दि. 9 ऑगस्ट क्रांतिदिनापासुन सुरु झालेली ही यू-ट्यूब मालिका, आज प्रजासत्ताक भारताच्या घटना समितीपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची नियुक्ती झाल्यादिनी म्हणजेच दि.29 ऑगस्ट रोजी लोकार्पित करीत आहोत. अमृतमहोत्सवी वर्षात विषयानुरूप अनेक उपक्रम करणं शक्य आहे. क्रांतिकथाकथन स्पर्धा, क्रांतिगीतगायन स्पर्धा, देशभावना वाढीस लागेल, या दृष्टीनं स्वतंत्र साहित्यनिर्मिती आणि कलाविष्कार शक्य आहेत. महाराष्ट्राला पोवाड्याची मोठी परंपरा आहे पण काही अपवाद वगळता शिवकाळातच रमलेल्या शाहिरांना अमृतमहोत्सवनिमित्त क्रांतिकारकाच्या कार्यावरचे उत्तम पोवाडे लिहीण्यासाठी प्रवृत्त करता येईल. करण्यासारखे खूप आहे. पण सरकारनेच सर्व करावे अशी अपेक्षा आपण का ठेवावी? सरकार करते आहेच. गेले वर्षभर आकाशवाणी आणि दूरदर्शनवर रोज त्या-त्या दिवशी स्वातंत्र्यलढ्याच्या निमित्त काय घडलं, हे प्रसारीत होतं आहे. हे किती जणांना माहिती आहे? इतरही अनेक कार्यक्रम विविध विभागाच्या वतीने होतं आहेत. राज्याच्या सांस्कृतिक खात्याच्या संयुक्त विद्यमाने हा यू ट्यूब उपक्रम झाला आहे. त्यानिमित्ताने त्यांचे मनःपूर्वक आभार. त्यांच्या सहकार्यामुळेच या मालिकेची निर्मितीमूल्य उच्च राखता आली. मालिकेचं मूळ ज्यांच्या लिखाण-प्रयोगात आहे ते स्व. वसंत पोतदार यांनाही अभिवादन….
ह्या चित्राफिती शाळा-कॉलेजनी विद्यार्थ्यांना दाखवाव्यात. त्यामुळे त्यांच्या मनात कुठेतरी राष्ट्रीय भावना, देशप्रेम यांचं अल्पसं बीज जरी रोवलं गेलं तरी ते या मालिकेचा हेतू साध्य होऊ शकेल. हा ठेवा त्यांना विनामूल्य उपलब्ध आहे.
आपणही याच्या प्रसारासाठी सूचना, मार्गदर्शन करत या कार्यात सहभागी व्हावे ही विनंती….
जय हिंद!