एखाद्या प्रसंग माणसाला बरेच काही शिकवून जातो. पण आठवण मात्र कायम राहते. आणि एक धडा शिकायला मिळतो. माझ्या बाबतीतही असेच झाले आहे. मुलं लहान असताना दरवर्षी पास झाले की पेढे आणून देवापुढे ठेवून मग सगळ्यांना वाटत होते आणि त्यांचे कौतुक करत होते. पण माझ्या मोठ्या मुली बाबत एक घटना घडली होती ती म्हणजे तिने बारावीची परीक्षा दिली आणि तिचा आत्मविश्वास. अभ्यास. चिकाटी. जिद्द आणि ध्येय या मुळे खात्री होती की हे सगळे नक्कीच खर होणार. पण शिक्षकांच्या काही मागण्या मान्य झाल्या नाहीत म्हणून त्यांनी पेपर तपासणी वर बहिष्कार घातला होता आणि योग्य मूल्यमापन झाले नाही. बऱ्याच मुलांचे नुकसान झाले होते. नंतर मुलगा बारावी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाला होता तसेच त्याचे दोन तीन मित्र देखिल म्हणून मी घरी तर पेढे आणलेच पण त्या वेळी एक मोठे हॉटेल सुरू झाले होते म्हणून मी त्याला म्हटले की तू तुझ्या मित्रांना घेऊन तिथे जा आणि काय पाहिजे ते मनसोक्त खा. मी सगळा खर्च देइन त्याने चक्क नकार दिला. कारण सांगितले नाही. माझा विरस झाला होता. मन अस्वस्थ होते. दुसऱ्या दिवशी शाळेत मैत्रीणीला सगळे सांगितले. ती म्हणाली तू नको काळजी करुस मी बघते. आणि दुसर्या दिवशी ती घरी आल्यावर म्हणाली की यंदा आमच्या घरी आम्ही ईद साजरी केली नाही. पण आता उद्या रविवारी आमच्या घरी यावे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगायला आले आहे. आम्ही दरवर्षी तिच्या कडे जायचो म्हणून होकार दिला. आणि गेलो तिथे शिरखुर्मा गुलगुले वगैरे खाणे झाले. मग तिने माझ्या मुलाला एक हार घातला आणि म्हणाली की आमच्यात कौतुक करण्याची ही पद्धत आहे. फूल पेहनाना. तू बारावी उत्तीर्ण झालास म्हणून ही मावशी तुला हा हार घालून तुला ही पेन बक्षिस देत आहे. एवढेच देऊ शकते मी. तुला आवडेल की नाही माहित नाही पण.. आणि त्यांनी घेतला तिचे आभार मानले होते..
तीन वर्षांपूर्वी सून बाई परदेशात कंपनी तर्फे गेल्या होत्या. आणि नातू तिसऱ्या वर्गात. आठ दिवस म्हणून त्याचा बाबा त्याचे सगळे आवरुन देत असे. प्रश्न होता डबा पण मी अशाच अवस्थेत यांची मदत घेऊन रोज एक पदार्थ करुन दिला. ती आली मला खूप आनंद झाला होता. माझी सून परदेशी जाऊन आली म्हणून म्हणून तिला म्हटलं की मी काही करु शकत नाही पण तु तुझ्या मैत्रीणींना बोलाव आणि मी तुझे कौतुक करेन आणि सगळा खर्च करेन. एखाद्या हॉटेलात. ती म्हणाली की आई अहो आता सगळेच जातात. मी काय मोठ केलय. नको म्हणाली तेव्हा ही असाच विरस अस्वस्थ झाले होते…
तेव्हा पासून ठरवले आहे की कुणीही उत्तीर्ण झाले की एक हजार रुपये व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व आशीर्वाद द्यायचे. आणि आज तागायत हे चालू आहे. आपण मोठ्या उत्साहाने करायचे ठरवले की असा अनुभव आला की मन अस्वस्थ होते. चिडचिड होते. त्यापेक्षा हा मार्ग उत्तम. असे मला वाटते म्हणून…..
सौ कुमुद ढवळेकर