निमित्त : १

उरी ‘ पुन्हा पाहिला आणि त्यानंतर लगेचच ‘ ऍक्सिडेंटल प्राइमिनिस्टर ‘ पाहिला , आणि खरं सांगतो राहवलंच नाही. लेखणी पुन्हा हाती घेतली.



उरी ‘ पुन्हा पाहिला आणि त्यानंतर लगेचच ‘ ऍक्सिडेंटल प्राइमिनिस्टर ‘ पाहिला , आणि खरं सांगतो राहवलंच नाही. लेखणी पुन्हा हाती घेतली .

खरं तर या दोन्ही विषयांवर समाजमाध्यमात खूप लिहिलं गेलं आहे. तरीही मी पुन्हा पुन्हा गुंतत गेलो त्या उरी नावाच्या स्फुल्लिंग चेतविणाऱ्या चित्रपटाच्या विषयात .
मुळात तो चित्रपट नाहीच .
ती एक धगधगती , जाळून भाजून काढणारी वीज आहे, एक अंगार आहे आणि प्रत्येक देशभक्ताच्या मनातला केव्हाही उद्रेक होऊ शकणारा ज्वालामुखी आहे.
सर्जिकल स्ट्राईकच्या स्वरूपातील उरीचा घेतलेला बदला असं जरी वरकरणी वाटणारं कथानक असलं तरी त्यापाठी प्रत्यक्षात किती काय शिजलं असेल, किती, काय, कोणत्या स्वरूपातील राजनैतिक प्रसंगांना सामोरं जावं लागलं असेल, प्रचंड गोपनीयता ठेवताना संबंधितांचा संयम किती ठेवावा लागला असेल , या देशातल्या गद्दार नेत्यांच्या आणि मीडिया नामक टी आरपी साठी वखवखलेल्या भुतांच्या नजरेपासून किती सांभाळावं लागलं असेल ,त्याची एक टक्का का होईना कल्पना येते .
देशातल्या आणि विशेषतः दिल्लीतील दरबारी राजकारणापासून सर्वाना दूर ठेवीत खंबीर मनाने आदरणीय पंतप्रधान मोदीजी, त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि ज्यांनी हे सर्व घडवून आणलं ते आदरणीय सैनिक आणि सर्व सैन्यधिकारी यांच्या मनातील अस्वस्थता , पाकड्याना धडा शिकविण्याची दुर्मिळ जिद्द ,देशवासीयांच्या मनातील पाक बद्दलचा संताप ,हे सर्व जुळवून आणायला जी धोरणात्मक आक्रमकता लागते त्याचं विलक्षण अनुकरणीय उदाहरण म्हणजे सर्जिकल स्ट्राईक.
एक्सिडेंटल प्राइमिनिस्टर बघताना वाटलं , या पंतप्रधानांच्या काळात ,त्यांना हा असा निर्णय घेता आला असता ?
एका अत्यंत हुशार माणसाला, दरबारी , जी हुजूर ,हलकट हलक्या कानांच्या तथाकथित माणसांनी हे होऊ दिलं असतं?
हा चित्रपट बघताना वाटलं , मोदी येण्यापूर्वी आपला देश नेमकं कोण चालवत होतं ?
रशिया ? चीन? अमेरिका ? इटली ?
की भारताबद्दल दुहेरी निष्ठा ठेवणारे तथाकथित पुरोगामी ? की वामपंथी ? की नक्षलवाद्यांबद्दल सहानुभूती असणारे विचारवंत?
की देशातील सगळ्या संपत्तीचे आजन्म वारसदार समजणारे गांधी घराणे ?की त्यांच्या आड राहून ,यादेशातील सर्व सुखोपभोग घेण्यासाठी , पैसा ओरबडण्यासाठी आपापले सवतेसुभे निर्माण करणारे तथाकथित लोकप्रतिनिधी ?
हा देश कुणाचा ?
लोक तुम्हाला निवडून कशासाठी देतात ?
निवडून आल्यावर ,पक्ष, जनता , विचारसरणी यांना तिलांजली का देता ?
असे किती तरी प्रश्न मनात उभे राहिले.
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे केवळ आपल्या हातात आहेत हे जनतेच्या कसं लक्षात येत नाही ?
पाचशे , हजार च्या बदल्यात आपलं मत विकताना आपल्या आया बहिणींची अब्रू आपण विकतो आहोत अशा प्रकारची भावना लोकांच्या मनात का निर्माण होत नाही ?
आणि मग महागाई झाली, भ्रष्टाचार वाढला, नेत्यांनी आपला देश विकायला काढला, विकास झाला नाही अशा आरोळ्या मारताना याच जनतेला लाज कशी वाटत नाही ?
हे सगळं मनात येतं , आणि वाटतं सैनिकांना काय वाटत असेल ?
जीवावर उदार होताना, या देशातल्या नेत्यांच्या कुपमंडूक वृत्तीमुळे आपली हानी होतेय हा विचार त्यांच्या मनात आला तर…
त्यांच्या मनातला देशभक्तीचा अंगार विझून जाईल .
लढण्याची उमेद संपेल.
आणि भारतमातेचं विदीर्ण रूप पुढच्या पिढ्यांना पाहावं लागेल.
म्हणून…
आपणच विचार करायला हवा .
खंबीर नेत्यांच्या आणि तितक्याच खंबीर सैनिकांच्या पाठीशी आपलं नैतिक बळ उभं करायला हवं .
उरीच्या निमित्ताने मला असं वाटलं, आपल्याला …?
***
–डॉ.श्रीकृष्ण जोशी,
रत्नागिरी.
****
लेख नावासह शेअर करायला हरकत नाही .

Author