शिर्डीचे साईबाबा मंदिर: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी हे गांव साईबाबांच्या वास्तव्यामूळे आधुनिक पर्यटन स्थळ म्हणून मान्यता पावले आहे. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास या मुळे शिर्डी लाखो भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे.
शनी-शिंगणापूर: शनि-शिंगणापूर हे स्थान नेवासे तालुक्यात आहे. येथे श्री शनिदेवाचे मंदिर नसून, उघड्या चौथर्यावर (शनिदेवरूपी) शिळा आहे. या गावातील घरांना दरवाजे नाहीत, तसेच घरातील कपाटांना कुलुपे नाहीत, येथे चोरी होत नाही, हे या भागाचे वैशिष्ठ्य आहे. शनि-अमावास्येला येथे भाविक प्रचंड संख्येने शनी दर्शनासाठी येतात.
रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर: अकोले तालुक्यात रतनगड हा पुरातन किल्ला असून याच्या पायथ्याशी ११ व्या शतकात बांधलेले अमृतेश्र्वराचे मंदिर आहे. अकोले तालुक्यातील हरिश्र्चंद्र गडावर हरिश्र्चंद्राचे हेमाडपंती मंदिर आहे. या गडावर मुळा नदीचा उगम असून, याच गडावर चांगदेवांनी तत्त्वसार हा ग्रंथ लिहिला. संगमनेर तालुक्यात पेमगिरी नावाचा वैशिष्ट्यपूर्ण गड आहे या किल्ल्यावर शहाजीराजांनी मूर्तझा निजामशहाला राज्याभिषेक केला होता.
भुईकोट किल्ला: इ.स. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. पी.सी.घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ शब्दबद्ध केला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान व मौलाना आझाद यांनी गुबार – ए – खातिर हे ग्रंथ याच शहरात लिहिले.
सिध्दटेक: अष्टविनायकांपैकी एका गणपतीचे- श्री सिद्धिविनायकाचे- स्थान कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे आहे. येथील उजव्या सोंडेचा श्री सिद्धिविनायक लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे.
याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यात चिंकारा व माळढोक अभयारण्य, रेणुकामाता मंदिर (केडगाव), जगदंबामाता मंदिर (टाहाकरी), भगवानगड, हरिश्चंद्रगड, चांदबिबीचा महल, भंडारदरा धरण, दायमाबाद (पुरातत्वीय उत्खनन स्थळ), निळवंडे धरण (प्रवरा नदीवरील धरण), मुळा धरण (मुळा नदीवरील धरण) ही महत्वाची पर्यटनस्थळे आहेत.