पल्याड नेते कधी कधी..

स्वामी निश्चलानंदांची एक कविता



किती विसरले तरीहि स्मरते नकोच ते-ते कधी कधी
तरल सयींचा हिंदोळा, मन झुलून घेते कधी कधी..

प्रयत्न करुनी कधी न मिळते हवे तेवढे हवे तसे,
निराशेतही आशा ठिणगी हळूच चेते कधी कधी..

जगात कोणी कधी कुणाचे झाले नाही कायमचे, मन हे
ओळख तरी कुणाची करून घेते कधी कधी..

शत्रू दूरच, बुद्धिबळाची प्यादी सुद्धा पछाडती,
हौस भागण्या तरी म्हणावे स्वत:स जेते कधी कधी..

कुवत नसावी, तरी शहाणे उंटावरचे बनायचे,
मिरवुन घेण्या उगाच संधी चालुन येते कधी कधी..

रखडत खुरडत चालत असता स्वप्न पहाणे मना नसे,
निदान मन हे क्षितिजाच्या पल्याड नेते कधी कधी..

— स्वामी निश्चलानंद

Author