अष्टांग संग्रहातील मात्राशीतीय नावाच्या अध्यायातील हे श्लोक म्हणजे आयुर्वेदातील भौतिकशास्त्रच नव्हे काय ? विज्ञान विज्ञान म्हणजे दुसरे आणि काय ?
उष्णतेमुळे पदार्थाचे प्रसरण होते आणि शीत स्पर्शाने पदार्थ आकुंचित पावतो, हा भौतिकशास्त्रातील नियम या श्लोकात वर्णन केलेला दिसतो. आपली दृष्टीची कक्षा वाढवली की सगळं स्पष्ट समजायला लागतं.
सूर्याच्या उष्णतेच्या प्रभावाने स्रोतसांचा विकास होतो. जेवढा पाईप मोठा तेवढा आतून वहाणारे द्रव पदार्थ जास्ती प्रमाणात जाणार. आणि जेवढा पाईप लहान तेवढा द्रव पदार्थ देखील पुढे ढकलायला जास्ती कष्ट पडणार. हे व्यावहारिक सत्य आपण बघतोच. बरं ही स्रोतसे आतून गुळगुळीत असतील तर आतील पदार्थ पटकन पुढे ढकलला असता. पण स्रोतसे आतुन वरखाली असतात. नुसत्या डोंगर आणि दऱ्या. याकरीता या स्रोतसांमधे लाळेसारखा एक बुळबुळीत पदार्थ सतत स्रवत असतो. यामुळेच तर अन्नाचा गोळा हळुहळू पुढे ढकलला जातो. पण स्रोतसांना चिकटणारे पदार्थ आत गेले तर या स्रोतसांच्या हालचाली थोड्या मंदावतात. आतमधे या आम सदृश पदार्थाचे लेपन झाल्यामुळे यांचा आकारदेखील थोडा लहान होतो. त्यामुळे आतील द्रव ज्या वेगाने पुढे सरकला पाहिजे, त्या वेगाने पुढे सरकत नाही.
दिवसाची मिळालेली सूर्याची उष्णता, या स्रोतसांमधील आतून चिकटलेला कफसदृश द्रवपदार्थ विलयीत करते आणि स्रोतसांचा आकारही वाढवला जातो, आणि अन्न पदार्थ सहजपणे पुढे ढकलायला मदत होते.
हे सर्व काम दिवसा उजेडी झाले तर बरे ना. म्हणून दिवसा जेवावे.
आणि रात्री सूर्य नसल्यामुळे स्रोतसांचे आकुंचन सुरू होते. स्रोतसे संकुचित होतात. आतून वाहाणारा द्रवाहार सावकाश जातो. काही वेळा तर अडकूनच रहातो. त्याला मागाहून येणारा रस चिकटत जातो. थरावर थर लागत जातात आणि स्रोतसांचा आकार आणखीनच कमी होतो. स्रोतसांमधे आतून साठण्याची वृत्ती वाढली की गोळा बनत जातो.
लहान रस्त्यावर ट्रॅफिक स्लो होते, रस्ता मोठा असला तर ट्रॅफिकजामची भीती नसते. म्हणून दिवसाचे अन्न लवकर पुढे सरकते, आणि पचते आणि रात्रीचे उशीरा !
ही संकोचनाची क्रिया होऊ नये या करीता, गती आणि उष्णता दोन्ही गोष्टी हव्यात. हे चक्क भौतिकशास्त्र सांगितलेले आहे.
ग्रंथकार एक सूचना अवश्य करीत आहेत. जर सायंकाळी घेतलेले अन्न चांगले पचले नसेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी भूक लागेपर्यंत जेऊ नये. पण दिवसाचे अन्न पचले नसेल तर परत सायंकाळी जेवले तरी ते दिवसभराच्या उष्णतेमुळे पचून जाते.
याचा दुसरा अर्थ सायंकाळी जेवताना नीट विचार केल्याशिवाय जेऊ नये. एवढे लक्ष सायंकाळच्या जेवणाच्या वेळेवर ठेवावे.
कारण,
जंतुंची वाढ देखील रात्रीच्याच वेळी होते.
कारण त्यांचाही रात्रीस खेळ चाले….
हे आयुर्वेदातील जीवशास्त्र..
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
12.03.2017