
बाईपण भारी देवा हा एक अप्रतिम चित्रपट आहे. या चित्रपटात ( मंगळागौर ) या नृत्याला मध्यभागी ठेवून चित्रपटाची कथा उत्तम गुंफलेली आहे.
मनोरंजन करता करता या चित्रपटातून स्त्रियांच्या अनेक समस्या मांडण्याचा उत्तम प्रयत्न केला गेला आहे.
एकाच घरात वाढलेल्या सहा बहीणी पण प्रत्येकीच्या मनात एका बहिणीबद्दल तिरस्कार नाही म्हणता येणार पण राग दाखविलेला आहे. त्यातील एका बहिणीला संतती नसल्याचे दु:ख आहे. ज्याच्यामुळे तिला मानसिक त्रास होत आहे. एकीला ती विधवा असून तिच्या मुलीचा तिच्या सासुवर जास्त जीव आहे ही समस्या भेडसावत आहे. तीसरीला घर आणि नोकरी सांभाळण्यासाठी तारे वरची कसरत करावी लागत आहे. चौथीचा नवरा खुप श्रीमंत आहे पण ती स्वत: काही कमावत नसल्यामुळे नवर्यावर आर्थिक निर्भर असल्यामुळे तिचा स्वाभिमान नवर्याकडून दुखावला जातोय . चौथी कमावती व व्यावसायिक आहे, तिचा हुशार मुलगा परदेशात आहे. पण तिचा नवरा दुसर्या एका तरूण स्त्रीच्या प्रेमात पडल्यामुळे तिच्याकडून काडीमोड मागत आहे. सहावी आहे ती मोठया पदावर नोकरीला आहे पण तिचा नवरा उच्चशि क्षित असूनही नोकरी करत नाही. त्याने लाखो रुपयाचे कर्ज करुन ठेवलेले आहे जे फेडण्याची बायको म्हणून नैतिक जबाबदारी तिच्यावर आलेली आहे. सततच्या मांसिक त्रासामुळे वयाच्या चाळीतच तिला मोनोपॉजचा सामना करावा लागतोय .
या चित्रपटात मोठ्या बहिणीचा नवर्याला या चित्रपटातील सर्वात आदर्श पुरुष म्हणून पाहता येईल. एका विशिष्ट वयाच्या झाल्यानंतर स्त्रिया आपल्या शारीरीक स्वास्थाकडे आपल्या दिसण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांचा जगण्यातील उत्साह कोठेतरी हरवलेला दिसतो. तो उत्साह प्रत्येक स्त्रिने कोठेतरी शोधण्याचा विचार करायला हवा… हे ह्या चित्रपटातून नक्कीच स्त्रियांनी शिकण्यासारखे आहे.
हा चित्रपट संपता – संपता या चित्रपटातील सर्व नायिकेंनी आप – आपला हरवलेला आनंद शोधलेला दिसतो. या चित्रपटात दोन दृष्यात स्त्रिया दारू म्हणजे ( वाईन ) पिताना दिसतात. पण ती कथानकाची गरज होती. एक दुसर्या बहिणीच्या मुलीची सासू वाईन पिताना दाखविली आहे पण ती स्त्री अधुनिक विचारांची असतानाही तिने आपल्या संस्कृतीशी असलेली तिची नाळ तोडलेली नाही हे अधोरेखीत केलेले आहे… दुसर्या वेळेला त्या सर्व बहिणीच्या मनातील भडास बाहेर निघावी म्हणून त्या वाईन पिताना दाखविलेल्या आहे. त्यामुळे हा चित्रपट स्त्रियांच्या दारू पिण्याचे समर्थन करतो असे नाही म्हणता येणार.
चित्रपटाच्या शेवटी त्या सर्व बहीणींनी मिळून जिंकलेली मंगळागौर स्पर्धा म्हणजे नातेसंबंधाचा विजय म्हणून आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यातील समस्यावर मिळविलेला विजय म्हणून पाहता यईल…
सर्वात महत्वाचे म्हणजे या चित्रपटाच्या नावातील भारी हा शब्द अनेक अर्थाने घेता येईल…
त्यामुळे हा चित्रपट लयभारी… आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही.
लेखक – निलेश बामणे