सरतेच आहे आयुष्य सारे
तरी मी कोण कळले नाही
धावलो, मी मृगजळापाठी
कां? कसा ते कळले नाही
लाभली नाती ऋणानुबंधी
ओढ कधी जाणवली नाही
भावनां, साऱ्याच कोरड्या
मनांतर कधी भिजले नाही
जगणे सारेच भोग भाळीचे
मी त्यास कधी टाळले नाही
जे लाभले ते निमूट भोगीले
त्रागा कधीच मी केला नाही
सत्संगास मी सदा भुकेलेला
तो मार्ग कधीच सोडला नाही
प्रारब्धयोगा भोगूनी संपवावे
हा विचार मी अव्हेरला नाही
विवेके केवळ सत्कर्म करावे
सूत्र! जगण्याचे भुललो नाही
कधीतरी भेटेलही तो भगवंत
ही मनीषा कधी सोडली नाही
— वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. ८६.
१९ – ३ – २०२२.