(User Level: User is not logged in.)

शैक्षणिक

Sort By:

  • ठशांचं ‘वय’

    दोन माणसांच्या बोटांचे ठसे कधीच सारखे नसतात. त्यामुळे गुन्ह्यांची उकल करण्यात बोटांचे ठसे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र ठशांचा हा पुरावा फसवाही ठरू शकतो. कारण जर हे ठसे गुन्हा घडण्याच्या अगोदरच किंवा गुन्हा घडल्यानंतर उमटलेले असले, तर गुन्ह्याचा तपास चुकीच्या दिशेनं जाण्याची शक्यता असते. त्यामुळे हे ठसे केव्हा उमटले असावेत याची माहिती मिळू शकली, तर गुन्ह्याचा तपास योग्यरीत्या होऊ शकेल. यासाठी ठशांचं ‘वय’ शोधण्याचे प्रयत्न गेली काही वर्षं चालू आहेत; परंतु संशोधकांना यात अजून यश आलेलं नाही. मात्र नजीकच्या भविष्यकाळात हे शक्य करणारं संशोधन, अमेरिकेतल्या ‘आयोवा स्टेट युनिव्हर्सिटी’ या विद्यापीठातील यंग जीन ली यांनी अलीकडेच केलं आहे. यंग जीन ली यांनी अँड्रयू पॉलसन यांच्या सहकार्यानं केलेलं हे संशोधन अमेरिकन केमिकल सोसायटीच्या ‘सेंट्रल सायन्स’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालं आहे. हे संशोधन म्हणजे यंग जीन ली यांनी तीन वर्षांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या स्वतःच्या संशोधनाचा पुढचा टप्पा आहे.

    आताच्या या अभ्यासात या संशोधकांनी एकाच व्यक्तीच्या बोटांचे चौदा ठसे घेतले. त्यानंतर हे ठसे ज्या काचांवर घेतले, त्या काचा प्रयोगशाळेतच, परंतु उघड्यावर ठेवल्या. त्याचबरोबर त्यांनी प्रयोगाच्या काळातलं, प्रयोगशाळेतलं तापमान, आर्द्रता, हवेतील ओझोनचं प्रमाण, इत्यादी सर्व गोष्टींची काटेकोर नोंद ठेवली. त्यानंतर त्यांनी, या चौदा ठशांचं वेगवेगळ्या दिवशी रासायनिक विश्लेषण केलं. सुरुवातीला मोजक्या रासायनिक पदार्थांचं मिश्रण असणाऱ्या या पदार्थांना, हवेतल्या ओझोनशी झालेल्या रासायनिक क्रियांमुळे अधिकाधिक गुंतागुंतीचं स्वरूप येऊ लागल्याचं या संशोधकांना आढळलं. या ठशांतील ट्रायअसाइलग्लिसेरॉल या रसायनाचं प्रमाण सात दिवसांत, तर स्क्वॅलिन या रसायनाचं प्रमाण तीन दिवसांत लक्षणीयरीत्या कमी झालं होतं. मात्र त्याचबरोबर या रासायनिक क्रियांत तयार होणाऱ्या डेकॅनॉइक आम्लासारख्या स्निग्धाम्लांचं, तसंच इतर अनेक रसायनांचं प्रमाण वाढत गेलं होतं. ओझोनशी क्रिया होऊन नष्ट होणाऱ्या रसायनांची, तसंच या क्रियेतून निर्माण होणाऱ्या रसायनांची, त्यांच्या प्रमाणानुसार तपशीलवार माहिती या विश्लेषणातून मिळाली. यांतील कोणत्या रसायनांच्या प्रमाणात काळानुरूप होणाऱ्या बदलाचा, ठशांचं वय काढण्यासाठी उपयोग होऊ शकतो, याचा अंदाज या संशोधकांना येऊ शकला.

    यंग जी लीन आणि अँड्रयू पॉलसन यांचे हे प्रयोग प्राथमिक स्वरूपाचे आहेत. या प्रयोगांत अधिक सुधारणा करण्याच्या दृष्टीनं यापुढचे प्रयोग केले जाणार आहेत. याशिवाय पुढचे प्रयोग हे अनेक व्यक्तींवर केले जाऊन, त्यांतून सर्वंकष स्वरूपाची माहिती गोळा केली जाईल. या माहितीच्या विश्लेषणासाठी वेगळी संगणकीय पद्धतीही विकसित केली जाईल. त्यामुळे या तंत्रातील अचूकता वाढून, गुन्ह्याच्या तपासातील अचूकताही वाढण्याची खात्री या संशोधकांना वाटते आहे. किंबहुना फक्त हे संशोधकच नव्हे तर, गुन्ह्यांचा शोध घेणारे तज्ज्ञही या तंत्राबद्दल अपेक्षा बाळगून आहेत. अमेरिकेतल्या व्हर्जिनिआ राज्याच्या न्यायवैद्यक विभागातील रसायनशास्त्रतज्ज्ञ कार्ल डेसिल यांनीही, यंग जीन ली आणि अँड्रयू पॉल यांचं हे संशोधन, गुन्ह्यांच्या तपासाच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र या तंत्राचं प्रमाणीकरण होण्यास काही वेळ लागणार आहे. विश्लेषणात्मक रसायनशास्त्रात होत असलेली प्रगती पाहता, हा काळ फार मोठा असणार नाही हे नक्की!

    (छायाचित्र सौजन्य - byrev/Pixabay and Young Jin Lee, et al)

  • ममींची कार्यशाळा

    ममी हा इजिप्तच्या पुरातन इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. ममी म्हणजे इजिप्तच्या राजघराण्यातील, तसंच तिथल्या सधन लोकांची, प्रक्रियेद्वारे जतन करून ठेवलेली शवं. ममीद्वारे मृताचा अनंताकडचा प्रवास सुरू होत असल्याचं मानलं जायचं. त्यामुळे ममी ही अगदी रूढीपूर्वक तयार केली जायची.

  • हिमनद्यांचा इतिहास

    पृथ्वीवर आज जवळपास दोन लाख लहान-मोठ्या हिमनद्या अस्तित्वात आहेत. यांतील काही हिमनद्या अंटार्क्टिकासारख्या अतिथंड ध्रुवीय प्रदेशात आढळतात, तर काही हिमनद्या पृथ्वीवरच्या विविध पर्वतांवर आढळतात. पृथ्वीवर आढळणाऱ्या या सर्व हिमनद्यांचं अस्तित्व पृथ्वीवरील हवामानावर अवलंबून आहे.

  • पहिले घोडेस्वार?

    घोडा हा आपलं जंगली स्वरूप सोडून माणसाच्या घनिष्ट संपर्कात सर्वात प्रथम सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी आला असावा. हे घडून आलं ते बहुधा काळ्या समुद्राच्या उत्तरेला असणाऱ्या युरेशिआ स्टेप या गवताळ पठारी प्रदेशाच्या पश्चिम भागात. घोडा माणसाळला गेल्यावर त्याचा उपयोग प्रथम दुधासाठी आणि मांसासाठी केला गेला असावा.

  • रेणुगंधांचा शोध

    माणूस आपल्या नाकाद्वारे विविध गंध ओळखतो, वेगवेगळ्या गंधांतला फरक सांगू शकतो. एखाद्या रसायनाचा गंध ओळखणं म्हणजे, त्या रसायनाच्या रेणूंची आपल्या घ्राणेंद्रियांशी झालेली क्रिया असते. मात्र एखाद्या रसायनाचा वास नक्की कसा आहे, हे त्या रसायनाच्या रेणूच्या रचनेवरून निश्चितपणे सांगणं, शक्य असतंच असं नाही. रसायनाच्या रेणूच्या रचनेतील, अणूंच्या काही ठरावीक गटांवरून त्या रसायनाच्या वासाचा अंदाज बांधता येत असला, तरी त्याला मर्यादा आहेत. अनेकवेळा जवळपास सारखी रेण्वीय रचना असणाऱ्या दोन रसायनांचा वास वेगळा असू शकतो.

  • किपचोगेचं यश

    मॅरॅथॉन शर्यत ही अ‍ॅथलेटिक्समधली एक अत्यंत प्रतिष्ठेची शर्यत आहे. सुमारे बेचाळीस किलोमीटर अंतराच्या या शर्यतीत धावपटूच्या शारीरिक क्षमतेचा पूर्ण कस लागतो. साहजिकच या स्पर्धेकडे फक्त क्रीडातज्ज्ञांचंच नव्हे, तर संशोधकांचंही लक्ष असतं. गेल्या शतकाच्या सुरुवातीला सुमारे तीन तासांत पूर्ण केली जाणारी ही शर्यत, आजचे खेळाडू ती जवळपास दोन तासांत पूर्ण करू लागले आहेत.

  • केळ्यांतली गुंतागुंत

    केळ्याचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न बराच पूर्वीपासून सुरू आहे. लागवड केली जाणारी आजची केळी ही केळ्यांच्याच विविध जाती-उपजातींत झालेल्या संकरातून निर्माण झाली आहेत. आजच्या मुसा अ‍ॅक्युमिनाटापासून निर्माण झालेल्या केळ्यांत, या जातीच्या जनुकांबरोबरच इतर काही जंगली केळ्यांतील जनुकही अस्तित्वात असल्याचं पूर्वीच माहीत झालं आहे.

  • ध्रुवीय प्रकाश – विषुववृत्ताजवळचा

    सुमारे ४१,००० वर्षांपूर्वी घडून आलेल्या या पृथ्वीवरील चुंबकीय बदलांत, चुंबकीय ध्रुवांची जागा मोठ्या प्रमाणात सरकली होती. तसंच त्यांच्या तीव्रतेतही मोठा बदल झाला होता. चुंबकत्वातील बदलाच्या घटना अधूनमधून घडून येत असल्या तरी, पृथ्वीच्या चुंबकत्वातला या वेळचा बदल खूपच मोठा असल्यानं लक्षवेधी ठरला आहे. या लक्षवेधी घटनेची झलक त्या काळी विषुववृत्तावरील ‘ध्रुवीय’ प्रकाशाद्वारे दिसून आली असल्याचं, आताचं हे संशोधन दर्शवतं.

  • जीवोत्पत्ती – किरणोत्सर्गाचा हातभार?

    अमिनो आम्लं ही पृथ्वीवरच्या जीवसृष्टीची अविभाज्य घटक आहेत. या अमिनो आम्लांपासूनच आपल्या शरीरातली विविध प्रथिनं तयार होतात. ही अमिनो आम्लं म्हणजे एक प्रकारची नायट्रोजनयुक्त आम्लं आहेत. पृथ्वीवरच्या जीवसृष्टीची सुरुवात होत होती, तेव्हा ही आम्लं अमोनिआ, मिथेन, हायड्रोजन सायनाइड, पाणी यासारख्या साध्या रसायनांच्या मिश्रणापासून निर्माण झाली असावीत. ही निर्मिती आकाशात कडाडणाऱ्या विजेच्या मदतीनं झाली असण्याची एक शक्यता, पूर्वीच्या संशोधनातून दिसून आली आहे.

  • ‘निस्तेज’ होणारी पृथ्वी

    सिरिस उपकरणांनी गेली काही वर्षं, कमी उंचीवरील ढगांकडून होणाऱ्या प्रारणांचं प्रमाण कमी होत असल्याचं नोंदवलं आहे. कमी होणारं प्रारणांचं हे प्रमाण, कमी उंचीवर पूर्वीइतके ढग तयार होत नसल्याचं दर्शवतं. कमी उंचीवरील ढगांचं कमी प्रमाणात निर्माण होणं आणि चंद्रावरचा पृथ्वीप्रकाश कमी होणं, हे एकाच वेळी घडत असल्याचं या संशोधकांना आढळलं. कमी उंचीवरील ढगांच्या प्रमाणाचा आणि पृथ्वीप्रकाशाच्या तीव्रतेचा थेट संबंध या तुलनेतून स्पष्ट झाला. कमी उंचीवरचे ढग हे सूर्यप्रकाश अधिक प्रमाणात परावर्तित करतात. या कमी उंचीवरील ढगांचं प्रमाण कमी होत असल्यानंच, पृथ्वीकडून सूर्यप्रकाश परावर्तित करण्याचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळेच पृथ्वी निस्तेज होत चालली आहे.