तीळगूळ घ्या मधूर बोला विनवीत येई संक्रांत
परंतु जाई पुन्हा वर्ष ते नियमित ओरड आक्रांत।
संक्रांतीच्या आक्रांतीतही काळोखाचा अवशेष
पुन्हा पुन्हा संक्रांती देती सौहार्दाचे संदेश ।।
--- द्वारकानाथ शंकर (जयंत) वैद्य
इतिहासाच्या पानामध्ये दडल्या गूढ कथा
त्यातुन काही उचलून आणि मानवतेच्या व्यथा
अवगत तुजला असतील आता यातील काही गोष्टी
फिरत फिरत ही अवनी आहे बदलत आहे सृष्टी ।।१।।
उचलून घे तू मित्रा आता यातील काही दाणे
बदलत आहे धरती सारखी हेच आमुचे गाणे
नको पाहु तू मागे वळुनी पुन्हा - पुन्हा जेणे
जुन्या स्मृतीच्या पायावरती हे तर सुंदर लेणे ।।२।।।
-- द्वारकानाथ शंकर (जयंत) वैद्य
ध्येयपूर्तीच्या पथातील आम्ही तीन शिलेदार टाकुनी आपुली धनदौलत ही सोडूनी घरदार
मार्गी येती संकट अगणित तुडवीत गेलो दूर तोडुनि आगुचे बंध रेशमी गंगार्पणी पार
चालत चालत चाल चाललो । निशीदिनी ध्येयपथी अंतिम होता तुझी भेट पण झालो स्थिर जगती
स्थापुन आपुले दोन जिवांचे घरकुल सुंदर छान खेळत बसलो सारीपटी या दिनरात्रीचे गान
कुठे हरवले परंतु माझे जिगरदोस्त दोन पुढे पुढे ते तसेच गेले रात्रीचे उचलुनी वाण
स्मृती गंधाच्या याच शलाका जाळीत जाती जीवा आज तडफडे जीव तयास्तव तृणवत मम ठेवा
-- जयंत वैद्य

संत ज्ञानेश्वरांच्या या कवितेचे रसग्रहण – ज्ञानमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग हे सामान्यांना न झेपणारे मार्ग आणि ज्ञानेश्वरांना तर सामान्यांचा कळवळा. ज्ञानेश्वरांनी सामान्यांना पटणारा, रुचणारा आणि झेपणारा असा जो भक्तिमार्ग त्याचा प्रसार करण्याचे कार्य केले. ज्ञानेश्वरांना ‘गुरुमाऊली’ म्हणून संबोधले जाते. याचे कारण आईने जसे लहान मुलाला बोट धरून चालायला शिकवावे तसे त्यांनी जनसामान्यांना भक्तिमार्गावरून चालायला शिकवले. वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदी येथे संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली.

‘कोलंबसाचे गर्वगीत’ ही कुसुमाग्रजांच्या गाजलेल्या कवितांपैकी एक. या कवितेत मानवतेचे निशाण हाती घेऊन नवनवे प्रदेश शोधून काढणाऱ्या कोलंबस या खलाशाचे, त्याच्या ध्येयासक्तीचे चित्रण कुसुमाग्रजांनी केले आहे. ही कविता कुसुमाग्रजांनी १९३६ मध्ये लिहिली. त्या वेळी ते केवळ चोवीस वर्षांचे होते. ऐन तारुण्यात त्यांच्या प्रतिभेने मोठी झेप घेतली आणि काव्यप्रेमींचे लक्ष वेधून घेतले.

चकोर पक्षी हा कोवळ्या चंद्रकिरणातील अमृत पिऊन जगतो अशी एक कल्पना आहे. चंद्रकिरणामधे शीतलता, मृदुता आणि संजीवकता असते. तिचा लाभ चकोराला होतो. असे हळुवार चंद्रकिरणांसारखे मृदुत्व योग्याच्या ठिकाणी असते. हे मृदुत्व आणखी कोणासारखे? तर पक्षिणीच्या पंखासारखे असते. आईच्या पंखांचा आश्रय हे पिलांचे सर्वस्व असते. कारण पंखांमुळे त्यांना उबारा मिळतो. पिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते. योगी पुरुषांचेही असेच असते. त्यांच्यामुळे सर्वसामान्य माणसाला मानसिक आधार लाभतो..
कल्पनेच्या इमल्याहूनी खररीखूरी झोपडी बरी
स्वप्नातल्या पर्यापेक्षा लग्नाची बायको खरी !!
अर्थेचा लाविती अनर्थ ही अनर्थात अर्थ शोधिती माकड वानर मानवजात ही
असामान्यता मानिती डरकाळी फोडिता तयाला शेर इ काश्मिर म्हणती
आणि तमाने लाभ मारिता गर्दभ पदी स्थापिती कशी ही उलटी जनता रिती ।।१।।
नरेचि केला नारयण जगी दांभिक जन फसती नारायण न वसे जगी या नाते आकाशी
परंतु जेव्हा येता लग्ना स्वसुता सौदामिनी जातो कोठे विश्वभाव हा जातीतच बुडूनी
अशी ही उलटी जनता रिती ।।२।।
प्रत्येकाने आपआपुले कार्य करावे खरे त्यातच देशोद्धारण वसे
हरेक सांगे सांगे संगी सांगे त्याचा संगी परंतु रचवी कागदपत्रे त्यांची हो ना जंगी
प्रत्येक जाणतो कर्तव्य पराचे स्वहिताचे अधिकार असा हा लग्नाचा संसार ।।३।।
मी एक त्यातला असे मी जाणतो सर्व हे ठसे पण अगतिकता ही असे
मग मीही हसतो मजला संसार जगाचा सजला ।।४।।
--- द्वारकानाथ शंकर (जयंत) वैद्य

पारवा म्हणजे कबूतर. घराच्या कौलारावर अथवा वळचणीला काहीही हालचाल न करता तासन्तास शांतपणे बसून राहिलेले कबूतर अनेकांनी पाहिले असेल. एखाद्या योग्याप्रमाणे जणू काही ध्यान लावल्यासारखे ते स्थितप्रज्ञ बसलेले असते. कबुतराचा आवाजदेखील घुमल्यासारखा धीरगंभीर असतो. अशा स्थितप्रज्ञ पारव्याचे चित्र बालकवी कसे रेखाटतात पहा
मुंबईची कथा आणि व्यथा सांगणारी ही कविता श्री द्वारकानाथ शंकर उर्फ जयंत वैद्य यांनी सर्वप्रथम १९८२ साली लिहिली. जसजसा काळ पुढे गेला तसे संदर्भ बदलले, मुंबईसुद्धा बदलली. या कवितेचा पूर्वरंग १९८२ मध्ये तर मध्यरंग १९९५ मध्ये लिहिला गेला. आता लिहिलेला हा उत्तररंग मुंबईची व्यथा जोरकसपणे मांडतो आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti