परवा भुवनेश्वरला एका कंपनीत एक चित्तवेधक बोर्ड पाहिला – नैसर्गिक संसाधनांचा वापर करा, कारण ती मुबलक आणि बव्हंशी फुकट असतात. त्या बोर्डवर चित्र होते सूर्याचे आणि दोरीवर वाळत टाकलेल्या कपड्यांचे! मोठ्ठा संदेश.
वस्तू थंड करायला रेफ्रिजरेटर हवा आणि त्यांत ठेवलेले दूध गरम करायला मायक्रोवेव्ह ओव्हन हवा. हवाबंद डब्यातील प्रक्रिया केलेले अन्न, शीतपेय हवे आणि त्यांतून विविध आजारांना निमंत्रण हवे. आपल्या आहारशैलीला संमत नसलेले खाद्य पदार्थ हवेत आणि त्या व्हरायटीला बळी पडत शरीराला खिंडारे पाडायची. गंमत म्हणजे जुन्या सोप्प्या आयुष्याचे, खेळांचे वर्णन करीत व्हाट्सअप वर उसासे सोडायचे. शब्दांत हृदयाला भिडू शकणाऱ्या भावना व्यक्त करण्यासाठी ईमोजी वापरायच्या आणि जुन्या काळातील पोस्टमनची प्रतीक्षा करण्याच्या हुरहूरीची पोस्ट लिहायची. “चुलीवरच्या” जेवणाची अपूर्वाई वर्णन करीत सर्वदेशीय खाद्य पदार्थ चापायचे आणि अपचनात तळमळणारी रात्र काढायची. महिन्याची वैद्यकीय बिले कधीच चार आकडी झालीएत. खऱ्या अर्थाने औषधे-गोळ्यांचे टेकू लावून जगणे सुरु आहे. दिवसाचे वेळापत्रक नावालाच उरले आहे. शुद्ध हवा, शुद्ध खाद्यपदार्थ यांच्या जोरावर शंभरी गाठणाऱ्या पूर्वसूरींची “याद ” काढायची आणि त्यांची दृष्टी, दात कसे दीर्घकाळ शाबूत असायचे याचे गीत गायचे.
काल रात्री काही औषधे घ्यायला एका दुकानात गेलो होतो. तेथे रात्री पटकन “शांत झोप येण्याची ” नवी गोळी दिसली. मी हंसून दुकानदाराला विचारले-
“खरंच उपयुक्त आहे कां ही गोळी?”
तो परतून हसला,म्हणाला- ” असेल. किमान जाहीरात तरी तशी करताहेत. पण खप मात्र जोरात आहे हं ! ”
मला आठवला – रवींद्र पिंगे यांनी सांगितलेला दुर्गाबाई भागवतांचा किस्सा. त्या एका मुलाखतीत पिंगेंना सहज म्हणाल्या होत्या-
“ज्याच्या हाताची दाही बोटे स्वच्छ असतात नां पिंगे, त्याला अंथरुणावर पडल्या-पडल्या क्षणार्धात गाढ झोप लागते.”
झोप येण्यासाठी अंगाई पुरणाऱ्या माझ्या पिढीला अशी काही गोळी गिळवेल कां हो?
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे