डाळींब फळाचा इतिहास अभ्यासला असता, डाळींबाचे मूळ स्थान इराण समजले जाते.
त्याची लागवड स्पेन, इजिप्त, अफगाणिस्तान, पाकिस्तान, ब्रहमदेश, चीन, जपान, अमेरिका व भारत या देशांमध्ये केली जाते.
अफगाणिस्तानातील कंदहार हे डाळींबाचे आगार मानले जाते.
डाळींब खाण्यासाठी तसेच औषधीसाठीही वापरले जाते.
त्याचा रस काढून बाटल्यात भरून अधिक काळ टिकवता येतो.
रसात साखरेचे प्रमाण १२ ते १६ टक्के असते.
कृष्ठरोगावर डाळींबाचा रस उपयुक्त मानला जातो.
फळाची साल अमांश व अतिसार या रोगांवर गुणकारी आहे.डाळींबातील अन्नघटक :
डाळींबाच्या प्रत्येक १०० ग्रॅम खाद्य भागात पुढीलप्रमाणे अन्न घटक असतात
पाणी ७८ टक्के, प्रथिने १०.६ टक्के, स्निग्ध पदार्थ ४.०१ टक्के, खनिजद्रव्य ०.७ टक्के, तंतुमय पदार्थ ५.१ टक्के, पिष्टमय पदार्थ १४.६ टक्के, कॉल्शियम ०.०१ टक्के, फॉस्फरस ०.०७ टक्के , आयर्न ०.३ टक्के, उष्मांक ६५ कॅलरी, रिबोफ्लेवीन १०० मि.ग्रॅ., जीवनसत्व १६ मि.ग्रॅ हे अन्न घटक समाविष्ठ असतात.
डाळेंब हे पिक जरी सर्वसामान्यपणे कोणत्याही हवामानात येऊ शकत असले तरी झाडाची वाढ व उत्पादन क्षमता समशितोष्ण व कोरडया हवामानात उत्तम असते.
चांगल्या प्रतीची फळे मिळण्यासाठी फळांची वाढ होत असतांना हवेत आद्रतेचे प्रमाण कमी असणे आवश्यक आहे.
दमट हवामानात फळांवर रोग व किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो.तसेच फळे तडकण्याचे प्रमाण जास्त असते.
डाळींबासाठी मध्यम प्रकारची व उत्तम निचर्याची जमीन निवडावी.
जमिनीची निवड केल्यावर उन्हाळ्यात तिची चांगली मशागत करावी.
२-३ वेळेस उभी आडवी नांगरून कुळवून घ्यावी.
हलक्या हलक्या व मध्यम जमिनीत खड्डे तयार करून २० ते २५ किलो शेणखत, १ किलो सुपर फॉस्फेट व चांगल्या मातीच्या मिश्रणाने भरावेत.
सर्वसाधारणपणे चौरस पध्दतीने लागवड केल्यास पावसाच्या १-२ सरी पडून गेल्यावर प्रत्येक खडयात एक याप्रमाणे कलमांची लागवड करावी.
कलमाभोवतालची माती हलक्या हाताने दाबून घेऊन कलम सरळ व ताठ राहील याची काळजी घ्यावी लागते.<डाळींबाच्या प्रमुख जाती :
भारतात डाळींबाचे निरनिराळे प्रकार लागवडीखाली असून त्याच्या फळांचे आकारमान,रंग,गुणवत्ता, बियांचा मऊपणा, चव,दाण्यांचा रंग इत्यादी मध्ये खूपच विविधता आढळते.
आळंदी, मस्कलरेड, काबूल, कंधारी, गणेश, १३७, भगवा/शेंद्री, आरक्ता, मृदूला सिडलेस या जाती असून आज महाराष्ट्रात भगवा / शेंद्री या जातीची सर्वाधिक लागवड आढळून येते.
त्यापाठोपाठ गणेश, आरक्ता व मृदुला या जातीची लागवड उल्लेखनीय दिसते.
डाळींबाच्या झाडाला फुले लागल्यापासून फळ तयार होण्यास साधारण ५ ते ६ महिने लागतात.
आंबे बहाराची ही फळे जून ते ऑगस्ट व मृग बहाराची फळे नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात तयार होतात.
डाळींबावर पडणार्या रोगाने आज सर्वच डाळींब उत्पादकांना त्रासून सोडले आहे.
हा रोग ‘झान्योमोनस’ या जिवाणू् बॅक्टेरियामुळे होतो.
यासाठी स्वच्छता मोहिम, बहार नियोजन, अन्नद्रव्य व्यवस्थापन पीक संरक्षण या ठळक बाबी रोग नियंत्रणासाठी अवलंबविल्या जातात.
रोगांच्या बंदोबस्तासाठी एकात्मिक किड नियंत्रण पध्दतीचा अवलंब करावा.
कीड रोग येण्याआधीपासून बागेची नियमित स्वच्छता ठेवावी.
कल्चरल प्रॅक्टीसेस वापरून कीड रोग नियंत्रणात ठेवावे.
जैविक उपायांचा जास्तीत जास्त वापर करावा.
झाडांची प्रतिकार क्षमता कशी वाढेल याकडे लक्ष द्यावे.