या मातीला जाग केव्हा येणार ?

देवभूमी असणाऱ्या उत्तराखंड मधून आलेल्या या राष्ट्ररक्षकाची महती , या देशाच्या मातीतील प्रत्येक कणाला का नव्हती , हेच कोडे उलगडत नाही , आणि म्हणून वाटत राहते की, या मातीला जाग तरी केव्हा येणार ?



सकाळपासून या एका प्रश्नाचं उत्तर मी शोधतोय .

प्रश्न केवळ वर्तमानकाळातला नाही .
तो भूतकाळातील पण आहे आणि दुर्दैवाने भविष्यातही तो राहणार आहे .
संदर्भ बदलतात . काळ बदलतो . माणसेही काळानुसार वेगवेगळी असतात .
पण भूभाग तोच असतो .
त्यावरच्या वृत्ती-प्रवृत्ती त्याच , तशाच असतात .
माती तीच असते. त्यावर पडणारे पाणी तेच असते . तेच हवामान , तेच पर्यावरण , तोच सूर्यप्रकाश …सर्व काही तेच ते असते .

पण त्या मातीत रुजलेल्या काही वृक्षवल्ली कुजलेल्या मनोवृत्तीच्या का निपजतात ?

अशावेळी वाटून जातं ,
या मातीला जाग तरी केव्हा येणार ?

बिपीन रावत यांचं अकाली जाणं , हा नियतीनं लिहिलेला ललाटरेख नक्कीच नसावा .

त्यांची कारकीर्द , शत्रूराष्ट्रांसाठी कर्दनकाळ स्वरूपाची होती .

त्यांची कारकीर्द , सर्व सैन्यदलांसाठी प्रेरक , कार्यप्रवण करणारी , खंबीर , आश्वासक , दुर्दम्य इच्छाशक्तीचा प्रत्यय देणारी , त्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाचा शोध आणि वेध घेणारी , त्यासाठी अत्याधुनिक शस्त्रांचं बळ पुरवण्याचा आग्रह धरणारी अशीच होती .

त्यांच्या कारकिर्दीला , प्रखर राष्ट्रभक्ती असणाऱ्या राष्ट्रप्रमुखांचे कोंदण लाभले होते .

त्यांच्या कारकिर्दीला , सीमेवरील स्फोटक परिस्थितीच्या ज्वालामुखीचे आव्हान होते .
आणि तसे आव्हान पेलताना त्यांनी शत्रू राष्ट्रांना ठणकावून सांगितले होते ;
” पहिली गोळी आम्ही झाडणार नाही पण नंतर आम्ही झाडलेल्या गोळ्यांचा हिशोब ठेवणार नाही ! ”
अशी शत्रूला थरकापवणारी आणि स्वदेशाला आश्वासक करणारी सार्थ गर्वोक्ती त्यांच्याजवळ होती .

एका कुटुंबप्रमुखाची सर्वसमावेशक भूमिका असावी तशी त्यांची कारकीर्द होती .
सैन्याचं मनोबल कधीच कमी होत नाही , हा त्यांच्या कारकिर्दीचा पाया होता .
भारतीय सैन्य कधीच खोटं बोलत नाही आणि अंगावर पडलेली जबाबदारी कधीच झटकत नाहीत , उलट प्राणपणानं सैन्य झगडत असतं , संघर्ष करीत असतं , मदतकार्य करीत असतं , मग ती जागा सीमावर्ती असो वा देशांतर्गत असो , हा त्यांचा सैन्याबद्दलचा प्रगाढ विश्वास होता .

देवभूमी असणाऱ्या उत्तराखंड मधून आलेल्या या राष्ट्ररक्षकाची महती , या देशाच्या मातीतील प्रत्येक कणाला का नव्हती , हेच कोडे उलगडत नाही , आणि म्हणून वाटत राहते की, या मातीला जाग तरी केव्हा येणार ?

आतंकवाद्यांच्या बाबतीत देशद्रोही असणारे तथाकथित मानवाधिकारवादी जितके जागरूक असतात आणि देशाचा विचार न करता केवळ दहशतवाद्यांचा , त्यांच्या कुटुंबीयांचा विचार करतात , तितका भारतीय सैन्याचा विचार ते का करत नाहीत ? आपलं सैन्य हे तथाकथित मानवाधिकारवाद्यांच्या दृष्टीने माणसं नाहीत ? आपल्या सैन्याच्या कुटुंबीयांचा ते विचार का करीत नाहीत ?

राष्ट्ररक्षणासाठी भारतीय सैन्याने शत्रूवर केलेल्या कारवाईवर अविश्वास दाखवणं हे कुठल्या देशभक्तीत येतं ? आपलं राष्ट्र समर्थ्यसंपन्न बनावं म्हणून आयात केलेल्या वा करण्यात येणाऱ्या शस्त्र सामग्रीत , तंत्रज्ञानात दलाली खाणारे या मातीत कमी नाहीत , त्यांची दलाली बुडाली म्हणून आता राजकारण करणारे या मातीचे कधी झालेच नाहीत . घरभेदी हा या मातीला मिळालेला शापच आहे , पण अशा घरभेदीना , आपली माती का ओळखत नाही ? देशावर होणाऱ्या आघातानंतर आनंदी होणारे , समाज माध्यमावर तो आनंद व्यक्त करणारे या मातीत पिकणारे धान्य खाऊन माजले आहेत , अशावेळी वाटतं

या मातीला जाग तरी केव्हा येणार ?

या मातीच्या आधारानं जगणाऱ्यांना सीमेवरच्या तणावाचं भान कसं नाही ?

शस्त्रास्त्रांच्या बाबतीत आपण स्वावलंबी होत आहोत हे कळत कसं नाही ?

गल्लीबोळात वाढणाऱ्या विषवल्ली उपटून फेकायला हव्यात , किमान त्यांना ओळखता यायला हवं , हे भान सुबुद्ध नागरिकांना का येत नाही ?

एकीचं सामर्थ्य जाणण्यात आम्ही कुठे कमी पडतो ?

अखंड सावधानता हा मंत्र आम्ही आचरणात का आणत नाही ?

आपल्या अकाली जाण्यानं बिपीनजी , असे असंख्य प्रश्न उभे राहत आहेत .

या मातीची परंपरा ओजस्वी होती . समर्थ्यसंपन्न , संस्कृतीसंपन्न भूतकाळ हा सुवर्णकाळ होता .
पराक्रमाचे तेज शत्रूला नामोहरम करणारे होते . पण तो भूतकाळ होता. त्या भूतकाळाला सुद्धा घरभेदीनी ग्रासले होते . पण आपल्यासारख्या शूर योध्यानी तेव्हाही भारतभूमीला पुन्हा उर्जितावस्था प्राप्त करून दिली होती . तोच वारसा आपण चालवत होता .

पण…
माती तीच आहे ना ?
घरभेदी बदलले तरी वृत्ती तीच आहे ना ?

स्वर्गीय जनरल बिपीनजी रावत

आपल्याला आदरांजली वाहताना माझ्या मनातल्या प्रश्नाचं रौद्ररूप समोर येतंय .

– डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
८९५१९०६७०१

Author