताना, अचानक "अकल्पित" स्वरस्थानांवर स्थिरावून, रसिकांना "धक्का" देण्याची आवड!! पंडित वसंतराव देशपांडे, यांच्या गायकीबद्दल असे काहीसे ढोबळ वर्णन करता येईल. वसंतराव "आलापी" गायनात फारसे रंगत नाहीत, असा एक "आरोप" त्यांच्याबाबतीत केला जातो परंतु जर का त्यांची "गायकी" जरा बारकाईने ऐकली तर त्यात फारसे तथ्य नाही, हेच आपल्याला कळून घेता येईल. खरी गोम अशी आहे, बहुतेकांना गायनात "चमत्कृती" आकर्षित करीत असते आणि तेच गायकीचे वैभव, असला चुकीचा समज करून घेतला जातो. याचाच परिणाम असा होतो, रसिकांना गायनातील "सरगम" या अलंकाराचे अतोनात असलेले आकर्षण!! वास्तविक, "सरगम" म्हणजे येऊ घातलेल्या तानेचा किंवा आधीच घेतलेल्या तानेचा किंवा आलापीचा "आराखडा" असतो परंतु या बाबीकडे दुर्लक्ष होते. वसंतरावांच्या बाबतीत, बरेचवेळा असेच घडत आले आहे.
    "येरी माई गुनिजन" या रचनेतील सुरवातीला आलेली आलापी आणि ठाय लयीतील बंदिश ऐकताना, काही बाबी अवश्यमेव ध्यानात येतात. एखादी हरकत घेऊन किंवा तान घेऊन, परत समेवर येताना, स्वरांवर "किंचित" आघात देऊन ठेहराव घेणे किंवा मध्येच एखादी खंडित तान घेताना, स्वरांना जोरकस "धक्का" द्यायचा!! कदाचित, यामुळेच बहुदा, हा गायक, आलापीमध्ये रमत नाही, असा प्रवाद पसरला असावा. स्वच्छ, मोकळा आवाज, तिन्ही सप्तकात विनासायास "विहार" करण्याची अचाट क्षमता आणि प्रयोगशील गायकी, ताना घेताना, अफाट बुद्धीगम्यतेचा परिचय करून देणारी गायकी आहे. ठाय लयीतील हरकतींचा आस्वाद घेताना, याचा आपल्याला प्रत्यय घेता येतो. गायन ऐकताना, काही ठिकाणी, "किराणा" घराण्याची छाप जाणवते. या रचनेत, बराच वेळ सरगम घेतली आहे आणि ती ऐकताना, "धैवत" स्वरावर जो "ठेहराव" घेतला आहे, तो खास ऐकण्यासारखा आहे. मी मुद्दामून ही रचना निवडली कारण ही रचना बहुतांशी "ठाय" आणि "मध्य"लयीतच सादर केली आहे.
    वास्तववादी चित्रपट निर्मितीत ज्याचा उद्भव होतो, त्या संगीतावरच भर असलेले संगीतकार म्हणून वसंत देसाई, यांचे नाव घ्यावे लागेल. हिंदी, मराठी चित्रपट तसेच मराठी नाटक, या सगळ्या माध्यमात, सहज वावर करणारे अभ्यासू व्यक्तिमत्व, असे देसायांबद्दल ठाम विधान करता येईल. याचा थोडा परिणाम असा झाला, त्याच्या रचनांत, कुठेतरी नाट्यसंगीताचा गंध राहिला, असे जाणवते. या शिवाय असेही जाणवते, पारंपारिक सांगीत चलने आणि चाली यांच्या अंगभूत सांगीत आकर्षणशक्तीवर विश्वास असल्याकारणाने त्या जागा, जशाच्या तशा व परिणामकारकतेने वापरण्यात त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. हिंदुस्थानी कलासंगीताचा आपण यथातथ्य वापर करतो असा मराठी नाट्यसंगीत परंपरेचा दावा बऱ्याच अंशी सार्थ असतो, ध्यानात घेणे जरुरीचे आहे. या परंपरेचा आणि वसंत देसाई यांचा देखील, कलासंगीतास पातळ करून वापरण्यावर भर नव्हता. आणखी एक विशेष मांडता येईल. ज्या व्ही. शांताराम यांच्याशी आणि त्यांच्या चित्रपट निर्मितीशी आयुष्यभर जवळचे संबंध असून देखील, जेंव्हा त्यांनी बाहेरचे चित्रपट निवडले, तिथे मात्र त्यांच्या शैलीचे वेगळे आणि अधिक विलोभनीय दर्शन घडते.
    "सन सनन सनन सनन, जा रे ओ पवन" हे गाणे "संपूर्ण रामायण" चित्रपटातील गाणे "चंद्रकौंस" रागाची आठवण करून देते. चंद्रकौंस रागाच्या सावलीत बांधलेले गाणे असून, चित्रपट गीतांत प्रसिद्ध असलेल्या "दादरा" तालात बांधलेले आहे.
    "सन सनन सनन सनन, जा रे ओ पवन;
    दूर देस लेजा संदेस जहां मेरा सजन;
    जा रे ओ पवन."
    "संपूर्ण रामायण" सारख्या धार्मिक चित्रपट असल्याने, चालीची रचना आणि वाद्यमेळ, यात पारंपरिकता येणे क्रमप्राप्तच ठरते तरी देखील, चालीचा जरा बारकाईने विचार केला तर लगेच आपल्याला कळेल, चालीचा ढंग "गायकी" अंगाकडे झुकलेला आहे आणि रचनेत विस्ताराच्या भरपूर शक्यता आहेत. अर्थात, गायला लताबाई असल्याने, मुळातला सांगीतिक मजकूर, तितक्याच सक्षमतेने सादर केला जातो. गाण्यातील "पॉजेस" तसेच अचानक वरच्या सप्तकात चाल जाणे, ही तर या गाण्याची वैशिष्ट्ये आहेत परंतु त्याचबरोबर, गाताना, बरेचवेळा शब्द तोडून गाण्यावर भर दिला जातो आणि याचे कारण, लयीच्या बंधनात, न बसणारी शब्दरचना. वसंत देसायांच्या रचनेत, शब्दांचे "औचित्य" या बाबतीत नेमकेपणाने सांभाळलेले दिसते.
    संगीतकार म्हणून जरी पु.ल.देशपांडे यांची कारकीर्द दीर्घकालीन नसली तरी त्यांनी आपल्या काळात, अनेक असामान्य रचना तयार करून, त्यांनी आपल्यातील "कलाकारा"चे अंग अप्रतिमरीत्या दाखवून दिले आहे. बऱ्याचशा रचना तशा सहज, कुणालाही भुरळ पडतील अशा आणि गुणगुणता येतील अशा पातळीवर वावरतात. चित्रपटातील गाणी, खासगी भावगीते या प्रांतात या संगीतकाराचा प्रामुख्याने वावर राहिला. रचनाकार म्हणून जरी फार प्रयोगशील नसले तरी देखील,रचना "प्रासादिक" तसेच "रसाळ" म्हणता येतील. त्यांच्या रचनांवर काही प्रमाणात "बालगंधर्व" गायकीचा असर होता, हे स्पष्टपणे जाणवते. "हसले मनी चांदणे" हे मराठीतील प्रसिद्ध भावगीत, चंद्रकौंस रागावर आधारित आहे.
    "हसले मनी चांदणे,
    जपुनी टाक पाउलं साजणी नादतील पैंजणे".
    काहीशी पंजाबी धाटणीची पण तरीही मराठी नाट्यसंगीताचा "असर" दर्शविणारी रचना आहे. माणिक वर्मा यांचा किंचित अनुनासिक स्वर, लडिवाळ गायकी आणि कवितेचा आशय ध्यानात घेता, रचनेची चाल फारच सुंदर आहे. किराणा घराण्याची पूर्वपिठीका असल्याने, गाण्यात एकूणच "उदारता" हा विशेष जाणवतो. पंजाब अंगाची फिरत पण मादकपणाशिवाय, नखरा पण अगदी लखनवी घराण्याचा नाही तसेच बनारसी ठुमरीच्या जवळ जाणाऱ्या प्रसरणशील चालींची भावगीते, हा खास आविष्कार. मुखडा जरी खालच्या अंगाने येणारा असला तरी पहिली लकेर सफाईने खालून वर जाणार आणि अनेकदा पंजाबी वक्र वळणे घेत खाली येणार. भावपट मोठा नाही परंतु संदिग्ध गोडवा, हा स्थायीभाव. यामुळे, माणिक वर्मांची भावगीते महाराष्ट्रात प्रचंड गाजली. ताला शिवाय केलेली आलापी किंवा तालासाहित केलेली आलापी किंवा घेतलेल्या हरकती ऐकताना, इतर भावगीत गायिका आणि माणिक वर्मा यांची गायकी, यात फरक कळून येतो. याचा वेगळा अर्थ असा लावता येईल, मराठी भावगीतांत माणिक वर्मा, यांनी उत्तरेचा रंग फार सफाईने आणला आणि महाराष्ट्रात रुजवला.
    मराठी चित्रपट "पाठलाग" मध्ये असेच अनोख्या चालीचे - या डोळ्यांची दोन पांखरे हे गाणे "चंद्रकौंस" रागाची सावली दर्शवतात.
    "या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती,
    पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगती".
    माडगूळकरांची चित्रदर्शी शैली आणि संगीतकार दत्ता डावजेकरांची अतिशय अवघड चाल, याचे अनोखे मिश्रण या गाण्यात झाले आहे. अशी चाल गायला फक्त आशा भोसले यांचाच गळा आवश्यक आहे, याची सत्यता गाणे ऐकताना सारखे जाणवत राहते. अत्यंत मोजका वाद्यमेळ आणि गायकी ढंगाची चाल, यामुळे हे गाणे, रागाचे नाते सोडून कधी स्वत:चे अस्तित्व निर्माण करते, याचा पत्ताच लागत नाही आणि हीच तर खरी सुगम संगीताची खासियत आहे.
    प्रसिद्ध संगीतकार यशवंत देवांनी या रागावर आधारित असेच एक चिरस्मरणीय गीत दिले आहे. सुधीर फडक्यांनी आपल्या भावगर्भ शैलीत हे गाणे कायमचे चिरंजीव करून ठेवले आहे.
    "त्या तरुतळी विसरले गीत,
    हृदय रिकामे घेउन फिरतो,
    इथे तिथे टेकीत."
    कविवर्य वा.रा. कातांची कविता असून, तसे बघितले तर हे गीत म्हणजे अप्रतिम भावकविता आहे पण तरीही यशवंत देवांनी त्यातील "चाल" हुडकून, इतकी सुंदर चाल लावली. या गाण्यात देखील नाममात्र वाद्यमेळ असून कवितेतील आशय, स्वररचनेतून मुखरित केला आहे. या गाण्यात, जरा बारकाईने ऐकले तर सुरवातीच्या ओळींत "चंद्रकौंस" राग सापडतो पण नंतर कवितेच्या अनुषंगाने चाल फिरते आणि आपल्या हाती असामान्य चालीची रचना ऐकायला मिळते.
    -- अनिल गोविलकर