(User Level: User is not logged in.)

शैक्षणिक

Sort By:

  • नाईलचा बाहू

    नाईल नदीच्या खुफू ‘बाहू’नं गिझाच्या पठारावरील पिरॅमिडच्या बांधणीत मोठी भूमिका बजावली असली तरी, या अगोदरच नाईल नदीची पातळी खाली जायला सुरुवात झाली असल्याचं या संशोधकांना आढळलं. कारण आफ्रिकेतला अतिदमट हवामानाचा काळ संपला होता. नाईल नदीला पूर्व आफ्रिकेतून होणारा पाणीपुरवठा रोडावला होता. मात्र नाईल नदीची पातळी आता जरी घटू लागली असली तरीही, खुफू शाखेला पाणी पुरवण्याइतकी ती पुरेशी होती. पिरॅमिड बांधली गेली त्या शतकात, खुफू शाखेची पातळी एकेकाळच्या कमाल पातळीच्या तुलनेत चाळीस टक्क्यांवर स्थिरावली होती.

  • वर्षावनांचा कायापालट

    पृथ्वीवरील प्राणिसृष्टीवर वर्चस्व गाजवणारे डायनोसॉर हे सरीसृप या आघातामुळे नष्ट झाले आणि सस्तन प्राणी हे, त्यानंतर अस्तित्वात आलेल्या प्राणिसृष्टीचे महत्त्वाचे घटक बनले. या आघातानंतर, प्राणिसृष्टीप्रमाणे वनस्पतिसृष्टीत कोणता बदल घडून आला, याचं कुतूहल उत्क्रांतीच्या अभ्यासकांना आहे. हे कुतूहल काही प्रमाणात शमवू शकणारं एक संशोधन ‘सायन्स’ या शोधपत्रिकेत अलीकडे प्रसिद्ध झालं आहे. पनामा शहरातल्या (मध्य अमेरिका) स्मिथ्सोनिअन ट्रॉपिकल रिसर्च इंस्टिट्यूट या संस्थेतील पुराजीवशास्त्रज्ञ मोनिका कार्‌व्हॅलो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या संशोधनाचे निष्कर्ष लक्षवेधी आहेत.

  • अजस्र पेंग्विन

    पेंग्विन हे अंटार्क्टिकावरील जीवसृष्टीतलं एक वैशिष्ट्य आहे. मात्र या न उडणाऱ्या पक्ष्यांचं वास्तव्य फक्त अंटार्क्टिकापुरतं मर्यादित नाही. पेंग्विनच्या काही जाती अगदी विषुववृत्ताजवळच्या प्रदेशांतही आढळतात. पेंग्विनच्या आज अठरा जाती अस्तित्वात असून, त्यांतील अंटार्क्टिकावर आढळणारी एम्परर पेंग्विन ही जाती आकारानं सर्वांत मोठी आहे.

  • विषारी जहाज!

    व्ही-१३०२ हे युद्धकालीन टेहळणीसाठी वापरलं गेलेलं एक जर्मन जहाज होतं. दारूगोळा, तोफा व इतर शस्त्रास्त्र, इत्यादींनी सुसज्ज असणारं हे टेहळणी जहाज म्हणजे मुळात मासेमारीसाठी बांधलेलं जहाज होतं. सन १९२७ साली तयार झालेलं हे ४८ मीटर लांबीचं, २९२ टन क्षमतेचं जहाज अगोदर ‘जॉन मान’ या नावानं ओळखलं जायचं. दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास, त्याचं रूपांतर टेहळणी करणाऱ्या जहाजात केलं गेलं. दिनांक १२ फेब्रुवारी १९४२ रोजी ब्रिटिश विमानांनी या टेहळणी जहाजावर हल्ला करून त्याला बुडवलं. तेव्हापासून गेली आठ दशकं हे जहाज, त्यावरील स्फोटकं, इंधनासाठी वापरला जाणारा कोळसा व इतर सर्व सामग्रीसह नॉर्थ सी या समुद्राच्या तळाशी चिरनिद्रा घेत आहे. हे जहाज जिथे सापडलं आहे, तिथे समुद्राची खोली तीस-पस्तीस मीटरच्या आसपास आहे. हे जहाज उजव्या बाजूला कलंडलं असून, त्याच्या डाव्या बाजूला बॉम्बमुळे एक मोठं भोक पडलं आहे.

    दीर्घ काळ पाण्याखाली असलेल्या या जहाजाच्या परिसरात अनेक सजीव मुक्तपणे विहरताना पाणबुड्यांना आढळले आहेत. मासे, खेकड्यांसारखे कवचधारी प्राणी, विविध मृदुकाय प्राणी, अशा अनेक सजीवांचं हे निवासस्थान झालं आहे. इथे अनेक सागरी वनस्पतीही वाढल्या आहेत. या सगळ्या सागरी जीवांना जरी हे एक चांगलं निवासस्थान लाभलं असलं तरी, त्या ठिकाणी विविध सूक्ष्मजीवाणूंची अनपेक्षित स्वरूपाची वाढ झाली असण्याची मोठी शक्यता संशोधकांकडून व्यक्त केली गेली. सूक्ष्मजीवांची अशा प्रकारची वाढ ही तिथल्या परिसंस्थेला धोका निर्माण होत असल्याचं दर्शवते. याच पार्श्वभूमीनुसार, जोसेफाइन व्हान लँडुयट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या संशोधनात, या जहाजातून पाण्यात शिरलेल्या विविध रसायनांचा आणि तिथे आढळणाऱ्या सूक्ष्मजीवाणूंचा एकमेकांशी असलेला संबंध अभ्यासला.

    जोसेफाइन व्हान लँडुयट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या संशोधनात, इथल्या गाळात जमा झालेले विविध धातू आणि सेंद्रिय रसायनं, यांचं प्रमाण मोजलं. तसंच त्यांनी या गाळात कोणत्या प्रकारचे सूक्ष्मजीवाणू आढळतात आणि ते किती प्रमाणात आढळतात, त्याचाही शोध घेतला. या गाळाशिवाय जहाजावरच्या, नांगरासह इतर पोलादी भागांवर कोणते सूक्ष्मजीवाणू वास्तव्याला आहेत, तेही त्यांनी शोधून काढलं. या संशोधनासाठी लागणारे सर्व नमुने, जोसेफाइन व्हान लँडुयट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाणबुड्यांकरवी गोळा करून घेतले. जहाजाच्या परिसरातल्या गाळातले विविध ठिकाणचे जे नमुने गोळा केले गेले, त्यांत जहाजाच्या दोन्ही बाजू, तसंच जहाजाचा पुढचा भाग आणि मागचा भाग, अशा सगळीकडील नमुन्यांचा, समावेश होता. तसंच हे नमुने जहाजापासून वेगवेगळ्या अंतरापर्यंतचे होते – अगदी जहाजाच्या जवळच्या गाळातले ते जहाजापासून ऐंशी मीटर अंतरापर्यंतच्या गाळातले. हे सर्व नमुने गाळाच्या पृष्ठभागापासून सुमारे पंधरा सेंटिमीटर खोलीवरून घेतले गेले. जहाजाच्या नांगराच्या व इतर भागांच्या पृष्ठभागावर जमा झालेल्या थरांचेही नमुने गोळा केले गेले. या सर्व नमुन्यांतील रसायनांचा शोध हा रासायनिक विश्लेषणाद्वारे तर, जीवाणूंचा शोध हा जनुकीय विश्लेषणाद्वारे घेतला गेला.

    या नमुन्यांच्या विश्लेषणातून अनेक लक्षवेधी निष्कर्ष निघाले. सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जहाज बुडून ऐंशी वर्षं उलटली असली तरी, त्यातून प्रदूषक अजूनही बाहेर पडत आहेत. जहाजात जिथे कोळसा साठवला होता, त्या भागातील गाळाच्या नमुन्यांत निकेल, तांबं आणि अर्सेनिक या मूलद्रव्यांच्या क्षारांचं प्रमाण सर्वाधिक होतं. यातील अर्सेनिक हे मूलद्रव्य कोळशातून बाहेर पडत असण्याची शक्यता आहे. जहाजाजवळच्या काही ठिकाणच्या गाळातलं धातूंचं प्रमाण, हे धातू पोलादाच्या गंजण्यामुळे वा जहाजाला दिलेल्या रंगाद्वारे पाण्यात मिसळले जात असण्याची शक्यता दर्शवत होतं. तसंच गाळाच्या नमुन्यांत टीएनटीसारख्या स्फोटकांपासून निर्माण झालेल्या सेंद्रिय पदार्थांचं प्रमाणही लक्षणीय होतं. जहाजापासून जसं दूर जाऊ तसं, या धातूंचं आणि सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण अपेक्षेप्रमाणे कमी होत गेलं.

    जहाजाच्या वेगवेगळ्या भागात सूक्ष्मजीवाणूंचं प्रमाणही वेगवेगळं असल्याचं दिसून आलं. तसंच काही विशिष्ट प्रकारच्या सूक्ष्मजीवाणूंचं प्रमाण, हे त्यात्या ठिकाणच्या धातूंच्या आणि सेंद्रिय पदार्थांच्या वाढत्या प्रमाणानुसार वाढत असल्याचं आढळलं. जहाजाच्या विविध भागांवर जमलेल्या थरांत, गंधकाचं रासायनिक स्वरूप बदलू शकणाऱ्या डीसल्फोबल्बससारख्या सूक्ष्मजीवाणूंचं प्रमाण गाळातील प्रमाणापेक्षा अधिक होतं. गंधकांशी संबंध असणाऱ्या या सूक्ष्मजीवाणूंचा पोलादाच्या गंजण्याशी थेट संबंध असतो. त्याचबरोबर जिथे स्फोटकांतून निर्माण होणाऱ्या सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण अधिक आहे, तिथे या सेंद्रिय पदार्थांचं विघटन करणाऱ्या ऱ्होडोबॅक्टरेसी आणि क्रोमॅटिएसी या प्रकारांतील सूक्ष्मजीवाणूंचं प्रमाणही अधिक असल्याचं दिसून आलं आहे. जोसेफाइन व्हान लँडुयट आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या संशोधनातून, जहाजावर आढळणाऱ्या सूक्ष्मजीवाणूंचा, जहाजातून बाहेर पडणाऱ्या विविध धातू आणि सेंद्रिय पदार्थांशी संबध असल्याचं स्पष्ट झालं आहे.

    या बुडालेल्या जहाजाच्या परिसरात सापडलेल्या सूक्ष्मजीवाणूंचं हे अस्तित्व, बुडालेल्या जहाजातून बाहेर पडणारे धातू आणि सेंद्रिय पदार्थ आजही – म्हणजे आठ दशकांनंतरही – इथल्या सागरी जीवनावर परिणाम घडवत असल्याचं दर्शवतं. हा परिणाम जरी अतितीव्र नसला, तरी तो भविष्यातही घडतच राहणार आहे. तसंच नॉर्थ सी समुद्राच्या परिसरात बुडवल्या गेलेल्या जहाजांची प्रचंड संख्या लक्षात घेता, या प्रदूषकांच्या परिणामाचा गांभीर्यानं विचार करायची गरज आहे. नॉर्थ सी रेक्स हा प्रकल्प अशा सर्व संशोधनातल्या निष्कर्षांची सर्वांगानं दखल घेण्याचा प्रयत्न करतो आहे. इतकंच नव्हे तर, या प्रकल्पाद्वारे लवकरच काही शिफारशी केल्या जाण्याची शक्यता आहे. यातली एक शिफारस असू शकेल ती, नॉर्थ सी समुद्राच्या तळाशी असलेली ही ‘विषारी’ जहाजं समुद्राच्या बाहेर काढण्याची! कारण समुद्राच्या तळाशी असणाऱ्या या जहाजांतून बाहेर पडणारे पदार्थ पूर्णपणे नष्ट होण्यास अजूनही दीर्घ काळ लागणार आहे. त्यामुळे ही घातक जहाजं जर पाण्याच्या बाहेर काढली नाहीत, तर हे सागरी प्रदूषण असंच चालू राहणार आहे!

    -छायाचित्र सौजन्य : (सागरी विज्ञानातील सीमा) / (Flanders Marine Institute)

    चित्रवाणीः विषारी जहाज

  • जीवोत्पत्ती – किरणोत्सर्गाचा हातभार?

    अमिनो आम्लं ही पृथ्वीवरच्या जीवसृष्टीची अविभाज्य घटक आहेत. या अमिनो आम्लांपासूनच आपल्या शरीरातली विविध प्रथिनं तयार होतात. ही अमिनो आम्लं म्हणजे एक प्रकारची नायट्रोजनयुक्त आम्लं आहेत. पृथ्वीवरच्या जीवसृष्टीची सुरुवात होत होती, तेव्हा ही आम्लं अमोनिआ, मिथेन, हायड्रोजन सायनाइड, पाणी यासारख्या साध्या रसायनांच्या मिश्रणापासून निर्माण झाली असावीत. ही निर्मिती आकाशात कडाडणाऱ्या विजेच्या मदतीनं झाली असण्याची एक शक्यता, पूर्वीच्या संशोधनातून दिसून आली आहे.

  • कुत्र्यांशी मैत्री

    ए२बी ही खूण आढळणारे हे सर्व कुत्रे, सायबेरिआतील कुत्र्यांच्या पूर्वजांपासून सुमारे तेवीस हजार वर्षांपूर्वी निर्माण झाले असल्याची शक्यता या संशोधकांना दिसून आली.

  • प्राण्यांचा जैवभार

    मानवाच्या ‘अधिपत्या’खालील भूप्रदेश वाढत आहेत, जंगलं नष्ट होत आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांची संख्यासुद्धा घटत आहे. विविध वन्यप्राण्यांची संख्या ही पृथ्वीवरच्या वन्यजीवनाच्या ‘प्रकृती’ची निर्देशक असते. वन्यप्राण्यांच्या संख्येवर होणारा कोणत्याही प्रकारचा परिणाम जाणून घ्यायचा असला तर, कोणत्या जातीचे किती प्राणी अस्तित्वात आहेत, हे माहीत असायला हवं.

  • व्रेडफोर्टचं विवर

    व्रेडफोर्टचं विवर हे पृथ्वीवरच्या ज्ञात विवरांपैकी सर्वांत मोठ्या आकाराचं विवर आहे. तसंच ते अतिप्राचीन विवरांपैकी एक आहे. काळानुसार ते पृथ्वीवरचं दुसऱ्या क्रमांकाचं प्राचीन विवर ठरलं आहे. हे विवर सुमारे दोन अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाल्याचं भूशास्त्रीय संशोधनावरून दिसून येतं. हे विवर इतकं जुनं आहे की, या दीर्घ काळात त्याच्या कडा पूर्णपणे धुपून गेल्या आहेत. त्यामुळे त्या आता अस्तित्वात नाहीत. आता मागे राहिला आहे तो अशनीच्या आघातामुळे विवराच्या मध्यभागी निर्माण झालेला उंचवटा. हा उंचवटा म्हणजेच व्रेडफोर्टच्या परिसरातले डोंगर! या विवराचा व्यास सुमारे १७२ किलोमीटर इतका असल्याचा जो निष्कर्ष काढला गेला होता, तो भूशास्त्रीय पुराव्यावर आधारलेला आहे. तिथल्या जमिनीत सापडलेल्या विविध खनिजांवरून, खडकांच्या स्वरूपावरून हा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

    व्रेडफोर्टचा परिसर म्हणजे एक विवर असल्याचं स्पष्ट झाल्यानंतरच्या काळात, त्या परिसरातील, चुंबकत्व, गुरुत्वाकर्षण, भूशास्त्र, इत्यादींबद्दलची नवी माहिती उपलब्ध होत गेली. या नव्या माहितीवरून या विवराच्या कडा पूर्वी कशा आणि कुठपर्यंत पसरल्या असाव्यात, याची अधिक अचूक गणितं मांडली गेली. त्यानुसार हे विवर म्हणजे पूर्वी एकाभोवती एक असणाऱ्या अनेक कडांनी मिळून तयार झालेली गुंतागुतीची रचना असल्याचं दिसून आलं. या रचनेवरून या विवराचा पसारा सुमारे अडीचशे ते पावणेतीनशे किलोमीटरच्या दरम्यान असल्याचं स्पष्ट झालं. जर हे विवर इतकं मोठं असलं, तर हे विवर निर्माण करणारा अशनीही अतिप्रचंड आकाराचा असायला हवा. अमेरिकेतील रोचेस्टर विद्यापीठातील नॅटली अ‍ॅलन आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी आता या अशनीचा आकार शोधून काढला आहे. नॅटली अ‍ॅलन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन अलीकडेच ‘जर्नल ऑफ जिओफिजिकल रिसर्च’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालं आहे.

    नॅटली अ‍ॅलन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन गणिती प्रारूपावर आधारलेले आहे. या प्रारूपात त्यांनी या विवराशी संबंधित विविध प्रकारच्या उपलब्ध माहितीचा वापर केला. आघात झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या विवराचं स्वरूप हे अशनीच्या वेगावर, त्याच्या आदळण्याच्या कोनावर, त्याच्या आकारावर, त्याच्या भूशास्त्रीय घडणीवर तर अवलंबून असतंच; परंतु त्याचबरोबर जिथे हा आघात झाला, तिथल्या जमिनीच्या भूशास्त्रीय घडणीवरही ते अवलंबून असतं. आतापर्यंत झालेल्या सर्व संशोधनाचा तपशीलवार आढावा घेऊन, या संशोधकांनी ही सर्व भूशास्त्रीय माहिती जमा केली. यात इथे सापडलेल्या खडकांचे प्रकार, त्यातली खनिजं, इत्यादींचा समावेश होता. या ठिकाणच्या जमिनीत असलेल्या क्वार्टझाइट, ग्रॅनाइट, डुनाइट, कॅल्साइट, अशा वेगवेगळ्या खडकांंच्या थरांच्या जाडीचाही या संशोधकांनी आपल्या संशोधनात वापर केला. जेव्हा एखाद्या अशनीची रासायनिक घडण माहीत नसते, तेव्हा तो अशनी ग्रॅनाइटच्या खडकापासून बनलेला असल्याचं गृहीत धरलं जातं. त्यानुसार हा आघातक ग्रॅनाइटपासून बनला असल्याचं, या प्रारूपात गृहीत धरलं गेलं व ग्रॅनाइटची घनता या प्रारूपातील गणितासाठी वापरली गेली.

    या सर्व माहितीचा वापर करून नॅटली अ‍ॅलन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, या प्रारूपाद्वारे कोणत्या आकाराचा अशनी, कोणत्या वेगानं या ठिकाणी आदळल्यास अडीचशे किलोमीटरहून अधिक व्यासाचं विवर तयार होईल हे शोधून काढलं. नॅटली अ‍ॅलन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काढलेल्या निष्कर्षांनुसार, अडीचशे किलोमीटरहून अधिक व्यासाचं विवर निर्माण करणाऱ्या या अशनीचा व्यास हा १५ किलोमीटर नव्हे, तर सुमारे २५ किलोमीटर इतका प्रचंड असावा. हा अशनी पृथ्वीवर सेकंदाला सुमारे १५ किलोमीटर वेगानं आदळला असावा. या अशनीमुळे झालेला आघात हा पूर्वीच्या गणितांनुसार केल्या गेलेल्या आघातापेक्षा साडेतीनपटींहून अधिक तीव्र असण्याची शक्यता दिसून आली.

    केंद्रापासून विविध अंतरावरील जमिनीत निर्माण झालेल्या दाबाचं गणितही या संशोधकांनी या प्रारूपाद्वारे केलं आहे. या आघातामुळे निर्माण झालेला, आघाताच्या जवळच्या जमिनीच्या आतला दाब हा वातावरणाच्या दाबाच्या तुलनेत दहा लाख पटींइतका प्रचंड असावा. एखादं खनिज निर्माण होण्यासाठी उच्च तापमानाबरोबरच ठरावीक दाब निर्माण व्हावा लागतो. त्यामुळे आघाताच्या जागेपासून विविध अंतरावर विशिष्ट प्रकारची खनिजं सापडतात. या प्रारूपावरून काढल्या गेलेल्या विविध अंतरावरील जमिनीतील दाब हा, त्या अंतरावर प्रत्यक्ष सापडलेल्या खनिजांच्या निर्मितीला आवश्यक असणाऱ्या दाबाशी जुळणारा आहे. आघातादरम्यान निर्माण झालेल्या या प्रचंड दाबामुळे इथल्या जमिनीचा पृष्ठभाग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणात, कमी-जास्त उचलला जाऊन, विवराच्या या गुंतागुंतीच्या रचनेची निर्मिती झाली असावी. या आघातामुळे इथे इतकी उष्णता निर्माण झाली की, जमिनीच्या सुमारे ५५ किलोमीटर खोलीपर्यंतच्या भागाला द्रवस्वरूप प्राप्त झालं. तसंच आघाताच्या जागेपासून सुमारे १३० किलोमीटरपर्यंतच्या पृष्ठभागावर वितळलेले खडक पसरले. द्रवरूप खडक निर्माण होण्यास तापमान किमान अडीच हजार अंश सेल्सिअस असावं लागतं.

    नॅटली अ‍ॅलन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या संशोधनातून आणखी एक नवी गोष्ट स्पष्ट झाली आहे. याचा सबंध रशियातील कारेलिआ इथे सापडलेल्या भूशास्त्रीय अवशेषांशी आहे. सन २०१४मधील एका संशोधनात रशियातील कारेलिआ येथे, काचेच्या गोट्यांसारखे दिसणारे काही मिलिमीटर आकाराचे गोलक सापडले. हे गोलक सुमारे दोन अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाल्याचं आढळून आलं. हे गोलक व्रेडफोर्ट इथल्या आघातादरम्यान दूरवर उडालेले पदार्थ असण्याची शक्यताही दिसून आली. नॅटली अ‍ॅलन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संशोधनानुसारही, व्रेडफोर्टवरच्या आघातामुळे तिथले काही पदार्थ सुमारे दोन-अडीच हजार किलोमीटर अंतरावर फेकले गेल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. कारेलिनाचं व्रेडफोर्टपासूनंच अंतर हे सुमारे दहा हजार किलोमीटर आहे. दोन अब्ज वर्षांपूर्वी सर्व खंड हे एकत्र असण्याची शक्यता लक्षात घेता, कारेलिनाचं व्रेडफोर्टपासूनचं तेव्हाचं अंतर खूपच कमी असलं पाहिजे. त्यामुळे नॅटली अ‍ॅलन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अपेक्षित असणारी जागा आणि आजची कारेलिना एकच असण्याची एक शक्यता व्यक्त केली गेली आहे.

    सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी आजच्या मेक्सिकोजवळ असणाऱ्या चिक्षुलूब इथे आदळलेल्या अशनीनं पृथ्वीवरची ७५ टक्के जीवसृष्टी नष्ट केली. या महानाशात डायनोसॉर सर्वस्वी नष्ट झाले. हा अशनी सुमारे दहा किलोमीटर व्यासाचा होता. व्रेडफोर्ट इथे आदळलेला अशनी हा तर आकारानं, चिक्षुलूब इथे आदळलेल्या अशनीपेक्षा अडीचपट मोठा होता. या प्रचंड आकाराच्या अशनीमुळे झालेला नाशही तितकाच प्रचंड असायला हवा. परंतु या महानाशाचे पुरावे उपलब्ध नाहीत. कारण या काळात जीवसृष्टी अत्यंत प्राथमिक स्थितीत होती. या काळचे पृथ्वीवरचे सजीव जरी प्रकाशसंश्लेषण करू शकत असले तरी, वृक्षराजी अस्तित्वात आलेली नव्हती. त्यामुळे या आघातानंतर मोठ्या आगी लागण्याचा प्रश्नच नव्हता.

    आघाताच्या काळात जीवसृष्टी जरी प्राथमिक अवस्थेत असली तरी, या आघातामुळे त्याकाळीसुद्धा वातावरणात मोठे बदल झाले असावेत. तेव्हाही प्रचंड प्रमाणात धूळ उडून, सूर्यप्रकाश काही काळासाठी अडवला गेला असावा. परिणामी, तापमान घसरलं असावं आणि सजीवांच्या प्रकाशसंश्लेषणाच्या क्रियेतही अडथळा आला असावा. प्रकाशसंश्लेषण थांबल्यानं, प्रकाशसंश्लेषणावर अवलंबून असलेल्या सजीवांवर याचा मोठ्या प्रमाणावर प्रतिकूल परिणाम झाला असावा. या आघातानंतर तापमान खाली आलं असलं तरी, वातावरणात जमा झालेल्या कार्बनडाय ऑक्साइड या हरीतगृह वायूमुळे नंतरच्या काळात तापमानात वाढही झाली असावी. या अतिप्रचंड आघाताच्या वेळी उडालेली धूळ पूर्णपणे खाली बसायला किती काळ लागला हे सांगता येत नाही. हा काळ दहा वर्षांपर्यंतचा दीर्घ असू शकतो. ही धूळ खाली बसल्यानंतरही, पृथ्वीला या आघाताच्या परिणामातून पूर्णपणे सावरायला यापेक्षाही दीर्घ काळ लागला असणार, हे उघडच आहे!

    -छायाचित्र सौजन्य : Lauren Dauphin/NASA Earth Observatory/Landsat
    Pierre Thomas / Planet Terre
    tadpolefarm / Wikimedia

    चित्रवाणीः व्रेडफोर्टचं विवर

  • शहरी खाणकाम

    इलेक्ट्रॉनिक कचऱ्यात तांबं तर असतंच, परंतु त्याशिवाय इतर सुमारे तीस मूलद्रव्यं असतात. यातील काही मूलद्रव्यं ही या वस्तूंच्या इलेक्ट्रॉनिक भागांत विशिष्ट उद्देशानं, मुद्दाम वापरलेली असतात; तर काही मूलद्रव्यं ही मुद्दाम वापरलेल्या मूलद्रव्यांत अपद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात. या सर्व मूलद्रव्यांत ऱ्होडिअम, पॅलाडिअम, चांदी, सोनं, यासारखे दुर्मीळ आणि उपयुक्त धातूही असतात.

  • पेंग्विनची वाटचाल

    सहा कोटी वर्षांपूर्वीच्या काळातले पेंग्विन हे आजच्या पेंग्विनपेक्षा खूपच वेगळे दिसत होते. त्या काळाल्या पेंग्विनचे पाय आणि चोची आताच्या पेंग्विनच्या तुलनेत खूपच लांब होत्या. तसंच त्यांचे पंखही सर्वसाधारण पक्ष्याच्या पंखासारखेच दिसत होते. उत्क्रांतीदरम्यान पेंग्विनच्या पिसांचा रंग लाल झाला. त्यानंतरच्या काळात हे पेंग्विन दोन पायांवर उभे राहू लागले. या पेंग्विनची उंची आजच्या सर्वांत मोठ्या पेंग्विनपेक्षाही अधिक होती.