छत्रपती संभाजी महाराजांचा ‘झंझावात’
Category:
लेखसंग्रहमाझ्या मावळ्यांनो, प्रजाजन हो, गेली ३४३ वर्षे दाबून ठेवलेल्या मनातील काही गोष्टी आज सांगाव्याशा वाटतायत् ! आम्हाला माहित आहे “आत्मा बोलतो” यावर आजच्या बुध्दिवादी लोकांचा विश्वस बसणार नाही.पण जे काही तुम्ही ऐकणार आहात ते ऐकून पूर्ण झाल्यावर तुम्हाला त्यातील सुसूत्रता पटेल आणि लक्षांत येईल की आम्ही जे बोललो तो गेल्या ३९३ वर्षांतील म्हणजेच आमच्या जन्मापासून ते आमच्या शारीरीक निर्वाणा पर्यंतचा घटनाक्रम अर्थात् इतिहास आहे आणि इतिहास कधी खोटा असेल काय हे तुम्हीच ठरवा !
त्याआधी आम्ही तुम्हांस ३४४ वर्षे मागे नेतो…..
आज चैत्री पौर्णिमा – रामभक्त हनुमानाची जयंती – म्हणजे तुमच्या आजकालच्या “इंग्रजा”ळलेल्या भाषेत ३-एप्रिल ! गेल्या अकरा दिवसांत आम्ही आसन्नमरण अवस्थेत आहोत आणि आज वैद्यराजांच्या औषधाच्या मात्रा पण पोटात ठरत नाहियेत.अंगाची नुसती काहिली होत्येय.सभोवताली काय चाललंय काही कळत नाही , अंतर्मनात जाणवत्येय ती फक्त गोमाजीबाबा पानसंबळ, महादेव आणि मनोहारी या सेवकांच्या डोळ्यांतील आर्त भाव ! राजाराम तर गेल्या अकरा दिवसांपूर्वीच स्वतःला “पोरका” समजू लागलाय ! शेवटी त्यांनाही महाराणींचे आणि रायगडावरील विषवल्लींचे फुत्कार ऐकू गेले असणारच !