(User Level: User is not logged in.)

दिनविशेष

एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इ‌थे

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बँक ऑफ महाराष्ट्रचा स्थापना दिन

    मराठी लोकांची आणि या लोकांच्या घराघरात पोचलेली एक राष्ट्रीयीकृत बॅंक म्हणून बॅंक ऑफ महाराष्ट्रची एक वेगळी ओळख आहे. तिचे मुख्यालयही पुण्यासारख्या शहरात दिमाखदारपणे उभे आहे.

  • वर्षातील सर्वात लहान दिवस

    २१ जूनपासून सूर्याचे दक्षिणायन होण्याचे चक्र सुरू होत असून दिवस लहान आणि रात्र मोठी होण्याला सुरूवात होते. हा क्रम चालत असताना २३ सप्टेंबरला रात्र आणि दिवस दोन्ही समान म्हणजे १२-१२ तासांचे असतात. तसेच २२ डिसेंबरला पृथ्वी आपला गोलार्ध बदलून त्यानंतर सूर्याचे उत्तरायण क्रम सुरू होते आणि २३ मार्चला दिवस आणि रात्र समान १२-१२ तासांचे असतात. त्यानंतर दिवस मोठा होण्याचा क्रम सुरू राहत असून मार्चनंतर उन्हाळा व तापमान वाढत असतो.

  • १६ डिसेंबर १८५४ – महाराष्ट्रातील पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना

    १६ डिसेंबर १८५४ रोजी “अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे” या महाराष्ट्रातील पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना झाली

  • जागतिक सिंह दिवस

    दरवर्षी १० ऑगस्ट रोजी जगभरातील सिंह प्रेमी सिंहाच्या घटत्या लोकसंख्येस जागरूकता देण्यासाठी या दिवसाचा वापर करतात. याव्यतिरिक्त, ते सिंहांच्या वस्तीच्या संरक्षणास मदत कशी करता येईल त्या पद्धतींबद्दल शिकण्याचे सुचवितात.

  • नॅशनल पोटॅटो चिप्स डे

    दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेने या बटाटा चिप्सवर ‘अनावश्यक खाद्यपदार्थ’ (non essential food) म्हणून बंदी घातली होती. अर्थात या चिप्सच्या उत्पादकांनी ही बंदी मोडून काढली. म्हणून १४ मार्च हा अमेरिकेत नॅशनल पोटॅटो चिप्स डे म्हणून साजरा केला जातो. बटाटा चिप्स हा अमेरिकन मंडळींचा नंबर वन स्नॅक्स आहे. भारतातली परिस्थिती काही वेगळी नाही.

    उपवासाचे दिवस आणि काही पदार्थ यांचं समीकरण पक्कं आहे. एक काळ उपवासानिमित्त खास घरी रांधल्या जाणाऱ्या पदार्थाचा होता. त्यानंतर रेडीमेड पदार्थाची मागणी वाढली. या पदार्थात सर्वात जास्त डिमांडमध्ये असणारा पदार्थ म्हणजे बटाटा वेफर्स. उपवासच कशाला, साखरपुडा, पूजा, वाढदिवस, बारसं, छोटी मोठी पार्टी या सर्व ठिकाणी संचारी असलेले बटाटा वेफर्स त्यांच्या सहजपणामुळे आवडीचे असले तरी फारसे गंभीरपणे पाहिले जात नाहीत. मुळात हा पदार्थ गंभीरपणे पाहण्याचा नाहीच. क्षणांचा चस्का किंवा तात्पुरतं खाऊ-पिऊ या वर्गातले वेफर्स बाजारपेठेत मोठी उलाढाल घडवतात.
    आज बटाटय़ाशिवाय भारतीय स्वयंपाकघराची कल्पनाच होऊ शकत नाही. पण बटाटा हे कंद आपणा भारतीयांसाठी खूप अलीकडचं आहे. पोर्तुगिजांनी ते स्पॅनिश दर्यावर्दींकडून स्वीकारलं आणि पोर्तुगिजांमार्फत पश्चिम किनाऱ्यावर बटाटा रुजला. त्यानंतर तो भारतभर पसरला. बटाटा हे पोटॅटोचं पोर्तुगीज नाव आपण स्वीकारलं हे मान्य करता येतं पण ब्रिटिशांमार्फत बाकीच्या भारतात पसरताना तो आलू का झाला हे कळत नाही. तर असा हा बटाटा म्हटला तर, खूप अलीकडचा. पण कंद म्हणून त्याने रताळ्याला मागे टाकत उपवासाच्या पदार्थात बाजी मारली.

    बटाटा युरोपात नेहमीच लोकप्रिय राहिलेला आहे. १८१७ मध्ये इंग्लंडमधील विल्यम किचनर्सने त्याच्या द कुक ओरॅकल या पाककृती पुस्तकात एक पाककृती छापली. ज्यात बटाटय़ाचे अगदी पातळ काप करून ते तळण्याविषयी लिहिले आहे. त्या अर्थाने बटाटा वेफर्सचा उद्गाता विल्यम किचनर्स ठरावा. मात्र हे नाव फारसे प्रचलित नाही. युरोपीय देशात बटाटा चिप्सच्या शोधाची कृती अनेकजणांनी जॉर्ज क्रम या प्रसिद्ध शेफशी जोडली आहे. या पाककृतीला तितकीच खमंग एका आख्यायिकेची फोडणी आहे. या जॉर्ज क्रमचं न्यूयॉर्क मधल्या Saratoga Spring नामक शहरात मून लेक हाउस नावाचं रेस्टॉरंट होतं. २४ ऑगस्ट १८५३ रोजी एका गिऱ्हाईकाने फ्राइड पोटॅटोची मागणी केली. जॉर्जने त्याला ते सव्‍‌र्ह केले मात्र गिऱ्हाईकाने त्या बटाटय़ाच्या जाड-जाड कापांबद्दल नाराजी व्यक्त केली. प्रख्यात शेफ असणाऱ्या जॉर्जला कदाचित हा अपमान वाटला. त्याने खोचकपणे अतिपातळ काप करून ते खूपच जास्त तळले जेणेकरून ते कडक होतील आणि त्यावर मीठ भुरभुरवले. हेतू होता की त्या ग्राहकाला डिवचता यावे, घे लेका! किती पातळ काप हवेत ते खा ! पण परिणाम उलट झाला. ग्राहक खूश झाला. त्याला ते काप तुफान आवडले आणि अशा प्रकारे बटाटा चिप्सच्या पर्वाला सुरुवात झाली.
    या दोन्ही जन्मकथांकडे नीट नजर टाकता, क्रमच्या बाबतीत घडलेली गोष्ट अतिरंजित वाटू शकते. याचं पहिलं कारण एखाद्या ग्राहकाला धडा शिकवण्यासाठी कोणताही शेफ चुकीच्या अर्थाने पदार्थ खराब करण्याचा प्रयत्न करणार नाही. हा किस्सा नक्की घडला असावा मात्र ग्राहकाला धडा शिकवणे वगैरे खमंगपणाच्या मिषाने जोडले गेले असावे. आता प्रश्न उरतो, मग या किचनर साहेबांच्या पाककृतीचे काय? यावर असं म्हणता येईल की शेफ खूप सारे प्रयोग करत करत एखादा पदार्थ अजमावून पाहतो. पाककृतींच्या पुस्तकातसुद्धा पाहा चित्रविचित्र नावांच्या हजार पाककृती असतात. पण त्या सगळ्याच लोकप्रिय होतात का? शेफ किचनरने पाककृती दिली आणि शेफ क्रमने ती लोकप्रिय केली असा सुवर्णमध्य काढता येईल.

    आपण बटाटा वेफर्स म्हणतो. अमेरिकन मंडळी पोटॅटो चिप्स म्हणतात. तर ब्रिटिशांनी पोटॅटो क्रिस्प हे नाव स्वीकारलं आहे. एक गोष्ट आणखी नमूद करण्यासारखी आहे- ती वॅक्स पेपरच्या वापराची. बटाटा वेफर्सचा प्रचार तर जोरात होत होता, मात्र हवेच्या संपर्कात आल्यावर ते पटकन नरम पडतात हे लक्षात घेऊन लॉरा स्कडर या कॅलिफोर्नियास्थित उद्योजिकेने वॅक्स पेपरबॅग्जमधून वेफर्स विक्री सुरू केली आणि त्यामुळे त्याचा खप वाढला. आज प्लस्टिक बॅग्जमधून हे चिप्स खूप मोठय़ा प्रमाणावर विकले जातात. या चिप्सच्या पाकिटातल्या चिप्सच्या संख्येवर आणि हवेच्या प्रमाणावर होणारे विनोद सुप्रसिद्ध आहेत. वेफर्स कमी आणि हवा जास्त असण्याचं कारण असं की, सध्या या रॅपर्समध्ये वेफर्स, चिप्स जास्त काळ टिकावे याकरता नायट्रोजन गॅस त्या पाकिटात आधी ब्लो केला जातो. त्यामुळे चिप्स मोडत नाहीत व अधिक काळ टिकतात.

    संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर ट्रेनमधून घरी जाईपर्यंत पोटाला आधार म्हणून पाच -दहा रुपयांची बटाटा वेफर्सची पाकिटं घेणाऱ्या चाकरमान्यांपासून ते डब्यात बटाटा वेफर्सच हवेत म्हणून हट्ट करणाऱ्या चिल्यापिल्यांपर्यंत आणि उपवास ना उद्या वेफर्स आणा हां ! म्हणणाऱ्या गृहिणीपर्यंत वेफर्स सर्वप्रिय आहेत. तळलेला बटाटा, त्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम, वाढती चरबी यावर सगळेच हिरिरीने बोलतील. पण समोर बटाटा वेफर्सचं पाकीट वा डिश आल्यावर मात्र जास्त नको म्हणता म्हणता सगळी डीश कधी संपते कळत नाही. एक वेफर खाऊन गप्प बसणारी मंडळी साधक असावी. सर्वसामान्य पामर मात्र एक, एकसे भले दो, दो से भले तीन म्हणत बॅटिंग करतात, त्यात त्यांचा दोष नाही. हा पदार्थच असा आहे. त्याचा तो केवडय़ासारखा रंग, गोलसर लांबट आकार आणि कुरकुरीत चव कुणालाही प्रेमात पाडणारी. दोन बोटांच्या चिमटीत पकडून वेफरचा तुकडा मोडावा. अगदी सूक्ष्मपणे उडणारे मिठाचे कण चेहऱ्यावर झेलावे. तेलकट तवंग मुखात पसरावा आणि त्या करमकुरम आवाजाने उगाचच उत्साही वाटू लागावे ही भावावस्था आपोआप निर्माण होते. त्या वेफर्ससारखीच कुरकुरीत.

    -- रश्मि वारंग.

    संकलन: संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • महाराष्ट्राचा कृषी दिवस

    शेती ही फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. आपले पूर्वज यांच्या विचारातून या संकल्पनेचा उगम झाला व तो तसाच पुढे चालत राहिला. महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या कालखंडात शेतकऱ्याला खूप महत्वाचे स्थान होते.

  • मुंबईचा जावई’ चित्रपटाची बावन्न वर्षे

    या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. प्रथम तुज पाहता जीव वेडावला, आज कुणीतरी यावे, कारे दुरावा कारे अबोला, कशी करु स्वागता अशी या चित्रपटात गाणी आहेत. या चित्रपटाचे काही चित्रीकरण गिरगावातील खोताची वाडीतील खंडेराव ब्लॉक येथे झाले होते.

  • जागतिक शौचालय दिवस

    जनजागृतीमुळे शहर व ग्रामीण भागात तीन वर्षांत हजारो शौचालये उभारली गेली, परंतु त्याचा प्रत्यक्षात कितपत वापर होतो हा संशोधनाचा विषय आहे. सरकारकडून शौचालय बांधणीसाठी १२ हजार रुपये अनुदान मिळत असल्याने कोणी त्यास नाही म्हणत नाही.

  • गीता जयंती

    पाच हजार वर्षापूर्वी मार्गशीर्ष शुध्द एकादशीला मंगल सुप्रभाती कुरूक्षेत्राच्या रणभूमीवर योगेश्वर श्रीकृष्णाने जीवनाचा दिव्य संदेश, महान विचार दिला.

  • २१ डिसेंबर

    २१ डिसेंबर १९६५ रोजी दादा कोंडके निर्मित व दिग्दर्शित आणि वसंत सबनीस लिखित 'विच्छा माझी पुरी करा' या नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला. वसंत सबनीस यांचे 'विच्छा माझी पुरी करा' हे नाटक म्हणजे सबनीसांच्याच छपरी पलंगाचा वगाचीच रंगावृत्ती आहे. याचे संगीतकार होते तुकाराम शिंदे. ‘विच्छा माझी पुरी करा’ नाटकाने दादा कोंडके यांना सुपरस्टार रंगकर्मी बनवले. दादा कोंडके यांनी या लोकनाट्याचा कुठंही प्रयोग लावला तरी तो हाऊसफुल व्हायचा. त्या काळात दादा कोंडके यांचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या नाट्यनिर्मात्यांच्या नाटकांचा तिकीटांचा दर थोडा चढा असायचा. मात्र दादांनी आपल्या या लोकनाट्यासाठी ‌अगदी ‘जनता दर’ लावला होता. त्यामुळे त्यांचा प्रत्येक प्रयोग लगेचच हाऊसफुल व्हायचा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दादांच्या लोकनाट्याची ‘प्रॉडक्शन कॉस्ट’ खूप कमी होती. रंगमंचाच्या पाठच्या बाजूला एक पडदा असलं की दादांचं काम होऊन जायचं.

    गायिका आशा भोसले यांनी एकदा ‘विच्छा…’चा प्रयोग पाहिला. फक्त एक माणूस प्रेक्षकांना तब्बल साडे चार तास हसवतो, नुसतंच हसवत नाही तर प्रेक्षक खुर्चीवरून खाली पडायचाच तो काय बाकी असतो. अशाप्रकारचं दृश्य आशाताईंनी पहिल्यांदाच पाहिलेलं होतं. हा अनुभव आशाताईंनी प्रख्यात दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांच्या कानावर घातला आणि त्यांनाही हे लोकनाट्य पाहण्याचा आग्रह केला. त्यानुसार काही दिवसांनी आशाताई भालजींसह पुन्हा हे नाटक पाहायला आल्या. ते एवढं रंगलं की आशाताईंनी खूश होऊन दादांच्या युनिटमधील सगळ्यांच्या हातामध्ये सोन्याचं ब्रेसलेट घातलं. त्या नंतर गायिका आशा भोसले यांनी त्या काळी ‘विच्छा माझी पुरी करा' ’चा मुंबईतला एकही प्रयोग पाहायचा सोडला नव्हता. याच सुमारास भालजी ‘तांबडी माती’ या चित्रपटाची निर्मिती करीत होते. दादा किती कमालीचे कलाकार आहेत, हे एव्हाना भालजींना समजलं होतं. त्यामुळे त्यांनी या चित्रपटामधील एका महत्त्वाच्या व्यक्तिरेखेसाठी दादांची निवड केली. दादांनी याच चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

    दादा कोंडके, राम नगरकर यांनी हे नाटक गाजवले होते. राजकीय परिस्थितीवर मार्मिक पद्धतीने भाष्य करत, हळूच चिमटे काढत प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारे 'विच्छा माझी पुरी करा' हे सदाबहार वगनाट्य सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्यांच्यानंतर अभिनेते विजय कदम गेली काही वर्षे सातत्याने 'विच्छा माझी पुरी करा'चे प्रयोग करत होते. 'विच्छा माझी पुरी करा' हे लोकनाट्यातील महत्त्वाचे नाटक आहे.

    आजपर्यंत अनेकांनी या नाटकाचे प्रयोग केले गेले. या वगनाट्याची कथा, त्यातील राजकीय भाष्य आज ही ताजे वाटते. एकेकाळी तमाशा,वगनाट्य हे ग्रामीण आणि असभ्य कलाप्रकार आहेत अशी शहरी समाजाची विचारसरणी होती. परंतु "विच्छा माझी पुरी करा" या नाटकाने ही विचारसरणी बदलण्याचं फार मोठं कार्य करत लोकनाट्य शहरी पांढरपेशी समाजापर्यंत पोहोचवले.कुठलीही कला जितकी आत्यंतिक लोकल असते, तितकेच तिला ग्लोबल अपील असते कारण ती जनसामान्यांच्या संवेदनांशी नाते सांगते. हीच गोष्ट पुन:पुन्हा कराव्याश्या वाटण्या-या "विच्छा माझी पुरी करा"या नाटकाने सिद्ध केली आहे! आणि हेच या नाटकाच सर्वात मोठं बलस्थान आहे. एक दोन नव्हे, तब्बल ५२ वर्षे या वगनाट्याने मराठी प्रेक्षकांना झपाटून टाकलं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट