करोना’ ह्या शब्दाची दहशत सध्या संपूर्ण जग अनुभवतंय. आताच्या अत्याधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाच्या ह्या युगात नुसत्या डोळ्यांनी दिसूही न शकणाऱ्या एका विषाणूमुळे जगाची अवस्था ‘गोठल्यासारखी’ होईल अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. सत्य हे कल्पनेपेक्षाही अद्भुत असते याचा अनुभव सध्या येतोय. आज ना उद्या लाॅक डाऊन उठेल. पण पुढे काय ? हा भयचकीत करणारा प्रश्न प्रत्येकापुढे आ वासून उभा आहे.
‘साहित्य’ हा समाजमनाचा आरसा असतो. माणसाला व्यक्त व्हावेसे वाटते. ती त्याची मानसिक गरज असते. व्यक्त होण्याचे प्रकार निरनिराळे. त्यातलाच एक प्रकार ‘पांढ-यावर काळे’ करणे किंवा साहित्यनिर्मिती. काळानुरूप हे ‘पांढ-यावर काळे’ काॅम्प्यूटर’ किंवा स्मार्ट फोनच्या स्क्रीनवर व्हायला लागले आहे.
लाॅकडाऊन उठल्यानंतर ‘जगण्याचा संघर्ष’ तीव्र होईल. संशय, अनिश्चितता, भीती या भावना कमीअधिक प्रमाणात सर्वांच्याच मनाला व्यापून टाकतील. मग अशा परिस्थितीत साहित्यनिर्मिती कशी होणार ? ही शंका निरर्थक आहे. कारण अशा संघर्षमय वातावरणात व्यक्त होण्याची गरज उलट अधिक तीव्र असते. “”भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली’ असं दलित कवीने म्हटलंय. त्याऐवजी ‘करोना संकटातून मार्ग काढताना जीवाची फरफट झाली’ अशासारखी कविता निर्माण होईल कदाचित. पण साहित्य निर्माण होणार हे नक्की. जगाचा इतिहास आणि विविध भाषांमधील दर्जेदार साहित्य पाहिले तर खडतर परिस्थिती आणि संघर्षमय वातावरणातच बावनकशी साहित्य निर्माण झालेले दिसून येते.
‘माझी माय सरसोती, माले शिकविते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपितं पेरली’ म्हणणाऱ्या बहिणाबाई चौधरी रूढार्थाने अशिक्षित. पण त्यांच्या अनुभवातून उतरलेला असामान्य प्रतिभेचा आविष्कार ‘शंभर नंबरी’ सोनं. पु.ल. देशपांडे यांच्या अफलातून व्यक्ती आणि वल्ली किंवा “”मी आणि माझा शत्रुपक्ष”” सारखे निवडक विनोदी लेखन अगदी आजच्या टीन एजर मुलांनाही बेफाट आवडते कारण अस्सल अनुभवातून, असामान्य प्रतिभेचे कोंदण लेवून ते आजही झगमगते आहे.
सध्याच्या लाॅक डाऊनच्या काळातदेखील भीती, अनिश्चितता यावर मात करून, संकटाला अंगावर घेत लोक व्यक्त होत आहेत, विनोदी अंगाने संकटाची खिल्ली उडवून त्याची तीव्रता कमी करत आहेत. स्वतःला आणि इतरांना धीर देऊ पहात आहेत.
करोनाच्या जागतिक महामारीमुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. अविकसित किंवा विकसनशील देशांना तर बेरोजगारी, दारिद्र्य, लोकसंख्येचा विस्फोट, अपुरी संसाधने या समस्या अधिक तीव्रतेने भेडसावणार आहेत.
अमेरिका आता ‘एकमेव महासत्ता’ किंवा ‘पृथ्वीवरचा स्वर्ग’ राहिलेली नाही. भारतात मा. पंतप्रधानांनी ‘आत्मनिर्भर भारत’ ची घोषणा केली आहे. या सगळ्याचे पडसाद करोनानंतरच्या साहित्यात उमटतील.
संकटावर मात करण्याची जिद्द, संघर्षमय परिस्थिती व्यक्त व्हायला भाग पाडेल आणि असामान्य, उत्कृष्ट साहित्य निर्माण होईल. कदाचित लिखित माध्यमाऐवजी ‘स्क्रीन’ वरून लोक व्यक्त होतील. दीर्घ कथा कादंब-यांऐवजी काळानुरूप ‘झटपट’ आणि सुटसुटीत लिहितील. पण ते काळजाला भिडणारे असेल.
अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला असे सागराला ठणकावून सांगणाऱ्या कोलंबसाची ‘विजिगिषु’ वृत्ती हे मानवजातीचे वेगळेपण आहे.
देव दानवांनी समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून हलाहल आणि अमृत हे दोन्ही बाहेर पडले. तद्वतच वेदना, धडपड, संघर्ष याचे हलाहल पचवून निर्माण होणारे करोनानंतरचे साहित्य अजरामर ठरेल.
©️ – रश्मी साठे
दि. 30-05-2020