शुक्रवारची कहाणी (आजच्या काळातील)

(Gold)
आटपाट नगर होतं तिथं एक गरीब कुटुंबातील पाच जण कसे बसे दिवस काढत होते. पौरोहित्य आणि चार पाच ठिकाणी देवपूजा यातून जे मिळायचे ते समजून घेऊन आनंदात रहात होते. मोठय़ा मुलीला असेच खातेपिते घर बघून लग्न करून दिले. गावातील लोकांनी थोडा हातभार लावला होता. एक जबाबदारी आणि खायचे तोंड कमी झाले. नतंरचे दोन मुलगे सरकारी शाळेत शिकत होती. अचानक वडिलांना आजार झाला आणि त्यातच ते देवाघरी गेले. मोठा यंदा दहावीत होता. म्हणून कशी बशी परीक्षा दिली. पास झाला. मग पौरोहित्य करु लागला पण आता पहिल्या सारखे वातावरण राहिले नाही. त्यामुळे दुकानात हिशेब लिहिण्याची नोकरी करु लागला. अशीच एक गरीब घरातील मुलगी सांगून आली. सणवार. आणि सवाष्ण म्हणून काही बाही मिळायचे याची सोय होईल म्हणून लग्न करणे आवश्यक होते ते झाले. उमा नावाप्रमाणेच सगळे काही निमूटपणे समाधानाने करत होती. आणि आता आजुबाजुला असलेल्या ग्रामीण भागातील लोक सदाशिवला पौरोहित्य करण्यासाठी बोलावू लागले होते. आणि बायकोला घेऊन या शिधा घेऊन जायला सांगत. एकदा श्रावणात सूनबाईनी पाटलांच्या घरी पुरणवरणाचा स्वयंपाक करुन पाचपंचवीस लोकांना जेऊ घालून सगळ्यांना आश्चर्यचकित केले. पाटील व पाटलोण बाई एकदम खुष. जातांना भरपूर शिधा. साडी चोळी ओटी भरली. सासूबाई म्हणाल्या तुझ्या या स्वयंपाकानेच एक दिवस तुझ्या घरी लक्ष्मी चालत येईल….